यू आर रिजेक्टेड

Submitted by बेफ़िकीर on 21 July, 2013 - 06:12

एन आय आय टी या संस्थेत मी गेले तीनएक महिने काम करत आहे. आय टी क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असे लहानमोठे कोर्सेस या संस्थेत असतात हे बहुश्रुत आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नुकतेच एक जॉब फेअर आयोजीत करण्यात आले होते, ज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापले अधिकारी पाठवले होते व अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांनी तेथे मुलाखती दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय प्रभावी व उत्तम झाला. मी उपस्थित असलेल्या मजल्यावर एका कंपनीच्या मुलाखतीसाठी इतकी गर्दी उसळली की मी त्या कंपनीच्या अधिकार्‍यांना 'काही मुलाखती मीच घेऊन आपणास मदत करू का' असे विचारले. मला परवानगी मिळाली व इंग्रजी संवादकौशल्य या सदरातील काही मुलाखती मी घेतल्या. त्या घेत असताना मला आलेला अनुभव येथे मायबोलीकरांना सांगावासा वाटत होता. तो अनुभव मनाला भिडला व बोचलाही.

================

आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद येथील रहिवासी होते. मात्र साधारण तीस टक्के विद्यार्थी हे बुलढाणा, सातारा, सांगली, अकोला, अमरावती, परभणी, लातुर अश्या ठिकाणांहून आलेले होते. हे किंचित अर्धविकसित विभागातील विद्यार्थी नुसते पाहूनही ओळखता येत होते. त्यांची मुलाखतीसाठी योग्य असे कपडे परिधान करण्याची जाण व आर्थिक क्षमता कमी असल्याचे लांबूनच जाणवत होते. या शिवाय चेहर्‍यावर एक प्रकारचे बुजलेपण होते. का कोणास ठाऊक, पण उगाचच एक लाचारीही होती व हा मला झालेला 'भास' नक्कीच नव्हे. दाढीचे खुंट वाढलेले विद्यार्थी व कॅज्युअल वेअरमध्ये असलेल्या विद्यार्थिनी तर प्रगत शहरातूनही आलेल्या होत्या, पण या अर्धविकसित भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा पोषाख, अ‍ॅक्सेसरीज, हेअर स्टाईल हे सर्वच तुलनेने 'साधेपणाचे' होते, 'स्वस्त' नव्हते.

यांच्यापैकी कोणाचा नंबर आला की त्यांची मुलाखत मी घेऊ लागायचो. तेव्हा जाणवायचे की त्यांच्या उभे राहण्यातही एक प्रकारची अजीजी होती. वरवर वाचायला हे खरंच भास वाटू शकतील, तेव्हा ज्या वाचकांना माझ्या गृहितकांबाबतच शंका आहे त्यांच्या मताचा आदर आहेच. पण निदान मी तरी प्रामाणिकपणे जे जाणवले ते लिहीत आहे. अर्थातच अश्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व खूपच कमी होते. त्याला 'प्रभुत्व' म्हणता येणारच नाही. ठराविक काही वाक्ये ते अगदी सलगपणे उच्चारू शकत होते याचा अर्थ तितकीच वाक्ये ते पाठ करून आलेले असावेत. त्या सर्वांच्या डोळ्यात 'नुसते माझ्या सहीवर बरेच काही अवलंबून असल्यासारखे' भाव होते. काहीजणांना तर मुलाखत केव्हा एकदा संपते आणि केव्हा एकदा आपण 'नेहमीप्रमाणे' रिजेक्ट होऊन येथून बाहेर पडतो असे झालेले असावे. यालाही कारण होते ते म्हणजे आजूबाजूला विकसित शहरांमधील जे विद्यार्थी वावरत होते त्यांच्या आत्मविश्वासयुक्त देहबोलीसमोर आपला निभाव लागणे शक्यच नाही याची या विद्यार्थ्यांना केव्हाच जाणीव झालेली होती.

यातील अनेकांना वडील नव्हते, अनेकांचे वडील शेतकरी होते किंवा गॅरेजवर कामाला होते. अनेकांनी निव्वळ नोकरीसाठी पुण्याचा रस्ता धरलेला होता पण पुण्यात वावरण्याचा आत्मविश्वास मात्र त्यांच्यापासून खूपच दूर होता. अनेकांवर लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. जवळपास सर्वांनीच 'छंद' या सदरात 'लिसनिंग टू म्यूझिक' आणि 'रीडिंग' असे लिहिलेले होते. मात्र कोणते म्यूझिक आणि कसले रीडिंग याची उत्तरे त्यांना देता येत नव्हती.

दुसर्‍या बाजूला फाडफाड बोलणारी मुले मुली एकमेकांना खाणाखुण करून हासत होती. त्यांचे पेहराव ग्रामीण युवक - युवतींना बावचळवणारे होते. त्यांचा वावर 'अ‍ॅट होम' होता. मुख्य म्हणजे 'नोकरी' ही त्यांची 'त्वरीत असलेली गरज' नव्हतीच, हे मला संभाषणातून सहज समजत होते.

एकुण वाईट वाटले.

संधी उपलब्ध असण्यात दरी होती. संधी उपलब्ध झाल्यानंतर आत्मविश्वासाच्या प्रमाणात तफावत होती. नोकरीची आवश्यकता ज्याला अधिक होती तो रिजेक्ट केला जात होता. ज्याला ती गरज कमी होती त्याला मुलाखतीच्या पुढच्या पायरीसाठी पाचारण करण्यात येत होते.

