वेदकालीन संस्कृती भाग २

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

वेदकालीन संस्कृती भाग १

प्रस्तुत लेखात हडप्पा-मोहंजदाडो संस्कृती थोडी विस्तृत स्वरुपात पण आर्य-अनार्य संकरासहित त्याचे मूल्य काय, त्यांचे देव व ह्या देवांची आर्यदेवांशी तुलना, इंग्रजी विद्वानांचे ह्यावर मत असे सर्व मांडण्याचा प्रयत्न आहे. लेख कालावधी व त्याची व्याप्ती खूप मोठा असल्याने काही भाग त्रोटक वाटू शकतो. तो दोष माझा आहे कारण मग ती ओळख न ठरता भाष्य ठरले असते, व भाष्य लिहिण्याइतका माझा अभ्यास अजिबात नाही. माझ्या मर्यादा ओळखूनच ही त्रोटक ओळख सादर करत आहे.

मागील लेखात आपण आर्यपूर्व असलेल्या हडप्पा - मोहंजदाडो ह्या संस्कृतीकडे लक्ष वेधले होते. त्या संस्कृती मध्ये मूर्तीपूजेला देखील महत्व होते हे उत्खननात सापडलेल्या मूर्तींवरुन लक्षात येते. उत्खनन करताना जे सील सापडले आहेत, त्यावर कोरीवकाम आहे व ती त्या संस्कृतीची भाषा आहे, त्याला अजूनपर्यंत डिकोड करता आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या भाषेबद्दल काही सांगता येत नाही, पण हे सील सापडल्यामुळे आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांच्याकडे भाषा होती व ती लिहीता देखील येत होती. म्हणून लिखाण ह्या कलेचा सुमेरियन संस्कृतीने (मेसोपोटेमिया) शोध लावला हे गृहितक देखील फोल ठरते. (हा माझा निष्कर्ष आहे, चुकीचा असू शकतो.) मेसोपोटेमियामध्ये ख्रिस्तपूर्व ३५०० वर्षांपूर्वी सुमेरियन संस्कृती नांदत होती. हा भाग आजच्या इराणमधील होय. आपण दस्यु हा शब्द पाहिला, जो इराणी भाषेशी मिळता जुळता आहे, शिवाय इराणातून देखील भारतात लोक स्थलांतरीत झाले आहेत. (लंबकपाली वगैरे) हा शब्द जर आर्यांनी (इराण मार्गे) बरोबर आणला, तर असे सहज सिद्ध होते की आर्यपूर्व संस्कृतीमध्ये लिखाणकला बहरास आली होती.

१९३३ ते १९६४ मधील संशोधनानुसार आर्यांची संस्कृती (उदा. धर्म, तत्वज्ञान, कला, साहित्य) ही आर्येतर वा अनार्यांपेक्षा उच्च होती, हा समज दूर होत आहे कारण, सिंधूसंस्कृतीमधील हडप्पा-मोहंजदाडोमध्ये सापडलेल्या वस्तू. हडप्पा नामशेष झाल्यावर नगररचनेची कला (पाहा http://www.harappa.com/har/har0.html ) त्यांच्यासोबत एकतर नाहीशी झाली, वा आर्यांना ती कळली नाही. नगररचनेचे तंत्र हे सिंधूसंस्कृतीपेक्षा जुने होते. आर्यांच्या नगरातील रस्ते हे कायम धुळीने माखलेले असत त्यामुळे सूत्रकाळापर्यंत आर्य ब्राह्मणांना नगरवास पसंत नव्हता. बौधायन धर्मसूत्रात नगरात वस्ती करणे हे अपावित्र्यकारक आहे असा उल्लेख आहे, कारण नगरात धूळ असते. (आजची भारतातील अवस्था बघता, नगररचना आपण समजूनच घेतली नाही हा कयास खरा ठरतो. Happy ) हड्डप्पा-मोहंजदाडो उत्खननापूर्वी पश्चिमी विद्वान सुसंस्कृत भारताचा इतिहास नॉर्डिक टोळ्यांच्या आक्रमणापर्यंत, म्हणजे इ.स.पूर्व १५०० च्या आसपास नेत. हा कालावधी मॅक्समुलर याने निश्चित केला. त्यावरुन आर्य हे प्रगत होते हे गृहितक त्याने बांघले होते, जे नंतर चुकीचे निघाले. पण अजूनही, अनेक भारतीय आर्य आक्रमण व त्यांची प्रगत संस्कृती गृ्हीत धरुन चालतात. व्हिलर व मार्शल हे सिंधूसंस्कृतीचे अभ्यासक असे मानतात की आर्यांच्या आक्रमणामुळे व लुटारु टोळ्यांमुळे सिंधूसंस्कृती लयाला गेली. ॠग्वेदातील आर्य हल्ले करुन दस्यु, व पणी यांचे धन लुटत. त्यांची नगरे फोडत. शबर* ह्या दस्यू राजाची नव्याण्ण्व भक्कम पुरे फोडली व त्याचे एक लाख लोक मारले असा एक उल्लेख आहे. ( ७|९९|५)

सिंधूसाम्राज्य हे तत्कालीन मेसोपोटेयीन सुमेरियन राजांपेक्षा फार मोठे असावे हे केवळ दोन नगरींमधील अंतरावरुन दिसते. हडप्पा ते मोहंजदाडो मध्ये ४०० मैलाचे अंतर आहे, ह्यावरुन तो अंदाज सहज यावा. कार्बन डेटिंगनुसार सिंधूसंस्कृतीचा नाशसमय इ. स. पूर्व २३५० असा ठरवला आहे. तर आर्य भारतात इ. स. पूर्व १५०० च्या आधी आले नाहीत असेही हे विद्वान धरुन चालतात. मग हा ८०० ते ९०० वर्षाचा कालावधी कसा भरुन काढायचा हाही प्रश्न उरला आहेच. काही अभ्यासकांच्या मते हाच काल, ज्यात महाभारत झाले. वैवस्वत मनूचा कालावधी इ स पूर्व ३१०० आहे. त्याने प्रलयंकारी महापुरातून वाचवून परत मानवसमाजाची स्थापना केली असे मानले जाते. (शतपथ ब्राह्मण्य १|८|४ काठक संहिता ११|२ ). बायबल वाचले तर हीच कथा बायबल मध्येही आहे. Happy

नॉर्डीक लोकांचा मूळ प्रदेश कोणता हे सांगता येत नसला तरी सध्याचे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी ह्यापैकी भाग ह्यांचे मूलस्थान आहे असे मानले गेले आहे. मध्य जर्मनीत इ स पूर्व ३००० च्या आसपासची भूमितीय तंत्राने घडवलेली अवजारे सापडली आहेत. ती ह्या नॉर्डीक वंशाने निर्मिली आहेत असे मानतात. पण ह्याबद्दल दुमत आहे, कारण रशियाच्या भागात, ह्यापेक्षा पुराणी पण तशीच अवजारे मिळाली आहेत. येथून इंडोयुरोपीय जमाती फुटून निरनिराळ्या भागात गेल्या. त्यांचे दोन भाग झाले इत्ताइत आणि इंडोइराणी. हित्ताइत ही जमात आशियातून मेसोपोटोमियात शिरली. इथे एक तह नमूद करावासा वाटतो तो म्हणजे हित्ताइत जमातीचा राजा व मितन्नी जमातीचा राजा ह्यांमध्ये इस पूर्व १४०० च्या सुमारास झालेल्या तहनाम्यात इंद्र, मित्र, वरुण व नासत्य (अश्विदेव) हया देवांचा निर्देश आहे. ते तहनामे बोधझ्-कोई येथे सापडले आहेत.

