आयुष्याशी नक्की काय देवाणघेवाण करायची आहे, हा व्यवहार न समजलेल्या तीन मित्रांची कहाणी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये दाखवली होती.
'जो अपनी आंखों में हैरानियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम'
ह्या जावेद अख्तर साहेबांच्या ओळींपर्यंत येऊन ती कहाणी थांबली होती. 'दिल धडकने दो'सुद्धा इथेच, ह्या ओळींच्या आसपासच आणून सोडतो.
१९७८ च्या 'गमन' मधील गझलेत 'शहरयार'नी म्हटलं होतं, 'दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढें!' बरोबर आहे. 'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ही तीन मित्रांची कहाणी होती आणि 'दिल धडकने दो' मध्ये आहेत तीन जोड्या. कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली शाह), कमल-नीलमची मुलगी 'आयेशा मेहरा' (प्रियांका चोप्रा) आणि तिचा नवरा 'मानव' (राहुल बोस) आणि कमल-नीलमचा मुलगा कबीर (रणवीर सिंग) आणि त्याचं प्रेम 'फराह अली' (अनुष्का शर्मा). कमल एक श्रीमंत उद्योगपती आहे. स्वत:च्या लग्नाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने डबघाईला आलेल्या धंद्याला नवसंजीवनी देण्यासाठी काही व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून, कुटुंब व जवळचे नातेवाईक ह्यांना घेऊन युरोपात क्रुझ ट्रीपचा प्लान तो बनवतो. ह्या 'फॅमिली-ट्रीप-मेड-पब्लिक' मध्ये मेहरा कुटुंबातले काही छुपे आणि काही खुली गुपितं असलेले प्रॉब्लेम्स समोर येतात आणि त्यापासून दूर पळणंही शक्य होत नाही. ते त्यांचा सामना करतात आणि ही क्रुझ ट्रीप त्यांना एका आनंदी शेवटाकडे पोहोचवते.
ती तशी पोहोचवणार आहे, हे आपल्याला माहित असतं का ? नक्कीच असतं. पण तरी पूर्ण पावणे तीन तास दिल 'मनापासून' धडकत राहतं !
'दिल धडकने दो' ची कहाणी खरं तर चोप्रा आणि बडजात्यांच्या पठडीची आहे. त्यांना 'जी ले अपनी जिंदगी' किंवा 'बचा ले अपने प्यार को' वगैरेसारखे डायलॉग इथे यथेच्छ झोडता आले असते. पण कौटुंबिक नाट्य असलं तरी त्याला संयतपणे हाताळलं असल्याने 'झोया अख्तर' टच वेगळा ठरतो. तगडी स्टारकास्ट असल्यावर चित्रपट भरकटत जातो, असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण तसं होत नाही. बिनधास्त तरुणाईच्या विचारशक्तीच्या सक्षमतेवरचा नितांत विश्वास झोयाच्या सर्वच चित्रपटांत दिसून आलेला आहे. तो इथेही दिसतो, त्यामुळे मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाला 'दिल धडकने दो' आवडला नाही, तरच नवल !
उद्योगपतींच्या मुलांकडून, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची अपेक्षा खूप सुरुवातीपासून केली जाते. हा दबाव असा असतो की बहुतेक वेळी त्या मुलाला काही दुसरं करायचं असेल, तरी आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. 'कबीर'कडे एक मोठा व्यवसाय सांभाळायची कुवत आणि ते करायची इच्छाही नसते, ह्याची त्याला पदोपदी जाणीव होत असतानाही तो काही करू शकत नसतो. 'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. पण 'कबीर'चं स्वत:शीच चाललेलं हे द्वंद्व त्याने चांगलं साकारलं आहे.
कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे. जावेद अख्तर साहेबांच्या शब्दांना आमिरने उत्तम न्याय दिला आहे.
'अनुष्का शर्मा'ने, 'NH10', 'बॉम्बे वेलवेट' नंतर अजून एक दमदार सादरीकरण केलं आहे. स्वतंत्र विचारांची व ओतप्रोत आत्मविश्वास असणारी 'फराह' उभी करताना, उथळपणा व अतिआत्मविश्वास दिसण्याचा धोका होता. मात्र ह्यातली सीमारेषा व्यवस्थित ओळखून, कुठेही तिचं उल्लंघन न करता तिने आपली छाप सोडली आहे.
