पुणे आणि पुणेकर

Submitted by चौकट राजा on 22 June, 2011 - 17:57

सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्‍याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************

तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.

तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?

तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्‍या आणि तिथेच व्यवसाय करणार्‍या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्‍या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्‍याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.

मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.

चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्‍याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.

हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?

*****************************************************

ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..

कळावे,

लोभ असावा.

गुलमोहर: 

केपी सॉरी हं का पिक्चरचं नाव - मुंबई पुणे मुंबई आहे.

हा शेवटचा पॅरा लोकांनी वाचलाच नाही म्हणजे.>> हाहा असं नसतं केपी लोक ते वाचतात पण दुर्लक्ष करतात Sad

डुआया अरेच्चा असे आहे का? अरे देवा. आता त्यावरुनही वाद..

मी पुण्याचा असल्याने पटकन पुणे लिहीले गेले. दुरुस्ती करतो. Happy

आय होप आता वाद थांबतील Happy हे पहा मुंबई, पुणे ही दोन्हीही शहरं चांगलीच आहेत ! माणसं ही! बाकीचीही आहेत हैद्राबाद, अमृतसर, कोची, चेन्नई, बंगळुरू, अकोला, अमरावती, अल्वार, आम्ली, अंबाला इ. इ.

लेखकाला अपेक्षित चर्चा झाली असेल तर let's move on!

http://www.youtube.com/watch?v=hgZ9Ba5SdK0 हे ऐका Happy

माझे या शहरांपेक्षा पुण्यात ज्यास्ती वास्तव्य असल्यामुळे पुण्याविषयी थोडे अधीक प्रेम असणे नक्कीच योग्य आहे.. पण म्हणुन मी इतर शहराना पुण्यापेक्षा कधीच कमी समजत नाही>> रामभाउ आपला प्रतिसाद वाचला, आपण जे काही लिहले आहे ते आपल्या प्रामाणिक अनुभवावरुन लिहले अहे असे दिसुन येत आहे हे मान्य करुन आपणास दिलगीरी व्यक्त करतो.. Happy
मला तेवढा अनुभव नाही...म्हणुन मी दुसर्‍या शहरा बद्द्ल काही आक्षेपार्य वाच्यता केली नाही. मी पुणे पाहीले नाही पण पुण्या बद्द्ल असं(लेखात जे मुद्दे दिले आहेत) म्हणतात हे अगदी लहानपणापासुन माहीत आहे.... व पुण्या विषयी आदरच आहे...एवढेच नाही तर हेच कारण असावं कदाचीत पुण्या बद्द्ल आपुलकी असण्याचे...!

<< "I don't hate in plurals". >>
हजार धन्यवाद, ह्या वाक्याची आठवण करुन दिल्याबद्दल

आयलाऽ पुण्याला शिव्या घालणारे लोकही आहेत!
- जसे हापूस आंबा न आवडणारे लोकही आहेत. ( पु.ल. देवा, तुमचंच वाक्य होऽ )

बाकी पुण्याविरुद्ध भांडणार्‍यांसाठी एकच प्रश्न येतो मनात.
"एवढा त्रास का करुन घेता हो ? " . मी तर म्हणतो, "तोड दो ये जंजीर आणि छोड दो पुणे. "
तुमीबी खुश आणि पुणेकरही खुश. Happy नाही का??

आणि रहायचंच असेल, तर चांगल्या मनाने रहावं असं आपलं मला वाटतं.

घ्या लागेल तसा.

- कोल्हापुरी पुणेकर.

@ जरा जास्तीच उशीर झाला हे बघाया. Uhoh

सर्वांचे आभार .. बरीच चर्चा झाली, बरीच मते / अनुभव मांडले गेले, बरेच वाद झाले.. ह्या द्विशतकाचे मानकरी तुम्हीच सगळे Happy

पहिल्याच लिखाणाला एवढा प्रतिसाद मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. परत एकदा सर्वांचे आभार आणि पु. ले. शु...

>>> उगाच नाही मुंबई-पुणे-मुंबई (डुआयने लक्षात आणुन दिल्याने बदल केला. सवयीने व पुणेकर असल्याने पुणे-मुंबई-पुणे असे लिहीले होते. ) असा चित्रपट निघाला.

