डीडीएलजेचं गारूड

Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16

‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटातली गाणी मात्र छानपैकी होती. त्यात उदित नारायण होता का गायक? आपल्याला तो गायक ज्याम आवडतो.

गाडीत घेण्याच्या लॉजिक वरुन आठवले.चेन्नाई एक्सप्रेस मधे शाहरुख इतक्या लोकांना एकापाठोपाठ हात देऊन चालत्या (वेग वाढणार्‍या बरंका) गाडीत कसे घेतो हे भयंकर विनोदी आणि अ आणि अ आहे.
>>>

ते मुद्दाम तसच विनोद निर्मितीसाठीच होतं Uhoh

मेहंदी लगाके रखना हे या चित्रपटातले माझे आवडते गाणे. गायक अर्थातच उदित नारायण. जियो उदितभाई!

>>>मेहंदी लगाके रखना हे या चित्रपटातले माझे आवडते गाणे.<<<

ओरिजिनल गीतात म्हणे सुरुवातीला 'बालोंमे' असा शब्द होता.

एडिटरची कमाल म्हणावी लागेल.

एकसुरी अभिनय आणि चित्रपट करणार्‍या अमिताभ बच्चनला अभिनय काय चीज आहे माहीत नाही हे खुद्द नसिरुद्दीन शाह / नाना पाटेकर बोलले आहेत. जस जसे काळ पुढे गेला बच्चनला हिरोपंती सोडुन द्यावी लागली आणि चरित्र रंगवायला सुरुवात केली तेव्हा कुठे ताकदवान रोल मिळायला सुरुवात झाली. >>> मी फक्त नासिर ने 'अमिताभचा चित्रपट निवडायचा चॉईस योग्य नव्हता, आणि एक अभिनेता म्हणून ते जर कौशल्य तुमच्याकडे नसेल तर कसे चालेल?' अशा अर्थाचे काहीतरी म्हंटलेले ऐकले आहे (आणि नंतर याच नासिरने काही भिकार रोल्सही स्वीकारले आहेत). पण वरती लिहीले आहे तसे म्हंटले असेल तर जरा जास्तच होते. नासिर व नाना दोघांबद्दलही आदर आहे पण ते जर हे म्हंटले असतील तर तो कमी होईल हे नक्की. आर्ट फिल्म्स मधला अभिनय व कमर्शियल मधला, दोन्ही मधे प्रचंड फरक आहे. उद्या नासिर ने इतके चित्रपट करून कोणताही चित्रपट कसा 'उचलावा' हे त्याला कळत नाही म्हंटल्यासारखे आहे Happy

नंतरचे चित्रपट सोडा - नुसते शोले, दीवार/काला पत्थर, त्रिशूल, डॉन, मुकद्दर का सिकंदर व अमर अकबर अँथनी - नुसते हे चित्रपट धरले तर हे रोल्स एकसुरी होते असे कोणाला वाटते?

आर्ट वाल्यांना क्षमतेच्या तुलनेत लोकप्रियता मिळत नाही हे खरे आहे तसेच कमर्शियल वाल्यांना क्षमतेच्या तुलनेने गांभीर्याने घेतले जात नाही, हे ही.

ऋन्मेष - सचिन चांगला फलंदाज आहे हे कळायला एक ३-४ डाव पाहून ठरवता येइल, पण तो चांगला फलंदाज नाही हे ठरवायला खूप डाव बघावे लागतील. त्याच लॉजिक ने कमल हासन चांगला नाही हे ठरवायला २-३ पिक्चर्स, ते ही एका ठराविक काळातील पाहून ठरवणे हे ही बरोबर नाही.

डीडीएल्जे हा 'माईलस्टोन' चित्रपट होता हे नक्की. प्रेमकथा सादर करण्याच्या बाबतीत चोप्राने काही डेअरिंग वगैरे केली आहे असे अजिबात नाही, कारण अमिताभचा सुरूवातीचा काळ सोडला तर 'यशराज' ने कायम लव्हस्टोरीज च दिल्या होत्या. त्यात त्याच्या आधी कयामत से कयामत तक, मैने प्यार किया वगैरेंच्या यशाने प्रेमकथांना मागणी आहे हे सिद्ध झालेच होते.

पण 'फ्रेश' सादरीकरण, गाणी व शाहरूख-काजोल ची केमिस्ट्री जबरी होती यात. अमरिश पुरीबद्दलही बराचसा सहमत (बेफि - एक 'पार्टी' पाहा जुना. चित्रपट चांगला आहेच, पण पुरी साहेबांचा रोलही मस्त आहे).

