फँड्री नावाचा स्क्रू...

Submitted by सई. on 17 February, 2014 - 07:34

आयुष्यात एखादं तरी दाहक वास्तव असतं. प्रत्येकाच्या असेलच असं नाही, पण बहुतेकांच्या असतंच. हर प्रकारानं आणि निकरानं त्याला टाळण्याचा, नाकारण्याचा प्रयत्न करावा आणि कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक तीव्रतेने आयुष्यानं ते वास्तव माणुस गाफील असताना कुणीतरी तोंडावर सणसणून दगड भिरकवावा तसं फेकुन मारावं... काय अवस्था होईल? हेच जर एखाद्या अडनिड्या वयातल्या मुलासोबत घडलं तर? तोही प्रथम भेलकांडून हतबल होईल आणि आवाक्याच्या बाहेर गेल्यावर त्वेषानं चवताळून परिस्थितीवर तुटून पडेल... जमेल त्या मार्गानं!!

पण फँड्री इतकाच नाही... मी माझ्यातला माणुस शोधत जाते, माझ्यातली संवेदनशीलता तपासत जाते, माझ्यामुळे आणि माझ्यापासून सुरू होणा-या समाजाचा एक हिस्सा म्हणुन माझ्या वाट्याला भिरभिरत आलेल्या ह्या दगडाचा मी थिएटरात नेम चुकवला तरी मनावर मात्र तो येऊन आदळतोच! मंजुळेंनी नेमच इतका अचुक धरलाय... तिथे वाल्याच्या बायकोसारखं मी पाप केलं नाही म्हणत बाजूला व्हायला वावच नाही. आजही चहूबाजूंना 'ड्रायव्हर', 'कामवाली बाई' (स्वतः घाण केलेली स्वच्छतागृहं तिच्याकडून साफ करून घेणं वगैरेही आलं त्यात!), 'वॉचमन' अशा प्रकारची असंख्य 'बिरुदं' आणि वर्णभेदही येतात कानांवर.. अर्थात हा फक्त एक दाखला, असे हजारो दाखले. त्यामागे दडलेल्या माणुस नावाच्या प्राण्याचं काय? मी अडवते का कुणाला असं संबोधताना? अशी वागणुक देणा-यांना परावृत्त करते का? म्हणजे काय काय करायला लागेल? मी स्वतः खरंच पूर्णपणे माणुसकीनं वागते का? प्रश्न. अनेक प्रकारचे. नागराज मंजुळे तुम्हाला टोचत रहातात. अनेक प्रसंगांमधून. - हा फॅण्ड्री आहे. पण पुन्हा, एवढाच नाही.

हे सगळं बेमालुमपणे अगदी जाता जाता करत मंजुळे तुमचं मनोरंजनही करतात. त्यांचा चंक्या ज्या सहज आणि लिलया जत्रेच्या जल्लोषात सामील होतो त्याच सहजतेनं. कोणतीच गोष्ट कशाचपासून वेगळी करता येत नाही.

एरवी अडम तडम तडतडबाजा असलेली माझी बहिण चित्रपट पहाताना वरचेवर डोळ्यांना रुमाल लावत होती. म्हणजेच चित्रपट भिडला असं नव्हे, माहिताय. पण नि:शब्द जडत्व घेऊन घरी पोचल्यावर आपोआपच 'माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं' यावर माझा आणि तिचा रंगलेला दीर्घ परिसंवाद पार प्रत्येक कुटुंबियाची पाळंमुळं खणत गेला, मागच्या आणि आमच्या पिढीतल्या प्रत्येकाबद्दल ते येणा-या पिढीला काय पोचवायचं इथंपर्यंत. दोघीच्या दोघीच निवांत असताना, वेळेचं बंधन नसताना एरवी स्वतःचीच सालं कशाला काढत बसलो असतो? त्यापेक्षा अनुपस्थित गोतावळ्याबद्दल ही अश्शीच आणि तिचं तस्संच हा मुखवास चघळत बसणं सोप्पं नव्हतं का? वर आणि तो मंजुळेंच्या डोईजड चित्रपटावर रामबाण उताराही तर झाला असता! पण...