या चित्रपटाच्या नावात सुध्दा पुण्याला मुंबईपेक्षा कमी लेखले आहे (मुंबई २ दा व पुणे १ दाच).

>>> अहो तो तिचा प्रवास आहे. ती पुण्यातून निघून परत पुण्याला परतली असती तर नाव तसे ठेवले असते.

अहो मग तसं दाखवायचं म्हणजे पुण्याचं नाव २ दा आलं असतं. Lol

अहो चौकट राजा,तुम्हाला मायबोलीकरांची मनं आधीच कळलेली दिसतात.
अगदी हमखास यशस्वी विषयावर लिहिल्यावर इतके प्रतिसाद न येतील तरच नवल.

ज्या मुंबईकरांना मुंबईचा जाज्वल्य अभिमान आहे त्यांना तसे असण्याचा हक्क कुणीच नाकारू शकत नाही. तसंच ज्या पुणेकरांना पुण्याचा जाज्वल्य अभिमान आहे त्यांनादेखील हा हक्क आहेच. इथे आपण मराठी लोकांबद्दल बोलत आहोत हे गृहीत धरलेलं आहे. तसंच हे जाज्वल्य लोक म्हणजे मुंबईतील गिरगाव, दादर वगैरे भागातील तर पुण्यातील सदाशिव, नारायण, नवी पेठ आदी भागातील असंही गृहीत धरलेलं आहे...

सध्या हे जाज्वल्य अभिमानी लोक डोंबिवली, बोरिवली, बदलापूर, दिवा, ठाणे, बेलापूर अशा ठिकाणी आनंदाने नांदत असताना त्यांच्या मूळच्या जागेत अलिशान मॉल्स, मल्टीप्लेक्स आणि हिरानंदानी सारखे संकुल उभे राहत आहेत तर पुण्यातील जाज्वल्य अभिमानी लोक पूर्वी कोथरूड आणि आता सिंहगड रस्ता, आंबेगाव, कात्रज असे स्थलांतर करीत गेले आणि खुद्द सदाशिव पेठेत शहा, मेहता असे बोर्ड लागलेले मी पाहीले आहेत.

मला इतकंच म्हणायचंय कि जाज्वल्य अभिमान असणं ही काही चूक गोष्ट नाही आणि त्यावरून वाद घालणं तर अजिबातच नाही.

अनिल सोनावणे,

१. सहमत आहे.

२. पण वाद झालेला आहे.

३. सभ्य व मिश्कील भाषेत वाद चालू आहे आणि तो बंद पाडण्याचे तूर्त काही कारण बहुधा नसावे.

आपल्याला माझ्यातर्फे मा.स.मि पुरस्कार! Happy

-'बेफिकीर'!

काय धमाल चाललीय. मुळात लेखक कधीचा अमेरिकन झालाय आणि तुम्ही मात्र मुंबई पुणे करताय. काय काडी टाकलीय. मान गये.

त्रुप्ति - लेखक थोड्या काळासाठी अमेरिकेत आलाय. अमेरिकन अजिबात झालेला नाहिये. आणि मराठी लोकांनी एकत्र रहावं असं मत व्यक्त करतोय.. काड्या टाकत नाहिये.

गजानना.. मला जर असे परिच्छेद पाडुन, व्याकरणाच्या चुका न करता लिहायला जमले असते तर मी माबोवरच्या बर्‍याच लेखक कवींपेक्षा ............ रिकामी जागा भरा.. Wink
जोक्स अपार्ट.. तुमच्या सुचनेचे स्वागत आहे. या पुढे मी नक्की प्रयत्न करेन.. Happy
बेफीकीर... मला दिलेला पुरस्कार म्हणजे नक्की काय ते कळले नाही हो.. Uhoh

मा.स.व. म्हणजे मायबोलीवरील सर्वोत्कृष्ट वक्ता - राम

मा.स.तो. म्हणजे मायबोलीवरील सर्वोत्कृष्ट तोफ - हा नीधप यांना द्यायचा मानस होता पण दिला नाही कारण ती तोफ पुरस्कार वितरण करणार्‍या संयोजकांकडेच वळते की काय असे वाटले.

मा.स.मि. - मायबोलीवरील सर्वोत्कृष्ट मिटवामिटवक - अनिल सोनावणे

Pages