सोने : चकाकती प्रतिष्ठा

Submitted by कुमार१ on 26 July, 2017 - 04:39

सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते. ती म्हणजे – सोने अंगावर घालणाऱ्या आणि घालू न शकणाऱ्या स्त्रिया.

सोने घालणाऱ्या स्त्रियांचा हव्यास हा कायम वाढताच राहतो, तर ते परवडू न शकणाऱ्या स्त्रियांच्या मनातील खंतही वाढतच राहते. अलीकडे झटपट श्रीमंत झालेल्या पुरूषांमध्येही सोने परिधान करण्याचे आकर्षण वाढीस लागले आहे. काही वर्षांपूर्वी अंगावर किलोभर सोने घालून त्याचे प्रदर्शन करणारे एक पुरुष लोकप्रतिनिधी पुणेकरांनी अगदी जवळून पाहिले होते.
माणसाच्या सोनेखरेदीमागे हौस आणि आर्थिक गुंतवणूक ही दोन कारणे अगदी उघड आहेत. आता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे विचार करूयात.

आधी बघूया हौसेचा भाग. अंगावर भरपूर प्रमाणात सोने घातल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन सहजगत्या होते. पण, त्याचबरोबर आपण चोर व लुटारुंच्या नजराही पटकन आकर्षित करतो. गळ्यातील सोनसाखळ्या ओढून पळवण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सर्रास होतात आणि मोठ्या लूटमारीच्या प्रसंगात तर आपण सोन्यात गुंतवलेले आपले सर्वस्व गमावून बसतो. समाजातील आर्थिक विषमतेची दरी जोवर रुंदावतेच आहे तोवर चोरी-दरोड्याचे प्रमाणही वाढतेच राहणार, हे निःसंशय. अशा परिस्थितीत सोन्याच्या वेडाला आवर घालण्याऐवजी आपण सोन्याच्या विळख्यात आपल्याला गुंतवून का घेतो, हे एक न समजणारे कोडे आहे. निदान लांबच्या प्रवासांमध्ये तरी आपण अंगावर सोने न घातल्यास आपणच आपली सुरक्षितता वाढवतो हे समजायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी तर सोने परिधान करण्यापासून चार हात लांबच राहिलेले बरे.

सोने हा प्रतिष्ठेचा निकष फक्त माणसांमध्येच नाही तर तो माणसांनी निर्माण केलेल्या “देवां”मध्येही आहे! काही मोठ्या देवस्थानांमधील ‘देवां’ना सोन्याने मढविण्यात आले आहे आणि त्या सोन्याच्या वजनाच्या आणि किमतीच्या बढाया मारणारे भक्त(?)ही दिसून येतात. अशा प्रकारे आपण तथाकथित ‘देवां’नाही सोन्याच्या भोगवादी कोषात अडकवून त्यांच्यातले देवत्वच काढून घेतले नाही का?

आता बघूयात सोने आणि गुंतवणूक या मुद्द्याकडे. मुळात माणसाने सोने जवळ बाळगणे का सुरू केले असेल? सोने हा दुर्मिळ धातू असल्याने तो मोल्यवान ठरवण्यात आला. कौटुंबिक आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत जवळ बाळगलेले सोने हा महत्वाचा आधार ठरतो. त्यामुळे आपली गुंतवणूक ही काही प्रमाणात तरी सोन्यात असावी, हे मान्य. मात्र या गुंतवणुकीचा अतिरेक हा आपण स्वतः आणि आपला देश अशा दोघांनाही फायदेशीर नसतो.
सोने उत्पादनाबाबत आपण स्वयंपूर्ण नसल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी आपल्याकडील बहुमूल्य परकीय चलन हे हौसेच्या कारणासाठी खर्ची पडते. मध्यंतरी एका अर्थतज्ञाचा लेख वाचनात आला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की आपण जर स्वतःला सच्चे देशभक्त समजत असू तर आपण सोने खरेदीचा हव्यास कटाक्षाने टाळला पाहिजे.

