नाचे नागीन गली गली

Submitted by पायस on 26 November, 2018 - 02:51

पूर्वपीठिका

द्वारका, कृष्णाची नगरी. कृष्ण आपल्या कक्षात फलाहार करत होता. "नारायण नारायण" च्या जापाने त्याचे लक्ष वेधले गेले. आज नारदमुनि एकटे नव्हते. सोबत कोणीतरी होते. ओळख पटायला फार वेळ लागला नाही.
"कालिया!" कधीकाळी यमुनेच्या डोहात वास्तव्यास असलेला कालिया नाग आज इथे कसा काय?
"प्रणाम भगवंत. आजच मी कालियाशी बोलत होतो की सध्या तुम्ही नागजमातीवर वरांचा वर्षाव करत आहात. बलरामदादांच्या सांगण्यावरून कलियुगात शेषनागावर एक अखंड सिनेमा बनण्याचे वरदान तुम्ही दिले आहेतच. मग मी म्हटलं की कालियाराव, बघा तुम्हाला सिनेमात काही रस असला तर. भगवंतांचा मूड आहे तोवर घ्या मागून वरदान!" आपले 'कळलाव्या' नाव सार्थ करत नारद म्हणाले. आता काही इलाज नव्हता, कृष्णाने कालियाला वर मागण्यास सांगितले.
"देवा, फार जुनी गोष्ट नाही. तुम्ही बासरीच्या मधुर सुरांवर मला डोलायला लावत माझ्या डोक्यावर नाचलात. तुम्हाला बासरी वाजवण्याचा अनुभव तर मिळाला पण तुम्हाला डोलायचा अनुभव नाही मिळाला. तरी माझी अशी इच्छा आहे की एकतरी असा सिनेमा बनावा ज्यात तुम्ही डोलता आणि इतर कोणीतरी सुरावट वाजवेल."
"अरे जर मी डोलायला लागलो तर बासरीतून पुंगीचे स्वर काढायला ऋषी कपूर येणार आहे का? मुनिवर आता तुम्हीच काहीतरी तोडगा सुचवा."
"भगवंत आपण तर सर्वज्ञ आहात. मी पामर आपल्याला काय सल्ला देणार? तरी भविष्यपुराणानुसार नितीश भारद्वाज नामे मनुष्य तुमची भूमिका वठवणार आहे. त्याच्याकरवी कदाचित ...."
"उत्तम विचार. कालिया, हा वर तुला पटतो का सांग. कलियुगात "डबल रोल" नामक तंत्र विकसित केले जाईल ज्यानुसार सिनेमात एकच अभिनेता किंवा अभिनेत्री दुहेरी भूमिका साकारू शकेल. तसेच या नितीश भारद्वाजाची 'कृष्ण' म्हणून प्रतिमा बनणार हे विधिलिखित आहे. त्यानंतर एक असा सिनेमा येईल ज्याच्यात नितीश पुंगीही वाजवेल आणि पुंगीच्या सुरांवर डोलेलही"
"मला हा वर मान्य आहे भगवन्"
"तथास्तु!"

******

(फास्ट फॉरवर्ड टू इसवी सन १९८९) लेखक, दिग्दर्शक मोहनजी प्रसाद "व्याहुत" यांचे घर

"सर सर सर, साईडप्लॉटसाठी ही आयडिया कशी वाटते इच्छाधारी नाग आणि गारुडी असा डबल रोल!"
"सुप्पर!! बाकी मसाला तर आहेच. पण तुला इतक्या चांगल्या आयडिया कधीपासून यायला लागल्या?"
"कोणीतरी तंबोरावाला होता, ही त्याची कल्पना" हे शब्द त्याने प्रयत्नपूर्वक टाळले.
"हिरोईन म्हणून आपली मीनाक्षी आहेच, औरत तेरी यही कहानी नुकताच केला आहे तिने आपल्या टीमसोबत. त्या नितीशच्या डेट्स मिळतात का बघ, सध्या महाभारतानंतर भरात आहे."
"ओके सर"

~*~*~*~*~*~*~

शेषनागनंतर नागपटांच्या अभ्यासक्रमातला पुढचा धडा आहे नाचे नागीन गली गली. नाचे नागीन गली गली आपल्याला वर नमूद केलेल्या गारुडी-नाग डबल रोल खेरीज, तांत्रिक सिद्ध पुरुष, बिछडलेला मुलगा, शाप देणारी आई, मानलेली आई, जबरदस्तीची आई, गारुड्यांच्या कबिल्यात राहणारी नागीण आणि सदाशिव अमरापूरकर असे बंपर पॅकेज आहे.

१) व्हिलनची एंट्री

अवांतरः माझे एक ह्युरिस्टिक आहे की जर पहिला सीन व्हिलनचा असेल आणि सिनेमा ८८-९६ या कालावधीतला असेल तर तो नि:संशय विश्लेषण करण्याकरिता बनलेला आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण १९९४ चा मॅडम एक्स!

१.१) सगळ्या गुरु-शिष्यांची गोष्ट गुरुपौर्णिमेला सांगण्यासारखी नसते

सुरुवात एका आश्रमाच्या दृश्याने होते. आश्रमाचे डिझाईन फार इंटरेस्टिंग आहे. सिमेंटच्या कुटिरांमध्ये शिष्यगण राहत असावेत. एक रँडम शिष्य स्टीलची बादली घेऊन चालला आहे. कुटिरांची छपरे उतरती आहेत. म्हणजे कथानक पर्जन्यमान अधिक असलेल्या एखाद्या प्रदेशात घडते. पण इतक्या चांगल्या लॉजिकवर हिंदी सिनेमांचा विश्वास नसल्याने प्रेक्षकाला कळते की सिनेमात एकदाही पाऊस पडणार नाही आहे. पत्र्याच्या छपरावर गवत पसरवून हा आश्रम जंगलात असल्याचे पटवून देण्याची पराकाष्ठा केली गेली आहे. तर अशा आश्रमाचा प्रमुख असतो सत्येन कप्पू आणि त्याचा पट्टशिष्य असतो सदाशिव अमरापूरकर!

आश्रमाचे पावित्र्य दाखवण्यासाठी सगळे भगवी वस्त्रे घालून बसलेले असतात. सदाशिव अमरापूरकरचे नाव नरसिंगदेव असते. तो सत्येन कप्पूसमोर हात जोडून बसलेला दाखवला आहे. सत्येन कप्पू प्रेक्षकांना सांगतो की याच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याने याला भारी भारी सिद्धी प्रदान केल्या आहेत. आता याच्या सारखा तांत्रिक दुसरा कोणी नाही. पण नरसिंगदेवला आणखी एक विशिष्ट सिद्धी हवी असते. तिचा वापर केला की मोठ्यातला मोठा सिद्ध पुरुष सुद्धा कैद होईल असा एक पिंजरा तयार होत असतो. या सिद्धीविषयी सांगण्यापूर्वी थोडेसे स.अ. च्या वेषभूषेविषयी - केसांमध्ये मधूनच चंदेरी रंगाचे फराटे ओढले आहेत तर काळी खोटी मिशी लावून तिच्या टोकांना पांढरे मिशांचे खुंट जोडले आहेत. यामागे दोन कारणे असू शकतात - १) एक अखंड मिशी मिळालीच नाही २) सत्येन कप्पूच्या धवल दाढीला कॉंट्रास्ट यावा आणि हा व्हिलन असल्याचे ठसावे. आता असेल ते असेल पण असा हा नरसिंगदेव ती सिद्धी मागतो.

