ती काळरात्र - भाग ९

Submitted by तुषार विष्णू खांबल on 27 November, 2022 - 13:03

https://www.maayboli.com/node/82683 - भाग १

https://www.maayboli.com/node/82689 - भाग २

https://www.maayboli.com/node/82701 - भाग ३

https://www.maayboli.com/node/82706 - भाग ४

https://www.maayboli.com/node/82708 - भाग ५

https://www.maayboli.com/node/82710 - भाग ६

https://www.maayboli.com/node/82713 - भाग ७

https://www.maayboli.com/node/82716 - भाग ८

ती काळरात्र - भाग ९
शब्दांकन : तुषार खांबल

परतीचा प्रवास आणि अपुऱ्या झोपेमुळे हर्षलला आज आल्यापासून झोपूनच होता. एव्हाना दुपारचे १२:३० वाजले होते. त्याच्या आईने त्याला जेवणासाठी उठवले तसा तो उठला. थकवा आल्याने अंग ठणकत होत. दुपार झाली असली तरी हवेत गारवा होता. त्याने न्हाणीघरात जाऊन अंघोळ उरकली. त्यानंतर त्याने नितीनला कॉल करून घरी बोलावून घेतले. इकडे त्याच्या आईने जेवणाची ताटे वाढली होती. हर्षलने जेवण उरकले. तोवर नितीन आला होता. थोडा वेळ बसल्यानंतर दोघेही नितीनच्या बाईकवरून देवळाकडे जाण्यासाठी निघाले.

देवळात पोहचल्यावर हर्षलने पुजाऱ्यांना दोन्ही गोष्टी मिळाल्या असल्याची माहिती दिली. आता पुढे काय करायचे असे त्यांना विचारले. कॉल लागल्यावर पुजाऱ्यांनी रुपेशला पुढील कार्याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. पुढील महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. त्यादिवशी पहिले कार्य उरकण्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत मृतदेह कोठेही बाहेर न काढण्याची तसेच कार्य झाल्यानंतर तो मृतदेह पुढील कार्यापर्यंत व्यवस्थित सांभाळायची काळजी घ्यायला सांगितले. या कार्याकरिता एखाद्या निर्जन जागेची पाहणी करण्याचे देखील सांगितले. यावर रुपेशने त्याच्या बंगलो स्कीमसाठी मिळालेल्या जागेची माहिती त्यांना दिली.

मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला होता. मुंबईहून आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले होते. गावातील लोकांची शेतातली साफसफाई आणि भाजवळीची कामे सुरु होती. यामुळे मंदिरात गर्दी कमी असायची. २७ तारखेला चंद्रग्रहण होते. त्यामुळे मंदिर बंद राहणार होते. पुजाऱ्यांनी दोन दिवस आधीच पुण्याला येणार असल्याचे रुपेशला कळविले होते. ठरल्याप्रमाणे २४ तारखेला रात्री हर्षल आणि नितीन पुजाऱ्यांसोबत पुण्याला जाण्यास निघाले. रुपेशने त्यांच्या राहण्यासाठी हॉटेल बुक केले होते. २५ तारखेला सकाळी ८:०० वाजता ते तिघे सांगितलेल्या हॉटेलवर पोहचले. त्यानंतर त्यांनी थोडा आराम केला. दुपारी सर्व रुपेशच्या घरी जमणार होते. तिथून ते ठरलेल्या जागी जाणार होते.

ठरल्याप्रमाणे दुपारी २:०० वाजता रुपेशची गाडी हॉटेलच्या गेटवर पोहचली. ते सर्व त्या गाडीत बसून रुपेशच्या घरी जाण्यास निघाले. मंगेश आधीच तिथे पोहचला होता. सर्व आल्या नंतर रुपेशने मंगेशची आणि पुजाऱ्यांची ओळख करून दिली. तसेच आता पुढे काय करायचे ते विचारले.यावर पुजाऱ्यांनी आधी जागा बघून घेऊ असे सांगितले. तसेच सर्व विधी साठी लागणाऱ्या सामानाची यादी रुपेशकडे सोपवली. थोडावेळ इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या नंतर सर्वजण जागा पाहण्यास निघाले. एक-दीड तासातच ते ठरवलेल्या जागी पोहचले.

