नर्मदे हर!

Submitted by मंजूताई on 3 April, 2012 - 08:25

चार-पाच वर्षांपूर्वी निवेदिता खांडेकरचे प्रत्यक्ष अनुभव ऐकण्यापूर्वी नर्मदा परिक्रमेबद्दल फारसं ऐकलं वा वाचले नव्हते. दोनएक वर्षापूर्वी जगन्नाथ कुंट्यांच 'नर्मदे हर' वाचण्यात आलं. त्यानंतर अमरकंटकलाही जाण्याचा योग आला. सध्या अनेक संस्थळांवर नर्मदा परिक्रमेवर लेख, चर्चा वाचण्यात आल्या. कधीतरी आपणही परिक्रमेचा अनुभव घ्यावा असं वाटू लागलं . अजून तरी योग आला नाही. पण प्रतिभाताईंनी मानस परिक्रमा घडवून आणली. नुकतीच माझ्या मैत्रिणीने सौ प्रतिभा चितळ्यांची, त्यांनी दोनहजार सात साली केलेल्या परिक्रमेच्या अनुभवकथनाची तबकडी ऐकायला दिली. त्यांचे अनुभवकथन ऐकले अन भारावूनच गेले आणि हे मी ज्योती कामतच्या 'नर्मदेच्या तटाकी' पुस्तक परीक्षणाच्या प्रतिसादात लिहिलं. ते वाचून तिने मला सीडीबद्दल लिहायला सांगितले. त्या सीडीबद्दल लिहिण्याचा हा माझा प्रयत्न.

पुण्याचे सौ प्रतिभा चितळे व त्यांचे पती श्री सुधीर (व्यवसायाने व काहीसे वृत्तीनेही मेकॅनिकल इंजिनियर) चितळे ह्यांनी दोनहजारसातसाली दीडवर्षाची नर्मदा परिक्रमा केली. त्यांच्या अनुभवकथनाची ही सीडी. त्यावर कुठलीही माहिती लिहिलेली नाही कुठल्या कंपनीची, कोणी केली, किंमत इ. त्यांच्याच घरात रेकॉर्ड केली असावी असं वाटतं. त्या आपल्यासमोर एका खुर्चीत बसून नुकत्याच करून आलेल्या परिक्रमेविषयी उत्स्फूर्तपणे, उत्साहाने वर्णन करताहेत. साधी साडी, रंगरंगोटी विरहित पण प्रसन्न व बोलका चेहरा आणि मर्यादित हातवारे! सांगण्यात कुठेही आत्मप्रौढी (बघा, किती कठीण काम करून आलेय, बघा, मला कित्ती अनुभवायला मिळाले)किंवा दर्प नाही. हातात किंवा समोर कागद नाही. साधी सोपी बोलीभाषा. कुठेही भाषेचा अवजडपणा नसल्यामुळेच की काय त्या आपल्याशी गप्पा मारताहेत असंच वाटतं. पूर्ण सीडी ऐकायला पाच तास लागतात म्हणजे एकदा ऐकायला बसलो की आपण पाच तास जागचे हालतच नाही. अक्षरशः आपण खिळूनच बसतो. मध्ये-मध्ये कथनाच्या अनुषंगाने येतील तेवढीच दृश्यचित्रे. सीडीला सुरुवात होते ती पुरुषी आवाजातील प्रास्ताविकाने त्यानंतर त्यांनीच म्हटलेल्या 'नर्मदाष्टकाने'. नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर! म्हणत त्या सांगतात ती त्यांची कौटुंबिक माहिती व त्यांची 'प्रेरणा'. त्यांची प्रेरणा त्यांचे वैद्यमामा. वैद्यमामांनी तीनदा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसांची परिक्रमा केली. तिसरी केली तेव्हा त्यांचे वय ब्याऐंशी, तर मामीचे पंचाहत्तर. प्रत्येक वेळेला त्यांचे अनुभव ऐकून एखाद्याची परिक्रमा करण्याची इच्छा पेक्षा धाडसच झाले नसते. पण त्यांची इच्छा तीव्रच होत गेली. ही अतिशय खडतर तीनहजार किमी (धरणामुळे आता साडेतीन) परिक्रमा