असं म्हणतात की ताजमहाल बनल्यानंतर शाहजहानने ती कलाकृती साकारणाऱ्या कारागिरांचे हात छाटून टाकले होते, जेणेकरून अशी दुसरी कलाकृती बनवली जाऊच नये. ह्या सृष्टीचा कर्ता-करविताही काही निर्मिती केल्यानंतर ते साचेच नष्ट करत असावा. काही व्यक्ती, वास्तू, जागा म्हणूनच एकमेवाद्वितिय ठरत असाव्यात आणि म्हणूनच महान कलाकृतीही एकदाच बनत असतात.
पण, अस्सल सोनं असलं, तरी त्यावर धुळीची पुटं जमली की त्याची लकाकी झाकली जातेच. त्यामुळे ही पुटं झटकणे हेही एक महत्वाचं कार्य आहे. एका पिढीने जर अस्सल सोनं जतन केलं असेल, तर त्यावर काळाच्या धुळीची पुटं जमू न देणे हे पुढच्या पिढ्यांनी आपलं कर्तव्यच मानायला हवं.
महान कलाकृतीला पुनर्निमित केलं जाऊ शकत नाही. पण तिच्या प्रतिकृती बनू शकतात. ह्या प्रतिकृतीच्या निमित्ताने विस्मृतीची पुटं झटकून सोनेरी स्मृतींना झळाळी दिली जाऊ शकते. गाण्यांची रिमिक्स आणि चित्रपटांचे रिमेक्स करताना हाच एक प्रामाणिक उद्देश असेल, तर होणारी पुनर्निमिती त्या पूर्वसूरींच्या आशीर्वादाने उत्तमच होईल. 'कट्यार काळजात घुसली' ला मोठ्या पडद्यावर आणताना संपूर्ण टीम आपल्या ह्या उद्देशाशी पूर्ण प्रामाणिक राहिली आहे, हे सतत जाणवतं आणि म्हणूनच भव्य पडद्यावर जेव्हा ह्या महान कलाकृतीची प्रतिकृती साकारली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, टाळ्या मिळवते आणि मुक्त कंठाने दादही मिळवते.
'कट्यार' हे एका पिढीने मनाच्या एका कोपऱ्यात श्रद्धेने जपलेलं सांगीतिक शिल्प. आजच्या पिढीतल्याही अनेकांनी त्या शिल्पाला मानाचं स्थान दिलं आहे. त्याचं सुबोध भावे, राहुल देशपांडे आदींनी नुकतंच नव्याने सादरीकरणही केलं होतं. पण तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. हा चित्रपट त्याही वर्गापर्यंत पोहोचणार आहे. नव्हे, पोहोचलाच आहे आणि पोहोचतोच आहे ! ह्या पिढीसाठी अमुक गाणं मूळ नाटकात होतं का की नवीन आहे ? हा प्रश्न वारंवार पडू शकेल. असा प्रश्न पडणे, ह्याचा अर्थ काय होतो ? ह्याचा हाच अर्थ होतो की मूळ संगीत व चित्रपटासाठी केलेलं नवनिर्मित संगीत हे परस्परांत बेमालूमपणे मिसळलं गेलं आहे. 'कट्यार' चा अश्या प्रकारे चित्रपट बनवत असताना 'संगीत' हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं. ह्या आव्हानाला पेलायला चित्रपटकर्त्यांनी उत्तमांतल्या उत्तमांना निवडलं आणि त्यांनी आपली निवड सार्थही केली. 'शंकर-एहसान-लॉय' ह्यांनी आठ नवीन गाणी दिली आहेत आणि एकेक गाणं त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं प्रतिक आहे. कुणास ठाऊक किती वर्षांनंतर एक सांगीतिक चित्रपट - भले 'रिमेक' का असेना - आला आहे ! ह्या नव्या कट्यारीचे नवे सूरही तितकेच धारदार आहेत आणि ते काळजात न घुसल्यास काळीज दगडी आहे, हे निश्चित ! सूर निरागस हो, दिल की तपिश, यार इलाही, मनमंदिरा ही गाणी तर केवळ अप्रतिम जमून आलेली आहेत. समीर सामंत आणि मंदार चोळकर ह्यांचे आशयसंपन्न शब्द, अवीट गोडी असलेलं संगीत आणि अरिजित सिंग, शंकर महादेवन, राहुल देशपांडे ह्यांचे जवारीदार आवाज असं हे एक जीवघेणं मिश्रण आहे. कविराजांसाठी (बहुतेक समीर सामंतनेच) लिहिलेला छंदही सुंदर आहे.
