राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख .. एकंदर पेशवाईतल्या स्त्रीया म्हणजे माहाभारतातल्याच स्त्रीया आहेत... सत्तेच्या सारीपाटात सगळ्याच दु:खी..

सुरेख माहितीपुर्ण लेख. लेखनशैली खुपच छान आहे. या सगळ्या व्यक्तिरेखा माहित होत्या, पण इतके डिटेल्स नाहीत. समशेरबहादुर बद्दल तर मला नेहमीच उत्सुकता होती, आज तुमच्यामुळे तिला पुर्णविराम मिळाला.

या सगळ्या श्रीमंत, प्रसिद्ध आणि सत्ता हातात असणार्‍या स्त्रिया. कोणत्याही सामान्य स्त्रीला जे हवंसं वाटतं ते पेशवे नावाबरोबर मिळवुन बसणार्‍या, पण कोणीच खर्‍या अर्थाने सुखी नाही. या सगळ्याच जणी कोणत्या तरी प्रचंड दु:खाने पोळलेल्या होत्या. मनाला हुरहुर लावणारी चरित्रं आहेत प्रत्येकीची.

अजुनही वाचायला आवडेल या विषयावर.

@ मोहन की मीरा ~

"गुप्ते" हे देशस्थ तर पेशवे हे 'भट' म्हणजे चित्पावन. पण नाशिकच्या सरदार गुप्त्यांची 'राधिका' ज्यावेळी सातार्‍यात आली होती त्यावेळीच छ.शाहूंच्या मनी ती विश्वासरावांसाठी नेमस्त झाली होती. शाहू थेट पुण्याच्या राज्यकारभार पद्धतीत लक्ष घालत नसले तरी नानासाहेब आणि त्यांचे सरदारदरकदार यांच्यावर त्यांची जरब होतीच [एक लक्षात घ्यावे की, बाळाजी विश्वनाथांच्या अगोदर समस्त 'पिंगळे' हे पेशवेपदावर होते, ते देशस्थ. पण शाहूंनी बाळाजीमधील गुणवत्तेला ओळखून, महत्व देऊन त्यांच्याकडेच कारभाराची - प्रशासकीय तसेच लष्कर - सूत्रे सोपविल्यामुळे 'देशस्थ' वर्ग काहीसा दुखावला जाणे नैसर्गिकच मानावे लागेल. पण प्रत्यक्ष लढाईवर जाणारे सरदार व त्यांचे सैन्य हे बहुजन समाजातील घटक असल्याने त्यांची निष्ठा प्रथम 'छत्रपती' आणि नंतर 'श्रीमंत पेशवे' अशीच राहिल्याने, पेशव्यांनीही सातार्‍यातून येणारे खलिते वंदनीय मानण्याचे धोरण ठेवले होते. देशस्थ चित्पावन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी शाहू आणि नानांनी 'गुप्ते' कुलीन राधिका सून म्हणून स्वीकारावी असा बेत केला. त्या काळी "स्त्री" पडदाशीनच असल्याने तिची संमती असल्याबाबतीत 'टेकन फॉर ग्रॅण्टेड' अशीच असायची. पण गोपिकाबाई याना स्वत:च्या चित्पावन वंशाचा अभिमान असल्याने देशस्थाची 'राधिका' आपल्या विश्वासरावासाठी बायको म्हणून नक्की केल्याच्या वृत्ताने चिडल्याही होत्या. वाङनिश्चय जरूर झाला होता, पण मूळ प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे 'राधिका' खर्‍या अर्थाने 'भट' घराण्याची सून बनलीच नाही.

[अवांतर : ही वस्तुस्थिती मी मूळ लेखातही मांडावी असे माझे मन मला लिखाणाच्यावेळी जरूर सांगत होते, पण आजकाल हे जातिभेदाचे खूळ जालावर इतके बोकाळले आहे की - त्यातून नेमके काय निष्पन्न होते हे वादाळू लोकानांही उमजत नसेल - ते इथे नको असा विचार समोर आल्याने त्या संदर्भात ऐतिहासिक सत्य असूनही ते देऊ नये असेच मला वाटले. असो]

अशोक पाटील

वाह, अशोकजी..
अतिशय सुंदर माहिती आणि मुद्देसुदही..
बर्‍याच गोष्टींना उजाळा मिळाला.. आणि बरेचसे नवीन कळाले.

