या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841
काठगोदाम ते पिथौरागड
एकूण अंतर -२४५ किमी
आज पासून यात्रेला सुरुवात बरं मंडळी!
सकाळी तशी गडबड नव्हती. संस्थेची गाडी आम्हाला हॉटेल मधून पिकअप करणार असल्याने ७ च्या आधी आवरून तयार रहायचे होते. माझे आवरणे चालू असतानाच सकाळी ६.३०ला कर्मचारींचा फोन आला की काही जणांची गाडीच सकाळी ७ ला येतेय त्यामुळे आम्हीपण रेल्वेस्थानकावरच ७ पर्यंत पोहोचावे. म्हणजे झाले का.. वेळापत्रक अर्ध्यातासाने अलिकडे आले. आम्ही लवकर उठलो होतो म्हणून बरे झाले. आवरून इतक्या लवकर रिक्षा मिळेल का असा विचार करत असतानाच पटकन एक रिक्षा मिळाली. आम्ही स्थानकात नीट वेळेवर पोहोचलो. तोवर इतर यात्री देखील जमले होते. दोन टेम्पो ट्रॅव्हल्स आमची वाट बघत होत्या. एकमेकांची जुजबी ओळख करून घेत आम्ही गाडीत स्थानापन्न झालो. आम्ही मुंबईचे ५ जण होतो. ७ जणांचा एक ग्रुप तमिळनाडूहून आला होता अजून एक काका केरळचे, एक काकू डेहराडूनच्या आणि बाकीचे तिथलेच लोकल उत्तराखंडवासी मिळून आमचा २० जणांचा ग्रुप होता.
स्टेशनहून आम्हाला फ्रेश होण्यासाठी काठगोदामच्या पी. डब्ल्यू. डी. गेस्ट हाऊसला नेण्यात आले. गाडी अगदी मस्तपैकी आमच्या हॉटेलवरूनच गेली. मग आम्हीपण (मनातला सात्विक संताप आवरत), सगळ्यांना हे बघा आम्ही इथूनच आलो हे दाखवले. आम्ही जरी आदल्या दिवशी आलो तरी बाकीचे लोक सकाळीच प्रवास करून आलेले. त्यांना फ्रेश होण्यासाठी हा थांबा आहे असे सांगितले. पण आम्ही गाडीतून उतरतो तो काय; पत्रकार, स्थानिक न्यूज चॅनेलचे वार्ताहर यांनी आम्हाला गराडाच घातला. हे सगळे खूपच अनपेक्षित होते. सगळ्याबाजूने एकदम कॅमेरांचा क्लिक्लीकाट झाला. हे लोक आमचे फोटो काढत होते, मुलाखती घेत होते. आम्हाला एकदम पेज थ्री पर्सनॅलीटी झाल्यासारखे वाटले. तुम्ही ह्या यात्रेला का आलात? कुठुन आलात? नवरा बायको असतील तर अजून एखाद दोन प्रश्ण. एक वेगळा अनुभव होता.
इथल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपुलकीने स्वागत केले. या सगळ्या लोकांबरोबर हे लोक सुद्धा दारात चहाचा ट्रे आणि पाणी घेऊन उभे होते. भराभर २/३ खोल्या स्त्रिया आणि पुरुषांना फ्रेश होण्यासाठी उघडल्या गेल्या. आमच्या स्वागताला येथील महापौर उपस्थित होते. त्यांनी हार घालून केलेल्या स्वागताचा स्वीकार करून आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्ही भीमतालला निघालो. आमची पहिलीच बॅच असल्याने महपौरांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला, "हर हर महादेव!" च्या गजरात गाड्यांनी भीमतालकडे कूच केले.
सकाळचा नश्ता आज भीमतालला होणार होता. सकाळच्या वर्ताहरांच्या गडबडीत बराच वेळ गेलेला. तसा थोडा उशीरच झालेला पण सकाळच्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे सगळे खुश होते.
