नवरा आणि मुलगा सध्या भारतात आहेत. नवरा आईला घेऊन अयोध्या-वाराणसीला जाणार होता पण त्यांनी प्रवास झेपणार नाही म्हणून बेत रद्द केला. पण नवरा आणि मुलाने स्वतः जायचे ठरवले. यावर अनेकांनी आडून किंवा उघडपणे तुम्ही मोदी भक्त आहात का असे विचारले. या प्रश्नाची मी अपेक्षा केली नव्हती. पण त्यामुळे या प्रश्नाच्या मानसिकतेवर आणि ते तिथे का जात आहेत यावर जरासे चिंतन झाले.
सांग कुणाच्या श्रध्देमधून
उगवलास पहिल्या प्रथम,
कुणी केले लाडकोड अन् -
निगुतीने भरणपोषण...?
कुणी घातले पाळण्या- बिळण्यात
मुंज, लग्न, नामकरण,
वाऱ्या- बाऱ्यात लावली रांग
कोण आले पहिले शरण...?
काय प्रिय काय वर्ज्य
कुणी ठरवले विधी-निषेध ,
बेल फुले धूप दीप
केला कुणी बुध्दीभेद..?
वस्त्र शस्त्र शंख चक्र
दागिन्यांनी कुणी मढवले,
मूषक मोर गरुड नंदी
पशूपक्षांवर कुणी चढवले...?
उपास रोजे नैवेद्याची
कुणी बनविली मेन्यूकार्ड ,
मोदक मेवा मटण मुर्गा
कोणी केला राडा द्वाड...?