देवांचा विषय आहेच तर थोडे पुढे येऊन आर्य व अनार्य देव व वर्णव्यवस्थेकडे वळू.

मध्यसमुद्रीय प्राचीन युरोपियनांमध्ये ( म्हणज पेगन्स, अगदी आजही हे काही देशात आहेत) देवीमातेची पूजा प्रचलित होती. इजिप्तसंस्कृतीमधील उत्खननात क्रीट बेटावर देवीमूर्ती सापडल्या आहेत, त्यांच्यातही देवी पूजा होती व त्या खालोखाल पृथ्वीला माता समजण्याची प्रथा होती. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी भारतात आणल्या. द्यौष्पिता व पृथ्वीमाता स्तवने ऋग्वेदात आढळतात. ( ह्याचा अर्थ असा नाही की ऋग्वेद तिथे तयार झाले. ह्याचा अर्थ असा की संकर निर्माण होत गेला व तत्वज्ञान बदलत गेले). पृथ्वीला आपण अदितीमाता/ आदिमाय म्हणतो, व देवांची निर्मिती तिने केली अशा काही कथा पुराणात आहेत. शिव उमा पूजा संप्रदाय भारतात आहे. क्रीटमधील जन हेच तामिळ (वा दक्षिण भारतीय द्रविड) होत असेही एक अभ्यासू संप्रदाय मानतो.

देवांबद्दल पूजेबद्दल बोलतच आहोत तर आपण पूजेबद्दलही पाहू. आर्यांची आणखी एक देणगी म्हणजे पशुयज्ञ व होम. प्राण्यांचे किंवा पशूचे बलिदान करण्याची प्रथा त्यांचात होती. देवतेपुढे बलिदान करण्याची प्रथा ही अप्रगत समाजाचे लक्षण होय. संकरानंतर आर्यांनी होम, हवन व यज्ञ बर्‍याच अंशी बंद करुन पूजेस प्राधान्य दिले असा कयास एक अभ्यासू वर्ग मांडतो. पूजा हा शब्द चारही वेदांच्या संहिता व त्यास पूरक असणारे ब्राह्मण ग्रंथात* आढळत नाही. पूजा हा शब्द द्राविड शब्दांवरुन अधिक चांगल्या रीतीने भाषाशास्त्रज्ञांनी व्युत्पन्न करुन दाखविला आहे. म्हणून असे अनुमान काढता येईल की ह्या दोन्हींचा संकर झाल्यावर हिंदू धर्मात होम व हवन हे कमी होऊन पूजेला प्राधान्य मिळाले. पूजेबाबत, गीतेत ( ९,२६) श्रीकृष्णाने सांगितले आहे, की पत्र, पुष्प, फळ व जल भक्तिपूर्वक अर्पण केल्यावर पूजा पूर्ण होऊ शकते.
मग ज्यांची पूजा स्वीकारली, त्यांचे देव स्वीकारण्यास काय हरकत? तर देवही स्वीकारले. शिव-पार्वती, विष्णू-लक्ष्मी , राम, कृष्ण व उपदेवता जसे नाग, हनुमान, गरुड, भैरव, स्कंध गणेश इत्यादी. ह्या सर्व उपदेवतांवर एकेक पुराण आहेत, उदा गरुडपुराण, स्कंधपुराण, गणेशपुराण इत्यादी. जर आपण वर्णन पाहिले, तर राम, कॄष्ण हे दोन्ही अवतार आर्यांसारखे गोरे नाहीत. मेघासमान काळे, वा मेघासमान निळे आहेत, बालाजी काळा आहे, यावरुन ते देव आर्यांचे नाहीत व द्रविडांचे आहेत हे सहज अनुमान निघते. वेदांमधील देव रुद्र, ज्याला शिव पण म्हणतात, त्याची पत्नी उमा हिचा वेदात उल्लेख नाही! लिंगपूजा (शिवलिंग) ही मूळची वेदपूर्वकालीन जनांची आहे. तसेच शिव ह्या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधून होत नाही. तामिळ 'शिवन्' (लाल) या शब्दावरुन त्याची व्युत्पत्ती सिद्ध होते. वेदात 'नीललोहित' (निळा लाल) हे शिवाला विशेषण आहे. निळा कंठ व लाल देह असलेला. तामिळमधील 'विण्' (आकाश) हा शब्द देखील विष्णूचे प्राकृत रुप दाखवतो. विष्णूचा वर्ण देखील निळसर आहे असे हिंदू मानतात. तसेच वर दिलेले राम व कृष्ण, हिंदूलोक विष्णूचा अवतार मानतात. हे देव आर्येतर आहेत. कृष्णाचे आणि इंद्राचे युद्ध आपणा सर्वांना (गोवर्धन) माहित आहेच. आपला अजून एक आवडता देव म्हणजे गणपती. स्कंद व गणेश हे मूळचे द्रविडी देव. हा गणपती आधी विघ्नकर्ता होता. त्याला विघ्नहर्त्याचे स्वरुप नंतर प्राप्त झाले. त्याने वैदिकांना त्रास देण्यास (संकरकालात) सुरु केले त्यामुळेच स्मॄतींमध्ये विनायकशांतीकर्म हे पण सांगीतले आहे.

सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मारुतीचे चित्र किंवा मूर्ती सापडली आहे. हनुमानास पुजणारा संप्रदाय भरपूर प्रमाणात आहे. हनुमानकवच इत्यादी स्त्रोत्रांवरुन तो भूत, प्रेत, पिशाच्च, राक्षस इ. कडून सुटका करतो, त्याचे वास्तव्य पिंपळ, वड इत्यादी वृक्षांच्या पारावर किंवा वेशीबाहेर आढळते. यावरुन अदिवासी समाजाचा देव सिंधू संस्कृतीने व नंतर आर्यांनी स्वीकारला असे मानावयास हरकत नसावी. तामिळ मध्ये 'अणूमन्ति" म्हणजे नर वानर. त्याचे सूक्तात भाषांतर होताना वॄषाकपि असे झाले. इंद्र, वरुण, मित्र इ आर्यांचे देव. त्याकाळात हा संकर होताना हनुमानाला वायुचा पुत्र म्हणून गौरविले गेल. पुत्र ह्या विषयावर आहोत तर पुत्र म्हणजे काय हे पण पाहू.

