मला ' दिसलेले' पुलं : थोडे वेगळे पैलू

Submitted by वावे on 28 February, 2019 - 23:31

मराठी भाषा दिवसानिमित्त पुलंबद्दल लिहायचं ठरवल्यावर किती लिहू आणि किती नको असं वाटायला लागलं. कितीही लिहिलं तरी ते कमीच पडेल. यातून मार्ग काढण्यासाठी विनोदी लेखनाच्या पलीकडे असलेले पुलं मला ज्यातून दिसले, त्या पुस्तकांबद्दल आणि कॅसेटबद्दल लिहायचं ठरवलं. अलूरकर म्युझिक हाऊसची ’ एक आनंदयात्रा कवितेची’ ही, पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या बा. भ. बोरकरांच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाची कॅसेट, ’ एक शून्य मी’ हा पुलंच्या गंभीर लेखनाचा संग्रह आणि ’ जीवन त्यांना कळले हो’ अशा सार्थ नावाचे, परचुरे प्रकाशनाचे, पुलंवरच्या विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन असे तीन संदर्भ या लेखात मुख्यत: वापरले आहेत.

पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अनेक पैलूंमधला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संगीतावरचं त्यांचं प्रेम. गायक, वादक, रसिक श्रोते अशा सर्व नात्यांमधून त्यांनी संगीतकलेची आराधना केली. यापैकी रसिक श्रोतेपणाचा प्रत्यय त्यांनी लिहिलेल्या अनेक गायक-गायिकांच्या व्यक्तिचित्रणांमधून येतो. त्यांचं हार्मोनियमवादन हाही भल्याभल्यांच्या कौतुकाचा विषय होता. पुलं कॉलेजला असताना कवी राजा बढे यांच्या कवितांना चाली लावून कार्यक्रमांमधून गात असत. पण हे सगळं फक्त कुठे कुठे वाचल्यामुळेच मला माहिती होतं. मला पुलंच्या आवाजाची ओळख ’ चितळे मास्तर’ , ’ हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका’ अशा त्यांच्या गद्य कॅसेट्समधूनच झालेली होती. पुलंचं गाणं ऐकण्याची संधी कधी मिळण्याचं कारण नव्हतं. कथाकथनांमधून दोन-तीन ओळी तुकड्या-तुकड्यांमधून कधी ऐकल्या असतील, तेवढ्याच. पण ’ पाळीव प्राणी’ मधल्या अगदी ’ कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा’ सारख्या एखाद्या ओळीतही त्यांच्या गळ्याचा गोडवा जाणवून जायचा. हा गोडवा भरभरून अनुभवता येतो, तो ’ एक आनंदयात्रा कवितेची’ या कार्यक्रमात! पुण्यात कॉलेजला असताना एकदा सहज ’ अलूरकर’ मध्ये चक्कर टाकताना या कार्यक्रमाची कॅसेट हाती लागली. असंख्य वेळा ती ऐकली, अजूनही त्या कविता ऐकण्याचा कंटाळा आलेला नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितांचं पुलं आणि सुनीताबाईंनी केलेलं हे वाचन/गायन ऐकणं म्हणजे एक सदाबहार आनंदाचा ठेवाच आहे.

मुळात बोरकरांशी पुलंचा खूप जुना परिचय. पुलं शाळेत शिकत असताना एक उगवता कवी म्हणून बोरकर पुलंच्या आजोबांना भेटायला आलेले असताना त्यांची बोरकरांशी प्रथम भेट झालेली होती. पुढेही अगदी बोरकरांच्या मृत्यूपर्यंत पुलं-सुनीताबाईंचे त्यांच्याशी अगदी जवळचे, घरोब्याचे संबंध होते. कविता हा सुनीताबाईंच्या खूप जिव्हाळ्याचा विषय. उभयतांचं वाचनही अक्षरश: अफाट. अनेक संदर्भ मनात जागे. त्यामुळे हा कवितावाचनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच जातो. पुलंचं काव्यगायन इतकं गोड आहे, की ही रंगलेली मैफ़िल संपूच नये असं आपल्याला ही कॅसेट ऐकताना वाटत राहतं. ’ चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे’ , ’ घन लवला रे घन लवला रे’ अशा कवितांमध्ये आपलं मन गुंगुन जातं. ’तव नयनांचे दल हलले गं’ या ओळीतले दल म्हणजे पाकळी की शस्त्रसज्ज सैन्यदल, असे शब्दांच्या अर्थाचे सुनीताबाई आणि पुलंनी केलेले खेळ, कवितेत मधेमधे सहजपणे आलेले पिसोळे, तार, भिरी असे लडिवाळ कोकणी शब्द दाखवणं, निळ्या रंगाबद्दलची कविता आल्यावर ज्ञानेश्वरांपासून ते थेट कवी ग्रेस यांच्या काव्यांमधल्या निळ्या रंगावरच्या ओळी सांगणं, बोरकरांच्या हृद्य आठवणी सांगणं, अशा वाटेने ही मैफिल कमालीची रंगतदार होत जाते. ’माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता सुनीताबाई वाचत असताना ’ माझ्या गोव्याच्या भूमीत, सागरात खेळे चांदी, आतिथ्याची, अगत्याची, साऱ्या षड्रसांची नांदी’ ही ओळ आल्यावर बोरकरांचं माशांवर काय विलक्षण प्रेम होतं, असं सुनीताबाईंनी म्हणायचा अवकाश, माशांवर तितकंच प्रेम करणारे पुलं उत्स्फूर्तपणे बोरकरांची दुसरी कविता तालासुरात सुरू करतात.. ’मासळिचा सेवित स्वाद दुणा.. इतुक्या लौकर येइ न मरणा..’ आणि या उत्स्फूर्ततेला प्रचंड दाद मिळते. हा कार्यक्रम जेव्हा ध्वनिमुद्रित झाला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये एस एम जोशी हजर होते. ’जीवन त्यांना कळले हो’ ही कविता वाचायला सुनीताबाई सुरुवात करत असतानाच त्यांना थोडं थांबवून पुलं म्हणतात की ही कविता जणू काही ज्यांना उद्देशून लिहिली आहे असं वाटावं असे एसेम जोशी आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. एसेम जोशींच्या सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मग या कवितेच्या वाचनाला एक निराळीच उंची प्राप्त होते. या कवितेचा अर्थ इतका आतपर्यंत समजून-उमजून वाचण्यासाठी पुलं-सुनीताबाईंसारख्या ’ जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करीं’ अशा वृत्तीच्या व्यक्तीच हव्यात. त्या दोघांमधला कवितांच्या निमित्ताने घडणारा हा संवाद या कार्यक्रमाला अधिकच जिवंत करतो. या सगळ्या कवितांना लावलेल्या चाली पुलंनीच लावलेल्या आहेत का ते मला माहिती नाही, पण या चाली आणि गाण्याची पुलंची पद्धत, दोन्ही गोष्टी त्या कवितांना अगदी पूरक आहेत. ’जपानी रमलाची रात्र' सारख्या शृंगारिक कवितेपासून ते ’ सुखा नाही चव’ अशा उदास कवितेपर्यंत विविध प्रकारच्या कविता अतिशय ताकदीने आणि कवितेच्या अर्थाशी समरस होऊन पुलं आणि सुनीताबाई सादर करतात.’ त्यां दिसां वडाकडे’ यासारख्या काही कोकणी कविताही या कार्यक्रमात ऐकायला मिळतात आणि ’ डाळिंबीची डहाळीशी’ या बोरकरांच्या कवितेची त्यांनीच लिहिलेली कोकणी आवृत्तीही ऐकायला मिळते. कोकणी भाषेचा गोडवा अगदी खास कोकणी उच्चारांमधे पुलं आपल्यापर्यंत पोचवतात. पुलंचं आजोळ कारवारी असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कानांवर कारवारी कोकणी भाषा पडलेली होती. त्यामुळे त्यांचे कोकणी उच्चार अगदी ' ओरिजिनल ' होते. या कोकणी कवितांमुळे या कार्यक्रमाला एक वेगळा आयाम मिळतो. मी या कार्यक्रमाबद्दल कितीही लिहिलं, तरी ती मुळातूनच अनुभवण्याचीच गोष्ट आहे. (यूट्यूबवर मला तरी यातली एकही कविता सापडली नाही त्यामुळे मी इथे लिंक देऊ शकत नाही. त्याबद्दल दिलगीर आहे).

