आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

Submitted by कुमार१ on 5 November, 2020 - 01:09

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.

ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतेच क्रिकेटवर ' १९७१ : द बिगिनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस ' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

त्यामध्ये 1946 मध्ये इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघाची दयनीय अवस्था वर्णिली आहे. तेव्हा आपल्या खेळाडूंची खायची मारामार झाली होती. तरीही क्रिकेट नियामक मंडळाने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

शेवटी खेळाडूंना वृत्तपत्रात निवेदन द्यावे लागले की आमच्या खाण्याकडे लक्ष न पुरवल्यास भूकबळी पडतील.

हे वाचून वाईट वाटले.
आजची खेळाडू आणि नियामक मंडळाची श्रीमंती थक्क करणारी आहे !

काल शोले (१९७५) चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पींची मुलाखत ऐकली. त्यातला रोचक किस्सा:

सुरवातीस तो थेटरात खास चालत नव्हता. त्यामुळे ते निराश झाले होते. अशात एका थेटर मालकाने त्यांना प्रत्यक्ष खेळाचे वेळी बोलावले. त्यावर ते मालकांना म्हणाले, " अहो, मला तुम्ही काय रिकामं थेटर दाखवायला बोलावता आहात काय ?"
मालक हसून म्हणाले, या तर खरं !
मग सिप्पी तेथे पोचले.
चित्रपटाचा खेळ चालू झालेला होता. मालकांनी त्यांना आधी गप्पांमध्ये रंगवून ठेवले. चित्रपटाचे मध्यांतर झाले. आता मालक म्हणाले, चला माझ्याबरोबर.

मग त्यांना खाद्य खाद्य-पेय विक्री विभागात घेऊन गेले. बघतात तर काय, तिथे नुसते खाद्यपदार्थ तयार होते परंतु ते विकत घ्यायला चिटपाखरू सुद्धा नव्हते !
सिप्पींना तरीही कळेना, " मला काय दाखवताहेत ?"

मग मालकांनी खुलासा केला. "अहो, या खेळाची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. आता मध्यंतर झालेले आहे. तरीसुद्धा एकही प्रेक्षक आतून बाहेर येऊन खाण्यापिण्यासाठी उत्सुक नाही. सर्वजण चित्रपटात खूपच रंगून गेलेले आहेत. त्यांना लवकरात लवकर त्याचा उत्तरार्ध पाहण्याची जाम उत्सुकता आहे. हेच तुमचे यश समजा !!"

हे ऐकल्यावर सिप्पी धन्य झाले !

हा हा.
डास चावून मलेरिया झाला हा अपघाती मृत्यू तर मग कुठलेही जिवाणू, विषाणू शरीरात जाऊन रोगाने मृत्यू हा पण अपघाती मृत्यू म्हणायला पाहिजे, त्यावर उपचार उपलब्ध असो/नसो.

पण विषारी सर्प दंशाने मृत्यू झाल्यास तो अपघातीच असेल.

डास चावून मलेरिया झाला हा अपघाती मृत्यू

>>> मुळात असे प्रकरण ग्राहक आयोगाने दाखल तरी कसे करून घेतले याचे मला आश्चर्य वाटते

हे एक:-

विजय भटांच्या ‘रामराज्य’ सिनेमाची जाहिरात, चक्क उर्दूत! कलाकार - शोभना समर्थ आणि प्रेम अदीब. वर्ष १९४३

267D3C13-4888-4FA1-80E6-BE7ADA438389.jpeg

बहुदा त्याकाळी उत्तरेत उर्दू हीच भाषा मुख्य भाषा होती. मला आठवतंय की टॉम अल्टर जे की एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे पुत्र होते त्यांचेही शिक्षण उर्दूमधून झालेले होते. त्यांना खुप सुंदर उर्दू बोलता यायची. त्यांना उर्दू वाचताना इथे बघा: https://youtu.be/lYCeKUKxt-U?t=319
ही पूर्ण मुलाखत खुप सुंदर आहे.

मला वाटतं की उर्दूला एका धर्माची भाषा बघण्यापेक्षा त्यावेळेस वापरात असलेली भाषा म्हणून बघणे जास्ती बरोबर होईल.