सत्येन कप्पू विचारतो "दुरुपयोग तो नही करोगे?" यावर स.अ. चा चेहरा - "कप्पूऽऽऽ तुजा माज्यावर भरवसा नाय काय?" बिचारे गुरुदेव भोळे असल्याने त्यांचा स.अ. वर स्वतःपेक्षा अधिक विश्वास असतो. हरि ओम् म्हणताच त्यांच्या ओंजळीत मोती प्रकट होतात. ते ओंजळभर मोती स.अ. ला देऊन ते सांगतात की हरि ओम् चा जाप करून तू यांची एक माळा बनव. मग तो पिंजरा प्रकट होईल. जोवर ती माळा आहे तोवर तो पिंजरा आहे. हे सर्व चालू असताना मागून डी कॉर्डमध्ये (बहुधा) बेस गिटार वाजत राहते. लगेच नरसिंगदेव ती माळा तयार करतो. हे सगळे बघायला शिष्यगण गोळा होतात. यांच्याकडे महान टेलिपोर्टेशन पॉवर्स आहेत. आधी सत्येन कप्पू आणि स.अ. चा एक शॉट आहे ज्याच्यात बॅकग्राऊंडला एक शिष्य मस्त झाडाला टेकून झोपला आहे. पुढच्याच सेकंदाला तो पाच शिष्यांच्या मॉब शॉटमध्ये बॅकग्राऊंडला येतो. या पाच शिष्यांच्या मॉबशॉटमध्ये उजव्या बाजूला एक दाढीवाला आहे. त्यानंतर दोनच सेकंदात सात शिष्यांचा आणखी एक मॉब शॉट आहे ज्याच्यात हा दाढीवाला एकटा रिसायकल केला गेला आहे. त्याची दाढी बदलून प्रेक्षकांना हा वेगळा शिष्य आहे हे पटवून देण्याची पराकाष्ठा गेली आहे.

जसा जसा एक एक मोती ओवला जातो तसा तसा पिंजरा तयार व्हायला लागतो. हे सगळे चालू असताना स.अ.च्या मागे एक गाय "आय डोंट गिव्ह अ डॅम अबाऊट दीज हूमन्स" भावाने चारा खाण्यात रमली आहे. पिंजरा पोपटाच्या बसण्यासाठी रेडिमेड दांडी सकट येतो. नरसिंगदेव सॉफ्टवेअर टेस्टर असल्याने "सॉफ्टवेअर तर तयार झाले गुरुदेव पण अजून टेस्टिंग झाले नाही आणि तुमच्या पेक्षा अधिक चांगली टेस्टकेस ती कोणती?" हा बहाणा बनवून सत्येन कप्पूचा पोपट करतो - आय मीन इट, शब्दशः पोपट करतो. पोपटरुपी गुरुदेव टेस्टिंगसाठी पिंजर्‍यात स्वतःहून कैद होतात. टेस्टिंग होते आणि आता गुरुदेव आपल्याला बाहेर काढण्याची विनंती करतात. नरसिंगदेवचा चेहरा - येडा समजतो का मला? गुरुदेव वगळता नरसिंगदेवइतका चमत्कारी तांत्रिक दुसरा कोणी नसतो. वर साळसूदपणे तो सुनावतो "भस्मासुराने तर आपल्या वरदात्या शंकराला भस्म करण्याचा प्रयत्न केला होता. मी तर तुमचे नित्य दर्शन व्हावे म्हणून फक्त कैद करून ठेवतो आहे." सगळे शिष्य लगेच नरसिंगदेवची गुलामी कबूल करतात.

१.२) शाप देणारी आई
देवराज नामक एका रँडम ठाकूरच्या जमिनीवर नरसिंगदेव कब्जा करतो. याने हा ठाकूर भलताच खवळतो आणि आपली माणसे पाठवून जमीन परत घ्यायला बघतो. या ठाकूरची आई असते सुहास जोशी. सुहास सांगते की नरसिंगदेव फार मोठा तांत्रिक आहे तू त्याच्याशी पंगा नको घेऊस. पण पोरगं हट्टाला पेटलेलं असतं. नरसिंगदेव आता एका आलिशान हवेलीत राहत असतो. हवेलीच्या दिवाणखान्यातच एक कालिमातेची मूर्ती असते. मूर्तीमागच्या भिंतीवर सापांचे चित्र काढून इच्छाधारीवाला मोटिफ अधोरेखित केला आहे. मूर्तीसमोर एक हवनकुंड असते. स.अ. ने आता भगवी वस्त्रे टाकून देऊन कवड्या लावलेले काळे कपडे परिधान केलेले आहेत. बायकोचा सबुरीने घेण्याचा संदेश धुडकावून लावत स.अ. या आधी कधीच न ऐकलेला तांत्रिकांचा मंत्र म्हणतो
"ऊर्ध्वमूल अधः शाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदासि यस्य पर्णानि यस्तं वेदसवेदवित्"
...........
..........
..........

शॉकमधून सावरण्यासाठी दोन मिनिटे घेऊन भेदरलेला प्रेक्षक पुढचा सिनेमा बघू लागतो. एका पळीने विभूती हवन कुंडात टाकतो. इतका वेळ ते कुंड विझलेले असते. पण विभूती टाकताच कुंडात अग्नि प्रकट होतो आणि एक अग्निगोल प्रकट होतो. अग्निगोलास स.अ. आज्ञा देतो की जाऊन देवराजला भस्म कर. इथे स.अ.ची बायको प्रेक्षकांच्या मनातली प्रतिक्रिया देते - प्रतिक्रिया. तो अग्निगोल मग जाऊन देवराजला भस्म करतो. इथे आपल्याला ग्रीन स्क्रीनवर हातात मशाल उर्फ अग्निगोल घेऊन धावणार्‍या माणसाची अस्पष्ट आकृती दिसू शकते.

देवराजला भस्म करून अग्निगोल परत कुंडात येतो आणि कुंडातली आग विझते. स.अ. ला कामगिरी फत्ते झाल्याचे लक्षात येऊन तो खुश होतो. इथे अग्निगोलाचा पाठलाग करत सुहास जोशी स.अ.च्या हवेलीत येते. ती मुलगा गेल्याच्या दु:खात शिव्यांची लाखोली वाहते. मग ती त्याला शाप देते - तू कोडी बन जाएगा. तेरा एक एक अंग गल गल कर गिरेगा. आता असा शाप दिल्यावर एवढा मोठा तांत्रिक कसा शांत बसेल. मग तो तिला "तेरी मौत तुझे बकवास करने पर मजबूर कर रही है, ले मर" असे म्हणून पुन्हा हवनकुंड प्रज्ज्वलित करतो आणि बायकोच्या विरोधाला न जुमानता गीतेतला आणखी एक श्लोक म्हणून सुहास जोशीवर पाणी फेकतो. याने सुहास जोशी नक्की का मरते हे अजून कळू शकलेले नाही कारण ती उगाचच पाच सहा वेळा नहीं म्हणते पण बाकी हार्ट अ‍ॅटॅक, जळून मरणे वगैरे कोणतीच सिंप्टम्स दिसत नाहीत. तिच्या लाशला मग याचे शिष्य नदीत फेकून देतात.
दुसर्‍या दिवशी रेघारेघांचा शर्ट आणि रेघारेघांचा पायजमा घालून झोपलेल्या नरसिंगदेवला उठवायला त्याची बायको चहा घेऊन येते. चहा घ्यायला तो हात पुढे करतो आणि त्याच्या लक्षात येते की आपला डावा अंगठा वितळत आहे. याने दोन गोष्टी सिद्ध होतात - १) नरसिंगदेव सव्यसाची आहे (कारण तो आहुती उजव्या हाताने देतो पण चहा डाव्या हाताने घेतो), २) जोशीबाईंचा शाप फळला आहे. हे लक्षात येताच स.अ. ची जाम तंतरते.