+१ फारएण्ड !!

>>त्यात त्याच्या आधी कयामत से कयामत तक, मैने प्यार किया वगैरेंच्या यशाने प्रेमकथांना मागणी आहे हे सिद्ध झालेच होते.>>

>>पण 'फ्रेश' सादरीकरण, गाणी व शाहरूख-काजोल ची केमिस्ट्री जबरी होती यात. >> त्यांच्यासाठी खुप महत्त्वाचा!

बाकी मला शाहरूख आवडतो, काजोल ठीक वाटते. यातील गाणी प्रचंड आवडतात. मात्र त्या कथेत त्या मंगेतर ची काहीही चूक नसताना उगाचच त्याचा पोपट केलेला मलाही आवडला नाही.

नंतर अमरिश पुरी "कडक" व अनुपम खेर "सॉफ्ट" हा एक पॅटर्न फारच घिसापीटा झाला अशा कथांमधे. यांना प्रेमकथांमधे काही वेगळे रोल द्यायचा कोणी प्रयत्न केल्याचे दिसले नाही.

तसेच परदेशांत प्रचंड संख्येने असलेल्या पण भारताची 'फ्रोजन' इमेज डोक्यात असलेल्या प्रामुख्याने पंजाबी (व कदाचित) गुजराती लोकांना हा चित्रपट (इतर लोकांपेक्षाही जास्त) का आवडला असेल तेही जाणवते.

फारेण्ड . सहमत पण इथे मी कमल हसन वाईट किंवा ठिकठाकच होता असे न म्हणता तो समजला जातो तितका अभिनयात महान नसून ओवर रेटेड होता असे म्हणतोय आणि ज्या चित्रपटांवरून लोक त्याला भारी म्हणतात तेच पाहून मी हे म्हणतोय.. तसेच त्याच्या प्रयोगशीलतेबद्दल देखील वाद नाही.. माझे मत फक्त अभिनयकलेपुरता आहे..

@ ऋन्मेऽऽष
<< शाहरूख आणि शतकी धागा.. ठारलेलेच समीकरण...>>
यात शाहरूखचा वाटा किती? मूळ विषयाचं गारूड कमी आणि विषयांतराचं भारुडच जास्त लांबलंय. किमान दहा टक्के प्रतिसाद तर तुम्हीच कमल हासन वर विषय वळविल्यामुळे आले आहेत.

चेतन.:हाहा:

यात शाहरूखचा वाटा किती? मूळ विषयाचं गारूड कमी आणि विषयांतराचं भारुडच जास्त लांबलंय. किमान दहा टक्के प्रतिसाद तर तुम्हीच कमल हासन वर विषय वळविल्यामुळे आले आहेत.
>>>>>>>>>>>

शाहरूख हे एक ब्रांड नेम आहे, त्याच्या नावावर धागा चालतो. जसे की एखादी जाहीरात.
शिर्षकात त्याचे नाव असणे वा ते त्याच्याशी संबंधित असणे पुरेसे असते.
कमल हसन वगैरे हे दुय्यम आहेत, शाहरूखच्या धाग्यात नसते तर कोणी चार शब्दही लिहिले नसते त्यांच्याबद्दल.

कमल हसन वगैरे हे दुय्यम आहेत, शाहरूखच्या धाग्यात नसते तर कोणी चार शब्दही लिहिले नसते त्यांच्याबद्दल.>>>>> आत्ता ग बया. जरा चेन्नईकडे जावा नी तित कौतुक करुन दावा, आणी प्लस कमल भाऊन्च्या विरुद्ध बी बोलुन दावा.

लिंक द्या बघू अश्या एक-दोन धाग्यांची...
किंवा नवीन धागा काढून ते सिद्ध करा..
कारण काही विषय तेवढ्यापुरते चर्चेत असतात, पण शाहरूख मात्र ऑलटाईम हिट..

बाकी अजमल कसाब आणि शाहरूख हि तुलना ब्रांड बाबत फसलीय हे आपणही मनोमन कबूल करालच.. अन्यथा तो जाहिरातीत अमुक तमुक प्रॉडक्ट मी वापरतो, तुम्हीही घ्या म्हणत दिसला नसता का? आणि दिसल्यावर येथील किती जण ते प्रॉडक्ट घेतील..??