सदर जागा हि शहरापासून थोडीशी लांब होती. पाठीमागे डोंगरांची रांग, आजूबाजूला पसरलेली हिरवळ, थंड वातावरण, कोणीही या जागेच्या प्रेमात पडलं असत. अश्या ठिकाणी आपला एखादा बंगला असावा असं कोणालाही वाटलं असत. याच उद्दिष्टाने रुपेशने हि जागा खरेदी केली होती. संपूर्ण जागेला पत्रे लावून कुंपण घातले होते. जवळपास वस्ती नसल्याने रहदारी देखील कमीच होती. जागा पाहताच क्षणी पुजाऱ्यांनी सर्वाना एकत्र बोलावले आणि सांगायला सुरुवात केली.

"हे ठिकाण आपल्याला जे कार्य करायचे आहे त्यासाठी योग्य आहे. परंतु त्याआधी आपल्याला या जागेचे शुद्धीकरण करून घ्यावे लागेल. जेणेकरून कार्य सुरु असताना कोणतेही विघान यायला नको. उद्या सकाळी ८:०० वाजता आपण येऊन ठिकाणी छोटीशी पूजा करून जागेचे शुद्धीकरण करून घेऊ. त्यानंतर दुसऱ्यादिवशी दुपारपर्यंत तुम्हाला ज्या दोन गोष्टी सांगितल्या होत्या त्या घेऊन इकडे यायचे आहे." सर्वानी सहमती दर्शवल्यावर सर्व माघारी परतले.

दुसऱ्यादिवशी सर्वजण तयार होऊन पुन्हा त्या जागी जमले. रुपेशने पूजेचे सामान हर्षलच्या हवाली केले. पुजाऱ्यांनी कंपास जमिनीवर ठेवून योग्य दिशा पहिली. त्यानंतर पूजेच्या साहित्याची मांडणी केली. रुपेश आणि रेवतीला फ्रेश होऊन पूजेला बसण्यास सांगितले. सर्वसाधारण पूजेप्रमाणे हि पूजा काही वेळात संपन्न झाली. त्यानंतर पुजाऱ्यांनी दुसरी दिवशीच्या कार्याबद्दल सांगण्यास सुरुवात केली.

"उद्या रात्री ११:१५ वाजता चंद्रग्रहण सुरु होणार आहे. आपले कार्य आपण ८:०० वाजता सुरु करू. सर्व कार्य संपायला किमान चार तास तरी लागतील. त्यानुसार आपल्याला तयारी करून यावे लागेल. कार्य सुरु असताना कोणालाही काहीही खाता येणार नाही. यासाठी येतानाच पोटभर जेऊन येणे. तसेच संपूर्ण कार्य संपे पर्यंत कोणालाही कुठेही जाता येणार नाही. फक्त नैसर्गिक विधीसाठी अनुमती असेल. तसेच कार्य सुरु असताना काही अनपेक्षित किंवा भयावह गोष्टी घडू शकतात. तर कोणत्याही परिस्थितीत घाबरायचे नाहीय. तशी सर्वानी आपली मानसिक स्थिती करून यावी. चला आता उद्या संध्याकाळी ८:०० वाजता याच ठिकाणी जमूया. त्याआधी महत्वाच्या दोन गोष्टी साधारण एक तास आधी या ठिकाणी पोहचतील अशी व्यवस्था करावी." असे म्हणून सर्वजण माघारी परतले.

तिसरा दिवस उजाडला. रुपेश आणि रेवती आज लवकर उठले. रेवतीने कामवाल्या बाईंना आज सुट्टी दिली होती. आज सर्व स्वयंपाक ती स्वतः करणार होती. दोघेही आज रात्री काय होणार याच विचारात होती. रुपेशने कॉल करून संध्याकाळी सर्वांना घरी जेवण्यास बोलावले. त्यानंतर हर्षल आणि मंगेश हॉस्पिटलला जाऊन मृतदेह आणि दूध घेऊन येतील. ते निघाल्यावर रुपेश आणि रेवती पुजाऱ्यांसोबत घरातून निघतील आणि कार्याच्या ठिकाणी पोहचतील असे ठरले. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता. संध्याकाळचे पाच वाजले. सर्वजण रुपेशच्या घरी जमा झाले. एकतासभर पुजाऱ्यांनी रुपेश आणि रेवतीला काही सूचना दिल्या. तसेच सर्वांनी पोटभर खाऊन घेण्यास सांगितले. वाटल्यास खाण्याचे पदार्थ सोबत घेऊन चला पण ते जागेच्या आत नेता येणार नाहीत असे बजावले.