तुम्ही रमेचे जे वर्णन लिहीले आहे, ते वाचून परतून "स्वामी" हाती घ्यावी असे वाटलेच.. Happy
धन्यवाद!

अशोक जी ... फार छान. माझ्या मनातिल शंका फिटवलीत. मी हे लिहिण्यास कारण की, ती एक प्रथा त्या काळात होती. आणि अनेक राजकारणे जातीं ना धरुन होत असत.

बाकी वाद घालणर्‍याना काय ......

एक लक्षात घ्यावे की, बाळाजी विश्वनाथांच्या अगोदर समस्त 'पिंगळे' हे पेशवेपदावर होते, ते देशस्थ>>>>
पिंगळे हे कर्‍हाडे होते. पंत प्रतीनीधी. आर्थात ही अवांतर माहीती. ह्या बाफशी संबंध नाही. स्वामी मध्ये गोपिकाबाई "पुरंदरे" ह्या देशास्थाला महत्व दिलं म्हणुन नाराज आहेत असा प्रसंग आहे.

असो. ह्या विषयावर जास्त चर्चा नको. विषय संपला.....

तुमची माहिती खरोखरच रंजक आहे. मराठ्यांच्या इतिहासा बरोबर जर तुम्हाला दक्षिणेतिल इतिहास माहीत असेल, तर त्यावर एक बाफ उघडा.

@ नीधप ~ धन्यवाद.

मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून 'इतिहास' विषयावरील विविध लिखाण आणि अन्य साधनसामुग्रींचे अवलोकन केले आहे. अर्थात एक 'अभ्यासक' या नात्याने नसून बहुतांशी 'आवड' म्हणूनच ते झाले आहे असे म्हटले तर जास्त सयुक्तिक ठरेल. कोल्हापूरातील थोरल्या राजवाड्यावर 'ताराबाईकालीन कागदपत्रे' पाहाण्यास मिळतात. शिवाय नगरवाचन मंदिरातही इतिहास आणि मूळ कागदपत्रेही सदस्यांनी (लाईफ मेम्बर्सना) उपलब्ध होतात. इथल्या बर्‍याच लोकांचा तो छंदच आहे, मीदेखील त्यांच्यापैकीच एक. तर इतिहासावरील प्रमुख उपलब्ध साधन म्हणजे रियासतकार सरदेसाई यानी संपादित केलेले "पेशवे दफ्तर' - फार प्रचंड असा अभ्यास आणि संशोधन असलेली ह्या कागद्पत्रांचे वाचन करताना भान हरपून जाते.

शिवाय राजवाड्यांनी संपादित केलेली 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने', पारसनीस यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेली 'ऐतिहासिक टिपणे'; र.वि.हेरवाडकर संपादित 'पेशव्यांची बखर' असे काही ग्रंथ कित्येक वर्षे वाचनात आहेत [अजून खूप यादी मोठी आहे; पण प्रामुख्याने हीच]. अलीकडे प्रमोद ओक यानीही 'पेशवेकालीन इतिहासा' चा विविध पुस्तकांतून छान मागोवा घेतल्याचे दिसत आहे. [पण मी अजून ओक वाचलेले नाहीत].

इंग्रजीत माझा ओढा प्रामुख्याने "एनसाय्क्लोपीडीया ब्रिटानिका" कडे जास्त. नोकरीच्या निमित्ताने अनेक कॉलेजीस्/विद्यापीठ इथे फेर्‍या असतात, त्यामुळे तेथील मुक्कामात कामानंतर त्या त्या ग्रंथालयांचा मुक्त वापर करण्यास सहज मिळतो. ब्रिटानिका तर जवळपास सर्वच महाविद्यालयाच्या कपाटांतून दिसतात - अर्थात त्याचा कितपत वापर प्रा. मंडळी करीत असतात हा एक संशोधनाचाच भाग होईल, पण असो, तो काही आपल्या या धाग्याचा विषय नाही.)

[पण एक आहे - इतिहासाविषयी कादंबर्‍या जरूर आकर्षण निर्माण करतात, पण 'कादंबरी लेखन' म्हणजे 'इतिहास लेखन' नव्हे हेही वाचकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.]

अशोकराव,

तुमच्यातला अभ्यासक व लेखक दोन्ही भावलेत. सुटसुटीत व प्रभावी मांडणी.