उत्खननालाच बसायचं तर अनेक गोष्टी निघतील. पण ते प्रत्येकानं आपापलं करावं. कारण मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही... तेव्हा तो शेवटी ज्याचा त्याचाच प्रश्न रहातो.

अलकनंदा दासगुप्तांचं संगीत आणि विक्रम अमलाडींचा कॅमेरा हे दोन महत्वाचे कलाकार आहेत चित्रपटात. शीर्षकापासूनच दोघंही मनाचा ठाव घेतात आणि ती पकड घट्ट घट्ट होत जाते... एकेक फ्रेम बघत रहावी अशी आणि एकेक तुकडा रिवाईंड करुन मुद्दाम ऐकण्यासारखा. किशोर कदम ह्या माणसाला मला एकदा सेटवर जाऊन निरखायचं आहे. ह्या माणसाला स्वतःला तरी कल्पना असेल का स्वतःच्या रेंजची?? स्विच ऑन्/ऑफ नावाची चीज हा करतो तरी कशी? ह्या माणसाबद्दलचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. 'ल्हान हाये अजून', 'शेण घेऊ का?'तली लाचारी, गल्लीच्या वळणावरच्या त्या बेतशीर झोकांड्या, जिवाच्या आकांतानं केलेली शेवटची पळापळ.. सगळं अचंबीत करणारं.
त्याच्यासमोर त्याच ताकदीनं उभी राहिलेली जब्याची आई. यांचं नाव मला माहिती नाही पण भुमिकेचं सोनं म्हणजे काय याचा वस्तुपाठ आहे तिची भुमिका. मग जब्या आणि पि-या. तीन चतुर्थांश सिनेमा होईतोवर तर माझं ध्यान पि-याकडंच. 'आता खाली कसा उतरू'पासून ते ओशाळवाणं होऊन नवी कापडं कशी आहेत विचारणं असो... 'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस पि-या. मी प्रेमात पडले त्याच्या. 'नायकाचे बेस्ट दोस्त' अशी काही कॅटेगरी केली तर सुरज पवारचा पि-या १००% पहिल्या पाचात!

पि-यापाठोपाठ चंक्या. अफलातून. मंजुळेंचा कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे. जब्या मात्र मला अधूनमधून आवडला आणि मग शेवटचा. त्याचं ते डोळ्यांच्या कोप-यातून शालूला निरखत रहाणं आणि ओघानंच ओठांवर उमटणारं अस्फुट स्मित लाजबाब. संवादफेक मात्र सोमनाथ अवघडेच्या मुळच्या हस-या जिवणीमुळं थोडीशी सदोष झालीये असं मला वाटलं. पण सायकलच्या आणि पेप्सीच्या प्रसंगात शिवाय जत्रेत बत्ती घेतल्यावरचा त्याचा प्रयत्न चांगला होता. राजेश्वरी खरातची शालू निरागस. ती तशीच अपेक्षितही होती. बामणीण चिमणीच्या गोष्टीसाठी ज्योती सुभाष नावाच्या देखण्या म्हातारीचं अनपेक्षित दर्शन सुखद. खरंतर अगदी एकच वाक्य बोलणा-या सुरखीपासून ते 'वढ पाच'ची म्हणणा-या न्हाव्यापर्यंत, जो तो ज्या त्या ठिकाणी एकदम फिट आहे, चपखल.

बाहेर धुमाकुळ घालणा-या आणि मलाही तेवढीच भुरळ घातलेल्या अजयच्या 'प्रितीच्या विंचू'ची अनुपस्थिती भावली. ते कुठेही आलं असतं तरी टेंपोच गेला असता. 'साजूक पोली अन म्हाव-या 'सारखं त्याचंही ठिगळच झालं असतं. त्या मोहाला बळी न पडण्याबद्दल मंजुळेंचं विशेष कौतुक.