अभिषेकी बुवांचे जुन्या कट्यारीचे संगीतसुद्धा नवनिर्मित करताना त्यावर चढवलेले साज त्याच्या सौंदर्यात भरच घालतात. मात्र मूळ नाटकात असलेली काही स्त्री गायिकांची पदं इथे वगळली आहेत. काही गाणी स्त्री आवाजात असणे आवश्यक होते, त्यामुळे एक प्रकारचा - कितीही नाही म्हटलं तरी - जो 'तोच-तो' पणा आला आहे, तो टाळता आला असता. कहाणीत अश्या नव्या पेरणीसाठीही जागा होत्या, त्या दिसल्याच नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्षिल्या गेल्या, हे माहित नाही. मात्र त्यांवर जाणीवपूर्वक काम करता आले असते, जे केलेले नाही, हेही खरंच. तसेच एका प्रसंगी 'खां साहेबां'च्या संवादांतून आता इथे 'ह्या भवनातील गीत पुराणे..' सुरु होईल असं ठामपणे वाटतं, प्रत्यक्षात ते तिथेच काय, कुठेच येत नाही !
ही सगळी गाणी व कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पडद्यावर दिसणारे झाडून सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटाचे सन्माननीय धनी आहेत. सुबोध भावे तर एक जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहेच. तसं त्याने बालगंधर्व, लोकमान्य व छोट्या पडद्यावरील काही कामांतूनही वारंवार सिद्ध केलं आहे. इथे त्याने साकारलेला 'सदाशिव'सुद्धा अविस्मरणीयच !
विशेष कौतुक करायला हवं ते शंकर महादेवन ह्यांचं. पंडितजींच्या भूमिकेतला शंकर महादेवन, मला वाटतं प्रथमच अभिनय करताना दिसला आहे. स्वत: एक महान गायक असलेल्या शंकर महादेवनना पंडितजींना गाताना साकार करणं तसं सोपं गेलं असू शकेल, मात्र जिथे फक्त आणि फक्त अभिनय हवा होता, तिथेही हा माणूस कमालच करतो ! उच्चार, संवादफेक कुठेही नवखेपण किंवा अमराठीपण औषधापुरतंही जाणवू देत नाही !
चित्रपटाचा 'मालक' मात्र ठरतो तो सचिन पिळगांवकर. छोट्या पडद्यावर व इतर काही जाहीर प्रगटनांतून गेल्या काही वर्षांत 'महागुरू' म्हणून काहीश्या हेटाळणीयुक्त विनोदाचा विषय ठरलेल्या सचिनने साकारलेल्या 'खां साहेब' ला लवून मुजरा करायला हवा. त्याने टाकलेले शेकडो कटाक्ष पडद्याला छिद्रं पाडतात, इतके धारदार आहेत. सचिनची 'महागुरू' म्हणून ओळख विसरून जाऊन त्याला इथून पुढे 'खां साहेब' म्हणूनच ओळखायला हवं. 'खां साहेब' ची आपल्या कलेवरची निस्सीम श्रद्धा, परिस्थितीमुळे आलेली हताशा, पराभवाच्या मालिकेमुळे आलेली नकारात्मकता, त्या नकारात्मकतेतून जन्मलेली खलप्रवृत्ती आणि विजयाचा उन्माद व नंतर शब्दा-शब्दातून जाणवणारा प्रचंड अहंकार हे सगळं एकाच ताकदीने व सफाईने सचिन साकार करतो.
सुबोध भावे, शंकर महादेवन आणि सचिन, ह्या तिघांसाठी आपापल्या व्यक्तिरेखा साकार करताना गाणं समजून घेणे अत्यावश्यक होतं. तिघांपैकी कुणीही त्यात तसूभरही कमी पडलेलं नाही. कुठलीही तान, हरकत आणि साधीशी मुरकीसुद्धा त्यांनी सपाट जाऊ दिलेली नाही. त्यांच्या नजरा व हातांना कुंचल्याचं रुप दिलं असतं, तर प्रत्येक गाण्याचं एक त्या गाण्याइतकंच सुंदर चित्र त्यांनी रेखाटलं असतं. देहबोलीत कुठलीही कृत्रिमता किंवा सांगितल्या बरहुकूम केल्याचं जाणवतही नाही. जे काही केलं आहे, ते त्यांनी स्वत:, उत्स्फूर्तपणे केलं आहे, हे निश्चित.
'उमा'च्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे खूप गोड दिसते ! निश्चयी, खंबीर व गुणी उमा म्हणून ती शोभतेच. तर 'झरीना'च्या भूमिकेत अमृता खानविलकर समंजस अभिनयाने चकितच करते ! आधी म्हटल्याप्रमाणे उमा, झरीना, मृण्मयी आणि अमृता ह्या चौघींनाही एकेक गाणं द्यायला हवं होतं, तो त्यांचा अधिकारच होता बहुतेक !
