मला ' दिसलेले' पुलं : थोडे वेगळे पैलू

Submitted by वावे on 28 February, 2019 - 23:31

मराठी भाषा दिवसानिमित्त पुलंबद्दल लिहायचं ठरवल्यावर किती लिहू आणि किती नको असं वाटायला लागलं. कितीही लिहिलं तरी ते कमीच पडेल. यातून मार्ग काढण्यासाठी विनोदी लेखनाच्या पलीकडे असलेले पुलं मला ज्यातून दिसले, त्या पुस्तकांबद्दल आणि कॅसेटबद्दल लिहायचं ठरवलं. अलूरकर म्युझिक हाऊसची ’ एक आनंदयात्रा कवितेची’ ही, पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या बा. भ. बोरकरांच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाची कॅसेट, ’ एक शून्य मी’ हा पुलंच्या गंभीर लेखनाचा संग्रह आणि ’ जीवन त्यांना कळले हो’ अशा सार्थ नावाचे, परचुरे प्रकाशनाचे, पुलंवरच्या विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन असे तीन संदर्भ या लेखात मुख्यत: वापरले आहेत.

पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अनेक पैलूंमधला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संगीतावरचं त्यांचं प्रेम. गायक, वादक, रसिक श्रोते अशा सर्व नात्यांमधून त्यांनी संगीतकलेची आराधना केली. यापैकी रसिक श्रोतेपणाचा प्रत्यय त्यांनी लिहिलेल्या अनेक गायक-गायिकांच्या व्यक्तिचित्रणांमधून येतो. त्यांचं हार्मोनियमवादन हाही भल्याभल्यांच्या कौतुकाचा विषय होता. पुलं कॉलेजला असताना कवी राजा बढे यांच्या कवितांना चाली लावून कार्यक्रमांमधून गात असत. पण हे सगळं फक्त कुठे कुठे वाचल्यामुळेच मला माहिती होतं. मला पुलंच्या आवाजाची ओळख ’ चितळे मास्तर’ , ’ हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका’ अशा त्यांच्या गद्य कॅसेट्समधूनच झालेली होती. पुलंचं गाणं ऐकण्याची संधी कधी मिळण्याचं कारण नव्हतं. कथाकथनांमधून दोन-तीन ओळी तुकड्या-तुकड्यांमधून कधी ऐकल्या असतील, तेवढ्याच. पण ’ पाळीव प्राणी’ मधल्या अगदी ’ कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा’ सारख्या एखाद्या ओळीतही त्यांच्या गळ्याचा गोडवा जाणवून जायचा. हा गोडवा भरभरून अनुभवता येतो, तो ’ एक आनंदयात्रा कवितेची’ या कार्यक्रमात! पुण्यात कॉलेजला असताना एकदा सहज ’ अलूरकर’ मध्ये चक्कर टाकताना या कार्यक्रमाची कॅसेट हाती लागली. असंख्य वेळा ती ऐकली, अजूनही त्या कविता ऐकण्याचा कंटाळा आलेला नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितांचं पुलं आणि सुनीताबाईंनी केलेलं हे वाचन/गायन ऐकणं म्हणजे एक सदाबहार आनंदाचा ठेवाच आहे.

मुळात बोरकरांशी पुलंचा खूप जुना परिचय. पुलं शाळेत शिकत असताना एक उगवता कवी म्हणून बोरकर पुलंच्या आजोबांना भेटायला आलेले असताना त्यांची बोरकरांशी प्रथम भेट झालेली होती. पुढेही अगदी बोरकरांच्या मृत्यूपर्यंत पुलं-सुनीताबाईंचे त्यांच्याशी अगदी जवळचे, घरोब्याचे संबंध होते. कविता हा सुनीताबाईंच्या खूप जिव्हाळ्याचा विषय. उभयतांचं वाचनही अक्षरश: अफाट. अनेक संदर्भ मनात जागे. त्यामुळे हा कवितावाचनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच जातो. पुलंचं काव्यगायन इतकं गोड आहे, की ही रंगलेली मैफ़िल संपूच नये असं आपल्याला ही कॅसेट ऐकताना वाटत राहतं. ’ चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे’ , ’ घन लवला रे घन लवला रे’ अशा कवितांमध्ये आपलं मन गुंगुन जातं. ’तव नयनांचे दल हलले गं’ या ओळीतले दल म्हणजे पाकळी की शस्त्रसज्ज सैन्यदल, असे शब्दांच्या अर्थाचे सुनीताबाई आणि पुलंनी केलेले खेळ, कवितेत मधेमधे सहजपणे आलेले पिसोळे, तार, भिरी असे लडिवाळ कोकणी शब्द दाखवणं, निळ्या रंगाबद्दलची कविता आल्यावर ज्ञानेश्वरांपासून ते थेट कवी ग्रेस यांच्या काव्यांमधल्या निळ्या रंगावरच्या ओळी सांगणं, बोरकरांच्या हृद्य आठवणी सांगणं, अशा वाटेने ही मैफिल कमालीची रंगतदार होत जाते. ’माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता सुनीताबाई वाचत असताना ’ माझ्या गोव्याच्या भूमीत, सागरात खेळे चांदी, आतिथ्याची, अगत्याची, साऱ्या षड्रसांची नांदी’ ही ओळ आल्यावर बोरकरांचं माशांवर काय विलक्षण प्रेम होतं, असं सुनीताबाईंनी म्हणायचा अवकाश, माशांवर तितकंच प्रेम करणारे पुलं उत्स्फूर्तपणे बोरकरांची दुसरी कविता तालासुरात सुरू करतात.. ’मासळिचा सेवित स्वाद दुणा.. इतुक्या लौकर येइ न मरणा..’ आणि या उत्स्फूर्ततेला प्रचंड दाद मिळते. हा कार्यक्रम जेव्हा ध्वनिमुद्रित झाला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये एस एम जोशी हजर होते. ’जीवन त्यांना कळले हो’ ही कविता वाचायला सुनीताबाई सुरुवात करत असतानाच त्यांना थोडं थांबवून पुलं म्हणतात की ही कविता जणू काही ज्यांना उद्देशून लिहिली आहे असं वाटावं असे एसेम जोशी आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. एसेम जोशींच्या सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मग या कवितेच्या वाचनाला एक निराळीच उंची प्राप्त होते. या कवितेचा अर्थ इतका आतपर्यंत समजून-उमजून वाचण्यासाठी पुलं-सुनीताबाईंसारख्या ’ जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करीं’ अशा वृत्तीच्या व्यक्तीच हव्यात. त्या दोघांमधला कवितांच्या निमित्ताने घडणारा हा संवाद या कार्यक्रमाला अधिकच जिवंत करतो. या सगळ्या कवितांना लावलेल्या चाली पुलंनीच लावलेल्या आहेत का ते मला माहिती नाही, पण या चाली आणि गाण्याची पुलंची पद्धत, दोन्ही गोष्टी त्या कवितांना अगदी पूरक आहेत. ’जपानी रमलाची रात्र' सारख्या शृंगारिक कवितेपासून ते ’ सुखा नाही चव’ अशा उदास कवितेपर्यंत विविध प्रकारच्या कविता अतिशय ताकदीने आणि कवितेच्या अर्थाशी समरस होऊन पुलं आणि सुनीताबाई सादर करतात.’ त्यां दिसां वडाकडे’ यासारख्या काही कोकणी कविताही या कार्यक्रमात ऐकायला मिळतात आणि ’ डाळिंबीची डहाळीशी’ या बोरकरांच्या कवितेची त्यांनीच लिहिलेली कोकणी आवृत्तीही ऐकायला मिळते. कोकणी भाषेचा गोडवा अगदी खास कोकणी उच्चारांमधे पुलं आपल्यापर्यंत पोचवतात. पुलंचं आजोळ कारवारी असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कानांवर कारवारी कोकणी भाषा पडलेली होती. त्यामुळे त्यांचे कोकणी उच्चार अगदी ' ओरिजिनल ' होते. या कोकणी कवितांमुळे या कार्यक्रमाला एक वेगळा आयाम मिळतो. मी या कार्यक्रमाबद्दल कितीही लिहिलं, तरी ती मुळातूनच अनुभवण्याचीच गोष्ट आहे. (यूट्यूबवर मला तरी यातली एकही कविता सापडली नाही त्यामुळे मी इथे लिंक देऊ शकत नाही. त्याबद्दल दिलगीर आहे).