रश्मी,
त्या तिथे व्यक्तीपूजा चालते, तिथे कौतुकच होणार आणि त्यांच्यावर केलेली प्रामाणिक टिका त्यांना सहनही नाही होणार, ते चालायचेच, याने सत्य बदलत नाही.. जगभरातील प्रसिद्दी बघाल तर सारे चित्र क्लीअर होईल Happy

प्रत्येकाची चित्रपटाबाबत आवड हि भिन्न असते डीडीएलजे काही जणांना आवडला नि काहीना नाही. मात्र तो आवडणार्यांची संख्या जास्त आहे. मलाही तो चित्रपट आवडला.
शाहरुख बाबत म्हणायचे तर मला वाटते अमिताभ बच्चन ह्यानंतर तोच सर्वाधिक यशस्वी अभिनेता असावा. त्याचा पडद्यावरचा वावर हा उस्फुर्त असतो.
नसीर आणि नाना ह्यांनी जर खरेच अमिताभवर टीका केलेली असेल तर तो त्यांचा न्यूनगंड असावा. कारण अमिताभ सारखा अभिनेता पुंन्हा होणे नाही. नसीर, नाना ह्यासारखे होवू शकतात पण अमिताभ तो अमिताभच ऑल टाईम ग्रेट. अमिताभने जास्त करून व्यावसायिक सिनेमे केले म्हणून त्याला कमी लेखणे हे चुकीचे वाटते. जर तो आर्ट फिल्म मध्ये असता तरी तेथेही राजाच राहिला असता. उदाहरणादाखल त्यांचा नि नूतन ह्यांचा चित्रपट सौदागर त्यात मारधाड नव्हती कि काही मसाला नव्हता तरी अमिताभचा तो सरस चित्रपट ठरला.

वरती कमल हसन वर टीका केली आहे. माझ्या मते कमल हसन ह्यांचा अभिनय हा उच्च प्रतीचा होता. जवळपास तेरा कि चौदा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी पटकावले. त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा रात्री दूरदर्शनवर त्यांचा चित्रपट लागला होता भाषेचे बंधन अजिबात आड आले नाही. त्यांच्या अभिनयासाठी मी तो चित्रपट भाषा कळत नसतानाही पाहिला नि तो चित्रपट मनाला भिडलाही ह्याला म्हणतात अभिनय, ज्याला भाषा, प्रांत ह्याचे बंधन लागू होत नाही. आपल्याकडे अनिल कपूरचा एक ईश्वर नावाचा सिनेमा हिट झाला होता तो चित्रपट मूळ ज्या तमिळ चित्रपटावरून घेतला आहे त्यातला कमल हसनचा अभिनय हा लाजवाब होता. तसेच दयावान हा ज्या नायकन चित्रपटावरून घेतला त्यातला कमल हसनही ग्रेटच. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना त्यांच्या क्षमतेचे चित्रपट मिळाले नाहीत शेवटी चित्रपट हे टीमवर्क असते चांगली पटकथा, दिग्दर्शन हे हि महत्वाचे असते त्याबाबतीत कमल हसन हा कमनशिबी ठरला नि हिंदी चित्रपटसृष्टीला एक चांगला नट मिळणार होता तो लाभला नाही.
शाहरुख नि कमल हसनची तुलना गैर वाटते दोघेही चांगले कलावंत आहेत.

<< त्या तिथे व्यक्तीपूजा चालते, तिथे कौतुकच होणार आणि त्यांच्यावर केलेली प्रामाणिक टिका त्यांना सहनही नाही होणार, ते चालायचेच, याने सत्य बदलत नाही.. >>

दक्षिण भारतातील कमल हासनचे कौतूक ही व्यक्तिपुजा आणि या न्यायाने ऋन्मेऽऽष यांना शाहरूखचे वाटणारे कौतुक ही व्यक्तिपुजा नाही???

बहूत नाईन्साफी है|

आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत.

>>> नोंद चूकली आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शीत झाला. आमीरचा रंगीला प्रदर्शीत झाला त्यानंतर १ महिना १२ दिवसांनी. Happy २० ऑक्टोबर २०१५ रोजी DDLJ ला २० वर्ष पुर्ण होतील.

आठवीत असताना हा चित्रपट सोसायटीमधल्या २३ जणांनी एकत्र जाउन पाहिला होता. तेंव्हा ठाण्याला आराधना टॉकीजला लागला होता. (ते टॉकीजही आता बंद झाले) एका माणसाला एकावेळी ६ पेक्षा अधिक टिकिटे देत नव्हते असे आठवतय अजून.

चित्रपट आवडला होता पण रंगीला पेक्षा कमी. पुढच्या काही वर्षात शाहरूखने त्याच त्याच पोतडीतल्या भूमीका केल्याने तो आवडेनासा झाला आणि आमीर अधिक आवडू लागला होता.

