राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार - मी बरोबर याच्या उलट वाचले होते. की त्यांनी जरा जरी नेट धरला असता तर उरले सुरले मराठी सरदार त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले असते. पण त्यांना युद्ध करून किर्ती मिळवण्यापेक्षा सुखाची झोप प्रिय होती. आधीही असेही ते बाहेरख्याली आणि रंगेल वृत्तीचे होते. त्यामुळे इंग्रजांकडून घेतलेल्या तनखेत त्यांचे सुखनैव चाले. हुजरे, भाट, त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करत आणि त्यांच्याकडून दक्षिणा मिळालेले तर अजूनच. एखाद्या राजाला साजेशाच त्यांचा थाट होता शेवटपर्यंत

आशुचँप, बरोबर मी पण असेच वाचले होते. बापु गोखले जेव्हा सेनापती होते, तेव्हा एका लष्करी तळावर जेवणे चालू होती तेव्हा गोखले यांनी दु.बाजीराव यांना येऊन सांगितले की आपल्याला त्वरेने या तळावरून निघाले पाहिजे. तर चिडून बाजीराव म्हणाले की तुम्ही सेनापती असताना आम्ही शांतपणे भोजन देखील करू शकत नाही काय ? तेव्हा गोखले तडफेने लढले आणि त्याच लढाईत हुतात्मा झाले.
तसेच त्रिंबकजी डेंगळे यांनी पण इंग्रजांपासुन राज्य वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते. पण फितुरीमुळे आणि बाजीराव खंबीर नसल्याने इंग्रजांनी डेंगळे यांना संपविले.

मंदार_जोशी तुम्ही 'द्रोहपर्व' वाचलाय का? .. बहुतेक त्यात तुम्ही म्हणताय तसा उल्लेख आहे. मला पण अत्ता नेमके आठवत नाही.

अशोकजी,
फार फार समाधान दिले आपल्या या लेखाने! लौकिक अर्थाने दुय्यम मानल्या गेलेल्या भूमिका पार पाडणार्‍या या स्त्रियांच्याबद्दल नेमकी आणि महत्वाची एकत्रित माहिती आपल्या या लेखाने आम्हाला मिळाली.
सोलापूरहून आलेल्या माझ्या मामा मामीने स्वामी वाचले आणि त्यांना थेऊरला जाण्याची ओढ लागली. विद्यार्थि असतांना (१९६२ असावे) त्यांच्याबरोबर रमाबाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो होतो ती आठवण जागी झाली. पुढे कधितरी मीही स्वामी वाचले.
सावरकरांच्या कमला काव्याची 'पानिपत' हीच पार्श्वभूमी आहे. इतके पानिपत ही आपल्याला हळवी करणारी घटना आहे.
आपल्या कडून अशाच आणखी लिखाणाची वाट पाहातो.
- शशिकांत गोखले, सोलापूर

@ रुमा, मंदार, आशुचँप, महेश ~

तुम्ही सर्व म्हणता तसे दुसर्‍या बाजीरावांच्याबद्दल इतिहासात उलटसुलट मते प्रतिबिंबीत झाली आहेत. होते असे की, ज्याच्या कारकिर्दीत एखाद्या राजघराण्याचा तसेच परंपरेचा सर्वार्थाने 'अंत' झाला की मग त्या मागील कारणमीमांसेचा (यथार्थ) शोध घेण्यापूर्वीच तातडीने अपयशाच्या टिळ्यासाठी कुणाचे तरी कपाळ समोर येणे गरजेचे असत अशीच लोकमानसिकता जगभरच्या इतिहासात पाहायला मिळेल. दिल्लीच्या मुघल साम्राज्याची वाताहात झाली आणि त्या अपयशाचा धनी झाला बहादुरशाह जफर, ज्याची ब्रिटिशांनी १८५८ मध्ये ब्रह्मदेशातील रंगून इथे कायमची रवानगी केली. जवळपास सार्‍या हिंदुस्थानावर राज्य करण्यार्‍या घराण्याच्या शेवटच्या वंशजाला मृत्यू यावा कैदेत अन् तोही परक्या मुलुखात ही देखील नियतीची एक क्रूर चेष्टा.

थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमापासून स्फूर्ती मिळावी म्हणून राघोबादादांनी जरूर आपल्या मुलाचे नावही 'बाजीराव' असेच ठेवले पण ह्याच्या कारकिर्दीत परिस्थितीचे फेरे असे काही उलटे पडत गेले की इतिहासाने त्याला 'पळपुटा' असे जे विशेषनाम बहाल केले तेच सर्वतोमुखी झाले.

मुळात या (दुसर्‍या) बाजीरावाला राज्यकारभाराचे तसेच संग्रामभूमीचे कसलेही शिक्षण मिळाले नव्हते. भोसले असो वा पेशवे असोत या दोन्ही घराण्यातील पुढच्या पिढीला राज्याच्या संदर्भातील आवश्यक ते "बाळकडू" त्यांच्या रांगत्या वयापासूनच मिळत असे. पण दुर्दैवाने म्हणा वा परिस्थितीच तशी होती म्हणा, वयाच्या तब्बल २१ व्या वर्षापर्यंत दुसर्‍या बाजीरावाची दिनचर्या ही तुरुंगातच गेली होती. नारायणरावांच्या खूनानंतर तसेच सवाई माधवरावांच्या पेशवाई काळात 'बारभाई'नी आनंदीबाई याना त्यांची तीन मुले आणि दोन सुना याना कारावासात डांबले आणि ज्यावेळी सवाई माधवरावांनी आत्महत्या केली आणि नाना फडणवीसांचा स्वत:च्याच अल्पवयीन मेहुण्याला यशोदाबाईने (सवाई माधवरावांची निपुत्रिक विधवा पत्नी) दत्तक घ्यावे यासाठीच्या हालचाली अन्य सरदार मुत्सद्द्यांनी निष्प्रभ केल्या, त्यावेळी कारभार्‍यांच्यापुढे या दुसर्‍या बाजीरावांशिवाय अन्य नाव वा पर्याय नव्हता. मग वयाच्या एकविसाव्या वर्षी कारावास ते थेट गादी असा प्रवास केलेल्या या अखेरच्या पेशव्याला "राज्यकारभार" म्हणजे काय आणि तो कशाशी खातात याची जाण असणे शक्य नव्हते. पण आता हाती सत्ता आली आहे आणि पैकाही समोर अशा परिस्थितीत "आला दिवस चैनीचा' अशीच त्याची सुरुवातीची मनःस्थिती झाली असल्यास ते नैसर्गिकच मानावे लागेल. परिस्थितीच्या रेट्यामुळे इच्छाही दबून राहिल्या होत्या. दुसरा बाजीराव विषयासक्त, रंगेलही होताच (त्याचा बापही असाच होता).

नाना फडणीसाच्याबाबतीत त्याने अखेरपर्यंत सूडभावना मनी जपली (ते त्याच्या दृष्टीने समर्थनीय होतेच म्हणा) आणि अशा एका ज्येष्ठ्य कारभार्‍याला त्याच्या मृत्यूपर्यंत कैदेत ठेवल्याने पुण्यातील गोतावळ्यात सल्लागार पदाला लायक अशी व्यक्ती राहिली नव्हती. ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीला पाठविलेल्या पत्रात कर्नल पामर यानी नानाच्या कारकिर्दीचे स्पष्ट कौतुक केले आहे : "नाना मेले आणि पेशवाईतील शहाणपण तसेच नेमस्तपणाही लयास गेले". या रितीने खर्‍या अर्थाने ज्येष्ठ म्हटली जाणारी अधिकारी व्यक्ती आता पुणे दरबारातून गेल्यानंतर मग मराठा राज्याचे काय व्हायचे ते होणे टळणार नव्हते कारण या बाजीरावाकडे "पराक्रमी' हे बिरुद लावण्यासारखी कोणतीही पात्रता होती, ना त्याने ती मिळविण्यासाठी काही प्रयत्न केले.

