गावांच्या नावाचा इतिहास

Submitted by हेमंतकुमार on 5 March, 2013 - 04:54

गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आवडता विषय. मी नेहमीच प्रवासात गावांच्या व्युत्पत्ती मागे हात धुवून लागत असतो.

तिरुनेलवेली गावात काही काळ वास्तव्य होते.
स्थानिकांकडून मिळालेली माहिती.
तिरु = या तमिळ शब्दाचा उल्लेख बऱ्याच तमिळ/ तेलुगू गावांमध्ये येतो. त्याचा अर्थ आहे पवित्र.
नेल+ वेली या शब्दांमागे स्थानिक नेल्लईअपार या शिव मंदिराची कथा आहे. प्रचंड पावसामुळे भातशेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाने आपल्या एका भक्ताच्या शेतावर छप्पररुपी कुंपण घातले होते, असा स्थानिक मंदिरातील जुन्या भुर्जपत्र लिखाणात उल्लेख आढळतो.
नेल वेली म्हणजे छप्पररुपी कुंपण. म्हणून गावाचे नाव तिरूनेलवेली म्हणजे पवित्र कुंपणाचे छप्पर.
---
माणूस आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत जे काही जग आपल्या भोवती उभे करतो त्याचा आविष्कार म्हणजे अशा कथा आणि टोळींच्या वास्तव्याला मिळालेली अनोखी अशी नावे.
(Sapiens पुस्तक वाचनानंतर मनी रुजलेले तथ्य.)

दिग्बोई
आसाममधील हे गाव भारतातील आणि आशियातील पहिली तेलविहीर खोदल्याचे गाव आहे. त्याच्या नावाच्या उगमाबद्दल दोन शक्यता आहेत :
१. ही लोककथा आहे. सन १८६७ मध्ये जेव्हा मजूर इथे तेलविहीर खोदायचे काम करत होते तेव्हा त्यांचा ब्रिटिश अधिकारी त्यांना उत्तेजन देण्यासाठी सतत, “डिग बॉय, डिग” असे म्हणत असे. त्यावरून हे नाव पडले.
(https://assamtourism.gov.in/Digboi1.php)

२. या उपपत्तीनुसार तिथे जवळच वाहत असलेल्या नाल्याचे आसामी नाव Diboi Nallah असे होते. त्याचा अपभ्रंश होऊन या गावाचे नाव पडले.

माझे गाव लातूर. लातूरचे मूळ नाव 'लत्तालुरू'. लातूर हे राष्ट्रकूट राजांचे मूळ निवासस्थान मानले जाते. राष्ट्रकुटांचा पहिला राजा 'दंतीदुर्ग' हा लातूरचा होता. याच घराण्यातील राजा ताम्रध्वज आणि राजा अमोघवर्ष याने त्याकाळातील एक प्रमुख शहर म्हणून लातूर विकसित केले. राष्ट्रकूट वंशातील राजांनी स्वतःला 'लत्तलूर-पुरवराधीश्वर' (लत्तलूर शहराचे अधिपती) अशा पदव्या लावल्या होत्या. काळाच्या ओघात लत्तलूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव 'लातूर' झाले. इसवी सन ७५३ ते ९७३ या काळात राष्ट्रकुटांनी या भागावर राज्य केले. त्यानंतर चालुक्य, देवगिरीचे यादव यांनीही येथे सत्ता गाजवली. दहाव्या शतकातील चालुक्य राजांनी बांधलेले केशवराज मंदिर आणि १२ व्या शतकातील लातूरचा राजा सोमेश्वर तृतीय याने बांधलेले पापविनाश तीर्थ आणि मंदिर आजही दिमाखात उभे आहे. त्याकाळात लातूर किती वैभवशाली होते, तिथली राज्यव्यवस्था कशी होती याची ओळख सांगणाऱ्या शिलालेखाचे वाचन नुकतेच डॉ. श्रीनंद बापट यांनी केले आहे. त्याची लिंक खाली देत आहे. मध्ययुगात हा भाग दिल्ली सल्तनत, त्यानंतर बहामनी साम्राज्य आणि विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता. इस्लामी राजवटीमध्ये हे शहर हळूहळू तेजहीन होत गेले. गेल्या तीसचाळीस वर्षांमध्ये ते पुन्हा नव्याने उभे राहात आहे.

https://www.esakal.com/marathwada/latur-district-historical-inscriptions...

Pages