भीमताल हे नैनीताल मधील मोठे सरोवर म्हणतात. कदाचित त्याहुनही मोठे नौकुचिया ताल असेल फक्त. त्याच्या भीमकाय आकारामुळे त्याला हे नाव मिळाले असावे. काही लोक, येथे भीमाने गदा मारून या सरोवराची निर्मिती केली म्हणून त्याला भीमताल म्हणतात असेही सांगतात. तसेही आपल्याकडे प्राचीन काही असले तर ते पांडव किंवा राम, सीता,लक्ष्मण यांच्य्यापैकी कुणाचे तरी असते.
भीमतालला गाडीतून उतरल्यावर लगेचच के एम् व्हि एन चे कर्मचारी रेस्ट हाऊसच्या दरवाज्या बाहेर हात जोडून आमची वाट बघत होते. प्रत्येकाचे स्वागत हात जोडून आणि ओम् नम: शिवाय म्हणून केले जात होते. आत गेल्यावर बुरांशच्या सरबताचा ट्रे सरबराई साठी हजर होताच. बुरांश (Rhododendron Flower) हे येथील स्थानिक फूल आहे. लाल रंगाचे फूल असते. फेब्रुवारी अखेर पासून एप्रिल पर्यंत साधारणपणे सिझन असतो म्हणतात. आम्ही गेलो तेंव्हा सिझन संपलाच होता. पण रस्त्यात एखादे झाड किरकोळ फुले अंगावर वागवून असायचे. याची चवही छान आहे काहीशी आंबट गोड. हृदयासाठी हे फूल चांगले म्हणतात.
भीमतालला, कुणाला आंघोळी वगैरे उरकण्याच्या दृष्टीने परत खोल्या उघडून देण्यात आल्या. हे पहिले रेस्ट हाऊस आम्ही पाहिले. अतिशय नेमक्या ठिकाणी बांधले होते, सभोवती छोटीशी बाग, तिथे बसायला बाक. खुप सुंदर रचना होती. कुठूनही तुम्हाला भीमतालचे दर्शन होत राहिल अशी व्यवस्था मला खूपच आवडली. हवाही छान होती त्यामुळे फोटोप्रेमी लगेच कॅमेरा घेऊन सरसावले आणि यथेच्छ क्लिक्लीकाट झाला. थोड्या वेळाने आमचा नास्ता लागल्याची वर्दी आली. मस्त पुरी भाजी, पोहे, सॅण्डवीच असा भरगच्च मेन्यू होता. शिवाय चहा, कॉफी होतीच. भरपेट खाल्यानंतर आम्हाला यात्रेच्या आजच्या दिवसाची माहीती देण्यात आली. वार्ताहरांशी बातचीत झाली. आम्हाला परत एकदा हार घालून शुभेच्छा दिल्या गेल्या. हरहर महादेव, जयकारा बीर बजरंगी, हर हर महादेव, ओम् नम: शिवाय असा गजर करत आमच्या दोन्ही टेम्पो ट्रॅव्हल्स सुसाट सुटल्या.
भीमताल :
रेस्टहाऊस बाहेरील सुशोभिकरण :
इथेच आमच्या स्वागताचा कार्यक्रम झाला :
बाजूच्या बागेमधूनच भीमताल डोकावतोय
आजचे जेवण जागेश्वरला आणि मुक्काम पिथौरागडला होता. भीमताल पासूनच थंड हवा आणि निसर्गाची सुंदर पहाडी रुपे दिसायला सुरुवात झाली होती. वळणावळणाचा रस्ता दोन्ही बाजूला हिरवे डोंगर बघायला मजा येत होती.