पुत्र म्हणजे ज्याची आपल्यापासून उत्पत्ती होतो तोच असा अर्थ वेदकालात नव्हता. वसिष्ठ व विश्वामित्राला १०० पुत्र होते असा वेदांमध्ये उल्लेख आहे. प्रजापती ह्या देवापासून प्रजा उत्पन्न झाली असे आपण आज मानतो, थोडे खोलवर विचार केला असता त्याचा अर्थ नीट उलगडतो. प्रजापती स्वतःच्या बीजापासून किंवा मनाच्या योगाने (इथे अर्थ वेगळा) प्रजेची प्राप्ती करुन घेत असे. स्वतःपासून न जन्मलेली प्रजा मानसिक संकल्पाने स्वतःची होते, ह्यास पुत्रविधी म्हणत. पुत्रांचे खालील प्रकार आढळत. औरस, क्षेत्रज, दत्तक, क्रीत, कानीन, सहोढ, अपविद्ध, पुत्रिकाप्त्र, स्वयंदत्त, पौनर्भव, गूढज, कृत्रिम, व पारशव असे हे तेरा प्रकार. पैकी औरस, दत्तक हे आजही रुढ आहेतच.

विश्वामित्राच्या १०० पुत्रांत त्याने शुनःशेपाला पुत्र म्हणून स्वीकारल्याची कथा ऐतरेय ब्राह्मणात आहे. त्याचा ज्येष्ठपुत्र म्हणून विश्वामित्राने शुनःशेपाची घोषणा केली तेंव्हा ह्या मानसपुत्राला विश्वामित्राच्याच आन्ध्र, पुण्ड्र, शबर, पुलिंद, मूतिब ह्या तेंव्हा असलेल्या पुत्रांनी मान्य केले नाही. त्याची निंदा केली, त्यामुळे विश्वामित्राने ते पुत्र असूनही नीच मानले, असे ऐतरेय ब्राह्मण सांगते. निरनिराळ्या मानवगणांस पुत्र म्हणून कर्तबगार वैदिक पुरुष स्वीकारीत. वरील पुत्रांपैकी काही पुत्र हे दास कुलाचे होते. आधी लिहिल्याप्रमाणे दास ह्या शब्दाचा अर्थ दास हा नाही तर अनार्य. म्हणजे आर्यांपूर्वीचे रहिवासी. वैदिककालात मानसिक संकल्पाने बहुतांचा समावेश होऊन स्वतःच्या कुलाचा विस्तार करत. मग ह्यातील काही पुत्र ब्राह्मण तर काही क्षत्रिय असत.

ऋग्वेदात दस्यु वा दास हा शब्द अनेकदा आहे. त्याचा अर्थ मी वर सांगीतला आहे. ह्या कल्पनेला फार महत्व आहे कारण ह्यावरुन वर्णभेद दिसत नाही. वर्ण ही संज्ञा वेदात कुठेही नाही. पुढे आलेल्या पुरुषसूक्तात जरुर आहे. म्हणून जेंव्हा वर्णौ असा शब्द ऋचांमध्ये येतो तो आजच्या चातुर्वण्याशी संबंधित नाही तर दस्यु व आर्य ह्यांच्या त्वचावाचक आहे. दस्युलोक काळे, सावळे तर नॉर्डिक आर्य हे गोरे होते.

विश्वामित्राचे आंध्र व शबर इ पुत्र गण वाचक आहेत. त्यांनी कल्याणमार्ग (म्हणजे वरील शुनःशेपाची कथा) मानला नाही म्हणून ते दस्युच राहिले असे ऐतरेय ब्राह्मण म्हणते. ही कथा हे स्पष्ट करते की दासांना आर्यगटात सहजपणे मुक्त प्रवेश होता. तो कालच वर्णसंकराचा होता कारण आर्यांकडे जे होते ते दस्यु वा मूळ प्रजेकडे नव्हते, व मूळ प्रजेकडे असलेला प्रगतपणा / भौतिक सुख आर्यांकडे नव्हते.

आजची आपली गोत्रे म्हणजे गणसंस्थेचीच रुपे आहेत. ह्या गणसंस्था होताना क्षत्रियांचे ब्राह्मण व ब्राह्मणांचे क्षत्रिय बनले असे मानावयास जागा आहे. विश्वामित्र आधी क्षत्रिय होता, मग ब्राह्मण झाला हे सर्वांस माहिती आहेच पण महाभारतकाली असे परिवर्तन चालू होते. कर्णपर्वात कर्ण शल्यास त्याच्या देशाची निंदा करताना म्हणतो, " वाहीक देशात (आजचा पंजाब) ब्राह्मणाचे क्षत्रिय, वैश्य व नापित होतात व पुन्हा त्याचे ब्राह्मण होतात. तुझ्या देशात जारज* स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. तुझ्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी समागम करतात, गाणी गातात, मद्य पितात. मद्रदेशाच्या शेजारामुळे गांधारही बिघडत चालला आहे. शूद्रांपासून अन्य स्त्रियांचे ठायी झालेले ब्राह्मण तुझ्या देशात आहेत. आरट्ट देशात पोटच्या पोरांना तुम्ही वारसा हक्क डावलता. (भारत - कर्णपर्व ८/४५/६-८) हे फक्त कर्णच असे म्हणतो असे नाही तर नारदही शांतीपर्वाच्या ३२८ व्या अध्यायाचे व्यासांना हेच सर्व सांगून वाहीक देशात गोंधळ माजू शकतो असे प्रतिपादन करतो. कर्णाच्या मते सुराष्ट्रातील व्यक्ती संकरवृत्ती आहेत. सूत प्रजा देखील ही आर्य-शुद्रसंकोरोत्पन्न होती हे भारत व स्मृतिवांडःमया वरुन निश्चित होते. संकरप्रजेतील काही लोक हे नेते बनले. (उदा कृष्णद्वैपायन व्यास, वाल्मिकी, विदूर इ ) वर्णभेद नेमका कधी का कसा घडला हे सांगता येणे कठिण आहे पण वरील ऋचा, सूक्ते हेच दर्शवितात की तत्कालिन संस्कृतीत मनुष्यजन्मावर काहीही आधारित नव्हते. मनुस्मॄती मध्ये एक श्लोक आहे,

