गावांच्या नावाचा इतिहास

Submitted by कुमार१ on 5 March, 2013 - 04:54

गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगमनेर : ईथ ३ नद्यांचा संगम होतो म्हनुन संगमनेर. प्रवरा , म्हाळुंगी आणि तिसर्‍या नदीच नाव आठवत नाही.>>>

प्रवरा, आढळा, आणि म्हाळुंगी! ह्या तीन नद्या ह्यांच्या संगमावर म्हणून संगमनेर!

आमचे मुख्याध्यापक होते शाळेचे. ते गावाच्या नावांच्या गमतीशीर पौराणिक आख्यायिका सांगत..

देव दानवांच्या समुद्र मंथना नंतर अमृत कुंभ निघाला जेंव्हा राहु देवांच्या पंक्तीत बसला आणि भगवान विष्णुने मोहिनीचे रुप घेतलेले तो अवतार म्हणजे राहुचा अरी म्हणजे शत्रू जुथे राहूचा शिरच्छेद केला ते 'राहुरी' . ते उडालेले शीर रतनगडावर जाऊन पडले त्याच्या गळ्यातून जे अमृत ओघळले त्या पासून अमृतवाहिनी ( हे संत ज्ञानदेवांनी प्रवरेला दिलेले नांव) अर्थात प्रवरा उगम पावती झाली. राहुचे धड जिथे जाऊन पडले तिथे हे हाताच्या कोपरावर सरपटू लागले ते कोपरगांव... आणि जिथे मोहिनीने निवास केला ते नेवासे, जिथे आजही मोहिनीराजाचे मंदिर आहे.