मंजुळेंनी डोक्याला खुराक दिलाय, साखरेत घोळवलेल्या कडू गोळीच्या डोससारखा. हा स्क्रू नवं काही आदळेपर्यंत डोकं पोखरत रहाणार. भविष्यातही जेव्हा जेव्हा फॅण्ड्री बघेन तेव्हा तेव्हा तो स्क्रू पुन्हा लोहचुंबकासारखा येऊन मेंदूला चिकटेल आणि आपलं काम करत राहील हेही आत्ताच माहितीये..

पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय.. पहिलाच प्रयत्न (प्रयत्न म्हणायचं का??) इतका खणखणीत... बस्स लगे रहो!! मंजुळेंच्या पुढच्या सगळ्या दमदार वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फँड्री ... बघितल्यावर.. ४ दिवस विचार करुन सोडुन देण्यापेक्षा..
दुसरा फँड्री आपल्या हातातुन या वर्तनातुन घडणार नाही ..... या कडे अधिक लक्ष द्यावे ...

आजवर वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक.. हा लेखही एक 'स्क्रू'च आहे. डोक्यात, हृदयात शिरलाय, शिरतोय... घुसलाय, घुसतोय.. अंतर्मुख होऊन लिहिल्याचं जाणवत आहे. आपल्याला जाणवत असलेल्या आर्ततेपर्यंत किंवा त्याहीपुढे वाचकाला जेव्हा लेखक घेऊन जातो, तिथे त्याचा विजय असतो. इथे तुम्ही जिंकलात. मी अजून हा चित्रपट पाहिला नाही. कुणास ठाऊक कधी पाहीन.. पण चित्रपट पाहिला तरीही हा लेख विसरणार नाही.

अप्रतिम !

__/\__

सई च परीक्षण वाचल आणि फेड्रीला बघितलाच पाहिजे च्या यादीत टाकल. नक्की बघायचाच अस ठरलं आणि आज ताबडतोब बघितलाही पण जब्याने मारलेला दगड अजिबातच सणकन न लागता निसटता स्पर्श करून गेला आणि काय अपेक्षा ठेऊन गेलो आणि काय बघायला मिळाल याचा ताळमेळ लावतच घरी परतले.
एक तर झी ट्योकीज चा सिनेमा असल्याने जाहिरात भरपूर चालली होतीच आणि त्यात सई च परीक्षण . काहीतरी उच्च पाहायला मिळेल अशा अपेक्षेनी मात्र दणकन खाली आदळल .
सई तुझ्या परीक्षणाला मात्र १०० पैकी २०० मार्कस Happy

मध्यानतरा पर्यंत काही म्हणजे काहीच घडल नाही.
कुठल्याही सिनेमाला कथा लागते अशी माझी आपली समजूत . कथानक चिमुटभर आणि भावभावनांच अविष्कार जास्त अशा चित्रपटच काय होत ?. कथा हा कुठल्याही चित्रपटाचा आत्मा असतो/ असावा. मग त्यात भावभावना आणि इतर अंगाचा योग्य वापर ( संवाद/क्यामेरा/दिग्दर्शन/अभिनय ) केल्यानंतर खरी कसदार कलाकृती तयार होते.

पण या चित्रपटाच्या बाबतीत मात्र मला अस वाटल कि कथानकच फारस काही नसल्याने इतर अंगाचा कितीही चांगला वापर झाला असला तरी चित्रपट मनाचा कुठेच ठाव घेत नाही. हे माझ वैयक्तीक मत.

त्या बाबतीत तीन- चार वर्षापूर्वी पाहिलेल्या टिंग्याला मी १०० पैकी १०० मार्क देईन.
तो पण असा गावाकडच्या दिग्दर्शकाचाच पटकथा/संवाद आणि दिग्दर्शन असलेला खणखणीत सिनेमा होता Happy
सई पण तुझ्या परीक्षणाला मात्र दाद द्यावी तितकी कमीच Happy

