देव चालले : स्थित्यंतराची गोष्ट
‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो कुठून आला आहे याची त्याला एका मर्यादेबाहेर कल्पना नसते आणि पुढे कुठे चालला आहे याबद्दल नजिकचा भविष्यकाळ वगळता खात्रीही नसते. पण तो चालायचा थांबत नाही. इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी यांपैकी कुठल्याही कारणांनी तो एकीकडून दुसरीकडे जात राहतो. जाताना सोबत आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, भावना, सवयी आणि यासगळ्या गोष्टी ज्यात बांधलेल्या आहेत ते संस्कृती किंवा परंपरा या नावाचं गाठोडं असतं. त्यात कुठेतरी त्याचा देवसुद्धा असतो.मध्येच कुठेतरी श्रांत होऊन विसावतो. शिदोरी उलगडतो.