'तपोबीजप्रभावैस्तु तें गच्छन्ति युगे युगे |
उत्कर्ष चापकर्ष च मनुष्येष्विह जन्मतः || (मनु १०|४३ )
अर्थ - ते सर्व युगात येथे मनुष्यामध्ये जन्म घेउन तप किंवा बीज यांच्या प्रभावाने उत्कर्षाला व अपकर्षाला प्राप्त होतात. शूद्रांचे ब्राह्मण होतात, ब्राह्मणांचे शूद्र होतात. हीच गोष्ट क्षत्रिय व वैश्य यांच्या संबंधी समजावी. (मनु १०|६५ )

यज्ञ किंवा मन्त्र यांच्या योगाने प्रजापतीने चार वर्ण निर्माण केले, असे वेदात काही ठिकाणी सांगितले आहे. (वाजसनेयी संहिता १५|२८-३०, शतपथ ब्राह्मण २|१|४|१३, तैत्तरिय ब्राह्मण ३|१२|९|२ इ इ ) पण आधी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या जाती निर्माण झाल्या नव्हत्या, आणि त्या वर्णात कॊणीही कधीही प्रवेश करु शकत असे. उदा. अंगिरस, अंबरीष व यौवनाश्व हे मूळ क्षत्रिय होते पण ते कर्माने ब्राह्मण झाले. गोत्र पाहिले तर त्यांची गणना त्यात आहे. क्षत्रवृद्ध या क्षत्रियापासून सुहोत्र, गृत्समद हे ब्राह्मणवंश निर्माण झाले. गृत्समदापासून शुनक (शौनक) हा चार वर्णांचा गण बनला. अंगिरस व भार्गव यांच्या वंशांचा गण बनला. ऋषभदेवांच्या शंभर पुत्रांपैकी (पुत्राची व्याख्या पाहा) ९० क्षत्रिय तर १० ब्राह्मण झाले. भटक्या लढाउ जमातींना व्रात्यस्तोमाने पावन करुन घेऊन त्रैवर्णिकात समावेशन करण्याचा विधी तांड्य ब्राह्मणात (१७|२ ते ४) सांगीतलेला आहे. पुढे व्रात्याचा अर्थ वेगळा झाला.

अशा गणसंस्थाचे वर्णव्यवस्थेत रुपांतर पुढे होत गेले असावे. वर्णभेद कदाचित वेदा्च्या शेवटच्या यजुर्वेदांच्या कालात वा ब्राह्मण ग्रंथ निर्मितीच्या काळात सुरु झाला असावा. कारण ब्राह्मण व क्षत्रिय या वर्णांचा झगडा ह्याच काळात दिसतो. ( उदा परशूराम - क्षत्रिय युद्ध). वर्णपरिवर्तनाची क्रिया केंव्हा तरी कमी झाली असावी व पुढे ती बंदच झाली. तसेच भौतिक उन्नती व्हायला सुरुवात झाल्यावर अर्थव्यवस्था निर्माण होते व कुठल्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेत शोषक व शोषित समाज तयार होतात. ह्यावर भाष्य करावयाचे म्हटले तर ज्ञात इतिहासातील सर्व अर्थव्यवस्थेंचा तौलनिक अभ्यास करावा लागेल. तो एक स्वतंत्र लेख होऊ शकेल.

एक मला जाणवलेला मुद्दा असा की आजच्या भारतात कुठेही इंद्र हा मुख्य देव नाही. राम, हनुमान, गणपती, शिव, कृष्ण हेच आपले आजचे मुख्य देव आहेत. इंद्रांची व सुर्याचीउपासना खूप कमी लोक करतात, अपवाद केवळ अग्निदेवाचा. त्याची उपासना अनेक होमांतून आपण आजही करतो. हे मुळ अदिवासी संस्कृतीने आर्यांनी आणलेल्या बदलाला पचवून घेऊन त्यावर विजयही मिळवला असेच वाटते.

आता आपण थोडे काही पूर्वग्रहदुषित इंग्रजी लोकं ह्या संस्कृती बद्दल काय म्हणतात ते पाहू.

सन १७४८ मध्ये विल्यम जोन्स हे इंग्रजी विद्वान असे मांडतात की भारतात रानटी लोक राहत व आर्य आल्यावर भारतात संस्कृतीचा उदयास सुरुवात झाली. त्यांनी ग्रीस, इटली, पूर्व युरोप इ देशांचा अभ्यास करुन भारताशी तुलना केली व हे मत मांडले. हिंदू देवता लक्ष्मी, पार्वती आणि दुर्गा देवी ह्या अनुक्रमे Ceres, Juno आणि Minerva ह्या देवी होत असे संशोधन त्याने मांडले. पुढे जाऊन ते रामा बद्दल लिहतात.

“RAMA and CRISHNA, must now be introduced, and their several attributes distinctly explained. The first of them, I believe, was the DIONYSOS of the Greeks.”

“The first poet of the Hindus was the great VALMIC, and his Ramayan is an Epick Poem… comparison of the two poems (the Dionysus and the Ramayan) would prove DIONYSUS and RAMA to have been the same person; and I incline to think, that he was RAMA, the son of CUSH, who might have established the first regular government in this part of Asia.”

इतकेच नाही तर मोझेसचा उल्लेख करुन ते वर म्हणतात की

"This epitome of the first Indian History… though whimsically dressed up in the form of an allegory, seem to prove a primeval tradition in this country of the universal deluge described by MOSES, and fixes consequently the time when the genuine Hindu Chronology actually begins.”

“We may suspect that all the fourteen MENUS are reducible to one, who was called NUH by the Arabs, and probably by the Hebrews; though we have disguised his name by an improper pronunciation of it. Some near relation between the seventh MENU and the Grecian MINOS may be inferred.

वरील संशोधन हडप्पा-मोहंजदाडो संस्कृती सापडण्याआधीचे आहे व त्यामुळेच धांदात खोटे आहे हे लगेच लक्षात येते. आर्य आक्रमण झाले की नाही ह्यावर अजूनही वाद आहेत. पण जे लोक आर्य आक्रमण झाले असे म्हणतात वा म्हणत असत, ते श्री. जोन्स ह्यांचा नेहमी संदर्भ देत असतात पण त्याचवेळी सिंधूसंस्कृती विसरतात. नॉर्डिक लोक आले हे निर्विवाद सत्य आहे पण त्यांची संस्कृती मूळ लोकांपेक्षा प्रगत होती हे मात्र असत्य आहे. काही करुन संस्कृतीचे मूळ मोझेस, अन् पर्यायाने येशूकडे वळवायचे होते. हा केविलवाणा प्रयत्न सिंधूसंस्कृती उत्खननामुळे बर्‍याच प्रमाणात उघडकीस आला. ह्या विषयावर अजून संशोधन व्हायला पाहिजे. पण सिंधूसंस्कृती जिथे विकसित झाली, तो भूभाग आजच्या पाकीस्तानात आहे, व ते किती सहकार्य करतील हे सर्वांना ज्ञात आहे, त्यामुळे जो पर्यंत आणखी काही जुने मिळत नाही तो पर्यंत आपण सिंधूसंस्कृतीपर्यंतच मागे जाऊ शकतो. पण विचार करण्याचा भाग असा, की जर सिंधूसंस्कृतीत पूर्णत्वाला गेलेली नगरे असतील, भाषा असेल तर, मुद्रणकला, शिल्पकला इ. विकसित झाली असेल, तर त्या आधी कित्येक हजारो वर्षे भारतवर्षात माणूस राहिला असेल?