आहे. एकंदरीत चौदाकोटी पावलं चालावी लागतात. तिथे लागतो तुमच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस आणि हो श्रद्धेचाही! हे कोण्या येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. परिक्रमा नर्मदेचीच का? तर त्याची कथा अशी - नर्मदा व गंगा तपश्चर्येला बसतात. शिवजी बघतात. शिवजी गंगेवर प्रसन्न होतात. गंगा वर मागते, मला तुमच्यात सामावून घ्या. गंगेला शिवजींच्या जटेत स्थान मिळतं. कालांतराने नर्मदेवर प्रसन्न होतात. नर्मदा वर मागते, तुमच्या पंचायतनासकट माझ्यात सामावून जा. शिवजी शेवटचे देव म्हणून तिची परिक्रमा. अमरकंटक तिचे उगमस्थान. मोठ्यांचे आशीर्वाद व लहानांच्या शुभेच्छांसह सत्तावीस नोव्हेंबर दोनहजारला ते निघतात पुण्याहून आणि गाठतात ओंकारेश्वर, ठाम संकल्प व श्रद्धेने! परिक्रमा तीन प्रकारे करता येते. एक सर्व साधन-साम्रगीसह वाहनाने, दुसरी काही अंतर किनाऱ्याने पायी व काही वाटेने, व तिसरी पूर्ण किनाऱ्याने अनवाणी. तिसऱ्या प्रकारात बरेच कडक नियम आहेत. अनवाणी चालायचं, संग्रह नाही (वस्तूंचा अथवा माणसांचा), आसक्ती नाही आणि 'मी'पणा विसरायचा, कोणाला काही मागायचं नाही, कोणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही. ही शहरातील बाई पायी कशी काय परिक्रमा? असं बऱ्याच लोकांना वाटलं. ओंकारेश्वरातील साधू-संत, मार्गदर्शकांनी पूर्ण पायी करण्याऐवजी काही अंतर बसने व काही पायी किनाऱ्याने करावी असं सुचवलं. पण ह्या दोघांनी तिसऱ्या प्रकाराने करायचे ठरवले. पती सुधीरह्यांनी पायात गरज पडेल तेव्हा वहाणा घालायच्या तर प्रतिभाताईंनी साडी ऐवजी पांढरा सलवार-कुर्ता घालण्याच स्वातंत्र्य घेतलं. विधिवत कन्यापूजन व भोजन, सज्जन असल्याचं प्रमाणपत्र घेऊन संकल्प घेतला आणि पहिलाच अनुभव असा काही आला की त्यांची श्रद्धा आणखी दृढ झाली. त्यांनी ही परिक्रमा एक तपश्चर्या म्हणून करायचे ठरवले न काही इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरिता. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी ओंकारमांधाताची परिक्रमा करावी लागते व संपल्यावर ऋणक्तेश्वराला जावं लागतं. परिक्रमा सुरू करण्यापूर्वी ऋणमुक्तेश्वर काय आहे ते पाहण्यासाठी म्हणून जातात. वाटेत एक हॉटेल लागतं. त्या हॉटेलात 'दाल-बाफले'चा फलक असतो. हा नवीन प्रकार खाऊन बघायची इच्छा होते व त्यायोगे जवळचे पैसेही संपतील, येताना खाऊ असा विचार करून मंदिरात जातात. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना आतून आवाज येतो नर्मदे हर! भोजन प्रसादी लो मैय्या. हातावर थोडासाच प्रसाद घेऊ अन हॉटेलात 'दाल-बाफले' खाऊ असा विचार करून आत जातात. पण तिकडे प्रसाद हातावर देत नाही व जेवावं लागतं. आता दाल बाफले कधी खाणार, मनात विचार येतो. प्रसाद घेतला. पानात वाढलेला प्रकार नवीन वाटला म्हणून शेजाऱ्याला विचारलं हे काय आहे, तो म्हणाला, ' दाल बाफले! ' 'जो जे वांछील तो ते लाहो' असा हा पहिला प्रत्यय आला नंतर तर अनेक वेळा आला. कन्याभोजन व पूजन (यथाशक्ति कुमारिकांना दान देणे) बाटल्यांमध्ये जल उचलले (म्हणजेच परिक्रमा उचलणे), दोन सुपाऱ्या (गणपती) मिळतात ज्यांचं परिक्रमा पूर्ण झाल्यावर विसर्जन करायचं असतं, असे विधी केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता निघायचं. आता त्या मैय्याजी अन त्यांचे पती बाबाजी. दोघांजवळ दोन सॅक. त्यामध्ये एक कपड्याचा जोड, एक पाण्याची बाटली, एक चादर, टॉवेल, कमंडलू (कडीचा स्टीलचा डबा), पूजेचं साहित्य, एक काठी आणि दोघात मिळून एक सतरंजी. ओंकारेश्वरला त्रिपुरी पौर्णिमेला दीपदानाचा सोहळा असतो. लाखो भाविक तिथे गोळा होतात. असाच एका भाविकाचा बुटाचा पाय प्रतिभाताईंच्या अंगठ्यावर इतक्या जोरात पडतो की अंगठ्याचं नख उखडतं. अनवाणी चालायचं आहे. पहिला पाच किमीचा पडाव अतिशय कठीण. घनदाट जंगल. आजूबाजूला चिटपाखरूही नाही. वाटेत एक खडा पहाड. खाली धोधो वाहणारी मैय्या. हातपायांची बोटं खोबणीत रुतवून पहाड पार करायचा. पायाचा अंगठा कामातून गेलेला. पाय घसरला तर... वाटेत एकालाही काही झालं तरी दुसऱ्याने पूर्ण करायची. नर्मदे हर! नर्मदे हर! समोर दोन परिक्रमावासी उभे. नमस्कार चमत्कार, कोण, कुठले विचारपूस होते. चालू लागतात. मागेपुढे परिक्रमावासी मैय्याजी व बाबाजी. जिथे पुढचा परिक्रमावासी बोटं रुतवत होता त्याच खोबणीत बोटे रुतवून चालायला लागलो. कलियुगात विश्वास बसणार नाही अशी घटना. पाय कुठे टेकलाच नाही. अलगद डोंगर पार कसा झाला कळलंच नाही. जोरात गजर केला नर्मदे हर! नर्मदे हर!

रोज सकाळी सहाला चालायला लागायचं. सकाळी दोन तास आरामात चालणं व्हायचं. जवळपास घाट बघून अंघोळ व पूजाअर्चा. पोट हेच घड्याळ. भुकेची जाणीव झाली की जवळपास गाव बघून जेवणाची सोय बघायची. गाव कधी किनाऱ्याच्या जवळपास असायचे तर कधी तीन-चार किमी. वाटेत थोड्या थोड्या अंतरावर पाण्याच्या हापश्या आहेत. पन्नास टक्के जेवण आश्रमात होतं तीस टक्के भिक्षा मागून वीस टक्के लोकं बोलावतात किंवा सदावर्त. सदावर्त म्हणजे कुठल्याही घरासमोर नर्मदे हर! म्हणायचं. घरातल्यांना कळतं हे परिक्रमावासी आहे. ते विचारतात, 'कितनी मूर्ती'? मूर्ती म्हणजे कितीजण? मूर्तींच्या हिशोबाने ते जेवण आणून देतात किंवा डाळ-तांदूळ व मिठाचा खडा असा शिधा देतात. शिजवायला साधन नाही सांगितल्यावर एक पातेलं व झाकायला ताटली मिळते. त्याच ताटलीत जेवायचं अन धुऊन पुसून परत करायची. एकाने शिधा आणेपर्यंत दुसऱ्याने काटक्या गोळा करून दगडांची चूल पेटवायची अन खिचडी शिजवायची. समजा आटा न गुळाचा खडा