रस्त्यात काफल विकणारी लहान मुले दिसली. आमच्यातील देहराडूनहून आलेल्या काकूंची ही चौथ्यांदा यात्रा होती आणि येथील स्थानिक फळे, फुलांबाबत त्यांना चांगली माहिती होती. त्यांच्या बरोबर आम्हीपण घेतली. सगळ्यांना आवडली. आपल्या चन्यामन्या बोराचे हे सख्खं भावंड वाटावे इतकी चव सारखी वाटली मला. दिसायलाही तसेच. इथले हे सिजनल फळ आहे. लहान मुले डोंगरातून गोळा करून आणतात. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्याला विकतात. आपल्य्याकडे नाहीका पूर्वी बोरघाटात मुले करवंद गोळा करुन विकत. ही मुले तशीच होती. काफलची झाडे नंतर बरीच दिसली आम्हाला. पण बिया खायच्या नाहीत आणि फळे ही आवडली म्हणून खूप खायची नाहीत बरं! नाहीतर दुसऱ्या दिवशी पोटाने जाणीव करून दिलीच समजा.
मधे गोलू देवतेचे मंदिर बघून आम्ही जागेश्वर कडे निघालो. गोलू देवता ही नवसाला पावणारी देवता, न्यायाची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. लोक आपले मागणे चिठ्ठीत लिहून ही चिठ्ठी येथे बांधतात आणि मागणे पूर्ण झाले की घंटा बांधतात. विशेष करून कोर्टकचेऱ्याच्या कामासाठी येथे नवस बोलला जातो असे म्हणतात. ही येथील अनेक लोकांची कुलदेवताही आहे. त्यामुळे भरपूर चिठ्ठ्या, घंटानी आवार भरून गेले आहे. मूळ गाभारा छोटासाच आहे. मूर्ती पाहिल्यावर मला आपल्या खंडेरायाचीच आठवण झाली. अगदी तशीच घोड्यावर बसलेली आणि तलवार हातात धरलेली मुर्ती आहे. दर्शन घेऊन कांचीधामला वळसा घालून आम्ही जागेश्वरला निघालो.
गोलू देवता मंदिराचे आवार : सगळ्या खांबाना कश्या चिठ्ठ्या आणि घंटा बांधल्यात पहा :
हा अजून एक प्रदक्षिणा मार्गावरचा :
अश्या काही मोठ्याला घंटापण आहेत.
जागेश्वरला पोहोचेपर्यंत उशीर झाला होता तरी परत तसेच हसमुख बुरांशच्या सरबताने आणि ओम् नम: शिवायच्या गजराने स्वागत झाले. जेवणे पटापट उरकून आम्ही जागेश्वरधामचे दर्शन घेतले. जागेश्वर हा एक मंदिर समूह आहे. येथे छोटी छोटी १०८ मंदीरे, वेगवेगळ्या दिशेकडे तोंड करून आहेत. एकूण म्हणे २५०च्या आसपास ही मंदिरे विखुरलेली आहेत त्यातली एका ठिकाणी स्थित असलेली मंदिरे आपल्याला पहायला मिळतात ती १०८ आहेत जवळपास. हे स्थानच खूपच रमणीय आहे. विकीपिडीया २२४ संख्या सांगतो पण तेवढी काही वाटली नाहीत. मोठी, मुख्य मंदिरे ३ आहेत. २ महदेवाची आणि एक देवीचे. हे ज्योतिर्लिंगही मानले जाते. ८वे ज्योतिर्लिंग - नागेशं दारुकावने असे वर्णन असलेले ते हेच होय असे मानतात. या विषयी अनेक मतांतरे आहेत. पुराणकाळा नुसार श्रीविष्णूंनी या शिव मंदीराची स्थापना केली तर काहींची सप्तर्षींनी असे मानतात. आदि शंकराचार्यानी हि मंदीरे शोधून काढली असेही सांगतात. थोडक्यात प्राचीन तपोभूमी म्हणजे जागेश्वरधाम समूह आहे. इथे २ उंचच उंच देवदाराची झाडे आहेत. त्याना शिवपार्वती मानतात. त्यांचे आणि त्यांच्या बरोबर आमचे असे दोन्ही प्रकारे फोटो काढून बाहेर पडलो.
