राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचकहो,

मुलाला मुलगा झाला की वानप्रस्थाला निघावे असा संकेत होता. पेशवाईच्या वेळेस नक्की होता का ते माहित नाही. मात्र असावा असं गृहीत धरल्यास सरासरी आयुर्मानाचा अंदाज लावता येईल.

त्याकाळी लग्ने लवकर होत असत. माझ्या एका मित्राचे आजोबा १७ व्या वर्षी बाप झाले. या न्यायाने पस्तीशीत बाप्येलोक आजोबा होत असावेत.

तर मग तिशीनंतरचा प्रत्येक दिवस अधिलाभ (=बोनस) धरायला पाहिजे. तेच सरासरी आयुर्मान असावे.

हा केवळ तर्क आहे.

आ.न.,
-गा.पै.

अशोक.,
तुम्ही खूप छान लिहीत आहात.
इतिहासाची फारशी आवड नसतानाही मी कुतुहलपोटी हा धागा उघडला.
आणि वाचून अतिशय कौतुक वाटले तुमचे. त्यासाठी धन्यवाद.
तुमची लेखनशैली खुपच छान आहे , वाचताना रटाळ वाटले नाही.
'बेफिकिर' व 'स्वाती आंबोळे' यांच्या प्रतिसादाला संपूर्ण अनुमोदन.
अजून असेच लेख येऊ देत. एक लेखमालिकाच कराल का ?

अतिशय सुंदर, संयमित लेखन! Happy

अशोकजी, फार फार धन्यवाद आणि भरपूर शुभेच्छा!
आपले लिखाण आवर्जून वाचतो. असेच लिहित रहा...

अशोक पाटील, आपला हा लेख फार सुरेख आहे आणि त्यावर होणारी साधकबाधक चर्चादेखील. आपण ज्या कागदपत्रातून या इतिहासाचा अभ्यास करता आहात त्याला रंजकतेची कोणतीही किनार न जोडता मांडत गेलात तर आमच्यासारख्या वाचकांसाठी ती मेजवानीच ठरणार आहे. कारण सत्य हे कटू असलं तरी पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
भविष्यातल्या चुका टाळण्यासाठीच इतिहास चाळायचा असतो. पण तो शक्यतो खरा असला तरच. धुसर चष्म्यांच्या काचातून मांडला गेलेला इतिहास वर्तमानाची दिशाभूल करू शकतो.
आपल्या या उपक्रमाबद्दल आपले अभिनंदन. आपल्यासारख्या तटस्थ विचारी व्यक्तीकडून पेशवाईवर योग्य प्रकाश पडेल असे निसंकोच येथे नमूद करावेसे वाटते.

आनंदवल्ली, नाशिकला आनंदीबाईंच्या गढीचे ठिकाण आता शेवटची घटका मोजत आहे. आधी या ठिकाणाचा उपयोग आजुबाजूच्या वस्तीतील लोकांकडून प्रातर्विधीसाठी केला जात असे. नंतर ती जागा बिल्डरने बळकावण्याचा प्रयत्न केला. दिड वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने गढीच्या जागेवर बिनशेतीची परवानगी तर नाशिक महापालिकेने तात्पुरत्या बांधकामास परवानगी दिली. अजून तरी गढीचं थोडं बांधकाम शिल्लक दिसतं. काही दिवसांनी त्यालाही पूर्णविराम असेल.. असो. थोडे विषयांतर झाले. क्षमस्व.

खरेच यातली बरीचशी माहिती नव्याने कळाली.
आपली लेखन शैली उत्कृष्ट आणि विषय रोचक असा समसमासंयोग जुळून आला आहे.
अजून खूप लिहा. जाती-पातीच्या वा त्यातील वर्चस्ववादाच्या उल्लेखामुळे इथे वाद निर्माण होतील याच्या आशंकेने ती माहीती कृपया टाळू नका. .....आम्हाला वाचायचे आहे.