प्रियांकाची 'आयेशा'सुद्धा एक स्वयंपूर्ण स्त्री आहे. लग्न झाल्यावर, कुणाच्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीच्या व मेहनतीच्या जोरावर तिने तिचं स्वत:चं व्यवसायविश्व निर्माण केलेलं असतं. एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न, त्यातून येणारं नैराश्य, त्यावर मात करून पुन्हा पुन्हा उभी राहणारी तिच्यातली मुलगी, पत्नी, सून, मैत्रीण तिने सुंदर साकारली आहे.
राहुल बोस आणि फरहान अख्तरला विशेष काम नाही. त्यातही राहुल बोसच्या भूमिकेला जराशी लांबी आहे. पण का कुणास ठाऊक तो सगळ्यांमध्ये मिसफिटच वाटत राहतो. कदाचित कहाणीचीही हीच मागणी आहे, त्यामुळे ह्या मिसफिट असण्या व दिसण्याबद्दल आपण त्याला दाद देऊ शकतो !
'शेफाली शाह'ची 'नीलम' प्रत्येक फ्रेमच्या एका कोपऱ्यात स्वत:ची स्वाक्षरी करून जाते ! तिचा वावर इतका सहज आहे की तिने स्वत:लाच साकार केलं असावं की काय असं वाटतं. मानसिक दबाव वाढल्यावर बकाबका केकचे तुकडे तोंडात कोंबतानाचा तिचा एक छोटासा प्रसंग आहे. त्या काही सेकंदांत तिने दाखवलेली चलबिचल अवस्था केवळ लाजवाब !
'अनिल कपूर' मेहरा कुटुंबाचा प्रमुख दाखवला आहे. तो ह्या स्टारकास्टचाही प्रमुख ठरतो. त्याच्या कमल मेहरासाठी पुरेसे स्तुतीचे शब्द माझ्याकडे नाहीत. मी फक्त मनातल्या मनात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या ! एका प्रसंगात आयेशाशी बोलताना आक्रमकपणे आवाज चढवून तो थयथयाट करतो. सहसा, असा तमाशा करताना कुणी उभं राहील, इथे-तिथे फेऱ्या मारेल, अंगावर धावून जाईल. पण हा माणूस खुर्चीत बसून आरडाओरडा करतो ! दुसऱ्या एका प्रसंगात मोबाईलवर बोलता बोलता त्याची नजर नको तिथे पडते आणि मग त्या व्यक्तींपासून लपण्यासाठी तो झाडामागे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. ती दोन-पाच क्षणांची धावपळ त्याने जबरदस्त केली आहे.
फरहान अख्तर आणि जावेद अख्तरलिखित संवाद चुरचुरीत आहेत. अनेक जागी वनलायनर्स, पंचेस आणि शब्दखेळ करून तसेच काही ठिकाणी वजनदारपणा देऊन हे संवाद जान आणतात.
अनेक चित्रपटांनंतर चित्रपटातलं 'संगीत' चांगलं जमून आलेलं आहे. 'गर्ल्स लाईक टू स्विंग' आणि 'धक धक धक धक धडके ये दिल' ही गाणी तर छानच ! 'धक धक धक धक धडके ये दिल' हे अख्खं गाणं एका सलग 'शॉट'मध्ये चित्रित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. ते निव्वळ अफलातून वाटलं !
शेवट थोडा अतिरंजित झाला असला, तरी एरव्ही 'दिल धडकने दो' वास्तवाची कास सोडत नाही.
ह्या आधीच्या चित्रपटांमुळे झोया अख्तरवर 'उच्चभ्रूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवणारी' असा शिक्का बसलेला असावा, 'दिल धडकने दो' हा शिक्का अजून गडद करेल. पण हेसुद्धा एक आयुष्य आहे आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहेच. कारण कोपऱ्यात लोटल्या गेलेल्या दिलाला इथे एक 'धड़कने का बहाना' नक्कीच मिळतो.
रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2015/06/movie-review-dil-dhadakne-do.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०७ जून २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
पाहिला. फार स्लो वाटला.
पाहिला. फार स्लो वाटला. त्यामुळे कंटाळा येत होता. मला तर पहिल्या १५ मिनिटात त्या प्लुटोची कथाच फार रटाळ वाटली.
