उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १० - लेहमधील १५ ऑगस्ट ... !

Submitted by सेनापती... on 22 August, 2010 - 09:19

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाने कालचा थकवा आणि शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. कालच्या दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री उशिराने झोपून देखील सर्वजण ७:३० वाजता निघायला हजर होते. हलकासा नाश्ता केला आणि पोलो ग्राउंडकडे निघालो. लेह मार्केटच्या थोड वरच्या बाजूला आहे हे पोलो ग्राउंड. फार मोठे नाही आहे पण ह्या सोहळ्यासाठी पुरेसे असे आहे. जम्मू-काश्मिरप्रमाणे इकडे परिस्थिति नसल्याने तशी फारशी सिक्युरिटी नव्हती. झेंडा वंदनासाठी विविध दलाचे, अनेक शाळा-कोलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रिय छात्र सेनेचे कडेट्स त्यांच्या बर्रेटवरच्या लाल हायकलमध्ये उठून दिसत होते. ह्या सर्वात 'महिला दले आणि छात्र सेनेच्या मुली' यांची संख्या लक्षणीय होती. नागरीकांची उपस्थिती सुद्धा खुप जास्त होती. मला खरच समाधान वाटले. श्रीनगर प्रमाणे इकडे वातावरण नाही. इकडे प्रत्येकाला लेह-लडाख हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे मनापासून वाटते.

आमच्यापैकी ज्यांच्याकडे SLR होते त्यांना जरा जवळून फोटो घेता यावेत म्हणुन नबी (गेस्टहाउसचे मालक) यांनी अमेय, उमेश आणि कुलदीप या तिघांना आत नेले. आम्ही बाकी सर्वजण जरा लांब उभे होतो. बरोबर ८:३० वाजता प्रमुख पाहूणे आले आणि त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. 'जन गण मन'चे सुर घुमु लागले. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आम्ही निश्चल उभे होतो. आम्हाला आज एक वेगळाच आनंद येत होता. नेहमीप्रमाणे शाळा-कोलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा न करता आम्ही एका निराळ्याच ठिकाणी तो साजरा करत होतो. झेंडावंदन झाल्यावर सर्व दलांनी राष्ट्रध्वजासमोरून संचलन केले. मला माझ्या कोलेजचे दिवस आठवत होते. असा एक १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी गेला नाही जेंव्हा मी घरी बसलो असेन. प्रत्येकवेळी कोलेजमध्ये तयारी करण्यात, मार्चिंगची प्राक्टिस करण्यात एक उत्साह असायचा अंगात. कोलेज संपल्यावर कामाला लागल्यापासून २ वर्षे ते सर्व काही चुकत होते. त्यामुळेच बहुदा आज एक निराळे समाधान मला लाभले.

*****************************************************
सैनिकांना उद्देशून लिहिलेले पत्र...

सैनिकहो ... स्वातंत्रोत्तर काळात गेल्या ६० वर्षात जेंव्हा-जेंव्हा शत्रुंनी सीमेवर यूद्धे छेडली, तेंव्हा-तेंव्हा आपण मोठ्या तत्परतेने मात्रुभूमीच्या रक्षणार्थ धावून गेलात. वारा-वादळे, उन-पाऊस, हिमवर्षाव आणि जगातल्या सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितिमध्ये पाय घट्ट रोवून उभे राहिलात. १९४८ च्या डोमेल पराक्रमापासून ते कारगिल युद्धापर्यंत आणि आत्तापर्यंत सुरु असलेल्या दहशदवाद विरोधातील सैनिकी जिद्दीला आणि अतुलनिय पराक्रमाला आमचा मानाचा त्रिवार मुजरा.

राष्ट्रभावनेच्या उद्दात्त हेतूने प्रेरित होउन, वैयक्तिक प्रश्नांना बगल देउन आपण या भुमीचे आधारस्तंभ बनता, तेंव्हा कुठे आमच्यासारखे तरुण आपणास निवांतपणे हे पत्र लिहू शकतात. या देशात आजही जिजाऊँसारख्या माता आपल्या शिवबांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत व शिवछत्रपतींसारखे पुत्र निर्माण करत आहेत. आपल्या प्रत्येकात आज सुद्धा शिवछत्रपतींचा एक अंश आहे आणि म्हणूनच आपली राष्ट्रभावना प्रचंड उच्च आहे. युद्धसदृश्य किंवा युद्ध परिस्थितिमध्ये अनेक दिवस अन्न-पाण्याशिवाय राहून, शत्रूला हुलकावण्या देत, अंगावर प्रचंड वजन घेऊनसुद्धा काटक व चपळ राहून, एका दमात प्रचंड अंतरे पार करीत आपण यशस्वी होता. अखेरच्या टप्यात शत्रूच्या नरडीचा घोट घेत देशाचा झेंडा मोठया अभिमानात पर्वत शिखरावर रोवता, तेंव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो. आज शत्रू फक्त सीमेवरच नव्हे तर सर्वत्र आहे. त्यास शोधून परास्त करण्याचे कर्तव्य आमचे देखील आहे. आम्ही ते पार पाडू याची आपण खात्री बाळगावी. आज प्रत्येकजण सिमावर्तीभागात जाउन सैनिकांशी संपर्क साधू शकत नसला तरी अशा मोहिमांमुळे हे शक्य होत असते. माझ्या सैनिकांनो, इकडे प्रत्येकाला तुमची आठवण आहे. काळजी आहे. सर्वात मुख म्हणजे सार्थ अभिमान आहे. आपण या देशाचे खरे आधारस्तंभ आहात. आपणास मनापासून मनाचा मुजरा. भारत माता की जय ... !