पुलेशू
--------------
एक वयक्तीक प्रश्न विचारायचा आहे. ईतक्या सुंदर धाग्यावर विषयांतर नको म्हणून तो विपूत टाकलाय.
कळावे.

आवडेश Happy

अशोकराव.. फारच सुरेख लेख आहे.. फक्त रमाबाईंविषयी थोडी माहिती मिळाली असती तर बरे झाले असते..माधवरावांची लाडकी पत्नी या पेक्षा माधवरावांच्या आजारपणात त्यानी पेशवाईची केलेली कामे, घरात आनंदीबाई सारख्या व्यक्तीवर ठेवलेला वचक याचे ऐतीहासीक सत्य.... स्वामी वाचली आहे पण ती कादंबरी आहे ऐतीहासीक लेख नाही.. Happy

अशोकजी... _/\_ खूप धन्यवाद... गोडी वाढत चाललीय... तेव्हा पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.. उत्कृष्ट लिखाण Happy

अशोकराव,
पेशवे कालीन स्त्रीयां बद्दल लिहलात नि गणपती दरवाजाची कथा राहुन जाते हे काही पटलं नाही बुवा.
शनिवार वाड्यातील त्या गणपती दरवाजाची कथापण येऊ द्या.

धन्यवाद,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने, ओकांचे 'पेशवेकालीन इतिहास' आणि रियासत खंड आहेत माझ्याकडे.
पेशवेकालीन इतिहास वाचलेय अगदी व्यवस्थित. बाकीची संदर्भांपुरती चाळली होती.

'पेशवे दप्तर' उपलब्ध आहे का? पुण्यात जाईन तेव्हा लगेच घेईन.

[पण एक आहे - इतिहासाविषयी कादंबर्‍या जरूर आकर्षण निर्माण करतात, पण 'कादंबरी लेखन' म्हणजे 'इतिहास लेखन' नव्हे हेही वाचकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.]<<<
अर्थातच. त्या कादंबर्‍यांना कधीच निरोप देऊन झालाय. Happy

<<पण एक आहे - इतिहासाविषयी कादंबर्‍या जरूर आकर्षण निर्माण करतात, पण 'कादंबरी लेखन' म्हणजे 'इतिहास लेखन' नव्हे हेही वाचकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.<<< हे आवर्जून लिहिल्याबद्दल अनेको धन्यवाद Happy
तुम्ही असंच छान लिहित रहा

अशोक,

उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद!

>>> राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

घोरपडे मराठा तर पेशवे ब्राह्मण. त्याही काळात ब्राह्मण-मराठा असे आंतरजातीय विवाह होत होते का? अशी शक्यता खूपच कमी वाटतेय म्हणून विचारतोय.

>>> त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला.

राघोबादादांना नारायणरावाच्या खुनानंतर सालीना २५००० रूपयांचे पेन्शन देऊन कोपरगाव इथे वास्तव्य करण्यास सांगितले होते व १७८२ चा आसपास कोपरगाव इथेच ते अत्यंत निराश अवस्थेत मृत्यु पावल्याचे मी कुठेतरी वाचले. बहुधा माझी माहिती चुकीची असावी.

घोरपडे मराठा तर पेशवे ब्राह्मण. त्याही काळात ब्राह्मण-मराठा असे आंतरजातीय विवाह होत होते का? अशी शक्यता खूपच कमी वाटतेय म्हणून विचारतोय.>>>>

त्यांचे खरे नाव वेगळे होते. ते पण चित्पावनच. पण एका लढाईत घोरपडे नावाच्या सरदाराने मदत केली. पोरक्या पोरांना आश्रय दिला. म्हणुन त्यांनी घोरपडे हे नाव धारण केले. नीट तपशील अत्ता आठवत नाहिये, पण घरी जावुन बघुन लिहिते. ( स्टार माझा वर "बाजीराव-मस्तानी" सीरीयल मध्ये ही ह्याचा उल्लेख होता.)

अशोकजी तुम्ही प्रकाश टाका ह्यावर.

घोरपडे मराठा तर पेशवे ब्राह्मण. त्याही काळात ब्राह्मण-मराठा असे आंतरजातीय विवाह होत होते का? अशी शक्यता खूपच कमी वाटतेय म्हणून विचारतोय. <<<
हे घोरपडे देशस्थ अशी नोंद कुठेतरी वाचलीये. कुठे ते लक्षात नाही पण या सगळ्यांपैकीच कुठल्यातरी एका पुस्तकात.

