शेती करण्यात अर्थ नाही...

Submitted by मी_अनामिक on 25 July, 2019 - 09:57

पिढीजात आहे म्हणून धंदा करण्यात अर्थ नाही
शेतकरी बाप माझा, शेती करण्यात अर्थ नाही...

बाजारात भाव ठरवणाऱ्यांना एवढेच कळावे
अजून ह्यांना आता पिडण्यात अर्थ नाही...

ज्याच्या दावणीची जनावरं, बायकापोरं उपाशी
त्यास 'जगाचा पोशिंदा' म्हणण्यात अर्थ नाही...

चार-चौघात ज्याची माय निलाम होते
त्याला 'भुमीपुत्र' म्हणण्यात अर्थ नाही...

सदा परिस्थिती खेळे त्याच्या नशिबाशी
गुलामच तो,'बळीराजा' म्हणण्यात अर्थ नाही...

योजना सगळ्या फायलींत अन् कागदोपत्रीच
हत्याच ती, 'आत्महत्या' म्हणण्यात अर्थ नाही...

सदा हात पसरलेले याच्या ना त्याच्या पाशी
याचक म्हणावे, 'दाता' म्हणण्यात अर्थ नाही...

मोत्यांच्या राशींचे छदाम न ठरविता येणाऱ्याला
'अनामिक' ठेवावे, 'शेतकरी' म्हणण्यात अर्थ नाही...

Group content visibility: 
Use group defaults

परिस्थिती कशी बदलता येईल असे लिहा. सतत नकारात्मक कानावर पडून शेतकऱ्यांचे मनोधैर्य अजूनच खच्ची होते.‌ समाज निगरगट्ट आहे, कितीही आत्महत्या झाल्या तरी कोण रडणार नाही फक्त कुटुंब उघड्यावर येते.

खरंय.
संसदेत इम्तियाज जलील शेतकरी आत्महत्यांबद्दल बोलत असताना सभापती , तुमची वेळ संपली, आवरा, असं सांगत होते
तेव्हा हेच वाटलं.
कशालाच अर्थ नाही.

<<< पिढीजात आहे म्हणून धंदा करण्यात अर्थ नाही
शेतकरी बाप माझा, शेती करण्यात अर्थ नाही... >>>

अगदी बरोबर. शेतीत पोट भरत नसेल तर दुसरा पर्याय शोधणेच श्रेयस्कर.

पिढीजात आहे म्हणून वाटण्या होत होत हाती आलेल्या अर्ध्या किंवा दीड एकरात शेती करण्यापेक्षा, ती शेती कॉर्पोरेशनला विकावी आणि शेती करायची अगदीच हौस असेल तर त्याच कंपनीच्या शेतात पगारी नोकर म्हणून राबावे.

हेच तर, नोकरदार लोक एक दोनच मुले काढून दर पिढीत एकेक
प्रॉपरती वाढत जाते, शेतकऱयांचे उलटे सगळे , 20 एकरवरून 1 एकरवर येतात आणि फाफलत बसतात

बरोबर आहे भाऊ.
शेती विकुन मस्त fd करा.. आरामात जगा आणि लोकांना जे काही लागेल ते रागा चंद्रावर आलू की खेती करून माल पुरवतील, हां का ना का !

@BLACKCAT...
@भरत...
@उपाशी बोका...
@निरु....
तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद....

@ चक्रम माणूस...
@अज्ञानी.....
नावाप्रमाणेच आहात....
मी फक्त सत्य परिस्थिती मांडली...
सआदत हसन मंटो एकदा म्हणाला होता की जर तुम्ही माझ्या कथा वाचू शकत नाहीत तर तो माझा दोष नाही.....समाज आणि आजूबाजूची परिस्थिती तशी आहे.....

परिस्थिती कशी बदलता येईल असे लिहा. सतत नकारात्मक कानावर पडून शेतकऱ्यांचे मनोधैर्य अजूनच खच्ची होते.‌ समाज निगरगट्ट आहे, कितीही आत्महत्या झाल्या तरी कोण रडणार नाही फक्त कुटुंब उघड्यावर येते.
यात आपणास चुकीचे काय आहे व काय खटकलं हे स्पष्ट लिहा सूरज.

सूरज भौ
सत्य परिस्थिती मांडताना निव्वळ पोकळ कागदी ज्ञानावर अवलंबून असेल तर त्याची पुंगळी केली जाते आणि अनुभवजन्य बोल नेहमी लोकसंग्रह ठरतात.

हाताला एक कण माती न लावता शेतीबद्दल कळवला जीव हे बघुन टडोपा
असो !

@चक्रम माणूस....
नुसतं बोलून काही होत नाही चक्रमजी....
त्याला आवश्यकता असते कृतीची......
नाहीतर 'तोंड घेतं घाई आणि हाताने होत नाही' अशी परिस्थिती होते....
आणि हेच समाज निगरगट्ट आहे म्हणून आज ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे.... आणि समाजात मी आणि तुम्ही सुद्धा येतो....
तुमच्या माहितीस्तव मी अजूनही शेतात काम करतो मी फक्त माझी व्यथा मांडली.....