लहानातल्या लहान भूमिकेतल्या अभिनेत्यां/ अभिनेत्रींनी त्या त्या व्यक्तिरेखेला जगलं आहे. खरं तर मराठी चित्रपट हा अभिनयाच्या बाबतीत इतर बहुतेकांपेक्षा बऱ्याच इयत्ता पुढे आहेच, त्यामुळे तसं पाहता 'मराठी चित्रपट' आणि 'अप्रतिम अभिनय' हे सूत्र कायमस्वरूपी गृहीतच धरायला हवे आणि म्हणूनच कथानकाला सादर करण्याची दिग्दर्शकाची जबाबदारी जरा वेगळ्या पातळीवरचीही मानायला हवी. सुबोध भावेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तरी काही सुटे किंवा ढिले धागे खटकतातच. सदाशिव आणि उमाची प्रेमकहाणी अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर टिपिकल मसाला चित्रपटातला जिन्नस वाटते. मनमोहन देसाई किंवा बडजात्या टाईप. बालपणीचं प्रेम आणि मग अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर ते लहानपणीचं गाणं गाऊन आपली ओळख पटवून देणे हा सगळा मसाला आता शिळा झाला आहे. तो वापरायला नकोच होता. असंही त्यामुळे कथानकाला कुठलाही महत्वपूर्ण हातभार लागत नव्हताच आणि ज्या पातळीला (कलावंताचा अहंकारेत्यादी) बाकी कथानक चाललं आहे, त्यासमोर हे सगळं प्रकरण बालिश वाटतं. चौदा वर्षांनंतर आलेल्या सदाशिवचा आगा-पिच्छाही कथानकात मांडला जात नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेलं आहे किंवा मूळ कथानक माहित आहे, त्यांनाच ते समजू शकतं. इतरांना 'हा कोण आहे ? ह्याच्याशी मिरजेत नेमकी ओळख कशी झालेली असेल ?' इथपासून 'चौदा वर्षं होता कुठे?' इथपर्यंत प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. एका इंग्रज अधिकाऱ्याचं पात्रही असंच अधांतरी आहे. त्याचीही चित्रपटात अजिबातच गरज नव्हती. 'झरीना'ला नाचताना दाखवणे, हा त्या काळाच्या मुस्लीम संस्कृतीचा विचार करता न पटणारा भाग होता, तोसुद्धा टाळता आला असता. तसेच मूळ संहितेत महत्वाचं पात्र असलेल्या काविराजाच्या भूमिकेला इथे बरीच कात्री लावली गेली आहे. इतर अनावश्यक भरणा न करता, ही भूमिका जतन केली गेली असती, तर ? असाही एक प्रश्न पडला.
असे सगळे असले तरी, 'कट्यार' हा असा चित्रपट आहे की जो पाहणे प्रत्येक चित्रपटरसिकाचं कर्तव्यच आहे. (ह्यात सर्व भाषिक आले.) कारण 'म्युझिकल'साठी संगीत देण्याची पात्रता एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची असल्याने 'म्युझिकल्स' चा जमाना आता गेला आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे, असा दुसरा चित्रपट होणे अवघडच आहे.
ह्या सुमधुर संगीतमय कट्यारीच्या घावाची सुगंधी जखम येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाने दाखवण्याची एक सुवर्णसंधी सर्व रसिकांना दिल्याबद्दल संपूर्ण 'कट्यार' टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि मानाचा मुजरा !
रेटिंग - * * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-katyar-kaljat-ghusli...
(हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्हमध्ये १५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे.)
--------------------------------------------------------
~ ~ कट्यार काळजात घुसली - Another Take ~ ~
चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.
मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.
हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.
हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)
आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.
संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !
आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.
चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.
तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/12/another-take_1.html
छान वर्णन... मी चित्रपट
छान वर्णन... मी चित्रपट पहाणारच..
सिनेमाआवडला. नवीन गाणी पण खूप
सिनेमाआवडला. नवीन गाणी पण खूप आवडली. पण......
त्यानंतर नाटक बघितलं. राहुल देशपांडेचं. आपली मराठी वर आहे.
http://mtalky.com/o/d.aspx?i=1417
नाटकातला सु. भा. चा बाके बिहारी इतका अप्रतिम आहे की सिनेमात त्यानी तोच रोल करायला हवा होता असं वाटून गेलं.