मित्रांनो धन्यवाद सर्वांचे Happy

सुजा …. फँड्री हि कथा नाही वर सांगितल्याप्रमाणे ते जगणं आहे. कुठेतरी कुणाचंतरी, वास्तवातलं.
पण ते जेव्हा एका किशोरवयीन मुलाच्या नजरेतून आपण पाहतो तर कुठेतरी आपणच स्वतःला अंशतः का होईना गुन्ह्याच्या पिंजर्यात पाहतो कळत नकळत. गुन्हा केलाय म्हणून नव्हे,
तर ते जगू पाहणारे अस्पृश्य समजले जाणारे गरीब आपण नाही म्हणून
किंवा आपण त्यांच्या बाहेरच्या कॅटेगरीत्ले म्हणजे जगू न देणाऱ्यांच्या कॅटेगरीत्ले आपण प्रत्यक्ष तसं वागत नाहीयोत
तरी आपली जागा बाहेरची त्यांच्या चौकटीत आपण जाणार नाही मग त्याचं जगणं कधी कळणारच नाही म्हणून आपण खुश राहिलो असतो ….
पण इथेच नेमकं मंजुळे दादांनी नेम धरला त्यांच जीन दाखवून दिलं आतून बाहेरून हेलावून खड्कन जाग केलं
एवढ्यावर ते गप्प कुठे झालेत ?
शेवटी आत्ता आपण त्यांच्यावर चिखलफेक काय करणार त्या आधीच त्यांनी आपल्यावर समोरून नेम धरला.
हा नेम संवेदनशील मनाला लागला नाही तरच नवल …

योग्य ती संवेदना घेऊन सिनेमा पाहिला तर बरोब्बर कळतो. खरंतर चित्रपटात जितकं घडताना दाखवलंय त्यापेक्षा कित्तीतरी जास्त तो प्रेक्षकाच्या मनात घडवून खळबळ माजवतो. असो

पण प्रवाहापेक्षा वेगळं मत इथे मांडण्याचं धाडस दाखवल्याबद्दल सुजा तुमचं अभिनंदन.

मयी ते जगण आहे मान्य आहे पण ते जगणंच चांगल्या कथेत गुंफता येत. विषयाची हाताळणी जी आहे ती मनाला फारशी भिडत नाही कारण कथानकाचा अभाव . जितक त्यांच जगण बाह्य जातीला अस्वस्थ कराव अस दिग्दर्शकाला अपेक्षित आहे तितक त्याच सादरीकरण भेदक किव्वा टोकदार झालेलं नाही हे माझ मत .

सुजा खरंतर तीच खासियत आहे, प्रत्येक सिनेमात मजोरंजन मूल्य असतीलच असं नाही ना. कधी कधी कोड्यात पाडणारी आणि वास्तव दाखवणारी कलाकृतीही असू शकते.

सुजा निर्मात्यांनी कोणताही उद्देश ठेवून हा सिनेमा बनवलाय अस वाटतच नाही. त्यामुळे काहीतरी ठळकपणे, अंडरलाइन करून दाखवण्याचा प्रयत्न झालाच नाहीये कल्पनेचे घोडे म्हणूनच कुठे धावू दिले नाहीयेत… जे आहे ते हेच आहे आणि असच आहे अगदी रोज रोज असच … इतकंच स्पष्ट इतकच नैसर्गिक …एका समाजाचं रुप … हे जे त्यांच रोजचच आहे हे तरी आपल्याला माहिती होतं का ?? जे आपल्याला माहिती नाही ते आपल्यासाठी नवीनच… मग एका समाजाचं नैसर्गिक रूप दाखवायला त्याला एखाद्या कृत्रिम साच्यात बसवावं??…ते तसं नव्हतं करायचं म्हणून हा सिनेमा out of croud ठरला ना आणि म्हणूनच मंजुळे नुसतेच निर्माते नाही राहिले वास्तवदर्शी निर्माते ठरले…. कहाणी दाखवली असती तर ती या पद्धतीने भिडलीही नसती…गम्मत जम्मत पाहून येतो आणि विसरतो नेहेमी तसेच याचेही झाले असते.