ण एक आहे - इतिहासाविषयी कादंबर्‍या जरूर आकर्षण निर्माण करतात, पण 'कादंबरी लेखन' म्हणजे 'इतिहास लेखन' नव्हे हेही वाचकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.>> पूर्ण अनुमोदन.
पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही.>>> रमाबाई-माधवराव यांचे नाते 'स्वामी'मधे जसे रंगवले आहे तसे प्रत्यक्षात असेल काय अशी शंका मला नेहमीच येते. एक साहित्यकृती म्हणून ते अत्यंत हृद्य आहे पण त्याबद्दल अस्सल ऐतिहासिक असा काही पुरावा आहे काय?

पाटीलसाहेब : अतिशय उत्तम लिखाण. आपल्या लिखाणाचा एकुणच बाज खुप आवडला. अशा भुमिकेतनं केलेल लिखाण जस असायला हवं तसच ते झालय... अन पोहोचलय वाचकापर्यंत अन त्यासाठी आपले अभिनंदन !!! असच अजुनही वाचयला आवडेल. खुप शुभेच्छा !!!

घोरपडे म्हणजे मराठाच. पण ह्या इचलकरंजीकरांनी त्यांच नाव लावायला सुरुवात केली होती. कारण त्यांच्यावरच्या उपकारामुळे. आर्थात त्या काळात हेही उल्लेखनीयच. ह्या अनुबाईंना अपत्य न्हवते. तरी मुलीला टाकली नाही. हेही उल्लेखनीय.

रमाबाईं बद्दल फार लीखापढी उपलब्ध नसावी. ती एक साधारण पेशवीण असावी. स्वामीकारांनी तिला कवित्व आणि रोमँटीक लुक दिला असावा. साधारण ज्या बायका महत्वाच्या आहेत त्यांच्या बद्दलच इतिहास जास्त भाष्य करतो.

जाता जाता एक गम्मत वाचलेली आठवली ती म्हणजे दुसर्‍या बाजीरावाने महाराष्ट्रीय पाक कलेला दिलेली एक देणगी म्हणजे " श्रीखंड". असे म्हणतात की श्रीखंडाचा शोध बाजीरावाच्या मुदपाक खान्यात लागला. त्याने त्यास राजमान्यता दिली. आज तो पदार्थ प्रसीध्ध आहे.

खरे खोटे माहित नाही. पण हे खरे की उत्तरेत व पुर्वेला आजही श्रीखंड फार प्रचलीत नाही. महाराष्ट्रात त्याचे जेवढे महत्व आहे, तेवढे इतरत्र नाही.

श्री.मास्तुरे आणि अन्य काही सदस्यांनी 'घोरपडे' - जे मराठा वाटतात - त्यांच्या घरात 'भट' पेशव्यांनी आपली कन्या कशी दिली ? अशी शंका, जी रास्तच आहे, उपस्थित केली आहे, त्यावर हा खुलासा :

हे घोरपडे इचलकरंजी चे संस्थानिक मराठा नसून कोकणस्थ ब्राह्मण आहेत. मूळचे 'कोकणस्थ जोशी' मग 'घोरपडे' कसे झाले त्याचीही एक आस्थेवाईक कहाणी आहे. आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापणे गावाची एक जोशी विधवा जी तिथल्या अपमान आणि उपासमारीला कंटाळून देशावर आपल्या नारायण महादेव या ७ वर्षाच्या मुलाला घेऊन कापशी इथे आली व मराठ्यांचे सरदार संताजी घोरपडे यांच्या इचलकरंजी जहागिरीवर रोजगारीसम काम करू लागली. हा मुलगा घोरपड्यांच्या तबेल्यात काम करणार्‍या नोकराबरोबर [ज्याला इंग्रजीमध्ये 'साईस' असे म्हटले जाते] पाग्यातील घोड्यांना घेऊन नदीवर जात असे. तिथेच त्याला [नारो जोशीला] घोडेस्वारीचा नाद लागला आणि काही दिवसातच त्याची अश्वरोहणावर इतरांना जाणवेल अशी पकड आली. पुढे साहजिकच संताजी घोरपडे यांची शोधक नजर या मुलाच्या कौशल्यावर गेली आणि त्यानी नारोला आपल्या येसाजी आणि तुकोजी या दोन मुलांसमवेत [तीही त्याच्याच वयाची होती] एकत्र वाढविले, इतके की या दोन मुलांपेक्षा नारोवरच त्यांचा जीव जडला, आणि नारो ह्यालाही पित्याचे सुख लाभले नसल्याने त्याने 'संताजी घोरपडे' या सेनापतीमध्येच आपल्या पित्याला पाहिले व पुढे मोठा होऊन रितसर मराठा सैन्यात सामील झाल्यावर मग आपले नाव 'नारो महादेव घोरपडे' असेच लावले. अर्थात ही माहिती पेशव दप्तरीही असल्याने त्यानीही या निर्णयाचे स्वागत केले. त्या आडनावाची मग पुढे लग्नासाठीही अडचण न येणे स्वाभाविकच.

