"गर्भसंस्कार"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39

डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालाजी तांबेचे "गर्भसंस्कार" या पुस्तकाची किंमत वाचुन घ्यायची हिंमत झाली नव्हती त्यावेळेस वाईट वाटले होते

आता हा लेख वाचुन वाटतय बरे झाले नाही घेतले ते.

हे इथे टाकल्याबद्दल डॉ. गायकवाडांना धन्यवाद! या प्रबोधनपर लेखनाबद्दल डॉ. चंद्रकांत संकलेचा व डॉ. अरूण गद्रे यांचे अभिनंदन!

लेखातील एका थोड्याश्श्या अवघड कन्सेप्ट/माहितीबद्दल पुन्हा थोडे लिहितो.

मायलीनेशनः

आपल्या शरिरातील चेतातंतू हे खरोखरचे इलेक्ट्रिक करंट वाहून नेतात, व त्यानुसारच आपले शरीर, स्नायू इ. काम करतात. मेंदूकडून शरिराकडे व शरिराच्या भागांकडून मेंदूकडे सूचना विजेच्या करंटमार्फत जातात. (हे थोडे ओव्हरसिंप्लिफिकेशन आहे, पण गुड वर्किंग एक्स्प्लनेशन) यामुळेच ईसीजी उर्फ "इलेक्ट्रो"कार्डिओग्राम व ईईजी सारख्या तपासण्या होऊ शकतात.

"मायलीन शीथ" हे इलेक्ट्रीक वायरवरील प्लॅस्टीकच्या इन्श्युलेशन कोटिंगसारखे असते. हे प्रत्येक चेतातंतूस (अ‍ॅक्झॉन) असते. हे पूर्ण नसेल, तर वायरिंगमधे शॉर्ट सर्किट्स होतील व सर्किट नीट काम करणार नाही.


मेंदू हे चेतातंतूंचे प्रचण्ड मोठे जंजाळ आहे. ज्यामार्फत चेतापेशी एकमेकींशी संवाद साधत असतात. त्या वायरींच्या जंजाळातील मायलीनेशन नीट नसेल तर सर्किट्स काम करणार नाहीत. अर्थात मेंदू काम करणार नाही. हे वायरिंग पूर्णतः मॅच्युअर होण्यासाठी किमान ३ वर्षे वय लागते, त्यानंतर मेंदूला अर्थात, बाळाला 'शिक्षण' देणे सुरु करता येते. त्यापूर्वी त्यांना 'प्लेग्रूपमधे'ही घालणे हा बावळटपणा आहे..

हेच वरती डॉक्टरद्वयींनी ऑलरेडी सांगितलेले आहे, ते थोडे कमी "युजर फ्रेंडली" शब्दांतले वाटले, त्यामुळे पुन्हा एकदा लिहिले.

डॉ. कैलास, हा उत्तम लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

डॉ. दीमांचा प्रतिसादही माहितीपुर्ण. धन्यवाद.

डॉ कैलास, फार महत्त्वाची माहिती असलेला लेख दिला त्याबद्दल धन्यवाद. हा गर्भसंस्कार प्रकार इतका बोळवला आहे त्याचे फॉलोअर ज़रा तरी सुधारतील अशी आशा.

वर दीमांनी सांगितलेल्या प्रक्रियेत अजून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या घरातला करंट इलेक्ट्रॉन ढकलत होतो बरोबर. शरीरात हेच काम अख्खा अणू ढकलून होतो. https://en.m.wikipedia.org/wiki/Action_potential#/search

अतिशय उत्तम लेख!

नेहमी पडणाऱ्या शंकांचे शास्त्रीय विवेचन वाचुन (बाळाचे हलणे वगैरे) शंका निरसन झाले.

पहिल्या मुलीच्या वेळी मी याबद्दल फार काही ऐकले किंवा वाचले नव्हते. दुसऱ्या वेळी मात्र एका मैत्रीणीने बा तां ची सी डी दिली होती. पण ती सी डी आम्हाला (मला आणि मोठ्या लेकीला) फार आवडायची म्हणून आम्ही ऐकायचो एव्हढेच!