पुलं स्वत: कोकणी उत्तमप्रकारे जाणत होते इतकंच नाही, तर कोकणीबद्दल त्यांना खूप आपुलकीही होती. मंगळुरी, मालवणी वगैरे कोकणीचे उपप्रकारही त्यांना चांगलेच माहिती होते. परंतु कोकणी ही मराठीची बोलीभाषाच आहे, स्वतंत्र, अभिजात भाषा नाही, असं मात्र त्यांचं ठाम मत होतं. मुळात माणसांमध्ये नसलेला कोकणी-मराठी वाद उभा करण्यामागे कसलं राजकारण आहे, याचंही त्यांना चांगलंच भान होतं. ’ एक शून्य मी’ या पुस्तकातल्या एका लेखात पुलंनी सडेतोडपणे आपलं हे मत मांडलेलं आहे. एकंदरीतच या पुस्तकातल्या सगळ्याच लेखांमध्ये पुलंचं एक निराळ्याच प्रकारचं लेखन वाचायला मिळतं. ’व्यक्ती आणि वल्ली’ सारख्या पुस्तकांमधली व्यक्तिचित्रणं किंवा ’असा मी असामी’सारखं पुस्तक लिहिताना पुलं स्वत:कडे त्या त्या विषयाला साजेशी एक विशिष्ट भूमिका घेऊन लिहितात, मग ते कधी मुंबईत खर्डेघाशी करणारे, मर्यादित विश्व असलेले बेनसन जानसन कंपनीच्या कचेरीतले कारकून असतात, कधी रत्नागिरीतल्या चितळे मास्तरांच्या पहाटे भरणार्या स्पेशल क्लासमधले स्कॉलर विद्यार्थी असतात, तर कधी रत्नागिरी ते मुंबई एसटीतून प्रवास करणारे प्रवासी असतात. त्या त्या लेखनात व्यक्त झालेली निवेदकाची मतं ही त्या त्या भूमिकेला साजेशी असतात. पण अर्थातच ललितलेखन करताना घेतलेलं हे स्वातंत्र्य असतं. प्रत्यक्षातल्या पुलंची विविध सामाजिक विषयांवरची जाणकार आणि परखड मतं ही ’ एक शून्य मी’ या पुस्तकातल्या लेखांमध्ये वाचायला मिळतात. हे सगळे लेख विविध नियतकालिकांमधून पूर्वप्रकाशितच आहेत, पण विनोदी लेखक, नाटककार, एकपात्री प्रयोग करणारे अभिनेते वगैरे ओळखींखाली एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे, कोणत्याही क्षेत्रातल्या दांभिकतेची चीड असणारे, त्याचबरोबर सखोल सामाजिक भान असणारे साहित्यिक ही त्यांची ओळख काहीशी झाकोळलीच गेली असं म्हणायला लागेल.

’ धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही’ या लेखात पुलंनी भारतीयांच्या झापडबंद वृत्तीबद्दल तीव्र मतं व्यक्त केली आहेत. पुलं म्हणतात की ही झापडबंद प्रवृत्ती, उच्च-नीचतेची मानसिकता आपल्याकडे सर्वव्यापी आहे. या बाबतीत कुठलाच धर्म अपवाद नाही. स्वत: पुलं नास्तिक होते, विवेकवादी होते. त्यांच्याच शब्दांत, ’ विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही आणि सत्याचे दर्शन घडवणार्या वैज्ञानिकांचा देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सर्वांत अधिक छळ केला आहे.’ जातीपातीच्या आधारावर केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल पुलं विषादाने लिहितात. ते म्हणतात की ’ जात नावाचा व्हायरस’ आपल्या स्वभावात घट्ट रोवून बसलेला आहे. ते अशी खंत व्यक्त करतात की बाबासाहेब आंबेडकरांकडे एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा, व्यासंगी, कृतिशील आणि द्रष्टा नेता म्हणून न बघता केवळ दलितांचा नेता म्हणून बघितलं गेलं आणि त्यामुळे त्यांची पुरेशी ओळखच कुणाला झाली नाही. हे वाचून मला कुसुमाग्रजांच्या ’ पुतळे’ या कवितेची आठवण होते. त्या कवितेतही कुसुमाग्रज हाच सल व्यक्त करतात, की शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना शेवटी आपण केवळ एका-एका जातीपुरतं मर्यादित करून टाकलं. त्या कवितेत शेवटी गांधीजी म्हणतात की तुम्हा सर्वांच्या पाठीशी निदान एकेक जात तरी आहे, माझ्या पाठीशी सगळे असूनही कुणीच नाही ( माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेऱ्यांमधल्या भिंती). हीच वेदना ’गांधीयुग व गांधीयुगांत’ या, गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिलेल्या लेखात पुलं व्यक्त करतात. गांधीजींबद्दल अतीव आदर असलेले पुलं, गांधीजींचं फक्त नाव घेऊन एरवी भ्रष्टाचार करायला मोकळे असलेले पुढारी बघून तीव्र संतापलेले आणि काहीसा अपेक्षाभंग झालेले इथे दिसतात. तसाच अपेक्षाभंग आणि संताप त्यांच्या ’ सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा बळी’ या लेखात, आणीबाणीनंतर जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून आणलेल्या जनता पक्षाच्या सरकारबद्दलही दिसतो. पुलंनी स्वत: आणीबाणीला जोरदार सक्रिय विरोध केला होता आणि निवडणुका जाहीर झाल्यावर जनता पक्षाच्या प्रचारसभांमधून प्रभावी भाषणेही केली होती. नंतर सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्यांच्यावर परखडपणे टीकाही करण्याइतका विचारांचा मोकळेपणा त्यांच्याकडे होता. कारण त्यांनी स्वत:ला त्या पक्षाशी बांधून घेतलेलं नव्हतं. निवडणुकांचे निकाल लागल्यावर ते आणि सुनीताबाई स्वत:हून त्यातून अलगद बाजूला झालेले होते. त्यामुळे पटतील त्या मुद्द्यांना पाठिंबा आणि न पटणार्या गोष्टींना विरोध ही आपली भूमिका ते ठामपणे निभावू शकले. या पुस्तकात विनोबांवरही एक लेख आहे. या आणि ‘गुण गाईन आवडी' या पुस्तकातल्या विनोबांवरच्या लेखांमध्ये त्यांच्याबद्दलचा निखळ अपरिमित आदर दिसतो. (भूदान चळवळ समजून घेण्यासाठी स्वत: पुलं विनोबांबरोबर त्यांच्या भूदानाच्या पदयात्रेत दोन वेळा आठ-दहा दिवस चाललेले होते.) विनोबा, बाबा आमटे, साने गुरुजी ही पुलंची श्रद्धास्थाने होती. आनंदवनात पुलं घरच्यासारखेच होते. ’ दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ हे त्यांचे सूत्र होते.

नवे मराठी शब्द तयार करण्याच्या सरकारी धोरणातल्या काही चुकीच्या बाबींवर ’ क्व च भवान क्व पुल: क्व च सूकर:’ या उपरोधिक लेखात पुलंनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत, तेही मधूनमधून मिश्कील चिमटे काढत! ’ अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या’ हा आचार्य अत्र्यांवरचा लेख म्हणजे एका सिद्धहस्त विनोदी लेखकाने, दुसऱ्या एका सिद्धहस्त विनोदी लेखकाच्या लेखनाचा, एका जाणकार चाहत्याच्या भूमिकेतून घेतलेला आढावा आहे. पुलंच्या व्यक्तिमत्त्वातल्या अशा अनेक पैलूंचं दर्शन या विविध लेखांमधून आपल्याला होतं. तसं ते थोडंफार इतर पुस्तकांमधूनही झालेलं असतंच म्हणा! ’ एक लाख खाल्ले की पाठवतात असेंब्लीत. लोकनियुक्त प्रतिनिधी!’ म्हणणारे ’ अंतू बर्वा’ मधले अण्णा साने, ’ शिंचे मुहूर्त बघतात, हातात कुठल्या कुठल्या बाबांच्या अंगठ्या घालतात, गळ्यात लाकिटं घालतात, धिस इज रिअली पझलिंग' म्हणणारे चितळे मास्तर, ’ आम्ही त्याच्या व्याख्यानाला गेलो नाही तर तो पुढारी राहणार का? वुई आर ए पार्ट ॲंड पार्सल ऑफ हिज पुढारीपणा’ म्हणणारा परोपकारी गंपू, ’ हे जग कसलं आहे ठाऊक आहे तुम्हाला? मुखवट्यांचं’ असं म्हणणारा ’ तो’, ह्या सर्व व्यक्तींच्या तोंडून त्या त्या वेळी जणू पुलंच बोलत असतात.

