महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय

Submitted by मंगलाताई on 13 March, 2023 - 07:57

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .
पूर्वी मात्र असं नव्हतं . महाराष्ट्रात अनेक छोटे व्यवसाय किंवा रोजगार सुरू असायचे . पोटापाण्यासाठी काम धंदा निवडणारे अनेक लोक होते , तर पारंपारिक काम करणारे असेही होते .अशा रोजगारांची एक मोठी यादी तयार होते . हे रोजगार स्वतंत्र असायचे पण कुटुंब एकत्र येऊनच करायचे . उत्पन्न कुटुंबातील सर्व सदस्यांचे असायचे .खेड्यात- गावात बारा बलुतेदार असायचे ,असे बलुतेदार प्रत्येक गावीच असायचे .शेतकऱ्यांची अधिक महत्त्वाची काम करणारे त्यांच्या नित्याच्या गरजा भागवणारे ते बलुतेदार . गावातील पाटील, कोतवाल ,कुलकर्णी सोडून हे बलुतेदार असायचे . सुतार ,लोहार , चांभार, तेली , कुंभार ,नाव्ही ,सोनार , परीट, गुरव आणि कोळी .
आता एकेकाची काम बघुयात .
कुंभार मातीची भांडी घडवणे ,पिण्याच्या पाण्याचे माठ, रांजण ,घट ,गाडगी, मडकी ,पणत्या , कवेलू इत्यादी तयार करायचे त्यांना भाजून विकायचे . स्वयंपाकाची भांडी तयार करायची ती विकायची . गौरी- गणपतीच्या मुर्त्या तयार करायच्या , दुर्गा देवीच्या मुर्त्या तयार करायच्या आणि त्या विकायच्या . कुंभार सुगडी तयार करायचे संक्रांतीला ती विकायचे . अशा प्रकारे आपल्या घरात येणारी सगळी जी मातीची भांडी होती ती कुंभाराच्या आव्यात तयार होऊन भट्टीत भाजून आपल्यापर्यंत पोहोचत असत . सुदैवाने आजही कुंभार ही कामे करतात . कारण ते काम इतर कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही .
कोळी नदीतून नावेतून प्रवास करवून आणायचे . यांना ढिवर धीवर असेही म्हणतात . समुद्रात शोध घेऊन मासे ,शंख शिंपले शोधून आणणे , माशांवर विविध प्रक्रिया करून ती लोकांपर्यंत नेऊन विकणे अशी काम गावातील कोळी करायचे . त्याशिवाय लहान- लहान गावात नदीच्या पात्रातून पैलतीरी स्वतःच्या नावेतून नेऊन सोडण्याची कामही कोळी करायचे .
गुरव - गुरव हे गावातल्या देवळात पुजारी म्हणून काम करायचे . घरोघरी बेलपत्री पोहोचवण्याचे काम गुरव करायचे .गुरव देवळात गात असत , गुरुवांच्या अनेक पिढ्या देवळात राहात , देऊळ संरक्षणाचे काम देखील करत असत .
चांभार - चांभार गावातल्या मृत जनावरांच्या कातड्यांपासून निरनिराळ्या वस्तू तयार करायचे ते विकायचे . चपला , बूट , कातडी सामानं , मोटं इत्यादी दुरुस्त करायचे नवीन वस्तू तयार करायचे आणि ते विकायचे . आता आपण आपली पादत्राणे शोरूममधून घेतो .
मातंग - मातंग समाज केतकी पासून निघणारा जो तंतू आहे त्याचे दोरखंड तयार करायचे . शिंदीच्या पानांपासून झाडू तयार करायचे . सुपं , टोपल्या ,परडे इत्यादी वेताच्या वस्तू तयार करायचे आणि गावात विकायचे . शुभप्रसंगी हलगी वाजवायचे . इत्यादी कामे मातंग समाज करायचे . आता आपण वरील सगळ्या वस्तू माँलमधे किंवा दुकानात घेतो .
तेली - तेली शेतकऱ्याने दिलेल्या तेल बियांपासून तेल काढून द्यायचे . लाकडाच्या घाण्यावर बैलाला फिरवून शेंगदाणा , जवस , तीळ , करडई , मोहरी , एरंडेल तेल काढायचे. सरकी, ढेप ,पेंड विकणे वंगण विकणे इत्यादी कामे तेली करीत असत . तेलाच्या व्यवसायाशी संबंधित बाकी सगळे लहान मोठे व्यवसाय तेली करत असत . एक बैले किंवा दोन बैलें तेली असायचे . म्हणजेच एका बैलाचे फिरवून तेल काढणे किंवा दोन बैलांना फिरवून तेल काढणे अशी ती पद्धत असे .आता आपण डबेबंद ,. बाटलीबंद सिलबंद रिफायनरी तेल वापरतो , किंवा लाकडी घाण्याचा व्यवसाय हल्ली वाढतांना दिसतो आहे .