२) हिरो-हिरोईन की एंट्री

२.१) पुढच्यास ठेच मागच्यास शहाणा हे खरे असले तरी याचा अर्थ पुढचा शहाणा होत नाही. तो परत परत ठेचकाळतच राहतो.

आपल्या दगाबाज शिष्याची ही अवस्था बघून सत्येन कप्पू पिंजर्‍यात बसून खदाखदा हसतो. कप्पू आधी त्याची नीच, अधम, दुष्ट, पापी अशा शब्दांत संभावना करतो. स.अ. भगवान शंकराची शपथ घेऊन प्राणांची भीक मागतो तरी कप्पूजी बधत नाहीत. मग तो "मी तुमचा दास होऊन राहीन" असे वचन देतो आणि गुरुदेव म्हणतात "ठीक हैं". या शापातून मुक्त होण्याचा अतिशय स्पेसिफिक उपाय
नरसिंगदेवला अमरकुंडात स्नान करावे लागेल. अमरकुंडात पोहोचण्यासाठी इच्छाधारी नागाची मणी मिळवावी लागेल. हा इच्छाधारी नाग आपल्या नागीणीसोबत दर पौर्णिमेच्या रात्री काळ्या पर्वतावर येतो. तोवर सड-गलकर मरू नये म्हणून "ओम् नमः स्वाहा" या मंत्राचा एक कोटीवेळा जाप केल्यास ही सड-गल प्रोसेस पंधरा वर्षांसाठी थांबेल.
स.अ. लगेच भगव्या वस्त्रांत येऊन जाप सुरु करतो आणि जवळपास बारा मिनिटांनंतर श्रेयनामावली पडद्यावर झळकते. इंटरेस्टिंगली इथे पहिले नाव मीनाक्षी शेषाद्रीचे आहे, हिरो नितीश भारद्वाजचे नाही. क्रेडिट्स संपेपर्यंत स.अ.चा जाप पूर्ण होतो आणि त्याचा कोड तात्पुरता बरा होतो. कप्पू मग त्याला आपल्याला स्वतंत्र करायला सांगतो. "आधी अमरकुंड तर मिळू दे" करून तो त्याला पुन्हा चुना लावतो. सुभद्रा (त्याची बायको, कृष्णकथेचा मोटिफ) ला गुरुदेवांच्या दाणापाणीची व्यवस्था करायला सांगून तो निघून जातो. (इथे सत्येन कप्पूची "दुष्ट पापी" वाली डायलॉग डिलीव्हरी बघण्यासारखी)

२.२) नाग सरपटणारा प्राणी आहे म्हणून इच्छाधारी नागांनीही सरपटलेच पाहिजे

काळा पर्वत आश्चर्यजनकरित्या निळसर प्रकाशात न्हाऊन निघालेला आहे. डच अँगलमध्ये, खराब शॉटमध्ये नागाचे चित्र तरंगत पर्वतावर येते. तोंडातून एक मणी काढून ते जमिनीवर ठेवते. मग त्या नागाचा भरजरी कपडे घातलेला नितीश भारद्वाज बनतो. हा महाभारताच्या सेटवरून थेट इथे आला असावा. थोडे "आ आ आ आ" आणि "ओ ओ ओ ओ" होते व मीनाक्षी शेषाद्रीची एंट्री होते. नागाच्या मानाने नागीण बरीच कमी नटली आहे जे बॉलिवूडसाठी जरा रेअर आहे. तरी केसांत नाग हेअर बँड घालून एका बाजूने पोंगा सोडलेला. नाग टिकली, जरीकाम केलेला गुलाबी स्कर्ट, पर्वतावरच्या धबधब्यात नाचता येईल या दृष्टीने घातलेली चोळी असा सरंजाम आहे. तरी हे दोघे सुसह्य आहेत. सेट अप होताच पुंगीच्या बॅकग्राऊंड मुझिकवर नितीन मुकेश "मिले मन से ये मन मिले तन से ये तन आयी मधुर मिलन की सुहानी रैना" करून रडू लागतो. सोबत म्हणून साधना सरगम ताई "जागी मन में तपन लागी तन में अगन, आज अगन से अगन बुझा दे सजना" करून साथ देऊ लागतात. याला पहारा म्हणून स.अ. शतपावली करतो आहे.

गाणं मोठं रंजक आहे. दोघांपैकी कोणाच्याही तनात अगन लागल्याचे जाणवत नाही. शेषाद्रीताईंनी आडनावाला जागणारी नागीण काही वठवलेली नाही. त्यांनी भरत नाट्यम्, कुचिपुडी, कथक, आणि ओडिसी नृत्यकलांचे शिक्षण घेतले खरे पण श्रीदेवी स्कूल ऑफ स्नेक डान्सिंगमध्ये त्या गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे नृत्य शास्त्रीय नृत्य वाटत राहते. त्यातही त्यांनी भर कंबर, मान आणि डोळे हलवण्यावर दिलेला आहे. नितीशने उर्वरित अवयव (त्याचे स्वतःचे, मीनाक्षीचे नव्हे) हलवून मानवी शरीराचा कोटा पूर्ण केला आहे. एक कडवे झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की एवढे ढीगभर कपडे घातल्याने ती अगन आणि सुहानी रैना सगळं व्यर्थ चाललं आहे. मग मीनाक्षी चोळी काढून नुसतेच झुळझुळीत पातळ नेसते तर नितीश खालचे निळ्या रंगाचे वस्त्र आणि गळ्यातल्या माळा वगळता सर्व काढून टाकतो. एव्हाना नृत्यदिग्दर्शकालाही जाग आलेली असते. मग त्या दोघांना झाडावरून सरपटत धबधब्याने निर्माण झालेल्या तळ्यात जायला सांगतो, कारण ते नाग आहेत ना. इथे हे लोक सोयीस्कर रित्या विसरतात की नाग अर्थात इंडियन कोब्रा झाडांवर राहत नाही, झाडांवर राहणारा (arboreal) भारतीय साप अजगर! तसेच त्या धबधब्याची नदी होत नाही हे भौगोलिक आश्चर्यही आपल्याला बघायला मिळते. मग थोड्या पोजेस मारल्यानंतर त्यांची तने एकदाची एकमेकांना मिळतात. पण परमोच्च बिंदू येणार तर त्याजागी नरसिंगदेव येतो.

