फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला याची जाणीव आहे की या धाग्यावर लिहीणारे आणि वाचनमात्र असलेले सर्वजण चांगल्याच हेतूने लिहित आहेत. जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना हा प्रश्न पडलाच नाहीये अजून! किमान यावर विचार करावासा वाटणे ही देखील एक चांगली बाब आहे असं मला वाटतं.
फटाके काय किंवा इतर अनेक दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी काय आपण सगळेजण कुठे ना कुठे तरी दांभिक वागतोच. पण अनेकदा तो दांभिकपणा नसतो - आपल्याला जसे वागायचे आहे वा आपण जसे वागले पाहिजे (श्रेयस) आणि आपण जसे वागू शकतो, आपल्या गरजेसाठी, सोयीसाठी, आनंदासाठी, परिस्थितीमुळे, अडचणींमुळे, सोपे आहे म्हणून, किंवा peer pressure मुळे (प्रेयस) या दोन्ही गोष्टी एक नसतात आणि मग ही विसंगती निर्माण होते. हा आपला आंतरिक झगडा जितका personal आहे तितकाच universal आहे.
पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या बाबतीत देखील हाच झगडा आहे. किंबहुना तो खूप मोठा आहे कारण आपली दैनंदिन जीवनशैली ही बहुतांशी पर्यावरणस्नेही राहिलेली नाही. त्यामुळे श्रेयसासाठी प्रवाहाविरुद्ध पोहणे क्रमप्राप्त आहे. अशा वेळी जर आपल्याला कोणी समानधर्मी भेटले तर हा श्रेयसापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुकर होतो. तेव्हा हे लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमधून घडणारा संवाद महत्त्वाचा आहे - यातून positive reinforcement मिळू शकते.
जेव्हा आपले प्रेयस हे फक्त स्वकेंद्रित आणि क्षणिक असते तेव्हा त्यातले आणि श्रेयसातले अंतर अधिक असते. त्यामुळे हा झगडा निर्माण होतो. जे माझ्यासाठी चांगले आहे आणि जे इतरांसाठी (सर्व सजीव निर्जीव सृष्टी साठी) चांगले आहे असे प्रेयस हे श्रेयसाच्या जवळ जाणारे असते. माझ्यासाठी कोणत्याही निर्णयात हे अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. तो प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या श्रेयसापर्यंत पोहोचाल.
कायदे नियम यांचे महत्त्व आहेच परंतु खरा आणि शाश्वत बदल हा मनातून घडावा लागतो. This may sound preaching from a moral high ground but believe me, the more I think about it, I feel more convinced about this statement - sustainable change comes from within.

मी माझ्या अनुभवावरून आणि निरीक्षणावरून सांगतो.

१) वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जितके फटाके वाजवले जायचे त्यापेक्षा कितीतरी कमी फटाके हल्ली वाजवले जातात.
२) वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जितके गाड्यांचे ध्वनी आणि वायू प्रदूषण झेलावे लागायचे त्याच्या कितीतरी पटीने जास्त हल्ली झेलावे लागते.

तुमचा अनुभव आणि निरीक्षण वेगळे असल्यास जरूर नमूद करा.

पण तरीही दर दिवाळीला आम्ही फटाक्यांना विरोध करून लहान मुलांचा आनंद हिरावून घेण्यात जी तत्परता दाखवतो
ती मला वर्षभर ज्या गाड्या प्रदूषण करतात त्याविरोधात कधी आवाज उठताना दिसला नाही.

का?

कारण ईथे मी स्वतः फटाके वाजवत नाही हे मिरवता येते.
पण तिथे कदाचित मी गाडी विकून आता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला सुरुवात केली हे बरेच जण सांगू शकणार नाही. मी पर्यावरणाचा विचार करून एसी वापरत नाही हे कदाचित सांगता येणार नाही.

आणि जर हे खरे असेल तर मग हा दुटप्पीपणा नाही तर काय झाला?