न्हावी- न्हावी गावातील लोकांची दाढी करणे , केशभूषा करणे , केशरचना करणे इत्यादी कामे करत असत . विधवा स्त्रियांचे केशवपण करणे केशकर्तनालय चालवणे , लहान मुलांची जावळं काढणे, एखाद्या घरी कार्यक्रम असेल घरोघरी जाऊन जेवणाची आमंत्रण देणे ही कामे नाभीक करत असत.
परीट आपण यांना धोबी या नावाने ओळखतो . घरोघरी जाऊन मळलेले कपडे गोळा करायचे ते नदीवर किंवा घाटावर न्यायचे तिथे धुवायचे, वाळू घालायचे, धुवून इस्त्री करून पुन्हा घरोघरी पोहोचवून देणे हे त्यांचे काम होते .आता आपण त्यांना आयरन वाला , इस्त्रीवाला या नावाने ओळखतो त्यांच्या व्यवसायात आता बराच बदल झालेला आहे.
माळी - माळी स्वतःच्या बागेत माळवं पिकवायचे, म्हणजेच फुले ,भाज्या ,कांदा बागायती पिके काढायचे आणि ते गावात विकणे अशी काम करायचे . "आमची माळीयाची जात शेत पिकवू बागायत " ही संत चोखोबांची ओळ आठवते .
‌ लोहार लोखंडाच्या वस्तू घडवणारे हे कारागीर असत . तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून विविध वस्तूंचे आकार देण्याचे काम ते करायचे . शेतीची अवजारे तयार करणे , बैलगाडीचे आरे तयार करणे , बाग कामाची अवजारे तयार करणे , विळे , कोयते , सळया , प्राण्यांच्या खुरांची नालं तयार करणे , कुदळी , घमेली , पावडे , खिडक्यांची गजं , दाराच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम लोहार करत असत . " ऐरणीच्या देवा तुला ठिणगी- ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे " हे गाण्याचे बोल आठवले का ?
सुतार लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम सुतार करायचे . त्यांना कारागीर असे म्हणत . लाकूड आणल्यावर त्याला तासायचे , करवतीने कापायचे , पटाशी वापरून, रंधा वापरून गुळगुळीत करून विविध वस्तू तयार करायचे . पाटं , खुर्च्या , स्टूल , चौरंग , घरातली छोटी देवळं , दाराच्या चौकटी, खिडकीच्या चौकटी इत्यादी तयार करण्याचे काम सुतार करत असतं . लाकडी खेळणी तयार करायचे , बंगया तयार करायचे, बारशासाठी पाळणे तयार करायचे, लाकडाचे छोटे नंदी तयार करायचे अशी कामे सुतार करायचे .
सोनार - सोन्या-चांदीचे दागिने घडवायचे , देवांचे टाक घडवायचे , वास्तुदेवतेच्या प्रतिमा तयार करायचे चांदीची भांडी दागिणे इत्यादी तयार करण्याचे काम सोनार करत असत . गावागावात जिवती म्हणजेच दीपपूजा हा सण असतो त्यावेळी दारावर जीवती लावण्याचे काम सोनार करायचे .
हल्ली आपल्याला ज्वेलर्स आढळतात पण बारकी दुकाने टाकून सोनाराचे काम पण सुरू असतं .
हे जे बारा बलुतेदार होते ते आपला व्यवहार पैसा न घेता करायचे .कामाच्या मोबदल्यात सुगीच्या दिवसात वर्षभराचे धान्य द्यावे लागे .
या बारा बलुतेदारांशिवाय गावोगावी फिरून आपले पारंपरिक उद्योग करणारे , व्यवसाय करणारे असत . अशावेळी हे पूर्ण कुटुंब बैलगाडी , खाचर किंवा घोड्यावरून सामान वाहून नेत गावी जाऊन राहुटी ठोकत व तिथेच काही दिवस मुक्काम करत , तिथेच आपला व्यवसाय सुरू करत असतं . तिथला व्यवसाय झाला की पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं .
कल्हई करणारे- गावात कल्हई करणारे लोक तांब्या- पितळेची भांडी कल्हई करून देत असत . ते स्वतः बैलगाडीवर प्रत्येक गावाला जायचे , त्यांचे कुटुंब सोबत असायचे . गावाच्या वेशीवर एखाद्या वडाच्या सावलीला कोळशावर चालणारा भाता जमिनीत गाडून ते बसवत असत . त्याला फिरवायला दांडा असे , तो दांडा फिरवला की निखारे फुलत , त्यावर पितळी भांडी तांब्याची भांडी गरम करून त्यावर नवसागराचा लेप देऊन कल्हई केली जात असे . आता पितळेची भांडी वापरणे बंद झाल्यामुळे कल्हई प्रकार दिसत नाही .
वडार - वडार लोक गावोगावी फिरून दगडाचा पाटा- वरवंटा , दगडी खल विकायचे .भटक्या जमाती तील हे लोक कुठेही आपली झोपडी शाकारायचे व व्यवसाय संपला की इतरत्र जायचे . गावातले लोक त्यांच्याकडून दगडाच्या वस्तू विकत घ्यायचे , आता मिक्सरने हे उद्योग बंद केले .
बोहारीण - डोक्यावर मोठ्या गाठोड्यात कपडे बांधून भांडी घ्या अशी आरोळी ठोकत बोहारीन दारात येते आणि जुन्या कपड्यांच्या बदल्यात आपल्याला अनेक घासाघसी नंतर एक भांडे देते . आजकाल बोहारीन प्लास्टिकची टोपले ,सुपं , भरण्या असा ऐवज पण मोबदल्यात देते . तिच्याशी घासाघिस करण्यात एक तास जातो .पण कापडं उपयोगात येतात वाया जात नाही .
पोतराज - अंगावर कपड्यांच्या माळा ,घुंगरांच्या माळा घालून , कपाळावर कुंकवाची मळवट भरून उघड्या अंगावर आसुडाचे फटके मारत , कोरडा ओढत पोतराज अंगणात येतो . पायात मोठे घुंगराचे चाळ बांधलेले असतात, सोबत बायको असते , तिच्या डोक्यावर देवीचे छोटेसे देऊळ असते . ते घेऊन ते घरोघरी जातात आणि शिधा मागत पोतराज फिरत असतो . हल्ली हे प्रमाण कमी झालेले आहे तरी नामशेष मात्र झालेले नाही कधीतरी पोतराज आढळतो .
सरोदी - फाटलेल्या दर्या सतरंज्या जोडणारे . हातात दाभन , जाड सुया आणि दोरा घेऊन फिरणारे भटके लोकं गोण्याला ठिगळ लावून देणारे , हे लोक गावातून फिरत असायचे आता हे लोक दिसत नाहीत .
सरोदी लोक पत्रावळी द्रोण तयार करण्याचे काम करीत असत . मोहाची पाने , पळसाची पाने गोळा करून पत्रावळी तयार करायचे .
शिकलगार - सायकलवर आपले अवजार घेऊन फिरणारे , हातात पत्रा कापायची कात्री , हातोडी , रिपीट , खिळे घेऊन गल्लीबोळ्यातून आवाज देत हे लोक फिरत असायचे . लोखंडी बादलीचे बुड बदलवून द्यायचे , लोखंडी बादली कापून त्याची शेगडी तयार करून द्यायची ,चाळणी तयार करून द्यायची, घमेल्या
ला बुड बसवून द्यायचे अशी लोखंडी पत्र्याशी संबंधित असलेले काम हे शिकलगार लोक करायचे .आता ते चाळण्या , लोखंडी कढया ,खलबत्ते असे विकतात .
कासार - बांगड्या भरणारे. सायकल वर बांगड्यांची माळ लावून गावोगावी खेडेपाडी जाऊन काचेच्या बांगड्या भरणारे लोकं . काही गावात बाया डोक्यावर टोपली घेऊन बांगड्या विकायच्या अजूनही विकतात . फार पूर्वी कासार लोक घोड्यावरून बांगड्या वाहून न्यायचे आणि भरायचे आता सगळं हातगाडीवर मिळतं , त्यामुळे जायची गरज नाही . पण गावात अजूनही कासार जात असतो , विशेषतः सणावाराला ग्रामीण भागातल्या बाया चुडा भरतात .
मातीच्या भिंतींना गिलावा करून देणारे सारवून देणारे लोक गावात फिरवून आरोळी द्यायचे . अशावेळी ज्यांना आपली घर सारवायची असत ते लोक यांना बोलवून आपल्या भिंतींना गिलावा करून घेत असत . आता मातिच्या भिंती नाही त्याच्यामुळे गिलावाही नाही.