अलीकडे तर काही तज्ञ हे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा Gold bonds मध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन करत असतात. अशा गुंतवणूकीमुळे आपण सोनेचोरीपासून तर नक्कीच सुरक्षित असतो. तसेच ही गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोन्याच्या अनुत्पादक गुंतवणुकीपेक्षा देशासाठी श्रेष्ठ ठरते. सर्व सुशिक्षितांनी विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे. सोन्याला असलेले आंतरराष्ट्रीय महत्व बघता आपल्या देशाकडे सोन्याचा साठा असला पाहिजे. पण, निव्वळ हौसेखातर होणारी व्यक्तिगत सोने खरेदी आणि त्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन किती करायचे याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने केला पाहिजे.

( टीप : सदर लेखातील सोने आणि गुंतवणूक यासंबंधीची विधाने माझ्या सामान्यज्ञान व वाचनावर आधारित आहेत. त्यावर तज्ञांनी भाष्य केल्यास आनंद होईल).
*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतातही बँकांकरवी सोन्याच्या नाण्यांची(कॉइन्सची) /बार्सची विक्री होत असे.

सुवर्णरोख्यांतून जमा झालेल्या पैशातून सरकारने सोने विकत घेतले पाहिजे , हे लॉजिकली वाटलेलं. पण त्यामुळे ते रोखे आणण्याच्या उद्देशालाच बाधा पोचते.

याआधीही स्टेट बँकेच्या गोल्ड डिपॉझिट योजनेत आपल्याकडचे सोने बँकेत जमा करून त्यावर व्याज मिळवायची आणि परतफेडही सोन्यात मिळवायची सोय होती. आपण जमा केलेले सोने नव्हे. कारण बँक ते वितळवून गुंतवणूक करणार होती.

हे सुवर्णरोखे कसे चालतात? म्हणजे आयबीआय आंतरराष्ट्रीय बाजारातून सोने विकत घेऊन ते फिजिकल स्वरूपात कुठे तरी साठवून ठेवते का? असं करत असेल तर परकीय चलन जाईल ना? का दुसऱ्या देशांत ते पैसे गुंतवते? यात व्याज कुठल्या पैशातून दिले जाते? सोने इंवेस्ट कसं करतात ज्यातून वृद्धी होईल? कुठे तरी, कुणाला तरी सोने ठेवावेच लागेल कारण ८ वर्षाअंती परतावा सोन्याच्या किंमतत द्यायची आहे.
चांगला प्रश्न.
सरकारला बाजारातून कर्ज घेताना जो व्याजदर द्यावा लागतो त्यापेक्षा थोड्या कमी व्याजदराने सुवर्ण रोख्यातून सरकारला कर्ज उपलब्ध होते. हा फरक अर्धा टक्के असला तरी सरकारची करोडो रुपयाची बचत होते. हे वाचलेले पैसे 'सुवर्ण राखीव निधी'त जमा केले जातात. सुवर्ण रोख्यांना 'हेज' न केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा व चलनाचा सतत बदलणार्‍या दराचा धोका असतो , अशावेळी 'सुवर्ण राखीव निधी' तील पैसे वापरले जातात. हा फरक फार मोठ्या प्रमाणात असल्यास सरकार पुढील सुवर्ण रोखे योजनेच्या व्याज व ईतर सवलतींमध्ये आवश्यक बदल करू शकते.
गोल्ड डिपॉझीट योजनेत बँकेला स्वस्त व सुरक्षीत ठेव मिळते. हे सोने वितळवून बँक सुवर्ण व्यापार्‍यांना अधिक व्याजाने कर्जाने देऊन नफा कमावतात. सीआरआर, किंवा एसएलार मध्ये सूट मिळाल्यामुळे बँकेकडे कर्ज देण्याकरता अधिक निधी उपलब्ध होतो.

मार्मिक, परतफेड सोन्याच्या.भावात करायचीय. सरकार हे पैसे कर्जाप्रमाणे वापरत असेल, ते त्यांना फायद्याचे पडत असेल तर सोन्याच्या किंमती फार वाढणार नाहीत असाच सरकारचा होरा असणार. म्हणजे सरकारला एकंदर ८/९% पेक्षा जास्त मोजावे लागत नसतील. बरोबर?

