लेखनस्पर्धा - माझा अनुभव कोविड-१९ लॉकडाऊन - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 August, 2020 - 19:13

तसे प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक कमालीचा आत्मकेंद्रीत मनुष्य आहे.
किंवा कदाचित होतो, वा अजूनही थोडाफार असेन. पण मुले आयुष्यात आली आणि बघता बघता हे केंद्र त्यांच्याभोवताली सरकले. त्यानंतर आयुष्यात जे काही केले, वा जे काही प्लान केले ते त्यांना डोळ्यासमोर ठेऊनच केले. मग ते घर सजवणे असो, वा नवीन घर घेणे असो. सुट्यांचा प्लान असो वा विकेंडची भटकंती असो, पिकनिक असो वा पार्टी असो, अगदी आमच्या लग्नाचा वाढदिवस देखील मुलांच्या आवडीचेच सारे करायचे आणि मुलांनीच केक कापून साजरा करायचा हे ठरलेलेच. नऊ ते साडेपाच ऑफिस करायचे, आणि कुठलेही प्रोजेक्ट टार्गेट अचिव्ह करायच्या फंदात न पडता शक्य तितके लवकर घरी सटकायचे. वर्क लाईफ बॅलन्स वगैरे संज्ञा निव्वळ कागदावर राहू नयेत हे बघायचे. मग घरी पोहोचल्यावर मी आणि माझी पोरं. त्यांच्यासोबत खायचे, खेळायचे, अभ्यास करायचे, त्यांची सूसूशीशी साफ करण्यापासून आंघोळीपर्यंत जे काही एकत्र करता येईल ते करायचे, आणि त्यातून जसा वेळ मिळेल तसे ईतर वैयक्तिक छंदही जपायचे. अशी अगदी टिपिकल कुटुंबवत्सल तरीही माझ्यादृष्टीने ईंटरेस्टींग लाईफ मी जगत होतो. टवाळक्या करतच लहानाचा मोठा झालो आणि तसेच काही विशेष न करता एक दिवस मरणार असे आयुष्याच्या अर्ध्या टप्प्यावर वाटत होते. पण दोन ईमुकल्या चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ दिला. कोणाच्या अध्यातमध्यात न पडताही माझ्या आयुष्यात मी कालपरवापर्यंत खुश होतो. आणि मग तो आला.. कोरोना!

चिमुकलाही म्हणू नये ईतका सूक्ष्मजीव पृथ्वीवर अवतरला आणि कित्येक कुटुंब उधळवून टाकू लागला. माणसं मरत होती. पण त्यापेक्षाही वाईट म्हणजे माणसे आपल्या मनाप्रमाणे जगू शकत नव्हती. जिवंत राहण्याची किंमत जगण्यात कॉम्प्रोमाईज करून राहत होती. लॉकडाऊन लागला आणि सर्वांप्रमाणेच आम्हीही घरी अडकलो. मुलांसोबत माझे आधीसारखे दर दिवसाआड त्यांच्या आजोळी जाणे बंद झाले. दर विकेंडचे गार्डनला जाणे बंद झाले. मुलांचे खाली खेळायला जाणेही बंद झाले. आणि याचे त्यांच्यापेक्षाही मला जास्त वाईट वाटत होते. कारण ईतर सर्व नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या मुलांप्रमाणे मलाही वाटायचे की माझे बालपण खूप भारी गेले आहे. त्यातही मी दक्षिण मुंबईतील चाळ संस्कृतीत वाढलेलो असल्याने ते खरेच खूप भारी होते. त्यामुळे या पिढीतल्या आपल्या मुलांच्या नशिबी ते सुख नसणार असे वाटून मी त्यांना हवे तसे मुक्तपणे बागडू द्यायचो. पावसात भिजू द्यायचो, चिखलात लोळू द्यायचो. मातीत खेळू द्यायचो, खेळतानाही वाटेल तेव्हा, वाटेल तिथे बसकन मारू द्यायचो. फ्लॅट संस्कृतीतील चार भिंतीत वा सोसायटीतील कंपांऊड वॉलच्या आतच त्यांचे आयुष्य अडकून राहणार नाही याची काळजी घ्यायचो. पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या स्विकाराव्याच लागतात. कोरोना आणि लॉकडाऊनलाही आम्ही असेच स्विकारले.