त्याच सादरीकरण प्रभावी नाहीये हे मी परत एकदा माझ मत म्हणून सांगते . विषयाची हाताळणी मनाला कुठेच फारशी भिडत नाही.जे काही नाट्य आहे ते फक्त शेवटच्या अर्ध्या तासात. बाकी इतका वेळ काय चाललाय तेच समजत नाही.
पदार्थ बनवताना प्रत्येकाच्या हाताची चव जशी वेगवेगळी असते. पदार्थातले घटक एकच पण प्रत्येकांनी बनवलेल्या पदार्थाची चव मात्र वेगवेगळी असते. तसेच चित्रपटाचे आहे. एकाच विषयावर दोन वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतील . एखाद्याने बनवलेला आवडेल .एखाद्याचा नाही आवडणार. तद्वत या दिग्दर्शकाला त्याला जे काही सांगायचे आहे ते सांगणे- त्याचे सादरीकरण त्याला बरोबर जमले नाहीये असेच म्हणावे लागेल हे माझ वैयक्तिक मत.
विषय भेदक पणे पोचत नाही.
ही माझी शेवटची पोस्ट कारण प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाची सिनेमाला जाताना ची मनस्थिती
वेगवेगळी असू शकते. त्यानुसार प्रत्येकाला तो आवडतो / पटतो किव्वा नाही आवडत / नाही पटत Happy

संवेदनशील मन हे प्रत्येकाकडेच असत. संवेदना हेच जिवंत माणसाच लक्षण समजल जात. फक्त त्याची पातळी प्रत्येक व्यक्तिगणिक वेगवेगळी असते. कोणी १० टक्के असतील तर कोणी ५० टक्के तर कोणी ८० टक्के Happy बर हि संवेदनशीलता हि वयानुसार/ परिस्थितीनुसार बदलत जाते -बोथट होत जाते . त्या मुळेच कुठल्याही कलाकृतीचा प्रभाव हा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा पडू शकतो :).

सर्वांचे मनापासून आभार. खरंतर हे परिक्षण नाही, चित्रपट पाहून मला जे वाटलं ते फक्त शब्दांत मांडलेलं आहे इतकंच.

असीम, तंत्रातलं मलाही काही कळत नाही. पण पडद्यावर दिसणारं दृष्य आवडतंय हे मात्र नक्कीच सगळ्यांनाच समजू शकतं. आपण लहानपणी खेळताना उन्हाळ्याच्या सुट्यांमधे सुर्यास्ताच्यावेळी ढगांचे वेगवेगळे आकार आणि रंग एका कुणाचं तरी लक्ष जायचं आणि मग सगळेच मुद्दाम खेळ थांबवून थबकून बघायचो, त्यात निरनिराळे आकार शोधायचो. आता मोठं झाल्यावर आपल्याला कोणत्या ऋतुत आभाळ साधारण कसं दिसणार ह्याचा अंदाज असतो, कोणत्या तिथीला चंद्राची कोर कशी असेल त्या अंदाजाने खिडकीतून, गच्चीतून डोकावत असतो... तसंच आहे हे. तुम्ही चित्रपट पाहिलाय, माळरानावरची सारी दृष्यं आठवा... देवळाजवळच्या दृश्यातकॅमेरा आपल्या उजव्या बाजूने फिरत त्यांच्या समोर येऊन थांबतो तेव्हा आधी आपल्या थेट समोरचा आणि बराचसा डाव्या बाजूचा अख्खा परिसर कव्हर करून मग जब्य-पि-यावर स्थिर होतो.. एका दृश्यात पानं गळलेल्या झाडावर उजव्या टोकावर अस्ताचा सुर्य टेकलेला आहे... रंगकाम, सारवण संपल्यावर धुरपी सडा घालताना चकाचक झोपडीबाहेर दमूनभागून विसावलेलं कुटुंब... शेवट्च्या दृष्यात भिंतीवरची व्यक्तिचित्रं सरकत रहातात आणि नेमक्या व्यक्तीवर तो स्थिरावतो!! आणखी किती बोललं पाहिजे दिग्दर्शकानं? Happy चित्रपट आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठीच जास्त बनतात, फक्त जाणकारांसाठी नाही असीम. असो.

