ती काळरात्र - भाग ८

Submitted by तुषार विष्णू खांबल on 25 November, 2022 - 13:06

https://www.maayboli.com/node/82683 - भाग १

https://www.maayboli.com/node/82689 - भाग २

https://www.maayboli.com/node/82701 - भाग ३

https://www.maayboli.com/node/82706 - भाग ४

https://www.maayboli.com/node/82708 - भाग ५

https://www.maayboli.com/node/82710 - भाग ६

https://www.maayboli.com/node/82713 - भाग ७

ती काळरात्र - भाग ८
शब्दांकन : तुषार खांबल

सकाळी १०:०० वाजता हर्षल आणि नितीन पुण्याला पोहचले. त्यांनी रुपेशला कॉल केला आणि कुठे भेटायचे विचारले. रुपेशने त्यांना घरी बोलावले. मंगेश पण येणार होता. सर्व एकत्र निघायचे ठरले. अर्ध्या तासात दोघेही रुपेशच्या घरी पोहचले. मागोमाग मंगेश पण पोहचला. किरकोळ गप्पा झाल्यावर मंगेशने त्यांना ‘बाळलीला मॅटर्निटी हॉस्पिटल’ बद्दल सांगितले. तसेच आधी ठरल्याप्रमाणे हर्षल आणि नितीन हे तिकडे जाऊन रुपेशला हव्या असलेल्या गोष्टींसाठी बोलणी करतील असे सांगितले.

जेवणे उरकून ते चौघे हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. काही वेळातच त्यांची गाडी हॉस्पिटलच्या जवळ पोहचली. आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेत हर्षल, नितीन आणि मंगेश हॉस्पिटलमध्ये पोहचले. रुपेश मात्र गाडीतच बसून होता. थोडावेळ इकडे तिकडे पाहिल्यानंतर काल भेटलेला सफाई कर्मचारी मंगेशच्या नजरेस पडला. त्याने त्याच्या जवळ जाऊन त्याला त्याला आपली ओळख करून दिली; अर्थातच ती खोटी होती हे वेगळे सांगायला नको. त्याचबरोबर त्याला देखील त्याच्या बद्दल विचारले. यावर त्याचे नाव अनिल होते आणि तो बरेच वर्ष या हॉस्पिटल मध्ये काम करीत असल्याचे समजले. “एक खाजगी काम आहे त्यासाठी थोडं बोलायचं होते” मंगेशने त्याला सांगितले. यावर तो त्यांना घेऊन हॉस्पिटलच्या मागील बाजूस गेला. तिथे गेल्यावर मंगेशने त्याला रुपेशला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल सांगितले.

गावखेड्यांसोबत आता शहरातही असे जादूटोण्याचे प्रकार सर्रासपणे चालत असल्याची अनिलला चांगलीच माहिती होती. अनेक वेळा विविध गोष्टींसाठी लोक तिकडे विचारपूस करीत असत. अश्या गोष्टी पुरवल्याने पैसे देखील पुष्कळ मिळायचे. त्यामुळे हे सर्व करताना त्यांना काही वाटत नव्हते. त्याला फक्त पैसा महत्वाचा होता. त्याने सरळ मागचा-पुढचा विचार न करता "किती पैसे मिळतील?" असे विचारले.

मंगेशला त्याच्या एकंदरीत देहबोलीवरून त्याचे व्यवहार ज्ञान कमी असल्याचे जाणवले. मंगेशने त्याला सर्व कामाचे पाच हजार रुपये मिळतील असे सांगितले. थोडी घासाघीस करून सात हजारांवर सर्व गोष्टी पुरविण्यास अनिल तयार झाला. शक्य तितक्या लवकर दोन्ही गोष्टी हव्या असल्याचे मंगेशने त्याला सांगितले. अनिलने देखील जसे शक्य होईल तसे तो कळवेल असे सांगितले. मंगेशने त्याला २००० रुपये दिले आणि त्याचा नंबर घेतला आणि आपला नंबर त्याला दिला. त्यानंतर सर्वजण तिकडून निघाले.

आता त्यांना अनिल कडून येणाऱ्या कॉल ची वाट बघायची होती. हर्षल आणि नितीन आता परतीच्या प्रवासाला निघाले. जाण्यापूर्वी रुपेशने त्यांना त्यांच्या आजच्या कामाचे पैसे दिले. तसेच संपूर्ण कामाचे प्रत्येकी ५००००/- रुपये देण्याचे कबुल केले. याव्यतिरिक्त त्यांच्या येण्या-जाण्याच्या, राहण्याचा, जेवणाचा आणि इतर खर्च देखील तोच करणार होता. आता मंगेश दार ४-५ दिवसांनी अनिलला कॉल करून चौकशी करत होता. अश्यातच ३-४ महिने निघून गेले. परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.

एप्रिल महिना सुरु झाला होता. मुलांच्या परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या लागल्या होत्या. अश्या वेळी बरेच लोक आपापल्या गावी किंवा पर्यटनस्थळी फिरायला जात असत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने महाबळेश्वरला पर्यटकांची पिकनिकसाठी जास्ती पसंती दिली जाते. त्यामुळे पुणे सातारा रोड वर गाड्याची बरीच वर्दळ असते. असेच एक नवदांपत्य पिकनिकसाठी महाबळेश्वरला जात होते. नवरा व्यवस्थित गाडी चालवत होता. बायको ७ महिन्याची गर्भवती होती. दोघेही अतिशय आनंदी होते. हाच आनंद साजरा करण्यासाठी ते महाबळेश्वरला जात होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