बिचार्‍या ग्रामीण विभागातील मुलांच्या डोळ्यात स्वप्ने दिसत होती. 'दोन तीन मिनिटे तर यांच्याशी बोलायचे, यांनी पास केले की मग थेट टेक्निकल मुलाखत, ज्यात आपण नक्की पास होऊ' अशी आशा दिसत होती. पण मला माहीत असलेल्या निकषांनुसार त्यांचे संवादकौशल्य तपासताना त्यांना रिजेक्ट करावे लागणे हे माझे तत्क्षणी कर्तव्य होते. एका वर्तुळात 'आर' लिहून त्यांचा बायोडेटा गठ्ठ्यात मागे सरकवताना आणि त्यांना 'ऑल द बेस्ट' असे 'खोटेच' हसून म्हणताना माझ्यातील कोणीतरी एक स्वतःच निराश होत चालला होता. चेहर्‍यावर व्यावसायिकतेचा मुखवटा मिरवणे भाग होते. मी त्यांना 'ओके, झाली मुलाखत' असे सांगितल्यावर ती मुले अजीजीने मान तुकवून 'थँक यू' म्हणून निघताना आशेने क्षणभर माझ्या डोळ्यांशी डोळे भिडवत होती. जणू त्यांना म्हणायचे असावे की 'आम्हाला फक्त हा इंग्लिशचाच एक प्रॉब्लेम आहे, तेवढा कराल ना दुर्लक्षित'!

आईच्ची जय त्या शिक्षणाच्या आणि विषमतेच्या! माझ्या मनावर गेले दोन दिवस जो परिणाम झाला तो कोणाला धड सांगताही येत नव्हता, माझीच थट्टा व्हायची असे वाटून! शेवटी मी माझ्या जगात पोचलो आणि प्रगत शहराचा एक भाग होऊन कंफर्टेबल झालो. आता असे वाटते साले आपल्याला देवाने इतके नशीबवान बनवले पण आपण त्या नशिबवान आयुष्याचे काय मातेरे करत आहोत?

माफ करा, विचार प्रकट करताना वाहवत गेलो, पण नेहमीप्रमाणेच हा लेखही जसा सुचला तसा एका बैठकीतच लिहून मोकळा झाल्याचे समाधान मनाला आहे.

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेत सोडा पण मनिष यांचे बोलणे १०० टक्के खरे आहेत. हैद्राबादला घडल्यात या घटना.

विजय देशमुख अचूक निरीक्षण आणी अचूक सल्ला.:स्मित: खरे संशोधक आहात्.:स्मित:

२. संवादकौशल्य असणे (मातृभाषेतील किंवा परभाषेतील) आणि बुजलेपण नसणे याची काळजी शहरी व ग्रामीण अश्या दोन्ही भागांमध्ये समसमान प्रमाणात का घेतली जात नसावी?
३. मातृभाषेत संवाद करूनही काम करता येईल अश्या संधी आपल्याकडे कमी का असाव्यात किंवा कमी पगाराच्या / उत्पन्नाच्या का असाव्यात?
<<
बेफिकिरजी,
मला वाटते तुमचे हे दोन्ही मुद्दे इन्टररिलेटेड आहेत.

कदाचित उद्या उठून ग्रामीण भागात काम करण्याच्या एकाद्या जॉबला,ज्यात जनसंपर्क अत्यावश्यक आहे, प्रतिष्ठा प्राप्त झाली, तर लोकल बोलीभाषेत संवाद करू शकण्याला डिमांड येईल.

याच परिस्थितीत, शहरी वातावरणात शिकलेला 'कॉन्फिडन्ट' कॉन्व्हेंट एज्युकेटेड मुलगा त्या मुलाखतीत प्रचण्ड बुजलेला दिसेल.

प्रज्ञा९ :- अविनाश धर्माधिकारी यांच्या फेसबुकवरुन
1 Invitation , 2 Programs
All my dear friends who are ever so affectionately with me on FB,
It gives me pleasure to extend personal invitation of 2 programs to all of you.
1. GANESH KALA KREEDA: We have organised my talk followed by Q & A on 'Career through Competitive Exams.' Monday May 13,2013 at 10.00 am sharp.(that means 9.55am!) Some of Chanakya Mandal students-Karyakarta-Faculty who have succeeded at UPSC exam this year, will also share their experiences with you.

2. YUVA-VANI: We are starting a 24 part series on 'Career Development' on Pune All India Radio station. This program will be 'Yuva-Vani' at 9.10 am every Monday & Thursday. The series in form of a radio talk by me will commence at 9.10 am on Monday May 13. Last & 24th episode will be broadcast on Thursday August 1, Tilak Punya-Tithi.
See you all.

मात्र याचं रेकॉर्डिंग मिळेल की नाही माहिती नाही.

कदाचित उद्या उठून ग्रामीण भागात काम करण्याच्या एकाद्या जॉबला,ज्यात जनसंपर्क अत्यावश्यक आहे, प्रतिष्ठा प्राप्त झाली, तर लोकल बोलीभाषेत संवाद करू शकण्याला डिमांड येईल.>>>

सध्या माझे काही स्नेही अश्या (ऑरगॅनिक कॉटन) प्रकल्पात काम करत आहेत. त्यात ज्यांना बर्‍यापैकी इंग्रजी येते, त्यांना अधिक फायदा मिळतोय. म्हणजे बढती वगैरे.... या प्रकल्पात काही शेतकरी स्पेन, जर्मनीला जाउन आले आणि त्यांनीही इंग्रजी शिकण्याचा ध्यास घेतला. आणि शिकलेही. बोलीभाषेसोबत इतरही भाषा माहिती असणे फायद्याचे ठरले. अर्थात हे एक उदाहरण आहे, नेहमीच असं होईल असही नाही, पण त्या शेतकर्‍यांना जो परदेशाचा अनुभव मिळाला, मात्र इतर शेतकर्‍यांशी संवाद साधणे अवघड गेले. आज इंटरनेटमुळे जग जवळ येत आहे, त्यामुळे जागतिक भाषा (अगदी शेतकरी का असेना) माहिती असणे फायद्याचेच राहिल. मुक्त व्यापारात आपण स्वतःचा फायदा कसा करुन घेउ शकतो, हे अनेक कंपन्यांनी लुटल्यावर आणि कोण्या एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगीतल्यावरच (थोडक्यात दे रे हरी प्रमाणे) जागे होणार असू तर .......... काय बोलावं ?

