'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.
'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
विवाह ही बाब खाजगी की सामाजिक
विवाह ही बाब खाजगी की सामाजिक या मुद्द्याबद्दल : एरवी दोन कुटुंबांना जोडणारे वै. उदात्त विशेषणं लावले गेलेले लग्न मानपान, देणंघेणं, त्यावरून गदारोळ, लग्नानंतरचा छळ या बाबी मात्र अचानक खाजगी होऊन जातात.
>> याला अनेको अनुमोदने.
(खरं तर पूर्ण पोस्टच पटली).
देवकी यांचा असा समज असावा कि
देवकी यांचा असा समज असावा कि प्रत्येक जातीची जातपंचायत असते. >>>>>माझा कुठलाही समज इ.नाही. त्या बाईने जे शब्द वापरले ते मी इथे लिहिले.बाकी जात पंचायत, आमचा समाज इ.बाबींकडे दूरान्वयाने संबंध नाही.
इथे मुंबईत असणार्या दुसर्या बौद्ध सहकार्यानेही आमच्या समाजाची मिटिंग असते,त्यावेळी त्यात ठराव वगैरे करतात हे वेगळ्या संदर्भात ऐकले आहे.
साधना, पोस्ट चांगली लिहिलीय
साधना, पोस्ट चांगली लिहिलीय (चित्रपट पाहून त्यावर आलेली).
एका कुठल्यातरी मुलाखतीत मंजुळे म्हणालेत की या चित्रपटाच्या निमित्ताने बर्याच ठिकाणी लोकांनी माझ्या काठीने साप मारायचे चालवले आहे. (म्हणजे अशा आशयाचे. तंतोतंत असेच शब्द नसतील.) ते पटले.
कोण कोणता साप धोपटतो तर कोण कोणता. (हे माझं म्हणणं आहे.)
नाही आवडला.
नाही आवडला.
मी पाहिला. फर्स्ट हाफ छान
मी पाहिला. फर्स्ट हाफ छान वाटला. कॅरेक्टर्स मस्त उभी केलीत. पण नंतर हैद्राबादामधला पार्ट फारच ताणलाय असे वाटले. किती ते डॉक्युमेन्टरी वाटावी इतपत डीटेल्स, आता आवरा अशी परिस्थिती आली तेव्हा तो शेवट आला. तसेही इतक्या चर्चा सगळीकडे सुरु आहेत की बरेच समजलेच होते. शेवटाचा इम्पॅक्ट असा जाणवला नाही फार. एकूण सेक्न्ड हाफ मधे प्रचंड कंटाळा आल्याने ओवरऑल इम्पॅक्ट ग्रेट नाही वाटला.
मैत्रेयी, मधुरा तुम्ही थिएटर
मैत्रेयी, मधुरा तुम्ही थिएटर मधे पाहिलात का? डीव्हीडीवर किंवा ऑनलाईन पाहताना याचा तेवढा इम्पॅक्ट येत नाही.
मला पहिला हाफ प्रचंड आवडला. दुसर्या भागातही कंटाळा आला नाही. आता पुढे काय दाखवणार आहेत विचार करेपर्यंत पिक्चर संपला. म्हणजे तोपर्यंत जे चालू होते त्याने खिळवून ठेवले होते. शेवट मात्र आवडला नाही.
रसप - या रिव्यूशी फारसा सहमत नाही. पहिला भाग मराठीतच काय, पण हिन्दीत सुद्धा अनेक वर्षांत बघितलेल्या कोणत्याही चित्रपटापेक्षा सरस वाटला प्रेमकथा म्हणून.
मला प्रचंड आवडला 'सैराट
मला प्रचंड आवडला 'सैराट '
आत्तापर्यंत ४ वेळा थिएटर मधे पाहिला , आणि गाणी तर सतत ऐकत असते
मला तर सैराटन अक्षरशः याड लावलय........
सैराटचे संगीत म्हटले की
सैराटचे संगीत म्हटले की लोकांना फक्त झिंगाट हवंय आणि त्यानंतर याड लागलंय.
पण याड लागलंय हे गाणे गाणे म्हणुन झिंगाटपेक्षा खुप उच्च आहे. झिंगाटसारखी गाणी भरपुर आहेत पण याड लागलंय अतिशय वेगळे आहे. हॉलिवुडच्या स्टुडिओमध्ये झालेले ध्वनीमुद्रण कानांना अतिशय गोड लागते, हल्ली दुर्मिळ झालेली रिपिट वाल्यु ह्या गाण्यला आहे. माझी खात्री आहे की अजुन दोन वर्षांनी जरी हे गाणे ऐकले तरी ते तित्कचे सुंदर वाटेल.