जागेश्वर धाम मंदिर समूह :
वरुन दिसणारे जागेश्वर :
अजून एक :
रेस्ट हाऊस मधून दिसणारे जंगल :
आता मात्र कुठेही न थांबता पिथौरागड गाठायचे असे ठरले. निघायला ५ वाजून गेले होते आणि अजून प्रवास बाकी होता. आम्ही असे ऐकले होते की इकडे रस्त्यात झरे लागतात. त्यांचे पाणी खूप चविष्ट असते. तसा एक झरा लागल्यावर आम्ही रस्त्यात थांबलो. घाटात असते तसे एक देवीचे देऊळ होते - गुरना देवीचे. त्याच्या समोर झरा. हा प्रसिद्ध वॉटर स्पॉट होता. जाणारे येणारे थांबून पाणी भरताना दिसत होते. खरोखरच थंड,ताजे खरेखुरे मिनरल वॉटर. याच्या पुढे बिसलेरीची किंमत ती काय. नंतरही जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली आम्ही असे झऱ्याचे पाणी पित राहिलो.
लांबून दिसणारे पिथौरागड :
परत एकदा माळा घालून, बुरांशच्या सरबताने आणि हरहर महादेवाच्या गजरात आमचे पिथौरागडला स्वागत झाले. आत हे सगळीकडे असणार की काय याने गंमत वाटत होती. या प्रकाराला आम्ही हळूहळू सरावत होतो. रात्री तिथल्या महादेवांच्या मूर्तीचे पूजन आणि एक दिवा शहिदांसाठी हा रोमांचपूर्ण कार्यक्रम झाला. आम्हाला दुसऱ्या दिवशीची माहीती दिली गेली. रात्री पौर्णिमेच्य्या चंद्राचे दर्शन, उल्का मातेच्या देवळात घेतले. इथे आवारात मोठे मंदिर आहे. पूर्ण चंद्राची छायाचित्रे घेतली. दिव्यांनी झगमगते पिथौरागड वरुनच पाहून घेतले.
पोहोचल्या पोहोचल्या आपल्याला दर्शन होते ते याच शिवशंभूच्या मुर्तीचे. भोवताली सगळीकडे झाडांनी सजावट केली आहे.
उल्का मातेच्या मंदिरातून दिसणारे रात्रीचे पिथौरागड :
पिथौरागडच्या कँटीनमधे एक छान तक्ता लावला आहे, आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारा : आवडला म्हणून मुद्दाम फोटो काढून घेतला : यात डावीकडे प्रेक्षणीय स्थळे तर उजवीकडे यात्रा मार्ग त्यातील मुक्काम इत्यादी सगळी माहिती आहे :
आजच्या रोमांचकारी कार्यक्रमा बद्दल सांगायचेच राहिले. रात्री जेवणा आधी एक दिवा शहिदांसाठी हा कार्यक्रम असतो छोटासा. त्यांनी आवारात एक शहिद स्मारक केले आहे. मोठे खांब अर्ध गोलाकार बांधून पिथौरागड जिल्ह्यातील प्रत्येक शहिदाचे नाव त्यावर लिहिले आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील नावेही यात समाविष्ट आहेत. भली मोठी यादी वाचताना अंगावर काटा येतो. यातील अनेकांना, लष्करातील मरणोत्तर शौर्य पुरस्कारही प्राप्त आहेत. जवळपास प्रत्येक गावातील जवान आहेत. याचे प्रत्यंतर प्रवासात येतेच. अनेक लहान लहान गावांच्या वेशीवर शहिद अमुक अमुक यांच्या गावात आपले स्वागत आहे अश्या कमानी दिसतात. आम्ही येथे दिवा लावला व श्रद्धांजली वाहिली. काहींनी गाणी म्हटली. वातावरण एकदम भावूक झाले. पहाडी लोक जसे प्रेमळ, विश्वासू तेवढेच शूर लढवय्ये असतात. कधीही पाठ फिरवत नाहीत. त्यामुळेच कुमाऊ रेजिमेंट युद्धात, नेहमी सर्वात पुढे असते.काय म्हणावे यांना. या आयांची खरच कमाल वाटते, गावोगावी शहिद असताना देखील आपल्या मुलांना सैन्यात घालण्याचे धाडस त्या करतात. मी मनापासून या सगळ्यांनाच सॅल्यूट केला. हात जोडून शहिदांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली. नुकत्य्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे जास्तच जाणवले होते. सगळ्यांची तिच अवस्था होती. त्यात आमच्या बरोबर एका शहिदाची आई होती - माझ्या आईच्याच वयाच्या- देहरादूनहून आलेल्या श्रीमती स्वराज यादव. मी त्यांना कडकडून मिठी मारली. त्यांनीही न बोलताच हात हातात घेतला आणि थोपटले. जणूकाही त्यांना कळालं होतं मला काय वाटतेय ते. कमाल, कमाल अनुभव होता तो.