पुलं स्वत: कोकणी उत्तमप्रकारे जाणत होते इतकंच नाही, तर कोकणीबद्दल त्यांना खूप आपुलकीही होती. मंगळुरी, मालवणी वगैरे कोकणीचे उपप्रकारही त्यांना चांगलेच माहिती होते. परंतु कोकणी ही मराठीची बोलीभाषाच आहे, स्वतंत्र, अभिजात भाषा नाही, असं मात्र त्यांचं ठाम मत होतं. मुळात माणसांमध्ये नसलेला कोकणी-मराठी वाद उभा करण्यामागे कसलं राजकारण आहे, याचंही त्यांना चांगलंच भान होतं. ’ एक शून्य मी’ या पुस्तकातल्या एका लेखात पुलंनी सडेतोडपणे आपलं हे मत मांडलेलं आहे. एकंदरीतच या पुस्तकातल्या सगळ्याच लेखांमध्ये पुलंचं एक निराळ्याच प्रकारचं लेखन वाचायला मिळतं. ’व्यक्ती आणि वल्ली’ सारख्या पुस्तकांमधली व्यक्तिचित्रणं किंवा ’असा मी असामी’सारखं पुस्तक लिहिताना पुलं स्वत:कडे त्या त्या विषयाला साजेशी एक विशिष्ट भूमिका घेऊन लिहितात, मग ते कधी मुंबईत खर्डेघाशी करणारे, मर्यादित विश्व असलेले बेनसन जानसन कंपनीच्या कचेरीतले कारकून असतात, कधी रत्नागिरीतल्या चितळे मास्तरांच्या पहाटे भरणार्या स्पेशल क्लासमधले स्कॉलर विद्यार्थी असतात, तर कधी रत्नागिरी ते मुंबई एसटीतून प्रवास करणारे प्रवासी असतात. त्या त्या लेखनात व्यक्त झालेली निवेदकाची मतं ही त्या त्या भूमिकेला साजेशी असतात. पण अर्थातच ललितलेखन करताना घेतलेलं हे स्वातंत्र्य असतं. प्रत्यक्षातल्या पुलंची विविध सामाजिक विषयांवरची जाणकार आणि परखड मतं ही ’ एक शून्य मी’ या पुस्तकातल्या लेखांमध्ये वाचायला मिळतात. हे सगळे लेख विविध नियतकालिकांमधून पूर्वप्रकाशितच आहेत, पण विनोदी लेखक, नाटककार, एकपात्री प्रयोग करणारे अभिनेते वगैरे ओळखींखाली एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे, कोणत्याही क्षेत्रातल्या दांभिकतेची चीड असणारे, त्याचबरोबर सखोल सामाजिक भान असणारे साहित्यिक ही त्यांची ओळख काहीशी झाकोळलीच गेली असं म्हणायला लागेल.

’ धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही’ या लेखात पुलंनी भारतीयांच्या झापडबंद वृत्तीबद्दल तीव्र मतं व्यक्त केली आहेत. पुलं म्हणतात की ही झापडबंद प्रवृत्ती, उच्च-नीचतेची मानसिकता आपल्याकडे सर्वव्यापी आहे. या बाबतीत कुठलाच धर्म अपवाद नाही. स्वत: पुलं नास्तिक होते, विवेकवादी होते. त्यांच्याच शब्दांत, ’ विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही आणि सत्याचे दर्शन घडवणार्या वैज्ञानिकांचा देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सर्वांत अधिक छळ केला आहे.’ जातीपातीच्या आधारावर केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल पुलं विषादाने लिहितात. ते म्हणतात की ’ जात नावाचा व्हायरस’ आपल्या स्वभावात घट्ट रोवून बसलेला आहे. ते अशी खंत व्यक्त करतात की बाबासाहेब आंबेडकरांकडे एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा, व्यासंगी, कृतिशील आणि द्रष्टा नेता म्हणून न बघता केवळ दलितांचा नेता म्हणून बघितलं गेलं आणि त्यामुळे त्यांची पुरेशी ओळखच कुणाला झाली नाही. हे वाचून मला कुसुमाग्रजांच्या ’ पुतळे’ या कवितेची आठवण होते. त्या कवितेतही कुसुमाग्रज हाच सल व्यक्त करतात, की शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना शेवटी आपण केवळ एका-एका जातीपुरतं मर्यादित करून टाकलं. त्या कवितेत शेवटी गांधीजी म्हणतात की तुम्हा सर्वांच्या पाठीशी निदान एकेक जात तरी आहे, माझ्या पाठीशी सगळे असूनही कुणीच नाही ( माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेऱ्यांमधल्या भिंती). हीच वेदना ’गांधीयुग व गांधीयुगांत’ या, गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिलेल्या लेखात पुलं व्यक्त करतात. गांधीजींबद्दल अतीव आदर असलेले पुलं, गांधीजींचं फक्त नाव घेऊन एरवी भ्रष्टाचार करायला मोकळे असलेले पुढारी बघून तीव्र संतापलेले आणि काहीसा अपेक्षाभंग झालेले इथे दिसतात. तसाच अपेक्षाभंग आणि संताप त्यांच्या ’ सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा बळी’ या लेखात, आणीबाणीनंतर जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून आणलेल्या जनता पक्षाच्या सरकारबद्दलही दिसतो. पुलंनी स्वत: आणीबाणीला जोरदार सक्रिय विरोध केला होता आणि निवडणुका जाहीर झाल्यावर जनता पक्षाच्या प्रचारसभांमधून प्रभावी भाषणेही केली होती. नंतर सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्यांच्यावर परखडपणे टीकाही करण्याइतका विचारांचा मोकळेपणा त्यांच्याकडे होता. कारण त्यांनी स्वत:ला त्या पक्षाशी बांधून घेतलेलं नव्हतं. निवडणुकांचे निकाल लागल्यावर ते आणि सुनीताबाई स्वत:हून त्यातून अलगद बाजूला झालेले होते. त्यामुळे पटतील त्या मुद्द्यांना पाठिंबा आणि न पटणार्या गोष्टींना विरोध ही आपली भूमिका ते ठामपणे निभावू शकले. या पुस्तकात विनोबांवरही एक लेख आहे. या आणि ‘गुण गाईन आवडी' या पुस्तकातल्या विनोबांवरच्या लेखांमध्ये त्यांच्याबद्दलचा निखळ अपरिमित आदर दिसतो. (भूदान चळवळ समजून घेण्यासाठी स्वत: पुलं विनोबांबरोबर त्यांच्या भूदानाच्या पदयात्रेत दोन वेळा आठ-दहा दिवस चाललेले होते.) विनोबा, बाबा आमटे, साने गुरुजी ही पुलंची श्रद्धास्थाने होती. आनंदवनात पुलं घरच्यासारखेच होते. ’ दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ हे त्यांचे सूत्र होते.