चेतनजी,
दक्षिणेकडे व्यक्तीपूजा म्हणजे भक्तीच असते. त्यांना आपल्या आवडीच्या कलाकारामधील दोष दिसतच नाहीत. त्यांचासाठी तो अगदी अस्मितेचा प्रश्न असतो. आपल्याकडचे चाहते मात्र डोळस असतात. ते दोषही कबूल करतात आणि दोषासह स्विकारतात. जसे की मी शाहरूखमधील दोषांवर देखील अख्खा नवीन् लेख प्रामाणिकपणे लिहू शकतो. त्यामुळे हि व्यक्तीपूजा नाही. तसेच यात शाहरूख माझ्या गावचा आहे म्हणून तो आवडतो असेही नाही. किंबहुना तो मुस्लिम धर्माचा असून हिंदू धर्मींयांना आवडतो. याचा अर्थ इथे प्रांतिक वा जातीय अस्मिता वगैरे मुद्दाही लागू नाही.. वर खास चेन्नईला जाऊन कमल हसनला असे म्हणा म्हणून मला सांगण्यात आले याचाच अर्थ ती पोस्ट टाकणाराच कबूल करतोय की कमल हसन याचे क्षेत्र तिथपर्यंतच. शाहरूख मात्र भारताताच सुपरस्टार नाही तर जगभरातील एक लोकप्रिय कलाकार आहे.

आणि हो, वर मी कमल हसनच्या अभिनयकलेबद्दल टिप्पणी केली होती फक्त.. तसेच शाहरूखला निव्वळ अभिनयापुरते जोखायचे तर तो त्यातदेखील्क़् सरस असला तरी आज तो सुपर्रस्टार म्हणून ओळखला जातो ते त्याच्या एक्स-फॅक्टर मुळे.

<< तसेच यात शाहरूख माझ्या गावचा आहे म्हणून तो आवडतो असेही नाही. किंबहुना तो मुस्लिम धर्माचा असून हिंदू धर्मींयांना आवडतो. याचा अर्थ इथे प्रांतिक वा जातीय अस्मिता वगैरे मुद्दाही लागू नाही >>

हा मुद्दा दक्षिणेत सुद्धा लागू होत नाही. रजनीकांत मूळचा मराठी आहे - शिवाजी गायकवाड नाव आहे त्याचं. तसेच तमन्ना भाटिया, तापसी पन्नू आणि इतर अनेक पंजाबी अभिनेत्री देखील तिथे लोकप्रिय आहेत. एखाद्या व्यक्तिच्या काही लकबी आवडल्या की ती व्यक्ति गुणदोषांसकट स्वीकारली जाणे, तिला डोक्यावर घेणे हे प्रकार जगात सर्वत्रच घडतात. दक्षिणेत हे प्रमाण जास्त आहे इतकंच.

इथे प्रश्न असा आहे की, कमल हासन महान अभिनेता आहे की नाही? तुमच्या मतानुसार तो जर तसा नसेल तर शाहरुखला तर किमान अभिनयदेखील येत नाही असे म्हणावे लागेल; पण जर तुमच्या मते शाहरुख चांगला अभिनेता असेल तर मग तुम्ही नि:संशय शाहरुख आणि कमल हासन यांचा अभिनय वेगवेगळ्या फूटपट्ट्या लावून मोजताय असे म्हणावे लागते.