अज्ञानीजी...
तुम्हाला माझ्या बद्दल काही माहिती नाही आहे त्यामुळे तुम्ही न बोललेलच बरं....
आणखी एक फायद्याचा सल्ला....
घ्या अथवा सोडून द्या...
ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती नसेल तेव्हा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर टिप्पणी करणे टाळावे अन्यथा भयंकर अपमान होतो......

छान! आता शेतकर्‍यांच्या व्यथा- समस्याबद्दल काही बोलणं ही देशद्रोह ठरवला जाऊ लागलाय.......
धन्यवाद भरत जी....
माझ्या भावना समजून घेतल्याबद्दल.....

तूम्ही व मी शेतकरी आहोत. मला एका एकरात वर्षाला मिळणारं उत्पन्न नोकरी करून एका महिन्यात मिळत आहे. शेतीवर बोलायचं तर दिवस पुरणार नाही. एकतर नाशवंत माल, विक्रीमुल्य ठरवता येत नाही, विक्री व्यवस्था गुंतागुंतीची आहे, आवक व मागणी ताळमेळ नाही, भाव वाढले की सरकारच भाव पाडतं, या सगळ्या गोष्टी आहेत. मी शेतीतून तोटा झाला तरी खूष राहतोय कारण मी नोकरी+ इतर व्यवसाय करतो व शेती ही आनंदासाठी करत आहे. काही शेती सांभाळता येत नाही म्हणून विकली व भांडवल व्यवसायात लावलं आहे.

शेतीच्या इतक्या सेवा सध्याचे सरकार देतय आणि कित्येक पटीने आता शेतकरी आधिपेक्षा संपन्न झालाय ही वस्तुस्थिती आहे. काही ठराविक शेतकरी वैयक्तिक / इतर कारणामुळे आत्महत्या करतात तर लगेच अक्खा शेती उद्योग वाईट किंवा नुकसनीचा ठरवणे कितपत योग्य आहे ?
चक्रम माणूस बोलले ते योग्यच आहे - उगीच निगेटिव्ह मत मांडणे शेती करणाऱ्यास धैर्य खचवणारे ठरते.

कविता विभाग आहे म्हणून इथे माझ्याकडून सध्या पूर्णविराम ... तुमच्या खऱ्याच अडचणी / निरिक्षणे / वाईट अनुभव असतील तर चर्चेसाठी वेगळा धागा काढल्यास अधिक सविस्तर आणि उदाहरणा सहित बोलता येईल

एखाद्याने मांडलेल्या मुद्द्यांवर उत्तर नसलं की त्यालाच खोटं ठरवायचं, डिस्क्रेडिट करायचं ही सध्याची स्टँडर्ड मोडस ऑपरेंडी आहे.
आधी तुम्ही शेतकरीच नाही, असं म्हणा यचं. मग तुमच्या अडचणी खर्‍या नाहीत असं म्हणायचं.

<सत्य परिस्थिती मांडताना निव्वळ पोकळ कागदी ज्ञानावर अवलंबून असेल तर त्याची पुंगळी केली जाते आणि अनुभवजन्य बोल नेहमी लोकसंग्रह ठरतात.

हाताला एक कण माती न लावता शेतीबद्दल कळवला जीव हे बघुन टडोपा>

या प्रतिसादाच्या आरशात स्वतःचं तोंड पाहावं.

भरत भाऊ तुम्हीच काढ़ा वेगळा धागा मग बोलू आपण तिकडे
तेव्हा कळेल कोणाच्या हातात माती लागली आणि कोण चंद्रावर शेती करायला जाते ते

तुमच्या सदस्यत्वात धागा काढायची पॉवर नाही का?
तुम्ही काढा धागा आणि लिहा शेतकरीच कसे चुकतात ते.

तुमच्या सदस्यत्वात धागा काढायची पॉवर नाही का?
हां नियम तुम्हाला स्वतास लागु न होण्याची काही विशेष कारणे असतील तर राहु दे Wink

अज्ञानी भाऊ आपण अज्ञानातच राहू. लोकांना काय नावं ठेवायची ती ठेवू दे.
सूरज माझं मत पटले काय?

@चक्रमजी...
तुमचे मत पटणे वा ना पटणे हे महत्त्वाचं नाही.....
तुम्ही तुम्हाला जे वाटलं ते मांडलं.....
आणि मला जे वाटलं ते मी मांडलं......
मी तुमच्या मताचा आदर करतो.....

[[[[[[[[[शेतीच्या इतक्या सेवा सध्याचे सरकार देतय आणि कित्येक पटीने आता शेतकरी आधिपेक्षा संपन्न झालाय ही वस्तुस्थिती आहे. काही ठराविक शेतकरी वैयक्तिक / इतर कारणामुळे आत्महत्या करतात तर लगेच अक्खा शेती उद्योग वाईट किंवा नुकसनीचा ठरवणे कितपत योग्य आहे ?]]]]]]]. ....
@अज्ञानी जी... या तुमच्या मताशी मी सहमत नाही......
तुमचं हेच मत कितपत योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा ग्रामीण मराठवाडा आणि ग्रामीण विदर्भ पाहून या........