नवे मराठी शब्द तयार करण्याच्या सरकारी धोरणातल्या काही चुकीच्या बाबींवर ’ क्व च भवान क्व पुल: क्व च सूकर:’ या उपरोधिक लेखात पुलंनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत, तेही मधूनमधून मिश्कील चिमटे काढत! ’ अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या’ हा आचार्य अत्र्यांवरचा लेख म्हणजे एका सिद्धहस्त विनोदी लेखकाने, दुसऱ्या एका सिद्धहस्त विनोदी लेखकाच्या लेखनाचा, एका जाणकार चाहत्याच्या भूमिकेतून घेतलेला आढावा आहे. पुलंच्या व्यक्तिमत्त्वातल्या अशा अनेक पैलूंचं दर्शन या विविध लेखांमधून आपल्याला होतं. तसं ते थोडंफार इतर पुस्तकांमधूनही झालेलं असतंच म्हणा! ’ एक लाख खाल्ले की पाठवतात असेंब्लीत. लोकनियुक्त प्रतिनिधी!’ म्हणणारे ’ अंतू बर्वा’ मधले अण्णा साने, ’ शिंचे मुहूर्त बघतात, हातात कुठल्या कुठल्या बाबांच्या अंगठ्या घालतात, गळ्यात लाकिटं घालतात, धिस इज रिअली पझलिंग' म्हणणारे चितळे मास्तर, ’ आम्ही त्याच्या व्याख्यानाला गेलो नाही तर तो पुढारी राहणार का? वुई आर ए पार्ट ॲंड पार्सल ऑफ हिज पुढारीपणा’ म्हणणारा परोपकारी गंपू, ’ हे जग कसलं आहे ठाऊक आहे तुम्हाला? मुखवट्यांचं’ असं म्हणणारा ’ तो’, ह्या सर्व व्यक्तींच्या तोंडून त्या त्या वेळी जणू पुलंच बोलत असतात.

‘गुण गाईन आवडी' , ‘गणगोत’, ‘मैत्र' यांसारख्या पुस्तकांमधून पुलंच्या गुणग्राहक आणि जगात कुठेही काही उत्तम, उदात्त, उन्नत, दिसलं की उत्कटतेने दाद देण्याच्या प्रवृत्तीचं दर्शन घडतं. पुलंचं गणगोत खरंच खूप मोठं होतं. शाळा-कॉलेजमधली नोकरी, चित्रपटव्यवसाय, रेडिओ आणि दूरदर्शनमधली कारकीर्द, नाट्यव्यवसाय, पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यांना केलेली मदत या सर्व टप्प्यांवर पुलंनी अगणित मित्र, चाहते आणि हितचिंतक जोडले. संगीत ही तर त्यांच्यासाठी अगदी जिव्हाळ्याची कला! त्यामुळे अनेक दिग्गज गायक, वादक, रसिक त्यांच्या खास बैठकीतले! वयाच्या पन्नाशीनंतर पुलं बंगाली भाषा शिकण्यासाठी थेट शांतिनिकेतनात जाऊन राहिले आणि जणू तिथलेच झाले. तिथल्या संगीतकार, शिल्पकार, कवी, गायक, लोकगायक, विद्यार्थी या सगळ्यांच्यात मिसळून गेले. पुलंचं वैशिष्ट्य असं, की एखाद्या नवीन लेखकाची किंवा कवीची साहित्यकृती आवडली, की ते स्वत:च्या प्रसिद्धीचा, मोठेपणाचा जराही गर्व न बाळगता त्या नवोदित साहित्यिकाला भरपूर प्रोत्साहन देत. शिवाय त्या नवोदिताचे आपल्या स्नेह्यांमध्ये भरपूर कौतुकही करीत. पुलंसारख्या मोठ्या, सुप्रसिद्ध साहित्यिकाच्या प्रोत्साहनाने त्यांना किती बळ येत असेल याची आपण कल्पना करू शकतो. साहित्यच नाही, तर अभिनय, नाट्यदिग्दर्शन, गायन, जिथे म्हणून त्यांना प्रतिभेची ठिणगी दिसत असे, तिथे तिथे त्या ठिणगीवर हळुवार फुंकर घालून ती फुलवण्याचं काम पुलं एका उपजत प्रेरणेने करत असत. ’ जीवन त्यांना कळले हो’ या पुस्तकातले नारायण सुर्वे, मधु मंगेश कर्णिक, विजया मेहता यांच्यासारख्यांचे लेख वाचून पुलंनी केलेलं हे काम किती महत्त्वाचं होतं याची आपल्याला जाणीव होते.

’ जीवन त्यांना कळले हो’ हे परचुरे प्रकाशनाचं पुस्तक म्हणजे विविध कारणांनी आणि विविध कालखंडांमध्ये पुलंच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींनी पुलंबद्दल लिहिलेल्या लेखनाचं संकलन आहे. जवळजवळ सगळेच लेख पूर्वप्रकाशितच आहेत. मी पुस्तक विकत घेताना जरा साशंक मनानेच घेतलं होतं. कारण अशा प्रकारच्या लिखाणामध्ये एक प्रकारचा तोचतोचपणा आलेला असण्याचा धोका असतो. पण या पुस्तकात मात्र तसं अजिबात झालेलं नाही. याचं कारण म्हणजे पुलंच्या व्यक्तिमत्त्वातली समृद्धी! विजया राजाध्यक्ष, शांता शेळके, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, ग. प्र. प्रधान, नारायण सुर्वे, गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, दाजी भाटवडेकर, निळू फुले, मधु मंगेश कर्णिक, विजया मेहता, करुणा देव, भक्ती बर्वे-इनामदार, अरुणा ढेरे, जयवंत दळवी अशी आपापल्या क्षेत्रात रथी-महारथी असलेली माणसं पु. ल. देशपांडे या एका व्यक्तीविषयी भरभरून लिहिताना या पुस्तकात आपल्याला दिसतात. प्रत्येकाचा पुलंकडे पाहण्याचा भाव वेगवेगळा आहे, त्यात अगदी भक्तिभावापासून ते आदरयुक्त मैत्री, निखळ मैत्री, जिव्हाळा, कौतुक, प्रेम अशा सगळ्या प्रकारच्या भावना आहेत. या सगळ्यातून समोर येतं ते पुलंचं ’माणूस’ म्हणून असलेलं झळाळतं रूप! पुलंची स्वत:ची अशी राजकीय मतं होतीच, पण त्याविरुद्ध मतं असलेल्यांशीही ते सहृदयतेनेच वागले. राजकीयच असं नाही, तर कुठल्याही क्षेत्रातली मतभिन्नता त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातल्या संबंधांच्या, मैत्रीच्या आड कधीच येऊ दिली नाही. आणि म्हणूनच त्यांचा विनोद हा कायम निर्मळ आणि निर्विषच राहिला. बॅ. नाथ पै यांच्या १९५२ सालच्या निवडणुकीतल्या बेळगावच्या प्रचारसभांमध्ये स्वत: पुलंनी भाषणं केली होती. पण त्याच निवडणुकीत, दुसर्या एका सभेत स्वत: नाथ पैंनी भाषण करत असताना, भाषणाच्या भरात ’ आज या जगात माणूस कुठे आहे?’ असा सवाल केल्यावर गर्दीत मित्रांसह मागे बसलेले पुलं हळूच ’ ते सगळे भुजंगरावांच्या सभेला गेले आहेत. इथे आपलीच मंडळी आहेत. तुम्ही बोला’ असा टारगटपणा करू शकत होते. कारण असा विनोद करण्यामागची त्यांची प्रेरणा ही कुणाचा अपमान करण्याची नसून एकंदर आयुष्यात आनंद शोधण्याची होती. तो आनंद मोकळेपणाने इतरांना वाटतच ते जगले.