‘गुण गाईन आवडी' , ‘गणगोत’, ‘मैत्र' यांसारख्या पुस्तकांमधून पुलंच्या गुणग्राहक आणि जगात कुठेही काही उत्तम, उदात्त, उन्नत, दिसलं की उत्कटतेने दाद देण्याच्या प्रवृत्तीचं दर्शन घडतं. पुलंचं गणगोत खरंच खूप मोठं होतं. शाळा-कॉलेजमधली नोकरी, चित्रपटव्यवसाय, रेडिओ आणि दूरदर्शनमधली कारकीर्द, नाट्यव्यवसाय, पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यांना केलेली मदत या सर्व टप्प्यांवर पुलंनी अगणित मित्र, चाहते आणि हितचिंतक जोडले. संगीत ही तर त्यांच्यासाठी अगदी जिव्हाळ्याची कला! त्यामुळे अनेक दिग्गज गायक, वादक, रसिक त्यांच्या खास बैठकीतले! वयाच्या पन्नाशीनंतर पुलं बंगाली भाषा शिकण्यासाठी थेट शांतिनिकेतनात जाऊन राहिले आणि जणू तिथलेच झाले. तिथल्या संगीतकार, शिल्पकार, कवी, गायक, लोकगायक, विद्यार्थी या सगळ्यांच्यात मिसळून गेले. पुलंचं वैशिष्ट्य असं, की एखाद्या नवीन लेखकाची किंवा कवीची साहित्यकृती आवडली, की ते स्वत:च्या प्रसिद्धीचा, मोठेपणाचा जराही गर्व न बाळगता त्या नवोदित साहित्यिकाला भरपूर प्रोत्साहन देत. शिवाय त्या नवोदिताचे आपल्या स्नेह्यांमध्ये भरपूर कौतुकही करीत. पुलंसारख्या मोठ्या, सुप्रसिद्ध साहित्यिकाच्या प्रोत्साहनाने त्यांना किती बळ येत असेल याची आपण कल्पना करू शकतो. साहित्यच नाही, तर अभिनय, नाट्यदिग्दर्शन, गायन, जिथे म्हणून त्यांना प्रतिभेची ठिणगी दिसत असे, तिथे तिथे त्या ठिणगीवर हळुवार फुंकर घालून ती फुलवण्याचं काम पुलं एका उपजत प्रेरणेने करत असत. ’ जीवन त्यांना कळले हो’ या पुस्तकातले नारायण सुर्वे, मधु मंगेश कर्णिक, विजया मेहता यांच्यासारख्यांचे लेख वाचून पुलंनी केलेलं हे काम किती महत्त्वाचं होतं याची आपल्याला जाणीव होते.

’ जीवन त्यांना कळले हो’ हे परचुरे प्रकाशनाचं पुस्तक म्हणजे विविध कारणांनी आणि विविध कालखंडांमध्ये पुलंच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींनी पुलंबद्दल लिहिलेल्या लेखनाचं संकलन आहे. जवळजवळ सगळेच लेख पूर्वप्रकाशितच आहेत. मी पुस्तक विकत घेताना जरा साशंक मनानेच घेतलं होतं. कारण अशा प्रकारच्या लिखाणामध्ये एक प्रकारचा तोचतोचपणा आलेला असण्याचा धोका असतो. पण या पुस्तकात मात्र तसं अजिबात झालेलं नाही. याचं कारण म्हणजे पुलंच्या व्यक्तिमत्त्वातली समृद्धी! विजया राजाध्यक्ष, शांता शेळके, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, ग. प्र. प्रधान, नारायण सुर्वे, गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, दाजी भाटवडेकर, निळू फुले, मधु मंगेश कर्णिक, विजया मेहता, करुणा देव, भक्ती बर्वे-इनामदार, अरुणा ढेरे, जयवंत दळवी अशी आपापल्या क्षेत्रात रथी-महारथी असलेली माणसं पु. ल. देशपांडे या एका व्यक्तीविषयी भरभरून लिहिताना या पुस्तकात आपल्याला दिसतात. प्रत्येकाचा पुलंकडे पाहण्याचा भाव वेगवेगळा आहे, त्यात अगदी भक्तिभावापासून ते आदरयुक्त मैत्री, निखळ मैत्री, जिव्हाळा, कौतुक, प्रेम अशा सगळ्या प्रकारच्या भावना आहेत. या सगळ्यातून समोर येतं ते पुलंचं ’माणूस’ म्हणून असलेलं झळाळतं रूप! पुलंची स्वत:ची अशी राजकीय मतं होतीच, पण त्याविरुद्ध मतं असलेल्यांशीही ते सहृदयतेनेच वागले. राजकीयच असं नाही, तर कुठल्याही क्षेत्रातली मतभिन्नता त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातल्या संबंधांच्या, मैत्रीच्या आड कधीच येऊ दिली नाही. आणि म्हणूनच त्यांचा विनोद हा कायम निर्मळ आणि निर्विषच राहिला. बॅ. नाथ पै यांच्या १९५२ सालच्या निवडणुकीतल्या बेळगावच्या प्रचारसभांमध्ये स्वत: पुलंनी भाषणं केली होती. पण त्याच निवडणुकीत, दुसर्या एका सभेत स्वत: नाथ पैंनी भाषण करत असताना, भाषणाच्या भरात ’ आज या जगात माणूस कुठे आहे?’ असा सवाल केल्यावर गर्दीत मित्रांसह मागे बसलेले पुलं हळूच ’ ते सगळे भुजंगरावांच्या सभेला गेले आहेत. इथे आपलीच मंडळी आहेत. तुम्ही बोला’ असा टारगटपणा करू शकत होते. कारण असा विनोद करण्यामागची त्यांची प्रेरणा ही कुणाचा अपमान करण्याची नसून एकंदर आयुष्यात आनंद शोधण्याची होती. तो आनंद मोकळेपणाने इतरांना वाटतच ते जगले.

या पुस्तकातले सगळेच लेख सरस आहेत. पण त्यातही २ लेखांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. पहिला आहे कृ. द. दीक्षित यांचा ’ पुलं : मेहनती व कल्पक ’ प्रोड्युसर’ हा लेख. दीक्षित स्वत: आकाशवाणीत कार्यरत होते. त्यामुळे त्यांना आकाशवाणीतल्या पुलंना जवळून पहायला मिळालं होतं. आकाशवाणी या माध्यमाची बलस्थानं, व्याप्ती आणि सीमा जाणणारे, स्वत: प्रतिभावंत साहित्यिक असलेले पु. ल. देशपांडे हे मुंबई आणि दिल्ली आकाशवाणीवरचे एक गाजलेले निर्माते होते. त्यांच्या मुंबईच्या कारकीर्दीत मंगेश पाडगांवकर, पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर अशा दिग्गजांचा सहभाग असलेली, स्वत: पुलंचं संगीतदिग्दर्शन असलेली ’ बिल्हण’ ही एक संस्मरणीय संगीतिका निर्माण केली गेली. (’ शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ आणि ’ माझे जीवनगाणे’ ही प्रसिद्ध गाणी याच संगीतिकेतली.). पुढे ते चीफ प्रोड्यूसर म्हणून दिल्लीला गेले. तिथेही त्यांनी नाव कमावलं. झोकून देऊन, निर्दोष कार्यक्रम तयार करण्यासाठी अविरत झटणं हे पुलंचं वैशिष्ट्य! त्यामुळे एकाहून एक सरस कार्यक्रम त्यांनी दिले. (’ गेले तेथे मिळले हो’ या स्वत:च्या स्वभावाला अनुसरून दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळातही ते लोकप्रिय झाले. इतके, की नंतर एकदा पुण्याच्या सावरकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात पुलं अध्यक्षस्थानी होते आणि अटलबिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करत होते, तेव्हा वाजपेयीजींनी अशी खंत व्यक्त केली की पुलं दिल्ली सोडून इकडे आले त्यामुळे दिल्लीचं सांस्कृतिक वर्तुळ थोडं रिकामं रिकामं वाटू लागलंय.) जेव्हा भारतात टेलिव्हिजनचं आगमन होणार होतं, तेव्हा त्याचं तंत्र शिकून घेण्यासाठी पुलंना बीबीसीमध्ये पाठवलं गेलं (आणि त्यामुळे आपल्याला ’ अपूर्वाई’ हे श्रेष्ठ प्रवासवर्णन वाचायला मिळालं). ही त्यांच्या आकाशवाणीवरच्या उत्कॄष्ट कामाची एक पावतीच होती. दूरदर्शनवरचे पहिले निर्माते म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही एक वेगळीच बाजू कृ.द. दीक्षितांच्या या लेखामुळे समोर येते.

