टीनएज प्रेमाची गोष्ट : टाईमपास (टीपी)

Submitted by ज्ञानेश on 5 January, 2014 - 05:15

मराठी सिनेमाची सुधारलेली वितरण व्यवस्था आणि मल्टिप्लेक्स यांच्या कृपेने जळगावसारख्या छोट्या शहरांत मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्यामुळे रवी जाधवांचा ’टाईमपास’ फर्स्ट डे ला पाहता आला. त्याचीच ही थोडक्यात ओळख-

चित्रपटाचे नाव- टाईमपास
निर्माते- नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव
कथा / दिग्दर्शक- रवी जाधव
प्रमुख भूमिका- प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरण्डे इत्यादि
संगीत- चिनार-महेश

timepass-movie-dailogue.jpg

’पौगंडावस्थेतील प्रेमभावना’ हा अनुभव सार्वत्रिक असला, तरी त्याला आपल्या मराठी कलाविश्वात फारसे स्थान दिले गेलेले आढळत नाही. या विषयाला पहिल्यांदा न्याय दिला, तो मिलिंद बोकील यांच्या ’शाळा’ या कादंबरीने. याच कादंबरीवर पुढे या नावाचा सिनेमाही आला.
रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाचा हा चौथा सिनेमा. या आधी नटरंग, बालगंधर्व आणि बालक-पालक या चित्रपटांतून त्याने आपले मेरीट सिद्ध केलेले असल्यामुळे ’टाईमपास’ सिनेमाकडून अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची काही प्रमाणात पूर्ती ’टाईमपास’ करतो.

ही कथा आहे दगडू शांताराम परब (प्रथमेश) आणि प्राजक्ता मनोहर लेले (केतकी) यांची. दगडू हा एक उडाणटप्पू , दहावीत वारंवार नापास होणारा आणि दिवसभर त्याच्या मित्रांसोबत टवाळक्या करणारा मुलगा आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात, आणि कर्ज काढून आपल्या मुलाला शिकवू पाहत असतात. दगडू पुन्हा नापास झाल्याने ते चिडून त्याला मारहाण करतात, आणि दगडू नाईलाजाने पेपर टाकण्याचे काम करायला सुरूवात करतो.
दगडूचे मित्रमंडळ- बालभारती, कोंबडा आणि मलेरिया अशी टोपणनावे असणारे टोळके पास होऊन कॉलेजात जाते. ते दगडूला फूस लावून प्राजक्ता नामक वर्गातल्या गुणी, सालस, हुशार मुलीला ’टाईमपास’ म्हणून पटवायची फूस लावतात. दगडू तसे करायचे ठरवतो.
दगडू आणि प्राजक्ता यांची ही ’टाईमपास’ म्हणून सुरू झालेली प्रेमकथा पुढे काय वळणे घेते, ते पडद्यावर पाहणेच योग्य ठरावे.

दगडूची प्राजक्तापर्यंत पोहोचण्याची धडपड, त्याला आलेल्या अडचणी, त्यातून निर्माण होणारे विनोद, सुश्राव्य गाणी आणि मजेदार संवाद- यामुळे चित्रपट मध्यंतरापर्यंत आपल्याला गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. मध्यंतरानंतर मात्र चित्रपटाचा वेग काहीसा मंदावतो. कथानक आपल्याला अपेक्षित असलेल्या वळणांनीच पुढे जात राहते, मात्र पुर्वार्धातल्या वेगाने नाही, तर काहीसे रेंगाळत. चांगले संकलन करून चित्रपटाची लांबी कमी केली असती, तर त्याचा एकंदर ’इफेक्ट’ वाढला असता असे वाटते.
सिनेमात दगडू आणि प्राजक्ता या भूमिका प्रथमेश आणि केतकीच्या अनुक्रमे ’बालक-पालक’ आणि ’शाळा’ या चित्रपटातल्या भूमिकांचेच extension आहे, असे मला वाटले. या दोन्ही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे, आणि आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. विशेषत: मध्यमवर्गीय घरातली सज्जन, पापभीरू आईवडिलांना घाबरणारी मुलगी केतकी माटेगावकरने सुरेख रंगवली आहे. या अभिनेत्रीकडून भविष्यात भरपूर अपेक्षा आहेत ! प्राजक्ताच्या पालकांच्या भूमिकेत वैभव मांगले आणि मेघना एरण्डे यांनी चांगले काम केले आहे. विशेषत: वैभव मांगलेची भूमिका मुलीचा टकला बाप- अशी काहीशी कॅरीकेचर स्वरूपाची असली, तरी त्याला दिग्दर्शकाने खलनायकी छटा येऊ दिलेली नाही, हे मला विशेष आवडले. खरं तर या चित्रपटात खलनायक असा कोणी नाहीच. प्रत्येक जण- काहीसे तर्‍हेवाईकपणाने वागत असले, तरी आपापल्या जागी योग्य आहेत असेच वाटत राहते. प्राजक्ताला गायन शिकवणारी स्पृहा आणि प्राजक्ताचा भाऊ यांचे उपकथानक हे तसे अनावश्यक असले, तरी त्यामुळे एकंदर चित्रपटाच्या ’फ्लो’ मध्ये कोणताही व्यत्यय येत नाही.
चित्रपटाचे कथानक कोणत्या काळात घडते, ते स्पष्टपणे सांगीतलेले नसले, तरी जागोजागी काही क्लू दिलेले आहेत. दगडू आणि कंपनीने प्राकक्ताच्या वडिलांना ’शाकाल’ म्हणणे, एका दृष्यात ’दयावान’ सिनेमाची जाहिरात इ. वरून हे ऐंशीच्या दशकातले कथानक आहे, हे सहज लक्षात येते.
चित्रपटातली संगीताची बाजू भक्कम आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत. विशेषत: ’मला वेड लागले... प्रेमाचे’, काहीसे भडकरित्या चित्रित केलेले आगरी गाणे- ’ही प्पोरी साजुक तुपातली’ आणि ’फुलपाखरू’ ही गाणी चांगली आहेत.

