स्मृतिगंध- एक ह्रदयस्पर्शी प्रेमकथा

Submitted by र।हुल on 7 June, 2017 - 13:43

का गं अशी अचानक सोडून गेलीस मला?..असं मध्येच मला एकट्याला सोडून जाण्यासाठी का आपण एकत्र आलो होतो?..आज आठवतंय सगळं अगदी पहील्यांदा तुला कॉलेजमध्ये पाहून माझं मन तुझ्यावर 'लट्टू' झालतं त्या क्षणापासून ते आजवर घडलं आणि घडवलं गेलेलं जसंच्या तसं आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात..कसा गं आवर घालू या भावनांच्या कल्लोळाला?..कुठं गं शोधू सखे तुला?..तुझ्या आठवणींत रमणं हा तर आता एक छंदच होवून बसलाय...
Engineering च्या पाचव्या semester ला होतो मी आणि तू तिसर्या तेव्हा thermodynamics वरील paper प्रेझेंटेशन देताना तुला सर्वप्रथम पाहीलं होतं..ज्या विषयावर आमची बत्ती गुल व्हायची त्या विषयावरील तुझा सहज मुक्त असा वावर बघून जितका तुझा हेवा वाटला नसेल त्याहून हजार पटीनं जास्त तुझं मनाला भुरळ घालणारं सौंदर्य बघून आनंद झालता..काहीतरी सुचक असं ते पुढील काळाचं प्रतीक होतं..काहीतरी जिवनात सापडल्याची ती खुण होती..तोपर्यंत फक्त ऐकून होतो, 'Love at First Sight' काय असतं ते..पण तुझा मुक्त वावर पाहीला आणि माझं ह्रदय तुलाच देऊन बसलो..पहील्या नजरेतलं प्रेम अनुभवलं आणि मग तुझ्यासाठी झुरणं सुरू झालं..त्यावेळेस जगाला नसली जाणिव तरी मला नक्की होती की 'तुझ्या रुपानं असलेला हा अनमोल हिरा माझ्याच कोंदणात बसविण्यासाठी आहे.' असं वाटू लागलं, ' जसं देवानं तुला फक्त माझ्याचसाठी बनवलेलं आहे' आणि मग तुलाच मिळविण्याचा खटाटोप सुरू झाला पण इतकं का सहज होतं ते?..तुझ्यात अन् माझ्यात जमिन-आस्मानाचा फरक होता..पुन्हा तुझ्यावर नजरा लावून बसलेले खुप सारे होते..तुझं अंतरंग नव्हतं गं माहीत तेव्हा..खरंतर कुठल्याही मुलीच्या अंतरंगात काय चाललंय हे ओळखणं सोप्पं नसतं..त्यामुळं मी एकही चुक न करता तुला तुझ्याच मनानं माझ्या जिवनात कायमचं आणण्यासाठी अगदी सावकाश- संथगतीनं आणि सावध पावलं टाकून तुझा विश्वास जिंकण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्याचं ठरवलं.
मी एकएक पाऊल टाकलं आणि तुझ्या विश्वासाला पात्र ठरत गेलो..आजही किती लख्खपणे आठवतं तुझं मला होकार देणं.. अनेकांना कात्रजचा घाट दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावणारी तू, नक्की माझ्या प्रेमात कशी पडलीस गं..माझी कुठली गोष्ट तुला भावली हे मला कधीच कळालं नाही..तुला असं काही विचारल्यावर तु उत्स्फूर्तपणे बोलायचीस, 'मला तुझ्या साधेपणातलं सौंदर्य आणि तुझ्या ठायी असलेला प्रामाणिकपणा भावला'. मलाही हे बोलणं पटायचं मात्र याशिवायही अजून काही होतं जे मला आजवर कधी उमगलं नाही आणि तुलाही तू माझ्याजवळ होती तोपर्यंत कधी ते उमगलं नसावं..