नाटकातला सुरांचा भुकेला सदाशिव, सिनेमात सूडानी पेटलेला का दाखवला कोण जाणे.
दारव्हेकर मास्तरांनी, नाटकात गाण्यातल्या घराणेशाहीवर भाष्य केलंआहे. सिनेमात तो अँगल फारसा दिसत नाही.
नाटकात, झरीना आणि उमा दोघींनाही गाणी आहेत. शिवाय अप्रतिम अशी रागमालाही आहे.
सिनेमात त्या दोघींनाही गाणे नाही हे खटकले. " लागी करेजवा कटार" खरं तर थीम साँग. ते घेण्यात काय अडचण आली असावी किंवा न घेण्यामागची कल्पना, सु. भा कडून जाणून घ्यायला आवडेल.
थोडं अवांतरः नाटकातील गाण्यातल्या घराणेशाहीवरचं भाष्य हे कै. वसंतराव देशपांडे यांच्यावर बेतलेलं असावं. ते कुठल्या घराण्याचे नव्हते म्हणून समकालीनांनीच नव्हे तर आकाशवाणीनेसुद्धा त्यांचे कार्यक्रम केले नाहीत. पु. लं. ही खंत बोलून दाखवत असत. पुलंनीच सांगितलेला एक किस्सा: कुणीतरी वसंतरावांना विचारलं की तुमचं घराणं कोणतं? ते म्हणाले,"आमच्यापासूनच सुरु होतं आमचं घराणं!"
असो. सिनेमा आवडला तरीही नाटक अधिक उजवं आहे असं वाटतं.
सगळेच प्रतिसाद उत्तम. एकदा
सगळेच प्रतिसाद उत्तम. एकदा सिनेमा बघून मन भरले नाही, पुन्हा बघायचा आहे, पण दिलवाले आणि बाजीराव मुळे खूप कमी ठिकाणी आता शोझ आहेत.
मी गेल्या आठवड्यात बघितला ..
मी गेल्या आठवड्यात बघितला .. त्याआधीचे सगळे विकेंड शोज फुल्ल! मस्त आहे चित्रपट नि आवडला..
आता तीच गाणी ऐकतेय
सामी +१
नाटकातला सुरांचा भुकेला
नाटकातला सुरांचा भुकेला सदाशिव, सिनेमात सूडानी पेटलेला का दाखवला कोण जाणे.
दारव्हेकर मास्तरांनी, नाटकात गाण्यातल्या घराणेशाहीवर भाष्य केलंआहे. सिनेमात तो अँगल फारसा दिसत नाही.
नाटकात, झरीना आणि उमा दोघींनाही गाणी आहेत. शिवाय अप्रतिम अशी रागमालाही आहे.
सिनेमात त्या दोघींनाही गाणे नाही हे खटकले. " लागी करेजवा कटार" खरं तर थीम साँग. ते घेण्यात काय अडचण आली असावी किंवा न घेण्यामागची कल्पना, सु. भा कडून जाणून घ्यायला आवडेल.
सुबोधच्या स्टार माझावरील मुलाखतीत तो याबद्दल बोलला आहे. ती यूट्यूबवर पहा.
मला आठवतंय त्याप्रमाणे- नाटकातला सदाशिव सुबोधला फार साधा सरळ वाटत होता व ते खटकत होतं. त्याला सदाशिव असा impulsive passionate च दाखवायचा होता..ती संधी चित्रपटात मिळाली.
झरीना सिनेमात गात नाही कारण सिनेमात ती गायिका नाही...क्लासिकल डान्सर आहे.
नेट वर चित्रपट उपलब्द आहे का
नेट वर चित्रपट उपलब्द आहे का ? पेड पण सुरक्षित अशा साईट्स चालतील.
झरीना सिनेमात गात नाही कारण
झरीना सिनेमात गात नाही कारण सिनेमात ती गायिका नाही...क्लासिकल डान्सर आहे.>>>
पण 'दिल की तपिश' गाताना दाखवलं आहे ना तिला? तसंच खांसाहेबांबरोबर साथ करायलाही बसलेली दिसते.
रच्याकने, शेवटी खांसाहेब राजमहालातून बाहेर पडतात. सदाशिवभोवती सगळे दाद देत गोळा होतात. झरीना सदाशिवला दाद देत दूरच उभी असते, नंतर वडील निघून गेलेले पाहून त्यांच्यामागून शांतपणे निघून जाते, ते फार आवडलं.
नाही सापडलं तर शेवटी टेसीने न
नाही सापडलं तर शेवटी टेसीने न भितीने एकलीच जाऊन आली पिच्चरला..
कोण जाणो उद्या शुक्रवार तर असले नसले शो पण हाती नै यायचे...
