लॉकडाऊननंतरचा पहिला प्रवास

Submitted by पराग१२२६३ on 24 October, 2021 - 01:48

1_edited.jpg

लॉकडाऊन जरा शिथिल होऊ लागल्यावर केलेला माझा पहिलाच प्रवास होता तो. त्या प्रवासाला नुकतेच एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहे. त्या निमित्ताने लॉकडाऊननंतरच्या त्या पहिल्याच प्रवासाच्या आठवणी....

कोयनेचे आरक्षण केल्यावर मी सकाळी लवकरच कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर पोहचलो. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा परिणाम रेल्वेच्या प्रत्येक बाबीवरही दिसत होता. स्थानकात प्रत्येकाला तिकीट तपासूनच प्रवेश दिला जात होता. दोन नंबरच्या फलाटावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी कोयना उभी होतीच. अजून बाकीच्या गाड्या सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे एरवी कोयना सुटण्याच्या आधी दिसणारी प्रवाशांची गर्दी आणि लगबग यावेळी दिसत नव्हती.

कल्याणचे निळ्या रंगातील दोघे डब्ल्यूडीएम-3 डी कार्यअश्व आमच्या गाडीचे सारथ्य करण्यासाठी सज्ज होते. लोको पायलट्सकडून गाडी सुरू करण्याआधीची सर्व प्रक्रिया पार पाडली जात होती. स्टेशनवरच्या शांत-शांत वातावरणातच मी कोयनेमध्ये माझ्या डब्याजवळ पोहचलो. त्या डब्याचे दोनच महिन्यांपूर्वी ‘उत्कृष्ट डब्या’मध्ये रुपांतर करण्यात आलेले होते; तरीही डबा फारसा सुस्थितीत वाटत नव्हता.

सकाळी ठीक 08:05 वाजता कोव्हीड-19 विशेष कोयनेने मुंबईच्या दिशेने कूच केले. नेहमी कोल्हापूरहूनच भरणारे डबे आज मोकळे-मोकळे होते. कारण लोकांचे गावाला जाणे आता कमी झालेले होते आणि प्रवासावरही अजून काही निर्बंध होते. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या हिंदीभाषिक प्रवाशांचीही कोरोना, लॉकडाऊन आणि कमी गर्दी यावर चर्चा सुरू होती. सकाळचं कोवळं उन अंगावर घेत मी प्रवास अनुभवायला लागलो होतो. 08:35 ला हातकणंगल्यात गाडी आली आणि अगदी मोजकेच प्रवासी गाडीत चढले. आधीच्या आणि आताच्या परिस्थितीतील विरोधाभास पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसला. पुढे मिरजेच्या आधी 15 किलोमीटरवर लोहमार्गाच्या दुरुस्तीमुळे ताशी 30 किलोमीटरची वेगमर्यादा ठेवली गेली होती. तिथे कोयनेचा वेग त्यानुसार कमी करण्यात आला होता.

कोयना 09:11 ला मिरजेत दाखल झाली. इथेही गर्दी आत आलीच नाही. फळवाले, इडली-सांबार, वडापाववाले हेही कुठे फारसे नव्हते. बाकीचे फलाटही लोकांची वाट पाहत होते. सगळंच पूर्वीच्या मानानं सामसुम होतं. तिकडे लोको पायलट आणि गार्ड लॉबीत मात्र ड्युटीवर आलेल्या लोको पायलट्स आणि गार्डची ड्युटीवर रुजू होण्याची पूर्वतयारी झालेली होती. म्हैसुरूला जाण्याऱ्या एक्सप्रेसवर त्यांची ड्युटी होती आणि ती गाडी कोयना गेल्यावर मिरजेत दाखल होत होती.

कोयना भिलवडीला आली, तेव्हा तिथे रिकामी डेमू आणि केशरी-पिवळसर रंगातील डब्ल्यूडीएम-3 डी इंजिनासोबत एक क्रेन गाडी (Departmental Train) तिची वाट बघत उभ्या होत्या. त्यापैकी डेमूला मिरजेकडे, तर क्रेनच्या गाडीला पुण्याकडे जायचे होते. भिलवडीतून सुटल्यावर सातच मिनिटांत किलोमीटर क्रमांक 243 वर कोयनेला आपला वेग पुन्हा कमी करावा लागला, कारण पुन्हा ताशी 30 किलोमीटरची वेगमर्यादा तिथे होती. खरं तर या वेळी कोयना किर्लोस्करवाडीत हवी होती, पण सततच्या वेगमर्यादांमुळे आज ती 17 मिनिटं उशिरा किर्लोस्करवाडीत पोहचली. तिथे गोंदिया जं.-कोल्हापूर महाराष्ट्र कोव्हिड-19 विशेष पुण्याच्या गोऱ्यापान डब्ल्यूडीपी-4डी कार्यअश्वांच्या जोडीबरोबर उभी होती.

12:24 ला साताऱ्यात पोहचलो, तेव्हा तिथे एक पूर्ण आणि एक अर्धी अशा रिकाम्या डीएमयू उभ्या होत्या.
आता वाठारनंतर यू-टर्न असलेला छोटा घाट जवळ आला होता. आदर्की स्थानकाच्या आधी, स्थानकात आणि त्याच्या पुढे अनेक तीव्र वळणे आहेत. ती झिग-झॅग वळणे पार करत आदर्कीला पोहचलो. तिथे कोयनेसाठी हजरत निझामुद्दीन-यशवंतपूर जं. कोव्हीड-19 विशेष कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्पेस रोखून ठेवलेली होती. काय तो तिचा निळाशार कार्यअश्व चमकत होता, व्वा! कोयना आदर्की ओलांडून बोगद्यात यू-टर्न घेऊन पुढे जात असताना संपर्क क्रांती पुढच्या प्रवासाला निघालेली दिसली.