या पुस्तकातले सगळेच लेख सरस आहेत. पण त्यातही २ लेखांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. पहिला आहे कृ. द. दीक्षित यांचा ’ पुलं : मेहनती व कल्पक ’ प्रोड्युसर’ हा लेख. दीक्षित स्वत: आकाशवाणीत कार्यरत होते. त्यामुळे त्यांना आकाशवाणीतल्या पुलंना जवळून पहायला मिळालं होतं. आकाशवाणी या माध्यमाची बलस्थानं, व्याप्ती आणि सीमा जाणणारे, स्वत: प्रतिभावंत साहित्यिक असलेले पु. ल. देशपांडे हे मुंबई आणि दिल्ली आकाशवाणीवरचे एक गाजलेले निर्माते होते. त्यांच्या मुंबईच्या कारकीर्दीत मंगेश पाडगांवकर, पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर अशा दिग्गजांचा सहभाग असलेली, स्वत: पुलंचं संगीतदिग्दर्शन असलेली ’ बिल्हण’ ही एक संस्मरणीय संगीतिका निर्माण केली गेली. (’ शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ आणि ’ माझे जीवनगाणे’ ही प्रसिद्ध गाणी याच संगीतिकेतली.). पुढे ते चीफ प्रोड्यूसर म्हणून दिल्लीला गेले. तिथेही त्यांनी नाव कमावलं. झोकून देऊन, निर्दोष कार्यक्रम तयार करण्यासाठी अविरत झटणं हे पुलंचं वैशिष्ट्य! त्यामुळे एकाहून एक सरस कार्यक्रम त्यांनी दिले. (’ गेले तेथे मिळले हो’ या स्वत:च्या स्वभावाला अनुसरून दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळातही ते लोकप्रिय झाले. इतके, की नंतर एकदा पुण्याच्या सावरकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात पुलं अध्यक्षस्थानी होते आणि अटलबिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करत होते, तेव्हा वाजपेयीजींनी अशी खंत व्यक्त केली की पुलं दिल्ली सोडून इकडे आले त्यामुळे दिल्लीचं सांस्कृतिक वर्तुळ थोडं रिकामं रिकामं वाटू लागलंय.) जेव्हा भारतात टेलिव्हिजनचं आगमन होणार होतं, तेव्हा त्याचं तंत्र शिकून घेण्यासाठी पुलंना बीबीसीमध्ये पाठवलं गेलं (आणि त्यामुळे आपल्याला ’ अपूर्वाई’ हे श्रेष्ठ प्रवासवर्णन वाचायला मिळालं). ही त्यांच्या आकाशवाणीवरच्या उत्कॄष्ट कामाची एक पावतीच होती. दूरदर्शनवरचे पहिले निर्माते म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही एक वेगळीच बाजू कृ.द. दीक्षितांच्या या लेखामुळे समोर येते.

दुसरा लेख म्हणजे सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचा! पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त लिहिलेला हा लेख हा आत्मीयतेने, काहीसा भावुकतेने ओतप्रोत भरलेला आहे. पुलंच्या साठीनिमित्त त्यांनी पुलंचं निवडक साहित्य असलेला ’ पुलं : एक साठवण’ हा ग्रंथ संपादित केला होता. असा ग्रंथ तयार करणं ही पूर्णपणे जयवंत दळवींचीच कल्पना होती. कोणतं साहित्य घ्यावं, हे मात्र त्यांनी साठ-सत्तर लेखक-कवी मित्रांना पत्रं पाठवून विचारलं होतं. हे पुस्तक खपणार नाही, अशी मॅजेस्टिक प्रकाशनाच्या केशवराव कोठावळ्यांची खात्री होती. ते फक्त हजार प्रतींची आवृत्ती काढणार होते. जयवंत दळवींच्या आग्रहाखातर त्यांनी पाच हजार प्रतींची आवृत्ती काढली आणि ही सगळीच्या सगळी आवृत्ती, छापून बाहेर येण्यापूर्वी, प्रकाशनपूर्व नोंदणी जाहीर झाल्यापासून चार दिवसांत संपली!! अगदी खुद्द जयवंत दळवींना त्यांच्या मित्रांसाठी चार-पाच प्रती हव्या होत्या, त्या मिळू शकल्या नाहीत. अशी अफाट लोकप्रियता वाट्यास आलेला लेखक विरळा! पुलंहून वयाने ज्येष्ठ आणि स्वत: अतिशय लोकप्रिय साहित्यिक असलेले जयवंत दळवी म्हणतात की ’ अशा सभ्य, सुसंस्कृत आणि तेवढ्याच दानशूर साहित्यिकाच्या साठीला ’ पु.लं. : एक साठवण’ यासारखा ग्रंथ मला संपादित करता आला, हे मी माझं भाग्य समजतो’. जयवंत दळवींचं हे वाक्य, किंवा ’ नाशिकला आम्ही तीर्थक्षेत्र म्हणतो, कारण तिथे कुसुमाग्रज राहतात’ हे पुलंचं वाक्य, असं काही वाचलं की वाटतं, हे संस्कृतीचं खरं सौंदर्य!