घर साकारणारे - घराच्या छतावर नळ्याची कवेलू किंवा इंग्रजी कवेलू असायची. ती पावसाळ्यापूर्वी शाकारून घ्यावी लागायची . अशी कवेलू शाकारून देणारी माणसं गावात यायची . लोक त्यांच्याकडून कवेलू शाकारून घ्यायचे . दरवर्षी हे काम उन्हाळ्यात करावं लागे .
वीट भट्टीवर विटा भाजण्याचे काम करणारे लोक होते , आताही आहेत . आताही गावाबाहेर वीट भट्टी दिसते आणि त्यावर काम करणारे मजूरही दिसतात .
गारुडी - आपल्या खांद्यावर एक झोळी अडकवून त्यात पुंगी पेटारा असे साहित्य घेऊन गारुडी गावोगावी फिरत असत , आणि सापाचे खेळ दाखवत असत . विशेषता नागपंचमीत गारुडी जास्त दिसायचे . पुंगी वाजवली आवाज केला तर गावातली बालमंडळी गोळा होत असे आता प्राण्यांच्या खेळांवर बंदी असल्यामुळे हे गारुडी दिसेनासे झाले .
केसांच्या मोबदल्यात फुगे विकणारे लोक यायचे . सायकलवरून ते खूप फुगे घेऊन यायचे आणि विंचरून गोळा केलेले केस घेऊन त्या ऐवजी फुगे देत असत .
आईस गोळे किंवा आईस कांड्या , कुल्फी विकणारे लोक दारासमोर गाडी किंवा सायकल घेऊन यायचे आणि गोळे विकायचे .
बुरडकाम करणारे लोक बेताच्या बारीक कमच्यां पासून सुपं , टोपल्या , परडे , झालं , पेटारे असे विनत असत आणि गावोगावी नेऊन विकत असत . आता हे सगळं साहित्य दुकानात मिळतं .
विणकर - हाताने सूतकातून त्या सुतापासून मागट्यावर हातमाग यंत्रावर कापड विणणारे विणकरी होते .
रंगारी विणकर जे कापड विणत असत त्या कापडाला रंगवण्याचे काम रंगारी करत असत .
बेलदार मातीच्या भिंती बांधण्याची मातीचे घरे बांधण्याची काम बेलदार करत असत .
कानातला मळ काढणारे लोक हातात एक तेलाची बुधली आणि जाड तांब्याचा तार घेऊन गावोगाव फिरत असत आणि कानातला मळ काढून देत असत .
नंदीवाला - सोबत एक नंदी घेऊन नंदीवाला घरोघरी फिरत असे . हा नंदीवाला गावाच्या बाहेर राहूटी ठोकत असे . लोकांचे भविष्य सांगण्याचे काम तो करत असे आणि ते भविष्य ऐकून त्याचा नंदी होकारार्थी मान डोलवत असे .
धार लावणारा - लावण्याची काम करणारे लोक सायकलवर आपलं धार लावायचं छोटसं यंत्र घेऊन यायचे आणि सायकल ला पैडल मारून ते धार लावून देत असत .
जादूचे खेळ दाखवणारे जादूगार आपली पोतडी घेऊन यायचा एक विशिष्ट प्रकारचा पोशाख घालायचा गावातले बाळ गोपाळ गोळा करायचा त्याच्या हातात एक जादूची काडी असायची आणि तो काही मंत्र म्हणून छोटे छोटे हात चलाखीचे खेळ दाखवून ही जादू असे सांगत असे .
मोड घेणारे - पितळेची , हिंडालियमची , तांब्याची जुनी भांडी घेऊन त्या मोबदल्यात पैसे किंवा नवीन भांडी अशी देवाणघेवाण हे मोड घेणारे लोक करत असत .
चित्रपट दाखवणारे - एक षटकोनी आकाराचा डबा घेऊन त्याला आत बघता येईल अशी पाच-सहा झाकणे असलेल्या खिडक्या असत . त्यातून आत बघितले तर आतला सिनेमा दिसत असे . असे चालते बोलते सिनेमागृह डोक्यावरून वाहून नेले जाई . आणि जिथे मुक्काम असे तिथे एका फोल्डिंग स्टॅन्ड वर ठेवले जाई .दहा पैसे घेऊन दहा मिनिटांकरिता हा सिनेमा बघता येत असे .यानंतर दुसरे सहा मुलं बघत असत . अशा प्रकारचे हे चलचित्र दाखवणाऱे खऱ्या अर्थाने चल असे फिरतीवर होते . गावोगावी चालून तो चित्रपट दाखवायचे . त्या सिनेमाची मजा आता कशातच नाही .
पिंजारी लोक- सायकलवर किंवा गाडीवर पिंजण्याचे यंत्र घेऊन गादी भरून देण्यासाठी उशा भरून देण्यासाठी पिंजारी लोक गल्ली बोळात फिरायचे आणि कापूस पिंजून रजया , गाद्या, उशा भरून द्यायचे .
