गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमंतिनी, वत्सला, अस्मिता, थँक्स

सध्या फक्त अन फक्त आंनदी अन सकारात्मक रहायचा प्रयत्न करत आहे. सुदैवाने घरच्यांची अन मित्र मंडळींची उत्तम साथ आहे. Wfh असल्याने कामाचाही ताण असा नाहीये.

होपिंग फॉर द बेस्ट

मला काही विचारायचय, प्लिज नीट उत्तर द्या, घरी आम्ही दोघेच असतो, माहितगार कोणी नाही .

बाळाच्या जन्मानंतर काय काळजी घ्यायची असते, बाळाला काजळ पावडर कोणती घ्यावी. गुटी, ग्राईप वॉटर, बालकडू, थेंब असे काय काय देतात आणि बाळ किती दिवसाचे झाल्यापासून द्यावे. बाळाला जर पाणी पाजयचे नाही तर हे सगळे कसे द्यायचे. औषध दिल्यावर पाण्याच्या जागी काय द्यायचे. बाळाला मालिश कधीपासून करतात त्यासाठी कोणते तेल घ्यावे.

काजळ पावडर काही लावू नका बाळ निदान वर्षाचे होईपर्यंत. तुमच्या इथे कोरडी हवा, थंडी असेल तर माइल्ड , लहान बाळांसाठी असलेले बॉडी लोशन वापरु शकता.
ग्राइप वॉटर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्या . नियमित द्यायचे मल्टि व्हायटॅमिन असे काही नाही ग्राइप वॉटर.

बाळकडू, थेंब , गुटी , मालिश याबद्दल माझा पास .

औषधे द्यायची वेळ येऊ नये. आलीच तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच द्यावीत. बहुतेक औषदे लिक्विड फॉर्म मधे असतात. ती ड्रॉपरने बाळाच्या जिभेवर ठेवायची.

मालिश साठी आम्ही हिमालया चे बेबी ऑइल आणलंय, चांगले आहे. संतुलन चा मालिश चा विडिओ छान आहे, त्यातली process पहायची त्यांनी भरमसाठ products सुचवली आहेत, त्यांची गरज नाही. पेडी ने नाकात कानात तेल घालू नका असे सांगितले असल्यामुळे ते करत नाही.

काजळ डोळ्यांत लावत नाही, तीट लावते

पावडर ची तशी गरज नाही पण मी आणलेत हिमालयाचे डबे. Fresh वाटतं, कोरडं होतं आणि वास छान येतो .सर्वांगाला फस फस फासू नये थोडंस लावावं अस मला वाटते.

बाकी काही विचारायचं असेल तर विचारून टाका
अनुभवी मंडळी सल्ले देतीलच
शेवटी काय करायचं हे आई म्हणूज तुम्हीच ठरवा