पुलं आणि सुनीताबाईंनी पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या विविध सामाजिक कार्यांसाठी दिल्या. बहुतांशी वेळा त्या चालू असलेल्या कार्यासाठी त्यांनी दिल्या. पण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या बाबतीत मात्र थोडा वेगळा घटनाक्रम झाला. डॉ. अनिल अवचटांचा व्यसनग्रस्तांवरचा एक लेख वाचून पुलं-सुनीताबाईंनी अनिल आणि सुनंदा अवचटांना घरी बोलावून सांगितलं की या व्यसनग्रस्तांसाठी तुम्ही काहीतरी करा. आत्ता आम्ही एक लाख रुपये द्यायचे ठरवलेत. पण आम्ही पैसे कमी पडू देणार नाही. यातून अवचट पती-पत्नींना व्यसनमुक्ती केंद्राची कल्पना सुचली. केंद्र उभं राहिलं, अधिकृत संस्था उभी राहीपर्यंत मुक्तांगणच्या कर्मचार्यांच्या पगाराचे चेक्स पुलं आणि सुनीताबाईंच्या सहीने निघत होते. ही देणगी देताना पुलं म्हणाले होते, की एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला तरी माझ्या देणगीचं सार्थक झालं असं मी समजेन. ’ मुक्तांगणची गोष्ट’ हे अनिल अवचटांचं पुस्तक वाचलं की जाणवतं, हे काम उभं राहणं किती महत्त्वाचं होतं ते. मुक्तांगणमुळे कितीतरी घरांमधले विझलेले दिवे पुन्हा प्रज्वलित झाले. आयुकातली विज्ञान वाटिका, आनंदवनातलं मुक्तांगण, इतर अनेक सामाजिक संस्था, चळवळी, अपंग-मूक-बधिरांसाठीच्या संस्था अशा विविध कार्यांना पुलं-सुनीताबाईंनी भरभरून देणग्या दिल्या. आपल्या पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकून तो पैसाही त्यांनी सामाजिक संस्थांना दान केला. त्यांचं हे सामाजिक भान सतत जागं होतं.

या दिवाळीत पाडव्याच्या दिवशी पुण्याला बालगंधर्व रंगमंदिरात पुलोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला हजर राहण्याची संधी मिळाली. साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक यांची भाषणं ऐकता आली. मधु मंगेश कर्णिक यांनी भाषणात पुलंच्या या जागृत सामाजिक भानावर भर दिला. ते म्हणाले, की पुलंच्या लेखनातला विनोद हा हास्यनिर्मितीसाठी तर होताच, परंतु त्या विनोदामागे एक सामाजिक भाष्य असे. पुलंनी लेखनातून उभी केलेली माणसे ही त्यांच्या सगळ्या सामाजिक संदर्भांसकट उभी केलेली होती. लेखन प्रचारकी थाटाचे होऊ न देता सामाजिक वास्तव मांडणे पुलंनी साध्य केलेले होते. आर. के. लक्ष्मणांसारखा कुशल व्यंगचित्रकार ज्याप्रमाणे काही रेषांमधून मार्मिक भाष्य करून जातो, त्याचप्रमाणे पुलंसारखा कुशल लेखक शब्दबंबाळ न होता एखाददुसर्याच वाक्यातून नेमके, मर्मग्राही सामाजिक भाष्य करतो. मग तो ’ द्राक्ष संस्कॄती आणि रुद्राक्ष संस्कॄती’ यासारखा शाब्दिक विनोद असेल, किंवा मौन या विषयावर एक तास बोलणारी आचार्य बाबा बर्व्यांसारखी व्यक्तिरेखा असेल. हा नुसता विनोद नसतो, त्या विनोदामागे बरेच संदर्भ असतात आणि म्हणून तो विनोदही गांभीर्याने घेण्यासारखा असतो.

मधु मंगेश कर्णिकांनी पुलं-सुनीताबाईंची एक सुंदर आठवणही सांगितली. मधु मंगेशांच्या गावी करूळला ’ वनराई’ उभारण्यासाठी पुलं-सुनीताबाईंनी पहिली देणगी पाठवली. देणगीदारांच्या नावे एकेक झाड लावण्याची मधु मंगेश कर्णिकांची कल्पना होती. त्यांनी विचारलं, की तुमच्या दोघांच्या नावाने कुठली झाडं लावू? त्यावर पुलं म्हणाले, तुम्ही आंब्याफणसाची झाडं तर लावालच, पण आमच्यासाठी एक बकुळीचं झाड लावा आणि एक सुरंगीचं झाड लावा.

बकुळ आणि सुरंगी...कोमेजल्यावरही दीर्घकाळ सुगंध देणारी, फुलं वेचलेल्या हातांना, फुलं माळलेल्या केसांनाही मंद सुगंध बहाल करणारी अशी ही फुलं. आजूबाजूचा परिसर आपल्या मोहक सुगंधाने भरून टाकणारे हे पुष्पवृक्ष! काही आश्चर्य नाही वाटलं पुलं-सुनीताबाईंची ही आवड ऐकून!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा.. मस्त पोस्ट्स!!

"पुलं वाचणार्‍यांपेक्षा ऐकणारे व बघणारे जास्त झालेत. " - यू नेल्ड इट! त्यातून पु.लं.ची एक कॉमिक रिलीफ देणारा लेखक अशी प्रतिमा तयार होते. मध्यंतरी तर एका व्हॉट्सअ‍ॅपीय फॉरवर्डमधे पु.लं.च्या नाववर खपवलेल्या विनोदात ऑनलाईन शॉपिंग चा संदर्भ होता. Uhoh पु. ल. गेले तेव्हा अ‍ॅमेझॉनचा जन्मही झाला नव्हता रे.

पण त्यापेक्षाही तू पुढे मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे. पु.लं. 'आता मी विनोदी लिहीतो' असं लिहीताना कधीच डोळ्यासमोर येत नाहीत. त्यांचे वैचारिक लेख, भाषणं (सभेतली, रेडिओवरची), व्यक्तीचित्रं, प्रवासवर्णनं ह्या सगळ्यातून ते काहीतरी सांगत असतात, मानवी स्वभावातली विसंगती दाखवत असतात आणि हे करताना त्यांच्या शैलीमुळे, शब्दसंपत्तीमुळे तो विनोद आपोआप निर्माण होतो. त्यांचे बरेचसे विनोद अजूनही रेलेव्हंट रहाण्यामागे त्या विनोदामागचा विचार मोठा असणं हे कारण आहे असं मला वाटतं. (किंबहूना त्यांनी मांडलेला विचार च. तो एका विशिष्ट शैलीतून मांडलेला असल्यामुळे निर्माण झालेला विनोद असा प्रवास असावा.)

फारएण्ड आणि फेरफटका +१
विनोद, तोही निर्मळ विनोद, आनंद देणं-घेणं ही पुलंची सहजप्रवृत्तीच होती. त्यामुळे जो विचार मांडायचा, तो आपोआप त्या मार्गानेच ते मांडायचे.
लेखात मी 'जीवन त्यांना कळले हो' या पुस्तकाचा उल्लेख केलाय, त्यातल्याच एका लेखात एक किस्सा आहे. (लेख कुणाचा ते आता लक्षात नाही) एका परिसंवादात किंवा चर्चेत एक प्राध्यापक मर्ढेकरांच्या कवितेवर टीका करत होते, "उंदीर? हा काय कवितेचा विषय आहे? " वगैरे. पुलं उठून म्हणाले, "घूस चालेल का?" Lol सगळे हसायला लागले. मुद्दा असा, की कवितेला विषयाचं बंधन नसलं पाहिजे हे पुलंनी विनोदातून सहजतेने सांगितलं. अशी अनेक उदाहरणं सापडतील.