थोडी पोटपूजा आटोपून मंगेश, हर्षल आणि नितीन हॉस्पिटलला जाण्यास निघाले. त्यांना मृतदेह आणि दूध घेऊन ठरलेल्या जागी पोहचायला साधारण दीड तास लागणार होता. घरातून बाहेर पडल्यावर मंगेशने अनिलला कॉल करून ते येत असल्याची माहिती दिली. त्याबरोबर अनिलने सर्व कागदपत्रे तयार केली. तसेच त्याच्या ओळखीतील एका ऍम्बुलन्सची व्यवस्था केली. सर्व गोष्टी अगदी टप्प्याटप्प्याने व्यवस्थित सुरू होत्या. काही वेळातच तिघे हॉस्पिटलला पोहचले. तिकडील सर्व प्रक्रिया पूर्ण करून ते ठरलेल्या जागी जाण्यास निघाले. निघताना मंगेशने रुपेश आणि रेवतीला कळवले. तसे ते देखील घरातून निघाले. साधारण ७:३० च्या सुमारास रुपेशची गाडी त्याजागी पोहचली. मंगेश देखील ऍम्ब्युलन्स सोबत ठरलेल्या जागी पोहचला होता. सर्व जण आता आत शिरले. कुंपणाचे फाटक आतून बंद करण्यात आले. मृतदेह बाहेर काढून एका जागी ठेवण्यात आला. ऍम्ब्युलन्सवाल्याला त्याचे पैसे देऊन पाठवून दिले. आता फक्त सहा जण त्या ठिकाणी होते.

पुजाऱ्यांनी जमिनीवर रांगोळीने साधारण एक व्यक्ती झोपू शकेल इतका एक चौकोन आखला. त्यानंतर त्यावर अभीर, गुलाल, हळद पसरली. त्यानंतर त्यांनी हर्षल आणि नितीन ला मृतदेह आणून त्या चौकटीच्या आत ठेवण्यास सांगितले. हर्षल आणि नितीनने तो मृतदेह आणून त्या चौकटीत ठेवला. त्यानंतर पुजाऱ्यांनी त्या मृतदेहाच्या पायापाशी रुपेश आणि रेवतीस बसायला सांगितले. कारण यापुढील सर्व विधी हे त्या दोघांनाच करायचे होते. आता पुजाऱ्यांनी एकेक विधी सांगायला सुरुवात केली. तसतसे रुपेश आणि रेवती करीत होते.

सर्वप्रथम त्यांनी रेवतीला तांदळाच्या पिठाची एक बाहुली बनवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी रुपेशला तो मृतदेह त्या पांढऱ्या कपड्यातून मुक्त करायला सांगितलं. रुपेश मृतदेह मुक्त करीत असताना पुजाऱ्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली होती. रुपेशने त्या मृतदेहावरील कपडा हटवताच सर्वांचे लक्ष त्या मृतदेहाकडे गेले. पाहताच सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. ग्रहण लागायला अजून वेळ होता. पांढरा पडलेले ते शरीर पौर्णिमेच्या प्रकाशात अधिक भयावह दिसत होते. बराच काळ ठेवल्याने ते कृश झालेले होते. ओटीपोटाजवळ गर्भाच्या खुणा दिसत होत्या.

एव्हाना रेवतीचे काम पूर्ण झाले होते. पुजाऱ्यांनी त्या दोघांना ती बाहुली त्या मृतदेहाच्या छातीवर ठेवायला सांगितली. त्यानंतर त्या मृतदेहाचे हात त्या बाहुलीच्या वर ठेवायला सांगितले. तसे केल्यावर जणू काही एक आई आपल्या बाळाला हृदयाशी कवटाळले आहे असेच वाटत होते. सर्व विधी सुरु असताना पुजाऱ्यांचे मंत्रोचार सुरूच होते. त्यांच्या त्या भारदस्त आवाजाने तेथील वातावरणात एक वेगळ्याच लहरी उत्पन्न होत होत्या. रुपेश आणि रेवती हात जोडून मृतदेहाच्या पायाशी बसले होते. अधून मधून पुजारी त्यांना फुले, हळद-कुंकू, तांदूळ इत्यादी वाहण्यास सांगत होते. साधारण अर्धा तास झाल्यानंतर पुजाऱ्यांनी सर्वाना जवळ बोलावले. आणि आता केलेल्या विधीबद्दल सांगायला सुरुवात केली.