३) कॉम्प्लिकेटेड प्लॉटचा सेटअप इलॅबोरेट असावा लागतो

३.१) गाव तिथे जत्रा

स.अ. ला बघून ते दोघे नागरुपात पळ काढतात. स.अ. मग एक पुंगी पैदा करून त्यांना शोधायला लागतो. पुंगीच्या कर्णकटू आवाजाला वैतागून ते परत मनुष्यरुपात येतात. पण काही अनाकलनीय कारणाने ते लहान मुलांचे रुप घेतात. नितीश बनतो मास्टर आलोक आणि मीनाक्षी बनते बेबी गुड्डू. हे स.अ.च्या नजरेतून सुटलेले नसते. दोघे धावत धावत पोहोचतात एका जत्रेत. इथे दोघा बालकलाकारांनी दमल्याचा न भूतो न भविष्यति असा अभिनय केला आहे. साधारण गावाच्या विरंगुळ्याची चव लक्षात यावी म्हणून एक बाई बाप्याचा वेष घालून दुसर्‍या बाईला छेडत "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" या गाण्यावर नाचताना दाखवली आहे. तर अशा गावच्या जत्रेत श्रीराम लागू आणि आशालता आपल्या सुपुत्रास घेऊन आले आहेत. आणि त्यांचा सुपुत्र आहे - मास्टर आलोक! इथे डबल रोलची भानगड अनुभवी प्रेक्षकास लगेच समजू शकते. त्या अजाण बालकाने देवदर्शनाआधी मेला बघण्याचा हट्ट धरलेला असतो. सुदैवाने हे साल २००० नाही. अन्यथा किमान ट्विंकल खन्नाच्या त्या गाण्याच्या भीतिने तरी त्याने मेला बघण्याचा हट्ट धरला नसता.

इथे नरसिंगदेवही जत्रेच्या ठिकाणी पोहोचतो. तो नागजोडप्याला शोधत, पुंगी वाजवत जत्रेत हिंडू लागतो. त्याच्या पुंगीच्या आवाजाने वैतागून जत्रेतला एकही व्यक्ती त्याच्याकडून पुंगी हिसकावून, त्याच्या पेकाटात लाथ घालत नाही हे विशेष! आपल्या मास्टर आलोक (नाग) आणि बेबी गुड्डूला मात्र या पुंगीचा त्रास होऊ लागतो. इतक्या वर्षात एकाही इच्छाधारी नागाला न सुचलेले शहाणपण ते दाखवतात. कानात बोटे घालतात. पुंगीचा आवाजच ऐकू येत नाही तर हे डोलणार कसे? एका कँपा कोला विकणार्‍या गाडीमागे ते लपतात. तिथून चालत जाणारा नरसिंगदेव कोला पीत नसल्याने नजर फिरवतो आणि त्या दोघांच्या शेजारून निघून जातो. हे सर्व घडल्यावर एकदाचे व्हायचे तेच होते - जत्रेत या दोघांची चुकामूक होते आणि ते हरवतात.

३.२) जत्रेत लहान मुले हरवली नाही तर त्या जत्रेला काय अर्थ आहे

दोन हरवलेल्या मुलांना कोणीही जत्रेच्या "हरवलेली मुले" केंद्रात का देत नाही हा प्रश्न आपण सोडून देऊ. मुख्य गोष्टी अशी की आपल्याला या दोघांची नावे कळतात. मीनाक्षीचे नाव आहे मोहिनी आणि नितीशचे नाव आहे नागेश. बाकी ते "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" चालूच आहे. त्या गाण्याची कोरिओग्राफी डबल मिनींगच्या दृष्टीने अभ्यासण्याजोगी आहे. इकडे मास्टर आलोक (नाग) आणि मास्टर आलोक (मानव) यांची भेट होते. इथे कंटिन्यूटी मिस्टेक आहे. आधी शॉटमध्ये मास्टर आलोक (मानव) मँगो डॉली (चोकोबार सारखे आईसक्रीम) खात असतो. ती थोडीफार खाऊन झालेली असते (काडीचे दुसरे टोक दिसत आहे इतपत खाऊन झाली आहे). कट टू मास्टर आलोक (नाग). कट टू मास्टर आलोक (मानव) जो म्हणतो की "अरे". इथे याच्या हातात अजिबात न खाल्लेली नवीन कांडी आलेली आहे. ते दोघे आपल्या सारखाच दिसणारा दुसरा मास्टर आलोक बघून प्रसन्नपणे हसतात. काही कारणाने जत्रेत दोन भिल्लही आलेले असतात. ते मास्टर आलोक (मानव) वर कांबळे टाकून त्याला पळवून घेऊन जातात. याने मास्टर आलोक (नाग) भलताच क्रुद्ध होतो.

स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलमधून डॉ. लागू आणि आशालता काहीतरी खरेदी करत असतात. इथे स्पष्ट दिसते की प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना चिनीमातीच्या सहा कपांचा सेट दिला आहे, स्टीलच्या भांड्यांच्या स्टॉलवर. मग त्यांच्या लक्षात येते की अरे आपलं पोरगं जागेवर नाही. इथे कळते की मास्टर आलोक (मानव) चे नाव कमल आहे. यांचा नोकर भोला, ज्याने कमलवर लक्ष ठेवणे अपेक्षित असते तो "कैसे कटे, रजाई बिना रतिया कैसे कटे" बघण्यात मग्न असतो. तोही मग यांच्याबरोबरीने कमलला शोधायला लागतो. इकडे कमलला त्या भिल्लांनी बळी द्यायला आणलेले असते. ते कमलचा बळी देणार इतक्यात तिथे नागेश येऊन त्यांना चावतो आणि कमलचा जीव वाचवतो. हे झाल्यावर त्याला आठवण होते की अरे मोहिनीला तर आपण मागेच सोडून आलो. क्यू तिचा रडण्याचा शॉट. पण दैवाला काही वेगळेच मंजूर असते. ते नोकर लोक नागेशला कमल समजून शब्दशः उचलून घेऊन जातात. आशालता आईच्या ममतेने त्याची विचारपूस करते. आधी तो कमल असल्याचे नाकारतो पण दुरून स.अ. येताना दिसताच तो आढेवेढे न घेता लागू आणि आशालता बरोबर जातो.

इकडे रमत गमत चाललेल्या स.अ. ला मरून पडलेला भिल्ल दिसतो. भिल्लाला साप चावल्याचे स्पष्ट असतेच पण स.अ. एका सेकंदात याला चावणारा इच्छाधारी नागच आहे हे ठरवतो. नजर वळवताच त्याला बलिवेदीवरचा कमल दिसतो. आश्चर्याची बाब अशी इच्छाधारी नागाचा दंश ओळखता येत असला तरी स.अ. ला इच्छाधारी नाग आणि माणूस यांच्यात फरक करता येत नसतो. त्यामुळे तो कमलला उचलून घेऊन जातो.