सुजा, तुझंही म्हणणं बरोबर असू शकतं. तुला तितका भावला नाही याबद्दल तू स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मीही म्हटलंय वरती "मला जे सापडलं तेच बाकिच्यांना मिळेल असं नाही शिवाय असंही होऊ शकेल की मलाच शंभर गोष्टी मिळाल्या आणि कुणाला एकही नाही...'' Happy

मनोरंजनाबद्दल मात्र थोडंसं दुमत असू शकेल... कितीतरी प्रसंगांमध्ये निखळ ते खळखळून या पटीत हसू येतं! इथे मला खुप मोह होतोय उदाहरणं द्यायचा पण आवरायला हवा. पण तरीही असंही म्हणेन की शेवटी हा काही १००कोटी क्लबातला चित्रपट नाही.

रॉबिन, आता चित्रपट आणखी चांगला चालेल. देव म्हणतात ते पडताळण्यासाठी आणखी चार लोकं जाऊन बघून येतील. अजून काय हवं? Happy

सई....

मूळ लेखाला सुसंगत असा तुझा वरील खुलासा फार आवडला. "चित्रपट आवडणे" म्हणजे नेमकी त्याची व्याख्या पूर्णत्वाने कधीच करता येणार नाही. ती एक प्रकारची अनुभूती असते आणि ज्याने त्याने स्वतःच्या मगदुरीवर जोखावी असेच गणित असते. "शोले" सारखा चित्रपट काढण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात आणि तो तितका धंदाही करतो; पण त्याचवेळी दुसरीकडे अवघ्या काही लाखात काढलेला "जय संतोषि माता" शोले इतकाच बिझिनेस कसा करू शकतो ? याला उत्तर नसते. आवडनिवडीपेक्षाही आणखीन् काही या क्षेत्रात आहे असे वाटणारे प्रेक्षकही मोठ्या संख्येत आहेत हेच खरे. संतोषी मातेच्या दर्शनासाठी म्हणून थिएटरमध्ये गेलेला भक्तप्रेक्षक एरव्ही अन्य चित्रपटांच्या दारातही जात नसेल. यावरून सर्वच चित्रपटांच्या यशापयाशाची गणिते त्या त्या परिस्थितीनुसार बदलत असतात.

फॅन्ड्री बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला {आणि तो मिळवित आहे असे चित्र आहेच} तर चित्रपटनिर्मितीसाठी मुंजळे आणि त्यांच्याच विचारसरणीच्या युवा कलाकार तंत्रज्ञांना हुरुप येईल....ही एक चांगली घटना यातून पुढे येईल.

थोडक्यात सुजा यांच्या प्रतिसादाबद्दल असेही मत मांडता येईल की त्यानी चित्रपट पाहूनच त्याविरूद्ध आपले मत प्रकट केले आहे. ही एक चांगली बाब. असेही लोक आहेत आपल्या समाजात की एखादी कलाकृती न पाहताही अमुक एक तसे म्हणतोय म्हणून आपलेही मत तसेच बनवून रिकामे व्हायचे.....असे होऊ नये, इतकेच.

सहमत मामा. चित्रपट आवडणं / न आवडणं पुर्णपणे अनाकलनीय आणि व्यक्तिसापेक्ष आहे.

फॅन्ड्री बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला {आणि तो मिळवित आहे असे चित्र आहेच} तर चित्रपटनिर्मितीसाठी मुंजळे आणि त्यांच्याच विचारसरणीच्या युवा कलाकार तंत्रज्ञांना हुरुप येईल....ही एक चांगली घटना यातून पुढे येईल.>>> अगदी अगदी. नागराज मंजुळेंचं कौतुक यासाठीही की पहिल्या प्रयत्नासाठीसुद्धा त्यांनी प्रेक्षकानुनय न करता स्वतःला भिडलेल्या विषयाला प्राधान्य दिलं, तो सादरही स्वतःला हवा होता तसाच केला. हा दणदणीत आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. ते धाडस आहे मोठं. नाहीतर प्रोमोजमधे दाखवत होते तो फोकस ठेवणं त्यांना शक्य होतंच की.