आता हा तीन वर्षे जुना धागा वर आलाच आहे तर त्या निमित्ताने काही जुन्या पोस्ट्सविषयी अधिक खुलासा करीत आहे.
१)या धाग्यातील पान क्र. २ वर मंदार कात्रे यांच्या पोस्टमध्ये 'महिकावतीची बखर' या पुस्तकातून सध्याच्या ग्रामनामांची जुनी रूपे दिली आहेत. त्यात काही चुका आहेत. एक दोन चुका मी तिथे दुरुस्त केल्या आहेत. पण वरसावे, बिंबस्थान या विषयी खुलासा करायचा राहून गेला. वरसावे म्हणजे सध्याचे (अंधेरी पश्चिमेचे )वरसोवा नव्हे. अंधेरी वरसोव्याचे मूळ नाम वेसावे किंवा यस्सांवें होते. 'महिकावतीची बखर' मधले वरसावे म्हणजे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर खाडीपुलानजिकचे वरसावे गाव. एक दोन वर्षांपूर्वी हा पूल धोकादायक झाल्याने वाहतूकनियमन करावे लागत होते आणि प्रचंड कोंडी होऊन हा पूल ओलांडायला तासभर वेळ लागत असे.
दादर म्हणजे जिना हा अर्थ आजही प्रचलित असला तरी असाही एक अर्थ आहे:
' "दादराचा अर्थ तरी 'वोहोटीचे समयीं वीथभर पाणी असत नाहीं व चिखलही नाहीं' ... पेशवे दफ्तर रुमाल ३४, पत्र ५०."' दादर, दादरें, दादरा या नावाची अनेक गावे उत्तर कोंकण आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर सापडतात. अगदी वसईच्या पूर्वेस आतमध्ये दादरे हे गाव आहे 'उमेळें ते गोखिरवे या भागात हे गाव आहे' असा उल्लेख साष्टीच्या बखरीच्या परिशिष्टांत आहे. 'दादरा पडलाय' असा वाक्प्रचारही ऐकला आहे. त्याचा अर्थ खूपच ओहोटी लागून एरवीचा पाण्याखालचा भाग उघडा पडलाय.
'बिंबस्थान' या नावाविषयी एक नव्या माहितीचे संकेत मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाने या वर्षी केलेल्या साष्टी बेटाच्या सर्वेक्षणातून मिळाले आहेत. या सर्वेक्षणात भाभा अणुशक्तिकेंद्राच्या संरक्षित प्रदेशात नव्यानेच सापडलेल्या एका इ.स. १३६८च्या शिलालेखात बिंबस्थान या शब्दाने माहीम-मुंबईचा प्रदेश दर्शवला आहे. हा शिलालेख म्हणजे एक सरकारी आज्ञापत्र आणि दानपत्र आहे.
पौड हे नाव महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळते. पऊड, पव्वुड, पौड हे शब्द 'प्राकृत' या शब्दाची जनरूपे असावीत. म्हणजे गावठाण, गावंढे, मुख्य गावानजीकची वसती अशा अर्थाने. तिथली सहज नैसर्गिक भाषा ती प्राकृत आणि मुख्य सुस्थापित गावाची भाषा ती सुसंस्कारित संस्कृत, असे कदाचित असू शकेल. खुद्द मुंबईत, विले पारले पश्चिमेला इरले गावात दोन उपगावे आहेत. एक सेंट जॉन विलेज आणि दुसरे पौड विलेज. या पौड गावात एक पाचशे वर्षे जुनी ग्रामवापी (विलेज वेल) जी इथल्या स्थानिकांना माहीतच होती, तिची अधिकृत नोंदणी या सर्वेक्षणामुळे होऊ शकली आहे. या विहिरीवर ईस्ट इंडियन क्रिस्टियनांचे उंबराचे पाणी वगैरे विधी आताआतापर्यंत साजरे होत होते,अजूनही होत असतील.
धारावें या नावाचीही काही गावे आहेत. वान्दरे-शीव दरम्यानची धारावी झोपडपट्टी सर्वांना माहीत असतेच. पण गोराई खाडीतही धारावे नावाचे बेट आहे. या विषयीची साष्टीच्या बखरीच्या परिशिष्टातली मनोरंजक माहिती :"बोरिवलीच्या पश्चिमेस वसईच्या खाडीच्या तोंडाशी समोर एक चिंचोळे बेट आहे. त्यात खाडीच्या तोंडाजवळ धारावी हें ठिकाण आहे. येथे एक फार मजबूत किल्ला होता. ह्या बेटातील किल्ल्यावरून वसईचे संरक्षण उत्तम प्रकारें करितां येत असे. म्हणून या बेटास त्या काळी वसईचा नाका असें म्हणत असत.(पेशवे दफ्तर रुमाल १६ पत्र २७) धारावी घेतल्याशिवाय वसई मिळत नाहीं असें त्यावेळचे सरदार नेहमीं म्हणत. ह्या बेटांत लांब लांब दगडाच्या खाणी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी एक गायमुख आहे. ह्यांतून गोड पाणी वहातें. प्रस्तुतच्या ( वसई किल्ल्याची मोहीम) मोहिमेंत या गायामुखास फार महत्त्व आलें होतें. बखरींतही ह्याचा उल्लेख आला आहे. ह्या बेटांतून वसईच्या किल्ल्यावर व खाडींत पल्लेदार तोफांचा मारा चांगलाच होई. ई.स. १७३७ मध्ये ह्या बेटावर पेशव्यांनी पहिला हल्ला केला होता. 'धारावीमुळे एक काय हलहल लागली ते ईश्वरास ठाऊक.' असे चिमणाजी आपांचे ता.४/४/१७३८ तले (पे.द.रु.३४ पत्र १११) उद्गार आहेत. ता. ६/३/१७३९ मध्यें दोनतीन महिन्यांचे वेढ्यानंतर पेशव्यांनी धारावी जिंकली."
आणखीही लिहिण्यासारखे आहे, ते नंतर कधीतरी.

'औरंगाबाद चे पूर्वीचे नाव 'खडकी'.
हे शहर मलिक अंबर या निजामशाहीतील सेनानीने वसवले. त्याची कबर खुलताबाद येथे आहे.

कुमार१, खडकी हा शब्द संस्कृत 'कटक' किंवा हिंदी/प्राकृत 'कटकई' वरून आलेला असावा. त्याचा एक अर्थ सैन्य, सैन्यदल, सैन्यस्थळ असा होतो. म्हणजे सैन्याचा तळ किंवा कँप.