पुढे कमलचे काय होते? आपण घरात आणलेला मुलगा इच्छाधारी नाग आहे हे आशालता आणि श्रीरामना समजते का? मधल्या काळात असे काय घडते की मोहिनीवर गल्लो गल्ली नाचण्याची पाळी येते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स.अ. ला अमरकुंड सापडते का? तसेच सत्येन कप्पूची मुक्तता होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार. पण एका अल्पविरामानंतर प्रतिसादांत - उरलेले रसग्रहण प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कप्पूऽऽऽ तुजा माज्यावर भरवसा नाय काय?" >>
त्यांचा स.अ. वर स्वतःपेक्षा अधिक विश्वास असतो. >> हाहाहाहा.... हे वाक्य बिगेस्ट जोक आहे, सिरीयल मधे असं वाक्य आलं की जाम हसू आणि वैताग पण येतो Happy
भारी आहेत पंचेस... हे मादाम x वाचून यूट्यूब वर बघितले रेखा चे भयंकर कोश्च्युम बघून पिक्चर बघायची हिंमत नाही।
प्लिज परीक्षण लिहा यावर पण।
अर्धा लेख वाचून घाईघाईत पहिला प्रतिसाद लिहिला आहे, पूर्ण वाचून परत लिहिते. Biggrin

तो रिअ‍ॅक्शनचा शॉट खतरनाक आहे, आणि माझ्याकडे नेमका बँडविड्थला प्रॉब्लेम असताना बघितला त्यामुळे एकदम स्लो-मो मधे अजूनच खतरनाक दिसला.

बाकी चिरफाड नेहमीप्रमाणेच एकदम सविस्तर चालू आहे..

लगे रहो!!
भारी आहे हे!!
मला वाटलं "नाचे नागिन गली गली" मधलं "गली गली" पायस ने मुद्दम जोडलं आहे, पण हे तर खरं खुरं नाव निघालं..

बाकी चिरफाड नेहमीप्रमाणेच एकदम सविस्तर चालू आहे..+११११
Rofl
येउ द्या ..
धमाल सुरु झालेली आहे आम्च्यासाठी आता Lol

नितीशने उर्वरित अवयव (त्याचे स्वतःचे, मीनाक्षीचे नव्हे) हलवून मानवी शरीराचा कोटा पूर्ण केला आहे. >>
इकडे रमत गमत चाललेल्या स.अ. ला मरून पडलेला भिल्ल दिसतो. भिल्लाला साप चावल्याचे स्पष्ट असतेच पण स.अ. एका सेकंदात याला चावणारा इच्छाधारी नागच आहे हे ठरवतो. >> नुसती धमाल चाललीये।

नुसती धमाल आहे... Happy
सत्येन कप्पु..... कसलं आडनाव!!! मला पहिले वाटायचं की पेपर मधे कपूर ऐवजी चुकून छापलं गेलंय....!
सत्येन कप्पूला आतापर्यंत डांबूनच ठेवलंय का?
आणि तो गुरुदेव ना? मग पिंजर्‍यातून (तोही स्वतःच सांगितलेला!) स्वत:ची सुटका नाही करता येत त्याला?

येऊदे अजून......

हरे रामा! महाभारत पाहून नितिश भारद्वाजच्या प्रेमात होते काही(च) दिवस. नंतर कधीतरी हा भयाण पिक्चर टीव्हीवर अर्धवट पाहिला होता. आता सुदैवाने काहीही आठवत नाहिये. अनेक कोटी नागातला एखादाच १०० वर्षाच्या तपस्येनंतर इच्छाधारी बनू शकतो हे ज्ञान 'नागिन' हा रीना रॉय-जितेंद्र ह्यांचा चित्रपट पाहून नुकतंच संपादन केलं आहे. १०० वर्ष हे नाग सुहागरात साजरी करायला थांबतात. आणि त्या रात्री नमनाला घडाभर तेल घालत नाचत रहातात. मूळ काम बाजूलाच राहतं. नागापेक्षा कमी नटलेली नागिण हा नागांच्या जातीला कलंक आहे. बहुतेक नागाला पगार कमी मिळत असावा आणि तो पगार तो नागिणीला देत नसेल.

परिक्षण वाचून जाम हसले. Proud बाकी ह्या एकाच पिक्चरमध्ये एव्हढी मर्‍हाटी मंडळी असण्याचं काय कारण असेल? 'मेला'तल्या गाण्याची नका आठवण करून देऊ Sad

एकंदरीत पायस ला नागोबा युनिव्हर्सिटीची मानद पी. एच. डी. का देऊ नये? Happy

मी तर आजूबाजूला कधीही साप-नाग वगैरे प्राणी दिसले, तर त्यांची 'घृत-युत-पायस' अर्पण करून पूजा करणार आहे. Happy

मेला बघून मेलेले कोण कोण आहेत इथे Wink
बादवे पुढं काय होतंय पिक्चरमध्ये ।।>>
मेला म्हटलं की मला जाळी जाळीचा बनियन आठवतो Wink

तो पिक्चर पण चिरफाड करायला घेतला पाहिजे कोणीतरी >> त्यासाठी फार हिंमत पाहिजे. चिरफाडीसाठी परत परत मेला बघायचा म्हणजे शेर का कलेजा किंवा गेंड्याची कातडी पाहिजे.

आणि तो गुरुदेव ना? मग पिंजर्‍यातून (तोही स्वतःच सांगितलेला!) स्वत:ची सुटका नाही करता येत त्याला? >> तो स्पेशल पिंजरा असतो ज्याच्यातून स.अ. च्या इच्छेशिवाय कोणीही बाहेर येऊ शकत नसतो, गुरुदेवसुद्धा! म्हणून तर स.अ. तो पिंजरा मागतो.

रसग्रहण पुढे चालू

४) कॉम्प्लिकेटेड प्लॉटचा सेटअप इलॅबोरेट असावा लागतो - २

४.१) मानलेली आई/जबरदस्तीची आई - १

आशालता आणि श्रीराम लागू नागेशला घेऊन घरी येतात. पोरासाठी दाही दिशा या न्यायाने आशालता नोकर भोलाला "झाडफूक करनेवाला मौलवी" तर लागूंना डॉक्टर बोलवायला सांगतात. तोवर हा पळून जाऊ नये म्हणून त्याला वरच्या मजल्यावरच्या खोलीत डांबतात. (घर दुमजली बंगला आहे) इकडे स.अ. कमलला घेऊन आपल्या हवेलीत आलेला असतो. कालीमातेच्या मूर्तीसमोर त्याला झोपवून तो पुंगी वाजवून त्याला वशमें करण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघून मिसेस नरसिंगदेव फार व्यथित होतात. पण तिच्या विरोधाला न जुमानता स.अ. पुंगी वाजवतच राहतो. कमलच्या अंगावर मुक्या माराच्या खुणा आहेत. म्हणजे झाडफूकवाला मार त्याला दिला गेला असावा. छाती फुटेस्तोवर पुंगी वाजवल्यानंतर स.अ. पुंगी फेकून देतो. मग तो मूठभर तांदूळ घेऊन मंत्र म्हणून कमलवर फेकतो. कमल अंगावर गार पाणी ओतले जावे तसे थरथरतो. हा सगळा तमाशा बघायला कोणीतरी असावे आणि शॉटला सिमेट्री असावी म्हणून सहा गुंड (तीन डावीकडे, तीन उजवीकडे) उभे केले आहेत. यातल्या केवळ एकाच गुंडाच्या हातात परशू देऊन (बाकीच्यांना काठ्या) असिमेट्री निर्माण करून प्रेक्षकाचे लक्ष तिथे वेधले जाईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