अगदी बरोबर जे पोहोचवायचं आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित केल्यानं काही टक्के (सवंगपणाची अपेक्षा करणार्‍या) प्रेक्षकांची निराशाच केली आहे त्यांनी. पण पोपटाच्या डोळ्याला भेदण्यासाठी अर्जुनच हवा.. नाहीतर बाण उगिचच इकडं तिकडं लागला असता.

अगदी बरोबर जे पोहोचवायचं आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित केल्यानं काही टक्के (सवंगपणाची अपेक्षा करणार्‍या) प्रेक्षकांची निराशाच केली आहे त्यांनी. पण पोपटाच्या डोळ्याला भेदण्यासाठी अर्जुनच हवा.. नाहीतर बाण उगिचच इकडं तिकडं लागला असता.>>>> अगदी अगदी

"चित्रपट आवडणे" म्हणजे नेमकी त्याची व्याख्या पूर्णत्वाने कधीच करता येणार नाही. ती एक प्रकारची अनुभूती असते आणि ज्याने त्याने स्वतःच्या मगदुरीवर जोखावी असेच गणित असते.>>>>>>अनुभूती १००% मान्य .. मस्तच

सई तू २० फेबु. ११.२६च्या प्रतिसादात जे वर्णन केलं आहेसना अगदी सूर्यास्ताच्या ढगापासून ते झोपडीबाहेर दमूनभागून विसावलेलं कुटुंबपर्यंत, ते सर्व आत्ता मध्यरात्री मी वाचताना असं डोळ्यासमोरून एखादी चित्रमय कविता सरकत जावी, असे गेले, शब्दच नाहीत माझ्याकडे ते अनुभवतेय मी, कसली सही लिहितेस ग तू. माय god. Hats off.

सुजा तुला जे वाटले ते तूसुद्धा प्रामाणिकपणे लिहिलेस हे खूप चांगलं केलंस.

फँड्री, चांगली कलाकृती आहेच.. मात्र मला विशेष भावला नाही. आणि त्याचे कारण याच्या खूप आधी मी पाहिलेली ही शॉर्ट-फिल्म. ज्यांनी फँड्री पाहिलाय त्यांनी आवश्य पहा.

http://www.youtube.com/watch?v=Sjjuu-Mqd88

'फॅण्ड्री' या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया वर लिंक दिलेल्या 'पायताण' या लघुपटाच्या खूप आधी सुरू झाली होती. किंबहुना 'पायताण' यूट्यूबवर येण्याआधी 'फॅण्ड्री'चं चित्रीकरण संपलंही होतं. चित्रपट न आवडणं ही एक बाब, पण म्हणून 'फॅण्ड्री'च्या निर्मितीमागील प्रेरणांवर संशय नको. नागराज त्या वातावरणात वाढला आहे. नागराजचं, चित्रपटाशी संबंधित काही तंत्रज्ञांचं झपाटलेपण जवळून पाहिल्यामुळे 'फॅण्ड्री'च्या अस्सलतेविषयीची शंका अस्वस्थ करून गेली.

लेख सुंदर लिहलाय हे सांगायचे राहिलेच की, लेख आवडलाच.

>>चित्रपट न आवडणं ही एक बाब, पण म्हणून 'फॅण्ड्री'च्या निर्मितीमागील प्रेरणांवर संशय नको >>> मी कुठेही संशय व्यक्त केलेला नाही. फक्त "पायताण" आधी बघितला असल्याने दोन्हींची आपोआप तुलना होत राहिली. आणि जितक्या निखळपणे चित्रपटाला सामोरे जायला हवे ते मात्र झाले नाही..