हो. परंतू सोन्याचे भाव ह्यापेक्षा अधिक वाढले तर ठरावीक मर्यादेपर्यंत सरकार तोटा सहन करू शकते, कारण प्रत्यक्षात सोने खरेदी न झाल्यामुळे परकीय चलन बचतीमुळे चालू खात्यातील तूट कमी होणे, नीधीअभावी थांबलेले प्रकल्प वेळेवर पुर्ण झाल्यामूळे खर्चातही बचत होते. असे अप्रत्यक्ष फायदे होत असल्याने सरकार थोडाफार तोटा सहन करू शकते.
मंदिरे व देवस्थानातील पडून असलेले सोने गोल्ड डिपॉझीट स्किम मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवले जाईल अशी सरकारची अपेक्षा होती, परंतू ह्या स्किमला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. भविष्यात सरकारकडून अजुन आकर्षक योजना येण्याची शक्यता आहे.

मंदिरे व देवस्थानातील पडून असलेले सोने गोल्ड डिपॉझीट स्किम मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवले जाईल अशी सरकारची अपेक्षा होती, >>> +१ लाख.

मला हा मुद्दा अतिशय महत्वाचा वाटतो. देवस्थानांमधील सोने जर हजारो वर्षात कधीच ‘राष्ट्रीय’ प्रवाहात येणार नसेल तर ते 'मृत’ सोनेच नव्हे काय?

एकवेळ गरीब व मध्यमवर्गीयांकडील सोने हे आपण हौसेचा भाग म्हणून सोडून देवू. पण, देवस्थानांमधील सोन्याचे अतिप्रचंड साठे हजारो वर्षे नुसते पडून राहण्यात काय हशील ? त्या सोन्याचाही काही ‘राष्ट्रीय’ उपयोग असतो , हे जर कोणी समजावून सांगितले तर मला आवडेल.

वरील देवस्थानांमधील सोने यावरील प्रतिसादाना + १
मूर्तींना सोन्याने मढवणे हा प्रकार माझ्या डोक्यात जातो. ते देव या कल्पनेचे विडंबन वाटते.

भारतातील सुवर्णरोख्यांसंबंधी एक उत्साहवर्धक बातमी खालील दुव्यावर वाचता येइल :
http://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-76730
त्यातले दोन महत्वाचे मुद्दे :
१. आजपर्यन्त आर बी आय च्या या योजनेत ५४०० कोटी रु. जमा झाले आहेत.
२. गेल्या वरषात या योजनेमुळे सोन्याच्या आयातीत १०% घट झालेली आहे.

सध्या सरकारची Sovereign सुवर्ण रोखे गुंतवणूक योजना चालू आहे. त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत:

१. २.५% वार्षिक व्याज
२. कर्जासाठी तारण म्हणून वापर
३. ‘जी एस टी’ मुक्त
४. पैसे डिजिटली भरल्यास रोक्याची किमत प्रती ग्राम ५० रु. ने कमी
५. पाचव्या वर्षांपासून बाहेर पडण्याचा पर्याय .

आज पैशाची अडचण भासल्यास कोणता सोनार रोख देऊ शकेल? त्यामुळे सोन्यातील गुंतवणुक वाटते तेवढी सुरक्षित नाही. हल्ली सोन्याच्या भावात चढ उतारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. लॉक डाऊन नंतर रोखतेची गरज वाढणार आहे,तेव्हा सोन्याच्या दरावर दबाव वाढेल.

झिंबाब्वेमध्ये चलनफुगवटा रोखण्यासाठी सोन्याच्या माध्यमाचा वापर (hedge).
अमेरिकी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय.
अन्य आफ्रिकी देशही त्या मार्गाने जाण्याच्या विचारात

https://tfiglobalnews.com/2022/07/01/zimbabwe-ditches-american-dollar-an...

Pages