दुसरा लेख म्हणजे सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचा! पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त लिहिलेला हा लेख हा आत्मीयतेने, काहीसा भावुकतेने ओतप्रोत भरलेला आहे. पुलंच्या साठीनिमित्त त्यांनी पुलंचं निवडक साहित्य असलेला ’ पुलं : एक साठवण’ हा ग्रंथ संपादित केला होता. असा ग्रंथ तयार करणं ही पूर्णपणे जयवंत दळवींचीच कल्पना होती. कोणतं साहित्य घ्यावं, हे मात्र त्यांनी साठ-सत्तर लेखक-कवी मित्रांना पत्रं पाठवून विचारलं होतं. हे पुस्तक खपणार नाही, अशी मॅजेस्टिक प्रकाशनाच्या केशवराव कोठावळ्यांची खात्री होती. ते फक्त हजार प्रतींची आवृत्ती काढणार होते. जयवंत दळवींच्या आग्रहाखातर त्यांनी पाच हजार प्रतींची आवृत्ती काढली आणि ही सगळीच्या सगळी आवृत्ती, छापून बाहेर येण्यापूर्वी, प्रकाशनपूर्व नोंदणी जाहीर झाल्यापासून चार दिवसांत संपली!! अगदी खुद्द जयवंत दळवींना त्यांच्या मित्रांसाठी चार-पाच प्रती हव्या होत्या, त्या मिळू शकल्या नाहीत. अशी अफाट लोकप्रियता वाट्यास आलेला लेखक विरळा! पुलंहून वयाने ज्येष्ठ आणि स्वत: अतिशय लोकप्रिय साहित्यिक असलेले जयवंत दळवी म्हणतात की ’ अशा सभ्य, सुसंस्कृत आणि तेवढ्याच दानशूर साहित्यिकाच्या साठीला ’ पु.लं. : एक साठवण’ यासारखा ग्रंथ मला संपादित करता आला, हे मी माझं भाग्य समजतो’. जयवंत दळवींचं हे वाक्य, किंवा ’ नाशिकला आम्ही तीर्थक्षेत्र म्हणतो, कारण तिथे कुसुमाग्रज राहतात’ हे पुलंचं वाक्य, असं काही वाचलं की वाटतं, हे संस्कृतीचं खरं सौंदर्य!

पुलं आणि सुनीताबाईंनी पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या विविध सामाजिक कार्यांसाठी दिल्या. बहुतांशी वेळा त्या चालू असलेल्या कार्यासाठी त्यांनी दिल्या. पण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या बाबतीत मात्र थोडा वेगळा घटनाक्रम झाला. डॉ. अनिल अवचटांचा व्यसनग्रस्तांवरचा एक लेख वाचून पुलं-सुनीताबाईंनी अनिल आणि सुनंदा अवचटांना घरी बोलावून सांगितलं की या व्यसनग्रस्तांसाठी तुम्ही काहीतरी करा. आत्ता आम्ही एक लाख रुपये द्यायचे ठरवलेत. पण आम्ही पैसे कमी पडू देणार नाही. यातून अवचट पती-पत्नींना व्यसनमुक्ती केंद्राची कल्पना सुचली. केंद्र उभं राहिलं, अधिकृत संस्था उभी राहीपर्यंत मुक्तांगणच्या कर्मचार्यांच्या पगाराचे चेक्स पुलं आणि सुनीताबाईंच्या सहीने निघत होते. ही देणगी देताना पुलं म्हणाले होते, की एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला तरी माझ्या देणगीचं सार्थक झालं असं मी समजेन. ’ मुक्तांगणची गोष्ट’ हे अनिल अवचटांचं पुस्तक वाचलं की जाणवतं, हे काम उभं राहणं किती महत्त्वाचं होतं ते. मुक्तांगणमुळे कितीतरी घरांमधले विझलेले दिवे पुन्हा प्रज्वलित झाले. आयुकातली विज्ञान वाटिका, आनंदवनातलं मुक्तांगण, इतर अनेक सामाजिक संस्था, चळवळी, अपंग-मूक-बधिरांसाठीच्या संस्था अशा विविध कार्यांना पुलं-सुनीताबाईंनी भरभरून देणग्या दिल्या. आपल्या पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकून तो पैसाही त्यांनी सामाजिक संस्थांना दान केला. त्यांचं हे सामाजिक भान सतत जागं होतं.

