पुरणपोळी - रवा मैद्याची

Submitted by VB on 12 January, 2019 - 13:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

चणा डाळ - अर्धा किलो
रवा अन मैदा - पाव किलो प्रत्येकी
सुंठ - अंदाजे एक इंच
५-६ वेलची
गूळ - अर्धा किलो
तूप
मीठ
खायचा सोडा
पाणी
आणि
हळद

क्रमवार पाककृती: 

परातीत थोडे पाणी घेऊन त्यात साफ केलेला रवा अन मैदा घ्यायचा. त्यात चिमूटभर मीठ अन सोडा घालायचा. अर्धा चमचा हळद घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. दुसऱ्या एका भांड्यात त्यांब्याभर पाणी घालून त्यात पिठाचा मळलेला घट्ट गोळा भिजवून झाकून ठेवा. हे पीठ किमान तास दिडतास तरी भिजवायचे(हा वेळ वर धरला नाहीये).

आता जोवर पीठ भिजतेय, पुरणाची तयारी करायची.
जितका कट हवा त्याच्या सव्वापट पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळले की त्यात चणाडाळ घालून शिजवायची. फक्त काळजी घ्या की डाळ जास्त शिजायला नको. डाळ एक कण कच्ची असताना त्यातले पाणी काढून घ्या. अन हो आच मंद ठेवा, नाहीतर डाळ करपेल. आता त्या डाळीत चिरलेला गूळ, सुंठ अन वेलची पावडर घालुन नीट मिक्स करून घ्या. गूळ जसा गरम होईल तसे त्याला पाणी सुटते. सो जास्तीचे पाणी आटवून घ्यावे. पाणी आटले की गॅस बंद करून पुरण थोडे गार होऊ द्या. आता गार झालेले पुरण पाटा, पुरण यंत्र वा मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे. आम्ही पुरण चाळणीत वाटून घेतो मस्त बारीक होते. अन मग बारीक वाटलेल्या पुरणाचे गोळे करायचे. आमच्याकडे पुरण भरपूर भरतात त्यामुळे अर्धा किलो डाळीच्या फक्त ११ पुपो होतात.

पुरणाचे गोळे झाल्यावर भिजत घातलेल्या पिठाकडे वळूयात.

पिठाचा गोळा जास्तीचे पाणी काढून परातीत घेऊन नीट मळून घ्यायचा. मळताना हाताला तूप किंवा तेल लावायचे कारण हे पीठ चिकट असते अन मळायला त्रासदायक देखिल ☺️

पुरणाचे गोळे झाले, पीठ मळून झाले की तवा गरम करा. ही पोळी शेकायला खूप नाजूक असते सो आच खूप जास्त ठेवायची नाही अन खूप कमी पण नाही.

पिठाचा बारीक गोळा करायचा अगद लहान पुरीला लागतो तेवढा. तो मैद्यात लोळवून त्याची छोटी पारी करायची, त्यात पुरणाचा गोळा भरून पारीचे तोंड बंद करायचे. अन परत थोडासा मैदा लावून हलक्या हाताने पोळी लाटून भरपूर तूप लावून शेकायची.

गरमागरम पुपो तयार. तुम्हाला हवी तशी खा, दुध, आमरस, गुळवणी सोबत वा नुसती.
आम्ही पुपो गुळवणीत कालवून खातो, सोबत तोंडलावणी ला बटाट्याची भाजी ,पापड अन कटाच्या आमटीचे भुरके☺️

अन हा पूर्ण भरलेल्या ताटाचा फोटो

Screenshot_2019-01-06-21-08-15-442_com.miui_.gallery_0.png

वाढणी/प्रमाण: 
४/५
अधिक टिपा: 

१-सुंठ, वेलची ची पावडर करताना त्यात थोडी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची.
२-रवा मैद्याची पारी लाटायला अन शेकायला खूप कठीण असते, सो दोन्ही खूप हलक्या हाताने करायचे नाहीतर पोळी फुटते.
३-पुरण वाटताना खूप जास्त कोरडे झाले तर कटासाठी काढलेले थोडेसे पाणी घाला

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई, मला वाटत डाळ थोडी कमी शिजली गेलेली. अजुन एक दोन मिनिट ठेवायला हवी होती. तसच डाळ गरम असताना मॅश करून मग गुळ घाला. दुसर्‍या शक्यता , बहुदा गॅस थोडा मोठा ठेवला गेला असावा, डाळ अगदीच कोरडी केलेली असावी आणि गुळ टणक असावा. यापैकी काहीतरी झाले असावे असा अंदाज.

व्हीबी छान आहे रेसीपी. एकदम सोपी करुन लिहिली आहे.

कुकरला चालेल की..मी कुकरमध्येच डाळ शिजवते.
सई,जर गूळ घातल्यावर डाळ कडक झाली तर थोडे पाणी घालून कुकरमधे 2 शिट्या काढाव्या.स्वानुभव.