काहीतरी खूपच रोचक सापडले आहे मला आज Happy विशेषतः ज्यांना जुनी नियतकालिके चाळायला आवडतात त्यांच्यासाठी तर हा खजिनाच....

"माणूस" साप्ताहिक पहिल्या अंकापासून (जून १९६१)

"वऱ्हाड समाचार: अकोला" पहिल्या अंकापासून (जानेवारी १८६९)

डेस्कटॉप वरून पहा. सर्व अंक स्कॅन केलेले आहेत आणि अगदी जसेच्या तसे. त्या अंकातील तेंव्हाचे लेख, जाहिराती, स्फुटे, छायाचित्रे इत्यादी आज पाहताना फार मौज वाटते. अधूनमधून क्लिक करून कोणतेही अंक पाहता येतात. उदाहरणार्थ, मी उत्सुकतेपोटी चाळलेले हे काही अंक:

माणूस साप्ताहिक पहिला अंक (जून १९६१)

"वऱ्हाड समाचार: अकोला" पहिला अंक (जानेवारी १८६९)

या व्यतिरिक्त हे अजून काही अध्येमध्ये क्लिक केलेले अंक....

माणूस १५ जानेवारी १९७२

माणूस ११ मार्च १९७८

माणूस ३० सप्टेंबर १९७८

माणूस २७ जानेवारी १९७९

माणूस ७ जून १९८०

अतुल
तुम्ही अगदीं मेजवानीच सादर केली आहेत !
माणूसबद्दल आकर्षण होतेच
आता सावकाश एक एक पाहणार
धन्यवाद
....
माणूसच्या पहिल्याच अंकात ब मो पुरंदरे, दि बा मोकाशी, श्री ग माजगावकर हे दिग्गज लेखक दिसत आहेत.
सांगत्ये ऐका हा चित्रपट जोरात चालत असल्याची जाहिरात आणि इतर अनेक धमाल गोष्टी आहेत.

एकंदरीत ही आठवणींची दिवाळी म्हणता येईल Happy

वा

मी आताच लोकसत्ता दिवाळी अंकात श्री गंच्या मुलाने लिहिलेला अनिल बर्व्यांवरचा लेख वाचला. तेव्हा आपण ' माणूस 'कधीच वाचलेलं नाही, त्याबद्दल आत्ता आत्ताच ऐकलं ;याची हळहळ वाटली होती.

भरत.
विलक्षण योगायोग >>+1
..
दि बा मोकाशी यांच्याबद्दलच्या दोन आठवणी जरा वेळाने लिहितो

माणूसच्या पहिल्या अंकात दि बा मोकाशी यांनी कथा लिहिलेली नसून रेडिओ व ट्रांजिस्टरचे कार्य याच्यावर तांत्रिक लेख लिहिला आहे.

त्यांचे स्वतःचे रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. लहानपणी माझ्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर मी ते पहात असे. त्यात एक मध्यमवयीन व्यक्ती मन लावून रेडीओ दुरुस्त करत बसलेली दिसे. पण ते कोण आहेत याबद्दल काहीच माहिती नव्हती.

पुढे कॉलेजला गेल्यावर त्यांच्या काही कथा वाचल्या आणि आवडल्या. एका वर्षी आमच्या कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेला ते परीक्षक म्हणून आले होते. तेव्हा त्यांना अगदी जवळून पाहता आले.
मग कोणीतरी सांगितले की ते रेडिओ दुरुस्ती करतात ना, तेच हे लेखक ! हे कळल्यावर विलक्षण आनंद झाला होता.

विजय तेंडुलकरांनी 1967- 68 दरम्यान ‘माणूस’ साप्ताहिकात रातराणी हे सदरलेखन केले होते. पुढे 1972मध्ये त्याचे 'रातराणी' पुस्तक निघाले.

सध्या त्याची चौथी आवृत्ती बाजारात आहे. यातील बहुतेक लेख हे तत्कालीन देशी-विदेशी नाटके, चित्रपट, अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही दिग्गज कलाकारांवर आधारित आहेत.

Pages