'गर्भसंस्कार' देणाऱ्या पालकांची मला नेहमी मजा वाटते. आपले बाळ 'काहीतरी' मोठेच (डॉक्टर/इंजी ) व्हावे असे मनात ठेवुनच हे लोक त्या बाळाचे अगदी गर्भात असल्यापासून व्यक्तिमत्व घडवू बघतात.. सुजाण नागरिक वगैरे कुणालाच नको असतात Lol

नवीन प्रेगु मुलींना मी नेहमी सांगते 'चांगले खा प्या. जमेल तेव्हढा व्यायाम आणि आराम करा. वाचा. गाणी ऐका' जेणेकरून प्रेगनेंसी च ओझ वाटणार नाही आणि आयुष्यातली थोड़ी आव्हानात्मक/ वेगळी पण नैसर्गिक वाट सुकर व्हायला मदत होईल.

या निमित्ताने भारतात असताना एका कलीगने त्याच्या मुलीवर लोनावळया की कुठे जाऊन 'गर्भसंस्कार' केले होते ते आठवले! आता ती मुलगी २० वर्षाची असेल.

डॉक आणि डॉ दिमांचे आभार.

सुरेख, सही लेख. खूपच माहितीकाऱक आणि ऊपयुक्त. शेअर सुद्धा करण्यात आला आहे.
हल्ली सर्वच पालक स्वतःच अभिमन्यू सारखे स्पर्धेच्या चक्रव्यूहात अडकले आहेत त्यांच्याकडून फार काही वेगळी अपेक्षा नाही धरू शकत.

<<<<<<लेखातील एका थोड्याश्श्या अवघड कन्सेप्ट/माहितीबद्दल पुन्हा थोडे लिहितो.
मायलीनेशनः >>>>>>>

दिमा, याबद्दल स्पेशल धन्यवाद. नेमके तेच सोपे सुटसुटीत करून हवे होते, ते दिलेत.

पण,
<<<< ३ वर्षे ... त्यापूर्वी त्यांना 'प्लेग्रूपमधे'ही घालणे हा बावळटपणा आहे.. >>>> हे नक्की का? म्हणजे ईतरही काहीच फायदा नसतो का? काहीतरी असेल, शारीरीक क्षमता विकसित होणे वगैरे?

उत्तम लेख! डॉक्टर गायकवाड, लेख इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
दीमा, माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

उत्तम लेख! आजकाल आयुर्वेदाच्या नावाखाली काहीही खपवणे सुरु झालेत, ज्याला काहीच शास्त्रीय आधार नाही Happy बर, क्रॉस केल तर एकच उत्तर, प्राचीन ऋषीमुनींनी काय चुकीचं लिहून ठेवलंय का Wink

दीमा,

मस्त समजावलेत! हे मायलीनेशन काय असतं आता छान समजलं!

धन्यवाद!

उत्तम लेख. हेच गर्भसंस्कारवाले ते सुवर्णप्राशन का काय करवतात त्याचेही कितीतरी पैसे घेतात. मागे एकदा त्या दवाखान्यातगेलो होतो,. तर नवरा बायकोवर कचाकचा ओरडत होता आणी कडेवरचं ते मूल भांबावून बघत होतं. त्या सुवणप्राशनाचा नक्की काय उपयोग असा प्रश्न तेव्हा पडला होता.

मी प्रेग्नंट असताना एका ओळखीच्या बाईंनी घरी येऊन तीन चारदा आमंत्रण केलं म्हणून मनशक्तीच्या गर्भसंस्कारांच एक दिवसीय शिबीर अटेंट केलं होतं. शिबीर वाईट काही नव्हतं, उपयोग कितपत झाला माहित नाही. सध्यातरी तिचे सर्व माईलस्टोन्स व्यवस्थित पार पडले आहेत.

पण मला जाणवलेली एक मेव गोष्ट (हे माझं माझ्यापुरतं लागू. जनरलायझेशन नाही) पण त्या शिबीरामुळे नवर्‍याला "आपण वडील होणार, म्हणजे आपली केवळ जबाबदारी वाढत नाही तर मुलाच्या जडणघडणीमधला सहभागही वाढला पाहिजे" ही आलेली जाणीव.

एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! <<< नेमका हाच प्रश्न मी त्या शिबीरामध्ये विचारला होता. त्यावर केवळ गोलमोल उत्तर मिळाले.

बाकी,त्या गर्भसंस्कारांचा काय उपयोग झाला माहित नाही. पण प्रेग्नन्सीमध्ये मी भरपूर वाचन केलंय, लेखन केलंय, चित्रपट पाहिले. झालाच असेल परिणाम तर या सर्वांचा मिळून व्हायला हवा.

खुप छान लेख आहे हा.

असल्या गर्भसंस्कारापेक्षा आहारशास्त्र / आहाराचे महत्व याकडे जास्त लक्ष, पैसा पुरवणे उचित.
बहुतेकांचा समज असतो की गर्भधारणा झाल्यावर आहाराकडे लक्ष द्यावे. परंतु गर्भ धारणा होण्या आधी किमान तीन महिन्यांपासूनच त्यासाठी लागणार्‍या आहाराची सुरवात दोघांनीही करायला हवी.
स्थानिक (जसे भारतात भारतीय आहारशास्त्रातील) आहारतज्ञांच्या सल्ल्या नुसार तयारी करुन घ्यावी.

डॉ. कैलास, हा उत्तम लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
डॉ. दीमांचा प्रतिसादही माहितीपुर्ण. धन्यवाद.

मी पहिल्या प्रेग्नंसीत जवळजवळ रोज बा. तां. ची सीडी ऐकली होती, दुसर्या वेळी ती क्रेझ नव्हती, तेव्हा रोज दुपारी 'बोन्स' या सस्पेन्स सीरीजचे एपिसोड्स निवांतपणे पहायचे. पण दुसरं बाळ स्वभावाला जास्त शांत आहे. ती सीडी ऐकून नक्कीच शांत वाटतं मात्र!

गर्भाचे माहित नाही पण गर्भिणीवर मात्र संस्कार होतात. बर्‍याच अशास्त्रीय गोष्टी मनोरंजक असतात. त्यातली ही एक. कुणीतरी एकदा यावर बोलायला हवच होत. बर झाल लोकसत्तेत ते काम डॉ गद्रे व डॉ संकलेचा यांनी केल. सकाळ न हे छापल नसतं.

ऊत्तम लेख. अनेक (सु?)शिक्षित लोकांना याच्या मागे पळतांना बघितले आहे. शोकांतिका ही आहे की हे कितीही वैज्ञानिक दृष्टीकोनातुन समजावुन सांगितले तरी "कळतय पण वळत नाही" अशी गत असते.

पण,
<<<< ३ वर्षे ... त्यापूर्वी त्यांना 'प्लेग्रूपमधे'ही घालणे हा बावळटपणा आहे.. >>>> हे नक्की का? म्हणजे ईतरही काहीच फायदा नसतो का? काहीतरी असेल, शारीरीक क्षमता विकसित होणे वगैरे?
>> मला समजल्यानुसार दिमां नी हे बौद्धिक विकासाबद्दल म्हटले आहे. मात्र काही जवळच्या लोकांकडुन ऐकलेल्यानुसार फायदे:
१. ३-४ तास मुलांना सांभाळण्यापासुन मोकळा वेळ मिळतो.
२. मुलांच्या कमी असलेल्या प्रतिकारक्षमतेमुळे ती महिन्यातुन १-२ वेळा तरी आजारी पडतात.

BTW, आमच्या आईबापांनी आमच्यावर गर्भसंस्कार न करताही आमची थोडीफार बौद्धीक प्रगती झालीच. त्या वेळी का ऋषी-मुनींनी हे सांगितले नव्हते आणि आताच अतीहुषार लोकांनी ते शोधुन काढले? पण असले प्रश्न विचारायचे नसतात.