हेम ~ नाशिकच्या फिरतीवर असताना मी जाणीवपूर्वक आनंदवल्लीचा हा भाग [विशेषतः 'नवश्या गणेश मंदिर' परिसर] मी पाहिलेला आहे. अर्थात माझी भटकंती १९९४-९५ मधील होती आणि त्यावेळी बांधकामाच्या दृष्टीने सर्व काही ठीकठाक दिसत होते. पण 'कालाय तस्मे नमः" च्या चालीवर बोलायचे झाल्यास झपाट्याने होत असलेल्या राज्याच्या सर्वच जिल्ह्यांतील तालुकापातळीवरील गावांचे 'शहरीकरण' मुळे अशा जुन्या वास्तू, गढी जमीनदोस्त होण्याचे पाहणे आपल्या हाती शिल्लक राहिले आहे. केवळ नाशिकच नव्हे तर इकडे प.महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली अशा 'ऐतिहासिक' महत्वाच्या गावी वसलेली वाडा-संस्कृतीही रस्ता रुंदीकरण नावाखाली नामशेष होत चालल्याचे आम्ही पाहात आहोत.

त्यातही 'आनंदीबाई' ह्या सर्वमान्य 'खलनायिका' असल्याने त्यांच्या नावाशी निगडित असलेल्या वस्तू वा वास्तू यांची विचारपूस करणेही व्यर्थ व्याप मानला जाण्याची शक्यता गृहित धरलेली असतेच.

[दुसर्‍या बाजीरावांसमवेत झालेल्या युद्धादरम्यान ब्रिटिशांनीही आनंदवल्लीवर हल्ला केला होता व त्या जागेची बरीचशी नासधूस केली होती, मात्र त्यानी 'नवश्या गणेशा' ला हात लावला नसल्याचे दप्तर सांगते. मला वाटते आजही हे देवस्थान मंदिर तिथे आहेच.]

अशोक पाटील

अशोकदा.. मंगळवारपासून आंतरजालावर नव्हतो. परतीच्या प्रवासात होतो. कालचा दिवस सुद्धा बऱ्यापैकी आराम करण्यातच गेला.

सर्वप्रथम इतक्या सोप्या पद्धतीने पेशवेकालीन स्त्रिया या विषयावर सुरेख लिखाण केल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद.. Happy मी अजून सर्व प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत त्यामुळे वाचून झाल्यावर पुन्हापुन्हा येऊन प्रतिक्रिया देईनच.

मासाहेब जिजामाता, शिवरायांच्या अष्टशिवराज्ञी म्हणजे सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, सगुणा, गुणवंतीबाई आणि सकवारबाई, तसेच खास करुन येसूबाई आणि ताराबाई यांच्याबद्दल देखील असेच लिखाण करावे असे मनी आले आहे. ते यथाशक्ती लिहायचा प्रयत्न करीनच. Happy

मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?
>>>> ह्याबद्दल थोडी माहिती खाली देत आहे.

१.

छत्रपती शिवाजी आणि महाराणी सईबाई (लग्न १६४० ) यांना सकवारबाई उर्फ सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई ह्या ३ मुली आणि युवराज संभाजी अशी एकूण ४ अपत्ये होती.

सकवारबाई उर्फ सखुबाई - जन्म : १६५१, महादजी बजाजी निंबाळकर (फलटण) यांच्याशी १६५७ मध्ये लग्न. यांचे दोन्ही मुलगे रावरंभा आणि जानोजी हे पुढे निजामाला सामील झाले.

राणूबाई - जन्म : १६५३. अचलोजी जाधव यांच्याशी लग्न (अंदाजे १६५९ मध्ये)

अंबिकाबाई - जन्म : १६५५. हरजी महाडिक यांच्याशी लग्न (तारळे) (अंदाजे १६६६ मध्ये) मृत्यू : २०-९-१६८९

संभाजी राजे - जन्म : पुरंदर येथे १४-५-१६५६. लग्न शृंगारपूर येथील पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसूबाई यांच्याशी. (संभाजी आणि येसूबाई यांच्याबद्दल अधिक लिखाण पुढे येईलच.)
मंचकारोहण / राज्यारोहण : २०-७-१६८०
राज्याभिषेक : १६-१-१६८१ किल्ले रायगड. मराठ्यांचे दुसरे छत्रपती.
बलिदान दिवस : ११-३-१६८९ (वढू). फाल्गुन अमावस्या.

क्रमश...

२.
छत्रपती शिवाजी आणि सगुणाबाई शिर्के. (लग्न १६४१) यांना राजकुवरबाई उर्फ नानीबाई ह्या नावाची मुलगी होती. तिचे लग्न माळे, दाभोळ येथील गणोजी शिर्के यांच्याशी झाले होते. संभाजी राजांना पकडून देणारे गणोजी शिर्के वेगळे हे वेगळे.. Happy

३.
छत्रपती शिवाजी आणि सोयराबाई संभाजी मोहिते. (लग्न एप्रिल १६५०) बाळाबाई उर्फ दिपाबाई आणि राजाराम अशी २ अपत्ये.
दिपाबाई यांचे लग्न विश्वासराव यांच्याबरोबर झाले होते. ते कुठल्या घराण्याचे, लग्न कधी झाले याबद्दल अधिक माहिती मिळत नाही.