पण मानव पृथ्वीकर म्हणतात ते योग्य आहे. कोण खरेच पर्यावरणप्रेमी आहे की नाही हे आपण त्यांच्याबद्दल पुर्ण माहीत असल्याशिवाय अंदाज बांधू शकत नाही. पण आजवर नो फटाके सारखा नो गाडी नो एसी सारखा धागाही मायबोलीवर निघाला नाही हे सुद्धा एक फॅक्ट आहे. किंबहुना या धाग्यातही तसे कोणी नमूद केले नाही की त्याने पर्यावरणाचा विचार करून कोणकोणत्या गोष्टींचा त्याग केला आहे. जर हे नमूद करायला स्वतंत्र धागा हवा असेल तर तो तसा काढूया. अन्यथा सिलेक्टीव्हली फटाक्यांनाच टारगेट केले जातेय कारण ते तुम्ही वाजवत नाहीत हा दुटप्पीपणाचा आरोप होणारच.

पण तिथे कदाचित मी गाडी विकून आता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला सुरुवात केली हे बरेच जण सांगू शकणार नाही. मी पर्यावरणाचा विचार करून एसी वापरत नाही हे कदाचित सांगता येणार नाही.>> अहो ह्याच कारणाकरता एसी बसवला नाहिये घरात आणि नाही वापरत. दरवर्षी असह्य झाले तर स्वतःला सांगते "हे वर्ष असेच काढू, पुढच्या वर्षी बघू" (ही ट्रीक आहे हे माझे मलाही माहित आहे :))
अनेकदा मोठी गाडी घ्यायचा मोह होऊनही डिसिजन टाळला आहे गेले अनेक वर्षे (निदान आत्तापर्यंत) - फॅमिली साईज नुसार गरज, एकॉनॉमिकली शक्य असून, फॅमिल-पिअर प्रेशर आणि मोह असूनही. निदान ७ - ८ वर्षे तरी आत्तापर्यंत वाचली आहेत.

अनेक गोष्टी आहेत. पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मिरवायची का? जो मुद्दा (फटाके) चाललाय त्यावर बोलतोय ना आपण सगळे?
( आणि पर्यावरणाचे इतकेच प्रश्न आहेत आणि पुन्हा ह्या सगळ्याच प्रश्नांना इतके आयाम आहेत की हे केलं, पण ते केलं का असे प्रश्न विचारून आपलं थोबाड बंद करायची सोय समोरच्याकडे असतेच.)

मुद्दा काय, आपल्या आप ल्या परीने प्रयत्न करत र हायला हवेत.
मुलं आपल्या पेक्षा शहाणी असतात - त्यांना मुद्दे नीट सांगितले तर ते पटतात, ते फॉलो ही करतात.
आमच्या इथे ग्राऊंडच्या सरांनी पटवलय म्हणून केक न खाणारी, इतर जंक न खाणारी रोज "भाकरी" खाणारी (गेले २-३ वर्षे तरी) आख्खी जनता आह ९-१२ वयोगटातली..