लॉकडाउन सुरू झाला तेव्हा मुलगा सव्वादोन वर्षांचा झाला होता आणि मुलगी नुकतीच सहाची. किंबहुना १९ मार्चचा तिचा सहावा वाढदिवस हेच आमचे शेवटचे घराबाहेर पडणे ठरणार याची आम्हाला तेव्हा कल्पनाही नव्हती. दुसर्‍याच दिवशीपासून माझे वर्क फ्रॉम होम चालू झाले. मुलीच्या शाळेला आधीच सुट्टी मिळाली होती. त्यामुळे मग दिवसभर दोन्ही पोरांशी खेळताखेळताच वर्क फ्रॉम होम व्हायचे. बरेचदा मी कामात असताना, अगदी मिटींगमध्ये असताना मुलगा माझ्या मांडीवर असायचा, तर मुलगी खांद्यावर चढून वरच्या फळीवरचा तिचा खजाना चेक करत असायची. मुलांच्या दंग्यात मिटींगमध्ये काही ऐकू गेले नाही तरी न संकोचता तसे बॉसला सांगायचो आणि त्यानेही ते समजून घ्यावे अशी अपेक्षा करायचो. कारण वर्क फ्रॉम होम कल्चर आमच्या क्षेत्रात नवीनच होते. त्यामुळे कधी मी आणि बॉस डिस्कशन करत असताना मुलगा जवळ यायचा, त्याला मीच हवा असायचो. त्याच्या वयाला वर्क फ्रॉम होम हि संकल्पना मी नाही समजवू शकायचो आणि त्याला असेच दूर लोटणे मला क्रूरपणाचे वाटायचे. म्हणून मग तिथेच बॉस वा कलीग जो कोणी असेल त्याला थांबवून कामातून ब्रेक घ्यायचो. थोडक्यात घरी जरी ऑफिसचे काम करत असलो तरी घराचे ऑफिस होऊ नये याची शक्य तितकी काळजी घ्यायचो.

पण हळूहळू सारे सेट होत गेले. कामाच्या मध्ये कामात चुका न करता मुलांशी ड्रॉईंग, कलरींग, उनो, पत्ते, पझल, हाईड अ‍ॅण्ड सीक वगैरे टर्न बाय टर्न खेळणे जमू लागले. पासिंग द पार्सल, चोर शिपाई, घर घर, डान्स डान्स असे मम्मी आणि आज्जीला सोबत घेत फॅमिली खेळही रोजच रंगू लागले. मारामारी, पकडापकडी, आबादुबी आणि झाल्यास योगा असे मैदानी खेळांनाही घरच्याघरी पर्याय शोधले गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रोज संध्याकाळी थंड पाण्याच्या शॉवरखाली आम्हा तिघांची एकत्र आंघोळ होऊ लागली. हा अर्धापाऊण तास ईतका दंग्याचा असायचा की मुले ती वेळ व्हायच्या तासभर आधीच नाचतगात तयार व्हायची. हाच उत्साह ते दर दोनचार दिवसांनी होणारया मॅगी पार्टीलाही दखवायची. या काळात दोन्ही भावंडात नात्याचा जो बंध तयार झाला तो या लॉकडाऊनचा माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा होता..

मग लवकरच मुलीची ऑनलाईन शाळा सुरू झाली. पण त्याचा तिला जाच वाटू नये म्हणून तिच्या मूडनुसार अध्येमध्ये लेक्चर बंक करू दिले. पण शाळेनेही त्या काळात बरेच छान आणि कल्पक उपक्रम राबवले असल्याने तिथेही ती रमू लागली. त्यात तिच्या शाळेने रेडिओ चॅनेल सुरू केले, आणि तिला पहिले ब्रॅण्ड अ‍ॅम्बासेडर बनवले. त्यामुळे त्यानिमित्ताने बरेच ऑडिओ आणि विडिओ वरचेवर रेकॉर्ड होऊ लागले. त्यात आपले काम सांभाळत सहभाग देणे हे शिवधनुष्य मला पेलावे लागले. पण बायको जॉबला नसण्याचा सर्वात मोठा फायदा मला या काळात जाणवला. वर्क फ्रॉम होम एकाचेच असल्याने पोरांची जबाबदारी वाटली गेली. साईड बाय साईड तिचेही यूट्यूब चॅनेल बघून आम्हाला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालणे चालूच होते. माझा वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस हे सारे या लॉकडाऊन काळात नेहमीपेक्षा वेगळ्या स्वरुपात पण तितक्याच उत्साहात साजरे झाले. आणि रोजच काहीतरी नवीन धमाल घेऊन येणारा हा लॉकडाऊन पिरीअड आपल्या आयुष्यातील सोनेरी काळ आहे असे मला वाटू लागले.