तीन मूठ तांदूळ मारल्यानंतर सत्येन कप्पू (पोपट) ला आपल्या शिष्याच्या बुद्धीबद्दल कणव वाटते. तो त्याला सत्य सांगतो - अरे हा इच्छाधारी नाग नसून त्याचा डुप्लिकेट मानव आहे, याला जाऊ देत. आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा नसल्याने स.अ. याचे खापर कमलवर फोडतो आणि परशू घेऊन त्याला मारू बघतो. मग मिसेस नरसिंगदेवमध्ये पडतात. त्या याला जीवनदान द्यायची विनंती करतात. तसेच आपण कमलला आपल्या मुलाप्रमाणे वाढवणार असल्याची घोषणा करतात. स.अ. ला कमलचे काय होते याचे सोयरेसुतक नसल्याने तो फारसे आढेवेढे न घेता होकार देतो. एव्हाना कमल शुद्धीवर आलेला असतो. शुद्धीवर आल्या आल्या तो डिक्लेअर करतो की आपल्याला पूर्वीचे काहीही आठवत नाही आहे. याने मिसेस नरसिंगदेव भलत्याच खुश होतात. त्याला त्या दोन वेळा बेटा काय म्हणतात, तो त्यांना माँ म्हणून घट्ट मिठी मारतो. कमलची सोय लागली.

४.२) नाग आणि पुंगीवादक यांच्यात शत्रुत्व असेलच असे नाही.

शीर्षकाचा खुलासा - या सिनेमात कोणालाही "सपेरा" असे संबोधले गेलेले नाही. पुंगी वाजवणारा प्रत्येकजण गारुडी असतोच असे नाही, तांत्रिकही पुंगी वाजवतात. त्यामुळे पुंगीवादक ही संज्ञा योजावी लागली आहे. पण हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की १९८९ साली हा आणि आणखी एक सिनेमा असा होता ज्याच्यात नाग आणि पुंगीवादक यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध दाखवले आहेत. लेट एटीज्-अर्ली नाईंटीजमध्ये शैलीत बदल झाले असे मी पूर्वीही नमूद केलेले आहे, हा त्यातलाच एक बदल. दुसरा सिनेमा याहून वरचढ आहे - तू नागीन मैं सपेरा - ज्याच्यात नागीण (सोनिका गिल) आणि सपेरा (सुमित सहगल) यांची प्रेमकथा आहे.

असो, इकडे आपली नागीण, बालरुपातली मीनाक्षी अर्थात बेबी गुड्डू बेंबीच्या देठापासून "नागेश, नागेश" असे ओरडत डोंगरदर्‍यांतून भटकत असते. भटकून भटकून ती दमते आणि जंगलात एका झाडाला पार बांधलेला पाहून तिथे वाईच टेकते. दुसरे काही काम नसल्याने ती तिथेच हुंदके देत बसते. रातच्या पारी दोन बंजारे - भारतभूषण आणि त्याचा मुलगा पेंटल - तिथून चाललेले असतात. जिप्सी जॅकेट, डोईला रुमाल, गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा असा जामानिमा असल्याने त्यांच्या बंजारा स्टेटसवर शिक्कामोर्तब होते. एकटी मुलगी रडताना बघून ते तिची चौकशी करतात. भारतभूषणच्या हातात इथे पुंगी आहे. ती पुंगी बघूनही आपली शूरवीर नागीण पळून जात नाही. ती त्यांना सांगते की "मेले में मेरा साथी बिछड गया". निर्जन स्थळी, रातच्या वेळी जर एक लहान मुलगी झाडाखाली बसून जर साथी वगैरेच्या गोष्टी करत असेल तर भूताखेतांवर विश्वास नसणार्‍या व्यक्तीलाही काहीतरी चुकतंय असे वाटेल. पण या दोघांना त्याचे काहीच आश्चर्य वाटत नाही. ते म्हणतात चल आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो, तुझा साथी घरी गेला असेल. ती म्हणते आम्हाला घर नाही.

आता त्या दोघांना फारच वाईट वाटते. पेंटल लगेच तिला आपली बहीण मानतो आणि साहजिकच भाभू तिला मुलगी मानतो. ते तिला ऑफर देतात - आम्ही बंजारे गावोगाव खेळ करत हिंडत असतो. आमच्यासोबत चल म्हणजे कुठे ना कुठे तरी तुला तुझा साथी सापडेल. ती लगेच होकार देते. मोहिनीची सोय लागली.

४.३) मानलेली आई/जबरदस्तीची आई

इथे नागेशला ज्या खोलीत डांबलेले असते तिच्या खिडकीला गज असतात पण खिडकी बंद नसते. आता नागरुप धारण केल्यावर नागेशसाठी तिथून पळून जाणे अगदी सोपे असते. तो तसेच करतो. तोपर्यंत श्री.ला. डॉक्टरला घेऊन आलेले असतात. खोलीत नागेश न दिसल्याने आशालता फारच घाबरते. ती लगेच नवर्‍याला आणि नोकरांना कामाला लावते. जत्रेप्रमाणेच भोला इथेही कामचुकारपणा करतो आणि किरकोळ शोधाशोध केल्यानंतर दोनच सेकंदात मालकिणीला आवाज देतो - छोटे सरकार कही दिख नही रहे.

आशालता पॅनिक मोडमध्ये जाते. ती अजूनही जत्रेत नेसलेला लाल शालू अंगावर वागवत असते. आता इतका घामट्ट शालू घालून तरातरा जिना उतरताना ती घसरून न पडती तरच नवल! या शॉटमध्ये तिच्या डोक्याला जखम झालेली दाखवली आहे. सुदैवाने नागेश अजून घराच्या हद्दीबाहेर गेलेला नसतो. हा गोंधळ ऐकून तो मानव रुपात परत येतो. आशालताची अवस्था पाहून त्याला अपार दु:ख होते. जड अंतःकरणाने तो परत फिरणार इतक्यात नोकर लोक त्याला बघतात आणि पकडून आशालताकडे नेतात. कंटिन्यूटी मिस्टेकः या शॉटमध्ये आशालताच्या डोक्याची जखम गायब आहे. श्री.ला. नागेशला सांगतात की आशालता कायमस्वरुपी पांगळी झाली आहे. तू तिला प्रेमाने हाक मार म्हणजे तिला बरं वाटेल. तोही बिचारा माँ करून हाक देतो. आशालता लगेच "तू अब मुझे छोड कर कहीं नहीं जायेगा" असे फर्मान सोडते. एवढ्या मेलोड्रामानंतर फत्तरालाही पाझर फुटेल तर हा तर इच्छाधारी नाग आहे. जोपर्यंत हिचा खरा मुलगा सापडत नाही तोपर्यंत तो तिला आई मानायला आणि या जोडप्यासोबत त्यांचा मुलगा बनून राहायला तयार होतो. नागेशची सोय झाली.

सेटअप झाला.

मी तर आजूबाजूला कधीही साप-नाग वगैरे प्राणी दिसले, तर त्यांची 'घृत-युत-पायस' अर्पण करून पूजा करणार आहे. Happy >> फेफ Lol

मी मेला ऍडव्हान्स बुकिंग करून पाहिलाय >> ग्रँड सॅल्युट!! रिस्पेक्ट!!