' अंदमान' ची व्युत्पत्ती :
सीतेच्या शोधात निघालेला हनुमान प्रथम या बेटांवर पोचला ..>> हन्दुमान ...>>> अंदमान.

'निकोबार' हा कन्नड 'नक्कवरम' वरून आलाय. त्याचा अर्थ ?

माझे गाव अकोला,

महाराजा मिर्झा राजे जयसिंह जेव्हा दख्खनमध्ये आले तेव्हा त्यांनी सोबत मोठी फौज आणली होती, ह्या फौजेतील एक (जयसिंहांचा) मंडलिक राजा होता 'महाराजा अकोलसेन' जयसिंहांचा तळ अकोला जिल्ह्यात बाळापूरला पडला होता (मन नदीच्या किनारी) तिथे आज त्यांनी बांधलेला एक छोटेखानी भुईकोट किल्ला सुद्धा आहे. तर राजा अकोलासेन ह्याने नावारूपाला आणलेले शहर म्हणून आमचे गाव अकोला. (ह्याच नावाचे एक तालुक्याचे ठिकाण राजस्थानमध्ये सुद्धा आहे असे ऐकिवात आहे)

-----------------

तसे पाहता अकोला सातवाहन कालीन असावे, फक्त त्याचे काही ऐतिहासिक दस्तावेज किंवा अस्सल कागदपत्रं माझ्या माहितीत नाही.

पांडुरंगपूरपासून पंढरपूर.

सुल्तान अहमद निजामशाहने वसवले म्हणून अहमदनगर.

गुजराथचा तत्कालीन शासक सुलतान अहमद शाहने सन १४११ मध्ये वसवले ते अहमदाबाद.

राजा भोजच्या भोजपूरपासून भोपाळ. भोपाळच्या विमानतळाला राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतात.

उस्मानाबाद शहराला हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम - मीर उस्मानअली खानचे नाव दिले आहे.

शिवाजीनगर नावाची अनेक गावे, पेठा, रेल्वे स्टेशने आहेत. पाहा : https://mr.wikipedia.org/wiki/ वर - शिवाजी नावाच्या संस्था

भंडारा
माझे गाव तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध... (बनवण्यासाठी) ती भांडी ठोकून बनवताना होणाऱ्या भण-भण या आवाजावरून गावाचे नाव पडले भाणारा
त्याचा अपभ्रंश होऊन भंडारा नाव झाले.

महू - MHow - Military Headquarters Of War

नाॅयडा - NOIDA - New Okhla Industrial Development Authority

Bombay - Bom Bay (चांगला उपसागर)

बेलापूर सीबीडी - बेलापूर सेन्ट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट

PCNT Post Office, पुणे ४११०४४ - पिंपरी चिंचवड न्यू टाऊन पोस्ट आॅफिस

सिडको - सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन

नरिमन पाॅईंट - हे नाव Fali Sam Nariman ह्या मुंबईतील प्रख्यात वकिलाच्या नावावरून पडले आहे.

वरती ६ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या शुद्ध मराठी यांच्या प्रतिसादात पान्डुरंगपुर वरून पंढरपुर आले असे दर्शवले आहे. पण मूळ गाव कन्नड भाषेत पंडरिगे असे अनेक विद्वान मानतात. तसेच त्यांच्याच २३/१०/२०१८च्या प्रतिसादात बॉम्बे हे बॉम बे वरून आले असे दर्शवले आहे. पण ही व्युत्पत्ती आता मागे पडली आहे. मुळात ज्या बॉम बाहिआ या गुड बे अर्थाच्या पोर्तुगीज शब्दावरून बॉम्बे आले असे मानले जात असे, तो शब्दच जुन्या पोर्तुगीज व्याकरणानुसार चुकीचा आहे असे सिद्ध झाले आहे. आता मुंबादेवी किंवा मुंबारक दैत्य किंवा बिंबस्थान यापैकी कोणत्यातरी एका शब्दावरून मुंबई हा शब्द आला असावा असे मानले जाते.