फारएण्ड >> +१

असा मी असामी किंवा अंतू बर्वा मधली कुठलीतरी वाक्यं घेऊन लोक 'कसला गांधी' वगैरे पुलंचे विचार असल्याचं सांगतात, तेव्हा त्यांना 'एका गांधीटोपीचा प्रवास' मधले उतारे उद्धृत करून दाखवले तर ते म्हणतात 'हे खोटं आहे. असं पुलंनी लिहिलं असणं शक्यच नाही.' हेच लोक पुढे 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट...' ही कविता पुलंनी कॉलेजमध्ये असताना केलेली कविता म्हणून फॉरवर्ड करतात (युट्युबवरही ही कविता पुलंची म्हणून टाकलीय कोणीतरी), तेव्हा एक ऑटोमॅटिक ग्राइंडर विकत घ्यावा असं मनापासून वाटतं.

Lol

फेफ - हो खरे आहे. अनेक लेखांतील वाक्ये ही अचूक निरीक्षणे आहेत. त्यातील काही धमाल विनोदी आहेत इतकेच. अशीच कितीतरी निरीक्षणे व त्याचे वर्णन करताना त्यासंबंधी विविध क्षेत्रातील उपमा व वाक्प्रचार यांची सांगड घालून एक जबरदस्त इमेजरी तयार करण्याची त्यांची हातोटी अनेकदा दिसते
( वाक्यांच्या अचूकते बद्दल चुभूद्याघ्या)
- अंतु बर्वा मधे "...दारी निसर्गाने कल्पवृक्ष दिलेला. पण त्याच्या खोबर्‍याहूनही करवंटीशी सलगी अधिक" हे गरिबीचे वर्णन. त्यात कल्पवृक्षाचा कन्स्पेट समजून घेतला तो तर शब्द किती चपखल आहे विरोधाभास दाखवायला हे लक्षात येते.
- "मी बेन्सन जॉन्सन नोकरी करतो. सुरूवार आणि झब्बा घालून काय बेबंदशाही नाटक करायला जायचे आहे काय" - यात नाटकही साधेसुधे नाही. बेबंदशाही! (असा मी असामी)
- "ज्या वयात सूत जमवायचे त्या वयात सूत कातत काय बसलास?" (तुझे आहे तुजपाशी)
- "(बायकोला झालेल्या मोतीबिंदूबद्दल बोलताना) मास्तराच्या बायकोच्या गळ्यात मोत्ये पडली नाहीत, डोळ्यात पडली", किंवा "तेथे मास्तरांच्या चपला शोधाव्या लागल्या नाहीत. इतर कोणत्याच चपला इतक्या झिजलेल्या नव्हत्या" (चितळे मास्तर)
- नंदा प्रधान च्या पूर्णपणे गंभीर व्यक्तिरेखेत "कल्हईवाले पेंडसे आत राहतात" असे लिहीलेला व तर्जनीने ती दिशा दाखवणारे चित्र असलेला बोर्ड - सदाशिव पेठेत पूर्वी खूप फिरलेल्यांना हे किती कॉमन आहे हे लगेच समजेल. आणि तेथे लगेच एका तेथील पोराने त्यावर "पण कल्हई रस्त्यात बसून काढतात" हा मजकूर त्यावर ग्राफिटी सारखा लिहील्याचा उल्लेख

ही आत्ता सहज आठवलेली. अशी असंख्य आहेत. काही सिरीयस तर काही धमाल.

ह.पा. ग्राइण्डर सुपरलोल

१९८९ ला मुंबईत जागतिक मराठी परिषद झाली होती. तीत ज्यांचा सत्कार झाला अशा सर्व मराठी भाषिक उत्सवमूर्तींच्या वतीने पुलं नी आभाराचे भाषण केले होते.
https://m.youtube.com/watch?v=BKTwQbGPKaQ

खालील व्हिडिओ पुलं नी संगीतकार खळेंच्या सत्कारसमारंभात केलेल्या भाषणाचा आहे.
https://youtu.be/gA6zFBL9x8U

अनंत भावे यांनी घेतलेली पुलंची मुलाखत.
https://youtu.be/QVDfxORfrGc

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ, न्यू जर्सी येथे केलेले १९८७ सालचै भाषण
https://youtu.be/t-uqxOpoxUU

तेव्हा एक ऑटोमॅटिक ग्राइंडर विकत घ्यावा असं मनापासून वाटतं. >> हे वाचून मी आणि माझा शत्रुपक्ष मधलं यात काय वाट्टेल ते टाका एका मिनिटात पीठ.. त्या मिक्सरचा साईझ लहान होता नाहीतर.. हे आठवलं!

क-हेचं पाणी, मी कसा झालो वाचले तर मराठीत विनोदाचा प्रवास समजतो. >> या दोन्ही पेक्षा अत्र्यांचेच विनोदगाथा सुचवेन. त्यात अर्थात केवळ मराठी नाही तर लिंकन, चर्चिल इत्यादी परदेशी व्यक्तींचे देखील किस्से आहेत पण एकूण आढावा फार सुंदर घेतलाय. पु. लं च्या बटाट्याच्या चाळीवर देखील एक लेख आहे
अत्रे किती बारकाईने विनोदाकडे पहात होते हे जाणवतं.
च्रप्स, ही बुकगंगावरच्या विनोदगाथा पुस्तकाच्या preview ची लिंक

फा - +१ Happy

"अशीच कितीतरी निरीक्षणे व त्याचे वर्णन करताना त्यासंबंधी विविध क्षेत्रातील उपमा व वाक्प्रचार यांची सांगड घालून एक जबरदस्त इमेजरी तयार करण्याची त्यांची हातोटी अनेकदा दिसते" - किंबहूना अशी उदाहरणं देताना पु.ल. ज्या दोन गोष्टींची तुलना करायची त्या इतक्या कॉन्ट्रास्टींग वापरतात की जसा-जसा तो कॉन्ट्रास्ट लक्षात येत जातो, तसा तसा तो विनोद सुद्धा अधिक भावतो आणि तो मुद्दासुद्धा लक्षात येतो. एक आणखीन उदाहरण म्हणजे असामी मधलं सुटासाठी आणलेल्या कापडाची 'फार तर ह्या तंबोर्याला गवसणी होईल'. एखाद्या सुटपीसची लायकी एकदम तंबोर्याच्या गवसणीसाठी वापरल्या जाणार्या कापडाची? Happy

इथे मुद्दाम नोंद करण्याकरता - पुलंच्या बटाट्याची चाळ मधल्या बहुधा "संगीतिका" मधल्या एका वाक्याचा परफेक्ट उपयोग वरदाच्या "कालप्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम" या लेखाच्या शीर्षकात आहे. तिच्याच दुसर्‍या एका लेखात "चिंता करितो वृष्टीची" हा समर्थ रामदासांच्या एका ओळीमधे किंचित फेरबदल करून चपखल नाव दिले आहे. बहुधा "उदक राखिले युक्तीने" याचाही संदर्भ समर्थांच्याच एका वचनाशी आहे. नक्की लक्षात नाही कोणत्या ते.