खतरनाक आहे.. कट्यार काळजात घुसली.. व्वाह व्वा बस एवढच निघतं.. शब्द थिटे पडलेत..
मला स्वतःला फिल्म बघण्यापूर्वी गाणी फारशी भावत नाही अपवाद हा ठरला.. कुठल गाणं नेमक कुणी कधी गायलं असेल याचा अंदाज शेवटी बरोबर निघाला..
चित्रपट पाहण्यापूर्वी सर्वात जास्त आवडलेल गाणं म्हणजे 'अरुणी किरणी' आणि त्याखालोखाल कव्वाली 'यार इलाही' .. बघताना तर काटा येतो.. डोळ्यांच नै माहिती पण कान मात्र तृप्त झालेत..
मला तरी 'शिव भोलाभंडारी' हे गाण इतक नै भावलं.. सतत कुठतरी आधी ऐकल्यासारखी धुन वाटते त्याची..
सचिन माझ्यासाठी सरप्राईझ पॅकेज होतं.. नच बलिए सरल्यावर तो आवडेनासा झाला होता.. सतत काय तो सचिनच दिसे.. तो निभावत असलेल कॅरेक्टर दिसणचं बंद झालं होत आणि का तर हमेशा मी मी मी चा स्वर दिसतो त्याच्या बोलण्यात.. पण यात डीट्टो खान साहेब च दिसलाय आणि दाखवला सुद्धा आहे..
शंकर महादेवन ने काही खुप अभिनय क्षमता दाखवली असं नै वाटल पण आहे ते काम छान निभावलय.. सगळ्यात जास्त तो खान साहेब सोबत हरतो त्यावेळी तिथे आवाज गेल्यामुळे जो दर्द आणि प्रतारनेचा अधिक त्याची गायकी कायमची सुटल्याचा जो भाव हवा होता तो नै जमला.. तिथं कळून येत तो गायक आहे अभिनेता नाही..
असो.. तरी ओव्हरऑल मी अजुनही त्याच नादात अडकलीए.. सुरेख...
माझ्या दोन्ही आवडत्या गाण्यात मला सचिनचा अभिनय खुप खुप आवडलाय..हातवारे..डोळे..गाण्याचे लिप्सिंग .. सगळ काही चपखलं..
सुबोध भावे सुद्धा छान.. हा रोल खुप साधा होता त्याच्या गट्स ला बघाव म्हटलं तर.. तो तर लंबी रेस का घोडा आहे..
अरे हां..
चित्रपट सुरु होण्यापूर्वी नटसम्राट चा प्रोमो बघीतला... १ जानेवारी २०१६ .. हा तर बघणारच मोठ्या पडद्यावर असं तेव्हाच ठरवलं मी डोळा मारा
दीपंजली, मस्त पोस्ट्स खरच .
दीपंजली, मस्त पोस्ट्स खरच . सगळेच प्रतिसाद खूपच छान
काळजात न घुसलेली कट्यार :
काळजात न घुसलेली कट्यार : चंद्रकांत लिमये
लिमयांची मुलाखत म्हनजे केवळ
लिमयांची मुलाखत म्हनजे केवळ खवटपणा या पलिकडे काही नाही. असूयाच म्हणू या.
Padukanand +1
Padukanand +1
आपलीमराठी वर आला आहे
आपलीमराठी वर आला आहे कट्यार...
पं. लिमयेंचंही बरोबर अहे.
पं. लिमयेंचंही बरोबर अहे. मूळ नातकातील खुश रहे सनम मेरा हे आजही त्याम्च्याच आवाजात ऐकतो.
लेख पटला व आवडलाही. खवटपणा
लेख पटला व आवडलाही. खवटपणा अजिबात वाटला नाही. प्रत्येकाचे मत वेगळे असूच शकते.
लेख मलाही खुप पटला. चित्रपट
लेख मलाही खुप पटला. चित्रपट मला आवडला पण लेखातले मुद्देही तितकेच बरोबर आहेत, मला चित्रपट पाहताना हे सगळे खुप खटकले होते. चित्रपट संगितासाठी आवडला, पण कथानकाने निराशा केली. मुळ कथा अजुन चांगल्या त-हेने मांडता आली असती.
पण तरीही, असो. जे पडद्यावर दिसतेय तेही खुप छान आहे. माझ्या घरातली नेक्स्ट जनरेशन या निमित्ताने "सुरत पियाकी.. " ऐकतेय, सोबत गायचा प्रयत्न करतेय हेही खुप मोठे यश आहे या चित्रपटाचे.
चंद्रकांत लिमयेंची मतं पटली.
