मराठी भाषेचं भवितव्य काय?

Submitted by बोबो निलेश on 15 February, 2014 - 23:01

मराठी भाषेचं भवितव्य काय?

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.

कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार Happy

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.

धन्यवाद मंडळी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी माध्यमात शिकलेल्यांना आयटीमधे, मार्केटिंग, मॅनेजमेंट मधे प्राधान्य मिळेल का ?

पूर्वी शेतीवर अवलंबून लोक होते तेव्हां मराठी माध्यमात मुलांना घालायचे. टॉपच्या नोक-या इंग्रजी माध्यमातल्यांनी बळकावल्यावर उरल्यासुरल्या पदरी पडल्या पवित्र झाल्या म्हणून चालवून घेतले जायचे. आता शेती आतबट्ट्याचा व्यवहार आहे आणि नोकरीधंद्यातल्या बारीक गोष्टी सर्वांच्याच लक्षात आल्यात. आधीच्या पिढीने स्वतः इंग्रजीचं स्तोम माजवून ठेवलं आहे आणि आता सर्वच जण इंग्रजी माध्यमाकडे वळल्यावर गुळमुळीत झालेल्या या मुद्यावर गळे काढण्यात अर्थ नाही.

http://www.maayboli.com/node/34893

http://www.maayboli.com/node/34707

http://www.maayboli.com/node/44231

हे तीन लेख कृपया डोळ्याखालून घालावेत (आधी वाचले नसलेत तर, अर्थातच).

हे तीन लेख मनात ठेवून विचार केला तर मला एक उत्तर असे मिळाले की 'मराठी मातृभाषा असणार्‍या व इंग्रजी नीट न येणार्‍या तरुणांना खासकरून नोकरी देण्याचे धोरण जोवर कायदेशीर होत नाही तोवर मराठीचा र्‍हास टाळणे अवघड आहे'.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

अहो जो समाज 'दबंग'असतो त्याची प्रत्येक गोष्ट एलाइट होते, मग असा समाज नागडा फिरला तरी नागडेपणाला प्रतिष्ठा येते .तसेच भाषेचे आहे ,तिला प्रतिष्ठा येण्यासाठी त्या भाषेच्या पाईकांच्या मनगटात जोर असावा लागतो. किंमत मागुन मिळत नाही.तस्मात बोबले बोबले बोल सोडून कामाला लागा Proud

वाईट काय वाटायचंय त्यात? तुमच्याच धाग्याची रिक्षा फिरवली आहे.
देशमुख साहेब, बेफिंच्या लिंका देखिल वाचा. या विषयावरची विस्तृत व विद्वत्ताप्रचुर चर्चा वाचायला मिळेल.
त्याच प्रमाण, तुम्ही म्हणताहात, तशी इंग्रजी देखिल यायलाच हवी. पण इंग्रजी बोलता येते म्हणजे इकडे मराठी मृतावस्थेत गेलीच, असे होत नाही ना?

हो हो Proud

मराठीत इतके भरभरुन ब्लॉग्स येताहेत, त्यावर मराठी तरुण-तरुणी भरभरुन लिहिताहेत यावरुन आपल्याला कळत नाही का भाषेचे भवितव्य कसे आहे ते?

केवळ एखाद्या भाषेत शिक्षण घेतले म्हणजेच ती भाषा जिवंत राहते असे मानणे आजघडीला भारतात तरी योग्य नाही कारण इथे बहुतांशी लोक इंग्रजी मधुन शिक्षण घेतात. उच्च शिक्षणही इंग्रजीमधुनच आहे. मग सुरवातीपासुनच इंग्रजी शिकले तर काय बिघडले असे लोकांना वाटते आणि एकुण परिस्थिती पाहुन बहुतेक लोक बहुतेक बरोबरच असावेत.

मला तरी मराठी दमलीय, अखेरचा श्वास वगैरे घेऊ लागलीय असे अजिबात वाटत नाही.

मला तरी मराठी दमलीय, अखेरचा श्वास वगैरे घेऊ लागलीय असे अजिबात वाटत नाही. <<< अखेरचा श्वास नाही पण .....

