आंनदी कॉलेजमधून नुकतीच घरी आली होती. थोडा वेळ इकडे तिकडे करून आता पुस्तक वाचायला बसणार, एवढ्यात आईने आठवण करून दिली. "आनंदी, जरा वेळात माझा स्वयंपाक होईल. कालच्यासारखा आजपण बाईंकडे डबा घेऊन जा. बऱ्या आहेत का ग? मला कालपण भेटायला जायला जमलंच नाही. त्यांचं जेवण होईपर्यंत तिथेच थांब." बाई, यांचं खरं नाव सुनंदा. गावात काही लोकं सोडली तर सगळे त्यांना बाई या नावानेच ओळखत. कित्येक वर्ष एकट्याच आहेत. गेल्या ३-४ दिवसापासून तापाने आजारी, झोपूनच होत्या.आनंदीच्या आईनेच औषध आणून दिलं. बाईंच्या अंगात ताकदच नव्हती. गेले काही दिवस, आनंदीची आई रोज जेवणही पाठवते आहे.
शाळा सुटल्याची घंटा वाजली. पेंगुळल्या डोळ्यांनी अमरने दप्तर काखोटीला मारलं. भराभर चालत तो निघाला. शाळेच्या आवारातून तो बाहेर पडणार तेवढ्यात मोगरेबाईंनी त्याला गाठलं. कपाळावरची झुलपं उडवत तो नुसताच त्याच्यांकडे बघत राहिला.
"मंगलताई येतील आज. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे."
"कशाला? मला टपरीवर जायचं आहे. पक्याला कबूल केलय मी." तो वैतागलाच.
"अरे, कुणी भलं करायला गेलं तर तुझं आपलं माझंच खरं असं आहे."
"बरं थांबतो." निर्विकार स्वरात तो म्हणाला.
"शाळा बंद झाली आहे. बाहेर राहशील का उभा? पाहिजे तर मी पण थांबते तुझ्याबरोबर ताई येईपर्यंत."
"थांबतो मी. तुम्ही गेलात तरी चालेल."