या भारलेल्या वातावरणातच आज विसावा घेऊया!
क्रमशः
माझी कैलास यात्रा झाली,
माझी कैलास यात्रा झाली, त्याला चवदा वर्षे झाली. तुमच्या फोटो, वर्तनामुळे त्या आठवणी ताज्या होत आहेत. आम्ही यात्रा संपवून येताना जागेश्वरला मुक्काम केला होता. त्या गोलू मंदिरात जाताना गेलो होतो.
कधी घडलीच आदि कैलास यात्रा, तर पहिल्या बॅचला जाईन, म्हणजे असं जोरदार स्वागत अनुभवता येईल! बाकी हात जोडून ॐ नमः शिवाय म्हणायची इतकी सवय झाली होती, की घरी आल्यावर ती सवय प्रयत्नपूर्वक मोडावी लागली होती.
मस्त वर्णन..
मस्त वर्णन..
ही पुर्ण यात्रा गाडीने करतात काय?
मस्त झालाय हा भाग.
मस्त झालाय हा भाग.
आम्ही पिठोरागड, जागेश्वर, भिमताल, धारचुला असा परतिचा प्रवास केला होता. आमच्या मुक्काम पिठोरागडला होता. ते ही एकदम मस्त टुमदार गाव आहे.
चांगला दिसतोय परिसर.
चांगला दिसतोय परिसर.
धन्यवाद अनया, पराग, साधना आणि
धन्यवाद अनया, पराग, साधना आणि एस आर डी!
कधी घडलीच आदि कैलास यात्रा, तर पहिल्या बॅचला जाईन, म्हणजे असं जोरदार स्वागत अनुभवता येईल! >> हो नक्कीच!
मला वाटते फरक वार्ताहरांचा असेल बाकी कुमाऊ मंडल असेच स्वागत करत असणार! अर्थात दुसर्या बॅच नंतर त्यांच्या फेसबुकपेजवर अपडेटस दिसत नाहीयेत.
ही पुर्ण यात्रा गाडीने करतात काय? > हो साधना आता चांगले रस्ते झाले आहेत. काही ठिकाणी धारचुला नंतर जाणवतात कच्चे रस्ते पण तरिही चालावे लागत नाही. पूर्वी रस्तेच नसल्याने चालावे लागे.
ॐ नमः शिवाय |
ॐ नमः शिवाय |
मी निसर्ग पाहण्यासाठी जायचे
मी निसर्ग पाहण्यासाठी जायचे म्हणत होते. चालत जो निसर्ग दिसेल तो गाडीने कितपत दिसेल माहित नाही. पण चालण्याची
क्षमता लक्षात घेता गाडीने तर गाडीने, पण जायला हवे असे वाटतेय. बघु.
पण जायला हवे असे वाटतेय. >>
पण जायला हवे असे वाटतेय. >> जाच नक्की. गाडीतून, तिथे मुक्कामाला असल्यावर, दिसतोच निसर्ग. चालत असताना इतका नाही पण तरीही खुप सुंदर दिसतो निसर्ग !! कधीही कसाही फोटो काढा सुंदरच येणार !