बरचसं विषयांतर आणि विस्कळित पोस्ट झाली पण ग्रामीण भागात इंग्रजी आणि संभाशण कौशल्याची जास्त गरज आहे, जेणेकरुन त्यांना स्वतःचा शेतमाल कुठे व कसा विकावा, हे तरी कळेल.

प्रामुख्याने शिक्षणपध्दतीतील बदल ही काळाची गरज आहे,
आजही इंग्रजी विषय शिकवताना केवळ शब्दसामुग्री पाठ करण्यावर भर दिला जातो ,संभाषणावर नाही,
संभाषणाला (भले ते व्याकरणदृष्ट्या चूकीचे असले तरी) प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढविणे हा एकमेव पर्याय वाटतो,माध्यमाचा फरक तर जाणवणारच आहे मात्र इंग्रजी अत्मसाद करणे याला पर्याय नाही,

२. संवादकौशल्य असणे (मातृभाषेतील किंवा परभाषेतील) आणि बुजलेपण नसणे याची काळजी शहरी व ग्रामीण अश्या दोन्ही भागांमध्ये समसमान प्रमाणात का घेतली जात नसावी?
३. मातृभाषेत संवाद करूनही काम करता येईल अश्या संधी आपल्याकडे कमी का असाव्यात किंवा कमी पगाराच्या / उत्पन्नाच्या का असाव्यात?
>> पहिल्या मुद्द्यावर मी ऑलरेडी दोनदा लिहिलंय. उलट माझ्या आजवरच्या अनुभवात ग्रामीण भागातील मुलं अधिक अनुभवसमृद्ध असतात.

(फक्त) मातृभाषेमधे संवाद म्हटला की तुम्ही आपोआप तुमचा स्कोप नॅरो करत आहात असे होत नाही का? (या वाक्यासाठी माफी असावी) तमिळनाडूमधील परिस्थिती काय आहे माहित आहे का? इथे बीटेक तमिळ माध्यमातून करता येतं. पण ही मुलं बाहेर नोकरी मिळवू शकत नाहीत. तमिळनाडूमधेच नोकरी करायची असेल तरी आता संधी मिळत नाही कारण सध्या इथेदेखील एम्प्लॉयर हिंदी येतं का ते बघतो. आमच्या आजूबाजूला राहणारी दहावी ते इंजीनीअरिंगपर्यंतची पाच सात मुलं माझ्याकडे हिंदीची बेसिक माहिती करून घ्यायला येतात. कारण,नोकरीसाठी ते आता आवश्यक झालेले आहे याची त्यांना जाणीव आहे म्हणून.

मातृभाषा हा तुमचा प्लस पॉइण्ट आहेच, पण त्याखेरीज अजून एक दोन भाषा आल्या तर काय अडचण आहे? त्यापैकी एक हिंदी तर बोलता येतेच. आणि दुसरी इंग्रजी शालेय शिक्षणामधे शिकवलेली असते. फक्त ती कशी वापरायची ते समजत नसतं हा मेन प्रॉब्लेम आहे.

खूप चांगली चर्चा, पण 'त्या' तरुणांना या चर्चेचं काय? त्यांच्यासाठि आपण फक्त चर्चाच करु शकतो? Sad

विजय देशमुख वाईट कशाला वाटुन घेताय चर्चा इथे घडली तर. उलट माझ्यासारखे काही वाचकही आपल्या मुलांच्या भविष्यातल्या प्रगतीकडे नीट आणी बारकाईने लक्ष देऊ शकतील की.:स्मित:

मी मराठी माध्यमातच शिकले, पण खरच माझा आत्मविश्वास कमी पडला काही ठिकाणी. मार्केटिंगचे काम केलयं पण तिथे बोलबच्चन असणे किती महत्वाचे आहे ते मला तेव्हा कळले. सुदैवाने ग्राहक मराठी आणी हिंदीच जाणणारे होते. पण संवाद कौश्यल्या अभावी कित्येक वेळा कित्येकांना सेमिनार वगैरे मध्ये भाग घेता येत नाही. आज HR मध्ये या लोकांना ( मुलाखत घेणार्‍यांना ) किती problems येत असतील हे मला कळतेय, कारण माझ्या उणिवा मला माहीत आहेत. आणी जो तुम्हाला सिलेक्ट करतो त्याच्यावरही त्याचा किती ताण असेल हे बेफिकीर यांच्या लिखाणातुन कळतेय.

म्हणून म्हणतेय की तुमच्या सारखे जे लोक सध्या परदेशात नोकरी/ संशोधन वगैरे क्षेत्रात आहेत, आणी जे परत येणार आहेत, त्यांनी पुढे वेळ मिळाला की भारतात जरुर आपल्या लोकांना या प्रशिक्षणात मदत करावी.:स्मित: नाहीतर किमान जे लोक असे सेमिनार आयोजीत करतात, त्यांनाच याचे प्रशिक्षण द्यावे.

टुनटुन :- नक्कीच करणार. मी स्वतः मराठी माध्यामातुन शिकलोय त्यामुळे अडचणींचा सामना करणे आणि त्यातुन मार्ग काढणे, हे नेहमीचेच आहे. त्याच त्याच अडचणी आणि त्यातुन मार्ग शोधण्यात जाणार वेळ वाचावा म्हणुन नेहमीच मी इतराम्ची मदत करतो (सध्या ऑनलाईन) आणि पुर्वीही गेस्ट लेक्चरमधुन केलय. ते मिस करतोय, इतकच...

बाय द वे :- मी हि मार्केटींग केलय... फार काही जमलं नाही पण त्यात भाषेची अडचण नव्हती. तुमचा तुम्हाला दिलेल्या उत्पादनावर विश्वास असणे आवश्यक असते, अन तेच जमलं नाही. Sad

श्री.बेफिकीर यांच्या लेखातील इंग्रजीचे चित्र आणि मुलाखतीसाठी आलेल्या आपल्या तरुणांचा आत्मविश्वास अभाव याचा अभ्यास केल्यानंतर तसेच या अनुषंगाने आलेले अत्यंत सविस्तर प्रतिसाद वाचल्यावर "इंग्रजीचे महत्व" कुणी कमी लेखत नाही हे ठळकपणे जाणवते. किंबहुना इंग्रजीतील संभाषण कौशल्य किती आवश्यक मानले जात आहे याचेच जिवंत उदाहरण म्हणजे हा धागा आणि चर्चा होऊ शकते.