चंद्रकांत लिमयेंची मतं पटली. ज्याप्रमाणे त्यांना सचिनचा अभिनय थोडा 'ओव्हर अॅक्टिंग'चा दोष वगळता आवडला, त्याचप्रमाणे मलाही त्यांची मतं थोडा पूर्वग्रह आणि अहंभाव वगळता आवडली. खांसाहेबांचं खलनायकीकरण, सदाशिव-उमाचं पोरकट प्रेमप्रकरण, बाष्कळ व उथळ कविराज असे संहितेतले बहुतांश बदल निश्चितच खटकणारे आहेत.
मुळात नाटक आणि चित्रपट ह्यांची तुलना करायची असेल, तर अनेक बाबतींत जसा चित्रपट कमी पडेल, तसाच अनेक बाबतीत तो नाटकापेक्षा उजवाही वाटेल. खासकरून तांत्रिक बाबी. सहसा भावनाप्रधान नाटकात लाऊड अभिनय केला जातो. करावाच लागतो, अन्यथा तो भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही. मात्र चित्रपटात थोडं अंडरप्ले करावं लागतं. असे अनेक फरक हे माध्यमांतच असल्याने नाटक वि. चित्रपट अशी तुलना करायचीच असेल तर अनेकविध बाबींचा सखोल व तटस्थ विचार करायला हवा आणि सगळा ताळेबंद मांडून मग निवाडा करायला हवा.
संगीतविषयक त्यांची मतं एकांगी विचार करून बनवलेली वाटली. नाटकात जेव्हा विविध पदं सादर केली जात/ जातात, तेव्हा त्यांना वेळेची मर्यादा नसे/ नसते. इथे तसं नाही. हा मुलभूत फरक लक्षात घ्यायला हवा. दुसरं असं की दोन्हीचा 'टार्गेट ऑडीयन्स' खूपच वेगळा आहे. आजचा प्रेक्षक लुंगी डान्स, ब्ल्यू है पानी, फेविकॉल वगैरेचा आहार करणारा आहे. त्याच्या समोर तुम्ही बैठकीचं शास्त्रीय गायन ठेवलं, तर ते त्याला पेलणार आहे का ? चित्रपटातून जर विलंबित ख्याल सादर केला गेला असता, तर तो झेपणार आहे का ?
संगीताच्या नावाने निव्वळ दळभद्रीपणा चाललेला हा काळ आहे. 'अठराविश्व दारिद्र्य' हीच फक्त पुढची पायरी बाकी राहिलेली आहे. कोरड्या रखरखाटात एक थंड हवेची झुळूक आल्यावर सुखावायचं की, 'आमच्या काळी अशी हवा सतत चालायची' म्हणत त्या झुळूकेला झिडकारायचं, हा किमान माझ्यासमोरचा तरी 'चॉईस' आहे आणि मी माझा 'चॉईस' केला.
चंद्रकांत लिमयेंची मतं पटली.
चंद्रकांत लिमयेंची मतं पटली. ज्याप्रमाणे त्यांना सचिनचा अभिनय थोडा 'ओव्हर अॅक्टिंग'चा दोष वगळता आवडला, >> +१
पण,
समाजाला नासवण्याचा प्रकार >> हा मला तरी चित्रपटात दिसला नाही.. मी नाटक पाहिल नै हे मान्य तरी इतकं एक्स्ट्रीम मत पटत नाही .. असे बरेच जण या काळात आहे ज्यांना या नावाचं नाटक होतं हे पण माहिती नव्हतं पण चित्रपट आल्यावर मात्र आवर्जुन पाहायला गेले. अधिक अशी बरेच लोक माझ्या नजरेत आहेत कि ज्यांना सास्त्रीय संगीत आवडतं हे सुद्धा सांगायला भिती वाटते कारण त्यानंतर ती आवड लोकांच्या टवाळी चा विषय होतो पण चित्रपट बघताना मात्र सर्वच एज ग्रुप चे लोक मला चिरपटगृहामधे दिसलेत.. अगदी १३ १४ ते ७० ८० वयोगटातील सर्वच लोकं.. नाटकाला एवढी आणि अशी ऑडीयन्स मिळणं मला तरी या दिवसात जरा कठीणच वाटतं ..
बाकी विचार एकेकाचे
अशी बरेच लोक माझ्या नजरेत
अशी बरेच लोक माझ्या नजरेत आहेत कि ज्यांना सास्त्रीय संगीत आवडतं हे सुद्धा सांगायला भिती वाटते कारण त्यानंतर ती आवड लोकांच्या टवाळी चा विषय होतो
>> कधीकधी माझंच असं होतं.
