इथेच का नको.....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

काही वर्षांपूर्वीची मायबोलीवरची सत्य घटना

एका मायबोलीकराची इच्छा होती मायबोलीवरती उर्दू गझला असाव्यात, म्हणून त्याने इथे एक छान उर्दू मधली (पण देवनागरीत) गझल लिहिली. त्याला काही जाणकारांचा प्रतिसादही मिळाला. त्याला पुढे उर्दू कवितांचा संग्रह (रसग्रहण नाही) मायबोलीवर करायचा होता. अ‍ॅडमीन टीम ने त्याला सुचवलं दुसरीकडे लिही मायबोलीवर नको. तेंव्हा त्याचं म्हणणं होतं पण इथंच का नको? तिकडे लिहिलं तर कुणी वाचणार नाही. इथे भरपूर वाचणारे आहेत. आणि कधी कधी इतक्या भारंभार मराठी कविता असतात तर चांगल्या उर्दू मधल्या गझला का नको?

वेगवेगळ्या रुपात "इथे का नको" हा प्रश्न पुन्हा पुन्हा मायबोलीवर येत असतो.

  • इथेच हिंदीतली गाणी का नको?
  • मला फेसबुकवरून्/व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेली छान छान चित्रे इथे मायबोलीवर टाकली तर काय बिघडलं?
  • प्रवासवर्णन गुलमोहरात टाकलं तर काय बिघडलं? "प्रवासाचे अनुभव" मधे कशाला टाकायचं?
  • मला पुस्तकाचं परिक्षण ललितमधे लिहायचंय. "वाचू आनंदे ग्रूप" मधे फक्त ३८३ सभासद आहेत.
  • पाककृती मी इथेच प्रतिक्रियेत लिहतेय. वेगळी कुठे टाकत बसू. नाहितर तुझ्या विचारपूशीत टाकते.
  • अरे या साईटवर भरपुर लोक दिसताहेत. चला एका दिवसात १५ धागे/लेख्/कविता उघडून टाकू.
  • वेगळा धागा वेगळ्या विषयावर कशाला काढू? सगळं याच धाग्यावर लिहणं मला सोपं वाटतं. आणि माझ्या मते हा विषय याच्याशीच संबंधित आहे
  • मला जुन्याच मायबोलीवर लिहायचंय. नवीन मायबोलीवर कुणी फिरकत नाही.

आणि मदतसमितीला/अ‍ॅडमीनटीमला आलेले हे संदेश

  • हे सगळं गुलमोहरात कशाला, वेगवेगळे भाग करा आणि काही भाग नजरेआड करा
  • "पाककृती हवी आहे का" या पानावर एक मस्त पाककृती टाकली होती कुणीतरी प्रतिक्रिया म्हणून पण आता सापडत नाहीये.
  • लोकांना प्रत्येक पुस्तकासाठी वेगळं पान उघडायला सांगा ना. "मी वाचलेलं पुस्तक" मधे काही सापडत नाहिये. सगळी चांगली पुस्तकं प्रतिक्रियांमधे हरवली आहेत
  • अहो या उत्साही लेखकांना आवरा. किती ठिकाणी रिक्षा फिरवतायत. कंटाळा आला त्याचा.
  • तिकडे फेसबुकवर जी चित्रं दिसतात तीच इकडे परत कशाला? आणि त्याचा मायबोलीशी काय संबंध?

प्रत्येक वेळी प्रश्नाचं रुप वेगळं असलं तरी मुख्य कारणं या पैकी असतात.
१. आपल्याला जे सांगायचंय, विचारायचंय ते नक्की खूप जणांना आवडेल याची खात्री.
२. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आपलं लेखन पोहोचावं.
३. जी पद्धत सोपी आहे/माहितीची आहे ती वापरावीशी वाटणे.

थोडक्यात लेखक ज्याच्यासाठी लिहायचंय त्या वाचकाचा विचार नेहमीच करतात असं नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यत जायचं या हेतूमुळे नकळत आपण वाचकांपासून दूर जात आहोत याची त्यांना कदाचीत कल्पनाच नाहीये.