सुरज थोरात, कविता आवडली. भिडली.

मायबोलीवरील फॅसिस्ट ट्रोल्सशी वाद करू नका. अजून 20/25 ड्युआयडी घेऊन तुम्हाला त्रास देत राहतील. शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलित, मुसलमान यांनी आमचे सगळे छानच चालू आहे तुमच्या राज्यात... असे यांना हात जोडून उभे राहून म्हटले पाहिजे ही अपेक्षा फारशी चुकीची नाही.

मायबाप कविता लिहून चूक झाली आहे असे म्हणा आणि माफी मागून मोकळे व्हावे.

सुरज थोरात कुणाला त्याच्या चष्म्यातून जसे जग दिसतं तसं ते समजत असतात. चष्मा पुसायची तकलिफ न घेता दुसऱ्यांना त्यांच्या गटात ओढू पाहतात. तरी आपण आपलं ऐकावं.... चे करावं मनाचं असे वागावे हे मला वाटते. कविता नेहमीचं तेच रूदन वाटली.

एक सहज विचारते. आधी पूर्ण वाचा. माझ्या नात्यातले ( माझ्या चुलत बहिणीचा दिर, जो शेती करतो ) एका व्यक्त्तीने सध्या शेतात ऊस लावलाय. पाऊस अजीबात झाला नाही. पाणी मिळत नाहीये. जिथे प्यायलाच कमतरता आहे तिथे शेतीला कुठुन मिळणार? आधी याच भाऊंनी आधी शेतात ज्वारी, भुईमुग, गहु, बाजरी लावुन रग्गड पैसा मिळवला होता. समाधानी होते, पण आता ऊसाला खूप पाणी लागते हे माहीत असुनही बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन ऊसातला त्वरीत पैसा कसा हातात येईल या विचाराने त्रस्त आहेत. हातचे सोडुन पळत्याच्या मागे का लागावे? नवे प्रयोग जरुर करावेत, पण ज्यात गुंतवलेला पैसा देखील हातात येत नाही अशा पीकाचा विचार का करावा? मग डोक्यावर कर्ज लादले जाते, निराशा येते.

मी कशाला फुकटचे कष्ट उपसतोय ही भावना निर्माण होते. मागे राजस्थानचे नोबेल प्राईज विजेते राजेंद्र सिंग टिव्हीवरल्या मुलाखतीत म्हणाले होते की जिथे पाऊस नाही, पाणी नाही तिथे ( मराठवाड्यात ) ऊस लावताच कशाला? जिथे पाणी कमी असते अशा कोरडवाहु जमिनीत कोणती पिके घ्यावीत हे मार्गदर्शन घेण्यात कसला कमी पणा आलाय?

सिन्नरला एका सुशिक्षीत माणसाने नोकरी सुटल्यावर खडकाळ जमिनीत शेवग्याचे पीक घेऊन लाखो कमावले. नशीब त्याचे घरचे त्याच्या पाठिशी होते. बाकी लोक हसले त्याला, पण त्याने पर्वा नाही केली.

उम्मेद हरुन निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये आणु नका. धंद्यात बुडलेला मारवाडी माणुस कष्ट व जिद्दीने परत वर येताना बघीतलाय आम्ही.

तुमची कविता जरी मनाला भिडली तरी तुम्ही उम्मीद हरताय हे बघुन वाईट वाटले व रागही आला. तेव्हा हारु नका, पुढे चला.

सत्य कटु असते. समोरच्याला राग येऊ शकतो, पण शांतपणे विचार केला तर मार्ग निश्चीत सापडतो. मला माहीत आहे, कुठलेही काबाड कष्ट न करता मी असे लिहीतेय. पण जेव्हा एका कुटुंबाचा कर्ता आत्महत्या करतो, तेव्हा खरच मनापासुन वाईट वाटते.

इथे दोन्ही बाजूने ( भाजपा व भाजपा विरोधी किंवा कॉम्ग्रेस किंवा काँग्रेस विरोधी ) लढणार्‍या लोकांना विचारावेसे वाटतेय की शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून दोन्ही पालथ्या हाताने शिमगा करणार्‍या किती आमदार-खासदार - मंत्री- संत्री यांनी आपली पगारवाढ नाकारलीय? अहो इथे भाजप व काँग्रेस तसेच इतर पक्षाच्या बाजूने अहोरात्र लढणार्‍यांनो एक लक्षात घ्या की जेव्हा आमदार-खासदारांची पगारवाढ होते ना तेव्हा हे बाजारबुणगे ( सगळ्या पक्षांचे बरं का ) आळीमिळी गुपचिळी करुन गप्प बसतात, कळ्ळं?

एकतरी माई का लाल येतो का स्वतःच्या खिशातुन शेतकर्‍यांना द्यायला? आँ! गप्प बसा, एकदम चूप्प ! हाताची घडी तोंडावर बोट !

Pages