जो तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना घलण्याच्या मागे धावताना दिसतो
मराठी शाळा काही काळात पुर्ण बंद होण्याची शक्यता वाटू लागली आहे, मी ज्या शाळेत शिकलो ती भारत हायस्कूल, पुणे. त्या वेळेस नु.म.वी. मधे सुद्धा प्रवेश मिळवणे खुप त्रासदायक होते. भारत हायस्कूल ५वी ते १०वी त्या वेळेस विध्यार्थी संख्या १४०० च्या जवळपास होती आणि आता १ ते १० पर्यंत फक्त ६०० विध्यार्थी आहेत. विध्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग अतिरिक्त घोषीत केला आहे आणि मागच्या ५-६ महिन्यांपासून विनावेतन काम करत आहे.

>>मला तरी मराठी दमलीय, अखेरचा श्वास वगैरे घेऊ लागलीय असे अजिबात वाटत नाही.
सुज आलेली आहे आणि तब्ब्येत सुधारल्यासारखी वाटते आहे. Sad

आजच सकाळमधे बातमी वाचली, त्यातले वाक्य पहा,
दमानिया या 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी) आंदोलनाशी जुळल्या.
हिंदीतल्या जुड गये चे अगदी जसेच्या तसे भाषांतर. Sad

हे मराठी भाषेची गळचेपी आणि अस काहीसं खुप बोलणार्या माझ्या एक आत्याबाईंची दोन्ही मुलं कॉन्वेंट मधे शिकलीत...त्यांना मराठीतील एक ओळ वाचता येइल तर शपथ.......आता यावरुनच ठरवा काय अन कोणामुळे होतय ते

मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जे बोलले गेलेय वर ते खरेय. पण मराठीत शाळा अणि तिथे शिक्षक हे आता खुप दुर्मिळ होतेय. जवळ चांगली मराठी शाळाच नसेल तर पालक काय करणार.

वर्तमानपत्राच्या मराठीबद्दल काय बोलणार? मुळात पत्रकारीता हीच फॅशनेबल गोष्ट झालीय आज. तिथे भाषेचे काय...

सुज आलेली आहे आणि तब्ब्येत सुधारल्यासारखी वाटते आहे Happy

घ्या चहा घ्या ,मग चर्चा करा. (गप्पागोष्टी धाग्यावर चहा देऊ केला तर तेथील मित्रांनी मलाच अपमानित केले, मी आता त्यांचे घर उन्हात बांधणार आहे)

http://www.maayboli.com/files/u31835/biscuits_1371907c.jpg

धन्यवाद. मला जरा गरम चहा आवडतो. पण बिस्कीटे छान. कपबशी पण छान.

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही.

आहेच.

जे लोकप्रिय असते ते टिकते. लोकांना उर्दू इंग्रजी इतर भाषांचे कदाचित जास्त प्रेम उत्पन्न झाले असल्याने मराठी तितकीशी लोकप्रिय नाही. मग उगीचच अर्ध्याहून अधिक इंग्रजी हिंदी, उर्दू शब्द वापरून त्यालाच मराठी म्हणायचे!
समृद्ध झालेली भाषा! पुरोगामी भाषा!

आजकालचे जीवन सगळे पाश्चिमात्य धर्तीचे. आजच्या काळात आपण जे वापरतो त्यातले जास्तीत जास्त सामान परदेशी लोकांनी शोधून काढलेले. त्याचे उगाचच मराठी नामकरण करायचे म्हणजे मराठी होत नाही. काँप्युटरला संगणक म्हंटले म्हणजे झाले का? बिस्कीटाला मराठी शब्द कुठे वापरात आलेला, लिखाणात, नाटकात, सिनेमात, रोजच्या बोलण्यात ऐकला आहे का? किती वेळा?

जुन्या मराठी पुस्तकांचे वाचन केले तर मराठी शब्द, वाक्प्रचार म्हणी आठवतील, नाहीतर कसे आठवणार मराठी शब्द. आजकालचे मराठी वाचून खरे मराठी शब्द आठवणार, सुचणार नाहीत.

जेंव्हा मराठी माणूस काही शोधून काढेल, त्याला मराठी नाव देईल, जे जगातले खूप लोक वापरतील तेंव्हा मराठी राहील. नाहीतर हीच उर्दू, इंग्रजी मिश्रित भाषा मराठी म्हणायची. आज मराठी माणसाने काही शोधून काधले तरी त्याला इंग्रजी नाव दिल्याशिवाय ते जगात लोकप्रिय होणार कसे?

नशीब तुम्ही तरी लेख मराठीत लिहीला! मागे एकदा एकाने म्हंटले होते

यस यस वी मस्ट बी प्राऊड ऑफ मराथी अँड स्पीक मराथी ओन्ली.