व्हीबी छान आहे रेसीपी. एकदम सोपी करुन लिहिली आहे. >>> थँक्स सीमा☺️

<<<डाळ बाहेरच शिजवायची का? कुकरला नाही का चालणार?>>> चालते की, पण भांड्यात शिजवलेल्या डाळीचा कट अप्रतिम लागतो. कुकरमध्ये शिजवलेल्या डाळीचा कट आम्हाला आवडत नाही, सो, आम्ही कुकरमध्ये शिजवत नाही. देवकीताई, एकदा अश्या शिजलेल्या डाळीच्या कटाची आमटी करून बघा अन सांगा☺️ अर्थात त्यातही मसाले नीट शिजले पहिजे म्हणा, पण करा एकदा अशी.

<<<गुळवणी कशी करतात?>>>> मिक्सर च्या भांड्यात ठेचलेली सुंठ घ्यायची, त्यात दोन वेलची अन थोडीशी साखर(फक्त सुंठ अन वेलची नीट वाटली जात नाही म्हणून) घालून बारीक करायची. हे झाले की एका भांड्यात पाणी घ्यायचे, त्यात गुळ अन बारीक केलेली सुंठ-वेलची पावडर घालून उकळून घ्यायची.

झाली गुळवणी तयार , पोळी खाताना गुळवणी नीट गाळून त्यात दूध घालायचे.

गूळ घातल्यावर पाणी सुटतं ते आटवण्यापुरती शिजवली. पण आधीच कच्ची राहिली असेल. रवा मैदा कणीक हिट आहे. पुरण अजिबात बाहेर येत नाही. आणि मऊसूत होते. फार आवडली पाक्रु.

अशी पुपो कधी खाल्ली नाही. आमच्याकडे कणकेचीच होती. ट्राय करायला हवी पध्दत.
घडीच्या मऊसुत पोळ्या (चपाती) हव्या असतील तर कणीक घट्ट मळून पुर्ण बुडेल इतक्या पाण्यात ठेवतो रात्री. सकाळी कणीक पुन्हा मळून पोळ्या केल्या तर कशाही दर्जाचा गहू असला तरी पोळ्या रेशमासारख्या मऊ होतात.

नाही होत. पिठाचा हात लावून मळायची पुन्हा. कणीक पाण्यात ठेवायच्या अगोदर चांगली मळून (तिंबून) घ्यायची.

@मेधावि
मलाही हा प्रश्न पडला होता म्हणून तशी कणीक मळून पाहिली. पण 1.5 तासानंतरसुद्धा गोळ्याचा आकार फारसा बदलला नव्हता. पाणी शोषल्याने चिकट होते. पण मुबलक तेल वापरून मळली की मध्यम consistency ची होते. Gluten formation चांगले होत असेल. त्यामुळे लाटताना पुरण बाहेर येत नाही थोडे जास्त भरले तरी.

आज सकाळीच पोळी खायचे मनात आले होते. मऊसूत पोळी आपल्याला बनवता यावी असे एक धाडसी स्वप्न मनात आहे. ते पुरे होते का बघावे का?

तो मैद्यात लोळवून त्याची छोटी पारी करायची, त्यात पुरणाचा गोळा भरून पारीचे तोंड बंद करायचे>>>>

हे वाचताना वाटतेय तितकेच प्रत्यक्षात सोपे आहे का?

घडीच्या मऊसुत पोळ्या (चपाती) हव्या असतील तर कणीक घट्ट मळून पुर्ण बुडेल इतक्या पाण्यात ठेवतो रात्री. >>>> नेहमीच्या चपात्या का? मुंबईच्या हवेत पीठ आंबणार नाही का,तसेच पीठाचा रंग काळसर होत नाही का?

करून पहाण्यापेक्षा प्रश्नच जास्त पडतात. Wink

देवकी, हो नेहमीच्या चपात्या. आमच्या घरी हा प्रकार नेहमी होतो. तुम्ही म्हटलेलं काहीही होत नाही. अर्थात कणिक चांगली तिंबलेली हवी.
गम्मत म्हणजे मी ज्यांना ज्यांना ही टिप सांगितली त्यातल्या कुणीच ट्राय केली नाही. Happy

शाली जमलं तर खरंच स्टेप बाय स्टेप फोटो टाकाल का? मळलेली कणीक अशी कच्चकन पाण्यात टाकायला कसंतरीच वाटतंय Happy

उद्या फोटो टाकेन नक्की. खरं तर ही आज्जीची ट्रिक आहे. पुर्वी पुपोसाठी कणीक मळताना ती पाट्यावर ठेऊन वरवंट्याने ठेचत असत फोल्ड करत बराच वेळ. त्याला पर्याय म्हणून आज्जी हे करायची. एक लाटी ठेऊन नक्की काय रिझल्ट मिळेल ते नाही सांगता येणार.

इंटरेस्टिंग आयडीया आहे शाली.
इतराजणी, मऊसुत चपात्यांसाठी शरबती गव्हाच पीठ वापरून पहाता का ? इथे मी सुजाता/आशिर्वाद वगैरेचा आता शरबती आटा म्हणुन पॅक मिळतो तो वापरती आहे.
आई लोक शरबती गहुच दळुन वापरतात. बघुदा. कारण आमच्या आईसाहेबांना सांगताना त्यां म्हणाल्या कि , लहानपणापासून शरबती गहूच खाल्ला आहेस कि.