ह्याच विल्यम जोन्स ह्यांचे आणखी एक संशोधन पाहा.

“I cannot help mentioning a discovery which accident threw in my way, (I) thought my proofs must be reserved for an essay which I have destined for the fourth volume of your Transactions. To fix the situation of that Palibothra which was visited and described by Megasthenes, had always appeared a very difficult problem.”

“…but this only difficulty was removed, when I found in a classical Sanscrit book, near 2000 years old, that Hiranyabahu, or golden-armed, which the Greeks changed into Erannoboas, or the river with a lovely murmur was in fact another name for the Son itself, though Megasthenes, from ignorance or inattention, has named them separately. This discovery led to another of greater moment; for Chandragupta, who, from a military adventurer, became, like Sandracottus, the sovereign of Upper Hindostan, actually fixed the seat of his empire at Patliputra, where he received ambassadors from foreign princes; and was no other than that very Sandracottus who concluded a treaty with Seleucus Nicator; so that we have solved another problem, to which we before alluded, and may in round numbers consider the twelve and three hundredth years before Christ

म्हणजे जोन्स साहेब आपला पूर्ण इतिहास गुंडाळू पाहत होते. आणि अश्या इंग्रजी विद्वानांच्या शून्य मूल्य असलेल्या संशोधनाला आपल्या देशातील अनेक विद्वान कवटाळून बसतात ही ह्या देशाची शोकांतिकाच म्हणावी.

पुढील लेखात वेद, वेदांगे व त्यावर आधारीत साहित्य ह्यांची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करेन.

* शबर ह्या राजाचा उल्लेख ह्या लेखात दोनदा आला आहे. एकदा दस्यु राजा म्हणून तर एकदा विश्वामित्राच्या १०० पुत्रापैकी एक म्हणून. मानसपुत्र असल्यामुळे हे सहज शक्य आहे.
** जारज प्रजा म्हणजे उभयतात लग्न न होताच निर्माण झालेली प्रजा. राजवाड्यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास ह्या पुस्तकात कर्णपर्वाचे संवाद दिले आहेत.
*** लेखातील त्रुटी माझे अज्ञान मानावे. संदर्भासहित दुरुस्ती दाखवली तर मी लेखात दुरुस्ती करेन.

प्रकार: 

खुप छान लेख.
अग्निपूजा इराणमधून आली आणि अजूनही पारसी धर्मात ती रुढ आहे.
इंद्र या देवतेबरोबर, ब्रम्हा या देवतेची पण पूजा थांबली आहे. या दोन्हीबद्दल वाचल्याचे आठवतेय.

केदार, माहिती खूपच अभ्यासपूर्ण आहे. काही शंका -

१. विश्वामित्र हे ॠषी शकुंतलेचे पिता आहेत जिच्यापासून पुढे भारतवंश (कौरव) निर्माण झाला. पण हेच ॠषी त्याच्या बर्‍याच आधी घडलेल्या रामायणात पण आढळतात. असे कसे?

२. वर्ण, वर्णसंकर आणि वर्णभेद यांची छान माहिती दिलीस. पण त्याचबरोबर 'गण' ह्या शब्दाचा केवळ उल्लेख केला आहेस. त्याबद्दल पण जरा सविस्तर लिही ना! कारण ह्या गणांवरुनच भारतातली विविध राज्ये (आजच्या काळातली नव्हेत) बनली. 'गणतंत्र' ही भारतीय राज्यपध्दती या गणांवरूनच बनली. हे गण म्हणजे कॉण आणि ते कसे अस्तित्त्वात आले त्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.

३. शंकर हा ह्या गणांचा अधिपती होता आणि पशुपती (शंकर) आणि त्याचे वाहन नंदी हे हराप्पा येथील उत्खननात सापडलेल्या अनेक मुद्रांवर दिसून येतात. ह्याबद्दल काही माहिती आहे का?

केदार, लेख वाचतेच आहे, पण त्याआधी एक विनंती:
ह्या लेखाच्या आधी पहिल्या लेखाची लिंक आणि पहिल्या लेखाच्या शेवटी ह्या लेखाची लिंक दे ना..
नवीन वाचणार्‍याला शोधायला सोपं पडेल..

आणि शक्य असेल तर अ‍ॅडमिनसाहेबांना हे लेखमालेत टाकता आलं तर..

" वाहीक देशात (आजचा पंजाब) ब्राह्मणाचे क्षत्रिय, वैश्य व नापित होतात व पुन्हा त्याचे ब्राह्मण होतात. तुझ्या देशात जारज* स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. तुझ्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी समागम करतात, गाणी गातात, मद्य पितात. मद्रदेशाच्या शेजारामुळे गांधारही बिघडत चालला आहे. शूद्रांपासून अन्य स्त्रियांचे ठायी झालेले ब्राह्मण तुझ्या देशात आहेत. आरट्ट देशात पोटच्या पोरांना तुम्ही वारसा हक्क डावलता.
>> केदार, वर्णसंकर होत होता हे जरी ह्यातून सिद्ध झालं तरी ते 'बाहेरून आलेले आर्य' आणि स्थानिक लोक ह्यांच्यात झालं असं सिद्ध होत नाही.. (असं मला वाटतं)
हे (एकाच समाजाच्या भाग असलेल्या) स्थानिक वर्णांमधे घडलेलं संकरही असू शकतं

छान माहितीपुर्ण लेख.
मला या विषयावर माहिती वाचायची होतिच. पण इंटर्नेट वरच्या इंग्लीश माहितीमधे बर्‍याचदा न पट्णारे, संदर्भ न लागणारे मुद्दे असतात. आता इथे चांग्ली माहिति मिळेल Happy

सर्वांना धन्यवाद. तसेच शैलजाने शुद्धलेखन दुरुस्ती सुचवल्याबद्दल तिचे पेशल आभार.

माधव,

१. पण हेच ॠषी त्याच्या बर्‍याच आधी घडलेल्या रामायणात पण आढळतात. असे कसे? >> विश्वामित्र रामायणात अनेक ठिकाणी आहेत. त्यांचा उल्लेख महाभारतात मात्र तुरळक ठिकाणी आहे. ह्यावर थोडा अभ्यास करुन लिहतो.