असे दिसत्ये की कॅम्पस इंटरव्ह्यू आणि आय.टी. पुरतेच इंग्रजीचे महत्व अधोरेखीत होत आहे की काय, पण केन्द्र शासनानेही सरकारी नोकरीतील 'मागासवर्गीयांचा अनुशेष भरती मोहीम' राबविताना इंग्रजी भाषा त्या त्या गटातील उमेदवाराने आत्मसात करण्यावर जोर दिल्याचे दिसते. अगदी ताज्या म्हटल्या जाणार्‍या २३ जून २०१३ रोजीच्या No.36038/1(e)/2013-Estt(Res) या क्रमांकाच्या जी.आर. मध्ये शासनाने स्पष्टपणे म्हटले आहे की :

Training programmes for interview skills and English proficiency may also be devised
for reserved category persons for posts requiring non-professional qualifications.

यापूर्वी फक्त त्या त्या पदासाठी असलेल्या शैक्षणिक अर्हतेविषयीचा उल्लेख असायचा; पण बदलत्या वार्‍यानुसार आता सरकार दरबारीही इंग्रजी "प्रोफिशिएन्सी" वर विशेष भर दिला जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा जी.आर. एस.सी. आणि एस.टी. कॅटेगरीतील उमेदवारांसाठी आहे. या पदासाठी [विशेषतः एस.टी. भटक्या विमुक्त जमाती] आवश्यक त्या संख्येचे उमेदवार मिळत नसतानाही केन्द्राने इंग्रजीचा आग्रह धरल्याचे दिसते हे उल्लेखनीय.

अशोक पाटील

कम्युनिकेशन स्किल्स असावेत की नाही? ह्याच उत्तर असावेत हेच येणार.

पण तरीही .. माझ्या जॉब मुळे मला अनेकांचे करीयर घडवणे वा बिघडवणे हे नेहमी करावे लागते. मग तो माणूस फ्रेशर, थोडा अनुभवी वा सिनियर असला तरी. त्यातून आलेले काही अनुभव.

सहसा मी फ्रेशरच्या निवडीस जात नाही. कधी एके काळी गेलो होतो तेवढेच. पण मी असे पाहिले आहे की भारतातील अनेक मोठ्या कंपन्यात जॉब करत असणार्‍यांना देखील इंग्रजी नीट येत नाही. कित्येक जणांचे "अमेरिकेत येणे" हे स्वप्न माझ्या इंटरव्ह्यू मुळे लांबले असेल पण कित्येक जणांना केवळ इंग्रजी येत नाही पण त्याच्यात कमिटमेंट आहे ह्या कारणामुळे देखील मी त्याला बोलावले आहे. बरेचदा माणूस केवळ सवयीने इंग्रजीत रुळतो. अश्या अनेक रॉ लोकांना मी अमेरिकेत बोलावले आहे. शिवाय तो "मराठी" असला तर कधी कधी प्रिफरंसही दिला आहे. जे प्रोफेशनली चुकीचे असू शकते. पण त्याच कॅलिबरचा मराठी व नॉनमराठी असेल तरच त्याच्या इंग्रजी कडे न पाहाता संधी दिली आहे.

अनेक इंटरव्हू असेही पाहिलेत की ( टेलिफोनिक) जे घेताना कोणी वेगळाच उत्तरे देत होता व सिलेक्ट झाल्यावर कोणी वेगळाच आला. ज्याला ओ की ठो ही येत नव्हते. मग त्याला परत काढा वगैरे वगैरे.अनेक जण अनुभव म्हणून खूपसे चुकीचे लिहितात. असे चुकीचे अनुभव लिहिलेले लोकं तर आता सिव्ही वाचून व त्या माणसाच्या चेहर्‍याकडे पाहून कळायला लागले आहे.

ह्या उलट फाडाफाड इंग्रजी पोटात असल्यापासून येणारे लोकं टेक्निकली साउंड असतीलच असे नाही हे मी तिथेच (इंग्रजी वल्ड मध्ये) राहिल्यामुळे सांगेन. Wink

तर सध्यातरी माझे काही रुल्स.

१. मुलाखत देणारा कुठल्या लेवलची मुलाखत देतोय त्याप्रमाणे त्याचे इंग्रजी. (म्हणजे अगदी सिनियर कन्स्लटंट असला तर त्याला निदान सलग ५-६ वाक्ये मध्येच अं अं, च्च च्च की, हां दॅट इज तो, असे न उच्चारता आले तरी तो कम्युनिकेशन मध्ये पास अशी माफक अपेक्षा). शिवाय त्याच्या लिखित सिव्ही वरून त्याचे इंग्रजी लक्षात येते.
२. ज्युनिअरच्या मुलाखती मी घेत नाही पण घेतल्या तर संभाषण कौशल्य गुंडाळून ठेवून केवळ तो किती कॉन्फिडंट आहे ह्यावरून संधी.
३. अमेरिकेत कोणीही जाऊ शकतो म्हणून केवळ विलिंगनेस टू वर्क / लर्न न्यू थिंग्स ह्यावर पूर्वानुभव नसताना देखील संधी.

आय अ‍ॅम शुअर की कोणीतरी मलाही ह्या वरच्या रुल्स मुळेच संधी दिली असणार.

आणि त्याला एकदा हो म्हणल्यावर लगेच त्याला त्याच्या मेल बॉक्स मध्ये त्याला जायला जाऊन "स्पेल चेक" कंपलसरी करायला लावणे हा उद्योग देखील करावा लागतो.

माझ्या प्रोजेक्ट ऑनबोर्डिंगच्या नोटस मध्ये "स्पेल चेक" एक टास्क आहे. Happy

पण अनेकदा नको म्हणावेच लागते.