[त्रिंबकजी डेंगळे आणि यशवंतराव होळकर ही प्रकरणे थोडावेळ बाजूला ठेवणे गरजेचे आहे, कारण खूप लिहावे लागेल त्याविषयी]

२८ आक्टोबर १८१७ च्या पुण्याच्या परिस्थितीचे वर्णन इतिहासकार ग्रॅण्ट डफ असे करतो की, " मराठे हल्ला करण्याचा मनसुबा करीत आहेत ही बातमी एलफिन्स्टनला समजली पण त्याला आता बचावाचे की चढाईचे धोरण स्वीकारावे या संघर्षाला सामोरे जावे लागले. ती संपूर्ण रात्र मराठ्यांना अनुकूल होती पण नेमक्या अशाच वेळी बाजीरावाचा चंचल स्वभाव आड आला. चढाईसाठी तब्बल एक आठवडा त्याने घेतला आणि दरम्यान इंग्रज सावध झाले....."

अशा भेदरट वा कचखाऊ धोरणाच्या नेत्यामुळे मग सैन्यही तसेच बनत गेले हा इतिहास आहे. १६ नोव्हेंबर १८१७ रोजी येरवड्याच्या मैदानावर इंग्रज आणि मराठे यांच्यातील अखेरचे युद्ध झाले आणि युद्धाचा परिणाम जो व्हायचा तोच झाला.

अशोक पाटील

@ स्_सा आणि
दामोदरसुत

~ दोघानांही प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. त्याबद्दल स्वतंत्र इथेच थोड्यावेळाने लिहितो.

अशोक पाटील

कुठे लिहू कळत नव्हते. आणि इतिहासाचा हा धागा पटकन लक्षात आला म्हणुन इथेच पोस्टते.

जुने नकाशे पहायचे असल्यास - http://project.oldmapsonline.org/about हि खुप सुंदर साईट आहे.

भरपुर नकाशे तेथे पहायला मिळतील.

नमस्कार,
>>तर्ककुतर्क करीत राहणे हा तर इतिहास संशोधकांचा एक छंदच असतो.<< सहमत
आणि सुतावरून स्वर्ग गाठून पुरेशा पुराव्याअभावी नेहमीच्या समजाच्या अगदी विरुद्ध सनसनाटी निष्कर्ष काढून कोणत्या का मार्गाने असेना एका रात्रीत प्रसिद्ध होणे हाही छंद अनेकांना झालेला आहे.
प्रतिसादांना दिलेले आपले प्रतिसादही अत्यंत वाचनीय झाले आहेत.
'अवांतर'मध्ये उल्लेख केलेल्या लेखाची तयारी चालू असल्याचे वाचून आनंद वाटला.
पदवीचा विषय नसूनही इतिहासाचा आपण करीत असलेला अभ्यास पाहिल्यावर मला प्रा. शेषराव मोरे यांची आठवण येते. तांत्रिक विषयाचे प्राध्यापक असलेले मोरे असेच आंबेडकर, सावरकर, इस्लाम आदी विषयांचे सखोल अभ्यासाकडे खेचले गेले आहेत आणि त्यांच्याकडून अतिशय उत्तम दर्जाची ग्रंथनिर्मिती झाली आहे. आपल्याकडूनही भविष्यात ही अपेक्षा आहेच!

मला पेशव्यांचा इतिहास वाचायचा आहे.
मी राऊ,स्वामी,रमाबाई हि पुस्तक वाचली आहेत,
अजून वाचायची इच्छा आहे,
जर कोणाला माहिती असेल पुस्तकाची तर ती जरूर सांगावीत हि इच्छा

छोटी जी
तुम्ही विश्वास पाटील लिखित 'पानिपत' देखिल वाचावी. पण कादंबरीतील सर्व बाबी इतिहासकारांनी लावलेल्या कसोट्यांना उतरतीलच असे नाही हे ध्यानात ठेवावे. कादंबरीत लेखक दंतकथांचा वापरही करतांना दिसू शकतात. कादंबर्‍या रंजकतेने ढोबळ मानाने इतिहास सांगतात.