आधी मातीच्या भिंती असत ,त्यावेळी त्या सारवण्यासाठी मालामिट्टी नावाची एक प्रकारची चिकन माती येत असे . बैलगाडीतून ती माती विकणारे लोक यायचे आणि दहा पैसे पायलीच्या हिशोबाने ती माती विकत घेऊन बाया घरोघरी साठवून ठेवायच्या नंतर वर्षभर त्या सारवणासाठी उपयोगी आणत असत .
तेल मालिश करून देणारे हातात तेलाची बाटली कंगवा एवढेच साहित्य घेऊन गावात तेल मालिश वाला फिरत असे . आठवला का जॉनी वॉकर सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाये आजा प्यारे पास हमारे काहे घबराए .
गोंदवणारे सुया घ्या बिबे घ्या दाभन घ्या अशी हाक मारत गोंदवून देणाऱ्या बाया गावात येत असत . आणि त्यांच्या जवळच्या सुईने त्या कपाळावर हातावर नावे गोंदवून देत असत .
वासुदेव भल्या पहाटे दारात येत असे आणि भुपाळी आळवत असे .काही भागात अद्यापही वासुदेव फिरताना दिसतात .
गावात बारई लोक विड्याच्या ( नागवेलीची पाने ) पानांची विक्री करत होते .सायकलवर पानाचा पेटारा बांधून गावात फिरायचे .
विहिरी खोदून, बांधून देणारे लोक असायचे .आजही आहेत . विहीरी उपसून स्वच्छ करून देतात .
वरील व्यवसायांचे स्वरूप आता बदललेले आहेत यातले काही जसेच्या तसे आहेत तर काहींचे रंगरूप बदललेले आहेत .काही दुकानातून व्यवसाय करतात , काही ऑनलाईन करतात , काही नुसत्या फोनवरून घरोघरी पोहोचतात अशा प्रकारे काळानुरूप अनेक बदल झालेले आहेत . समाज मागणीनुसार व्यवसाय बदलतात आणि आपणही ते सहज स्वीकार करत करत बदलत जातो . त्यामुळे अनेक व्यवसाय आता वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतात एक आठवण म्हणून सहज लिहून बघितले .
लिहिता लिहिता यातले काही व्यवसाय कदाचित सुटलेले असतील . नव्या व्यवसायांची यादी करते म्हटलं तर ती इतकी मोठी होणार आहे की त्याचा एक स्वतंत्र लेख द्यावा लागेल आणि त्यातले पूर्ण स्वरूपही कधीकधी माहीत नसते .
या व्यवसायांमध्ये मुद्दाम पैठणी चा उल्लेख केलेला नाही . कारण पैठणी तयार करणारे लोक वर्षभरात सर्व कुटुंब मिळून काहीच पैठण्या तयार करत असत . आणि त्यांना राजाश्रय असल्यामुळे त्यांचा पिढीजात पैठणी तयार करणे हाच होता .असे कौशल्य असणारे काहीच कुटुंब असतात त्याच्यामुळे हा व्यवसाय पैठण किंवा गुजरातमध्ये पाटण येथेच होता .पैठण ची पैठणी आणि पाटणचा पटोला प्रसिद्ध आहे .हे लोक आपल्या मुळ गावातच राहिले .गाव आणि व्यवसाय बदलला नाही .
या सगळ्यात एक लिहायचे राहिले ते म्हणजे शाळेच्या आवारात जी आजी बसायची टोपलं घेऊन ती .आठवते का . कवठ ,चिंच ,बोरे ,पेरू ,बोरकूट, फुटाणे खारे दाणे अशा मैत्रीभाव असलेल्या वस्तू तिच्या जवळ मिळायच्या आणि मैत्री नांदवायच्या .या खाऊचे वैशिष्ट्य असे होते की तो कितीही कमी पैशात घेतला तरीही सगळ्यांना पुरत असे .
वर उल्लेख केलेल्या व्यवसायात काही सुटलेले आहेत तर काही व्यवसाय थोड्याफार फरकाने नवीन रूपात समोर येत आहेत .व्यवसाय भिन्नता बघून आनंद होतो . जो तो आपल्या क्षेत्रात निष्णात .आपले पूर्ण आयुष्य एकाच उद्योग व्यवसायात लावून निष्ठेने कर्म करत राहणे हेच एक उद्दिष्ट होते .फसवणूक, लबाडी याचा मागमूसही नव्हता या किरकोळ धंद्यात . शुद्ध व्यवहार .त्यांना तपासून घेण्यासाठी कोणीही भेषज अधिकारी नव्हते .त्यांचे शुद्ध मन हेच त्यांचे सर्वस्व होते .माणुसकीचा अमोल ठेवा जपला या जुन्या लोकांनी .आभारी आहोत