जून महिना उजाडला. आमचा आवडता पावसाळा सुरु झाला. तसे थंड पाण्याचे शॉवर थांबले. पण त्याजागी संध्याकाळी टेरेसवर जाणे सुरू केले. खरे तर गेले चार वर्षे या भाड्याच्या घरात राहत होतो. पण कधी टेरेस कसे आहे हे बघायलाही गेलो नव्हतो. कारण घराजवळचे ‘मिनी सी शोअर’ हा आमचा ठरलेला कट्टा ज्याने गेल्या चार वर्षात कधी बोअर केले नाही. पण गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. मोकळ्या हवेत श्वास घेण्याच्या गरजेने आमच्यासाठी टेरेसचे दरवाजे उघडले. मग जे खेळ घरात खेळायचो ते तिथे जाऊन खेळू लागलो. आता धावायला जास्त जागा उपलब्ध होती. खेळ वाढले होते. तासतासभर मुलीला घेऊन टेरेसवरच्या टाकीवर बसून गप्पा मारू लागलो. तब्येत सांभाळून का होईना टेरेसवरच पावसात भिजू लागलो. सभोवताली बहुढंगी बहुरंगी पक्षी मुक्त विहार करताना दिसायचे. अगदी डोक्यावर टपली मारून जावे ईतक्या अंतरावरून उडायचे. सुर्याने अस्ताला जाताजाता उधळलेले रंग झेलत आजूबाजूचे शहरदेखील त्या पक्ष्यांईतकेच नयनरम्य जाणवायचे. ना त्यात कोरोना दिसायचा ना त्याची भिती आढळायची.

पण प्रत्यक्षात मात्र तो जगभर थैमान घालत होता. भारतातही पसरू लागला होता. पण आम्ही घरच्याघरी सुरक्षित असे वेगळ्याच विश्वात होतो. सुरुवातीला रोज नित्यनेमाने बघितल्या जाणार्‍या बातम्या मी कोरोना महाराष्ट्र मुंबईत पसरू लागताच मुलांसमोर लावणे बंद केले होते. त्यांचे लॉजिक म्हणाल तर, कोरोना हा घराबाहेर आहे आणि जोपर्यंत आपण घराबाहेर पडत नाही तोपर्यंत सुरक्षित आहोत, ईतके सिंपल होते. मी सुद्धा तेच पकडून चालत होतो. आणि अश्यातच तो आमच्या समोरच्या घरातील चारपैकी तीन सदस्यांना झाला. माझ्या मुलीच्या तिच्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या मैत्रीणीला, आणि तिच्या ताईला झाला. आजवर बातम्यात दिसणारा आणि चॅनेल बदलताच अदृश्य होणारा कोरोना अगदी चार फूटांवर दिसू लागला.

जी खळबळ आता आमच्या मनात उडाली होती तिला मुलांपासून लांबच ठेवायचे ठरवले. सर्वतोपरी काळजी घेत आठवड्याभराचा ब्रेक घेतला आणि पुन्हा टेरेसवर जाणे सुरू केले. तिथे पाऊस आमची वाट बघत तयारच होता. त्यात त्या कोरोनाला भिजवून, त्याला मनातून काढत आम्ही पुन्हा चारशे मैलांवर भिरकावून दिले. तसेही आमचे टेरेसवर जाण्याचे काही शेवटचे दिवसच शिल्लक होते. कारण आता आम्हाला आमच्या नवीन घराचे वेध लागले होते.

नियोजित वेळेच्या तब्बल चार महिने जास्त आम्ही भाड्याच्या घरात काढले. या काळात नाहक घरभाडे आणि नवीन घराचे लोनचे हफ्ते दोन्ही भरत होतो. आर्थिक गणित बिघडले होते, उधारखाते चालू झाले होते. सासरेबुवांकडून बिनव्याजी कर्ज घ्यावे लागले होते. घरमालकाकडून घरभाड्यात दोन महिन्याची सूट घ्यावी लागली होती. पण तरीही लॉकडाऊन शिथिल होऊनही ‘जान है तो जहान है’ म्हणत शिफ्टींगचा विचार न करता जिथे आहोत तिथे सुरक्षित आहोत हा विचार करून थांबून होतो. पण समोरच्या घरात पाहुणचार स्विकारलेल्या कोरोनाने हा विचारही मनातून पुसून काढला होता. कोरोना बॅकफूटवर गेला होता तर भाड्याच्या घरातून स्वत:च्या हक्काच्या घरात जातानाचा आनंद उपभोगण्यास आता आम्ही मुलांसोबत तयार होतो. नवीन घरात प्रवेश करताना मुलांसाठी बरेच सरप्राईज प्लान केले होते, पण पैश्याची तंगी आणि कोरोनाकाळात मुक्तसंचारावर असलेले निर्बंध यामुळे सारेच काही शक्य झाले नाही. घर शिफ्ट करताना आणि घराचे उरलेसुरले काम करून घेतानाही या काळात बरीच काळजी घ्यावी लागली. रोज रात्री झोपताना आज आपण कुठे कुठे फिरलो, कोणाकोणात मिसळलो, कुठे हलगर्जीपणा तर झाला नाही ना, उद्या ताप तर चढणार नाही ना वगैरे विचार मनात आल्यावाचून राहायचे नाही. पण मुलांनाही आता आपण एक नवीन घर, एक नवीन आयुष्य देणार आहोत या विचारांतून आलेल्या समाधानात ते विरून जायचे.