एकंदर चित्रपट सर्व आघाड्यांवर समाधानकारक असला, तरी खूप उत्कृष्ट, अद्वितीय असे त्यात काही नाही. एकदा पहायला हरकत नाही, पाहिला नाही तरी फारसे बिघडत नाही, असा.

माझ्याकडून (पाचपैकी) तीन स्टार्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर दगडू ने साईबाबांची प्रार्थना करून त्यांना नवस बोलून आपल्या प्रेमाची प्राप्ती केली असती तर कदाचित बरेच लोकांना ते पटले असते, अगदीच अतार्किक नसते वाटले, असे आधीही झाले होते ना एका चित्रपटात, अंध मातेला दृष्टी येणे वगैरे..

काहीही अभिषेक दादा Uhoh
मग शाळा घ्या झालचं तर बालक पालक घ्या Uhoh
दुनियादारी का मधे का येतोय ते न कळण्या इतके लहान आम्ही नाही Uhoh

बालक पालक शी तुलना पण होतेयच ना..

पण << दुनियादारी का मधे का येतोय ते न कळण्या इतके लहान आम्ही नाही >>> हे मात्र मलाच कळाले नाही .. Uhoh

आदिती ने उगाच लिहिलेले नाही.......ब्राम्हणांच्या विरुद्ध दाखवलेले आहे आणि नुसत चित्रपटात नाही, तर खऱ्या समाजात सुद्धा ब्राम्हणाला टाळण्याचा प्रयत्न सुरु असतो; त्याच्या शुद्ध बोलण्याची, बुद्धीची थट्टा उडवण्याचा प्रयत्न सुरु असतो.
मी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. म्हणजे गुजराथी, पंजाबी लोकांची अशी कधी थट्टा उडवण्यात नाही आली पण......

असो, मला यावरून इथे वाद घालायचा नाही, कारण हा धागा या विषयासाठी नाही. हा विषय निघाला म्हणून मी मुक्तपीठ असल्यासारखं मन मोकळ केल. मला वाटत हा विषय बास आता. माझ्याकडून याला पूर्णविराम!!!!

चित्रपट पटला नाही आणि आवडला तर त्याहून नाही हे मात्र सत्य आहे.

काल पाहिला. ठिकठाक वाटला. दगडूला स्वप्निल चा आवाज सूट नाही होत...
ही प्पोली साजुक तुप्पातली हिला... हे गाणं लै म्हणजे लै आवडलं मला... Proud

मग नाही आवडलं मला गाणं>>>>>>रिया, मी पहिल्यांदाच सहमत आहे तुझ्याशी. Rofl

कुठं कोणाचे मनं दुखावतील काही सांगता नाही येत. Sad
बाकी हा चित्रपट चांगला चालतोय, ही आनंदाची बाब.
पण http://maharashtratimes.indiatimes.com/cinemagic/box-office/film-box-off... हे वाचुन जरा विचित्र वाटले. मराठी निर्मात्याकडे इतका पैसा असेल असं वाटत नाही... पण कोण जाणे १०% खरं असेल तर Sad

मराठी निर्मात्याकडे इतका पैसा असेल असं वाटत नाही... पण कोण जाणे १०% खरं असेल तर अरेरे >>
असल तरी असू दे . Happy
"नया है वह" म्हणजे काय हे माझे ऑफिसमधले अमराठी कलिगही विचारतायत , मला बर वाटत .
मीही पाहिला टाईमपास . टाईमपास आहे . बर्याच चुका असल्या तरी एक फ्लो आहे .
मला तरी उलट वैभव मांगलेच कॅरेक्टर आवडल . खर वाटल . दगडूच फारसा नाही जमला खर तर .