चोरी छुपाये सुरू झालेला आपल्या प्रेमाचा प्रवास नवनवीन वळणं घेऊ लागला..आपण दोघं मनानं जवळ येत गेलो..खुप जवळ आलो मात्र आपण आपल्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाही. त्या न ओलांडण्याईतकं नितीधैर्य आणि संयम आपल्या दोघांच्या ठायी होता..मला वाटतं हे जन्मजात लाभलेलं असावं ज्यामुळं आजच्या ह्या उच्छृंखल जगातही आपल्या दोघांच्या मनाला वासना कधीच स्पर्श करू शकल्या नाहीत..आपल्या दोघांच्यामध्ये जे काही होतं ते शुद्ध प्रेम होतं. अतिशय परिपक्वपणे रूजलेलं हे प्रेमाचं रोपटं सर्वांगानं पुढे बहरणार होतं..पुढं झालंही तसंच! तुझं कॉलेज संपेपर्यंत आपल्यातलं नातं खुपच गहिरं होत गेलं.. एकदूजे केलिए बनलेले आपण नंतर मात्र एका निर्णायक टप्प्यावरती काहीसे जरावेळ गोंधळलो, भांबावलो. प्रेमाच्या ह्या सुंदर मार्गावरती बागडताना आपण समाजरचनेचा कधी विचारही केला नव्हता..किंवा बदलू पहात असलेल्या समाजरचनेमुळं आपण सगळं काही गृहीत धरलं असावं म्हणून जेव्हा आपल्या घरच्यांकडून दोन्ही बाजूच्या जातींचा मुद्दा आपल्यासमोर आक्रमक रितीनं मांडला गेला तेव्हाच आपल्याला समोर काय वाढून ठेवलं होतं त्याची थोडीफार कल्पना येऊन आपण अंतर्मुख झालो होतो..सह्याद्रीच्या कुशीत आपल्या एकांतप्रिय ठिकाणी बसून दोघं विचार करत असताना तु खुपच हळवी होऊन पहील्यांदाच माझ्या मिठीत शिरून धाय मोकलून रडली होतीस..त्यावेळी तुझ्या व्याकुळलेल्या डोळ्यांत बघताना मी घर की प्रेम याचा निर्णायक असा निर्णय घेऊन टाकला..तो भावनेच्या भरात घेतलेला तकलादू निर्णय कधीच नव्हता तर त्याला परिपक्व आणि परिपूर्ण अशा खोलवर केलेल्या विचारांची जोड होती आणि म्हणूनच त्यावेळेस दोघांनी एकमेकांशी घेतलेले कसमेंवादे जेव्हा प्रत्यक्षात निभावण्याची वेळ आली तेव्हा आपण डगमगलो नाही. पुढं आपण जातीची बंधनं झुगारून आणि सकल समाजाची धारणा करणार्या,universal religion अर्थात् मानवता ह्या दृष्टिकोणाने पछाडलेलो दोघं घरच्यांचा विरोध सौम्य करून प्रेमविवाह करते झालो तेव्हा आपण स्वत:चं एक नविन जग बनविण्याचं स्वप्नं पाहीलं होतं.
किती उमेदीनं लग्नं करून तुला मी ह्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आणलं होतं. परक्या जातीतली मुलगी आपल्या घराच्या परंपरा सांभाळेल का, अशा नाना तर्हेच्या शंकांना तु तुझ्या शालीन आणि कुलीन अशा वागण्यानं न बोलता उत्तरं देऊन अगदी सहजपणे सगळ्यांना आपलंसं केलंस. माझ्या कुटूंबात तुझं एकरूप होणं हे तुझ्या ठायी असलेल्या संस्कारांचं प्रतीक होतं. लग्नानंतर तुझं एकेक नवं रुप मी नव्यानं पहात गेलो. एका घरंदाज स्रीजवळ असणारे सारे सारे गुण तुझ्या ठिकाणी मुळत:च वसलेले होते. कोमल ह्रदयाची तू, दुसर्यांचं दु:ख पाहून व्यथित होणारी तू.., अशा तुला जेव्हा मी corporate field मध्ये माझ्या बरोबरीनं वावरताना आणि एकेक धाडसी व्यावसायिक निर्णय घेताना पहायचो तेव्हा, 'आपली निवड किती सार्थ होती' याचा मला अभिमान वाटायचा..कुठलाही निर्णय घेण्याची आणि तो पुर्णत्वाला नेण्याची तुझी क्षमता ही विलक्षण वादातीत होती..माझ्याही पेक्षा खोलवर विचार करणारी तू..तूझा विचारांचा पल्ला खूप दुरचा होता..