पाणी पाजू नयेच असं डॉक्टर कटाक्षाने सांगतात, ते ऐका. बाळ अंगावरचं दूध पिणार असेल तर सोने पे सुहागा. मग गरम पाणी फक्त तुमच्यासाठी पिताना वापरा. न जाणो आमच्यासारखी परिस्थिती आलीच आणि वरचं दूध पाजावं लागलंच तर सकाळी ऊठून आधी पातेलंभर पाणी उकळून ठेवा आणि थोडं कोमटपेक्षा जरा गरम असताना थर्मासमधे भरून ठेवा. गरजेनुसार वापरा.
मालिश घरी आल्यापासून म्हणजे ५-६ दिवसानी चालू केली आम्ही. नाळ पडेपर्यंत जरा जास्त काळजी घ्या. अंघोळीच्या आधी मी तरी साध्या खोबरेल तेलाने मालीश करतेय थोडं कोमट करून. नाकात, कानात तेल घालायचं नाही. तुम्ही स्वत: मालिश करणार असाल तर youtube वर विडिओज् बघून ठेवा. अंघोळ घालताना आधी काही दिवस तरी शाम्पू, साबणाचा भडिमार करू नका. मी बेसन-दूध लावतेय कारण लेकीच्या अंगावर लव खूप आहे. अंघोळीनंतर धूरी द्यायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही गावाला राहतो. आसपास मोकळी हवा आहे, त्यामुळे तिला धूरी देताना कोंडल्यासारखं वगैरे होत नाही. नीट कोरडं करून मी हिमालयाची पावडर लावते. काखेत, मानेला, कानाच्या मागे. चेहर्याला एकदम कमीच कारण कण नाकात जाऊन त्रास होऊ शकतो. काजळ फक्त छोटीशी तीट लावायला. नजर वगैरे काही नाही, पण गोड दिसते छोटीशी तीट लावून.
गुटी महिना झाल्यावर पाजायला चालू केली(ते उकळलेलं पाणी वापरून). ग्राईप वॉटर देते कधी पोटात दुखून खूप रडत असेल तर. बाकी कुठलंच औषध डॉक्टरने सांगितल्याशिवाय नाही.
डायपर रॅश येऊ नये म्हणून डायपर लावायच्या आधी थोडं थोडं खोबरेल तेल लावून ठेवते मांडीला,कमरेला.
जरा जास्तच लिहीलंय, पण उपयोगी ठरू शकतं. बाकी शुभेच्छा. Happy
ता.क. पहिला महिनाभर रेग्यूलर चिकटवायचे डायपर वापरा, डायपर पॅन्ट्स नको. काढता घालताना बाळाला त्रास होतो. बेबी वाइप्सपण घ्या. खूप उपयोगी.

चांगलं लिहिलंय चिन्मयी
धुरी बद्दल कॉन्फिडन्स आणि मदत नसेल तर सध्या नाही दिली तरी चालेल.जे काम धुरी, शेक घेण्याने होतं ते सध्या अगदी कमी गरम केलेल्या,स्वतःच्या हातावर आधी टेस्ट केलेल्या कापडी हॉट मसाजर बेल्ट ने व्हायलाही हरकत नाही.
बेसन दूध सुद्धा अंगावरून नीट धुवून काढता येत नसेल तर नुसतं व्हर्जिन कोकोनट ऑइल, कोणतंही सौम्य,कृत्रिम सुगंध आणि हॉट चॅम्पि के तत्व नसलेलं तेल चालेल.थोडक्यात बाहेरची मदत नसताना स्वतःला करायला सोपे आणि बाळाला आवडतात असं दिसणारे प्रकार करा.

मायबोलीकर मनिषा ह्यांनी एक बाल संगोपनाचे पुस्तक लिहीले आहे. अमेरिकेत कपलने एकट्याने डिलिव्हरी व बालसंगोपन कसे म्यानेज करावे ते आहे. ते पण बघून घ्या. डाँ स्पॉक पुस्तक घ्या त्यात सर्व सर्व शंकांची उत्तरे असतात. शुभेच्छा. लिंक मिळाली तर देते

बाळकडू, थेंब , गुटी याबद्द्ल मला काहीच माहित नव्हते, शेजारच्या काकुने सांगीतले की आधीच तयारी कर , काही दिवस बाळाला अंघोळ मालीश करेन मी तु शिकेपर्येत असे बोल्ल्या.
कुणालाच माहित नाही का याबद्दल. त्या काकु खुप जुन्या विचाराच्या आहेत त्यातर त्यांच्या सुनेला गोळ्याही खाऊ दिल्या नाही की सोनोग्राफी केली, फक्त एक नवव्या महिन्यात केली होती . मला त्यांची भिती वाटते पण गरजेचे काही असेल तर सुटु नये , कुणाला माहित असेल तर सांगा

बाळकडू थेंब माहिती नाही
गुटी पहिले २ महिने मी दिली होती उगाळून
नंतर तिला गॅसेस होऊ लागले
गुटी बंद केली की बंद झाले

मला वाटते किंतुम्ही फक्त आणि फक्त gynac आणि peditrician यांचे ऐकावे आणि त्यांना विचारावे..
गोळ्या न घेणे वगैरे करू नये.. dr प्रेत्येकाची प्रकृती तपासून गोळ्या देत असतात आणि आता काळ वेगळा आहे, नवीन उपचार आले आहेत
Dr ला काहीही basic सुद्धा शंका असतील तर विचारा कारण त्यांना शास्त्रीय ज्ञान व अनुभव दोन्ही असते