चित्रपट माझ्याच जिल्ह्यात बनलाय, यात माझ्या एका मित्राने छोटी भूमिकाही केलीये. त्यामुळे चित्रिकरणाचा काळ मला माहित आहे.( "पायताण" च्या निर्मितीकाळ आणि प्रेरणे बद्दल इथे लिहलेले आहे)

"पायताण" हाही अ‍ॅवॉर्ड विनिंग सिनेमा आहे. शिवाय नागराज मंजुळे हे, पायताणचे लेखक/दिग्दर्शक कौस्तुभ बंकापुरे यांच्या फेसबुक फ्रेंडलिस्ट मध्येही आहेत. "पायताण" चे एक फेसबुक पेजही आहे , जे सप्टेंबर २०११ चे आहे .. याच वर्षीच्या मे महिण्यात नाजराजच्या "पिस्तुल्या"ला "रजतकमळ" मिळाले होते आणि त्या बक्षीसाच्या रकमेत नागराज यांनी फँड्रीची निर्मिती केलीये.
शेवटी कोणी कोणाकडून काय घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण दोन्हीही कलाकृती एकमेकांशी सहसंबंध सागतातच.. पटलं तर घ्या .. नायतर .... वढ पाचची Wink

टाईमपास पाहिल्यानंतर मराठी सिनेमे थिएटर मध्ये जाऊन पैसे वाया घालवायचे नाहीत अस ठरवल्याने सध्या तरी हा Fandry पाहणार नाही.

पण लेख मात्र मनापासून लिहिला आहे तुम्ही, सई!
मार्केट मध्ये सीडी आल्यावर ती नक्की पाहीन. तेही फक्त हे परीक्षण आवडलं म्हणून.

सई.....फार सुरेख लिहिलं आहेस गं.... !!
आता जेव्हा हा सिनेमा बघेन तेव्हा पुन्हा एकदा तुझा हा लेख वाचेन Happy
कधी बघायला मिळणार देवच जाणे !!

गेले कित्येक दिवस फॅण्ड्रीबद्दल वाचायला मिळतय ते सगळं वाचल. निगेटीव्ह, पॉझिटीव्ह दोन्ही. हे सगळं वाचल्यानंतर आधीच पाहून झालेला सिनेमा कळायला मदत झाली (कॅमेरा बिमेरा, एडीटिंग बिडीटिंग कळायला शिकूनच घ्यावं लागेल). पार्श्वसंगीत आता लक्षात नाही.

लोकांच्या प्रतिक्रिया वाचताना एक गोष्ट खटकली ती म्हणजे स्वतःला गुन्हेगार ठरवून निगेटीव्ह, पॉझिटीव्ह किंवा टोकाच्या प्रतिक्रिया देणारे लोक. अगदी एबीपी माझाचा अँकर पण अपवाद नाही. त्याच्या वॉलवर एका मुलीने काय छान प्रतिक्रिया दिलीय. जर तुम्ही व्यक्तिगत रित्या कुणावर अन्याय केला नाही तर कशाला अस्वस्थ व्हायचं ? हा वेडेपणा आहे. समाज काय करतो हे आपल्या हातात असतं का ? आपलं ऐकून समाज ठरवतो का कसं वागायचं ? जितकं होईल तितकं करत राहतोच प्रत्येकजण. मग या प्रतिक्रिया अशा का येतात ? एखाद्याचा अनुभव म्हणून बघा कि त्याच्याकडे. कि प्रत्येकवेळेला आपण काही करू शकत नाहि ही बोच बोलून दाखवायला पाहीजे ? मागे अण्णांच्या आंदोलनाच्यावेळी अशाच प्रतिक्रिया होत्या.

ज्या गोष्टी एकट्यादुकट्याच्या प्रयत्नातून होत नाहीत त्याबद्दल खंत बाळगण्यापेक्षा जमेल ते, जमेल तसं करत रहावं. अशा कलाकृतींचा आस्वादही घ्यावा आणि एखाद्याला वेळ, पैसा मनुष्यबळ हाताशी असेल आणि कल्पकता असेल तर काही करायला प्रेरणा मिळत असेल तर चांगलंच आहे.

दुस-या बाजूने या प्रतिक्रिया चुकीच्या आहेत असं पण नाही. कधीच असा विचार केला नसेल तर अशी प्रतिक्रिया द्याविशी वाटणे हे आपण संवेदनशील आहोत याचा पुरावा समजावा.

माणूस वजा संवेदनशीलता = जंगली जनावर (फॅण्ड्री).
ते आपण नाही आहोत हा दिलासा जेव्हढा मोठा आहे.

Pages