शाहरुखच्या अभिनयाची तूलना कमल हासन, संजीव कुमार किंवा अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील मी करत नाही. चला त्यापेक्षा सोपी कसोटी लावू. अमिर खानने सरफरोश मध्ये किंवा सलमान खानने गर्व प्राईड अ‍ॅण्ड ऑनर मध्ये जसा पोलिस अधिकारी रंगविला आहे तशी भूमिका शाहरुख खान कधीतरी पेलू शकेल काय? शाहरुख एक तर पाचकळ विनोदी चाळ्यांमध्ये अडकतो किंवा मग गंभीर भूमिका केलीच तर त्यात विनाकारण एक चिडचिडेपण दिसून येते. उदा. - हम तुम्हारे है सनम, चक दे इंडिया. त्याला खरं तर चांगली भुमिका रंगविण्याची एक सुवर्णसंधी मिळाली होती - रब ने बना दी जोडी मध्ये. असुरक्षिततेच्या भावनेतून त्यातही एक तर वेष पालटून माचो माचो ओरडत माकडचाळे केलेच. शिवाय जी मूळची गंभीर भुमिका होती सुरीची त्यातही पैलवानाशी कुस्ती खेळणे, रात्री पोट भरलेले असतानाही बिर्याणी खाणे असे उपद्व्याप करून भुमिकेचे बेअरिंग घालविले. मूळात सुरीची भुमिका साध्या, पोक्त व गंभीर व्यक्तिची होती. तिच्यात बावळटपणाचा रंग भरणे यातून शाहरुख खानची असुरक्षितता दिसून येते. आपण 'नॉर्मल' माणसारखे दिसलो तर पडद्यावर प्रेक्षक आपल्याला स्वीकारणार नाहीत अशी भीती त्याला वाटते. माय नेम ईज खान सारखा चित्रपट एक फार छान विषय पडद्यावर मांडतो पण त्याकरिता नायकात व्यंग दाखविणे गरजेचेच होते काय? नॉर्मल शाहरुख दाखविला असता तर चित्रपट चालला नसता का? कदाचित नाही. कारण जे शाहरुखचे आताचे चाहते आहेत ते त्यांना असाच विचित्रपणे वागणारा शाहरुख आवडतो. मला मात्र शाहरुखने साथिया मध्ये रंगविलेला जिल्हाधिकारी शिवाजी राव अजुनही आठवतो. शाहरुख अशी भूमिका करणार असेल तर संपूर्ण चित्रपटगृहात बाकी कुणी नसलं तरी एका खुर्चीवर मी नक्की असेन. अर्थात आर्थिक बाजू प्रचंड भक्कम असूनही शाहरुख अशी जोखीम कधीच पत्करणार नाही. जोवर तो अशी जोखीम पत्करत नाही तोवर त्याला चांगला अभिनेता म्हणायला निदान मला तरी जमणार नाही.

चेतनजी,
शाहरूखवर एवढी मोठी पोस्ट लिहिल्याबद्दल, तसेच त्याचे हम तुम्हारे है सनम सारखे रखडलेले फ्लॉप चित्रपट पाहिल्याबद्दल, तसेच साथियामधील त्याची छोटीशी भुमिका आणि तिचे नाव लक्षात ठेवल्याबद्दल आपले कौतुक आणि अभिनंदन मी सर्वप्रथम करू इच्छितो.
वर मी उल्लेखल्याप्रमाणे आपल्या येथील चाहते गुणदोषांसह स्विकारतात तसेच मी देखील आपण शाहरूखचे मांडलेले सारे दोष स्विकारतो.

शाहरूखची तुलना सलमान खानशी...
शाहरूखची तुलना आमीर खानशी...
शाहरूखची तुलना अमिताभ बच्चनशी..
आणि आता शाहरूखची तुलना कमल हसनशी...

हे पुर्वापार चालत आले आहे,
एकेकाळी हृतिक रोशन नव्याने आला तेव्हा त्याचीही तुलना शाहरूख खानशी करून झाली.. वा गेला बाजार रणबीर कपूर हा शाहरूखनंतर सुपर्रस्टार होणार का अशीही चर्चा होते..

पण याउलट आपन कधीच अमिताभ-आमीर, सलमान-आमीर, सलमान-अक्षय वगैरे वगैरे मध्ये नंबर वन कोण वा सुपर्रस्टार कोण अश्या तुलना कधी करत नाही वा ऐकल्या नाहीत.. कारण उघड आहे, कोणालाही त्या पदावर आपला दावा सांगायचा असेल तर त्याला शाहरूखलाच त्या पदावरून पायउतार करावे लागणार..

इथे सहज आठवले,
हाच प्रकार क्रिकेटमध्ये सचिनबाबत होतो,
सचिनची तुलना, लारा, ईंझमाम, पॊंटींग, अगदी हल्लीच्या कोहलीपर्यंत होतच राहते..
पण त्याचवेळी लारा की पॊंटींग वा ईंझमाम की लारा वगैरे तुलना कधी झाल्या नाहीत.. सचिन हा तुलनेतला कॉमन भाग होताच..

थोडक्यात,
यावरून,
शाहरुख हा बॊलीवूडचा तेंडल्या किंवा सचिन हा क्रिकेटमधील शारूख आहे असा निष्कर्श काढू शकतो Happy

सचिन पगारे ,पोस्ट आवडली .

डीडीएलजे आतापर्यत बर्याचदा पाहिला आहे. अजूनही टी व्ही वर लागला तर पाहिला जातोच . शाहरूखच्या मला आवडलेल्या भूमिकांमध्ये चेतन सुभाष गुगळेनी उल्लेख केलेली साथियातील शिवाजी राव , स्वदेसमधला मोहन भार्गव, वन टू का फोर मधली भूमिका . डरमधली निगेटिव भूमिकाही आवडली होती .

Pages