बाळगुटी वगैरे मी माझ्या दोन्ही मुलांना नाही दिली..
शेक शेकोटी आईच द्यायची.. मुलाला 6 महिने आणि मुलीला एकच महिना कारण आई एक महिनाच होती माझ्या कडे..
मालिश आणि आंघोळ आईने शिकवली..एक महिन्याच्या बाळाला मीच करायचे..मी डाबर लाल तेल वापरले दिड वर्षे.
नवरा बाळाच्या आंघोळीसाठी बाई लाव म्हणत होता पण दुसर्यांच्या हातात छोट्याशा मुलीला नाही द्यावेसे वाटले मला.
वर्षभर मला दोन्ही मुलांना फक्त लसिकरणासाठीच दवाखान्यात न्यावे लागले (मी सरकारी लसीकरण फौलो केले).

डॉ. नी दिलेल्या आयर्न कैल्शिअम मी न चुकता खाल्ल्या.
माझ्या पण दोन्ही प्रेग्नन्सी मधे आम्ही दोघेच होतो.. डॉ. नी सांगितल्याप्रमाणे सगळं फौलो करायचो आम्ही.

मालिश आणि अंघोळ एवढे कठीण नसते, सहज जमते.
Video पाहून अभ्यास करून घ्या
पायावर घालता आले नाही तरी टब मिळतो विदेशातल्याप्रमाणे, त्याने आयुष्य सोपे होईल.

नवरा बाळाच्या आंघोळीसाठी बाई लाव म्हणत होता पण दुसर्यांच्या हातात छोट्याशा मुलीला नाही द्यावेसे वाटले मला.+११११
तरी बाई लावणार असाल तर समोर उभे राहुन पहा ती कसं करते, तुम्हाला पटत असेल तर continue करा, तेवढीच मदत

मालिश ला चांगली वेडीवाकडी चेअर (ज्यावरुन बाळ पडणार नाही, अडकेल अशी) भारतात सगळीकडे मिळते. अमॅझॉन वर वगैरे पण.
शिवाय बाळ घाण होत नाही. मालिश आंघोळ ही त्याला सुख म्हणून आहे, पण एखादा दिवस मालिश आपल्याला जमते तशी अगदी वरवर काळजीपूर्वक करुन आंघोळ घातली तरी बिघडणार नाही. आत्मविश्वास नसल्यास दोन जण मिळून आंघोळ घालता येईल. एकाने बाळाची मान धरुन दुसर्‍याने पाणी हळूहळू ओतून.
बाकी गुटी, धुरी हे सर्व ऑप्शनल आहे.(गॅस असल्यास ओवा रुमालात ठेवून तव्यावर रुमाल तापवून सुरुवातीला स्वतःच्या हातावर रुमाल थोडा गार करुन मग शेक दिल्यास आराम पडतो. )
आपल्या पेडी च्या सल्ल्यानुसार आणि स्वतःला जमेल तसे करा. फार टेन्शन घेऊ नका.

आत्मविश्वास नसल्यास दोन जण मिळून आंघोळ घालता येईल. एकाने बाळाची मान धरुन दुसर्‍याने पाणी हळूहळू ओतून...

बरोबर आहे अनु...माझी मेड मदत करायची पाणी ओतायला.

दिवस भरत आलेत तसे चिंता वाढतीये. शेजारच्या काकूंची भीती वाटत होती शेवटी मैत्रिणीची सासू येणार मला मालिश बाळाला मालिश आंघोळ शेक द्यायला. डिलिव्हरीच्या वेळी सुदधा काही दिवस डबा पण देणार ती. खूप आधार वाटला नाहीतर आम्ही दोघांनी कसे केले असते.
बाळासाठी कपडे ब्लॅंकेट सगळे घ्यायला त्यांनीच मदत केली.
त्याच बोलल्या की आता शतावरी कल्प घे त्याने दूध यायला मदत होते, पंचामृत पण चांगले असते असे इथेच वाचले. मला सांगा शतावरी कल्प आणि पंचामृत कधीपासून आणि केव्हा घ्यावे. सध्या मी एक चमचा तूप दुधात घालून पितेय