२. त्याचबरोबर 'गण' ह्या शब्दाचा केवळ उल्लेख केला आहेस. त्याबद्दल पण जरा सविस्तर लिही ना! >>

भारत कधिही एक देश नव्हता असे म्हणनारे व माणनारे अनेक लोकं आहेत. ब्रिटिश विद्वानांना गणतंत्राची पद्धत कळली नाही. त्यांना भारतात असणारे १६ महाजनपद हे तत्कालिन भारत वर्ष चालवत होते हे मान्य नव्हते, कारण आम्हीच भारत एक केला असे त्यांचे म्हणने होते. ह्यावर सविस्तर लिहायचा विचार आहे.

३.ह्याबद्दल काही माहिती आहे का? >> ह्याबद्दल अजून माहिती मी काढत आहे, जमेल तसे वाचन चालू आहे. पण आता हे मात्र सिद्ध झाले आहे की हे वर नमुद केलेल देव आर्येतर आहेत.

हे (एकाच समाजाच्या भाग असलेल्या) स्थानिक वर्णांमधे घडलेलं संकरही असू शकतं >>

हो नानबा हे सहज शक्य आहे. पण त्याचवेळेस नॉर्डिक, शक, हुण, इराणी, झोराष्ट्रीयन हे लोकं आपल्याकडे आले आहेत हे ही अमान्य करुन चालणार नाही. ती वाक्य तेथे देण्यात स्थानिक / बाहेरचे असा मुद्दा नाही तर मुख्य मुद्दा हा ब्राह्मण, शुद्र, क्षत्रिय आणि वैश्य कधिही आपला सो कॉल्ड वर्ण बदलू शकत होती. शुद्र स्त्री पासून ब्राह्मण होत तसे ब्राह्मणांपासून शुद्र किंवा क्षत्रिय.

केदार, अभ्यासपूर्ण लेख.

औरस, क्षेत्रज, दत्तक, क्रीत, कानीन, सहोढ, अपविद्ध, पुत्रिकाप्त्र, स्वयंदत्त, पौनर्भव, गूढज, कृत्रिम, व पारशव असे हे तेरा प्रकार. >>> याविषयी माहिती देशील का? तसेच, विवाहाचे पण असेच काही प्रकार पूर्वी होते ना? त्याविषयी पण जरा सांग ना.

केदार, मस्त माहिती.
(कर्ण - शल्याच्या संभाषणातला हा भाग प्रक्षिप्त असावा असं इरावतीबाईंच्या 'युगान्त'मधे वाचल्यासारखं वाटतंय मात्र. घरी जाऊन पडताळून बघते.)

आणि एक सुचवू का? मागच्यापुढच्या लेखांच्या लिंक्स दे मालिकेतल्या प्रत्येक लेखावर.

लिंक्स दिल्या. (आधिच द्यायला हव्या होत्या. Happy )

नंदिनी त्या विषयीचे खास पुस्तक शोधावे लागेल ते माझ्याकडे आत्ता नाही. पण नेटवरुन वा पुस्तके मागवून ही माहिती मिळाली तर मी नक्की देईन. विवाहाचे प्रकार कुटूंबव्यवस्थेचा लेखात द्यायचा विचार केला आहे. Happy

कर्ण - शल्याच्या संभाषणातला हा भाग प्रक्षिप्त असावा असं इरावतीबाईंच्या 'युगान्त'मधे वाचल्यासारखं वाटतंय मात्र. >>हो

शंकर-पार्वती (सती नाही) हा आर्य आणि अनार्य (आर्य नसलेले) ह्यांच्या प्रथांचे आनि पर्यायाने देवांचे assimilation आहे असे दर्शवणारा एक लेख मागे लोकप्रभामधे होता. त्यातले बरेचसे निष्कर्ष तुझ्या लेखासारखेच होते. अर्थात त्याचा focus वेगळा होता.

ऋषी हे व्यक्ती नसून कूळ असावे. (आपली गोत्रं म्हणजे अशीच नावे असतात) त्यामूळे त्या नावाच्या अनेक व्यक्ती असाव्यात (असे वाचल्याचे आठवतेय !!!)

दिनेश त्या व्यक्तीच होत्या मग त्यांचे गोत्र निर्माण झाले. थोडक्यात हिंदूस्थानी गायकी, किराणा घराणे ह्यांचात जसे मुळ गायक व त्यांची गायकी वाढवलेले शिष्य तसेच हे.

वेदपाठ भेदांसारखीच गोत्र पद्धती विवाहसंबंधासाठी राबवली गेली आहे. पूर्वी लग्नसंबंध आपसात होत असत, पण जसेजसे काल गेला तसे तसे त्यातून नविन समस्या निर्माण झाल्या. त्या दुर करण्यासाठी मग गोत्र पद्धती सुरु झाली. एका कुळात त्यामुळेच लग्न करत नाहीत. पण ही पद्धत सुरु होताना केवळ चार पिढ्या ( की तीनच) पर्यंत अतंर मानले गेले होते, पण मग ही रुढी होऊन आता गोत्र एक असेल तर लग्न होत नाही.

अनेक व्यक्तीं असेलेल्या तुम्ही मनु संबंधी वाचले असावे. हे मनु अनेक होते. १६ स्मृती लिहल्या गेल्या आहेत पण त्या सर्व मनु नामक व्यक्तीने लिहल्या नाहीत. मनुस्मृती प्रसिद्ध म्हणून सर्वांना तेच नाव गोर्‍या इतिहासकारांनी दिले व तेच आपण समजून बसलो. पुढे कागदपत्रांनुसार योग्य तो उलगडा झाला.

तसेच तुम्ही म्हणता तसे आणखी एक उदाहरण मी वाचले आहे. बाप्-मुलगा- त्याचा मुलगा हे तिन्ही लोक प्रंचड विद्वान निपजले, पण तिघांचे नाव एकच होते. ते आत्ता मी विसरलो आहे, व त्यांनाही एकच मानले गेले होते, पुढे उलगडा झाला.

स्वाती_आंबोळे | 6 July, 2010 - 14:43

केदार, मघाशी लिहिलं होतं, पण वाहून गेलं. 'कानीन पुत्र' हा शब्दप्रयोग वाचल्याचं आठवतंय, पण कुठे आणि काय अर्थ ते आठवत नाहीये. नियोगाने झालेला तो कानीन का? तसंच क्षेत्रज म्हणजे बीजक्षेत्रन्यायाने का?

'क्रीत' निराळ्या संदर्भात - पांडव द्यूतात हरले तेव्हा 'क्रीतदास' झाले असं वाचल्याचं आठवतंय. चुभूद्याघ्या.

रमा | 6 July, 2010 - 14:54

कानिन म्हणजे बायकोला लग्नाआधि दुसर्‍या पुरुषापासुन झालेला मुलगा.