हे आपलं वरचं उगाच अनुभव कथन करायला. Happy

तमिळनाडूमधेच नोकरी करायची असेल तरी आता संधी मिळत नाही कारण सध्या इथेदेखील एम्प्लॉयर हिंदी येतं का ते बघतो.
>>
अरे वा! तामिळनाडू बदलतंय.

इंग्रजी बोलता येणं व इंट्रव्ह्यूत इंग्रजी बोलता येणं या दोन गोष्टीत फरक असतो. जो इंटरव्ह्यूत फाड फाड इंग्रजी बोलू शकत नाही तो १२वी च्या पेपरात ९५ मार्क्स मिळवतो अन पुढे मेडीकलला एडमिशन घेऊन एम. बी.बी.एस. डॉक्टर बनतो. पण ज्याला इंग्रजीत ५० मार्क्स होते तो मात्र इंट्रर्व्ह्यूत फाड फाड इंग्रजी बोलतो. कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवुन विदेशवारी करुन येतो. हा फरक मी स्वतः अनुभवला आहे.
भाषा ही एक वेगळी कला आहे, त्याचा बुद्धिमत्तेशी संबंध असतोच असे नाही. त्याच बरोबर बुद्धिमान व्यक्तिकडे संवाद कौशल्य असतेच असेही नाही. पण ९५ मार्क्स मिळवायला बुद्धिमत्ता लागते हे मात्र खरे. फाड फाड इंग्रजी न येणे म्हणजे बुद्धिमत्तेचा अभाव असे अजिबात माणू नये. व दर्जेदार इंग्रजी बोलणारा बुद्दिमान असतोच असेही नाही. मी अशा कित्येक लोकाना ओळखतो ज्यांचं इंग्रजी उत्तम आहे पण बुद्धिमत्तेच्या बाबतित माठ आहेत. अन कित्येक इंजिनिअर्स् व प्रक्टिसिंग डॉक्टर्सना ओळखतो त्यांचं इंग्रजी आजही यथातथाच आहे... पण त्यांची बुद्दिमत्ता मात्र अजोड आहे. या बुद्धिमान लोकांचं रिटन इंग्रजीत आपणही हात धरु शकणार नाही. पण जेंव्हा फाड फाड बोलण्याची वेड येते तेंव्हा मुळातच भाषा कौशल्याचा अभाव असणारे असल्याने कसंबसं बोलतात.
--------
उदा. कुठल्याही मल्टिनॅशनल कंपनीत जा. तिथली रिसेप्शनिस्ट उत्तम इंग्रजी बोलते, बुद्धिमत्ता काय? अगदी याच्या उलट चित्र इंजिनिअर्स लोकांच. माझ्या कंपनित तर संवाद कौशल्याचा एक डिपार्टमेंटच आहे. अगदी पट्टीचे इंजिनिअर्स दर शनिवारी आमच्या अंतर्गत शिकवणीत येऊन इंग्रजीचे धडे घेत असतात. एवढ्या मोठ्या कंपनीत काम करणा-या या इंजिनिअर्सची इंग्रजी ऐकुन मी तर थक्क होतो... पण ते त्यांच्या कामात निपून आहेत. त्याचा भाषेशी काही संबंध नाही.

लालशाह ह्यांचा मुद्दा पटला पण एंट्री लेव्हलला इंग्रजी न येणे हा अडसरच आहे आजच्या घडीला.

अनेक मल्टीनॅशनल कंपन्या जिथे डे इन डे आउट आपापल्या प्रिंसीपल कंपनीशी डील करत असतात ह्यात अगदी रीसेप्शनिस्ट ते सी ई ओ ह्या लेवलचे लोक संभाषणात इन्व्हॉल्व्ह असतात. बर्‍याच कंपन्यांचा कस्टमर बेस फॉरीनला असतो त्यामुळे बघतानाच असे लोक सिलेक्ट करण्याचे प्रमाण हल्ली वाढलेले आहे हेही खरे आहे.

इंग्रजी न आलेले चालेल असे म्हणणे कुणाचेच दिसत नाही.
पण इंग्रजी हाच मुख्य मुद्दा, मुख्य दडपण होऊन विषय समजलेला असणे, विषयाच्या असलेल्या ज्ञानाचा उपयोग करता येणे, कुठल्याही मुद्द्याचा विविध बाजूंनी विचार करता येणे या गोष्टींकडे दुर्लक्ष किंवा या गोष्टींना दुय्यम स्थान येता कामा नये असे अनेकांचे म्हणणे असावे असे वाटतेय.
मीही या मुद्द्याशी सहमत आहे. (कोणी विचारलंय का? ते तर आहेच पण तरी!)

या बुद्धिमान लोकांचं रिटन इंग्रजीत आपणही हात धरु शकणार नाही. पण जेंव्हा फाड फाड बोलण्याची वेळ येते तेंव्हा मुळातच भाषा कौशल्याचा अभाव असणारे हे कसंबसं बोलतात.>>>

हे पचायला थो...डं जड जात आहे मला. कारण असे असल्यास केवळ 'आत्मविश्वासाचा अभाव' ही एकच बाब आड येऊ शकते.

हे पचायला थो...डं जड जात आहे मला. कारण असे असल्यास केवळ 'आत्मविश्वासाचा अभाव' ही एकच बाब आड येऊ शकते.>> तसही असेल म्हणा. कारण बोलण्यासाठी आत्मविश्वास लागतोच. त्यातल्या त्यात पुढच्या माणसाचा दबाव पडला की आत्मविश्वास पसार होतो. मग तोंडातुन शब्द फुटत नाही.

फाडफाड इंग्रजीपेक्षा समोरच्याला सहज समजेल अशी भाषा महत्त्वाची. थोडं विषयांतर होईल, पण मी ओशोंचे २-३ पुस्तकं वाचली आणि काही व्हिडिओ बघितले. तत्वज्ञान/ ध्यान यांचेशी संबंधीत तांत्रिक शब्द वगळता फारसे काही शब्द अगम्य नव्हते. (हे मी ११वीला असताना वाचलेली पुस्तके).