राजे राजाराम - जन्म :२४-२-१६७० (काल बरोबर ३४२ वर्षे झाली) मराठ्यांचे तिसरे छत्रपती.
राज्यारोहण : ९-२-१६८९ (संभाजी राजांना कैदेत पडून अवघे ८ दिवस होत नाहीत तो राजारामांचा राज्यारोहण सोहळा उरकून घेतला गेला.)
लग्न: ताराबाई हंसाजी (उर्फ हंबीरराव) मोहिते यांच्याबरोबर.
मृत्यू : २-३-१७०० किल्ले सिंहगड.

राजाराम आणि ताराबाई यांच्याबद्दल अधिक माहिती पुढे येईलच.

४.
छत्रपती शिवाजी आणि पुतळाबाई पालकर (लग्न १६५३) यांना कुठलेही अपत्य नव्हते. सईबाई यांच्या निधानंतर पुतळाबाई यांनी संभाजी राजांवर पुत्रवत प्रेम केले होते. राजांच्या निधनानंतर त्या संभाजीराजांची भेट होईपर्यंत सती गेल्या नव्हत्या.

५.
छत्रपती शिवाजी आणि लक्ष्मीबाई विचारे (लग्न १६५६) यांना देखील अपत्यप्राप्ती नव्हती.

६.
छत्रपती शिवाजी आणि सकवारबाई गायकवाड (लग्न १०-१-१६५७) यांना कमलजाबाई या नावाची मुलगी होती. तिचे लग्न पुढे पालकर घराण्यात जानोजी पालकर यांच्याबरोबर लावण्यात आले.

७.
छत्रपती शिवाजी आणि काशीबाई जाधव (लग्न ८-४-१६५७) यांना देखील अपत्यप्राप्ती नव्हती. काशीबाईचा मृत्यू १६-३-१६७४ म्हणजे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३ महिने आधी झाला.

८ .
छत्रपती शिवाजी आणि गुणवंताबाई इंगळे (लग्न १५-४-१६५७) यांना देखील अपत्यप्राप्ती नव्हती.

लक्ष्यात घेतले तर राजांनी शेवटची ४ लग्ने अवघ्या वर्षभरात केली आहेत. त्यातील शेवटची ३ तर ४ महिन्यात आणि शेवटची २ तर एका आठवड्याच्या अंतराने. १६५६ नंतर राजांनी जावळी मारून आघाडी घेतली आणि जे राजकारण पुढे आणले हा त्याचाच एक भाग अस अंदाज करता येतो. विविध घराण्यांशी सोयरिक करून त्यांनी आपले पद अधिक मजबूत केले हे निश्चित.

पुढे येसूबाई आणि ताराबाई यांच्याबद्दल अधिक लिहितो... खरेतर त्यांच्यावर एक स्वतंत्र धागाच हवा.. Happy

सेनापती, चांगली माहिती. वेगळ्या धाग्याबद्दल अनुमोदन. पण त्यात वरच्या तुझ्या सर्व पोस्ट एकत्र करून लिहील्यास तर बरे होईल - प्रत्येकीबद्दल अजून माहिती असेल तर ती ही आवडेल वाचायला. तसेच शिवाजी महाराजांचे भाऊ/त्यांच्या बायका तसेच महाराजांना बहिणी होत्या का, असल्यास त्यांच्याबद्दलही.

फारएण्ड... शिवाजी महाराजांचे भाऊ/त्यांच्या बायका >>>> नक्की लिहितो त्यावर. Happy

भोसले घराण्याची वंशावळ असा एक धागाच काढतो.. Happy

सेनापती, अशोकजी तुमच्या अश्या ईतिहासावरील अप्रतिम लेखांमुळे आमची पण उत्सुकता वाढीला लागलेय. अर्थात आम्हाला पण खात्री आहे तुम्ही तितक्याच आपुलकीने आमचे शंकानिरसन करणार. तुम्ही लिहित राहा आम्ही वाचतोच आहोत. (ईथे 'आम्ही' हा शब्द येथील सर्व ईतिहासप्रेमी वाचक ह्या दृष्टीने वापरला आहे. Happy )

अशोकजी:

खूप दिवसांनी मायबोलीवर एक अतिशय उत्कृष्ट लिखाण (प्रतिसाद included) वाचायला मिळाल. एका वेगळ्याच जगात घेउन गेल्याबद्दल मनापासून आभार!