सध्या गणेशोत्सवाच्या धामधूमीतच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आहोत. मुले फार आनंदात आहेत. सुदैवाने आमचाही कोणाचा घसा अजून खवखवला नाहीये ना ताप आलाय. पण शेवटही गोड झालाय असे म्हणू शकत नाही कारण मुळात हा शेवट नाहीये. अजूनही कोरोना आपल्या आसपासच आहे. आणि अजूनही त्यासोबतच आयुष्य जगायचे आहे.

म्हटलं तर कित्येक किस्से घडले या काळात, काही चांगले काही वाईट. बरेच अनुभव आले, ज्यांनी घरबसल्या देखील विचार करायची, आयुष्याकडे बघायची नजर बदलून टाकली. आपण अजूनपर्यंत तरी सुखरूप आहोत याचे आभार मानावेसे वाटले, जे नाहीत त्यांच्याबद्दल वाईट वाटले. आपल्या मनातील गिल्ट जावी यासाठी का असेना, ओळखीच्या वा अनोळखी लोकांना मदत केली गेली. पण या सर्वात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपण हे काय करून ठेवलेय? येणार्‍या पिढीचे आपण फार मोठे दोषी आहोत. आपण आपल्या सुखासाठी आणि स्वार्थासाठी जे आजूबाजूचे वातावरण विषारी आणि विखारी करून ठेवले आहे, त्याचे असेच एकेक भीषण परीणाम येणार्‍या प्रत्येक पिढीला भोगावे लागणार आहेत. ईथून आपल्या किती पिढ्या शिल्लक राहणार आहेत याचीही आता शाश्वती नाही असे वाटते. सर्वात वाईट म्हणजे जे आपण करून ठेवलेय ते आता निस्तरणेही कदाचित आपल्याला शक्य नाही असे वाटते. त्यामुळे लेखाचा शेवट करताना शाहरूखचा एक डायलॉग मारायचा मोह आवरत नाही, जो सकारात्मक आहे की नकारात्मक हे मला सांगता येणार नाही, कदाचित ज्याला त्याला आपल्या स्वभावानुसार उलगडत असावा...

तुम्हारे पास जो है वो शायद तुम्हारे हिसाब से कम है
पर शायद किसी दुसरे के नजर से देखोगे, तो तुम्हारे पास बहोत कुछ है
तो फिर जिओ, खुश रहो, मुस्कुराओ...
क्या पता,
कल हो ना हो !!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख , आणि अभिनंदन नवीन घरात रहायला गेल्याबद्दल.
खुप दिवसांनी अभिषेक शैली वाचायचा आनंद मिळाला.

अगदी मनापासून लिहीलं आहे.. बापाचं मनही खूप हळवं असतं पण ते वरून खंबीर असल्याचं दाखवतात किंबहुना तसं त्यांना मुलांसमोर भासवावं लागतं .. खूप छान लिखाण

त्यामुळे या पिढीतल्या आपल्या मुलांच्या नशिबी ते सुख नसणार असे वाटून मी त्यांना हवे तसे मुक्तपणे बागडू द्यायचो. पावसात भिजू द्यायचो, चिखलात लोळू द्यायचो. मातीत खेळू द्यायचो, खेळतानाही वाटेल तेव्हा, वाटेल तिथे बसकन मारू द्यायचो >>हे फार आवडलं कारण मलाही हे असंच करायला आवडतं.. आणि सध्याच्या माॅल संस्कृतीमुळे हे कुठेतरी नाहीसं होत चाललंय असंही वाटतं.

अभि, अगदी आतून आलंय .... प्रांजल! तुझ्या कुटुंबाचे (वजा पत्नी) वेगवेगळे फोटो टाकत असतो ..... डोळ्यासमोर सगळी द्रुष्य दिसली... स्टे ब्लेस्ड!
नवीन घराबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!