गाणे ऐकत असताना ते सुर एक विस्त्रुत कॅनवॉस उलगडतोय असा भास उत्पन्न करतात आणि पडद्यावर गाणे पाहताना तो कॅनवॉस खरेच नजरेसमोर पसरतो. गाणे ऐकत असताना जे काही वाटते ते सारे पडद्यावर दिसते. या गाण्यात भवतालचा निसर्ग इतका मोठा दिसतो की त्यातला माणुस शोधावा लागतो. चित्रपटात गाण्यात मध्ये ब्रेक आहे पण युटुबवर गाणे एकसंध पाहायला मिळते. एक सुंदर गाणे आणि त्याला साजेसे चित्रिकरण पाहिल्याचा आनंद हे गाणे देते.
या गाण्यावर "जीव रंगला, दंगला" ची खुप छाप आहे. असे म्हणावेसे वाटते की जीव रंगला पासुन जो प्रवास सुरू झाला तो या गाण्यात पुर्णत्वाला गेला.
पाहिला हा सिनेमा. सरबजीतच्या
पाहिला हा सिनेमा. सरबजीतच्या धाग्यावरच प्रतिक्रिया नोंदवली
नाही आवडला
जितका गाजावाजा झाला तेवढे असे काहीच नाही सापडले.
एक प्रेमकथा म्हणून ठिक आहे .
@ फारएण्ड | 29 May, 2016 -
@ फारएण्ड | 29 May, 2016 - 21:24
मैत्रेयी, मधुरा तुम्ही थिएटर मधे पाहिलात का? डीव्हीडीवर किंवा ऑनलाईन पाहताना याचा तेवढा इम्पॅक्ट येत नाही.
मला पहिला हाफ प्रचंड आवडला. दुसर्या भागातही कंटाळा आला नाही. आता पुढे काय दाखवणार आहेत विचार करेपर्यंत पिक्चर संपला. म्हणजे तोपर्यंत जे चालू होते त्याने खिळवून ठेवले होते. शेवट मात्र आवडला नाही.
रसप - या रिव्यूशी फारसा सहमत नाही. पहिला भाग मराठीतच काय, पण हिन्दीत सुद्धा अनेक वर्षांत बघितलेल्या कोणत्याही चित्रपटापेक्षा सरस वाटला प्रेमकथा म्हणून. >>>> + १
मलासुद्धा पहिल्यांदा जेव्हा मोबाईलवर पाहीला तेव्हा ईतका नाही आवडला, पण दुसर्यांदा थिएटर मध्ये पाहिला तेव्हा प्रचंड आवडला
@ साधना
पण याड लागलंय हे गाणे गाणे म्हणुन झिंगाटपेक्षा खुप उच्च आहे. झिंगाटसारखी गाणी भरपुर आहेत पण याड लागलंय अतिशय वेगळे आहे. हॉलिवुडच्या स्टुडिओमध्ये झालेले ध्वनीमुद्रण कानांना अतिशय गोड लागते, हल्ली दुर्मिळ झालेली रिपिट वाल्यु ह्या गाण्यला आहे. माझी खात्री आहे की अजुन दोन वर्षांनी जरी हे गाणे ऐकले तरी ते तित्कचे सुंदर वाटेल.
गाणे ऐकत असताना ते सुर एक विस्त्रुत कॅनवॉस उलगडतोय असा भास उत्पन्न करतात आणि पडद्यावर गाणे पाहताना तो कॅनवॉस खरेच नजरेसमोर पसरतो. गाणे ऐकत असताना जे काही वाटते ते सारे पडद्यावर दिसते. या गाण्यात भवतालचा निसर्ग इतका मोठा दिसतो की त्यातला माणुस शोधावा लागतो. चित्रपटात गाण्यात मध्ये ब्रेक आहे पण युटुबवर गाणे एकसंध पाहायला मिळते. एक सुंदर गाणे आणि त्याला साजेसे चित्रिकरण पाहिल्याचा आनंद हे गाणे देते. >>>> अगदी अगदी
साधना अनुमोदन. उच्च आहे
साधना अनुमोदन. उच्च आहे गाणे. मी वराती मागून घोडे वर एक चांगला प्रतिसाद दिला होता तो तिथेच मेला इथे आणून चिकटवते.