बाकी ,
"जय हो " मध्ये सुनिल शेट्टी आर्मी टँक घेऊन हॉस्पिटलला जातो , फिट येऊन पडायचा बाकी होतो मी Happy

रिया, टायपो झाला होता. Proud

सिच्युएशनला अगदी परफेक्ट शब्द वाटले म्हणून आवडलं ज्जाम..

गुजराथी, पंजाबी लोकांची अशी कधी थट्टा उडवण्यात नाही आली >>>>>>>>>>>>>>>>>गुजराथी आणि पंजाबी लोकांवर जोक्स नसतात????. काही काय???? जोक्स सर्वांवर असतात....पंजाबी, मारवाडी, मालवणी अगदी सर्वांवर..पण फरक इतकाच आहे की इतक पर्सनली कोणी घेत नाही...तितका वेळच नसतो काथ्याकुट करायला कोणाकडे की मी अमुक एक तर माझावरच का जोक केलाय अ‍ॅन्ड ऑल......

मराठी निर्मात्याकडे इतका पैसा असेल असं वाटत नाही... पण कोण जाणे १०% खरं असेल तर अरेरे >>
असल तरी असू दे . स्मित>>>>>>>>>>

केदार, उगाच हाउस्फुल दाखवण्याइतका पैसा मराठी निर्माता घालेल असं वाटत नाही, असं म्हणायचं होतं. Happy

ए अनिश्का किती डॉट्ट डॉट्ट टाकतेस मधून मधून.:फिदी: जरा फुलस्टॉप, स्वल्पविराम, अवतरणचिन्हे याचा पण वापर कर की.:फिदी:

हीहीही Proud
अगं मला आत्तापर्यंत ते ही पोरगी साजुक तुपातली वाटत होतं... म्हणजे सभ्य बिभ्य काईंड ऑफ घरातली असं!
पण ते पोळी आहे म्हणून तो शब्द नाही आवडला. मी आपलं त्याला पोरगी समजुनच आवडुन घेते Wink

अगं मला आत्तापर्यंत ते ही पोरगी साजुक तुपातली वाटत होतं... म्हणजे सभ्य बिभ्य काईंड ऑफ घरातली असं!
पण ते पोळी आहे म्हणून तो शब्द नाही आवडला. मी आपलं त्याला पोरगी समजुनच आवडुन घेते डोळा मारा >>
रीया बहुधा ते तशाच अर्थान आहे पण Happy

रिया, अनिश्का, मधुरा

फार भारी शब्द लिहिले आहेत या गाण्याचे जो कोणी गीतकार आहे त्याने.

एका टिपिकल ब्राह्मणी संस्कारात वाढलेली मुलगी कोकणी (दगडू कोळी समाजतला दाखवला आहे का ?) मुलाच्या प्रेमात पडली आहे हे डायरेक्ट न सांगता, पोळी आणि म्हावरा (मासा) यांचे प्रतिक फारच छान वापरले आहे.
ही कल्पनाच भारी आहे.

बहुतेक कोकणातले अब्राह्मण लोक ळ ला ल म्हणतात त्यामुळे पोळीचे पोली झाले आहे, जे बरोबरच आहे.
उदा. तललेला पापड
"कायद्याच बोला" मधे मोहन आगाशे चपराशाला वाक्य म्हणायला सांगतात तो सिन आठवा.
"धोंडोपंत धावत धावत भाउच्या धक्क्यावर गेला"
तर तो विचारतो "पलत पलत" म्हणू ?

त्यामुळे तुम्ही ज्याप्रकारे पोरी/पोरगी म्हणत आहात तोच अर्थ गीतात अभिप्रेत आहे पण प्रतिकाच्या रूपात.

महेश ते समजलं पोळी ला मुलगी हा अर्थ अभिप्रेत आहे तो.. Happy कोळी आगरी लोक ळ ऐवजी ल वापरतात...म्हणुन ते पोळी च पोली झालय.....कोळी आगरी लोकांत असच बोलतात.....पोली...पलाली....मिलाली....डोला....फोरला ( फोडला ) ... सगले ;)....कोळी आगरीच कशाला खुप लोक ळ ला ल बोलतात..... पण त्या गाण्यात शब्द पोली असाच आहे.....

Pages