पुलंच्या लेखनात कुठल्या कवितांचे संदर्भ आले आहेत ह्यावर एक धागा होऊ शकेल. फे फ ने म्हणल्याप्रमाणे कॉन्ट्रास्ट असलेला वापर ज्यांच्या लक्षात येईल, त्यांना तो अधिक भावतो. 'अहो गुरुदेवांना बरं का साहेब सगळे सारखे' ह्या वाक्यानंतर त्यांनी 'हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं' (राजहंस माझा निजला - कविता) हे जे काही केलंय, ते सुचायला मुळात त्या कविता हजारो वेळा डोक्यात घोळून, रिचवून, योग्य त्या वेळी योग्य आणि विचित्र ते संदर्भ /सांगड घालता येईल अशी विनोदबुद्धी हवी. कित्येक वर्षांच्या रियाजानंतर गायकाने जश्या ठेवणीतल्या सोडून आणखीन कुठल्या कुठल्या हरकती पोतडीतून काढाव्या आणि सादर होत असलेल्या रागात दुसऱ्याच रागाचं प्रतिबिंब बघून श्रोत्यांनी अचंबित व्हावं तसा मामला आहे हा.

परफेक्ट उपयोग वरदाच्या >> हे वाचून फा ची चक्क चूक झाली. हे वाक्य सुरुवातीच्या सूत्रधाराच्या 'तुझेन येथे काम ' मध्ये आहे, वरदा बाईच्या गाण्यात नाही हे लिहायला आलो.
मग एकदा त्या लिंक वर काय आहे बघायला क्लिक केलं आणि डोक्याला हात लावला. Lol
म्हटलं प्रेमात येऊन वरदाबाईंची फा ने अगदी वरदा केली. Proud

ह.पा. अनुमोदन!
'उपास' मधे ' तबकात राहिले देठ लवंगा साली' ही गदिमांच्या 'जोगिया'मधली ओळ आहे.
अमितव Lol

म्हटलं प्रेमात येऊन वरदाबाईंची फा ने अगदी वरदा केली >> Lol

राजहंस माझा निजला चा संदर्भ माहीत नव्हता.

'उपास' मधे ' तबकात राहिले देठ लवंगा साली' ही गदिमांच्या 'जोगिया'मधली ओळ आहे. >>> सही!

"कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला" वरून बाबा बर्व्यांबद्दल की आणखी कोणाबद्दल कसलातरी दृष्टिक्षेप "टाकुनिया बाबा गेला" आहे Happy मी आणि माझा शत्रुपक्ष मधे उंदरांचा प्रश्न सोडवायला पिंपे आणली चा उल्लेख आहे, तो "पिपात मेले ओल्या उंदीर" या बहुधा बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवरून. पुढे त्यावर आणखी "उंदीर ओले करायचे की पिंपे हे न समजल्याने तो प्रश्न तसाच राहिला" हे ही आहे वर Happy

धमाल चर्चा आहे.
ते म्हातारी उडता नयेची चं कारकून व्हर्जन पाळीव प्राणी पक्षी मध्ये आहे का?वाईफची नुकतीच डिलिव्हरी वगैरे.
बिगरी ते मॅट्रिक मध्ये उल्लेख येतो की गोपिकाबाईंचा पुत्रशोक ही एका रड्या मास्तरांची फेवरीट कविता असते. तेव्हा पुत्रशोक कितीही गंभीर घटना असली तरी त्या सिच्युएशनमध्ये हसायला येतं. त्यातच देवाजीने करुणा केली चं दामले मास्तर व्हर्जन आहे.
किंवा पाळीव पक्षी मध्येच तो 'सत्य वदे वचनाला नाथा' उल्लेख एकदम परफेक्ट येतो.

तबकात राहिले देठ लवंगा साली >> हो, हा तर खतरनाक कॉन्ट्रास्ट आहे! जोगियातलं त्या स्त्रीचं वर्णन आणि उपासमध्ये पंतांची अवस्था. कुठच्या कुठे तुलना आहे!

टाकुनिया बाबा गेला >> +१

अंतू बर्वा मध्ये जो 'चक्रनेमिक्रमेण' शब्द आला आहे, तो तर कालिदासाने कॉईन केलेला मेघदूत मधला एक आयकॉनिक शब्द आहे.

व्हाइटहॅट>>
हो 'म्हातारी उडता न ये चि तिजला' हे पाळीव प्राणीमधेच आहे.

अजून एक आठवलं म्हणजे बापू काणे कलेक्टरला झुणका देऊन येतो तेव्हा तो 'सुख झाले हो साजणी' असा दिसतो Lol (रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी हा अभंग)

हपा, मला वाटलेच होते!
केवळ मराठी साहित्याचेच नाही तर एकूणच भारतीय आणि मराठी संस्कृतीचे अनेक संदर्भ पु. लं. लीलया वापरतात. ज्यांना ती संगती लागते त्यांना त्यातील अर्थ अधिक छान कळतो!
भारतीय भोजनाला नावे ठेवणाऱ्या माणसाला जेवणाचे ताट पुढे आल्यावर "गच्छ सूकर, भद्रं ते" म्हणण्याचा (अपूर्वाई बहुतेक) याचा अर्थ तो संस्कृत श्लोक जाणणाऱ्याला पटकन उमगेल. खरंच असा धागा काढला तर छान संकलन होईल आणि नवीन अर्थ ही कळतील.

नवीन धागा काढला पाहिजे म्हणता म्हणता इथेच लिहितोय आपण.
बहुतेक अपूर्वाईमध्येच (इंग्लंडला पोचल्यावर ?) सूटबूट काढून टाकून सदरा-लेंगा वगैरे घातला यासाठी 'मोडुनि दंडा फेकुन देईन भिकार भगवी वस्त्रे' अशी ओळ आहे. आत्ता गूगल केल्यावर कळलं की ती संगीत सौभद्र या नाटकातली आहे!

ही उदाहरणेही जबरी. चक्रनेमिक्रमेण लक्षात आहे पण बापू काण्याचे वाक्य व वरची इतरही एक दोन नाहीत. एकूणच आख्खे व्यक्ती आणि वल्ली आणि इतर पुस्तकेही परत वाचायला हवीत Happy

"दासबोधाची इतकी पारायणे करून इतका अव्यवहारी राहिलेला मनुष्य" हे हरितात्यांचे वर्णन ही फार उच्च दर्जाचे कनेक्शन आहे. हरितात्या किती अव्यवहारी आहेत हे त्या व्यक्तिचित्रणात उघड आहे. पण एकूणच इतिहासाबद्दलचे त्यांचे वेड आणि त्यातही रामदास स्वामींबद्दलची माहिती ओघाने येते आणि मग हे वाक्य येते. या दोन्ही गोष्टी स्वाभाविकपणे एकत्र आणल्यामुळे हे भारी वाटते. अनेकदा लेखक एखादा संदर्भ लेखात "पेरतात", त्याबद्दल पुढे वाक्य, कोटी करता यावी म्हणून. पुलंनीही हे बहुधा केले असेल. त्यात चूक काही नाही. पण लेखाच्या मुख्य गाभ्यातीलच दोन विरूद्ध संदर्भ एकत्र आणल्यामुळे हे इथे एकदम भारी वाटते.