अत्यंत माहितीपुर्ण लेख व प्रतिसाद.
खुप वेळ काढुन हे वाचायचे होते ते आज जमले.

अशोक, तुम्ही लेखात रमाबाईंबद्दल खुप हळवे लिहिले आहे त्याबद्दल अधिक वाचायला आवडेल. कारण तुमच्या नंतरच्या रमाबाईंबद्दलच्या सविस्तर प्रतिसादात 'त्यांचे पतीबरोबर जे तरल नाते समोर येते ते खरे असण्यापेक्षा लेखकाचे विचारस्वातंत्र्य आहे' असे लिहिले आहेत.

सेनापती, धन्यवाद. भोसलेघराणे ह्या धाग्याची वाट पहात आहे.

सुनिधी ~ मनःपूर्वक धन्यवाद.

"रमा"
एक स्त्री या नात्याने तुम्ही हे जाणू शकाल की एका विशिष्ट वयात - विशेषतः हायस्कूल कॉलेजच्या वयात - आपण खूप स्वप्नील असतो, तारुण्याच्या अंगणात नुकतेच पाऊल टाकलेले असते, बालकवी, महानोर यांची कविता भावते, पण सुर्वे, मर्ढेकर, ढसाळ दूरच असलेले बरे असा समज करून घेतलेला असतो, नवनवीन क्षितिजे आपल्यापुढे आव्हान घेऊन उभे ठाकणार आहेत याची कुठेतरी जाणीव करून देणारे ज्येष्ठ येताजाता टपली मारीत असले तरीही आपला भावूक स्वभाव अशी काही हृदय हेलावणारी स्थाने शोधत असतो की त्या जागेच्या वा त्या जागेत वावरणार्‍या व्यक्तिमत्वाच्या प्रेमातच आपण पडतो.

'रमा' ही एक अशी स्त्री [वास्तवात ती मुलगी होती, पण ज्यावेळी तुम्ही 'स्वामी' हाती घेता त्यावेळी ती समोर येते ती एक 'संसारी' बाई म्हणूनच, त्यातही "पेशवीण" या आदराच्या नात्याने. शिवाय देसाई यानी तिच्या संदर्भात मोठ्या कल्पकतेने केलेली विशेषणांची खैरात. पुढे टीव्हीच्या जमान्यात आल्यावर मृणाल कुलकर्णी याना 'रमे'च्या भूमिकेत पाहिल्यावर हुबेहूब रमा आपल्यासमोर अशी काही येते की, तिथे दुसरी एखादी व्यक्ती प्रवेश करूच शकत नाही. हे विवेचन अशासाठी की, इतकी सुंदर व्यक्तिमत्वाची, सरळ आणि सात्विक स्वभावाची मुद्रा 'सती' जाते, म्हटल्यावर अगदी दगडालाही पाझर फुटू शकतो आणि आपण तर हाडामांसाची जिवंत माणसे. त्यामुळे त्या घटनेला आज २५० वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असली तरी महाराष्ट्रीयन मनातून "रमा" जात नाही, म्हणून तिच्या आठवणीने आपण हळवे होणे हे नैसर्गिक.

पण आता 'इतिहासा' चा चष्मा, अन तोही रोखठोक फोकल लेन्सेसचा, घालून त्या काळाचे भ्रमण करताना मग त्या व्यक्तींचा लेखाजोखा पाहताना मग 'स्वामी' ची पाने बाजूला पडतात आणि उरतात ते अनिवार्यपणे सामोरे येणारे रुक्ष कंगोरे. ते पाहताना, वाचताना, तपासताना हृदय जडही होते, ते अशासाठी की प्रश्न पडतो 'स्त्री' खरोखरी इतकी की दुय्यम होती त्या पुरुषी संस्कृतीत ? अभ्यास तर केलाच पाहिजे आणि तो जर करायचाच असेल तर समोरचे 'सत्य' जसेच्या तसे स्वीकारणे ही अभ्यासकाची पहिली भूमिका स्वीकृत झाली पाहिजे.