मिळाला तर पळसाच्या दोन पानात कणिकेचा गोळा ठेवून ते पानग्या सारखं शेकायचं अन गुळाच्या खड्या बरोबर खायचं. आम्ही परिक्रमा करून आल्यावर लोक विचारायचे अलौकिक अनुभव काय? तर भुकेने जीव कळवळतो त्या वेळेला ही जी अमृततुल्य खिचडी, गूळ-रोटी मिळते किंवा तहानेने व्याकुळ झालेलो असतो त्या वेळेला पाणी मिळतं ना, ते अलौकिक असतं. "कवडीने बांध गाँठको मांगने सब जाए, पीछे पीछे हरी फिरे भक्त ना भूखा जाए". लोकं त्यांच्या घासातला घास काढून खायला देतात. रोज सरासरी पंधरा ते वीस किमी चालणं होतं. क्वचित जास्तही होतं. नगावचा पटेल खूपच अगत्यशील. तो तीन-चार दिवस जाऊच देत नाही. परिक्रमावासियांची सेवा करण्याचं पुण्य जास्तीत जास्त मिळविण्याकरिता. आपल्याला आसक्ती वाटायला नको किंवा यजामानाला विरक्ती, वैराग्य यायला नको म्हणून एका जागी जास्त दिवस थांबायचं नाही. तेलियाभट्टमला सियाराम नावाचे पंचाहत्तर-ऐंशी वर्षाचे सडसडीत साधू राहतात. त्यांना आजपर्यंत त्यांच्या खोलीतून बाहेर येताना वा जाताना कोणी बघितले नाही. त्यांना खूप कमी ऐकायला येतं. त्यांची फरशी बसवलेली स्वच्छ खोली. कोपऱ्यात एक स्टोव्ह. परिक्रमावासी आले की त्यांना चहा देणार. एका पातेलीत आधण ठेवून मुठीने अंदाजे चहा साखर टाकतात. त्या छोट्याश्या पातेलीत केलेला चहा चाळीसएक लोकांना देताना बघून आश्चर्य वाटतं. असे अगणित अनुभव. सियाराम बाबांसारखे कितीतरी सिद्धीप्राप्त साधुसंताचे दर्शन होते, सहवास लाभतो. पण सज्जन कोण, दुर्जन कोण हे ओळखायचं कसं? त्याची कथा अशी: एक व्यापारी असतो. त्याचा एक मुलगा असतो. मुलगा वडिलांना रेसरकार मागतो. वडील पक्के व्यापारी. तू प्रथमश्रेणीत उत्तीर्ण हो मी तुला कार देईन, वडील अट घालतात. मुलगा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होऊन घरी येतो. वडिलांकडे गाडीची किल्ली मागतो. वडील त्याला एक सोनेरी पाकीट देतात. मुलगा पाकीट उघडतो त्यात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं भागवत असतं. वडील रोज एक पान भागवत वाचायचे. मुलगा चिडतो. मला किल्ली हवीय, भागवत नको, तुम्ही माझ्याशी खोटेपणाने वागले म्हणत रागाने पाकीट भिरकावून देतो. स्वबळावर कार घेण्याची प्रतिज्ञा करत घराबाहेर पडतो. कार घेतल्यावर घरी फोन करतो. फोन नोकर उचलतो. मुलगा म्हणतो 'वडिलांना फोन दे'. 'तू कोण? तुझे वडील तर गेले', नोकर उत्तर देतो. मुलगा घरी येतो. नोकराला विचारतो, माझ्यासाठी वडिलांनी काय ठेवलंय? नोकर सांगतो तू जे पाकीट फेकून दिलंस, तेवढंच आहे. मुलगा पाकीट उघडतो. त्यात तीच भागवताची प्रत. पहिलं पान उघडतो, त्यात कारची किल्ली! होश आणि जोश दोन्हीमध्ये राहता आलं तर पाकिटाच्या आतली किल्ली आपोआप गवसते. असे अनेक कथा-किस्से! अनेक अद्भुत घटना! नर्मदे हर! नर्मदे हर!