माझं एक आवडतं वाक्य (विशेषतः इंग्रजीसाठी) :- समोरच्याला (जगातील कोणत्याही देशातील व्यक्ती) तुमचं म्हणणं समजणे, म्हणजे तुमचं संवाद कौशल्य चांगलं आहे, तर समोरच्याच म्हणणं तुम्हाला समजणं, (मग तो कोणत्याही देशाचा असो) म्हणजे तुमचं इंग्रजी भाषेचं श्रवणकौशल्य चांगलं आहे.

बहुदा IELTS मध्ये हीच संकल्पना वापरली आहे. चुभुद्याघ्या.

केदार यांचा प्रतिसाद छान आहे.
"माझ्या प्रोजेक्ट ऑनबोर्डिंगच्या नोटस मध्ये "स्पेल चेक" एक टास्क आहे. "
<<
'एसेमेस इंग्लिश' लिहिण्याची सवय मोडायला लावणे असा एक कठीण प्रकार त्यात येतो. दुसरे म्हणजे कॅपिटलायझेशन. वर्ड वगैरेमधे आपोआप होत असले, तरी i u r ची सवय लवकर जात नाही. स्पेलचेक करूनही there अन their मधला फरक न समजणारे महाभाग आहेतच.
*
विदिपा,
हे पचायला थो...डं जड जात आहे मला. <<
अजिबात नाही.
१०-१२ वर्षे यशस्वी व उत्तम प्रॅक्टिस केलेल्या व्यक्तीला कॉन्फरन्स पेपर प्रेझेंट करण्याची वेळ आली तेव्हा किती प्रचण्ड तंतरली होती, ते आठवले. अनोळखी वातावरणात गेल्यावर माणूस बोलायला बुजतो हेच खरे. वास्तविक या डॉक्टरांचे आपसात बोलतानाचे इंग्रजी छान आहे, इंग्रजी माध्यमातले शिक्षण आहे. केलेल्या उत्तम संशोधनपर कार्यासाठी यांना कॉन्फरन्समधे आमंत्रित गेस्ट फॅकल्टी म्हणून प्रेझेंटेशन द्यायचे होते. तरीही भीती!
म्हटलं यार, तिथे तुला भाषण द्यायला बोलावलं आहे, याचा अर्थ समोर बसलेल्यांपेक्षा तुला जास्त येतं हे आधी स्वत:शी घोक. मग जमेल. Wink

अनोळखी वातावरणात गेल्यावर माणूस बोलायला बुजतो हेच खरे.>>>

मीही तेच म्हणतोय इब्लिस, बुजणे म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव. Happy

याच्या उलटही परिस्थिती असू शकते. कम्युनिकेशन पुरतं, मुद्दा समजावून देण्यापुरतं अगदी शिकवण्यापुरतंही इंग्लिश व्यवस्थित असलं तरी पेपर लिहिणे, कामकाजाची पत्रे लिहिणे वगैरेंमधे वाट लागते.

मीही तेच म्हणतोय इब्लिस, बुजणे म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव.
<<
होय विदिपा. पण माझे म्हणणे थोऽडे वेगळे होते. (व लालशहा यांनाही हेच म्हणायचे असावे असे गृहित)
बोलायला घाबरतो, याचा अर्थ लिहिण्याचा आत्मविश्वास नाही असे होत नाही, असे म्हणत होतो. आत्मविश्वास एका बाबतीत आहे म्हणजे तो सगळीकडेच तितकाच वापरला जाईल असे नसते.
अन तो अमुक ठिकाणी कमी पडतो तर कसा वाढवता येईल याबद्दलचेच बोलणे आपण करीत आहोत. Happy

बोली भाषा ही लिखीत व वाचीक भाषेपेक्षा वेगळी असते. लिहीताना ज्या गोष्तींचे भान ठेवायचे ते बोलताना ठेवावे लागतेच असे नाही. इडिअम्स, लहेजा, कोंटेक्स्ट, अ‍ॅक्सेंट, शब्दसंग्रह असे अनेक आयाम बोली भाषेला असतात. माझ्या मते बोली भाषा हा पर्फोर्मन्स असतो. फक्त भाषेचे ग्रामर शिकले खुप वाचले म्हणुन उत्तम बोलताही येईल हा समज अतिशयच चुकिचा आहे. बोली भाषा सतत कानावर पडणे महत्वाच असते. असे इमर्शन नसेल तर बोली भाषा व्यवस्तीत आत्मसात होऊ शकत नाही. ग्रामीण / मराठी वातावरणात वाढलेल्या मुलांचा (अस्मादीक इन्क्लुडेड) हाच मोठा प्रोब्लेम असतो. एकदा हे इमर्शन मिळाले की बोली भाषा झटपट आत्मसात होते.

कम्युनिकेशन बर्‍याच प्रकारचे असते देशात फक्त भाषीक कम्युनिकेशनवरच भर दिला जातो. समोरच्या व्यक्ती अनेक प्रकारे "व्यक्त" होत असतो. माझ्या मते बर्‍याच इंटर्व्हीव घेणार्‍यांनाच आधी "ऐकावे" कसे आणि काय ह्याचे शिक्षाण द्याय्ची गरज असते. मला ज्या माध्यमात समजते त्यात तुला व्यक्त होता आले नाही तर तुच बावळट आहेस असा एक हास्यास्पद समज सार्वत्रीक दिसतो.

इंग्रजी येणे न येणे हा त्यातलाच एक भाग. तुमचे काम (अत्ता पर्यंत केलेले) तुमच्या बद्दल खुप बोलते. माझ्या मते त्यावर लक्ष देणे महत्वाचे. मग तुम्हाला इंग्रजी फक्त नावाला येत असेल तरी कडिचाही फरक पडत नाही निदान टेक सेक्टर मधेतरी. अर्थात ज्या कामात हुमन टरॅक्शन जास्त व कामाचा अविभाग्य भाग असते त्या ठिकाणी त्या मानवसमुहाची भाषा उत्तम येणे गरजेचे असते.