आता 13:32 ला लोणंद आले आणि तिथे कोयनेत थोडीशी गर्दी चढली. त्यानंतर दहाच मिनिटांत निरा नदी ओलांडून कोयनेनं पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. निऱ्याला दोन मिनिटांचा थांबा घेऊन माझ्या प्रवासातील शेवटच्या अधिकृत थांब्याच्या दिशेने (जेजुरी) कोयना वेगाने निघाली.

दुपारी ठीक सव्वादोन वाजता कोयना जेजुरीत आली होती. तिथे कोल्हापूरकडे जाणारी कोयना पुण्याच्या डब्ल्यूडीपी-4 डी कार्यअश्वाबरोबर आधी येऊन आमची वाट बघत थांबली होती. तिच्या पलीकडे नव्याकोऱ्या रिकाम्या एलएचबी डब्यांची गाडी उभी करून ठेवलेली होती. पुढे शिंदवण्याचा घाट उतरून आळंदीत आलो. त्यावेळी मिरजेच्या दिशेने जाणारी मालगाडी दोन डल्ब्यूडीजी-4 इंजिनांसह लूप लाईनवर कोयनेनं मार्ग मोकळा करून देण्याची वाट पाहत उभी होती. त्यानंतर फुरसुंगी, सासवड रोड, घोरपडी स्थानकांना ओलांडत कोयना दुपारी 15:22 वाजता म्हणजे नियोजित वेळेच्या 18 मिनिटं आधीच पुण्यात पोहचत होती. त्यानंतर लॉकडाऊनोत्तर काळातील माझा पहिला प्रवास अनेक बदल अनुभवत पूर्ण झाला. नेहमी कोयनेतून पुण्यात उतरल्यावर दिसणारी गर्दी यावेळी मात्र नव्हती.

Link
https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/blog-post_24.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महाराष्ट्रात अंतर्गत प्रवासासाठी कोविड लस सर्टिफिकेट आणि RTPCR TEST रिपोर्ट दाखवावा लागतो का?

>>>महाराष्ट्रात अंतर्गत प्रवासासाठी कोविड लस सर्टिफिकेट आणि RTPCR TEST रिपोर्ट दाखवावा लागतो का?>>> नाही

<<<महाराष्ट्रात अंतर्गत प्रवासासाठी कोविड लस सर्टिफिकेट आणि RTPCR TEST रिपोर्ट दाखवावा लागतो का?>>>>
नाही.

मस्त! खाण्यापिण्याची सोय काय होती मग? ३:२२ ला १८ मिनीटे आधी म्हणजे ३:४० वेळ झाली आहे का आता? पूर्वी बहुधा ४:३० होती, डेक्कन एक्सप्रेसनंतर सुमारे एक तासाने.

आता विजेची इंजिने कधी सुरू होणार आहेत कोल्हापूर लाइन वर? वरच्या चित्रात विद्युतीकरण झाले आहे/सुरू आहे असे दिसत आहे.

खाण्यापिण्याची व्यवस्था स्वत:ची स्वत:च करावी लागत होती. अप कोयनेची पुण्यात यायची वेळ साधारण १०-१२ वर्षांपूर्वीच ३.४० झाली आहे. कोल्हापूर लाईनचे विद्युतीकरण जवळजवळ ९० टक्के पूर्ण होत आलेले आहे.

छान.
दोन आठवड्यांपूर्वी मी हैद्राबादहुन नागपूरला गेलो/आलो तेव्हा सुद्धा लसीकरण प्रमाणपत्र / RTPCR रिपोर्ट काही लागले नाही कुठे.

तसेच अजूनही बेडरोल देत नाहीत. गाडीत खाद्यपदार्थ विक्री मात्र सुरू होती.

मानव पृथ्वीकर, रेल्वेतून बेडरोल प्रकार हद्दपार होण्याची शक्यता वाटत आहे. रेल्वेचा खर्च कमी करण्यासाठी.

तुमचे लेख म्हणजे मेजवानी असतात. Happy अचुक निरीक्षण ,अगदी तपशीलवार ..! अन ते नोंद करुन सगळ इथे बैजवार लिहिणे. अर्थात तुमचे कार्यक्षेत्र तेच असले तरी चौफेर लक्ष ठेवुन सगळ्या नोंदी ठेवणे अवघडच.

नेहमीप्रमाणे खूप छान वर्णन. अगदी गाडीत बसल्यासारखेच वाटते. आता दिवाळीच्या सुट्टीत वर्दळ वाढेल बहुतेक.

प्रवासात कधीच एवढे निरीक्षण केले नाही.
एवढं निरीक्षण करून लिहिणे म्हणजे ग्रेटच.

वडील आठवडा भर आधीच भोपाळ वरून आले तेव्हा कोणीही त्यांना लसीकरण certificate वैगरे काही विचारलं नाही.
गाडीत खाद्य पदार्थांची नेहमीप्रमाणे रेलचेल होती अस ते सांगत होते.

नियम नुसार दोन डोस असतील तर च मुंबई लोकल नी प्रवास करता येतो

हे फक्त नियम नुसार आणि नियमात राहणाऱ्या लोकांसाठी च असते.
नियम न मानणाऱ्या लोकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत..

स्वर्ग पेक्षा नरकात च खूप सुविधा आसव्यात.
असे काही तरी समजा.