प्रत्येक लेखकाने स्वत:ला हे प्रश्न विचारून पहावे असं सुचवावसं वाटतं.
- मायबोली या संकेतस्थळावर हे लेखन योग्य/सुसंगत आहे का?
-आज जर मायबोलीवर इतके वाचक नसते तरी मी हे लिहिलं असतं का? की फक्त खूप लोक बघतील म्हणून आपण लिहितो आहोत?
-मला आज जरी हे लिहायला सोपे वाटत असले तरी वाचकाला शोधायला हे सोपे आहे का?
-ज्या वाचकवर्गाच्या ओढीने मी लिहतो/लिहिते आहे तो वाचकवर्ग माझ्या लेखनामुळे माझ्यापासून दूर जातो आहे का?

हे लिहायचं आणखी एक कारण म्हणजे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या पानावर काही मायबोलीबाहेरच्या दुव्यांचे संकलन सुरु होते. वर काही दिलेले मुद्दे या बाबतही लागू होतात. पण दुव्यांच्या संकलनाबद्दल आणखी काही नवीन मुद्दे उपस्थित होतात. (या पानांना मुद्दाम वेगळे काढून टिका करणे हा या लेखाचा उद्देश नाही. हे मुद्दे गेले काही दिवसापासून लिहायचे होते. आज मुहुर्त लागला असे म्हणूया)

मुळात मायबोलीसारख्या संकेतस्थळाचे यश जास्तीत जास्त वाचकांनी इथे यावे, इथे शक्य तितके रेंगाळावे यावर अवलंबून असते. या उलट कुठल्याही दुव्याचे संकलन असणार्‍या साईटचे/विभागाचे यश नेमके उलटे म्हणजे लवकरात लवकर वाचकाला बाहेर पाठवावे यावर असते. म्हणून मायबोलीचा सूची विभाग वेगळा आहे. कानोकानी ही साईट म्हणूनच वेगळी तयार केली आहे. त्यामुळे ज्या विभागात आणखी वाचकांनी यावे म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत त्याच विभागात आलेल्या वाचकांना बाहेर पाठवणे योग्य होणार नाही. आणि त्या त्या दुव्याचे वर्गिकरण नसेल आणि त्या दुव्याच्या लोकप्रियतेबद्दल, दर्जाबद्दल माहिती नसेल तर आपण अजून वाचकांपासून दूर जाऊ.

याच कारणांसाठी कानोकानीसारख्या साईटवर मायबोलीसारखी वर्दळ कधीच दिसणार नाही. कारण ज्याना मायबोलीवर येऊन रेंगाळायचे आहे ते इथे असलेले वाचण्यासाठी आलेले आहेत, बाहेरचे वाचण्यासाठी नाही. नाहीतर ते इथे आलेच नसते. या उलट कानोकानी वर पटकन वाचकांना हवे ते सापडून ते त्या त्या वेबसाईटवर गेले तर तेच यश असेल.

विषय: 
प्रकार: 

छान पृथकरण! Happy

कुठलेही लिखन करायचे किंवा दुवा (लिंक) द्यायचा म्हटले कि हा गोंधळ नेहमीच मनात असतो. कानोकानी मध्ये मी अनेक दुवे दिलेले आहेत, कि जे मला स्वतःला पुन्हा सहज शोधता येतात. तेच जर मी कुठे स्फुट, लेख, प्रतिक्रिया मध्ये दिले असते, तर पुन्हा शोधने एक दिव्य बनले असते (आधीच आमचे संगणकाचे ज्ञान अगाध!) भलेही त्यातील अनेक दुव्यांना इतरांकडुन प्रतिसाद नाही मिळाला, तरी किमान माझ्या संदर्भासाठी ते दुवे एका ठिकाणी पुन्हा मिळु शकतात, ही खुपच चांगली सुविधा आहे. (निव्वळ स्वार्थी विचार!)

सुविधेबद्दल धन्यवाद!