अशी बरेच लोक माझ्या नजरेत
अशी बरेच लोक माझ्या नजरेत आहेत कि ज्यांना सास्त्रीय संगीत आवडतं हे सुद्धा सांगायला भिती वाटते कारण त्यानंतर ती आवड लोकांच्या टवाळी चा विषय होतो>>>
अश्या लोकांना भीक घालू नये.. आपल्याला जे आवडते ते ऐकावे... आणि शास्त्रीय संगीत आवडत असेल तर नक्कीच ऐकावे आणि बिनधास्त सांगावे...
लिमयेंचा लेख आवडला- विशेषतः
लिमयेंचा लेख आवडला- विशेषतः कथेतल्या बदलांबद्दल. खांसाहेब हे कॅरॅक्टर सिनेमामध्ये अत्यंत एकांगी केले आहे ज्याची काहीएक गरज नव्हती. त्यांना असलेली संगीताची तळमळ, त्यांचे मनातले द्वंद्व दाखवले नाही ही पटकथेमधली खूप मोठी चूक होती. पण चित्रपटाचे संगीत उत्तम आहे, अप्रतिम आहे. त्याबाबत त्यांचे पटले नाही.
हा अभि प्राय फक्त संगीता
हा अभि प्राय फक्त संगीता पुरता आहे. म्हणजे म्युजीक.
नाटकातली गाणी ऐकली ना की ती नुसती आहेत. नाटकातली गाणी त्यांच्या जागी बेस्ट क्लासिक्स. कोणताही अभिनि वेश नसलेली अशी आहेत. हिरे माणकं पेटीत ठेवावी अशी. किंवा सिल्कची साडी घडी करून ठेवावी तशी.
नवी गाणी सर्व ऐका. एक प्रकारचा अभिनिवेश आहे. काही तरी प्रूव्ह करून दाखवायचे आहे असे वाट्ते.
त्यातल्या त्यात राहुलचा आवाज जुनी आठ्वण करून देतो. तेजोनिधी मध्ये शंकर फार कमी पडतो.
मला नवी गाणी आवडली आहेत. छान बांधली आहेत. पण काय होते जुनी कशी सवयीची म उ गोधडी असल्यासारखी आहेत. त्यात गुरफटून स्वस्थ आस्वाद घ्यावा.
त्यामानाने नवी अंगावर येतात. सिंथेटिक कापड बेतून शिवलेल्या ड्रेसासारखी. थोडावेळ ठीक.
मी लेख वाचला आणि खूप पटला.
मी लेख वाचला आणि खूप पटला. (मी अजूनही सिनेमा बघितलेला नाही. बघेन तेव्हा नवीन कलाकृती म्हणून बघेन. तुलना टाळून. पण मतं बदलतील की नाही माहिती नाही.)
मला माझ्याच पोस्टीतले अनेक उल्लेख आठवले, जे पं. चंद्रकांत लिमये यांच्याही लेखात आहेत. मला खूप मस्त वाटलं. नाटक बघताना मला ते जसं पोचलं ते तसंच पंडितजींच्या लेखातून दिसलं आणि ''हायला!!! मीपण हेच म्हणत होते!म्हणजे नाटक कसं बघायचं हे थोडंसं समजतं म्हणायचं आपल्यालाही!!" असंही वाटून मजा आली. असो.
लिमयांचा लेख नाटकाची संहिता
लिमयांचा लेख नाटकाची संहिता आणि चित्रपटाची पटकथा यांच्यातली तुलना म्हणून ठीक, पण सादरीकरण?
यूट्यूबवर लिमयांनी काम केलेला प्रयोग आहे आणि मला तरी तो महाकंटाळवाणा झाला. तीच गत संगीताचीही. लिमयांनी असं म्हणावंच की ते वसंतरावांची पदं त्यांच्याइतकीच चांगली सादर करतात वा करू शकले. किंवा खानसाहेबांची द्विधा/तळमळ अभिनयातून पोचवू शकले! तुमची कमतरता विरुद्ध चित्रपटाच्या टीमच्या कमतरता यात काय चर्चा करायची? जर लोकांपर्यंत पोचणारच नसेल तर उत्तम संहितेला कवटाळून बसण्याचा उपयोग काय?
सुबोधने त्याच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सिनेमा हे 'नाटकाचं रेकॉर्डिंग' असू शकत नाही. हे माध्यमांतर आहे. आणि तेही आजच्या प्रेक्षकाला रुचेल अशा पद्धतीने सादर केलेलं आहे. ते सगळ्या वयोगटांतल्या प्रेक्षकांना रुचलेलं आहे हे आता प्रत्यक्ष सिद्ध झालेलंच आहे. संहिता लिमयांची नाही, संगीत त्यांचं नाही, लोकप्रियतेत त्यांचा वाटा नाही, मग लिमयांना वाईट वाटायचं कारण काय? कसला अपमान? कसलं विद्रुपीकरण? काय नासवलं चित्रपटाने नक्की?