बाय द वे, त्या किडस-अ‍ॅडल्ट-लेजेण्ड मीम्स असतात त्यात इतिहासाने भारलेले असण्याबाबत पुरंदरे जर अ‍ॅडल्ट असतील, तर हरितात्या हे लेजेण्ड आहेत Happy

https://www.aksharnama.com/client/article_detail/6090
ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे असं एक पुस्तक आलं आहे. त्या पुस्तकावरचा हा लेख आज वाचला.
पु. ल. देशपांडे हे ब्राह्मणी मानसिकतेचे होते हा मुद्दा लेखकाला पटवायचा आहे हे समजलं, पण लेखात दिलेली उदाहरणं काही पटली नाहीत.

Happy हे अजून एक परीक्षण त्या पुस्तकाचे
https://rightangles.in/2022/05/09/pula-deshpande-brahminism/

दोन्ही परीक्षणे व त्यावरून पुस्तकही - हे सगळेच "गल्ली चुकलं काय हो हे पीएल" झाले आहे Happy

मुळात ते "ब्राह्मणी" म्हणजे काय हे प्रत्येक लेखात पॅराभर मजकुरात सांगावे लागत असेल तर दुसरे विशेषण वापरा असे सांगावेसे वाटते. कारण वाचणार्‍यांच नव्हे तर लिहीणार्‍यांचाही अनेकदा त्यात घोळ झालेला दिसून येतो. पण ते एकवेळ सोडा. पुलंची "मानसिकता ब्राह्मणी" असल्याची जी उदाहरणे आहेत ती फार विनोदी आहेत.

पुलंच्या साहित्यातील विनोदाला असलेली झालर ही जाती व्यवस्थेबद्दल असलेला पक्षपातीपणा, बहुजन-कष्टकरी विरोधी दृष्टीकोन, स्त्रियांविषयी तुच्छता-टिंगल, शारिरीक व्यंगांवरून टिंगल, मुस्लिमद्वेष, कम्युनिस्ट द्वेष, महात्मा गांधी आणि त्यांच्या कामाबद्दल टिंगल याची आहे. हे वाचून मोठ्ठं आश्चर्य वाटेल
>>> हा कॉन्फिडन्स आवडला आपल्याला. आणि हे - किमान यातले काहीतरी- 'बटाट्याची चाळ' मधे दिसले!

"या जगात विशुद्ध प्रेम कोठेच मिळत नाही" हे त्यांच्या पुस्तकातील वाक्य जसे गटणे खरेच त्यांचे वचन समजतो तसे या लेखकांचे झाले आहे.

"या जगात विशुद्ध प्रेम कोठेच मिळत नाही" हे त्यांच्या पुस्तकातील वाक्य जसे गटणे खरेच त्यांचे वचन समजतो तसे या लेखकांचे झाले आहे.>> Happy

एकंदरीत ब्राम्हणांना शिव्या घालायचा सध्या ट्रेन्ड आहे त्यातुन पु.ल. पण सुटले नाहीत. असो एकंदरीत ह्या लोकांना प्रतिवाद करण्यापेक्षा याकडे दुर्लक्ष करुन पुढे चालावे (Ignore & move on)

इंटरेस्टिंग! ब्राह्मणी साहित्य’मधील ‘ब्राह्मणी’ हा शब्द जातीवचक नसून संस्कृती/ परंपरा/ व्यवस्था/ मानसिकतावाचक असल्याचं नमूद करत >> very convenient indeed! जर इतर जातीवाचक विशेषणे वापरणे चुकीचे आहे (जे मला मान्य आहे) तर ब्राह्मणी हा शब्द जातीवाचक नाही हे कसे काय? मला तरी तो जातीवाचक म्हणूनच वापरला जावा असे वाटते. ही अशी मखलाशी करून हा शब्द derogatory विशेषण म्हणून वापरण्याचे स्वातंत्र्य मिळवायचे आहे असे वाटले.
Brahmins have enjoyed and are still enjoying many privileges of being so called "upper cast" and there is a great room for improvement in the psyche and behavior of this class. पण या मुसळाकडे बोट दाखवून आपण आपल्या समाजातील मुसळांकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना हे तपासून पाहिले पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे जातींची उतरंड आहे. शिवाय सर्व जाती आणि धर्म हे पुरूषप्रधान तर आहेतच! In a true egalitarian society the word ब्राह्मणी will also be considered politically incorrect.

"आणि म्हणून ‘पुलं’ या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवलेल्या लेखकाची चिकित्सा करताना मेणसे त्यांचा त्यांच्या खऱ्या नावानेच उल्लेख करतात. यावरून लेखकाने त्यांच्या चार पुस्तकांचा किस पाडताना त्यांच्यापासून भावनिकदृष्ट्या लांब राहण्याचं भान किती जागृत ठेवलं आहे, याची कल्पना यावी. ">> हे विनोदी आहे! How do you know that you are not a hater? मग भावनिकदृष्ट्या लांब राहण्याचं भान कसं काय म्हणायचे याला? गांधीजींना मिस्टर गांधी म्हटले की तटस्थता येते का?

Gone with the wind किंवा Downton abbey/Bridgerton सारख्या मालिकांना होणारा विरोध या अशाच मानसिकतेतून होतो असे वाटते. यांची पुढची मागणी अशा ब्राह्मणी साहित्यावर बंदी घालण्यात यावी अशी झाली तर नवल वाटायला नको.
समाजातल्या असमानतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींचे उदात्तीकरण कधीच केले जाऊ नये पण याचा अर्थ त्या काळातील सर्व साहित्य आणि कला नष्ट कराव्यात असे मला वाटत नाही.

वावे, हा धागा सुरक्षित राहू दे अशा शुभेच्छा!

फारएण्ड +१
असा मी असामी हे पुस्तक (सोयीस्करपणे?) त्यांनी विचारात घेतलेलं दिसत नाही. त्यात 'कसला शिंचा हिंदू बांधव?' वगैरे आहे म्हणून का? शिवाय पांढरं व्हाईट्ट अध्यात्मही अडचणीचं झालं असतं.
जिज्ञासा, ब्राह्मणी हा शब्द वर्चस्ववादी (? की जातीयवादी?) मानसिकतेसाठी वापरावा का हा एक मुद्दा आहेच, पण पुलंचं लिखाण आणि आयुष्य त्या मानसिकतेचं नव्हतं हे नक्कीच आहे. त्या पुस्तकाच्या लेखकाची गल्ली फारएण्डनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच चुकलेली आहे. बापू काणेची बायको ही आदर्श हिंदू स्त्री असं पुलंना खरोखरच म्हणायचं आहे असं लेखकाला वाटत असेल तर कमाल आहे.

दोन्ही परीक्षणं वाचली. हणमंतराव दशपुत्रे संबंधित परिच्छेदावरून पुस्तकाच्या लेखकाला विनोद कळलेला नाही, हे समजलं. बाकी अनेक गोष्टीही-
हं . या निकषात बसणार्‍या कोणकोणत्या गोष्टी यात दिसतात, ते पाहू, असं म्हणून घेतलेल्या वाटतात.

Pages