पंचामृत व शतावरी अगदी प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासून चालू केलं तरी चालतं. आता कधीही कर. शतावरी नंतर चालूच ठेव. शक्यतो रात्री झोपताना पी. झोपही चांगली लागेल. पंचामृत बंद केलंस तरी चालेल. सर्दी-खोकल्यापासून लांब रहायला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळ जन्माला आल्यावर हॉस्पिटलमधेच ब्रेस्टफिडिंग चालू कर. कंपलसरी. डॉ. , नर्सेस् ची मदत घे. घरी येऊन बाळाला फिडिंगची सवय लावणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. स्वानुभव.
आता शेवटचे दिवस शक्य तितका आराम आणि मन शांत ठेव. हॉस्पिटल बॅग तयार ठेव. डॉ. कडे चेकअप चालू असूदे. डेट कळली की जा आणि या बाळाला घेऊन. Happy
थंडीचे दिवस येतायत, गरम कपडे असूदेत. पण बाळाला स्वेटर वगैरे घालायची घाई नको. मऊ सुती कपडेच असूदेत. माझ्या आईने तिच्या ४ कॉटनच्या साड्या फाडून तयार केले आहेत. त्यात गुंडाळून अजूनही बाळ छान झोपतं.
बॅगेत चमचा-वाटी मस्ट आहे बाळासाठी. जस्ट इन केस, फॉर्म्युला पाजावा लागला तर.
बाकी काही विचारावसं वाटलं तर आहोतच आम्ही. शुभेच्छा.
(ता.क. झोपा काढून घे. नंतर असं रात्री-अपरात्री उठावं लागतं आणि झोपेचं पाााााार खोबरं होऊन जातं) Lol

बाटलीने फॉर्म्युला पितं बाळ. चमचा वाटी कशाला?
हॉस्पिटल मध्ये ब्रेस्ट फिडींग कंपलसरी वगैरे काही मनातही आणू नका. प्रयत्न जरुर करा पण त्या हॉस्पिटलमधल्या एका दिवसात, आणि शारिरीक श्रमात तुम्हाला, बाळाला सगळंच नवीन आहे. ऑफर करत रहा पण टेक युअर टाईम, आणि ते एंड ऑफ द वर्ल्ड नाही हे ही ध्यानात ठेवा.
शुभेच्छा! Happy

अमितव, समीक्षा भारतात राहते. अजूनही इथले बहुतांश डॉक्टर्स बाटली वापरायला मज्जाव करतात. पूर्ण नकार. अशावेळी सोबत चमचा वाटी असणं गरजेचं आहे. कारण डिलिवरी कशीही होवो. पहिला दिवस आई खुप दमलेली असते. फॉर्म्युला मिल्क देणं भाग पडतं.
ब्रेस्टफिडिंगबद्दलही मी सांगितल़य ते तिला घाबरवण्यासाठी किंवा दडपण आणण्यासाठी नाही. हॉस्पिटलमधे bf न केल्यास नंतर किती त्रास होऊ शकतो हे मी अनुभवतेय. मला कुणी सांगणारं नव्हतं तर atleast तिला माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा एवढंच. बाकी समीक्षा सुज्ञ आहे.

बरोबर आहे चिन्मयी.
माझा अनुभव पण सेम आहे बाटलीबद्दल..जन्मजात बाळाला तर अजिबात बाटली देऊ देत नाहीत..वाटी चमचा लागेल.
आणि ब्रेस्टफिडींग दवाखान्यातच सुरू करावे हे ही बरोबर आहे.
मला तरी तुझी पोस्ट आग्रही नाही वाटली आणि यात घाबरवण्यासारखं पण काही नाही.. घरी कुणी सांगणारे नसेल तर बाळाला कसे पाजावे हे दवाखान्यात समजून घेतलेले बरे.