या दिवाळीत पाडव्याच्या दिवशी पुण्याला बालगंधर्व रंगमंदिरात पुलोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला हजर राहण्याची संधी मिळाली. साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक यांची भाषणं ऐकता आली. मधु मंगेश कर्णिक यांनी भाषणात पुलंच्या या जागृत सामाजिक भानावर भर दिला. ते म्हणाले, की पुलंच्या लेखनातला विनोद हा हास्यनिर्मितीसाठी तर होताच, परंतु त्या विनोदामागे एक सामाजिक भाष्य असे. पुलंनी लेखनातून उभी केलेली माणसे ही त्यांच्या सगळ्या सामाजिक संदर्भांसकट उभी केलेली होती. लेखन प्रचारकी थाटाचे होऊ न देता सामाजिक वास्तव मांडणे पुलंनी साध्य केलेले होते. आर. के. लक्ष्मणांसारखा कुशल व्यंगचित्रकार ज्याप्रमाणे काही रेषांमधून मार्मिक भाष्य करून जातो, त्याचप्रमाणे पुलंसारखा कुशल लेखक शब्दबंबाळ न होता एखाददुसर्याच वाक्यातून नेमके, मर्मग्राही सामाजिक भाष्य करतो. मग तो ’ द्राक्ष संस्कॄती आणि रुद्राक्ष संस्कॄती’ यासारखा शाब्दिक विनोद असेल, किंवा मौन या विषयावर एक तास बोलणारी आचार्य बाबा बर्व्यांसारखी व्यक्तिरेखा असेल. हा नुसता विनोद नसतो, त्या विनोदामागे बरेच संदर्भ असतात आणि म्हणून तो विनोदही गांभीर्याने घेण्यासारखा असतो.

मधु मंगेश कर्णिकांनी पुलं-सुनीताबाईंची एक सुंदर आठवणही सांगितली. मधु मंगेशांच्या गावी करूळला ’ वनराई’ उभारण्यासाठी पुलं-सुनीताबाईंनी पहिली देणगी पाठवली. देणगीदारांच्या नावे एकेक झाड लावण्याची मधु मंगेश कर्णिकांची कल्पना होती. त्यांनी विचारलं, की तुमच्या दोघांच्या नावाने कुठली झाडं लावू? त्यावर पुलं म्हणाले, तुम्ही आंब्याफणसाची झाडं तर लावालच, पण आमच्यासाठी एक बकुळीचं झाड लावा आणि एक सुरंगीचं झाड लावा.

बकुळ आणि सुरंगी...कोमेजल्यावरही दीर्घकाळ सुगंध देणारी, फुलं वेचलेल्या हातांना, फुलं माळलेल्या केसांनाही मंद सुगंध बहाल करणारी अशी ही फुलं. आजूबाजूचा परिसर आपल्या मोहक सुगंधाने भरून टाकणारे हे पुष्पवृक्ष! काही आश्चर्य नाही वाटलं पुलं-सुनीताबाईंची ही आवड ऐकून!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असा मी’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’, अशी चार पुस्तकं आहेत.
पण फा ने म्हटल्याप्रमाणे प्रचंड bias आणि विशिष्ट अजेंडा ठेवून लिहिलेले पुस्तक आहे असे वाटते. त्यामुळे ब्राह्मणी मानसिकतेची उडवलेली खिल्ली दुर्लक्षित केली असावी.
खरंतर हे असे परीक्षण, विश्लेषण केले जावे पुस्तकांचे. पण त्याचा हेतू दस्तऐवजीकरण असला तर तो तटस्थ म्हणता येईल. उदाहरणार्थ या किंवा दुसर्‍या एका धाग्यावर पु. लं. च्या लेखनात आलेले सांस्कृतिक/साहित्यिक संदर्भ अशी एक चर्चा सुरू झाली होती.

ओह असा मी असामी आहे नाही का! मग तर खूपच सोयीस्करपणे हवं तेच आणि तेवढंच घेतलेलं आहे.

हं . या निकषात बसणार्‍या कोणकोणत्या गोष्टी यात दिसतात, ते पाहू, असं म्हणून घेतलेल्या वाटतात. भरत+१

हा मेणसे नुसता छिद्रान्वेषी द्वेष्टाच नसून विनोद आणि उपहास आजिबात न कळणारा अभागी आहे एवढेच या बावळट पुस्तक परिक्षणांवरून कळते. असा मी असामी, बटाट्याची चाळ ह्यात तर मध्यमवर्गिय, भेकड कुपमंडूकतेची प्रचंड थट्टा आहे.

सध्याच्या विनोद न कळणाच्या आणि त्याचेही जात-धर्म बघुन भरत म्हणताहेत तसं शोधुन शोधुन वर्गीकरण करण्याच्या काळाशी सुसंगतच म्हणायचे!
ब्राह्मणी हा शब्द उतरंडीला वापरणे हल्ली बर्‍याच ठिकाणी बघितलं आहे. त्याबाबत जिज्ञासा आणि फा शी सहमत. इतकं स्पष्टीकरण द्यावं लागत असेल आणि त्या शब्दाचा सरळ सरळ अर्थ जातीवाचकच असेल तर त्याच शब्दाला वेगळा अर्थ देण्याचा अट्टाहास कशाला? याचं उत्तर द्वेषपूर्ण असावं.

शब्द आहे, वापरला जातो. तसा वापरणं बरोबर की चूक हा मुद्दा वेगळा. पण ज्या अर्थाने वापरला जातो, तो अर्थ पुलंच्या बाबतीत चूक आहे.

जेम्स लेनच्या पुस्तकातही 'ब्राह्मणिकल' शब्द वाचल्याचं आठवतं. त्याचं मराठीकरण ब्राह्मणी झालं बहुतेक. Proud ब्राह्मण्यवादी मध्ये गोंधळ कमी उडता ना! Wink
तत्सम शब्द परभाषीक विभक्ती लाऊन परत मराठीत येणार्‍या शब्दाला काही संज्ञा आहे का? Proud

वावे - इथे अवांतर होत असेल तर वेगळ्या धाग्यावर हे बोलू.

पुलंच्या लेखनाबद्दल काही रास्त आक्षेप आहेत - विशेषतः त्यांचे स्त्रियांबद्दलचे लेखन. पण ते ही काही नव्याने यांनी शोधून काढले असे नाही. मंगला खाडिलकर - ज्यांनी पुलंच्या आठवणीवर एक स्वतंत्र पुस्तक लिहीले आहे - त्यांनी बहुधा एका लेखात याबद्दल लिहीले होते.