बरोबर आहे.
खूप मार्कस मिळवणारेच डॅाक्टर होऊ शकतात हासमज खोटा आहे हे " डॅाक्टर नसेल तिथे "नावाचे पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल.गावागावातल्या अशिक्षीत सुइणीही चांगल्या प्रथमोपचार देऊ शकतात,बय्राच सर्वसामान्य रोगांवर इलाज करू शकतात.
शल्यकर्म करणाय्रा विशारदांना मात्र संपूर्ण शरीर विज्ञान माहीत करून घ्यावे लागते.हल्ली अॅक्यु प्रेशर/पंक्चर वगैरे कोर्स करून "डॅा"पदवी नावामागे लावायचे खूळ वाढत चालले आहे.असे डॅाक्टर 'डेथ सर्टिफिकेट देऊ शकतील का?

ज्यांनी गर्भसंस्कार अटेंड केले आहेत ते स्वतःचे अनुभव शेअर करतील का?

मी माझ्या पासून सुरुवात करते. मी बा.तां.चे पुस्तक वाचले होते. पण पटेल तेवढेच फॉलो केले. याशिवाय उर्जिता जैन यांचे गर्भसंस्कार पुस्तक आणि मालती कारवारकरांचे 'वंशवेल' हे सुद्धा वाचले. आहाराबाबत वंशवेल आणि उर्जिता जैन यांना फॉलो केले.
मी २ गर्भसंस्कार वर्ग अटेंड केले होते. गर्भावर कितपत परिणाम झाला हे अजुन लक्षात आले नाही. पण या वर्गांमुळे खुप छान सकारात्मक वाटे. नवर्‍यालाही तिथे यायला आवडे. एका ठिकाणी वर्ग अटेंड केले तिथे गर्भसंस्कारापेक्षा पालकत्वावर जास्त भर होता म्हणजे मुल झाल्यावर पालक म्हणून तुमची जबाबदारी काय... त्यामुळे वेगळ्या पद्धतीने विचार करता आला.
दुसरा वर्ग अटेंड केला होता त्यात वन टू वन बेसिस वर१५ दिवसातून एकदा एक आयुर्वेदिक डॉ क्लास घेत. ते सुद्धा अतिशय छान होते. योगासने, श्वासाचे व्यायाम इ. सुद्धा शिकवले होते ज्यामुळे प्रत्यक्ष प्रसुतिच्या वेळी मला मदत झाली.

खुप छान लेख आहे.. आणि लेख इथे दिल्याबद्दल डॉ. कैलास यांना धन्यवाद.

>>"लोकसत्तेत ते काम डॉ गद्रे व डॉ संकलेचा यांनी केल. सकाळ न हे छापल नसतं _प्रकाश घाटपांडे "<<
अगदी मनातलं बोललात!

खूप छान लेख!!
डॉ. कैलास, इकडे हा लेख दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद!!

दीमांचा प्रतिसादही मोलाचा आहे. धन्यवाद दीमा!!

त्या सुवर्णप्राशन संस्काराबद्दलही अंजनपर लेख लिहा इथल्या तज्ज्ञांनी.

छान लेख.
स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी >> या उदाहरणातील माते ने मुलगा स्वतः न वाढवता लगेच दत्तक दिला होता. आई ने आपल्याला देउन टाकले ह्याचा फार मोठा परिणाम जॉब्ज यांच्या मनः स्थितीवर, झाला होता. मोठे पणी आईने आपले अ‍ॅबोर्शन करून जीवन संपवूनच टाकले नाही म्ह णून त्यांनी आईचे आभार मानले होते. त्यांनी जे संस्कार केले ते स्वतः च स्वतःवर तसेच त्यांचे दत्तक बाबा व आई ह्यांचा त्यांच्या ज डण घडणीत महत्वाचा भाग होता हे त्यांच्यावरील पुस्तकात डीटेल मधये आहे. वाचताना जीव तुटतो. एका मुला साठी वेळ देणे, त्याला मोठे करणे हयात जी वेळ , भावना व प्रेम,रिसोर्सेस ची गुंतवणू क करावी लागते ती महत्वाची.ती करतात ते पालक. गर्भावस्था फक्त ९ महिनयाची असते पण पुढील १९ २० वर्शे कमिट मेंट चांगल्या सकारत्मक पद्धतीने
करणे महत्वा चे..

नंदी नींचे पोस्ट आवडले.

Pages