छानच विश्लेषण केलय, मनोमन पटतय!
लेखकाने स्वतःला विचारायचे प्रश्न देखिल मस्त!
(आयला, मी इथे काही लिहीतो ते कुणी वाचतात तरी का हे कसे समजावे?
पूर्वी कित्येक खोडसाळ आयडीज तर तोन्डावर सान्गायच्या की आम्ही स्क्रोल करीत उड्यामारीत जातो म्हणून! Proud )

मस्त पोस्ट अ‍ॅडमिन टीम.
प्रत्येक लेखकाने स्वत:ला हे प्रश्न विचारून पहावे >> bull's eye!
मध्यंतरी इथे काही बाफवर झालेल्या उहापोहांच्या अनुषंगाने सोनाराने कान टोचून तरी फायदा व्हावा ही अपेक्षा. धन्यवाद. Happy

सगळ्याला अनुमोदन आहेच. काही मुद्दे तर खरंच bull's eye.
लिंका ओघाने चर्चेत आल्या तर? आणि तिथे आलेल्या लिंका मग नंतर कानोकानी मधे टाकल्या तर?

एकदम सिक्सर मारला अ‍ॅडमिन तुम्ही!
ललित लेखांच्या बाबतीत ' नक्की कुठे टाकू' हा प्रश्न येतो. प्रवासवर्णन, सिनेमा/पुस्तक परिक्षण हे त्या त्या विभागात गेलेले बरे. पण यात काही तारतम्य बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा ही वर्गवारी अतितांत्रिक होउ शकते. उदा. माझाच 'दर्शनमात्रे' हा लेख ललित ऐवजी धार्मीक ग्रुपमधे का टाकला नाही अशी तक्रार येउ शकते!
फक्त तेवढ्या पाउलखुणा लवकर सुरु करा, म्हणजे लिहिलेलं शोधायला सोपं पडेल.

# प्रवासवर्णन गुलमोहरात टाकलं तर काय बिघडलं? "प्रवासाचे अनुभव" मधे कशाला टाकायचं?
# मला पुस्तकाचं परिक्षण ललितमधे लिहायचंय. "वाचू आनंदे ग्रूप" मधे फक्त ३८३ सभासद आहेत.
ज्या वाचकांना ज्या त्या विषयाचे लेख योग्य जागी टाकायला पाहिजेत हे कळत नाही त्यांचे लेख तुम्ही हलवायला हरकत नसावी.

त्यांचे लेख तुम्ही हलवायला हरकत नसावी>>>>> ते केले जातेच! पण हेच जर त्या वाचकांनी (लेखकांनी!) केले तर अ‍ॅडमीन अन टीम ला जरा दुसरी कामे पण करता येतील ना!

>>>> ज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांनी बोध घेतला म्हणजे मिळवली! <<<
अहो मग याची रीक्षा फिरवा ना लग्गेच! Lol