पण ते ही ५०-६० च्या दशकातील एकूण "चालून जाणारे लेखन" मधेच येइल. त्याबाबतीत ते काळाच्या पुढे वगैरे नव्हते इतपत म्हणता येइल. त्या काळातील पुढारलेल्या देशांतील महिलांचे चित्रण पाहिले तर साधारण तसेच होते. पुलं जर अजूनही लिहीत असते तर आता तसे विनोद त्यांनी केले नसते असेच वाटते.

मुळात असे आक्षेप एखाद्या अभ्यासकाने घेणे वेगळे आणि कोणी आधीच आरोप गृहीत धरून काही वाक्यांचे आपल्याला वाटते तसे चुकीचे इंटरप्रिटेशन करून "त्यांना तसेच म्हणायचे होते" हे ठसवत राहणे वेगळे. वास्तविक 'बोलट' मधल्या जनूच्या आईबद्दल जे लिहीले आहे ते परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय इतकेच आहे. त्यात समर्थनही नाही आणि टीकाही. बापू काणे च्या "सुशी" बद्दलही तसेच आहे. इंदूचा तो म्हातारा तिला अडवतो ते तत्कालीन परिस्थितीत अगदी शक्य होते. त्यातही त्याचे कोठे समर्थन नाही. 'असा मी असामी' मधे बायकोची जितकी खिल्ली उडवली आहे, तितकीच स्वतःचीही उडवली आहे. बटाट्याची चाळ मधे तर कोणाची उडवलेली नाही असा प्रश्न पडेल. पुंबा यांनी वरती चपखल लिहीले आहे.

ज्या मध्यमवर्गाकरता त्यांचे लेखन असल्याचा आरोप केला जातो त्या मध्यमवर्गाची तर त्यांनी जवळजवळ प्रत्येक पुस्तकात खेचली आहे. "तोंडाळ गरिबी आणि घुमी श्रीमंती यांच्या मधे जोडलेला दुसर्‍या वर्गाचा डबा हा सर्वात केविलवाणा असतो. रेल्वेचा स्टाफ जर अजिबात घाबरत नसेल तर तो या वर्गाला" वगैरे "काही अप काही डाउन" मधली वर्णने. एखाद्या शूरवीराने एखाद्या स्टेशनवर आपण पटकन पाणी भरून घेतल्याची कौतुके, बॉस ची गाडी निघून गेली की त्याच्याबद्दल आणि त्याच्या "वाइफबद्दल... म्हणजे असं ऐकलं होतं" टाइप होणारी चर्चा - अशी असंख्य उदाहरणे आहेत. कोठे प्रत्यक्षात काही अ‍ॅक्शन न घेता "रेल्वे हॅज बिकम...म्हणजे सगळा युसलेस कारभार" वगैरे म्हणणारे लोक ई.

बाकी मुस्लिम द्वेष व गांधी द्वेष यांनी कोठून शोधून काढला त्यांनाच माहीत. खिल्ली मधला "एका गांधी टोपीचा प्रवास" हा एकच लेख बास आहे त्याला उत्तर म्हणून. त्यात तत्कालीन हिंदुत्त्ववाद्यांवर जी टीका आहे ती आज कोणी केली असती तर पूर्ण सोशल नेटवर्क्स वर पब्लिक सुटले असते. पण त्याच लेखात नंतरच्या काळात काँग्रेसमधे शिरलेल्या वाइट गोष्टींबद्दलही लिहीले आहे. लोकांना तरीही पुलं आवडतात कारण त्यांचा विरोध वस्तुनिष्ठ आहे.

बाकी त्या एका लिन्क मधे हिंदुत्त्ववादी किंवा ब्राह्मण तर सोडाच पुरोगाम्यांना पुलं आवडतात कारण पुरोगामी हे प्रत्यक्षात गांधीद्वेष्टे आहेत असाही एक शोध लावला आहे Happy

"स्थितीप्रिय आणि परंपराप्रिय असणं, सकारात्मक का असेना बदल घडू लागले की, त्याला विरोध-टिंगल करणे, बदल घडवू पाहणाऱ्यांची मानहानी करणं, बदल घडलाच तर दुःख व्यक्त करणं, " - हे सगळं त्या पु. ल. देशपांड्यांविषयीच लिहीलंय ना, ज्यांना आपण पु. ल. म्हणून ओळखतो? पु. लं.ची कित्येक भाषणं, वैचारिक लेख - पटकन आठवणारं म्हणजे, खाडिलकरांच्या नाटकाची त्यांनी केलेली चिकित्सा आणि मिमांसा, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताविषयक त्यांनी मांडलेले तौलनिक विचार, जात-पात, धर्म आणि त्यावरून होणार्या भेदाभेदाविषयीची त्यांची मतं, गांधीजी, सावरकर, फुले ह्या सर्वांविषयी त्यांनी मांडलेले विचार - हे सगळं बाजूला ठेवून पु. लं.च्या मनोरंजनात्मक लिखाणातून संदर्भ सोडून (फा ने दिलेलं गटणे च उदाहरण चपखल आहे) काहीतरी फाटे फोडून पुस्तक छापायचं म्हणजे आजही ह्यांना पु. ल. ब्रँडनेच पुस्तकं खपवावी लागतात असं म्हणावं लागेल.

पु. लं.च्या इतक्या लिखाणातून असलं संदर्भहीन तुकडे जोडून त्यांना परंपरावादी वगैरे म्हणणं म्हणजे तेंडुलकर च्या क्रीझवर आल्या आल्या सोडून दिलेल्या एक-दोन बॉल्सकडे बघून तो डिफेन्सीव्ह बॅट्समन होता, त्याच्या भात्यात मोठे फटके नव्हते किंवा लता मंगेशकरची एक-दोन फिल्मी गाणी ऐकून तिला रागसंगीताविषयी माहिती नव्हती असं म्हणण्यापैकी आहे. असल्या गोष्टी केवळ दुर्लक्ष करण्यासाठीच असतात.

पुलंबद्दल इथे जनरल fan club टाईप धागा आहे का? पुलंबद्दल काहीतरी नाटक/कार्यक्रम मराठी रंगभूमीवर येत आहे ज्यात मुक्ता बर्वे सुनीताबाईंचा रोल करत आहे. पुण्यात पहिला प्रयोग ११ जूनला पुलंच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आहे. १२ जूनला पुलंना जाऊन २२ वर्ष होतील. Unbelievable.