सारिका +१................खरेच खुप रंगवुन दाखवितात हे सिरिअल वाले.....

आशोक ,जी लेख खुपच मस्त..आणि माहिती पुर्ण Happy

मामा __/\__. किती अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख, शब्दच नाहीत प्रतिक्रिया द्यायला, खूप सुंदर. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहित नव्हत्या. धन्यवाद.

कोणताही धागा उशीराने उघड्ण्यात एक फायदा असतो कारण सर्व प्रतिसाद सुद्धा सलग पणे वाचायला मिळतात. लेख खूपच चांगला आहे. महितीपूर्ण लेख आणि ओघवती शैली!! मजा आली वाचताना. प्रतिसाद ही तितकेच interesting !!

अशोकराव,
आपला लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया वाचल्या. मला मराठेशाहीचा इतिहास वाचण्यात नेहमीच आनंद होतो. अनेक वंशांचे 'पुढे काय झाले' हे तुमच्या लेख आणि प्रतिक्रियांवरून कळले. मनःपूर्वक धन्यवाद आणि आपल्या व्यासंगाचे भरभरून कौतुक ! आपण याद्वारे एखादी मोठी ऐतिहासिक कादंबरी लिहावी असे वाटते.
हार्दिक शुभेच्छा !

डॉक्टरसर....

आय अ‍ॅम स्पीचलेस रीअली ! तुमच्यासारख्या व्यावसायिक तज्ज्ञाने माझ्या या व्यासंगाचे असे कौतुक करावे याचा मला खूप आनंद होत आहे. इतिहास वाचताना आपल्याला होणार्‍या आनंदाची जातकुळी वेगळीच असते. पानापानावर पसरलेल्या घटनांची चित्रे नजरेसमोर आणताना आपले रक्त किती वेगाने धावत असते याची प्रचिती वारंवार येते.....मुघलांचा इतिहास असो वा राजपुतांचा...ब्रिटिशांचा असो वा पोर्तुगिजांचा....प्रत्येकाला शिरपेच तुरा असतोच, तो वाचताना आनंद होणे साहजिकच....पण आपण जेव्हा मराठेशाहीचा इतिहास वाचतो त्यावेळी आनंदाच्या सोबतीला अभिमानही येणे स्वाभाविक आहे....कारण त्या रणकंदनात आपल्या पूर्वजांपैकी कुणीतरी पराक्रम केलेला असतो त्याची जाणीव सखोल होते.

@ अन्जू.... शालेय असो वा महाविद्यालयीन स्तर असो....तेथील इतिहासाच्या कित्येक धड्यात पूर्णपणे माहिती येईल असे नसतेच...मात्र आपण व्यक्तीश: त्यात लक्ष घालून अधिकची माहिती मिळवित गेलो की मग त्यातून खजिनाच सापडतो.

@ हेमा.... धन्यवाद....होय, लेख चांगला झाला असला तरी त्यावर प्रकटलेले प्रतिसादही तितकेच अभ्यासपूर्ण आहेत.

मामा मस्त माहिती .... बर्याच गोष्टी माहित नव्हत्या ... रमा-माधव विशेष करून ... प्रतिसाद ही खूप छान आहेत ....

अशोक जी,

अतिशय अभ्यासपुर्ण लेख...
इतकी बहुमोल माहिती उपलब्ध करुन दिलीत तुम्ही...

एक सूचना / विनंती:
तुम्ही किंवा सेनापती (रोहन) यांनी पेशव्यांविषयी पण एखादी लेखमालिका सुरू करावी >>>>+१००१ Happy

धन्यवाद

अंजु, लेख वर काढल्याबद्दल तुझे आधी आभार Happy
मामा, तुम्ही खुप सुरेख लिहिताच त्यात हा असा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. तुम्ही आणि प्रतिसादक, दोघांनीही उत्तम माहिती दिली आहे.