केदार | 6 July, 2010 - 14:48

पण त्यातील पुत्रिकाप्त्र म्हणजे मुल नसेल पण मुलगी असेल तर तिच्या पुत्राला देखील वडिलाचे नाव, किर्ती व धन मिळते. तशी पुत्रप्राप्ती म्हणजे पुत्रिकाप्त्र.

स्वाती_आंबोळे | 6 July, 2010 - 14:54

>> कार्बन डेटिंगनुसार सिंधूसंस्कृतीचा नाशसमय इ. स. पूर्व २३५० असा ठरवला आहे. तर आर्य भारतात इ. स. पूर्व १५०० च्या आधी आले नाहीत असेही हे विद्वान धरुन चालतात. मग हा ८०० ते ९०० वर्षाचा कालावधी कसा भरुन काढायचा हाही प्रश्न उरला आहेच. काही अभ्यासकांच्या मते हाच काल, ज्यात महाभारत झाले.

म्हणजे आर्यांचा महाभारताशी संबंध नाही? मग 'आर्यपुत्र' / 'हे आर्य स्त्रिये' वगैरे संबोधनं रामायण-महाभारतात आहेत ती कशी?

केदार | 6 July, 2010 - 15:01

माहित नाही. कदाचित हा जो इस पूर्व १५०० चा कालावधी मॅक्समुलरने ठरवला आहे तोच मुळी चुकीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही तरी मॅक्समुलरने जी थेअरी मांडली आहे ती बरीच खोडली गेली आहे.

असेही असू शकते की नॉर्डिक लोकं सिंधूसंस्कृतीच्या वेळीच आले व त्यांनी हळूहळू उत्तर भारतात पसरायला सुरुवात केली. हा विचार केला तर मात्र सिंधूसंस्कॄतीच्या नाशावेळी आर्य इथे होते व त्यानंतर काही शे वर्षांनी महाभारत युद्ध झाले अशी सांगड लागते. मग तशी संबोधनं पण आपोआपच येतील.

मुळ महाभारत अन त्यानंतर घुसाडले गेलेले टेक्स्ट ह्यामुळेही असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जसे शाक्लव ऋषींनी पुरूष सुक्त, श्री सुक्त हे ऋग्वेदाच्या परिरिष्टात लिहले आहे. तो मुळ भाग नाही. तसे इथेही होऊ शकते.

महायुद्धाचा काळ हा, महायुद्धानंतर कलीयुग सुरु झाले असे धरून, इसपूर्व १००० हा धरला आहे असे मी ऐकले.
कदाचित् २३५० ते १५०० पर्यंत तिथे कुणि नसतीलच! तेंव्हा सबंध जगाची लोकसंख्या आजकालच्या मुंबई एव्हढी सुद्धा नसावी. त्यामुळे मुंबईत जसे एक बिल्डिंग पडली की तिथे लगेच झोपडपट्टी येते, तसे होत नसावे. बरीच जागा तशी मोकळीच होती! माणसाला जमीन, नद्या वगैरे लागते. जमीन, नद्या माणसाशिवाय जगू शकतात!

कदाचित् इ.स. पूर्व १५०० ते १००० पर्यंत देव दानव युद्ध, रामरावण, विश्वामित्र मेनका इ. प्रकरणे होऊन भरत नि त्याच्यानंतरच्या पिढ्या होऊन गेल्या असाव्यात.

केदार छान माहिती आहे. पण जरा जास्त विस्तिर्ण व त्यामुळे थोडी विस्कळीत वाटते. उदा. वेद ते पुराणे. वेद्/वेदांग या पुढच्या भागानंतर बहुदा जास्त सुसुत्रता आपोआप जाणवेल. त्या साहित्यावर मागे एकदा (२००६) मायबोलीच्या दिवाळी अंकात मी एक छोटा लेख लिहिला होता: http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118185.html?1161387673

इतिहासाप्रमाणेच देवांबद्दलही आहे. विजेत्या देवांचे भक्त त्यांच्या गाथा लिहितात. त्यामुळे आधिचे देव मागे ढकलले जातात. गणपती तसा पुरातन, पण विघ्नकर्ताही मागे ढकलल्या गेला होता. शिवसमुदाय पुढे आल्यावर त्यांना त्यालाही आपल्या गोटात सामील करुन घ्यावे लागले. हळुहळु तो केवळ विघ्नहर्ता बनुन राहीला.

आपले 'पेगन' देव म्हणजे मातृका वगैरे. त्यांनाही हळुहळु गौणत्व येत गेले व नंतर त्या म्हणजे मागाहुन पुढे आलेल्या देवांच्या बायका असे दाखवल्या गेले (किंवा कालीची रुपे). आधी देवी शिवापेक्षाही श्रेष्ठ होती. आता हळुहळु देवी महात्म्य पुन्हा वाढते आहे (उदा. संतोषी माता, किंवा काशीतील देवींची मंदिरे).

केदार,
छान जमलाय लेख आणि माहिती सुध्धा उत्तम. फक्त काही ठिकाणी त्रोटक वाटते, विशेषतः गण्-गोत्र संदर्भात.
पण ह्या विषयाची व्याप्ती ईतकी प्रचंड आहे (तितकेच संदर्भही लाखोने आहेत) की प्रत्त्येक बाबीवर एक वेगळा लेख लिहावा लागेल.
कुठलेही ठोस अनुमान न काढता देखिल वरील लेखमालेतील माहिती अर्थपूर्ण वाटते.

सगोत्र विवाह यावर माझ्याकडे genetical perspective with reasearch data असलेला लेख फार पूर्वी होता. सापडला तर बघतो. त्यात पुन्हा सगोत्र विवाह म्हणजे थोडेफार inbreeding (एकाच रक्त नाते संबंधातील प्रजनन) अशी तुलना करून त्याचे अधिकतम तोटे दाखवले होते. पारसि समाज लयाला (सांख्यिक अर्थाने) चालल्याचे एक मुख्ख्य कारण एकाच रक्त-नात्यातील भावंडातील विवाह असेही समजले जाते. अशा inbreeding ने पुढील पिढीचे आयुष्य कमी होते शिवाय नविन पिढीत deformities वगैरे अधिक आढळून आल्याच त्या लेखात म्हटलेलं आठवतय.

केदार,

नोर्डिक लोक भारतात आले ह्याला काय पुरावा आहे का? दुसरे अजुनही आर्य बाहेरून भारतात आले ह्याला ठोस पुरावे नाहीत. तसेच ते सिंधु संस्कृतीशी जोडलेले आहेत ह्यालाही नाहीत. वंश, रेस ह्या अर्थी आणि सांस्कृतीक देवाण्घेवाण ह्याचा इम्मिग्रेशन आणि माय्ग्रेशन ह्याच्याशी एकास एक संबंध नाही असे वाटते. तसेच भाषेचेही आहे.