देशातील आयटि कंपन्यांचे महत्वाचे क्लायंट्स हे इंग्लिश स्पिकिंग असल्याने इंग्रजी येणे गरजेचे होते. भारतातील बड्या व्यवसायांची कम्युनिकेशन भाषा इंग्रजी असल्याने ती येणे मह्त्वाचे होते. पण देशातील सिक्षण पद्धती स्क्रिझ्प्प्रेनिक आहे. इंग्रजी का स्थानिक भाषा ह्या वादात ना धड ही ना ती अशीच अवस्था आहे.

माझ्याही मते प्राधान्यक्रमाप्रमाणे अग्रक्रम (टॉप प्रायोरिटी) आणि महत्त्वानुसार ६० ते ८०% वेटेज हे, आपल्याला जे काम करायचे आहे त्या कामाविषयी पुरेसे ज्ञान प्राप्त करणे आणि शिकलेल्या गोष्टींचा वापर करता येणे ह्या दोन गोष्टींना असले पाहिजे.

आपल्याला काम येते आहे / विषयात गती आहे आणि ते मुलाखती दरम्यान प्रकटही करता येते आहे ही सर्वात उत्तम गोष्ट. (पण अर्थातच दुर्मीळ कॉम्बिनेशन)

करीयरच्या सुरुवातीच्या टप्प्यामधे, (दाखवण्याजोगे काम नसल्यामुळे) आपण जे शिकलो आहोत त्याची पातळी दाखवण्यासाठी स्वतःचे मार्केटिंग करता येणे हे आवश्यक झाले आहे. ह्या टप्प्यावर जी मुले मुलाखती दरम्यान बोलण्याच्या जोरावर आपली छाप पाडू शकतात ते चांगल्या कंपन्यांमधून चटकन निवडले गेल्यामुळे पुढे गेले असा (तात्कालिक) आभास होऊ शकतो. नंतरच्या काळात असे आढळू शकते की ही मुले मुलाखतीमधे ज्या प्रमाणात एम्प्लॉयेबल वाटली होती तितकी प्रत्यक्ष कामाच्या वेळी वाटत नाहीयेत. या उलट जी मुले नीट बोलू शकली नव्ह्ती (आणि म्हणून प्रथम श्रेणीच्या कंपन्यांमधे निवडली गेली नव्हती) ती नंतरच्या काळात काही एक अनुभव प्राप्त केल्यावर, चांगले काम केल्यामुळे, त्यांचे काम बघितलेल्या वरिष्ठांच्या शिफारसीमुळे (चांगल्या अर्थाने), मुलाखतीदरम्यान फारशी चमक न दाखवता आली तरीही निवडली जातात.

सध्याच्या काळात चांगली कामे करणारी माणसे (क्वालिफिकेशन आणि सॉफ्टस्किल्स ह्या क्रायटेरियांनुसार पदांसाठी सुयोग्य अशी) मिळवणे व ती टिकवणे हे दुरापास्त होत चालले आहे. त्यामुळे काही एक अनुभव मिळाल्यानंतर चांगली कामे / नोकर्‍या मिळवणे हे केवळ आणि केवळ आपल्या कामातल्या पारंगततेवरच शक्य होते.

समोरच्या व्यक्ती अनेक प्रकारे "व्यक्त" होत असतो. माझ्या मते बर्‍याच इंटर्व्हीव घेणार्‍यांनाच आधी "ऐकावे" कसे आणि काय ह्याचे शिक्षण द्याय्ची गरज असते.>>>> एकदम योग्य मुद्दा

चर्चा अगदी ओळ-न-ओळ वाचली नाही, पण बर्‍यापैकी चाळली. नंदिनी, केदार, हर्पेन आणि पेशवे यांच्या पोस्ट्स आवडल्या.

थोडीशी टॅन्जन्ट पोस्ट टाकते आहे.
भारतात नम्रता आणि अजिजी यातली सीमारेषा फार पुसट आहे असं एक माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. हे केवळ प्रोफेशनल क्षेत्रांतच नव्हे, एकूण फिलॉसॉफीच म्हणते आहे. अध्यात्म असू दे किंवा नातेसंबंध किंवा आणखी काही. मानसिक बरोबरी हा प्रकार क्वचितच बघा/अनुभवायला मिळतो. देवळात आपल्याच थोबाडीत मारून घेणारी भक्तमंडळी पाहिली असतील तर मी काय म्हणते ते ध्यानात येईल.

दुसरं - आणि कदाचित त्याचंच एक्स्टेन्शन - मुलाखत 'घेणं' हीसुद्धा एक कला आहे हा वर आलेला मुद्दा. हा अनुभव मी इथेही देशी(एशियन)च लोकांच्या बाबतीत घेतला आहे. उमेदवाराला नाउमेद करणं हाच अजेन्डा असल्यासारखे वागतात. का माहीत नाही. (माझ्या सासूने मला छळलं तेव्हा मी माझ्या सुनेला छळणार असा काही प्रकार?) असा अनुभव अमेरिकन / युरोपियन लोकांचा नाही मला तरी. या जागेसाठी तुमचा स्किलसेट मॅच होत नाही म्हणणं is an entirely different story. पण त्यासाठी ह्यूमिलिएटिंग वागणं हे कोणत्या एथिक्समधे बसतं? मुळात 'रिजेक्शन' या शब्दापासूनच सुरुवात होते. रिजेक्ट झालं म्हटलं की - मग ते नोकरीसाठी असो वा लग्नासाठी - एकदम पंक्चरतोच नकार घेणारा माणूस! काय आवश्यकता तसं करायची? रिस्पेक्टफुली नाही म्हणता येतंच की. समोरच्या माणसाला काय येतंय हे बघायला बसला आहात की काय येत नाहीये हे?