सई....

"...हा असा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय...."

हे बाकी शंभर टक्के सत्य. "इतिहास" या नामातच इतकी जादू आहे की विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही शाखेत शिकत असली तरी त्यांच्या अंतरी आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि नंतर देशाच्या इतिहासाविषयी एक सार्थ म्हणावी अशी ओढ कायम बसलेली असते....मग तो त्याचा अभ्यासाच्या दृष्टीने मागोवा घेवो वा निखळ मनोरंजनाच्या....त्यात त्याला गोडी निर्माण होतेच.

शेवटी समाजमन तयार होते ते इतिहासाच्याच अनुषंगाने हेच खरे.

अशोक लेख,प्रतिसाद,शम्का निरसन सर्वच उत्तम.खुप नविन माहिती मिळाली.तट्स्थता तरी रंजकता, भाउकता काय टाळावे याचे नेमके भान.मोराच उदाहरण एकदम बेस्ट.
[पण एक आहे - इतिहासाविषयी कादंबर्‍या जरूर आकर्षण निर्माण करतात, पण 'कादंबरी लेखन' म्हणजे 'इतिहास लेखन' नव्हे हेही वाचकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.] एकदम पटणार.पण तरीही अनेक अभ्यासक ऐतिहासिक कादंबर्‍याकडे पहातात तस तुच्छतेने न पाहता त्याना द्यायच तेवढ श्रेय तुम्ही देता.सर्वच बाबतीतिल विवेकी,संयत दृष्टिकोन भावला.
आणखी येउ द्या म्हणायला आवडेल.पण तब्येत सांभाळुन इथही विवेक बाळगा हा प्रेमळ सल्ला

वा मामा
वाचण्यात अगदी गुंग झाले हां लेख वाचताना .सुंदर लिहिलत .प्रतिसाद पण उत्तम

अन्जू ताईंना खूप सारे धन्यवाद हां लेख वर काढल्याबद्दल

अंजु, लेख वर काढल्याबद्दल तुझे आधी आभार स्मित >> +१००

खूपच मस्त लेख. अतिशय आवडला. अशोकमामा अजुन येऊदेत.

धन्यवाद. हे सगळे श्रेय अशोकमामांच्या ह्या लेखाला आहे, जो पूर्वी मी वाचला होता पण तेव्हा मी सदस्य नव्हते आणि परत वाचतानापण नवीन काहीतरी गवसले असे वाटले आणि भावना मामांना कळवाव्यात असे वाटले.

अन्जू खरंच आभार. हा सुंदर लेख तब्बल दोन वर्षांनी वर आला आहे. त्यातून अशोक यांच्या व्यासंगाबरोबरच त्यांचं संतुलित तरीही सहृदय व्यक्तिमत्व प्रकटलं आहे . प्रतिसादही तसेच सर्वंकष आढावा घेणारे त्यामुळे मायबोलीवरील हा एक खूप खास लेख झाला आहे.
खिन्न करणारे जीवनानुभव राजस्त्रियांचे हाच परिणाम शेष राहिला.
मिथकं,लोकापवाद आणि अल्पस्वल्प ठोस पुरावे यातून सत्य कसं शोधावं लागत असेल !
रमाबाईंच्या सहगमनाबद्दलची दुसरी घातपाती थियरी अजेय झणकर यांच्या द्रोहपर्व मध्ये वाचली होती ते आठवलं ..

सेम पिंच अन्जू पूर्वी वाचला होता तेव्हा मी पण सदस्य नव्हते. Happy
काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा ना.सि. इनामदार यांची झुंज वाचली त्यावेळी
या लेखाची आठवण आली होती.मामा, यशवंतराव होळकरांबद्दलही लिहा ना वेळ मिळाला की !!!

Pages