आम्हाला २-३ फॅमिलीज ना एकत्र प्लॅन करून एका वीकेन्ड ला बाहेर जाणे महा मुष्किल होते अन इतके बिझी बिग बिझनेसमन लोक रिकामटेकड्यासारखे आठवडे च्या आठवडे क्रूज वर कसे? अनिल कपूर ची फायनान्शियल हालत खराब असताना असला मोठा खर्च का करतो ? असे बरेच प्रश्न पडले. ते क्रूज तसंही लो बजेट दिसत होतं म्हणा
रणवीर अन प्रियांका आवडले मस्त कामं केली आहेत. अनिल कपूर -शेफाली पण छान. बरेच सीन्स वे टू चीजी. जसे मध्यमवयीन बाईने डिप्रेस होऊन लगेच केक वगैरे खाणे. इ. ...
चित्रपट पाहून दोनेक आठवडे
चित्रपट पाहून दोनेक आठवडे झाले पण लिहायला आज वेळ झाला
झोयाचा चित्रपट म्हणून फार अपेक्षा ठेउन गेलो होतो त्यामानाने भ्रमनिरास झाला!
चित्रपट तुकड्या-तुकड्यात चांगला आहे पण एकत्रित परिणामाच्या बाबतीत मार खातो..... अतिशय अ आणि अ क्लायमॅक्स आणि खुप सिरियस प्रसंगावेळी आलेले अतिशय भारी पंचेस नको तिथे लाफ्टर काढतात
पात्रांना establish होउ न देता त्या प्लुटोकरवी हे लोक बाबा असे आहेत असे सांगणे म्हणजे चमच्याने घास भरवणे झाले..... आम्ही बघुन ठरवतो ना ते कसे आहेत.... बर ती ओळख पण फार काही हटके वगैरे नाहिये.... इन फॅक्ट फारच बाळबोध आहे
आजकालच्या प्रेक्षकांना Reading between the lines जमते.... ते अगदी कुत्र्याच्या तोंडी घालून "आम्हाला बाबा यातुन असे असे म्हणायचेय" वगैरे सांगणे म्हणजे दिग्दर्शकीय दिवाळखोरी आहे
कामे सगळ्यांनीच बरी केलीयत पण कुठलेच पात्र असे भिडत नाही
रणवीर सिंग हा माणूस मला off screen अजिबात आवडत नाही (e.g. AIB knockout, Coffee with Karan आणि त्याचे इतर इंटरव्ह्यूज) पण पडद्यावर तो त्या त्या भुमिकेत शोभून दिसतो आणि हा चित्रपटही त्याला अपवाद नाहीये
रणवीर सिंग हा माणूस मला off
रणवीर सिंग हा माणूस मला off screen अजिबात आवडत नाही (e.g. AIB knockout, Coffee with Karan
AIB knockout माहिती आहे पण कॉफी विथ करणबरोबर काय केले होते त्याने?
ऋन्मेष.... युट्युब्स कर तो
ऋन्मेष.... युट्युब्स कर तो कॉफी विथ करणचा एपिसोड
मलातरी खुप उथळ वाटला त्यात तो!
ओके, तसेही AIB knockout मुळे
ओके,
तसेही AIB knockout मुळे मला उथळपणाची लेव्हल माहीत आहेच, कॉ विथ के बघायची गरज पडू नये, बस्स उथळपणा त्याच्याकडून फ्लूकमध्ये घडला नव्हता एवढेच कन्फर्म करायचे होते.
माणुस वैयक्तिक आयुष्यात जसा
माणुस वैयक्तिक आयुष्यात जसा आहे तसाच तो पडद्यावर असणार किंवा जसा पडद्यावर आहे तसाच वैयक्तिक आयुष्यात असणार असा भ्रम आपण का करुन घ्यावा बरे? आपला संबंध त्याच्या पडद्यावरच्या कामाशी आहे. बस... तिथे दिलेला रोल तो आपल्याला पटेल इतपत निभावत असेल तर मग तो वैयक्तिक आयुष्यात काय झक मारतोय याच्याशी आपल्याला का आणि काय देणेघेणे?
^^^ हे रणवीर बाबत असेल तर
^^^
हे रणवीर बाबत असेल तर सहमत आहे
AIB knockout आणि कॉफी विथ करण सारख्या कार्यक्रमात जे दिसते ते पडद्यावरचे व्यक्तीमत्व नसून प्रत्यक्षातले असते.