पुणे शहर सोडल्यानंतर मुख्य रस्त्यावर एका ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. आणि त्याने समोरून त्यांच्या कारला जोरात धडक दिली. कार जागच्याजागी गोलगोल फिरत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विजेच्या खांबावर आदळली. ट्रकचा वेग इतका प्रचंड होता कि कारमध्ये असलेल्या दाम्पत्यापैकी नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पत्नीचा श्वास थोडा सुरु होता. म्हणून स्थानिक लोकांनी तिला जवळच्या रुग्णालयात हलविले. तिथे नेले असता ती गर्भवती असल्याने तिला मॅटर्निटी हॉस्पिटलला न्यावे लागेल असे तेथील डॉक्टारांनी सांगितले. तोवर पोलीस घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोहचले होते. त्यांनी ताबडतोब त्या महिलेला बाळलीला मॅटर्निटी हॉस्पिटल'ला नेण्याची तयारी केली. परंतु हॉस्पिटलला पोहचेपर्यंतच त्या महिलेचा देखील मृत्यू झाला.

दोन्ही मृतदेह आता वेगवेगळ्या शवगृहात ठेवण्यात आले होते. पोलिसांतर्फे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता. ते करीत असताना आंतरजातीय विवाह केला असल्याने दोघांच्या घरच्यांनी त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले असल्याचे समोर आले. तसेच मित्रपरिवारापैकी कोणीही यावेळी पुढाकार घेण्यास तयार नव्हते. शेवटी हॉस्पिटलतर्फे त्या शवांची विल्हेवाट लावण्यात यावी असे आदेश पोलिसांनी हॉस्पिटलला दिले.

अनिलने ताबडतोब मंगेशला कॉल केला आणि सदर मृतदेहाविषयीची माहिती दिली. तसेच तो मृतदेह जातं करून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल याबद्दल देखील सांगितले. यासर्व कामासाठी काही पैसे खर्च करावे लागणार होते. कारण अनिल सोबत अजूनही काही वरिष्ठ मंडळी होती. मंगेशने अनिलवरच हि जबाबदारी सोपवली. तसेच तो स्वतः दुसऱ्यादिवशी येऊन त्याला भेटेल आणि सर्व रकमेची पूर्तता करेल असे सांगितले. अनिलने देखील त्याचे काम करण्याचे कबुल केले. शेवटी त्याच्यासाठी पैसा महत्वाचा होता. इकडे मंगेशने हर्षल आणि रुपेशला या गोष्टीची कल्पना दिली. आणि हर्षलला दुसऱ्या दिवशी पुण्यात येण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे हर्षल दुसऱ्यादिवशी पुण्यात हजर झाला.नितीनला काही काम असल्याने यावेळी त्याला येणे शक्य नव्हते. सकाळचा चहा-नाश्ता आटोपून रुपेश, मंगेश आणि हर्षल हॉस्पिटलकडे रवाना झाले. अनिल तिकडे त्यांचीच वाट पाहत होता. ते आल्याबरोबर अनिलने त्यांची भेट त्याच्या एका वरिष्ठ साहेबांशी घालून दिली. कामाची सर्व बोलणी झाल्या नंतर सर्व आर्थिक व्यवहार २५०००/- रुपयांवर येऊन संपला. रुपेश मात्र या सर्व कामात लांबच राहिला होता. त्या कुठेही स्वतःला इतरांच्या समोर यायचे नव्हते. तो सर्व व्यवहार आटोपून ते तिघे गाडीत पुढील गाडीत चर्चा करीत बसले होते. रुपेशने मृतदेहाविषयी गावी पुजाऱ्यांना कळविले. यावर त्यांनी दोन्ही गोष्टींची व्यवस्था झाल्यावर लागलीच आपण आपले कार्य सुरु करू असे त्याला सांगितले.

ते निघणार इतक्यात अनिलच्या मंगेशला पुन्हा कॉल आला. नुकतीच एका खेड्यातील स्त्रीची प्रसूती झाली होती. गरोदरपणात व्यवस्थित काळजी न घेतल्याने तिला तिची मुले गमवावी लागली होती. तसेच सदर महिलेची प्रकृतीदेखील नाजूक होती. त्यामुळे तिला काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार होते. अनिलने त्यांना लागणारी दुपारी गोष्ट या बाईकडून मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी तिचे हॉस्पिटलचे बिल त्यांनी भरावे असे सांगितले. मंगेशने ते लगेच कबुल केले. हॉस्पिटलच्या बिलासाठी ५०००/- रुपये देऊन मंगेश आणि हर्षल हॉस्पिटलच्या बाहेर पडले. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या दोन्ही गोष्टींची व्यवस्था झाली होती. गाडीत बसल्यावर त्यांनी हि गोष्ट रुपेशला सांगितली. या दोन गोष्टींमुळे रुपेशचे काम आता सुकर होणार होते. त्याने घरी कॉल करून रेवतीला हि बातमी सांगितली. बाप होण्याचा जितका आनंद त्याला झाला होता तितकेच किंबहुना त्याहून जास्त दुःख त्याला त्या मृत पावलेल्या स्त्री बद्दल आणि त्या मूल गमावलेल्या मातेबद्दल वाटत होते.

हे काम आटोपताच हर्षल माघारी जायला निघाला. आज दिवसभर घडलेल्या घटनेचा विचार सारखा त्याच्या डोक्यात घोळत होता. खर तर यावेळी तो एकटा असल्याने थोडी भीती वाटत होती. रुपेशच्या सांगण्या नुसार हर्षलला दुसऱ्यादिवशी पुजाऱ्यांपर्यंत हि बातमी पोहचवायची होती. त्यानंतर पुजारी पुढे काय करायला सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

Group content visibility: 
Use group defaults

छान