[अवांतर : विशेष म्हणजे पुढे इतिहासात जी काही उलथापालथ होत गेली त्यामुळे मूळचे संताजी घोरपडे यांचे वंशज इचलकरंजी जहागिरीतून कायमचे हद्दपार झाले आणि ते मग कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यात वास्तव्यास गेले. आजही त्यांचे वंशज त्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. जसे नारो महादेवांचे इचलकरंजीत.]

आता संताजी तिथून का निघून गेले वा त्यांच्यावर तशी वेळ का आली, कुणी आणली, याचाही भलामोठा इतिहास आहे, पण ते इथे अधिकच अवांतर होईल.

अशोक पाटील

वा अशोकजी वा!!

तुम्ही म्हणजे इतिहासाचे रेडी रेकनर आहात..... ( शी सुचुन सुचुन काय उपमा सुचली आहे!!! पण आमच्या सारख्यांना अजुन काय सुचणार!!! काय दिनेशदा बरोबर ना)

लिखाणाच्या अनुषंगाने ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या वाचताना लक्षात येत आहे की बर्‍याच सदस्यांनी यासोबत आणखीन काही जादाची माहिती हवी आहे असे म्हटले आहे, ती देण्यात मला आनंदच आहे कारण त्यामुळे माझेही जादाचे वाचन आयतेच होत आहे. पण एकावेळी एकाच्याच शंकेचे निरसन करणे शक्य असल्याने [अन् मलाही एकदोन ओळीत खुलासा करणेही जमत नाहीच] ती बाब समजून घ्यावी ही विनंती.

श्री.आशुतोष ०७११ यानी नारायणराव 'गंगुबाई' हिच्याबद्दल काही लिहिलेले नाही, ते लिहावे अशी एक चांगली सूचना केली आहे. त्या अनुषंगाने ~

वास्तविक पेशव्याच्या सत्ता खेचाखेचीत नारायणराव पत्नीला महत्व अशासाठीच आले की नारायणराव खुनाच्या वेळी त्या गर्भवती होत्या. वय तरी काय असेल या मुलीचे ? नारायणाचा जन्म १७५५ चा आणि त्याचा साठ्यांच्या गंगाबाईंशी विवाह झाला तो १७६३ मध्ये....म्हणजे वर ८ वर्षाचा तर वधू ५ वर्षाची. नारायणरावाचा खून झाला ऑगस्ट १७७३ मध्ये, म्हणजे त्याचे वय होते फक्त १८, मग त्या न्यायाने गंगाबाई होती १५ वर्षाची. नवरा गेला आणि ही ती गरोदर म्हणजे तिची अवस्था काय असू शकेल याचे चित्र जरी नजरेसमोर आणले तर तिच्या आयुष्याची शोकांतिका स्पष्ट होते.