>>>>आज जर मायबोलीवर इतके वाचक नसते तरी मी हे लिहिलं असतं का? की फक्त खूप लोक बघतील म्हणून आपण लिहितो आहोत?<<<<
या प्रश्नाच्या उत्तरात मात्र थोड्या संमिश्र भावना आहेत.
सुरवातीस मायबोलीवर काहीबाही लिहित होतो ते इथे "देवनागरीची" सुविधा असल्याच्या अत्यानन्दातून! आपल्या लिखाणाला कुणी "वाचक" असू शकतात हे गावीही नव्हते!
ज्या काय निवडक आयड्या भेटायच्या बीबीवर, त्या याहू च्याटवरील आयड्यान्पेक्षा अधिक काही वेगळ्या म्हणजे "जाणकार वाचक" वगैरे असतील ही जाणिव बर्‍याच नन्तर येऊ लागली! पण तरीही, काहीतरी कुणापुढे तरी मान्डावे, ते कुणीतरी बघावे/वाचावे ही सूप्त इच्छा मनात होतीच.
मात्र, आजही मी खात्रीने असेही सान्गू शकतो की मी जे काय इथे लिहीतो, ते लिहीत असतानाच, माझे मीच वाचण्याव्यतिरिक्त अजुन कुणी वाचेल याची तीळमात्रही अपेक्षा ठेवत नाही.
अन गेल्या नोव्हेम्बर मधे मला हेच प्रकर्षाने जाणवले की अरे लिहीलेले वाचलेच जाणार नसेल तर उगाच पान्ढर्‍यावर काळे करण्यात काय अर्थ आहे?
मग तरीही मी इकडे का खरडत अस्तो? खूप लोक वाचतात म्हणून? खुप लोकान्नी वाचून वाहव्वा करावी म्हणून? की खुप लोकान्ना दाखविण्यासारखे बरेच काही माझ्याकडे आहे म्हणून? अन या प्रश्नान्ची निखळ उत्तरे नकारार्थी असतील, इथे लिहीणे हे अन्य नैमित्तिक दैनन्दिन कामान्प्रमाणेची एक सवय बनुन गेलय का? जसे की तहान लागली - प्या पाणी, भुक लागली - गिळा काहीतरी, तसच मेन्दुन किडा वळवळला - वळववा बोटे अन बदडा कीबोर्ड! हाय काय अन नाय काय त्यात Proud
मी तर बोवा कन्फ्य्जन मधे!

ज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांनी बोध घेतला म्हणजे मिळवली!<<
म्हणजे काय?
अ‍ॅडमिनने काही ठराविकच लोकांसाठी किंवा लेखांसाठी हे नाही असं स्पष्ट केलंय...
>>या पानांना मुद्दाम वेगळे काढून टिका करणे हा या लेखाचा उद्देश नाही. हे मुद्दे गेले काही दिवसापासून लिहायचे होते. आज मुहुर्त लागला असे म्हणूया<< हे वरच्या लिखाणातले वाक्यच इथे कॉपी पेस्टलेय.

उदाहरणार्थः लिंका योग्य ठिकाणी द्या असं अ‍ॅडमिनने माझ्याच लिखाणावर लिहिलंय म्हणजे मी नक्की काय बोध घ्यायचा? माझ्या(पक्षी कुणाच्याही) लिखाणात मला(पक्षी कुणालाही) एखादी लिंक देऊन काही सांगायचे असेल तर ते तसे करायचे नाही का? की लिंक कानोकानी मधे आहे असे सांगून कानोकानीची लिंक द्यायची?

मला असं वाटतं की अ‍ॅडमिननी हे स्पष्ट केलंय की ही सूचना, मुद्दे सगळ्यांसाठीच आहेत तेव्हा आपण दुसर्‍याला ते मुद्दे समजतील की नाही किंवा इतर लोक ते मुद्दे पाळतील की नाही ह्याचा विचार न करता स्वतः कधीही अशी चूक करत नाही आहोत ना एवढंच बघावं. गोंधळ असेल आपण बरोबर की चूक याचा तर अ‍ॅडमिनला विचारावं.
काय म्हणता?

त.टी.: एकट्या पूनमला टार्गेट करून मी प्रश्न विचारत नाहीये. माझा प्रश्न/ रोख केवळ मुद्द्याकडे आहे. मग तो मुद्दा अजून कुणाच्याही डोक्यात असो.

सगळं पटतय, पण हे जरा मोघम वाटतेय.
काहि नेमक्या शंका विचारतो.

१. मी लिहिले होते, कि एकच कविता अनेकवेळा पोष्ट केली जातेय. नवीन लेखनातील
बरीच जागा त्याने अडते. अशावेळी, समजा आमच्यापैकी, कुणाला हे लक्षात आले, तर
आम्हि कुठे सांगायचे ? म्हणजे जे नेमस्तक आहेत, ते त्यावर योग्य तो उपाय करतील.

२. कधी कधी एखादा बीबी चुकिच्या धाग्याखाली उघडला जातो. समजा तेही ल़क्षात आले
तर काय करायचे ?