मला पहिल्या पासूनच आवडला आहे सिनेमा. आर्ची पर्श्या वयोगटातील मुलामुलींची मानसिकता जनरल माहीत असेल तर तो थोडा समजेल जास्त करून. पक्व मनाने पाहिला तर तृटी दिसतीलच. सोलापूर तेलंगणा व हैद्राबादचे चित्रन अगदी अस्सल आहे. ते स्कूटरवर नवर्याला, मुलाला मागे बसवून फिरणे नील बागा वस्तदा विचारणे वगैरे मी पण केले आहे. त्यामुळे अग्दी अगदी झाले. आर्चीचे गाणे आहे त्यावर तेलुगु गाण्यांची छाप आहे. हिरॉइन प्रेमात पडते वगैरे. याड आणि झिंगाट दोन गाणी थेटरात बघायची आहेत. चित्रपटा त दाखवलेले हैद्राबादी बस्ती पब्लिक त्यांची धडपड, भांडणे लग्ने मुले बाळे मी जवळून बघितले आहे. त्यामुळे अधिक जवळचे वाटले. प्रशांत फारच गोड मुलगा आहे. रि़कू पण मस्तच.
फक्त नाही आवडला अशी
फक्त नाही आवडला अशी प्रतिक्रिया आवडली.
सर्वांनाच आवडला पाहीजे असं होऊ शकत नाही.
८९ करोड झाले.
८९ करोड झाले.
१०० करतोय का?
१०० करतोय का?
१०० कोटी साठी सैराटला मनोमन
१०० कोटी साठी सैराटला मनोमन शुभेच्छा!
"स्टोरीटेलींग" नावाची संकल्पना किती महत्वाची असते हे अधोरेखीत करणारा सिनेमा.
ग्रामीण जीवनातील बारकाव्यांचा अनुभव नसणार्या काही गटांना सिनेमा तितकासा न भावणे समजू शकतो.
काही लोकांना डिटेलिंग खूपच जास्त झालेय असे वाटल्याचे वर वाचले परंतू हे डिटेलिंगच सिनेमाला प्रेक्षकापर्यंत थेट पोहोचवते असे वाटते. चित्रपटात जे जे म्हणून काही चांगले उतरले आहे त्यातून नागराजचा दृष्टीकोन किती स्पष्ट आहे हे दिसून येते.
एकदा तालुक्याच्या ठिकाणी मोनोप्लेक्स, साधे थिएटर आणि एकदा मल्टीप्लेक्सला नाशकात पाहिला दुसर्यावेळी कंटाळा येण्याऐवजी सिनेमा अधिकच आवडला हे नमूद करतो.
परश्याच्या मित्राच्या सेल फोन
परश्याच्या मित्राच्या सेल फोन चा रिंगटोन ऐकला का? ते ऐकून लगेच नाचू लागतात ते? फारच विनोदी आहे.
१०० कोटी साठी शुभेच्छा.
"पप्पा तिरु तिरु" अशी सुरुवात
"पप्पा तिरु तिरु" अशी सुरुवात आहे. लहान मुले खूप एंजॉय करतात तो डान्स!
परश्याची गॅंग ट्रेनच्या
परश्याची गॅंग ट्रेनच्या आवाजावर पण नाचते.
सैराट तर्राट झिंगाट या
सैराट तर्राट झिंगाट या शब्दांचे अर्थ माहित असल्याने पाहावासाच वाटला नाही . घरी पाहतानाही जास्त पाहावासा वाटला नाही. मधले मधले पाहिले पण नाहीच वाटलं काही खास.
अजय अतुल च 'वेड लागलं' चं
अजय अतुल च 'वेड लागलं' चं संगीत मात्र खरच गोड आहे.
"पप्पा तिरु तिरु" अशी सुरुवात
"पप्पा तिरु तिरु" अशी सुरुवात आहे. लहान मुले खूप एंजॉय करतात तो डान्स! >>
परश्याची गॅंग ट्रेनच्या आवाजावर पण नाचते. >>>
ह्या आणी अश्याच लहान लहान प्रसंगातुनच तर हा पिक्चर रंगतो
अगदी अगदी, फारच मस्त आहे ती
अगदी अगदी, फारच मस्त आहे ती रिंगटोन. मी माझ्या फोनला पण ठेवलेली पण अॉफीसात अगदीच चमत्कारीक नजरेने बघायला लागल्यावर बदलली. फुल्ल टू धम्माल आहे.