*****************************************************

सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला की १५ ऑगस्टचा दिवस तसा मोकळाच होता. आजच्या दिवसात दुपारी शॉपिंग उरकून बघायच्या राहिलेल्या 'अल्ची गोम्पा' आणि 'मॅग्नेटिक हिल' ह्या जागा बघायच्या होत्या. दुपारच्या जेवणापर्यंत शॉपिंग उरकायचे आणि लंच करून फिरायला निघायचे असे ठरले. आता सुरू झाली मार्केटमधली भटकंती. कूणी ह्या दुकानात शिरले तर कोणी त्या. लडाखला एम्ब्रॉयडरी केलेले खुप छान छान टी-शर्ट मिळतात. मी खुप सारे बनवून घेतले तसे. शिवाय आम्ही सर्वांनी एक टिम टी-शर्ट बनवून घ्यायचे ठरवले. काळ्या रंगाच्या टी-शर्टवर 'जम्मू ते लेह' आणि 'लेह ते दिल्ली' असा नकाशा बनवून घेतला. ह्या संपूर्ण रस्तामध्ये जी-जी महत्वाची ठिकाणे आणि पासेस आम्हाला लागले ते उंचीसकट त्यावर शिवून घ्यायचे होते. कारागीर ईब्राहीम भाईला सर्व डिटेल्स दिले आणि १ दिवसात ऑर्डर पूर्ण करून ठेवायला सांगितली. हे सर्व होईपर्यंत सर्वजण खरेदी संपवून एका होटेलमध्ये घुसले होते. जेवाय-जेवाय केले आणि भटकायला निघालो.

दुपारी अल्ची गोम्पासाठी पुन्हा खालसेच्या दिशेने निघालो. आम्ही सर्वजण बाइक्स ७०-८० च्या स्पीडला टाकत एकदम फुल तू राम्पार्ट रो... ४ च्या आसपास डावीकडे अल्ची गोम्पाचा बोर्ड दिसला. आम्ही हायवे सोडून डावीकडे ब्रिज पार करत नदी पलीकडे गेलो आणि पुढे लगेच मॉडर्न व्हिलेज ऑफ़ अल्ची लागले. अल्ची गावत पोचलो आणि १००० वर्षे जुने 'गोम्पा' बघायला गेलो. गोम्पाकडे जाताना आजूबाजूला सगळीकडे सफरचंद, पीच आणि जर्दाळूची झाडे होती. खुद्द गोम्पामध्ये प्रवेश केल्या-केल्या समोरच एक जर्दाळूचे झाड़ होते आणि त्याला अश्शी खालपर्यंत जर्दाळू लागलेली होती. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच. गोम्पा राहिले बाजुलाच आणि आम्ही तुटून पडतो त्या जर्दाळूच्या झाडावर. एकदम असा हल्लाबोल केल की काय विचारूच नका. हे तोड़.. ते काढ.. गाडीच्या हेलमेट मध्ये भरून घेतली इतकी जर्दाळू तोडली.

अल्ची गोम्पामध्ये फोटो काढायला बंदी आहे शिवाय प्रवेश करायला ३० रुपये प्रवेश फी आहे. रिनचेन झांग्पो (Rinchen Zangpo) याने १००० साली ह्या गोम्पाची स्थापना केली. बाहेरील ३ मजली बांधकाम पूर्णपणे लाकडाचे आहे. येथे एकुण ३ विहार आहेत. पहिल्या विहारात मातीच्या बनवलेला अत्यंत जुन्या ३ बुद्ध मुर्त्या येथे आहेत. २ मजली तरी नक्की असाव्यात. हा प्राचीन कलेचा वारसा जपला नाही तर लवकर त्या नष्ट होतील की काय अशी भीती वाटते. पुढच्या विहारामध्ये सुद्धा काही जुन्या बुद्ध मुर्त्या आहेत पण येथे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भिंतीवर काढलेली निरनिराळ्या देवांची भित्तिचित्रे. ह्यामध्ये आम्हाला ३ ठिकाणी चक्क 'श्री गणेशाची प्रतिमा' आढळून आली. बाकी बरीच चित्रे आता पाण्यामुळे अस्पष्ट झाली आहेत. तिसऱ्या आणि सर्वात शेवटच्या विहारामध्ये सर्वात विलोभनीय आहे डाव्या भागात असलेली सहस्त्रहस्त असलेली भगवान बुद्ध यांची धातूची मूर्ती. या शिवाय उजव्या भागात भगवान् बुद्ध आणि त्यांचा परिवार यांच्या धातूच्या प्राचीन मुर्त्या आहेत. ह्या सर्व मुर्त्या अतिशय सुंदर असून त्यांची चांगली निगा राखली गेली आहे. त्यांचे दर्शन घेउन ५ वाजता तिकडून निघालो आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.