सिंधू संस्कृतीचा लयाला जाण्याचा काळ साधारण १९०० बीसी इतका आहे. पण त्या संस्कृती आढळणारी अनेक वैषिष्ठे अगदी अजुनही भारतीय समाजात आढळून येतात.

वेदिक संस्कृती ह्यात कुठे बसते हे अजुनही निष्छीत झालेले नाही... त्यामुळे तीला भओगोलिक व पुरातत्वीय संदर्भ जोडणे हे केवल "माझे मत" ह्या वर्गवारीत मोडते...

पेशवा नॉर्डिक लोकांचा वंश भारताचा पंजाब, काश्मीर, महाराष्ट्राचा चित्पावन ब्राह्मणांमध्ये बर्‍याच अंशी दिसतो हे मागच्या लेखात लिहले आहे. डॉ गुह ह्यांनी हे संशोधन केले आहे.

सिंधू संस्कृतीशी नॉर्डिक लोकं जोडलेले नाहीत असेच मी गेल्या दोन लेखांपासून मांडत आहे. कारण पुरावा नाही! तसेच ते सो कॉल्ड आर्य प्रगत होते हा समज मी गेल्या दोन लेखांपासून खोडत आहे. पण संकर झालाच नाही असे मात्र मी म्हणनार नाही.

पण त्या संस्कृती आढळणारी अनेक वैषिष्ठे अगदी अजुनही भारतीय समाजात आढळून येतात. >>> अनुमोदन. तसे नंतर आलेल्या आर्यांच्या आर्श प्रथा जसे प्राण्याचा बळी देणे ह्या ही अजून आहेतच.

मुळे तीला भओगोलिक व पुरातत्वीय संदर्भ जोडणे हे केवल "माझे मत" ह्या वर्गवारीत मोडते... >> हे जर केदार जोशी करत असेल तर तुझे बरोबर, पण कैक पुरावे देऊन तर्काधिष्ठित मत जर इतिहासकार व पुरातत्वखात्याचे व्यक्ती मांडत असतील चूक. कारण कोण मांडतो ह्याला इथे नक्कीच महत्व प्राप्त होते.

पेशवा नॉर्डिक लोकांचा वंश भारताचा पंजाब, काश्मीर, महाराष्ट्राचा चित्पावन ब्राह्मणांमध्ये बर्‍याच अंशी दिसतो हे मागच्या लेखात लिहले आहे. डॉ गुह ह्यांनी हे संशोधन केले आहे>> तु ह्याचा दुवा देउ शकशील का मला उत्सुकता आहे. माझ्या माहितित केवळ जनुकांच्या सहायाने दोन समुहातील सारखेपणा शाररीक संबंध ह्याचा मागोवा घेता येतो. पण त्याला मर्यादा आहेत.

हे जर केदार जोशी करत असेल तर तुझे बरोबर, पण कैक पुरावे देऊन तर्काधिष्ठित मत जर इतिहासकार व पुरातत्वखात्याचे व्यक्ती मांडत असतील चूक. कारण कोण मांडतो ह्याला इथे नक्कीच महत्व प्राप्त होते >> अगदि बरोबर आहे. "माझे मत" हे त्या अभ्यासकांनाही लागु होते. कारण ह्यातील बर्याच सध्या थेअरिज (अभ्यास्पुर्ण) आहेत. फारच थोड्या गोष्टि सर्वसंमत आहेत.

उदा. पुरत्त्विय द्रुष्ट्या वेदिक लोकांशी पेंटेड ग्रे वेअर प्रकारचि मातीची भांडी जोडली जातात. जी सुमारे १५०० बिसि च्या सुमारास उत्तर भारतात सापडतात (चु.भु.ध्या.घ्या.)

संकर झाला ह्यालाही पुरावे नाहीत. पहिल्यांदा आर्य समुह व द्रवीड समुह पुरातत्व द्रुष्ट्या वेगळा काढता येत नाही. आर्य व द्रविड समुह हे भषिक समुह आहेत वांशिक नाहीत.

देव आणि त्यांचे समाजात प्रसारण हा मुद्दा पुर्ण वेगळा आहे. त्याचा वांशीक माय्ग्रेशन वा इमिग्रेशन शी सहज संबंध नाहि असे वाटते.

पेशवा मी लिंक वाचून लिहले नाही, पण तू म्हणल्यामुळे शोध घेतला. खालील साइटवर १९३१ मधील सेन्सस, १९०१ मधील सेन्सस व डॉ गुह ह्यांचे विचार आहेत.

http://www.jstor.org/pss/2791190

संकर झाला ह्यालाही पुरावे नाहीत >>
मुळात संकर म्हणजे काय? माझ्या मते लग्न वा शरिरसंबंध. भाषा असेल तर भाषेतील शब्द उचलने.

चक्क ऋग्वेदात असे संकरांचे पुरावे आहेत. वर मी शबर दस्यु व विश्वामित्र आर्य ह्यांचा पुरावा दिला आहे. हा केवळ एक असे अनेक पुरावे आहेत. दस्यु, पणी व सो कॉल्ड आर्य ह्यांत रोटी बेटी व्यवहार कॉमन होता. व्यास, विदूर, मत्स्यकन्येचे लग्न ही आणखी काही उदाहरण.

आर्य भारी होते हे गृहितक आता मोडले गेले आहेच पण आर्य आले म्हणवून घेण्याने फारसा फडक पडू नये कारण आर्य आले ते टोळ्यांमध्ये. तत्कालिन लोकसंख्येच्या कितीतरी कमी प्रमाणात!
आर्यन इन्वेजन थेअरी एक थोतांड आहे हे हळूहळू सिद्ध होईलच. बराच भाग ऑलरेडी खोडला गेला आहे. पुढच्या लेखात मॅक्स मुल्लरची काही पत्र पण देणार आहे. त्यावरुन त्याला ख्रिश्चॅनिटीला कसे वर आणायचे होते हे लक्षात येईल.

बरं तू भाषिक म्हणतोस तर भाषेवरुन लिंक कशी लावावी, सुमेरियन, मुंडा ह्या भाषांनंतर अचानक संस्कृत कशी झाले हे ही अजून उलगडलेले नाही, की तुझ्यामते हा तर्क पण खोटा? (तुझे भषिक समुहचे मत) ह्यावर काही माहिती असेल तर लिहतोस का?

शेवटी आपण सर्व मत बनवतो ती त्या त्या काळी उपलब्ध असलेल्या व माहित झालेल्या माहिती आधारे. तुझ्या माझ्यासाठी तर पुस्तकांद्वारेच. त्यामुळे मुळ लेखकाचा मताचा आपल्या मतावर बर्‍यापैकी प्रभाव पडतो.

Pages