३. मी हल्ली कहि गाण्यांबद्दल लिहिले आहे. ती गाणी इतर कुठेच उपलब्ध नाहीत, त्यासाठी
यु ट्यूब च्या लिंक्स देत असतो, ते योग्य आहे का ?

४. मायबोलीचे सर्च इंजिन उत्तम आहे, अनेक जूने संदर्भ त्यात मिळतात. पण एखादा लेख
नाही म्हणजे नाहि मिळत. उदा. अलिकडे मला, माझ्या ग. बावडा, नापणे आणि उन्हाळे, या
लेखाचा संदर्भ द्यायचा होता. तो मिळाला नाही.

५. खुपदा प्रतिक्रिया द्यायला, शब्द नसतात. केवळ एखादी स्माईली दिली जाते. या प्रतिक्रियांचे
महत्व कमी आहे असे नाही, पण त्यात बरीच जागा जाते. तर अशा प्रतिक्रिया सभासदांनी
देउ नयेत अशी विनंति करता येईल का ? प्रतिक्रियेंचा संख्येपेक्षा, तो लेख किती जणांनी
बघितला, याचा एखादा काऊंटर ठेवता येईल का ? म्हणजे रोमात असणाऱ्यांची सुद्धा दखल
घेतली जाईल.

शेवटी आमची आहे हो मायबोली.

<<<मी लिहिले होते, कि एकच कविता अनेकवेळा पोष्ट केली जातेय. नवीन लेखनातील
बरीच जागा त्याने अडते.>>>

दिनेशदा, काहीवेळा मी असे केले आहे; पण त्याबरोबरच जुनी पोस्ट उडवून लावली आहे. सर्वांनी तसे केले तर जागा भरपूर प्रमाणात वाचेल. Light 1 Happy

प्रतिक्रियेंचा संख्येपेक्षा, तो लेख किती जणांनी बघितला, याचा एखादा काऊंटर ठेवता येईल का ?>>> मी मागे फेसबुका सारखे लाईक/अनलाईक सुविधा करता येते का? म्हणुन विचारले होते. ते पुन्हा विचारतो!

नेट वर बरिच मराठी संकेत स्थळं आहेत आणि काहीजण येकच लेख्/कविता बर्‍याच ठिकाणी प्रकाशीत करतात. याबाबत नियम नसला तरी काही संकेत/ गाईडलाईन बनवता येईल का? उदा. इथे पोस्ट करताना ते साहित्य ते इतरत्र प्रकाशित नसावे ( स्वतः चे संकेत स्थळ, ब्लॉग, प्रींट मिडीआ यांचा अपवाद करुन)

>> प्रतिक्रियेंचा संख्येपेक्षा, तो लेख किती जणांनी बघितला, याचा एखादा काऊंटर ठेवता येईल का ?
मलापण हे योग्य वाटतं.

उदा. इथे पोस्ट करताना ते साहित्य ते इतरत्र प्रकाशित नसावे ( स्वतः चे संकेत स्थळ, ब्लॉग, प्रींट मिडीआ यांचा अपवाद करुन)>>>>>>>>>

असे करणे कुठल्याही वेबसाईटच्या दृष्टीने योग्य कदाचित ठरणार नाही. कितीही तीच तीच लोकं, इथे तिथे असली तरी प्रत्येक वेबसाईटचा, ब्लॉगचा वाचकवर्ग बर्‍यापैकी वेगळा आहे. त्यामुळे लेखकाला तसे करावेसे वाटण्यात चुक नाहीये.
असे मला वाटते.

<<लोकांना प्रत्येक पुस्तकासाठी वेगळं पान उघडायला सांगा ना. "मी वाचलेलं पुस्तक" मधे काही सापडत नाहिये. सगळी चांगली पुस्तकं प्रतिक्रियांमधे हरवली आहेत>>
हो ना

दिनेशदा - हे वरील प्रकार होण्याचे कारण मला वाटते - त्याच 'सबमिट' पेज वर परत (किंवा बॅक करुन) रिफ्रेश मारल्याने होतेय.

Pages