ऋन्मेष, फटाके कमी झाले कारण ते बंद करणं शक्य होतं आणि त्याविषयी प्रबोधन केलं गेलं. गाड्यांमुळे होणारे प्रदूषण वाढले कारण त्याविषयी काहीच जागरूकता निर्माण झाली नाही. पण याचा अर्थ या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून असाव्यात असे नाही. फटाक्यांचा प्रश्न सोडवणे तुलनेने सोपे होते म्हणून तो प्रश्न लवकर सुटला. वाहतूकीचा प्रश्न बराच कठीण आहे आणि त्यात बऱ्याच जणांचे vested interests असल्याने तो सुटलेला नाही.
मी स्वतः गाडी (दुचाकी आणि चारचाकी) वापरत नाही. घरात गाडी आहे जी लांबच्या प्रवासाला वापरली जाते. आत्तापर्यंत सर्व दैनंदिन प्रवास हा शेअर रिक्षा, बस, लोकल आणि सायकलवर केला आहे. आतातर घरून काम करत आहे. घरी एसी आहे जो २५ डि. से. वर फक्त मे आणि जून महिन्यातले बहुतेक रात्री चालतो. उन्हाळ्या व्यतिरिक्त एरवी शक्यतो पंखा आणि लाईट चालू नसतात. पोळीवरून भाकरीवर आले आहे. जवळपास व्हिगन आहे. शक्य तितके organic/naturally grown भाजीपाला, धान्य वापरते. साबण, शांपू शक्यतो वापरत नाही. कोणतेही मेकअपचे सामान वापरत नाही. गेल्या तीन वर्षांत कपडे घेतले नाहीत. गरजेच्याच वस्तू घेते.
गेल्या पाच वर्षांत कोणालाही वस्तू भेट म्हणून दिलेली नाही. पुस्तक देते, पैसे देते किंवा खाऊ देते. ज्यांना सांगणे शक्य आहे त्यांना भेट देऊ नका म्हणून सांगते. काँपोस्ट करते. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं शक्य तिथे टाळते. भेळ, बटाटेवडे स्टीलच्या डब्यात पार्सल करून आणते. हे सर्व वेळा करता येत नाही.
अनेक अजून गोष्टी आहेत ज्या करायची इच्छा आहे पण अजून जमलेल्या नाहीत किंवा ट्राय केलेल्या नाहीत.
यातलं काहीच न करणारी व्यक्ती जरी फटाके उडवू नका असं म्हणाली तरी मला आनंदच होईल. कारण कोण म्हणतंय यापेक्षा काय म्हणताहेत याकडे लक्ष देणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. शिवाय या गोष्टी मी करतेय म्हणजे मी खूप भारी आहे असं मला आजिबात वाटत नाही. I do this by choice. आणि मला अशा अनेक व्यक्ती माहिती आहेत ज्या हे सगळं आणि याहून अधिक गेली अनेक वर्षे करत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की कोणी काही चांगले सांगत असेल तर त्याला पहिल्यांदा मिडिया ट्रायलला सामोरे जावे लागते. तुमची लायकी सिद्ध करावी लागते. पण वाईट गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांना मात्र कोणी विचारत नाही की का हो तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार कसा काय प्राप्त झाला! चालायचंच.
नानबाने म्हटलं आहे तसं लहान मुलांना बरे वाईट नीटच कळते. फटाक्यांच्या बाबतीत प्रश्न मोठ्यांच्याच nostalgia चा आहे खरंतर.
अरे हो! फटाके उडवणं दहावीत असताना बंद केलं. माझा भाऊ त्यावेळी पाचवीत होता. त्याला मी काही तरी समजावलं असावं. तुला उडवायचे असतील तर उडव असं सांगितलं होतं त्याला पण त्याने ताई करणार नाही तर मीही करणार नाही म्हणून सोडून दिलं! आता गंमत वाटते हे आठवून! आम्हाला फटाके नाहीत म्हणून दिवाळीच्या आनंदात काही कमी वाटल्याचं आठवत नाही.

साधू संत बोलून गेले
सुतळी बॉम्ब लावा चौकात, रस्त्यावर लावा पाऊस
भुईचक्र लावा अंगणी, फिटवूनी घ्या सारी हाऊस.

फटाक्याच्या धुरामुळे पक्ष्याना त्रास होतो हे पटणारे किती सुडो पर्यावरणप्रेमी जेवताना कोंबडी खातात?? हात वर करा...

तुम्ही लोक इथे वाद घालण्यापेक्षा आपल्या घराजवळ भरपूर फटाके लावा. घरातल्या सगळ्यांनी त्याची मजा लुटा.
ही दिवाळी संपलीय. पुढल्या दिवाळीत दुप्पट किंवा तिप्पट उडवा.

फटाक्याच्या धुरामुळे पक्ष्याना त्रास होतो हे पटणारे किती सुडो पर्यावरणप्रेमी जेवताना कोंबडी खातात?? हात वर करा...>>> पर्यावरण प्रेमींच्या मते कोंबडी आणि बोकड हे पक्षी आणि प्राणी या कॅटेगरीत पकडू नयेत कारण त्यांची पैदासच मनुष्याना खाण्यासाठी केली आहे. ज्या प्राण्यांना माणसं खातात त्यांना सोडून बोलायचं.

