ईशान आजारी पडला आणि कांताबाईचा जीव कासावीस झाला. तिने त्याच्याकडे जायचं निश्चित केलं आणि ईशानला आधीच लागणारी धाप आणखीनच वाढली.
"आई, हट्टीपणा करु नको. मी आता बरा आहे. तू एकटी कशी येणार?"
"मेल्या, इतं माजा जीव टांगनीला लागला आनि येऊ नगं म्हनतंस. लाजबिज हाय की नाय तुला. निगाले मी."
"निघाले काय? ते काय पुण्याची एस टी पकडून वडगाव बुद्रुक गाठायचं आहे का? काहीही." आजारपणामुळे ईशानच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. आता आई फोन ठेवणार नाही या कल्पनेनेच त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरला.
भल्या पहाटे कळा सुरु झाल्या. सुमुखी दाते आय ओय करत कुशीवर वळली. नवर्याला गदगदा हलवलं तर तो तिच्याहून जोरात ओरडत एकदम दारच उघडायला निघाला. त्याचं हे नेहमीचंच. आधी दाराकडे धावणार काही झालं तरी. पळपुटा कुठला. सुमुखी ’झोप तू’ असं फणकार्याने पुटपुटली आणि आय, ओय जोरात आळवत दुसर्या खोलीत डोकावली. चिरंजीव आडवे पडलेले. ते ढिम्म हलले नाहीत. सुमुखी तिसर्या खोलीत गेली. पलंग रिकामा. पळाली की काय? कुणाबरोबर? कशी? कधी? आता सुमुखी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी ओरडायला लागली. पलंगाच्या पलीकडच्या बाजूला पडलेली तिची तरुण कन्यका उठून शांतपणे पलंगावर झोपली.