साधना | 17 February, 2014 - 03:21

मराठीत इतके भरभरुन ब्लॉग्स येताहेत, त्यावर मराठी तरुण-तरुणी भरभरुन लिहिताहेत यावरुन आपल्याला कळत नाही का भाषेचे भवितव्य कसे आहे ते?>>>>

मराठीत इतके भरभरुन ब्लॉग्स येताहेत, त्यावर मराठी तरुण-तरुणी भरभरुन लिहिताहेत या गोष्टीचा मलासुद्धा आनंदच आहे.
पण मराठी ब्लॉग्ज बाबत एक प्रश्न मला नेहमीच पडतो. यातले किती ब्लॉग्ज इंग्रजी माध्यमातून शिकलेले तरुण-तरुणी लिहित आहेत?
आजकाल शहरात तरी जवळजवळ सगळे जण इंग्रजी माध्यमातून शिकतात. पण जर हे इंग्रजी माध्यमातून शिकलेलेसुद्धा मराठीत ब्लॉग्ज लिहित असतील, तर मराठीची चिंता करण्याची गरजच नाही.
पुन्हा एकदा सांगतो, मी इंग्रजीच्या किंवा इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याच्या किंवा घेणाऱ्यांच्या विरोधात मुळीच नाही.

>>जुन्या मराठी पुस्तकांचे वाचन केले तर मराठी शब्द, वाक्प्रचार म्हणी आठवतील, नाहीतर कसे आठवणार मराठी शब्द. आजकालचे मराठी वाचून खरे मराठी शब्द आठवणार, सुचणार नाहीत.

अनुमोदन ! +१०१

वाचाल तर वाचाल Happy
हे वाक्य हिंदी, इंग्रजी किंवा अन्य भाषेत म्हणुन पहा बर ! Wink

पण मराठी ब्लॉग्ज बाबत एक प्रश्न मला नेहमीच पडतो. यातले किती ब्लॉग्ज इंग्रजी माध्यमातून शिकलेले तरुण-तरुणी लिहित आहेत?

हे सांगता येणं कठीण आहे पण इंग्रजीतुन शिकलेल्यांना मराठी अजिबात येत नाही किंवा ते मराठीतुन लिहु शकणार नाहीत असे गृहित धरणेही अयोग्य आहे.

इथे अर्निका नावाची एक आयडी आहे तिने मराठीतुन अतिशय सुंदर लेख लिहिले आहेत. तिचे आठव्या इयत्तेपासुनचे शिक्षण लंडनमध्ये झालेय. त्या अनुभवांवर तिने अतिशय छान लिहिलेय. सगळे मराठित आहे.

मायबोलीवर लिहिणारी कित्येक मंडळी परदेशात शिक्षण घेतलेली आहेत, त्यांनी प्राथमिक शिक्षण कुठल्या भाषेतुन घेतले माहित नाही पण आजही ती मंडळी मराठीतुनच लिहिताहेत.

मुळात मराठीतुन शिक्षण घेणे आणि मराठी साहित्य वाचणे-लिहिणे याचा थेट संबंध नाही असे मला वाटते. तसे असते तर ५० वर्षांपुर्वीछ्या पिढीत जिथे मराठी हिच शिक्षणाची मुख्य भाषा होती, त्या पिढी तले सगळे लोक वाचक आणि लेखक झाले असते. पण तसे नाहीय ना. लेखक तर सोडाच, वाचकवर्गही पहिल्यापासुन जेवढा आहे तेवढाच आहे. लेखन वाचन ह्या शेवटी आवडीच्य गोष्टी आहेत असे मला वाटते. ज्याचा तिकडे कल आहे तो ते करणारच, मग त्याचे शिक्षण भले कुठल्याही भाषेतुन होवो.

>> त्या पिढी तले सगळे लोक वाचक आणि लेखक झाले असते. पण तसे नाहीय ना. लेखक तर सोडाच, वाचकवर्गही पहिल्यापासुन जेवढा आहे तेवढाच आहे.
==> नाही, आधी वाचक आणि लेखक खुप होते

>>लेखन वाचन ह्या शेवटी आवडीच्य गोष्टी आहेत असे मला वाटते. ज्याचा तिकडे कल आहे तो ते करणारच, मग त्याचे शिक्षण भले कुठल्याही भाषेतुन होवो.
==> असहमत, कोणत्या भाषेत शिक्षण घेतो त्यावर वाचन लेखनाच्या आवडीचा कल ठरण्याचे प्रमाण पण जास्त असते. केवळ कल असणे पुरेसे नाही.
ना.सि.फडक्यांच्या घरातील व्यक्ती कॉन्व्हेन्टमधे शिक्षण झाल्यामुळे खुद्द घरात असलेली त्यांची पुस्तके पण कधी वाचली नाहीत. असे झालेले मी पाहिले आहे.

