आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

Submitted by कुमार१ on 5 November, 2020 - 01:09

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.

ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगणकपूर्व काळात जगभरात छपाईचा व्यवसाय छपाईचे खिळे जुळवून (कंपोज) चालत असे. 1905 मधली रशियातील एक घटना विलक्षण आहे. St. Petersburgमधल्या Bolshevik छापखान्यातील कामगारांनी संप केला होता.
कशासाठी असावा?

कदाचित विश्वास बसणार नाही.. .
तेव्हा या कामगारांना प्रत्येक खिळ्यामागे अमुक इतके पैसे असे वेतन असायचे. एखादा मजकूर कंपोज करताना त्यात अनेक विरामचिन्हे पण असतात आणि त्याचे किरकोळ पैसे धरले जायचे. परंतु अक्षरांइतकेच पैसे विरामचिन्हाच्या खिळ्यानाही मिळाले पाहिजेत, या मागणीसाठी त्या कामगारांचा अभूतपूर्व संप झाला. पुढे त्या संपातून प्रेरणा घेऊन पहिली रशियाई राज्यक्रांती झाली !

वरवर क्षुल्लक दिसणाऱ्या कारणातून एखाद्या मोठ्या घटनेची ठिणगी कशी पडते याचे हे उदाहरण.

प्रख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलेली एक दंतकथा सुरस आणि चमत्कारिक प्रकारची असल्याने इथे लिहितो.
झाडांचे आंदोलन!
खूप खूप वर्षांपूर्वी पृथ्वीवर लाखो झाडे होती. ती हवेतला कर्बवायू (CO2) शोषून घेत आणि त्या बदल्यात हवेत ऑक्सिजन सोडत. त्यामुळे कालांतराने हवेतील ऑक्सिजनचे ‘प्रदूषण‘ वाढल्याचे झाडांच्या लक्षात आले. Proud

मग पर्यावरणवादी झाडांनी पृथ्वी बचाव समिती स्थापन केली. समितीच्या निर्णयानुसार पृथ्वीवर जाणीवपूर्वक माणसांची भरपूर ‘लागवड‘ करण्यात आली. त्यामुळे पृथ्वीवरील लोकसंख्या वाढून हवेतील कर्बवायूचे प्रमाण बरेच वाढले. अशा तऱ्हेने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण सापेक्ष कमी झाले.

मानवनिर्मित प्रदूषणावर भाष्य करणारी ही बोधकथा !

1980 च्या दशकात Kodakचे polaroid (instant) अर्थात तत्काळ छापील फोटो देणारे कॅमेरे ही एक नवलाई होती. तेव्हा ते परदेशातून आणावे लागत. त्यांनी काढलेल्या फोटोंना भारतात बरेच लोक जादूच्या कॅमेऱ्याचा फोटो असे म्हणत.

फोटो काढल्यानंतर तो कॅमेऱ्यातून लगेच बाहेर येई आणि दोन-तीन मिनिटात त्याच्यावर छबी उमटत असे. फोटो जाडजूड असून त्याला दोन आवरणे होती, ज्यांच्यामध्ये काहीतरी रसायन (silver bromide व अन्य ) भरलेले असायचे.

काल सामान आवरताना मिळालेली एक जुनी आठवण :

polaroid back.jpg
ही फोटोची मागची बाजू
. .
आणि
kumar polaroid.jpg
पुढच्या बाजूवरील ही विद्यार्थीदशेतील छबी !
. .
हे फोटो पर्यावरणस्नेही नसल्याने त्यांची विल्हेवाट लावणे ही सुद्धा एक डोकेदुखी असायची. कालांतराने हे कॅमेरे जवळपास बंद झाले होते परंतु 2020 नंतर खास शौकिनांसाठी म्हणून ते पुन्हा बाजारात आलेत (Fujifilm's Instax)

२०१८ साली जगात खळबळ घडवणारी ही घटना. तिळ्या भावांची ताटातूट आणि त्यामागचे कारस्थान. याचे परिणाम काय झाले हे समजून घेण्यासाठी.
https://www.youtube.com/watch?v=gmK6MyrqMgc

सर, देजावू फिलिंग येतंय या केस मुळे.
कधीतरी संशोधनाला कशाचंही वावडं नसावं हा एक मतप्रवाह विरूद्ध संशोधन करताना नैतिक मूल्ये / मानवी मूल्ये यांचं पालन व्हायला हवं असा वाद रंगल्याचं वाचलं होतं हे आठवतंय. पण कशाच्या संदर्भात ? त्या वादाचा निकाल काय लागला ?
या केसमुळं या आठवणी ( अस्पष्ट) ताज्या झाल्या.

*नैतिक मूल्ये / मानवी मूल्ये >>
वैज्ञानिक संशोधनात याला महत्त्व आहेच.
संशोधन हाती घेताना जे महत्वाचे नैतिक मुद्दे विचारात घ्यायचे असतात त्यामध्ये, ज्यांच्यावर संशोधन करतोय त्यांचे भले व्हावे आणि त्यांना कोणतीही वेदना वा इजा पोचू नये, ही काही मूलभूत तत्वे आहेत :

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11060189/#:~:text=Ethics%20are%....

हे तिळ्यांचे ताटातुट न करायचे वैद्यकिय कारण कायआहे,? भावंडे जातात वेगवेगळ्या घरात, त्यांचेही बाँडिंग असतेच ना जायच्या आधी. एक अंडे विभाजुन झालेली जुळीतिळी व वेगवेगळी जुळी यांच्या बाँडिंग मध्ये फरक असतो का?