मऊ चपात्यांसाठी रात्रभर पीठ पाण्यात का ठेवायचे? . मी साधारण अर्धा पाऊण तास आधी कणिक तिंबत ठेवते, अन नंतर हलक्या हाताने गोळे करते, मस्त मऊ पोळ्या होतात.

मला वाटते पोळ्या जश्या शेकल्या जातात तसे त्या कडक किंवा मऊ होतात. मला चपाती लाटणे अन शेकणे एकत्र करता येत नाही, तसे केले तर एकतर त्या करपतात किंवा कडक होतात, सो मी आधी सगळ्या लाटून घेते मग मोठया आचेवर शेकते,त्या छान मऊ मऊ होतात☺️

VB ही काही आवर्जून करायची ट्रिक नाहीए. बरेचदा कणीक उरते ते फ्रिजमध्ये ठेवायच्या ऐवजी असे ठेवावे. कधीकधी कितीही पारखुन घेतला तरी गव्हू चांगला निघत नाही. त्यावेळी ही पध्दत उपयोगी येते. तसेही दळणात मुठभर सोयाबीन्स टाकले तरी पोळ्या मऊ होतातच. पोळ्या शेकन्याची लय महत्वाची आहेच. तसेच तव्यावरची पोळी रुमालावर सरळ ठेवण्या ऐवजी उभी धरुन पटकन मुडपून ठेवल्यानेही चपात्या जास्तवेळ मऊ रहातात. अंडे चालत असेल तर चार माणसांच्या कणकेत एक अंडे टाकले तरीही पोळ्या सुरेख होतात. (वास येत नाही अंड्याचा) Happy
सॉरी, तुमचा धागा जरा भरकटला माझ्यामुळे.

सॉरी, तुमचा धागा जरा भरकटला माझ्यामुळे.>>> शाली, सॉरी कशाला?? ठीक आहे, किमान चांगली चर्चा चालू आहे , वाद विवाद नाही ☺️

Var shalee yani lihilay te shilya kankesathi me kelay. Polya kalya hot nahit, Ani mau on hotat. Of course, urleli kanik thodi aste so panyat budawlelya shilya kanket thodi fresh kanik add karayla lagte.

Sorry for English.

मऊसूत चपाती बद्दलची चर्चा इथे करूया. इथे अवांतर म्हणून नव्हे, तर योग्य जागी रहावी म्हणून.

इथले प्रतिसाद तिथे कॉपी पेस्ट केले आहेत.

प्राजक्ता चिंचवणी म्हणजे चिंचेचे सार. आम्ही याला चिम म्हणतो. गुळवणी म्हणजे चक्क गुळाचे पाणी. खाताना दुध घेतात त्यात. गरम असताना दुध टाकले तर गुळवणी फाटते. पुर्वि तेलच्या नावाच्या मोठ्या पुऱ्या केल्या जायच्या खपली गव्हाच्या. त्यासोबतही गुळवणी खात. मस्त प्रकार आहे.

या कृतीने पुरणपोळी करून पहिली आज.

घट्ट पीठ भिजवून पाण्यात ठेवायचे म्हटल्यावर माझी बाई वैतागली. पण दोन तासांनी पीठ काढून चांगले मळले व खलबत्त्याच्या बत्त्याने ठेचले तेव्हा मस्त मउ झाले. पुपोचे आवरण एकदम तोंडात विरघळणारे.. उरलेले पीठ बाई घेऊन गेली, मी घरी जाऊन माझ्यासाठी पुपो करते म्हणून Happy

पाकृ वाचताना मऊ पिठाची पारी भरून लाटणे कठीण जाईल असे वाटले होते, प्रत्यक्षात लाटणे खूप सोपे गेले. भरपूर ग्लूटेन तयार होते व लाटणे सोपे जाते.

एक प्रश्न : पुपोचे आवरण विरघळणारे असले तरी थोडे कडक बनले. त्यामुळे पुपोची घडी घातली की घडीवर ती तुटते. माझे नेहमीच हे असे होते. हे कशामुळे होत असेल? बाई मैदा किंवा तांदूळ पिठी लावून पोळी लाटते.

वरची कणकेची चर्चा ऐकून आठवले की 35-40 वर्षांपूर्वी जेव्हा फ्रीज हा प्रकार ऐकूनही माहीत नव्हता तेव्हा भिजवलेली कणिक चुकून कधी उरली तर आई तिला तेल माखवून पाण्यात बुडवून ठेवायची व दुसरे दिवस वापरायची.

एक प्रश्न : पुपोचे आवरण विरघळणारे असले तरी थोडे कडक बनले. त्यामुळे पुपोची घडी घातली की घडीवर ती तुटते. माझे नेहमीच हे असे होते. हे कशामुळे होत असेल?>>>> साधनाताई, मी वर चपात्यांसाठी जे लिहिलेय तेच पोळ्यांनाही लागू आहे, पोळ्या/चपात्या झटपट शेकल्या, जास्त वेळ न लावता तर मस्त मऊ होतात अन राहतात देखील☺️

Pages