ना.सि.फडक्यांच्या घरातील व्यक्ती कॉन्व्हेन्टमधे शिक्षण झाल्यामुळे खुद्द घरात असलेली त्यांची पुस्तके पण कधी वाचली नाहीत. >> त्याचा कॉन्व्हेन्टमधे शिक्षण घेण्याशी संबंध नसावा.

त्याचा कॉन्व्हेन्टमधे शिक्षण घेण्याशी संबंध नसावा.> +१.
माध्यमातुन शिकल्यावर त्या भाषेची गोडी लागणे आणि तेव्हड्यापुरती वापरणे यात फरक असतोच. मराठी माध्यमाची सगळी मुलं मराठी पुस्तकं वाचतातच, हे म्हणणे धाडसाचेच होईल. माझ्या मते ते आवडीवर अवलंबुन आहे.

वाचनाची आवड आणी शिक्षणाचं माध्यम याचा काहीही संबंध नाही.
मला सगळ्या भाषा शिकायला आवडतात आणि ज्या भाषा येतात त्यातलं सगळं लिखाण वाचायला आवडतं.

मी महेशशी सहमत आहे. मातृभाषा "मराठी" (हीच आहे ना हो नक्की?) सोडून दुसर्‍या माध्यमात/ हगारीबिगारीपासून शिकविल्यावर मातृभाषा शिल्लक राहील हा भ्रम कुणाला पाळायचा/पोसायचा असेल तर त्याला माझा तरी नाईलाज आहे.
मातृभाषेपासून दूर जाणे हे निदान भारतापुरते तरी "धर्मान्तर" होण्याइतके घातक ठरत आहे असे माझे मत. केरळपासून काश्मिरपर्यन्त सम्पुर्ण भारतात सध्या सुरू असलेली "लव्हजिहाद"ची अ‍ॅक्टिव्हीटी अन "इन्ग्रजीचे स्तोम" माजवुन पोरान्ना जन्मापासूनच अन्तर्बाह्य इन्ग्रज बनविणे यात मला काहीही फरक वाटत नाही.

Proud

कोणत्या ना कोणत्या देशात कोणत्या ना धर्मात मनुष्य जगल्याशी कारण नै का हो लिंबु?

जी भाषा जगायला मदत करते तीच टिकते. नै तर तुमची ती भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती दोन वेळच्या अन्नाला महाग का झाली? साक्षात देवांची भाषा मेली Proud तिथं माणसाच्या भाषेचं काय इतकं कौतुक!

Proud

धोतरं जाऊन प्यॅण्टी आल्यानं धर्मांतरं झाली नाहीत, मग भाषांतरं झाल्याने धर्म बुडाला अशी कागाळी कशाला?
उद्या म्हणाल पादुका जाऊन शूज आले आणि आमचा धर्म बुडाला...

इंग्लिश आजची ज्ञानभाषा आहे हे वास्तव आहे
जगात पुढे जायच असेल तर ही भाषा येण जरुरीच आहे
विशेषत जर तुम्ही कॉर्पोरेट जगात वावरत असाल तर. कम्युनिकेशन स्कील उत्तम असण ही कॉर्पोरेट क्षेत्रातील यशाची पायरी आहे.यासाठी इंग्लिश बोलता वाचता आणि या भाषेतून संवाद साधण गरजेच आहे.तिला सध्यातरी पर्याय नाही।.
याचा अर्थ तुम्ही मराठीला दुय्यम स्थान द्याव अस नाही .आपल्या मातृभाषेचा मान राखण आपल्या हातात आहे .

मुळातच कोणतीही भाषा शिकण हा एक आनंददायी अनुभव असतो
निखळ मनाने दुस्वास न करता शिकल्यास भाषाच काय जगण सोप होऊन जात
बहुभाषिक असण कधीही फायद्याचच
मला स्वतला तरी आपल्याला अनेकानेक भाषा यायला हव्यात अस वाटत

Pages