खरं सांगायचं तर दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत असते. त्यामुळे तुळशीचं लग्न होईपर्यंत रोज थोडे थोडे फटाके वाजवले पाहिजेत. जास्त वाजवले तरी चालतील

>><< "प्रॅक्टिस बिफोर यु प्रीच" याची इक्विवॅलंट मराठी म्हण काय आहे? >> ------ आधी केले मग सांगितले...<<
धन्यवाद, उदयशेठ. आता आजची नविन म्हण -

"सौ चूहे खाके बिल्ली हज को चली" या हिंदि (कि उर्दु?) म्हणीची इक्विवॅलंट मराठी म्हण काय आहे? तर्खडकरांनी इंग्रजी म्हण दिली तर मी त्यांना त्यांच्या आवडिचं बेवरेज पाजेन... Proud

अनेक गोष्टी आहेत. पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मिरवायची का? जो मुद्दा (फटाके) चाललाय त्यावर बोलतोय ना आपण सगळे?
>>>>

अहो मिरवायला हवे ना मग ते. जर तुम्ही खरेच काही मनाला आवर घालून पर्यावरणाच्या चिंतेने काही करत असाल तर ते चार लोकांना सांगायला हवे. त्याशिवाय जनजागृती कशी होणार. उलट तुमच्या वर्तनातून तुमची पर्यावरणाची कळकळ तुम्ही पोहोचवाल तेव्हा कोणीतरी तुमचे ऐकून घेईल.

अन्यथा जर आता एखाद्याचे फटाके वाजवायचे वय तसेही निघून गेले आहे त्या केसमध्ये ते ईतरांना उपदेश करत आहेत तर समोरचा हेच म्हणणार की यांनी स्वतः उडवून झाले. आता तसेही यांना त्यात आनंद राहिला नाही. म्हणून आले आम्हाला शिकवायला. त्यात वर काही लोकं ईथे फटाक्यांतून मिळणार्‍या आनंदालाही नावे ठेवत आहेत. अश्याने तर कोणी नाही ऐकणार. त्यांना मिळणारा आनंद आधी मान्य करा. मग पर्यावरणाच्या चिंतेने तो त्यांनी त्यागावा असे अपील करा.

आणि हो, आपण आपल्या मुलांना फटाके उडवण्यापासून परावृत्त करणे यात आपला स्वतःचा काही त्याग नाही. पण जर ते करताना कोणी दैनंदिन कारभारात आणखी दहा गोष्टी प्रदूषणाची चिंता न करता करत असतील तर ते दुटप्पीपणाचेच झाले.

@ जिज्ञासा, आपलीही छान पोस्ट. आपल्याकडून ते अपेक्षितही होतेच.

खरं सांगायचं तर दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत असते.
>>>>>

मला आजच दुपारी आठवलेले तुळशीचे लग्न. आमच्यावेळी तुळशीच्या लग्नाला वाजवायला मुद्दाम दिवाळीला काही फटाके राखून ठेवले जायचे. बिल्डींगमध्ये आठ दहा घरात तुळशीचे लग्न व्हायचे. त्यात एक घर आमचेही होते. टोपी घालून मीच उभा राहायचो. मंगलाष्टके म्हणायला गणपतीच्या आरतीसारखे चाळीतले सर्व जण मिळून साजरा करायचे तो सण.. टिवल्याबावल्या करत ती मंगलाष्टके म्हणने, नवरदेवाला टपल्या मारणे, मग प्रसादासाठी तुटून पडणे, त्यात तुळशीला दाखवलेला प्रसाद लुटायच्या नादात नवरी म्हणजे तुळशीच कुंडीसह आडवी होणे, मग दादरावर जमून खाल्लेला प्रसाद, उरलेसुरले संपवायला उडवलेले फटाके... या तुळशीच्या लग्नाच्या एकेक वेगवेगळ्या गंमतीशीर आठवणी आहेत. एक धागा काढतो नंतर Happy

<< फटाक्याच्या धुरामुळे पक्ष्याना त्रास होतो हे पटणारे किती सुडो पर्यावरणप्रेमी जेवताना कोंबडी खातात?? हात वर करा... >>

ते फक्त cage-free, free-range, pasture-raised कोंबड्या खातात.