छान लिहिलंय.अगदी आतून aalay.तू छान बाबा आहेस हे सर्टिफिकेट मागेच दिल्यामुळे परत देत नाही.गच्चीच्या वर्णनावरून तुम्ही अगदी डोळ्यांसमोर आlaत.सुखी रहा.

ह्यावर्षीच्या गणेशोत्सव काळातील सर्वात उत्तम लेख. अगदी सहजभावाने लिहिलेले आश्वासक प्रयासांचे भावविश्व आवडले. मिनी सी शोअर वरुन माझ्याही खुप वर्षां पुर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.

खूप खूप छान लिहिले आहे.

अय्या, तुमच्या प्रिन्सेस चा आणि माझा वाढदिवस सेमच दिवशी असतो. आम्ही ही कोरोनाच्या आधी शेवटचे 19 मार्च लाच फैमिली फैमिली घराबाहेर पडलो होतो.
Happy

खुप मस्त लिहीलंयस ऋन्मेSSष, डोळ्यासमोर आली तुमची दंगामस्ती. तू एक हळवा बाप आहेस हे माहितीये, ते अधोरेखित झालं. Stay blessed.

छान प्रतिसाद आले.
आभार सर्वांचे
नवीन घराच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. Happy

@ पाफा, हो लिहीतानाच ऋन्मेष की अभिषेक, कोणत्या आयडीने प्रकाशित करावे हा विचार मनात आला होता. पण माझ्यासाठी दोन्ही सेमच आहेत त्यामुळे मग फार विचार नाही केला.

गच्ची हा खरे तर एक स्वतंत्र अध्याय आहे. एकदा हे नवीन घरात सेटल झालो की त्यावर एक फेसबूक पोस्ट (३०-४० फोटो अपलोड करत) लिहायचा विचार आहे Happy

@ म्हाळसा
आणि सध्याच्या माॅल संस्कृतीमुळे हे कुठेतरी नाहीसं होत चाललंय असंही वाटतं.
>>>>

+७८६
यावरून आमच्या घरातही नेहमी वाद/चर्चा होते. मलाही ते वातावरण नेहमी नकली वाटते. पैसे मोजा आणि सुख विकत घ्या. त्यामुळे मी सुद्धा मुलांना मॉलमध्ये नेण्यास उत्सुक नसतो. अर्थात मुले तिथे मजा करतातच. त्यामुळे ते काम मग त्यांच्या मावश्यांवर सोडले आहे.

@ अनंतनी
मिनी सी शोअर वरुन माझ्याही खुप वर्षां पुर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.
>>>

ग्रेट! मला वाशी आवडायचे हे सर्वात मोठे कारण आहे. यावर तर स्वतंत्र धागाच काढायचा विचार आहे.
आम्ही तिथे जवळच राहायचो. तिथेच पडीक असायचो. पावसाळ्यात तर आणखी धमाल माहौल असतो. बोटींग, भुट्टा, गार्डन्स, स्वच्छ आणि हिरवेगार वातावरण. विकेंडला उठले की सरळ भिजायला तिथेच.
आताही घर बदलले तरी फार लांब नाही गेलोत आणि बायकोचे माहेर तिथेच आहे त्यामुळे जाणे होत राहीलच Happy

खूप मस्त लेख ऋन्मेऽऽष.
अशा लेखनात तुझा हातखन्डा आहे त्यामुळे तुझ्या एन्ट्रिची वाटच बघत होते.
नवीन घराबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!

खूप छान लिहिलंय... तुमची मुलं खूप लकी आहेत कारण तुमच्यासारखे बाबा त्यांना भेटलेत... नाहीतर मुलांशी खेळतात सर्वच जण, मुलांचा विचारही करतात पण priority कामाला असते... At least आमच्या घरी तरी.. पण तुम्ही मुलांना priority देता हे मला फार आवडतं...

सुंदर लिहीले आहे.
________
मलाही मुलगी ३ वर्षांची होइपर्यंत, माझ्या मुलीबरोबर व्यतित केलेले दिवस आठवले. त्यानंतर मग मात्र अमेरीकेचे शुक्लकाष्ठ मागे लागले व .....

आम्ही जुहु चौपाटी, सिद्धीविनायकला जायचो जिथे चक्रात बस कुठे भेळ खा, फुग्यांशी खेळ, घोडागाडीत बस अशी मजा मजा करत असू. घरीही, तिच्या वयाच्या तिच्या मैत्रिणींबरोबर चेंडू व अन्य खेळ खेळत असू. खरं तर फार मस्त दिवस होते ती लहान असतानाचे.
_______
लेख खूप आवडला.

Pages