जेव्हा मी तुला माझ्या मनीचं 'ते' गुज सांगितलं तेव्हा माझं करीअर वगैरे काहीही कारण पुढं न करता आनंदानं तू मातृत्वाला तयार झालीस आणि मग एक पत्नी म्हणून तुझा मला किती गर्व वाटला. एका सुंदर अशा चिमुकलीची जगातील सगळ्यात अनमोल अशी भेट तू मला दिलीस आणि मी धन्य झालो..त्या दिवशी माझ्या डोळ्यांतून वाहणार्या आनंदासवांना मी मनमोकळेपणानं अबोल वाहू दिलं..त्या चिमुकलीचे पापे घेताना मी कितीतरी वेळ हरवून गेलो होतो..जितका तुझ्यात रंगलो नसेल त्याहून जास्त मला भविष्यकाळात रंगवणारी आता माझ्या जिवनात अवतरली होती ती फक्त तुझ्याचमुळं..मला बाप बनवण्याचं सुख तू दिलंस..तुझी माझ्याजवळ असलेली सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे आपली दोघांची चिमुकली ईशू..हळूहळू आपलं फुलपाखरू शरीर, मन आणि बुद्धीनं वाढत होतं..कधीकाळी तुझ्यात रममाण होणारा मी, आता तुला विसरून ईशूत रममाण होऊ लागलो आणि मग तु लटक्या रागानं माझ्याजवळ तक्रार करायला लागली की, 'तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होऊ लागलंय' अशी..आणि मग कधी मला गम्मत म्हणून आम्हा दोघांना सोडून जाण्याची धमकी द्यायचीस!..तुला तसं वागताना पाहून मला खुद्कन हसू यायचं..पण त्यावेळी कल्पनासुद्धा नव्हती पुढं तसंच काहीसं घडून येईल याची..नियतीच्या मनांत काही वेगळंच योजलेलं होतं..अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या आपल्या पिल्लाला माझ्या एकट्याजवळ सोडून तू अनंताच्या प्रवासाला निघून गेलीस..असं पुढं घडणार हे जर मला आधीच कळालं असतं तर मी तुला त्या दिवशी एकटीला जाऊच दिलं नसतं गं.. छोट्याशा प्रवासाला निघालेली तू दूरवर निघून गेलीस..पुन्हा कधीही न परतून येण्यासाठी..का गं अशी खोटं बोल्लीस माझ्याशी..एवढा का राग आला माझा..मला बाबा म्हणून हाक मारणारी आपली ईशू जेव्हा मला विचारते, 'ममा कुठं गेली?' तेव्हा मनात निर्माण होणारा भावकल्लोळ मला नाही गं आवरता येत..तुझ्यामाझ्या काळजाच्या त्या तुकड्याशी अशा वेळी खोटं बोलताना मन तिळतिळ तुटतं गं..नजर चोरून तिच्याकडं बघावं लागतं..तु गेलीस आणि आपण बघीतलेल्या सुंदर अशा अनेक स्वप्नांचा चुराडा झाला..
आपल्या ईशूत मला तुझं प्रतिबिंब दिसतं..ती आहे पण अगदी तुझ्याचसारखी गोबर्या गालांची..तिचं बघणं, बोबडं बोलण, हसणं ह्या सगळ्यांत मला तुझंच अस्तित्व जाणवतं..तु आम्हाला सोडून गेलीस, आपलं पिल्लू, त्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर टाकून गेलीस..मी तुला दोष नाही देत गं..तो मला आधिकार ही नाही..परमेश्वराला तुझी काही गरज असेल, त्याला कुठलं दुसरं जगाचं काम तुझ्यावर सोपवायचं असेल म्हणून त्यानं तुला बोलावणं धाडलं असावं..दुसरी कुठलीही गोष्ट असती तर मी परमेश्वरावरही हरकत घेतली असती..पण मला तसं करता येत नाही..तु माझ्यावर विश्वास दाखवून तुझ्या शरीराचा तुकडा माझ्या हाती सोपवलास...मला त्याला वाढवायचंय..खुप मोठ्ठं करायचंय..सर्वार्थानं अगदी परिपूर्ण बनवायचंय..आई आणि बाप अशा दुहेरी भूमिका मला पार पाडायच्या आहेत..मी नक्कीच त्या पार पाडेल..तू नकोस गं काळजी करू..आपल्या ईशूचा सांभाळ मी एकटा करेल यात तुलाही काही शंका नसेल.. पण माझं एक काम मात्र माझ्यासाठी करशील ना; 'इथल्या सगळ्या जबाबदार्या संपल्यानंतर मी ज्यावेळी कधी तुला कायमचा भेटायला म्हणून येईल त्यावेळी मला ओळखशील ना गं..की कॉलेजमध्ये तुझ्याशी पहील्यांदा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा, एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकून मला ignore करून निघून गेली होती तसं करशील?'

―तुझाच, प्रेमवेडा ₹!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि पण स्टोरी मस्त लिहिलि आहे.. Happy
आयडी नावाप्रमाणे तुम्ही फक्त लव-स्टोरीज लिहिणार वाटतं... Happy
पु.ले.शु.

धन्यवाद मेघाजी. Happy
आयडी नावाप्रमाणे तुम्ही फक्त लव-स्टोरीज लिहिणार वाटतं...
Happy तसं काही नाहीये.