निष्ठेने व श्रद्धेने केलेल्या संकल्पात काय ताकद असते त्याची कथाही अशीच बोधप्रद. संकल्प असा करावा जेणेकरून दुसऱ्याला दु:ख नको. आम्ही घरी संपर्क न करून घरच्यांना दु:खी करत होतो. आणि म्हणून तो मोडला गेल्याचं दु:ख झालं नाही. संकल्प पुर्तिचा आनंद तर आहेच आहे. झाडीतून म्हणजेच भिल्लांच्या जंगलातून आता जायचे होते. जवळ मागच्या गावातून मिळालेला शिधा आहे. एका शाळेत टेकत नाही तो आवाज आला. नर्मदे हर! पासमें घर है वहाँ आसन लगाओ. घरी मुलगी होती आईवडील बाजाराला गावात गेले होते. आसन लावले तेवढ्यात आई आली. भोजन प्रसादी बना देते है म्हणत सैंपाक बनवायला लागली. शिध्याच ओझं नको आणि उद्या नाहीतरी झाडीतून जातांना लुटल्याच जाणार आहे तर ते तू वापर असे म्हणताच ती हसली. मामाजी यायचेच होते. आम्ही जेवलो अन घरात झोपी गेलो. पहाटे उठलो तर बाहेर शेकोटी पेटवून गब्बरसिंगसदृश्य मामाजी बसलेला. आम्ही परिक्रमावासी असून घरात झोपलो होतो अन मामाजी एवढ्या थंडीत बाहेर झोपले होते. कोणी भेटलं की कोन गांवके? अन कोन जातके? हे दोन प्रश्न अगदी ठरलेले. तो ह्या झाडीतल्या भिल्लांचा टोळीप्रमुख. ती बाई का हसली ते कळलं. झाडीत अजूनही धनुष्यबाण चालतात. ते विषारी धनुष्यबाण बनवायचा ह्याचा व्यवसाय. खूप वर्ष हा व्यवसाय केला, खूप लोकांना लुटलं. लोकांना लुटून घेण्यात काय मजा येते, हे पाहण्यासाठी म्हणून त्याने तीनवर्षे तीन महिने तीन दिवसांची परिक्रमा केली वेष न बदलता, नियमपूर्वक. खूप त्रास झाला. आता तो वाल्याचा वाल्मीकी झालाय अन परिक्रमावासियांची सेवा करतो. पुढे रेवाकुटीला दिगंबरदासांचा आश्रम आहे. इथे ठरतं कुठल्या मार्गाने जायचं. झाडीतून की सरळ रस्त्याने. असं म्हटलं जातं की नर्मदेच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. अमरकंटकला तिचं डोकं आहे. समुद्राजवळ तिचे पाय आहेत, झाडीत तिचं हृदय आहे. कोणाच्या हृदयात शिरणं कठीण. संपूर्ण वीस दिवस दाट जंगलझाडीतून पहाडावरून चालायचं आहे. दिगंबरदासांनी कुठल्यातरी गटाबरोबर जाण्याचं सुचवलं. दोन दिवस थांबूनही त्यांना बरोबर घेऊन जायला कोणीही तयार नाही कारण कुठल्याही स्त्रीची विटंबना होताना बघणं शक्य नाही अन तिथे कोणी काही करूच शकत नाही. बाबाजींना मात्र घेऊन जायला तयार. तुमच्या कर्माच्या फळांचा हिशोब इथे कळतो. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला चांगले वाईट अनुभव येतात. बाभळीचे काटे बोचतात ना तेव्हा कळतं कितीजणांना टोचून बोललोय ते. वाटेत बोरखेडी गाव लागतं. तिथे रावतमामाकडे उतरायची सोय होते. भिल्लांच्या मुखियाला 'मामा' म्हणायचं. तो असतो खबऱ्या. उद्या काय होणार आहे, हे त्याला माहीत असतं. त्याला काय वाटले माहीत नाही तो ढसढसा रडून विनंती करतो की इथून जाऊ नका. निर्धार पक्का आहे. कर्माची फळं इथे नाहीतर अजून कुठे तरी प्रारब्धानुसार भोगावीच लागणार आहेत तर इथेच भोगू विचार करत पाच-सहा डोंगर पार केले. आता लुटण्याची ठिकाण येतं. समोर प्रत्यक्ष 'शोले' सिनेमाचा सेट. चारी बाजूला डोंगर. डोंगरावर सशस्त्र भिल्ल दरोडेखोर. खाली मैया. सामान खाली ठेवलं. लुटा, काय लुटायचं ते 'दीनबंधू दीनानाथ मेरी लाज तेरे हाथ' मनातल्या मनात भजन गायल्या जातं. बाबाजी खाली मान घालून उभे. वाट बघत बसलो. आत्ता खाली उतरतील मग खाली उतरतील. काही हालचाल नाही. सगळे थिजल्यागत! शेवटी विचारलं, लुटायचं नाही का? आश्चर्य म्हणजे नही मैया, आगे बढो, उस पहाडसे निकल जाव. विश्वासच बसत नाही. अश्या अनेक विश्वासच बसत नाही टाईप कितीतरी घटना! एक पैसा जवळ न ठेवता निघालेलो खर्च मात्र केले चौदा-पंधरा हजार. चातुर्मासात परिक्रमा करायची नसते म्हणून जिथे थांबलो तिथे एका खोलीत भांड्या-कुंड्यांसहित संसार थाटल्या गेला. न मागता मिळतंच जातं, मिळतंच जातं. मैया किती देशील दोन्ही करांनी. नर्मदे हर! नर्मदे हर!