<< "सौ चूहे खाके बिल्ली हज को चली" या हिंदि (कि उर्दु?) म्हणीची इक्विवॅलंट मराठी म्हण काय आहे? >>
करून करून भागले नी देवपूजेला लागले.

"सौ चूहे खाके बिल्ली हज को चली" या हिंदि (कि उर्दु?) म्हणीची इक्विवॅलंट मराठी म्हण काय आहे? तर्खडकरांनी इंग्रजी म्हण दिली तर मी त्यांना त्यांच्या आवडिचं बेवरेज पाजेन >> द कॅट वेण्ट टू हज आफ्टर ईटिंग मिसेस माईस ... मला पंचामृत चालेल.

>> द कॅट वेण्ट टू हज आफ्टर ईटिंग मिसेस माईस … मला पंचामृत चालेल<<
पथेटिक ट्रांस्लेशन; यु नीड ए स्पाइक्ड पंचाम्रुत… Proud

. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की कोणी काही चांगले सांगत असेल तर त्याला पहिल्यांदा मिडिया ट्रायलला सामोरे जावे लागते. तुमची लायकी सिद्ध करावी लागते. पण वाईट गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांना मात्र कोणी विचारत नाही की का हो तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार कसा काय प्राप्त झाला! चालायचंच.>>>>हो ना! चोराला चोर म्हणण्याचा अधिकार फक्त सावालाच का? तो चोरालाही हवा. अगोदर आपल सावत्व सिद्ध करत बसायचं नंतर चोराला चोर म्हणण्याचा अधिकार इतर लोक मान्य करणार. मी चोर आहे किंवा होतो पण मला चोरी करणे हे पटत नाही तर मला तसे सांगण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य हवे.अंधश्रद्धा निर्मूलनातही हेच होत. अगोदर स्वत:च्या घरातल्यांच्या अंधश्रद्धा दूर करा मग इतरांना सांगा असे लोकांचे म्हणणे असते. म्हणजे मी माझ्या कुटुंबियांच्या अंधश्रद्धा कमी करु शकलो नाही तर मला जणू इतरांना सांगण्याचा अधिकारच नाही असे काही तर्कट समूहमानसाला भावते. समूहमानसशास्त्राचे अभ्यासक अधिक चांगले सांगू शकतील. गंमत म्हणजे अगोदर स्वत:च्या घरातल्यांच्या अंधश्रद्धा दूर करा मग इतरांना सांगा असे सांगणारे लोकच तुम्हाला फक्त हिंदु ध्रर्मातल्याच अंधश्रद्धा दिसतात का? इतर धर्मातल्या अंधश्रद्धांबाबत बोलती का बंद होते असे म्हणत असतात.बकरी इदला प्रतिकात्मक बकरा कापा असं का नाही बोलत कुणी? तुम्हाला दिवाळीचेच फटाके दिसतात का? नववर्षाचे फटाके दिसत नाहीत का? वगैरे वगैर

आपण खूप चान्गले सांगत आहोत, असे आपल्याला वाटते; दुसऱ्याला नाही ना आणि खरा मुद्दा तिथेच आहे. आपल्याकडे सेलेक्टिव्ह READING/वागणं खूपच कॉमन आहे.

प्रत्येक जण स्वतःच्या सोयीनुसार वागत असतो. ज्यांची मुले १० -१२ वर्षाखालील आहेत, त्यांना ग्रीन / कमी आवाज वाले फटाके वाजवावे असे वाटते. प्रदूषण कमी करायचे बाकीही मार्ग वापरतो आम्ही पण २-३ दिवस त्यांना आनंद मिळतो असे वाटते. इथे ३०-४० असलेल्या बऱ्याच
लोकांनी १३-१५ नंतर फटाके वाजवणं सोडाल असेल आणि कदाचित परत मूल झाल्यावर वाजावले असतील. मधली १२-१५ वर्ष नसतीलच उडवले फटाके. माल वाटत ऋन्मेऽऽष किंवा बाकी ids च हे mhaune असावं. सरसकट बंदी नको, अस काहीसं.