नाटकाची संहिता संगीतातल्या घराणेशाहीभोवती फिरते कारण नाटक आलं त्या काळात तो विषय महत्त्वाचा होता. चित्रपट कला ही कलाकारापेक्षा कशी मोठी आहे आणि असाधारण कलाकार घडण्यासाठी केवळ तंत्र शिकणं पुरेसं नसतं तर माणूस म्ह्णूनही मोठं व्हावं लागतें हा संदेश देतो आहे - जो आजच्या काळाला रेलेव्हन्ट आहे.
>> नवीन लोकांना याबाबतीत जुन्या जाणत्या गायकांचा आणि विद्वानांचा विचार घ्यावासा का वाटत नाही?
हे खरं दु:ख असावं बहुधा लिमयांचं.
लिमयेंचा लेख आवडला- विशेषतः
लिमयेंचा लेख आवडला- विशेषतः कथेतल्या बदलांबद्दल. खांसाहेब हे कॅरॅक्टर सिनेमामध्ये अत्यंत एकांगी केले आहे ज्याची काहीएक गरज नव्हती. त्यांना असलेली संगीताची तळमळ, त्यांचे मनातले द्वंद्व दाखवले नाही ही पटकथेमधली खूप मोठी चूक होती. पण चित्रपटाचे संगीत उत्तम आहे, अप्रतिम आहे. त्याबाबत त्यांचे पटले नाही. >>> मलाही साधारण असेच वाटले तो लेख वाचून.
त्यांच्या शेवटचा परिच्छेद तर
त्यांच्या शेवटचा परिच्छेद तर बाजीराव-मस्तानी पाहून दोन्ही चित्रपटांवरचा राग एकत्रित व्यक्त केल्यासारखा आला आहे
एक सचिनचा अभिनय आणि गाणी
एक सचिनचा अभिनय आणि गाणी सोडली तर बाकी इतका खास वाटला नाही. दोघींपैकी कोण प्रेम करत आहे त्याचे काही नाही. किमान पुष्कर क्षोत्री यांनी तरी अशी भुमिका करू नये. कैच्याकै पात्र आणि त्याचे कॅरेक्टर बनवले आहे. एखादा विदुषकाची एंट्री होते तशी त्याची केली आहे. मृण्मयीच्या वाटेला संवाद कमी रडणे जास्त आहे. अमृता कॅरेक्टरमधे छान शोभत आहे. सचिनच्या जागी दुसरा कोणी असता तर चित्रपट फसलेला होता असे म्हणावे लागले असते. त्याचा खलनायकी बाकीच्यांना खाऊन जातो. शंकर महादेवन काही अॅक्टर नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलणे अयोग्य ठरेल. परंतू त्यांची वेशभुषा आणि कॅरेक्टर असे दाखवले आहे की सतत मैद्याचे पोते हळुहळू चालत येत आहे असे सारखे वाटते.
एक सामान्य पटकथा आणि असामान्य सर्वोत्तम संगीत आणि उत्कृष्ट खलनायक या तिन गोष्टींमधे चित्रपटाचे वर्णन करता येईल.
तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा
तरी आजच्या पिढीतला एक भलामोठा वर्ग असा आहे, ज्याला हे नाट्य केवळ ऐकूनच माहित आहे. >>> खरं आहे. आज टीव्हीवर नाटक पाहीलं तेव्हाच कळाली ताकद. संगीत नाटक म्हटल्यावर आपल्याला काही कळणार नाही या समजाला तडा दिला या नाटकाने...
राहुल देशपांडेनं जिंकून घेतलंय
/
/
कट्यार बघताना एक गोष्ट कळली
कट्यार बघताना एक गोष्ट कळली नाही, की त्या खिद्रापूरच्या शिवमंदिरात पंडितजी जातात, तिथे त्यांची उमा आणि सदाशिवशी भेट होते. तो पूर्ण भाग महाराष्ट्रातील मराठी आहे (खिद्रापूर हा उल्लेख उमाच्या बोलण्यात आला आहे), लोकांची वेषभूषा मराठमोळी आहे मग तिथे सदाशिव 'शिव भोला भंडारी' हे हिंदी गाणे कसं गातो, ते मराठी गाणं दाखवलं असतं तर जास्त उचित वाटलं असतं.
Pages