त्या नजरेतून आता ती व्यक्ती वा तिच्याभोवतालच्या परिस्थितीचे आवरण पाहताना जाणवते की 'कादंबरी' लेखन म्हणजे "इतिहास" असू शकत नाही. लेखकाला विचारस्वातंत्र्याची मुभा असल्याने तो वाचकाला 'गुंगवून' ठेवतो तर दुसरीकडे इतिहास त्याला सत्याच्या सुईची टोचणी देतो.

अशोक पाटील

khup grate mama, labhale aamah bhagya zahalo tumchi lekure.........................................
ami khup bhagyawan aahot amala tumcha sahavas ayushyabhar aahe..................

प्रज्ञा १२३ <<<<तुम्ही लिहित राहा आम्ही वाचतोच आहोत. (ईथे 'आम्ही' हा शब्द येथील सर्व ईतिहासप्रेमी वाचक ह्या दृष्टीने वापरला आहे.)>>>> अनुमोदन.
सेनापती,अशोकजी....प्रत्येकवेळी पुढिल लिखाण वाचायची उत्सुकता कायम ठेवणारे लिखाण!

पाटीलसाहेब वा! सावकाशीने वाचायला म्हणून लेख बाजूला ठेवून दिला होता, त्याचं अगदी सार्थक झालं. काही प्रतिक्रियाही अतिशय वाचनीय आहेत. रमाबाईंबद्दल तुम्ही जी माहिती दिली आहे ती नवी असली तरी त्या काळात हे असं होणं काही विशेष नव्हतं. आता लेखक आपली पुस्तकं लोकप्रिय करण्यासाठी हळव्या प्रेमाच्या अशा कहाण्या उभ्या करतात, काही लेखकानी अगदी शिवरायाना सुद्धा कादंबर्‍यातून हळूवार प्रेमळ माणूस बनवून टाकलं आहे पण तो सगळा कल्पनाविलासच म्हणायचा.

आनंदीबाईबद्दल जास्तीची माहिती म्हणजे तिचं बरचसं उत्तर आयुष्य नजरकैदेत गेलं. त्यामुळे दुसर्‍या बाजीरावाला युद्धकलेचं काय सामान्य शिक्षणही मिळालं नाही असं रियासतकार म्हणतात. तिला अत्यंत नैराश्य आलेलं असेल हे साहजिकच आहे.

यापुढे शिवरायांच्या भोसले कुळातल्या स्त्रियांबद्दल जरूर लिहा. स्वतःची शिक्का कट्यार असणारी आणि कर्तबगार येसूबाई हिच्याबद्दल वाचायला आवडेल तसंच अहिल्याबाई, जरा नंतरच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि जमलं तर बडी बेगमसारख्या इतर काही स्त्रियांबद्दलही लिहा.

@ सेनापती, पुतळाबाई पारकर नव्हे, पालकर होत्या. नेताजींच्या नात्यातल्या. तुझ्याकडून हा टायपोच असणार याची खात्री आहे.

अर्थात.. पालकर.. Happy टायपो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.. Happy

पुढचे काही दिवस आंतरजालावर नाहीये पण परत आलो की भोसले घराण्यावर एक धागा सुरू करणार आहे. त्यात येसूबाई आणि ताराबाई यांच्यावर लिखाण येईलच. Happy

अशोकजी, सेनापती - अप्रतिम लिहिता तुम्ही. हा लेख वाचला आणि या ग्रुप मधले इतरही बरेच लेख वाचून काढावेच लागले.
स्वामी ने निर्माण केलेल रमा - माधव काव्य आणि इतिहासाच्या चष्म्यातून तुम्ही दाखवलेली रमा. स्वप्न आणि वास्तव.
आम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायला मिळतोय, मनापासून धन्यवाद...!

एंक प्रश्न आहे, इथे विचारण उचित नाही, तरीही, शिवाजीराजांच्या मृत्यूबाबत एंक धागा वाचला. त्यात म्हटलंय कि सकवार बाईने महाराजांवर विषप्रयोग केला असं काही इतिहासकारांना वाटत. पण त्यामागचा हेतू काय? सेनापतींच्या लिहिण्याप्रमाणे तिला तर एकाच मुलगी होती. म्हणजे राज्य मिळवण्याचाही हेतू नसावा. माझा इतिहासाचा काहीही अभ्यास नाही. आवड आहे, तरी अधिक उणे झाल्यास क्षमस्व.

Pages