©️ मंगला लाडके
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान माहिती.

बाकी ठीक आहेत, पण 'पोतराज' हा व्यवसाय म्हणता येईल का? माझी आपली एक शंका.

केसांच्या मोबदल्यात फुगे विकणारे लोक यायचे . सायकलवरून ते खूप फुगे घेऊन यायचे आणि विंचरून गोळा केलेले केस घेऊन त्या ऐवजी फुगे देत असत .>>>
हे पहिल्यांदाच ऐकतोय.
फारच छान लेख. निवडक दहात साठवतोय.

वाटसप फारवर्ड लेख आहे का?

किती जुनाट माहिती आहे. जर व्यवसायातून निघणाऱ्या वस्तू विकल्याच जात नाहीत तर कसे काय ते टिकतील?

तेव्हा स्वयं पूर्ण खेडी होती.
गावातील सर्वांच्या गरजा गावात च भागात होत्या..
गरजा ह्या सहकार्य मधून भागल्या जात..
सर्वांचे व्यवसाय चालायचे कारण हक्काची गिऱ्हाईक होती.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे ..त्या मुळे सामाजिक स्थिठी बदलली आणि आज च असुरक्षित स्थिती निर्माण झाली आहे.
संपत्ती चे केंद्रीकरण झाले त्या मुळे गरीब लोकांचं संख्या वाढली.
काहीच लोक सर्व संपत्ती चे मालक झाले..
बारा बलुतेदार पद्धती मध्ये ही स्थिती नव्हती.
दहा वीस वर्षापूर्वी च आई वडील आणि मूल ह्यांच्या वयात फक्त 20 ते 22 वर्षाचा फरक होता.
आज तो 35 ते 40 वर्ष झालं आहे..काहीच वर्षात समाजात एक तर वयस्कर माणसं आणि लहान मूल असे च चित्र असेल .
मधले 20 ते 35 वर्षांची young लोक खूप कमी असतील

केशवकूल, तुम्ही ' बबल्या इकस केसावर फुगे ' हे अहिराणी गाणं ऐका. युट्यूबवर सध्या नाटू नाटु गाण्याइतके त्याला व्युज आहेत (२७० मिलियन की काहीतरी).

फुगे लया फुगे केसावर फुगे
ऐकल,छान आहे.
पण खरच हा धंदा कधी ऐकला पण नव्हता.
अशा केसांना माझ्या घरी बहिणी "अगुळंं" अस म्हणत. मला वाटत ह्याचे "गंगावन" बनवत असावेत.

छान.
आठवणी स्वरुपात लिहिलेत ते आवडले. (शेवटच्या परिच्छेदातील गोष्टी सोडून. ते स्वप्नरंजन नसते तरी चालते). तेव्हाचे जीवन आणि आत्ताचे जीवन याची तुलना केली नाहीत ते ही उत्तमच. एक दस्तावेजीकरण म्हणून लेख आवडला.