Happy श्री.ला. Rofl मला समजलंच नाही एक मिनीट श्री. ला. म्हणजे काय!
वशमे....... याला मराठीत काय म्हणता आलं असतं? Happy

सत्येन कप्पू स अ ला दुरुपयोग तो नही करोगे? असं विचारुन पिंजरा देतो?
पिंजर्‍याचा अजुन सदुपयोग काय असेल बरे? Lol

श्री. ला. म्हणजे काय>> श्रीराम लागू गं. Happy

मी (माझ्या लहानपणी) नितीश भारद्वाजच्या फार दिवस प्रेमात होते. महाभारत आणि नंतर वर्षा उसगांवकर सोबतचा "पसंत आहे मुलगी" हा चित्रपट पाहून. त्याने केलेलं इतर काम पाहिलंच नाही मी. Happy

चिरफाड एकदम दणक्यात हां. Rofl
बाकी कोणीही माबोचित्रपटतज्ञाने पाहिलेला दिसत नाही हा चित्रपट. Wink

तू नागीन मैं सपेरा - ज्याच्यात नागीण (सोनिका गिल) आणि सपेरा (सुमित सहगल) यांची प्रेमकथा आहे.>> हा पण तुम्ही बघितलंय का।, धन्य आहात Happy

पायस _/\_
स.अ.ची बायको प्रेक्षकांच्या मनातली प्रतिक्रिया देते Lol

५) लहान मुले जर आपल्या जन्मदात्यांकडे वाढली नाहीत तर त्यांचे कॅरेक्टर प्रोग्रेशन नेचरच्या अंगाने न जाता नर्चरच्या अंगाने होते

५.१) श्श्श फिर कोई हैं ने दोन वेळा, श्श्श कोई है ने एकदा आणि हल्ली चालू असलेल्या कोई हैं? ने एकदा रिसायकल केलेल्या राजस्थानी लोककथा 'वारिस'नुसार सुंदर बंजारन स्त्रिया चुडैल असू शकतात यावर शिक्कामोर्तब झाले होतेच, आता त्या नागीणही असू शकतात हे स्पष्ट झाले आहे. - आमचे प्रेरणास्थान श्री. विक्राल यांच्या केसफाईल्समधून साभार

आता नागीणीकडे दुसरा काही कामधंदा नसल्याने ती भाभू आणि पेंटल सोबत गावोगाव, सॉरी गल्लो गल्ली भटकायला लागते. पोट भरण्यासाठी भाभू पुंगी आणि पेंटल ढोलक वाजवत असतात. हिला नाचता येत असल्याने ती नाचायला लागते. आता रुदन करण्याची पाळी अलका याज्ञिकची आहे. शीर्षकगीताचे बोल आहेत - नाचे नागीन गली गली, तेरी याद में सजना गली गली जब जब ये नशीली बीन बजे, बिछडे सजना तेरी याद जगे. तेरी प्यास लिए, तेरी आस लिए, पिया तेरी तलाश में मैं निकलीऽऽऽ

बालकलाकारांकडून काय वाट्टेल ते सीन्स काढून घ्यायची आपली परंपरा जुनी असल्याने बेबी गुड्डू अर्धा पाऊण मिनिट नाचते. स.अ. चा शतपावली शॉट रिपिट मारून तो अजूनही यांचा शोध घेत असल्याचे दाखवले आहे. बेबी गुड्डू मीनाक्षीप्रमाणे क्लासिकल डान्सर नसल्याने तिला जवळपास भजन गात असल्याचे हातवारे करायला लावले आहेत. ऋषी कपूरने आपल्याला बासरीतून पुंगीचे स्वर काढता येतात हे सिद्ध करून दाखवले होते. या गाण्यात अधून मधून भाभू पुंगीतून बासरीचे स्वर काढता येतात हे सिद्ध करतो. सुदैवाने अशा विसंगती आपल्याला फारकाळ बघाव्या लागत नाही. स्कर्ट धरून गोल गोल फिरण्याच्या शॉट ट्रान्झिशनमध्ये बेबी गुड्डूची मीनाक्षी बनते. तिकडे वरच्या मजल्यावरच्या खोलीतही मास्टर आलोकच्या जागी नितीश भारद्वाज दिसतो. इथे या लोकांनी बालपण ते तरुणपण या काळात वयाला साजेशी रुपे कशी बदलली हा प्रश्न आपण सोडून देऊ. कारण त्या प्रश्नाच्या खोलात घुसलो तर आपल्याला या दोघांना सांभाळणार्‍या लोकांना काहीच शंका कशी येत नाही या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागेल. डोक्यावर पडलेले भाभू आणि पेंटल सोडून देऊ, अगदी पांगळी आशालताही सोडून देऊ पण श्रीराम लागूंना संशय का येत नाही हे एक कोडे आहे. त्यापेक्षा आपले नाग लोग आणि त्यांची इच्छाधारी शक्ती लय भारी असं म्हणायचं. याला नाचे नागीन गली गली चा किंग क्रिमसन समजूयात.

इकडे स.अ. वर फारच वाईट पाळी आलेली दिसते. कारण गाण्यात तो जंगलातल्या रँडम नागांना पकडून पुंगी वाजवून ते इच्छाधारी आहेत का नाही हे बघण्याचा प्रयत्न करताना दाखवला आहे. गुरुदेवांना बंदी बनवण्याआधी इच्छाधारी ओळखण्याची सिद्धी प्राप्त केली असती तर ही वेळ आली नसती. मीनाक्षीने मधल्या काळात थोडे स्नेक डान्सिंगचे धडे गिरवले असल्याने ती मध्ये मध्ये झिंगल्यासारखी नाचते. पण मग तिच्यातली शास्त्रीय नर्तकी परत येते आणि गुलाबी रंगाच्या बंजारन ड्रेसमध्ये सुद्धा ती कुचिपुडी/भरतनाट्यम्/कथकच्या मुद्रा करते. तिला इतक्या वर्षांता नागेश सापडला नसला तरी होणार्‍या गर्दीवरून तिने भाभू आणि पेंटलचा धंदा चांगला चालवल्याचे स्पष्ट होते. तसेच ती काळ्या पर्वताचा पत्ता विसरली असल्याचेही स्पष्ट होते.

५.२) हेऽ गाऽणेऽ संपत नाही | हिचा ड्रेस बदलतच राही | ही गल्लो गल्ली जाते | शोधण्या साजणा नाचते ||

नागेश मात्र काळ्या पर्वताचा पत्ता विसरलेला नसतो. तो आपला इमानेइतबारे काळ्या पर्वतावर (मोस्टली दर पौर्णिमेला) ती भेटेल या आशेने येत असतो. इथे बेसावध प्रेक्षक गाणे संपले म्हणून सुखावतो आणि लाल ड्रेसमध्ये पुन्हा मीनाक्षी नाचायला सुरुवात करते. पेंटल जोशात ढोलक वाजवतो, भलेही तो ज्यापद्धतीने ढोलकाच्या पानांवर आघात करतो त्याप्रकारे ढोलकातूनही "दब्ब दब्ब" खेरीज आवाज निघता कामा नये. भाभू बँडवाले ज्याप्रकारे बासरी वाजवतात त्याप्रकारे पुंगी वाजवतो. मीनाक्षी मग पोपटी-निळा ड्रेस घालते. या गाण्यात भविष्यात ज्या अँगलने कॅमेरे लावले जातील, पक्षी हिरोईनच्या कंबरेखालून वरच्या दिशेने रोखलेले, त्याची चुणूक मिळते. शैलीतल्या बदलांचा आणखी एक पुरावा. पण बदल करणारा नवशिका असल्याने अँगल चुकले आहेत. गाणे संपता संपता युनुस परवेझ पठाणी वेशात अवतरतो. एकंदरीत त्याचे हावभाव बघता मासोळीच्या डोळ्यांवर त्याचा डोळा असल्याचे कळते. अजून थोडे भरतनाट्यम्/कथक मिश्रित बॉलिवूड नृत्य होऊन एकदाचे गाणे संपते.