कोपरावर सरपटू लागले ते कोपरगांव
>>

दैत्यगुरु शुक्लचार्य यांनी कोपराने गोदावरी ज्या भागात ढकलली तो कोपरगाव.

(रामायण काळातील दंडकारण्य म्हणतात तो हाच भाग असं कुठं तरी वाचलंय)

वरील ४ प्रतिसादांत चांगली माहिती मिळाली.
'मुंबई'ची व्युत्पत्ती त्या शहराप्रमाणेच गाजत राहणार हे नक्की !

<नरिमन पाॅईंट - हे नाव Fali Sam Nariman ह्या मुंबईतील प्रख्यात वकिलाच्या नावावरून पडले आहे.>
फली नरिमन अजून आहेत. हे नाव खुर्शीद नरिमन यांच्यावरून दिले गेले आहे.
मुंबईच्या ब्रिटिशकालीन इतिहासाबद्दल रोचक लेख

पारनेर तालुका - पराशर ऋषी यांचा आश्रम इथं असल्याने त्या नावाचा अपभ्रंश होऊन पुढे पारनेर असं रूढ झालं.

याच तालुक्यात कान्हूर नावाचे मोठे गाव आहे .. हा भाग पूर्वी बऱ्यापैकी निसर्गरम्य असल्याने निजामकाळातले शासक इकडे फिरायला येत आणि त्यांनी खुश होऊन याला क्या-हे नुर असा संबोधायला सुरुवात केली आणि नंतर त्याचा कान्हूर असा अपभ्रंश रूढ झाला .. काही लोक म्हणतात इथं रत्नाच्या खाणी दडल्याने त्याला कोहिनुर म्हणत असावे पण ते पटत नाही.

'नेर'हा शब्द आपल्याकडे अनेक ग्रामनामांच्या अंती सापडतो. जसे : पारनेर, संगमनेर, चिरनेर, सिन्नर इत्यादि. पुरातत्त्ववेत्त्यांचे असे संशोधन आहे की 'नेर' हा 'नगर'या शब्दावरून आला असावा.

एवरेस्ट:
ब्रिटीश अधिकारी सर्वे करत होते तेंव्हा त्यांच्या लक्षात आले कि या पर्वताला स्थानिक भाषेत विविध नावे आहेत. दार्जीलिंग, तिबेट, नेपाळ इत्यादी वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळी नावे. अखेर सर्वेअर जनरल एंड्र्यू वॉ यांनी आपल्या आधीचे सर्वेअर जनरल सर जॉर्ज एवरेस्ट यांचे नाव या पर्वताला देण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी रॉयल जिओग्राफिकल सोसायटीला कळवले सुद्धा. पण स्वत: जॉर्ज एवरेस्ट यांनीच आपले नाव देण्यास विरोध केला होता. कारण त्यांचे नाव हिंदीत लिहायला अवघड आहे असे त्यांचे म्हणणे होते. तरीही कालांतराने रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने अखेर एवरेस्ट या नावावरच शिक्कामोर्तब केले.

एवरेस्ट शिखराचे स्थानिक भाषेतले नाव चोमो लुंग् मा आहे. त्याचा अर्थ बहुधा सागरमाथा असा होतो.
असम हा आसाम नसून असम किंवा अहम/ अहोम आहे. इथे अहोम वंशीय राजे राज्य करीत होते म्हणून अहोम . अहोमचे पुढे अस्सम / असम झाले.
ळूर/ लूर/ ऊर हे मुळात कन्नड/द्रवीड प्रत्यय आहेत. ( खरे तर कन्नडमध्ये ळूरु) बेंगळूरु, मेंगळूरु,गुंटूर, होस्सूर कित्तूर, कूनूर वगैरे. किंवा काहींच्या मते हे सगळे शब्द ' पुर' म्हणजे नगर/ वसाहत या शब्दावरून आले असावेत.
पुरम वरून वरम आले हेही आपण जाणतो . जसे कांचीपुरम, धर्मपुरम वरून कांजीवरम, धर्मावरम इ.

Pages