डॉ कुमार, शक्य असेल तर वेगळा धागा काढा यावर.

हा विषय मुळातून वाचावा लागेल. सवडीने पाहू.

कुठल्याही संशोधनासाठी संबंधित प्रौढ व्यक्तीने / अज्ञान बालकाच्या पालकांनी 'समजून उमजून दिलेली संमती' महत्त्वाची आहेच

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK430827/

सरांनी दिलेली लिंक पाहिली. धन्यवाद.
ही भारताच्या कायद्यांबद्दल आहे. अणुबाँब टाकल्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं ही जुनी गोष्ट.
बहुतेक वैद्यकीय संशोधनासाठी माकड, उंदीर यांचा वापर होतो या संदर्भात वाचलं असेल. गिनीपिग नावाची कादंबरी होती का ?

https://en.wikipedia.org/wiki/Charles_Whitman
टेक्सास विद्यापीठात १९६६ साली चार्लस व्हिटमन ह्या २5 वर्षाच्या तरुणाने मास मर्डर चे सत्र केले. त्याने एकूण १५ लोकांना ठार केले व ३१ लोक जखमी झाले .
ह्या इथे लिहिण्याचे कारण की charlesला स्वतःच्या व्यक्तीमत्वात बदल होत आहेत ह्याची जाणीव होती. त्याने लिहिलेल्या सुइसाइड नोट मध्ये हे स्पष्ट प्रतीत होते. पण स्वतःवर ताबा मिळवण्यात त्याला यश येऊ शकले नाही. त्याने हेही लिहून ठेवले होते की माझ्या नृत्यू नंतर माझ्या मेंदूची तपासणी करावी. आश्चर्याची गोष्ट असशी की खरोखरच त्याच्या मेंदूत ट्युमर होता.
Forensic investigators have theorized that the tumor pressed against Whitman's amygdala, a part of the brain related to anxiety and fight-or-flight responses among numerous other functions.

खरंय, मेंदूच्या आजारामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. अशाच एका गाजलेल्या खुनाच्या घटनेबद्दल पूर्वी स्वतंत्र लिहिले होते :

https://www.maayboli.com/node/81475?page=4

वाचले आहे.
त्या ठिकाणी चांगली चर्चा झाली आहे.
जरा निराळी केस वाचनात आली. एका व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात लग्न झाल्यावर १६ वर्षांनी सेक्स्च्युअल प्रेफरन्सेस मध्ये बदल होऊ लागले. त्याच्या पत्नीने त्याला डॉक्टरकडे नेले आणि नंतर तपासणीत असे आढळले की त्याच्या मेंदूत ट्युमर आहे. शस्त्रक्रिये नंतर तो नार्मल झाला. पण पुन्हा सहा महिन्यांनी पुन्हा बदल दिसू लागला. त्याच्या पहिल्या शस्त्रक्रियेत ट्युमरचा काही भाग राहिला होता. त्याची वाढ झाली होती. पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यामुळे खुन्याला फाशी देणे कितपत योग्य आहे? फाशीची शिक्षा असूनही खून व्हायचे थांबले आहे का ? अनेक देशांतून फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्लंड मध्ये एके काळी ब्रेड चोरला म्हणून फाशी होत होती. पण समाज वेळेवर भानावर आला आणि असले प्रकार थांबले.
शेवटी काय की माणूस त्याच्या मेंदूत चाललेल्या सोडीअम पोटॅशीअम कणांच्या अथक नाचाचा गुलाम आहे.

त्यामुळे खुन्याला फाशी देणे कितपत योग्य आहे? फाशीची शिक्षा असूनही खून व्हायचे थांबले आहे का ?>>माझ्या स्मरणात असल्याप्रमाणे या अशा विषयावर वर एक धागा आहे....नसल्यास दुसरा धागा काढून तिथे चर्चा करणे उचित....हा विषय खुप क्लिष्ट आहे जितका वरवर सोपा आणि सरधोपट वाटतो तसा तो नाही.

>>>>शेवटी काय की माणूस त्याच्या मेंदूत चाललेल्या सोडीअम पोटॅशीअम कणांच्या अथक नाचाचा गुलाम आहे.
वी आर अ बन्च ऑफ केमिकल्स. दॅट्स ऑल.

26 नोव्हेंबर 1949 हा दिवस स्वतंत्र भारताच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. या दिवशी राज्यघटना मंजूर करण्यात येऊन तिच्या तीन प्रती तयार करण्यात आल्या होत्या :

  1. पहिल्या प्रतीतील संपूर्ण मजकूर इंग्रजीतील सुलेखनात आहे
  2. दुसरी प्रत इंग्रजीत छापलेली आहे आणि
  3. तिसरी प्रत हिंदी भाषेतील हस्तलिखित आहे

या मूळ प्रति संग्रहालयात हेलियम वायूने भरलेल्या पेटीत जतन केलेल्या आहेत.
. .
दिल्लीमध्ये 2004 मध्ये झालेल्या एका लिलावात घटनेच्या पहिल्या आवृत्तीच्या एका प्रतीस 48 लाख रुपयांची बोली लागली होती व ती सर्वाधिक ठरली.
(28 नोव्हेंबरच्या मटा पुणे मधील भगवान गुजर यांच्या लेखातून साभार !)

Pages