बदल तर होत च राहणार .
प्रतेक बदलाचे चांगले वाईट परिणाम त्या त्या काळातील समाजात दिसतात च ..
फक्त चांगले आणि फक्त वाईट असे परिणाम नसतात

केसांच्या मोबदल्यात फुगे विकणारे लोक यायचे . ....... ३-४वर्षांपूर्वी ऐकले होते.फक्त फुग्यांच्या जागी पैसे देतात अशी माहिती त्यावेळच्या कामवालीने सांगितली होती.

लेख संपूर्ण वाचायचा आहे.

चांगला लेख!!

एक दस्तावेजीकरण म्हणून लेख आवडला. >>> येस

केसांच्या मोबदल्यात फुगे विकणारे लोक यायचे . सायकलवरून ते खूप फुगे घेऊन यायचे आणि विंचरून गोळा केलेले केस घेऊन त्या ऐवजी फुगे देत असत .>>> हे पहिल्यांदाच ऐकलं

अशा केसांना माझ्या घरी बहिणी "अगुळंं" अस म्हणत >>> मूळ शब्द आगवळ आहे बहुतेक.

केसांच्या मोबदल्यात फुगे
हे मी '६८साली विटा (कराडच्या जवळ)येथे पाहिले आहे. पण गाणं नवीन आहे आताचं.
तिरुपती येथे आणि काशी येथे केशदान केले जाते. तिथूनही भरपूर केस मिळत असतीलच.

छान माहिती संकलन.
त्या त्या परंपरागत व्यवसायाला संरक्षण देऊन वित्त पुरवठा आणि विपणनाची मदत पुरवली असती तर खेड्यापाड्यातली जनता आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाली असती.

. जो तो आपल्या क्षेत्रात निष्णात .आपले पूर्ण आयुष्य एकाच उद्योग व्यवसायात लावून निष्ठेने कर्म करत राहणे हेच एक उद्दिष्ट होते >> ह्या मागचे खरे व विदारक सत्य म्हणजे अगदी घट्ट अशी जातिव्यवस्था. जन्माने आले ते च काम करायला भाग पाडणारी समाज व्यवस्था. मसान सिनेमात हिरोची धडपड बघूनही कसेतरी होते. जी मुले प्रयत्न कर तात त्यांना पुढे त्रास सहन करावा लागतो.

अजून दोन जुने व्यवसायः पूजा सांग णारे भटजी व कपडे शिव णारा शिंपी,

केसावर फुगे गाणे युट्युब वर फेमस आहे. मी एकदा कराओके नाइट ला म्हटले होते. परत त्यांनी बोलवले नाही.

सांगलीत एक केव्ही के डी म्हणून होते. काय वाट्टेल ते करून दिले जाइल. म्हणे
शोले बघून मला कापूस पिंजणारा माहीत आहे.

छान लिहिले आहे . केसांवर फुगे हे नवीनच कळले . लगे हाथ गाण्याचा एक व्ह्यू वाढवला . भाडीपा च्या एका भागात लीना भागवत ने या गाण्याचे प्रमोशन केले होते ते आठवले.

नेमाड्यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अड गळ ह्या पुस्तकात ह्या गाव गाड्या च्या रचनेवर उत्तम विवेचन आहे. नाल मारून देणारे नालबंद
शेती करणा रे कुण बी, शेतमजूर. पाणी आणून देणा रे भिश्ती.

शोले बघून मला कापूस पिंजणारा माहीत आहे. >>> लहानपणी पिंजारी हिंडायचे. त्यांच्याकडे गादी दिली कि दिवसभर पिंजत रहायचे आणि कमी झालेला कापूस त्यांच्याकडचा टाकायचे. हल्ली गादी बनवणार्यांकडे असतात कामाला.

मोठ्या शहरांमधे नसतील कदाचित पण छोट्या शहरांमधे आणि गावांमधे यातले बरेच व्यवसाय अजूनही चालतातच. अमांच्या म्हणण्याप्रमाणे जातीव्यवस्था यातूनच आली आणि बळकट झाली. त्या त्या व्यवसायाप्रमाणे काम करणारी माणसं आता फार नाहीत पण ती ती जात त्यांना चिकटलेली आहे अजूनही. बरेचसे लोक यातले २-३ धंदे एकत्रितपणे करताना दिसतात.
लहानपणी केसावर फुगे मिळतात हे ऐकले होते पण खरंच कधी नाही मिळाले.