AIB knockout आणि कॉफी विथ करण
AIB knockout आणि कॉफी विथ करण सारख्या कार्यक्रमात जे दिसते ते पडद्यावरचे व्यक्तीमत्व नसून प्रत्यक्षातले असते. >> नॉट नेसेसरी. अशा कार्यक्रमांचेही त्याला पैसे मिळतात त्यामुळे एक ठराविक आवड, ठराविक वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन घडेल ह्याची त्याच्यावर जबाबदारी आहे.
जेव्हा पैसा हा घटक दूर केला तेव्हा त्याचे व्यक्तिमत्त्व समजून येईल उदा: फॅन्स समोर आले तर सेल्फि देतो का उद्धटपणे बोलतो, सेटवर इतरांशी वागणे प्रोफेशनल आहे का, काळवीटे मारतो का, लोक मारतो का इ इ.
युट्युब्स कर तो कॉफी विथ
युट्युब्स कर तो कॉफी विथ करणचा एपिसोड>>> एक दोन कॉमेन्ट सोडल्या तर मलातरी तो एपिसोड फार फनी वाटला होता..
AIB knockout is not my cup of tea but ज्याची त्याची आवड
नॉट नेसेसरी. अशा
नॉट नेसेसरी. अशा कार्यक्रमांचेही त्याला पैसे मिळतात त्यामुळे एक ठराविक आवड, ठराविक वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन घडेल ह्याची त्याच्यावर जबाबदारी आहे.
>>>
अंशतः असहमत
कारण मुलाखती, गप्पाटप्पा पुर्ण स्क्रिप्टेड असतीलच असे नसते किंवा नसाव्यात. त्यामुळे बोलण्यावागण्यातून सहजच एखाद्याला पारखता येऊ शकते. कोणी मी नाही त्यातला किंवा मी आहे यातला असा आव आणला तरी ते समजून येते.. निदान मला तरी..
माणसे मी अश्शी ओळखतो अश्शी ..
कारण मुलाखती, गप्पाटप्पा
कारण मुलाखती, गप्पाटप्पा पुर्ण स्क्रिप्टेड असतीलच असे नसते किंवा नसाव्यात. <<<<< हाहाहाहा!!!! पी आर पर्सन म्हणून या वाक्यावर प्रचंड हसतेय.
पुर्णपणे स्क्रिप्टेड नसतातचा
पुर्णपणे स्क्रिप्टेड नसतातचा अर्थ प्रश्नोत्तरे स्क्रिप्टेड असू शकतात, पण कलाकार त्यात स्वता:च्या ओरिजिनल शैलीतच दिसतो. उदाहरणार्थ आमीर खान त्याच्या मुलाखतीत रांचोच्या भुमिकेत जाऊन वा पीकेचे बेअरींग पकडून नाही वागत बोलत. एखादा शांत धीरगंभीर स्वभावाचा कलाकार तशीच सावचितपणे तो "ठरलेला" प्रश्नोत्तराचा राऊंड पार पाडतो, तर कोणी आचरट असेल तर तो आचरटपणाच करतो. खास करून जेव्हा कोणी आपल्या आयुष्यातील किस्से सांगत असतात तेव्हा ते समजून येते.
मला आवडला. शेवटचा फार्सिकल
मला आवडला. शेवटचा फार्सिकल भाग थोडा दुर्लक्ष करूनही. कामाच्या बाबतीत - रणबीर, अनिल कपूर, प्रियांका, शेफाली, अनुष्का, राहुल बोस व फरहान.
जिनामिदो ची लेव्हल नाही पण तरीही बघण्यासारखा आहे. संवाद आवडले मला. कथा मात्र सुरूवातीला त्याच्या बिझिनेस च्या प्रॉब्लेम पासून सुरू होते व शेवट त्यांच्या कुटुंबातील प्रॉब्लेम्स वर होतो पण मूळ कंपनीच्या कामाचे काय झाले कळत नाही. तसेच एका ऑनलाईन कंपनीची सीईओ ८-१० दिवस कंपनीबाबत काहीही विचार करताना दाखवली नाहीये, ते ही जरा ऑड वाटले. बाकी पिक्चर मस्त.
Pages