“आता आपण ज्या मृतदेहाची पूजा केली ती त्या मृतदेहाच्या आतील आत्म्यास शांती लाभावी म्हणून. तसेच त्या आत्म्याकडून आपण हा देह आपल्या कार्यासाठी वापरण्याची परवानगी घेतली. त्या आत्म्यातील मातृत्वाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण ती पिठाची बाहुली तिच्या छातीजवळ ठेवली. आता आपण रुपेशच्या पूर्वज ज्यांच्यामुळे हा त्रास या दोघांना सहन करावा लागत आहे त्यांच्या आत्म्याला येथे बोलावणार आहोत. हे सुरु असताना कोणालाही विचित्र आवाज ऐकू येणे किंवा इतर कोणता भास होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तरी कोणीही घाबरून जाऊ नये. कारण जोपर्यंत तुमच्या पासून त्यांना धोका नाही तोवर ते तुम्हाला काहीही करणार नाहीत. त्यामुळे घाबरायचे काहीही कारण नाही. तसेच ज्या कोणाला भास झाला असेल त्याने स्तब्दपणे उभे राहावे. कोणतीही हालचाल करू नये. किंवा दुसऱ्या कोणालाही काहीही विचारू नये. आता आपण पुढील कार्याला सुरुवात करूया. त्या आधी आपण सर्व गाऱ्हाणे घालून त्यांना येथे स्वखुशीने येण्यास विनंती करूया. चला सर्वानी हात जोड." असे म्हणून पुजाऱ्यांनी सर्वाना तांदूळ दिले आणि गाऱ्हाणे घालायला सुरुवात केली.

गाऱ्हाणे घालून झाल्यावर सर्व बाजूला उभे राहिले. रुपेश आणि रेवती मृतदेहाच्या पायापाशी उभे होते. पुजाऱ्यांनी मृतदेहाच्या आजूबाजूला उभ्या आडव्या रेघा मारून मंत्र म्हाणायला सुरुवात केली. तरीही कोणतीही हालचाल होत नव्हती. काही वेळ वाट पाहिल्यावर पुजाऱ्यांनी होम प्रज्वलित केला. त्यांचा मंत्रोचार सुरूच होता. पुजाऱ्यांनी त्यांच्या दोन्ही हातात होमात अर्पण करायचे धान्य आणि घेतले आणि होमात टाकले. त्याबरोबर अग्नीचा मोठा भडका झाला आणि त्या जागेच्या गेटपाशी असलेल्या झाडाची एक मोठी फांदी तुटून खाली कोसळली. ती आल्याचा इशारा मिळाला होता. पुजाऱ्यांनी चारीही दिशेला कलशातील पाणी शिंपडले. त्यानंतर त्यांनी आलेल्या आत्म्याला त्या मृतदेहात प्रवेश करण्यास सांगितले. जसे त्या आत्म्याने मृतदेहात प्रवेश केला तसे त्या मृतदेहात किंचित हालचाल जाणवली. आता पुजाऱ्यांनी रुपेशला त्या मृतदेहाच्या छातीवरील बाहुली उचलून एका केळीच्या पानावर ठेवण्यास सांगितली. त्यानंतर रेवतीला त्यांनी जे दूध आणले होते. ते त्या मृतदेहाच्या स्तनाग्रावर लावण्यास सांगितले. आता त्यांना त्या आत्म्याशी संवाद करायचा होता. जेणेकरून रुपेश आणि रेवतीला असलेला त्रास दूर करता येईल. परंतु त्याआधी त्या दोन्हीही आत्म्यांना तृप्त करणे आवश्यक होते. पुजाऱ्यांनी आता ती बाहुली मृतदेहाच्या ओटीपोटाजवळ ठेवली आणि सर्व पुरुषांना लांब उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर एखाद्या स्त्रीची प्रसूती होते तसे त्या बाहुलीला खाली खाली आणून नंतर रेवतीच्या हातात दिले आणि तिला ती बाहुली पुन्हा त्या मृतदेहाच्या छातीशी ठेवण्यास सांगितले. जसे ती बाहुली त्या मृतदेहाच्या छातीवर ठेवली तसे एखाद्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज आसमंतात घुमू लागला.

दोन तास उलटून गेले होते. ग्रहणाचे वेध सुरु झाले होते. आजूबाजूचा परिसर पूर्णपणे शांत निजला होता. आता पुजाऱ्यांनी रुपेश आणि रेवतीला मृतदेहाच्या आजूबाजूला बसायला सांगितले. त्यानंतर पुजाऱ्यांनी एका वाटीत पाणी आणि दुसऱ्या वाटीत दूध घेतले. त्या दोन्ही वाट्यांवर हात ठेवून त्यांनी काही मंत्र म्हटले. त्यानंतर त्यांनी ते दूध रेवतीकडे दिले आणि पाणी रुपेशकडे. रेवतीला ते दूध बाहुलीला पाजायला सांगितले. तसेच रुपेशला त्या पाण्याने मृतदेहाचे पाय धुवायला सांगितले. पुजार्यांचे मंत्रोच्चार सुरूच होते. साधारण १५-२० मिनिटांत दोघांच्या वाटीतील दूध आणि पाणी संपले. त्यानंतर पुजाऱ्यांनी जमिनीवर एक चौकोन बनवला. आणि ते त्या मृतदेहासमोर बसून त्याच्याशी बोलू लागले.

"कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे?" पुजाऱ्यांनी असे विचारताच त्या चौकोनात अक्षरे उमटू लागली.

"मी राधाबाई किर्तीकर, तू मला इकडे कशाला बोलावलंस?"

"या दोघांना तू का त्रास देते आहेस?"

"मला यांच्या वंशाचा सर्वनाश करायचा आहे. मी याच्या आधीही बराच प्रयत्न केला आहे. परंतु कोणी ना कोणी तरी आडवा येतोच. यावेळी तू आलास. पण यावेळी मी हार मानणार नाही. मी माझं कार्य पूर्ण केल्याशिवाय इथून जाणार नाही."

"हे बघ, तुला जो त्रास झाला तो या दोघांनी दिलेला नाहीय. आणि ज्यांनी दिला ते आता या जगात नाहीत. तू बऱ्या बोलाने यांच्या मार्गातून दूर हो. नाहीतर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव."

"अरे जा.. आता मी अश्या धमक्यांना घाबरत नाही. मला जे हवं आहे ते घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि जर का कोणी मला आडवा गेला तर मी त्याला पण संपवल्याशिवाय राहणार नाही."

हे ऐकल्यावर पुजारी सोडून तिथे उपस्थित असलेल्या सर्व भयभीत झाले. पुजाऱ्यांनी रुपेश आणि रेवतीला पुढे बोलावले आणि त्यांना तिला काय हवाई आहे हे विचारायला सांगितले. तसे रुपेश आणि रेवती मृतदेहाच्या पायापाशी जाऊन उभे राहिले. हात जोडून त्यांनी देवाचे स्मरण केले आणि रुपेशने बोलायला सुरुवात केली.

"आई, आमच्या पूर्वजांकडून जी चूक झाली त्याची शिक्षा तू आम्हाला देऊ नकोस. तुला जे काही हवं असेल टँ६ए आम्ही देण्याचा प्रयत्न करू. पण प्लिज आमच्या पदरात मूल होण्याचं सुख दे. आम्ही मनापासून तुला शरण जातोय. कृपा कर आमच्यावर."

हे ऐकून सुद्धा राधाबाईंचा आत्मा शांत होण्यास तयार नव्हता. बरच काळ चाललेल्या वादावादीनंतर रुपेश आणि “रेवतीचे होणारे मूल घेतल्या शिवाय मी शांत होणार नाही” असे सांगून त्यांचा आत्मा तिथून निघून गेला. रुपेश आणि रेवतीचे हातपाय आता गळायला लागले होते. आपण इतके प्रयत्न करून देखील आपल्या पदरात निराशाच आली असे त्यांना वाटू लागले. ग्रहण सुरु व्हायला अजून एक तास बाकी होता. पुजाऱ्यांनी रुपेशला कालच तिथेच एक खड्डा खणून ठेवायला सांगितला होता. जेणेकरून तिथे तो मृतदेह पुरता येईल. त्यानुसार रुपेशने त्याची तयारी करून ठेवली होती. आता सर्वजण त्या खड्ड्यापाशी आले. पुजाऱ्यांनी रुपेशला त्या खड्ड्यात उतरण्यास सांगितले. पुजाऱ्यांनी आता रुपेशला त्या खड्यात काही सौभाग्यलंकार आणि नवजात बालकाचे साहित्य ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हर्षलला आणि नितीनला तो मृतदेह त्या खड्यात सोडण्यास सांगितला. नंतर पुजाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे रुपेशने त्या खड्यात मृतदेहाचे सोपस्कार केले. त्यानंतर त्याने बाहेर येऊन त्या मृतदेहाला मूठमाती दिली. हर्षल, नितीन आणि मंगेशने तो खड्डा संपूर्णपणे बुजवून टाकला. त्यानंतर पुजाऱ्यांनी त्यावर एक दिवा पेटवला आणि सर्वांना त्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर सर्व तिथून निघून गेले. रेवतीची रडून रडून अतिशय वाईट अवस्था झाली होती. तिने नियतीपुढे हार मानली होती. परंतु विधात्याच्या मनात काही वेगळेच होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सामी

धन्यवाद हरितात्या