५.३) कथा तर पुढे सरकत राहिलच, आयुष्याचे रहाटगाडगे आधी ढकलले पाहिजे

इकडे काळ्या पर्वतावर वाट पाहून नागेश कंटाळतो आणि परत घरी येतो. संवादांतून कळते की नागेशला दिवसेंदिवस घरातून गायब व्हायची सवय आहे. या सवयीमुळे आता लागूंना हा गायब होते त्याची फिकीरही वाटेनाशी झाली आहे. आशालताला मात्र अजूनही पोराची थोडी काळजी असावी असे तिच्या एक्सप्रेशनवरून वाटते. आता हा यांना गायब होण्याचे काय कारण देऊ शकणार? बिचारा गपगुमान आपल्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत जातो.

कट टू नरसिंगदेवची हवेली. प्रेक्षकांना टाईमलाईनचा थोडा अंदाज यावा म्हणून संवादांतून सत्येन कप्पू साडेचौदा वर्षे लोटली असल्याचे कळवतो ("केवल छह महिने रह गये हैं" आणि पंधरा वर्षे मिळाली होती). मधल्या काळात चिंता करून करून स.अ.ची दाढी वाढली आहे. इथे 'पुन्हा एकदा जाप करून आणखी पंधरा वर्षे मिळतात का बघूयात' असे लॉजिकल विचार नरसिंगदेवच्या डोक्यात येत नाहीत. नो वंडर तो अशा फालतू प्रकारे शापग्रस्त मरणार आहे. म्हणा अशा मंदबुद्धि शिष्याच्या जाळ्यात अडकणारा सिद्ध त्याचा गुरु असल्यावर आपण अपेक्षा तरी काय ठेवू शकतो. सत्येन कप्पू (पोपट) त्याला अजून खिजवतो. याने स.अ. च्या रागाचा पारा अजूनच चढतो. इतक्यात मोठा झालेला कमल पक्षी नितीश भारद्वाज (मानव) येतो. तो आपल्या मानलेल्या बापासाठी जंगलात जाऊन नाग पकडून घेऊन आलेला असतो. यावर बक्षीस म्हणून स.अ. त्याच्या कानफटात वाजवतो. जर इच्छाधारी ओळखता येत नसेल तर नाग पकडायला कशाला गेला हा व्हॅलिड प्रश्न तो त्याला विचारतो. इथे सोयीस्कररित्या आपल्यालाही इच्छाधारी ओळखता येत नाहीत हे तो विसरतो. रागावून स.अ. निघून जातो. एकंदरीत कमलचे जीवन काही फार सुखकर चाललेले दिसत नाही.

इकडे नागेशच्या आयुष्यात सगळी सुखे पायाशी लोळण घ्यायला तयार असतात. विकास आनंद (शोलेमध्ये ठाकूर ज्या पोलिसाला जय-वीरूला शोधून आणायला पाठवतो तो) दिलीप अंकल नामे श्री.लांचा मित्र दाखवला आहे. अमेरिकेत असल्याने त्याला आशालताच्या अपघाताची बातमी कळूनही भेटायला यायला जमलेले नसते. अखेर साडेचौदा वर्षानंतर तो तिची ख्यालीखुशाली जाणून घ्यायला आलेला असतो. शेजारी उभी असलेली पोरगी तर त्याने अशीच सोबत आणलेली असते. साहिला चढ्ढा (हम आपके हैं कौन मधली रिटा) रुप नावाने कमलची पोटेन्शिअल पार्टनर म्हणून दाखवली आहे. तिच्या दुर्दैवाने हा कमल नसून नागेश आहे. या सिनेमातल्या तिच्या ड्रेस आणि हेअरस्टाईल बद्दल लिहायचे ठरवले तर पानेच्या पाने खर्ची पडतील, त्यामुळे काही न लिहिणेच इष्ट! आठ वर्षांनंतर येणार्‍या परदेसची चुणूक या सिनेमात बघायला मिळते. वानगीदाखल अमेरिकेहून आलेल्या विकास आनंदचा डायलॉग ऐका (यानंतर रुपची ओळख करून दिली जाते) - बेटे, दुनिया में हर चीज मिल जाती हैं. पर संस्कार कभी नहीं मिलते.
आणि हा आणखी एक (रुपला उद्देशून) - बेटे ये अमरिका नहीं हिंदुस्तान हैं, हिंदुस्तान. यहां बडों के झुककर पैर छूए जाते हैं. चलो पैर छूओ.

भविष्यात परदेसला इन्स्पायर करणारी साईडस्टोरी चालतच राहिल. तत्पूर्वी आपल्या मुख्य पात्रांपैकी शेवटच्या पात्राचे, अर्थात मोहिनीच्या आयुष्य कसे चालले आहे ते बघूयात. एका रँडम ठिकाणी घागरा-चोळीत मीनाक्षी चणे खात असते आणि युनुस परवेझ तिची लांबी-रुंदी मोजण्याच्या गप्पा करत असतो. अचानक तो तिला कडेवर उचलून घेतो. ती शांतचित्ताने चणे खाणे सुरू ठेवते. इथे युनुसभाईंचा "मेरीऽऽ जाऽऽन" चा अ‍ॅक्सेंट ऐकण्यासारखा आहे. साधारण १९९५ नंतर असे प्यासे अ‍ॅक्सेंट ऐकायला मिळणे बंद झाले. तो तिला लिपटणार असे म्हणतो. एव्हाना तिचे चणे संपलेले असतात. फोलपटे त्याच्या केसांत ओतून ती त्याला लिपटते. प्रॉब्लेम इतकाच होतो की ती नागरुपात लिपटते. मुलीची नागीण झालेली बघून काकांची तंतरते आणि ते पळ काढतात. मीनाक्षी यावर खदाखदा हसते. एकंदरीत तिचं आयुष्यही बरं चाललेलं असल्याचे आपल्याला कळते. दुर्दैवाने हे लोक अल्पसंतुष्ट नसल्याने चटकन सिनेमा संपवण्याऐवजी अजून दीड तास लांबवणार असल्याचे प्रेक्षकाला कळते आणि प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातले सव्वादोन तास फार काही बरे चालले नसल्याचे उमगते.

इथे या लोकांनी बालपण ते तरुणपण या काळात वयाला साजेशी रुपे कशी बदलली हा प्रश्न आपण सोडून देऊ>>म्हणजे काय

Pages