(ही आधीच्या पोस्ट वर टिप्पणी नाही.सर्वांनी मनापासून सांगितलं आहेच.)
फार जास्त लोड घेऊ नका समीक्षा.डॉ सांगतात वाटी चमचा ते सेफर सेफेस्ट साईड असतेच.निपल नीट खळखळून धुतले न गेल्याने इन्फेक्शन वगैरे.पण आपण काळजी घेऊन स्वच्छ करतोच.
तुम्हाला त्यातल्या त्यात व्यवस्थित करता येईल, जमेल असा मध्य तुम्हाला नक्की मिळेल.तुम्ही सर्व प्रेमाने करता आहात.बाळच सांगेल काय आवडते काही नाही.निश्चिन्तपणे आयुष्यातला हा छान काळ एन्जॉय करा.
ब्रेस्ट फीड नर्स च्या मदतीने हॉस्पिटलमध्ये असल्यास जमले तर उत्तम.(चिन्मयीचं वाक्य 'ब्रेस्ट फीड करणार असल्यास 80% ट्रेनिंग हॉस्पिटलमध्येच होऊदे, घरी नंतर स्वतःला जमत नाही' अश्या अर्थाचं आहे.) न जमल्यास कोणताही गिल्ट सतत वाटून घेऊ नका.

जास्त टेन्शन घेऊ नका..सगळे असतात काळजी घ्यायला.. सो डोन्ट वरी..डॉ,नर्सेस सगळं सांगतात वेळेवर,काय आणि कसे करावे.
वर लिहिलेला फक्त अनुभव सांगितला.
Happy

शतावरी कल्प काय आहे? माझ्या डॉक ने दिले नाही मला.
अन पंचामृत कश्यासाठी असते मी ही घेतले नाही. अन सी सेक होणार असल्याने तूप दुधाचा प्रश्नच नाही.

नर्सिंगच्या काळात शतावरी कल्प दूध येण्याकरता मदत करतो. बाकी बाळ पीऊ लागलं की दूध येतच आपसुक. पण शतावरी कल्प अजुन मदत म्हणुन. मात्र २ शतावरी कल्प आहेत. एक लॅक्टेशनकरता आणि एक वृद्धांकरता. तो पहीला प्रसूतीनंतर महत्वाचा.

मला गेल्या दोन दिवसात दोन डोस बेथनेसोल इंजेक्शन दिले, रक्त कमी आहे म्हणून सलाईन मधून इंजेक्शन दिले. त्यामुळे बाळाला काही त्रास होतो का, माझी डॉप्लर टेस्ट पण 15 दिवसात दोन वेळा झाली सगळे रिपोर्ट चांगले आहेत पण कालपासून बाळाची हालचाल खूप कमी झालीये. हे बेथनेसोल इंजेक्शन मुळे होत असेल का, काळजी वाटते खुप

माहीत नाही..इथे विचारु शकते की नाही...related वाटला धागा म्हणून विचारतेय.. माझा मुलगा 2 वर्षांचा झालाय या महिन्यात.. मला कळत नाही त्याच स्तनपान कसं बंद करु... सध्या wfh मुळे घरीच असल्या मुळे सतत त्याला तलफ आली की प्यायला मागतो...नाहीतर रडारड करतो.. बाकी जेवण..सगळा चौरस आहार, मासे, अंडी सगळ खातोय..पण दुपारी, रात्री दूध हवच असत...कस बंद करु??? बाकी घरात मोठी मंडळी नाही आहेत..

..सगळा चौरस आहार, मासे, अंडी सगळ खातोय..पण दुपारी, रात्री दूध हवच असत...कस बंद करु?>>>>> नका बंद करू! उलट जितके दिवस अंगावर पित आहे तितके दिवस पिऊ दे. तुम्ही कॅल्शियमयुक्त आहार घ्या,तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने, कॅल्शियमच्या गोळ्या घ्या.

धन्यवाद देवकी... calcium च्या गोळ्या आहेत पण नियमित नाही घेण होत.. रात्री झोपताना दूध घेते..पण गोळ्यांच लक्षात ठेवीन

Pages