समोरच्या माणसाला काय येतंय हे बघायला बसला आहात की काय येत नाहीये हे?>> ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन. आपण ह्याच प्रोसेस मधून गेलो असल्याने संधी मिळाली की त्याचा वचपा काढला जाणारे अनेक आहेत. फार थोडे लोक कामाची गरज आणि त्यानुसार पात्रता किती हे बघतात. असाच प्रकार रागिंग झालेल्या मुलांच्यात पहिला आहे. फर्स्ट ईयरचा नवा कोरा बकरा कसा मी त्याला कच्चा खातो आणि माझ्यावर जे जे झाले ते ते मी त्याच्यावर करीनच कसा असे विचार येतात. सुरावातुच्या बऱ्याच मुलाखतीत हाच प्रकार करणारे कलिग पहिले आहेत.

आत्तापर्यंतच्या लेख/प्रतिसादांवरुन असं जाणवतंय कि, देशातील कँपस इंटरव्ह्युज हा एक खोगीरभरतीचाच प्रकार आहे. दहा पैकी आठ आयटम चेक झाले तर इन, अदरवाइज आउट. कोणी विचारतं का उमेदवाराला - त्याला हाच जॉब का हवा? हेच फिल्ड का हवं? त्याला का सिलेक्ट केलं जावं?

हॅज एनी इंटरव्ह्युअर बीन ब्लोन अवे विथ अ‍ॅन अ‍ॅस्टोनिशिंग, आउट्-ऑफ्-द्-बॉक्स रिस्पाँस?

टॅलंट हॅज नो बाउंडरी, नो लँग्वेज. इन माय हंबल ओपिनियन, अ‍ॅट होम कँपस रिक्रुट्स आर नॉट अ‍ॅडिक्वेट्ली चॅलेंज्ड. अँड द ओनस इज ऑन रिक्रुटर्स...

इंग्रजी येणे न येणे हा त्यातलाच एक भाग. तुमचे काम (अत्ता पर्यंत केलेले) तुमच्या बद्दल खुप बोलते. माझ्या मते त्यावर लक्ष देणे महत्वाचे. मग तुम्हाला इंग्रजी फक्त नावाला येत असेल तरी कडिचाही फरक पडत नाही निदान टेक सेक्टर मधेतरी. अर्थात ज्या कामात हुमन टरॅक्शन जास्त व कामाचा अविभाग्य भाग असते त्या ठिकाणी त्या मानवसमुहाची भाषा उत्तम येणे गरजेचे असते. >>>>> +१ चांगली पोस्ट पेशवे.

राज, देशात फार कमी ठिकाणी आपण वर व्यक्त केले विचार करणारे लोक इंटरव्ह्युअर आणि मुख्य म्हणजे रिक्रुट्रस असतात. मुदलात हे असे असायला पाहिजेल हाच विचार करण्याची तयारी नसते. अगदी नावाजलेल्या एमएनसी मध्ये पण असेच क्रायटेरिया अनुभवलेले आहेत. एखादा डायरेक्टर विचार करतो आणि बदल घडवतो पण तो हलला की पहिले पाढे पंचावन्न.

दोन-चार दिवस ही चर्चा वाचतोय... आज लिहायला वेळ मिळाला!

"योग्य त्या वेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळणे ही सर्वात मोठी ग्रामीण भागात रहाण्यातली अनुपलब्धि आहे" आणि "खेळाचे नियम जगजाहीर असताना त्या दृष्टीने तयारी न करणाऱ्यांबद्धल मला केवळ सहानुभूतीच वाटे" या दोन्ही टिपणी पटल्या

पण होते काय की आपण खेळाच्या तयारीत कच्चे पडतोय ही अक्कल येण्यासाठी अश्या एक-दोन मॅच हराव्या लागतात आणि त्या हरल्यानंतर जे अनुभवाने शहाणपण शिकतात किंवा योग्य मार्गदर्शन मिळवतात ते नक्कीच सावरतात... यशस्वी होतात!

मुळात हे अर्धविकसित भागातुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुलनेने जास्त का घडते?
पूर्णपणे मराठी माध्यमातुन शाळा आणि पेपर लिहण्यापुरत्या इंग्रजीतुन अकरावी-बारावी करुन जेंव्हा हे विद्यार्थी उच्चा शिक्षणासाठी शहरात येतात तेंव्हा ते सर्वात आधी आपले गाववाले शोधतात... कट्ट्यांवर रंगणार्‍या विंबल्डन- फ्रेंच ओपनच्या चर्चा, फ्रेंड्सच्या एपिसोडसचे किस्से किंवा इंग्रजी नॉव्हेल्सच्या चर्चा या सगळ्यात काय बोलायचे हे न कळून गड्या आपुला गाववाला बरा अश्या विचाराने हे मित्र शोधायला लागतात त्यांच्याबरोबरच रुम्स शेअर करतात ... मग बर्‍याचदा तो गाववाला मित्र त्याच्या प्रॅक्टिकल बॅचचा नसतो, किंवा त्याच्या वर्गातला/कॉलेजातला नसतो.... कधीकधी तर त्याच्या स्ट्रीममधला पण नसतो
मग हे असे लोक वर्गात, कॉलेजमध्ये रमत नाहीत कधी एकदा रुमवर जातो आणि तालुक्यातल्या राजकारणावरच्या गप्पांचा फड रंगवतो असे त्याला होउन जाते!
पर्यायाने ते प्रवाहपासुन तुटत जातात.... भुतकाळात जगतात.... जरा दोन दिवस सुट्टी आले की गावाकडे पळतात.... तिकडे मिरवतात आणि शहरात आल्यावर परत बुजुन जातात..... एकुणच मागे पडतात!
अतिशयोक्ती नाही पण धायरीत राहुन पिंपरीला कॉलेजला जाणारे लोक्स मी बघितलेत.... का? तर त्याचे दोस्त धायरीत राहतात.... असली दुनियादारी!

अश्यावेळी त्याच क्षेत्रातला चांगला सिनिअर मिळणे फार गरजेचे असते.... आपल्याला पुढे जाउन काय करायचेय, त्या क्षेत्रातली आव्हाने काय आहेत... आपण कश्यात कमी पडतोय हे कळायला आणि वळायलासुद्धा लागते

Pages