फा, मंगला गोडबोले ना? की खाडिलकरांनी पण लिहिलं आहे पुलंवर काही?
पुलंनी कुणावर विनोद केले नाहीत? मी वर माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे नाथ पैंच्या भाषणावरही त्यांनी विनोद केला आहे. अपूर्वाईमध्ये, पूर्वरंगमध्ये स्वतःवर कित्येक विनोद केले आहेत. ज्या मध्यमवर्गाकरता त्यांचे लेखन असल्याचा आरोप केला जातो त्या मध्यमवर्गाची तर त्यांनी जवळजवळ प्रत्येक पुस्तकात खेचली आहे. >> अगदीच!

बापू काणेची बायको, इंदू वेलणकरचे वडील, जनूची आई या सगळ्यांबद्दल जे लिहिलं आहे त्याला +१ ते चित्रण आहे. कुणाचंच समर्थन नाही.

पुलं मनाने दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात, तेही मुंबईत रमलेले होते असं वारंवार जाणवतं. त्यांच्या हिराबाईंवरच्या लेखात मला वाटतं वर्णन आहे मुंबईतल्या गणेशोत्सवांचं. 'बटाट्याची चाळ' मधल्या 'चिंतनात' ती त्यांची भावना उतरलेली आहे.
पण म्हणून त्यांनी नवीन पिढीकडे बघताना 'आमच्या काळी...' असा आव नाही आणला. दलित साहित्याचं, 'कोसला'सारख्या नवीन वाटेवरच्या लिखाणाचं मनापासून स्वागत केलं.

स्त्रीस्वातंत्र्याबद्दलची त्यांची मतं काळाच्या पुढे नव्हती हे बरोबर आहे. सुनीताबाईंनी 'आहे मनोहर तरी' मधे लिहिलंय, त्यांचा (सुनीताबाईंचा) भैय्या म्हणून जो मित्र होता (मीर असगर अली) त्याच्याबरोबर सुनीताबाईंची मैत्री लग्नानंतरही उत्तम टिकून राहिली, इतकंच नाही, तर पुलंचीही त्याच्याबरोबर छान मैत्री झाली, पण त्रयस्थ व्यक्तीला त्याच्याबद्दल सांगताना पुलं कायम त्याचा उल्लेख 'माझा मित्र' म्हणून करत, 'सुनीताचा मित्र' म्हणून नाही! Happy पुरुषांचे मित्र असतात आणि बायकांच्या मैत्रिणी. उगाच कुणाचा काही गैरसमज नको व्हायला!

हे सगळं म्हटलं तर अवांतर, म्हटलं तर विषयावर चाललंय. Happy दुसरा योग्य धागा मिळाला/कुणी काढला तर तिकडे बोलू. नाही तर इथेही चालेलच.

फा, मंगला गोडबोले ना? की खाडिलकरांनी पण लिहिलं आहे पुलंवर काही? >> Happy हो गोडबोले. खाडिलकर कोठून आल्या माझ्या पोस्ट मधे माहीत नाही.

बाकी पोस्टशी सहमत.

तो मुक्ता बर्वेंचा कार्यक्रम डॉ समीर कुलकर्णींच्याच 'कवितेला अस्ं जाऊ दे करायचं नसतं' ह्या अतिशय हृद्य लेखावर आधारलेला आहे. फारच सुंदर लेख आहे तो.

बरेच दिवस हा लेख बुकमार्क करून ठेवला होता... आज सवडीने वाचला.
काय लिहू, वावे ?
नितांत सुंदर अभ्यासपूर्ण लेख... > अगदी अगदी ! माझ्या निवडक १० त !
पुल प्रचंड आवडतातच... पुन्हा पुन्हा वाचणार हा लेख हे नक्की !
शेवटचा पॅरा वाचतांना मन (आणि डोळेही ) भरून आले.

अरे देवा! हा लेख कसा काय वाचला नव्हता मी?!
सुंदर लिहिला आहेस!
लेख आणि अभिप्राय-प्रतिसादांत अगदी हरवून जायला झालं! Happy

इतक सुन्दर लिहिलय. खूप छान वाटल वाच्ताना.

विचारलं, की तुमच्या दोघांच्या नावाने कुठली झाडं लावू? त्यावर पुलं म्हणाले, तुम्ही आंब्याफणसाची झाडं तर लावालच, पण आमच्यासाठी एक बकुळीचं झाड लावा आणि एक सुरंगीचं झाड लावा. >>> बकुळीच वाटल, "बकुळ फुला" ची आठवण झाली.

बकुळ आणि सुरंगी...कोमेजल्यावरही दीर्घकाळ सुगंध देणारी, फुलं वेचलेल्या हातांना, फुलं माळलेल्या केसांनाही मंद सुगंध बहाल करणारी अशी ही फुलं. आजूबाजूचा परिसर आपल्या मोहक सुगंधाने भरून टाकणारे हे पुष्पवृक्ष! काही आश्चर्य नाही वाटलं पुलं-सुनीताबाईंची ही आवड ऐकून! >>> शहारा आला..

त्यांच्या दिल्लीच्या वास्तव्य विषयी पण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत,
हा लेख वाचताना
त्यातली एक ठळकपणे आठवणारी गोष्ट,

त्यांना विचारलं जायचं " दिल्लीतली कोणती गोष्ट तुम्हाला आवडते "

त्यांनी सांगितलं, "दिल्लीहून मुंबईला जाणारी गाडी, ही माझी सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे. "

धन्यवाद स्वातीताई आणि छन्दिफन्दि Happy

गेल्या रविवारी इथल्या महाराष्ट्र मंडळात गणेशोत्सवानिमित्त वर पुंबा यांनी उल्लेख केलेला ' प्रिय भाई, एक कविता हवी आहे' हा कार्यक्रम झाला. छानच कार्यक्रम आहे. सगळा संच उत्तम आहे. मूळ प्रसंग हृद्य आहे आणि संस्कृती समृद्ध होते ती अशा माणसांमुळेच, हे परत एकदा पटवणारा आहे.

Pages