नाग खेळवणारे .
मग अस्वल घेऊन फिरणारे कोण? अस्वलाचा केस काढून विकत.
आता माकड आणि माकडीण ---भागुबाई-- ह्याच्या घराच्या मारामाऱ्या . माकड भागुबाईला काठीन मारायचा .
पुण्याची मंडइ शनिवारी बंद असे. त्या दिवशी एक जादुगार नाग आणि साप घेऊन येत असे आणि जादूचे अचाट प्रयोग करून दाखवत असे. आपल्या हंंडीबाग मुलाची जीभ कापत असे. मग त्याच्या अंगावर काळी चादर टाकत असे. त्याचे अश्लील संवाद जबाब चालत.
"बच्चे लोक ताली बाजाव, जो नाही बजाएगा उसकी मा मर जाएगी." सगळी लहान मुल घाबरून टाळ्या वाजवायची. मी लहान होतो पण घाबरट नव्हतो बरका. मी आपला दोनी हात पाठीमागे नेऊन हळूच एक टाळी वाजवत असे.
मुलगा पण तोडीस तोड. जादुगार त्याला प्रश्न विचारत असे. ह्या कारचा नंबर सांग. तो अचूक सांगत असे.
शेवटी जादुगार एक एक रुपयाला, धंद्यात बरकत प्यारमे स्त्री को वश , करनेवाला ताईत विकत असे. तो दंडात बांधायचा आणि गुरुवारी त्याची पूजा करायची. सो सिम्पल. हा पण व्यवसायच की.
तसेच कीर्तनकार, प्रवचनकार. गोंधळी. मी तर पुण्यात एका लग्नघरी एकदम हाय फाय गोंधळी कार्यक्रम बघितला. तरुणाई एकदम खुश त्याच्यावर!

ती सिस्टीम होती जातीवाद हा वेगळा प्रकार स्वार्थी लोकांनी आणली असावी.
पण बारा बलुतेदार पद्धती मध्ये सर्वांना जगण्यासाठी हक्क नी
व्यवसाय दिले होते.
त्यांचा मान त्यांना दिला जायचा.
फुकट कोणी सेवा घेत नसतं.
गावात मंदिर असायची आज पण आहेत त्याला ग्राम दैवत म्हणतात.
त्यांच्या जमिनी होत्या आज पण आहेत.
त्या कसायला दिल्या आहेत.
माळी,तेली, देवाचा नगारा वाजावनारी जी जात होती त्यांना .
त्या बदल्यात .
तेली लोकांनी देवळात दिव्यासाठी वर्षभर तेल देणे,माळी लोकांनी फुल देणे.
गुरव लोकांना मंदिर रात पूजा करायची त्या बदल्यात दानपेटी मधील पैसे त्यांचे.
सर्वांच्या पोटाची सोय केली होती.
जातीयवाद हा प्रकार वेगळाच आहे.
गावातील मंदिराची व्यवस्था योग्य रित्या लावून लोकांना रोजगार पण दिला गेला होता

एक थोडा अवघड व्यवसाय म्हणजे देशी वैदू, हाडवैद्य.

१) देशी वैदू: आयुर्वेदिक अपरक्रस्ट वैद्य नव्हे. झोपडीच्या बाहेर सर्व लाजिरवाण्या रोगांची नावे लिहिलेली व ते जडीबुट्टी करून बरे कर णारा व्यक्ती. ह्यच्या खोपटी बाहेर हलक्या आवाजा त एक टेप लावलेली असे.

२) हाडे जोड णारा हाड वैद्य झाडपाल्याचे वा ट न लावून फळी चिंधी लावून फ्रॅक्चर सुद्धा बरे करणारा.

३) पाइल्स क्लीनिक वाला वैदू.

४) बायकांना गर्भपाताची, गुप्तरोगांवरची वशीध देणारी बाई.
५) जात्यावर दळून देणार्‍या बायका. पापड लोणची करायला मदतीला येणा र्‍या.
६) कंत्राटी आचारी. लग्न कार्यात स्वयंपाक बिर्या णी कर णारे लोक शबे बारा त च्या फीस्टला.

एकच प्याला मध्ये सिंधू नक्की काय व्यवसाय करते घरात पैसे आणायला? कागदाच्या घड्या घालून द्यायचा? तो . मला वैधव्य आल्यावर ती सिंधू सारखे घड्या घालायची वेळ येत नाही तोपरेन्त आपण ओके आहोत असे मी ठरिवले होते. कशी ह्या त्यजू पदाला टाइप्स.

कासार कशे विसरलात लाडके. गावोगावी फिर णारा चुडीवाला.

Pages