तो सगळा मोबाईलचा सीन जबरी
तो सगळा मोबाईलचा सीन जबरी आहे. मोबाईल नं दिल्यावर पुढच्या सीन मधे तो मोबाईल क्लोजप मधे दाखवतात आणि तेव्हाही थिएटर मधे हशा पिकतो. जणू काही त्या मोबाईलकडे तो टक लावून बघत आहे असे दाखवायचे आहे :). मग ती अचाट रिंग, तो डान्स, पुढच्या वेळेस वाजल्यावर ते हैदराबादी हिन्दी सगळेच धमाल आहे. तो ट्रेन च्या वेळचा डान्सही भारी. नंतर "मालगाडी" ला बाय बाय करणे वगैरे. यांच्या अचाट काड्या अनेकदा आपल्या शाळा कॉलेजातील काड्यांची आठवण करून देतात. त्या "प्रदीप" च्या प्रतिक्रिया सर्वात भारी :). "तू आम्हाला तिकडचे रान दाखव" ला लै हसलो
त्या परशाकडे त्याचा स्वतःचा मोबाईल नसतो ना? तिने नं मागितल्यावर तो सलीम लगेच पुढे होउन स्वतःचा देतो तो ही मस्त सीन आहे.
आणि नंतर बिचारा हताश होऊन
आणि नंतर बिचारा हताश होऊन मोबाईल परत कधी मिळेल याची वाट पाहात बसतो
हो . झाले बोलून की दुकानात
हो :). झाले बोलून की दुकानात आणून दे म्हणतो :). तो प्रदीप समोरच्या दुकानातील मुलीकडे टक लावून बघतना इकडे हा परशाला "तुज्यामुळे ते ही बिघडलं बघ" म्हणतो तो सीन आणि एक्स्प्रेशन्स जबरी आहेत. नीट बघितलेत तर त्याच्या दुकानात एक फेरारीचा झेंडा लटकावलेला दिसेल. मी अशा असंख्य दुकानांत एखाद दोन पॉश ब्रॅण्डची चिन्हे पाहिलेली आहेत, तेथील बाकी मटेरियल शी कसलाही संबंध नसलेली
ट्रेनच्या आवाजावर नाचण्यामुळे
ट्रेनच्या आवाजावर नाचण्यामुळे ट्रेन लक्ष्यात राहते. नंतर ते S T बसून पळतात त्यावेळेला आपल्याला लगेच जाणवते कि चुकीच्या दिशेने निघालेत .
मला तर आर्ची लंगडयाला ...ए
मला तर आर्ची लंगडयाला ...ए चेन्नई एक्स्प्रेस म्हणते ते पण आवडत.
बाकीच्या गाण्यापेक्षा मला हल्ली " आता ग बया का बावरल " हे गाण रीपीट मोड वर एकायला आवडत.
लंगड्या मित्राचे भाव भावना पण
लंगड्या मित्राचे भाव भावना पण सही पकडल्या आहेत. त्याला ही वाट्ते आपले प्रेम बसावे कोणीतरी चिठ्ठी टाकावी अन ते सर्व घडावे. पण तसे होत नाही मग तो आर्ची परश्याच्या मीलनातच आपले सूख बघतो. असे किती तरी असतात. रुपाने साध्या मुली, चमक नसलेले मुलगे. कोवळ्या वयात घाव बसतात मग आत्म विश्वास घालवून बसतात.
सर्वात छान परश्याचे बाबा त्यांना म्हणतात सावलीतली नोकरी शोधा. अगदी अगदी होते. गुड पेरेंतल अॅडवाइस. जे मुले काना बाहेर करतात. आणि सुरवातीला घरचे उठ्त्याल घरचे उठत्याल परश्या झोपेत बोल तो ते ही गोड वाट्ते. अशीच असतात मुले. व्यक्त होता येत नाही पण भावना खवळून उठलेल्या असतात.
सैराट झाल जी पण मस्त आहे. खरे खुरे युगुल गीत. ते पावसात भिजतात . तो झोपाळा वगैरे मस्तच.
खरे तर रिलेशन इथेच सोडून देता येते. लग्न बिग्न न करता. एक हसीन हादसा.....
हां, असं सिनेमाबद्दल / काय
हां, असं सिनेमाबद्दल / काय आवडलं / काय नाही याबद्दल बोला जरा...
आर्ची भावाची बुलेट कॉलेजला घेऊन येते, तेव्हा बुलेटच्या पुढ्यातली नंबरप्लेट तलवारीच्या आकाराची असते. प्रिन्स वाढदिवसाचा केक कापायलाही म्यानातली छोटी तलवारच वापरतो. दोन्ही ठिकाणचा तलवारीचा वापर त्या व्यक्तीच्या वृत्ती दर्शवते.
मधे मधे मजा म्हणुन परशा आणि
मधे मधे मजा म्हणुन परशा आणि मित्र नाचतात ते एकदम नॅचरल आणि मस्त वाटत..
Pages