परतीच्या मार्गावर सासपोल मध्ये रस्त्याच्या बाजूला असलेली सफरचंदाची झाडे पाहून मोह आवरला नाही. शेवटी बाईक रस्त्याच्या बाजूला लावली आणि चढलो बाजुच्या भिंतीवर. झाडाची एक डहाळी रस्त्यावर बाहेर आली होती त्यावरून सफ़रचंद तोडली. लहानपणी कुठे कोणाच्या बागेत असे आंबे नाहीतर चिकू तोडायचो त्याची आठवण आली एकदम. पुढे निघालो तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या छोट्या-छोट्या गावांमधून लडाखी घरांचे दर्शन होत होते.

कुठे माती-विटांची तर कुठे सीमेंटची घरे. पण काही वैशिष्ट्ये असलेली. मोठ्या-मोठ्या लाकडी खिडक्या आणि त्यावर नक्षिकाम असणारी घरे. घरांच्या छतावर चारही बाजूने मातीचे साचे करून त्यात छोटी झाडे लावलेली असतात. या शिवाय शुभचिन्हे म्हणुन छतावर बहुरंगी पताका ज्याला 'प्रेयर फ्लाग्स' असे म्हणतात त्या लावतात. छोटेसे पण टुमदार असे हे लडाखी घर.

आता थेट 'मॅग्नेटिक हिल'ला पोचलो. इकडे रस्त्याच्या मधोमध एक चौकोन काढला आहे. त्यात गाडी उभी केली की मॅग्नेटिक इफेक्ट जाणवतो म्हणे. वेगाने जाणाऱ्या गाडीचा स्पिड सुद्धा कमी होतो, एक्सेलरेट केली तरी गाडी पळत नाही असे ऐकले होते. असे काहीसे आमच्यासोबत येताना झाले होते. कुलदीपने तर चौकोनामध्ये स्वतः उभे राहून उड्या मारून पाहिल्या. मी म्हटले 'तुझ्या अंगात काय मेटल आहे का?' आदित्यला बाईकवर इफेक्ट जाणवत होता मला मात्र तेंव्हा अजिबात जाणवला नाही.म्हणुन मग मी बाईक रस्त्यावरुन खाली टाकली आणि अक्षरश: त्या 'हिल'वरती जिथपर्यंत बाईक जाईल तिथपर्यंत नेली. चढवताना मज्जा आली पण जशी ती चढायची थांबली तशी फिरवताना मात्र लागली बरोबर. कशीबशी न पड़ता फिरवली आणि सुसाट वेगाने उतरायला लागलो. अर्धातास तिकडेच नव-नवीन प्रयोग करत होतो आम्ही. जसा अंधार पडत आला तसे आम्ही तिकडून निघालो. परतीच्या वाटेवर अतिशय सुंदर असा सूर्यास्त आम्हाला बघायला मिळाला. डोंगर, सूर्यकिरणे आणि ढग यांचा सुंदर मिलाफ.

८ वाजता सर्वजण गेस्टहॉउस वर पोचल्यावर 'जेवायला कुठे जायचे' हा एक यक्ष प्रश्न होता. २ दिवस ड्रीमलैंड मध्ये जेवलो होतो तेंव्हा तिकडे नको जायला असे ठरले. मी ड्रीमलैंडच्या अगदी टोकाला 'मोनालिसा' म्हणुन मस्त गार्डन रेस्तरंट शोधले. आज जेवणासोबत चिकन आणि वेज 'मोमोस' खाल्ले. जेवण आटपून ११ वाजता होटेल वर परत आलो. उदया सकाळी खर्दुन्ग-लासाठी लेह सोडायचे होते. सामानाची बांधाबांध केली आणि झोपी गेलो. आजच्या लेह मधल्या झेंडावंदनानंतर उदया झेंडा रोवायचा होता तो जगातल्या सर्वोच्च रस्त्यावर. तो क्षण अनुभवायला आम्ही सर्वच उत्सुक होतो. आता प्रतीक्षा होती ती उद्याच्या सुर्योदयाची...

पुढील भाग : खर्दुंग-ला १८३८० फुट उंचीवर ... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान भाग. त्या गोंपामध्ये फोटो काढायला मिळाले असते तर आम्हांलाही घर बसल्या १००० सालच्या मूर्त्यां बघितल्याचा आनंद लुटता आला असता.
>>>पुढच्या विहारामध्ये सुद्धा काही जुन्या बुद्ध मुर्त्या आहेत पण येथे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भिंतीवर काढलेली निरनिराळ्या देवांची भित्तिचित्रे. ह्यामध्ये आम्हाला ३ ठिकाणी चक्क 'श्री गणेशाची प्रतिमा' आढळून आली.>>>>

अरे वा, चक्क बुद्ध मुर्त्या आणि गणपतीबाप्पा एकत्र नांदतायत नी इथे काही लोकं उगाचच हिंदू द्वेष मनात धरुन बसली आहेत.

छान! Happy

छान Happy