पतीचा खून झाल्याचे वृत्त कानी पडताच गंगाबाईने दु:खावेगाने वाड्याच्या भिंतीवर आपले डोके फोडून घेतले होते पण इथे विशेष म्हणजे तिला वाचवले ते दस्तुरखुद्द आनंदीबाई यानी. त्यानी गंगाबाईला गारद्यांपासून दूर नेऊन आपल्या खोलीत कोंडून ठेवले होते आणि दुसर्‍या दिवशी दिवसभर तिच्या 'मी सती जाणार' या निश्चयापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न आनंदीबाईनी केले. [हे खरे तर कौतुकास्पद असे प्रयत्न मानले पाहिजेत, पण आनंदीबाईंनी गंगेला सती का जाऊ दिले नाही यावर खूप भिन्नभिन्न मते आहेत. इतिहासकारांत विविध मतप्रणाली आहे. काहीजणांच्या मते 'आनंदीबाईचे ते कृत्य म्हणजे नारायणरावाच्या खूनात माझा हात नाही' हे दाखविण्याचा प्रयत्न तर काहीजण असेही मानतात की, जर गंगाबाईला 'सती' ची परवानगी दिली असती तर दुसर्‍या दिवशी शनिवारवाड्यावर सार्‍या पुणेकरांचा पूर लोटला असता कारण 'सती' चे दर्शन आणि तिच्या पायाचे दर्शन ही भाग्याची बाब मानण्याची प्रथा असल्याने नारायणराव याचे छिन्नविच्छिन्न शरीर एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला सतीवस्त्रीतील गंगाबाई पाहून पुणेकरांनी हे कुणामुळे झाले हे ओळखून मग त्यांच्या संतापाला आवर घालणे महाकठीण काम झाले असते, हा विचार धूर्त आनंदीबाई यानी केला असणार आणि या सर्वावर एकच रामबाण उपाय म्हणजे गंगाबाईला वाचविणे, ते त्यानी केले.

पुढे 'बारभाई' नी रघुनाथराव व आनंदीबाई यांच्यावर तात्पुरती का होईना पण मात केली, ती फक्त गंगूबाई गर्भवती आहेत आणि त्याना पुत्रप्राप्ती होईल या आशेने. झालेही तसेच. गंगूबाईनी मुलास जन्म दिला आणि नाना फडणीस व अन्य स्वामीनिष्ठांनी त्याचे नाव 'सवाई माधवराव' असे ठेवले व तो ४० दिवसांचा झाल्याझाल्या त्याच्या नावे पेशवाईची वस्त्रे आणून त्याला रितसर पेशवेपदावर बसविले.

झाली गंगाबाईची कर्तव्यपूर्णता. त्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आता गंगाबाई राहिली की ना राहिली याची काळजी बारभाईना नव्हतीच. अल्पवयात अपत्य झाल्याने त्या सदोदित आजारीच असत, शिवाय पती गेल्याने पदरी आलेले एकाकीपणही खात असेल. त्यामुळे सवाई माधवराव केवळ तीन वर्षाचे असतानाच आजारपणामुळे गंगाबाई मृत्युमुखी पडल्या.

सवाई माधवराव यानेही पुढे वयाच्या २३ व्या वर्षी आत्महत्या केल्याने व तोही निपुत्रिकच वारल्याने [त्याची पत्नी यशोदा] पेशवे पदासाठी दुसर्‍या बाजीरावाच्या दारात मराठा सरदारांना जावे लागले हा कटू असला तरी इतिहासच आहे.

असो.

श्रीखंडाचा शोध बाजीरावाच्या मुदपाक खान्यात लागला.

श्रीखंदाचा शोध भिमाने लावला आणि श्रीकृष्णासाठी त्याचे नाव श्रीखंड ठेवले असे ऐकून आहे.

मस्तानी बद्दलचा लेख वाचला. काहीही असले तरी तिचे जे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न आहेत ते पटत नाहीत. ती राजकन्या वगैरे नव्हती, कारण तसे असते तर तिला मिळणार्‍या उपेक्षेबद्दल बुंदेलखंडाने काही हस्तक्षेप नक्कीच केला असता. तसेच बाजीरावाने तिला जे अतोनात महत्व दिले होते ते पण पटत नाही. कोथरूडला जागा दिलेली होती, अंगवस्त्र म्हणुन मान्यता मिळाली होती, एवढे असताना तिच्यासाठी शनिवारवाड्यात महाल बांधण्याचा अट्टाहास कशासाठी ? ज्या काळात हे सगळे घडले त्या काळच्या समाजाला एक माणूस केवळ तो सत्तेवर आहे म्हणून झुगारू पहात असेल तर ते योग्य नाही. टिळकांनी देखील समाजाच्या खुप विरोधी जाऊन काही करणे योग्य नाही असेच धोरण ठेवले होते, तसा काही समतोल साधता आला असता.

Pages