बाकी हिंदू सण साजरे केले के प्रतिगामी आणि नाव ठेवली के पुरोगामी असे झालेच आहे, त्या बद्दल न बोललेलंच बर. खरतर X-mas आणि दिवाळीत फार काही फरक नाहीये. फक्त आपल्याकडे X-mas व्यक्तीस्वातंत्र नावाखाली तर दिवाळी ट्रॅडिशनल. आपण फक्त सोयीच्या X-mas RITUALS घेतो.

तुम्ही फक्त फटाके वाजवून दिवाळी साजरी करता वाटतं? जर्मनीत का?
आम्ही अजूनही अभ्यंगस्नान, रांगोळी, पणत्या , कंदिल, फराळ ,
नवे किंवा ठेवणीतले कपडे, आप्तेष्टांच्या भेटी किंवा फोन इतकं सगळं करतो दिवाळीत.

>>हो ना! चोराला चोर म्हणण्याचा अधिकार फक्त सावालाच का? तो चोरालाही हवा. <<
बरोबर आहे तुमचं म्हणण. इथे तुम्हि चोराला चोर म्हणु नका असं कोणिहि सांगत नाहि. मुद्दा एव्हढाच आहे कि जेंव्हा एक चोर दुसर्‍या चोराला चोर म्हणतो, तेंव्हा ते हास्यास्पद दिसतं...

आता आपण बिब्लिकल काळात जगत नाहि आहोत, हे मान्य, तरिहि दगड उचलण्या अगोदर थोडं आत्मपरिक्षण असले वाद थांबवु शकते...

राज, उपाशी बोका, चरप्स यांच्याशी सहमत आहे.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं तुकोबा म्हणतात.

फटाकेमुक्त दिवाळी चळवळीला पाठिंबा आहे. प्रबोधन करत राहा पण सक्ती नको. फक्त ही चळवळ शाळा कॉलेज, सामान्य लोक यांच्या माध्यमातून चालू राहू दे. त्यात दुटप्पी सेलिब्रिटी, राजकीय सोयीस्कर पुरोगामी याना हायजॅक करू देऊ नका. अन्यथा त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जो रोष आणि तिरस्कार आहे त्याचा विपरीत परिणाम एका चांगल्या चळवळीवर होईल.
उदा- अनुष्का शर्माने कुत्र्यांना त्रास होतो म्हणून फटाके उडवू नयेत असं आवाहन केलं होतं. नंतर तिने मटण एन्जॉय करत असल्याची पोस्ट टाकली होती. म्हणजे कुत्र्याला जराही त्रास नको पण लॅम्ब?
अशा लोकांपेक्षा सामान्य लोक आणि समाजातील प्रतिष्ठित respect असलेल्या लोकांनी केलेला प्रचार प्रभावी ठरतो.

आमची पण दिवाळी अभ्यंगस्नान, रांगोळी, पणत्या , कंदिल, फराळ, नवे किंवा ठेवणीतले कपडे, आप्तेष्टांच्या भेटी किंवा फोन, ह्या सगळ्या सोबतच जर्मनीत किंवा भारतात साजरी होते. आता इथेही उटणं मिळत. आम्ही कधी इथे तर कधी तिथे असतो.
पण असं निरीक्षण आहे कि ३ - १०/१२ वयोगटातल्या मुलांना बेसिक फटाके (फूलबाज्या, भुईनळे, भुईचक्र typ ) फटाके आवडतात.
जर्मनीन असताना मुलीचे आजूबाजूचे जर्मन मित्र-मैत्रिणी पण सामील होतात. इथे oct-dec फटाके मिळतात.
निरीक्षण सारखंच, (११-१२ वर्षांपुढची इथलीही भारतीय/जर्मन मुलं फार उत्सही नसतात; भारतात पण शाळा मधून आणि बाकी गोष्टीमुळे ११-१२ वर्ष पुढच्या मुलांचं प्रमाण कमी झालाय.

आज पाकिस्तान हरली म्हणून भारतात ईथे कुठे कुठे फटाके वाजले.
विजय असे फटाके वाजवून साजरे करण्यामागे काय लॉजिक आहे.
म्हणजे अगदी जुन्या काळापासून आतापर्यंत आपण तोफांची सलामी ऐकत आलोय.

Pages