ऋणमुक्तेश्वरला आलो. विधिवत परिक्रमेची सांगता केली. कुटुंबासह कन्याभोजन पूजन केले. पुण्याला सकाळी दहाला परतलो. खूप लाड कौतुक झाले. खूप गप्पा-टप्पा झाल्या. संध्याकाळ केव्हा झाली कळलंच नाही. लक्षात आलं एक सॅक गायब. सामान आवरायला घेतले. सामान फार काही नव्हतेच. त्याच दोन सॅक. त्यात मिळालेले काही दगड, शाल, कोणी भेट म्हणून दिलेलं मोती, पोळ, शिवलिंग, डोंगरे महाराजांच एक पुस्तक आणि बाबांच्या . त्या दोन सॅक पैकी बाबांची सॅक दिसत नव्हती. त्यात बाबांनी लिहिलेल्या डायऱ्या होत्या. डायऱ्या गेल्या म्हणजे दीड वर्षात गमवलेलं सगळं गेलं असं बाबांना वाटतं होते. खूप शोधाशोध, फोनाफोनी केली. सात-आठ तासानंतर सॅक स्थानकावर मिळण्याची शक्यता नव्हती तरी पण प्रयत्न करून बघू विचार करत मधला मुलगा रेल्वे स्थानकावर गेला. शोधाशोध करू लागला. उकिरड्यावरल्या एका म्हातारीने विचारले काय शोधतोय? हीच बॅग ना? ती सॅक तिच्याजवळ कशी आली सांगत तिने सॅक दिली. मुलगा आनंदाने ओरडतच आला मी काय आणले बघा! ती म्हातारी कोण होती मला माहीतच होते पण मुलालाही कळले.

नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा रविवारी सौ. प्रतिभा चितळेंना त्यांच्या घरी जाउन भेटलो. अतिशय उत्साही आणि मनमोकळ्या स्वभावाच्या सौ. चितळेंनी आमचं तोंडभरुन स्वागत केलं. आमच्या आधीच तिथे अजुन ४ लोक आले होते. एकीकडे सर्वांसाठी चहा ठेवत त्या आम्हाला उत्साहाने माहिती देत होत्या. गप्पांमधे दीड तास कसा गेला समजलच नाही. त्या म्हणाल्या.. हे रोज सुरु आहे. त्यांची ड्युटी रोज सकाळी ८ ते २ त्यांच्या मुलाकडे (समोरच्या बिल्डींगमधे त्यांचा मुलगा रहातो) नातवाला सांभाळायला असते. दुपारी २ नंतर इकडे आल्यावर दररोज सुमारे ४ च्या सुमारास लोक येतात. कधी कधी रात्री ११ पर्यंत गप्पा होतात. आम्ही गेलो तेव्हा त्या नुकत्याच २-३ दिवसांपुर्वी नर्मदातीरावरुन आल्या होत्या. आता चातुर्मासाचे ४ महिने इथे रहातील. दरवर्षी ८ महिने नर्मदातीरावर कुटी बांधुन परिक्रमावासियांची सेवा करतात.
निघण्याआधी आधी तिथे जावुन परिक्रमावासियांना विचारुन जिथे त्यांची गरज असेल (म्हणजे वाटेत जिथे त्यांना सदावर्त मिळत नाही) अशा ठिकाणी जागा निश्चित करतात. आणि मग कारने ८ महिन्याचा शिधा तिथे नेतात. गावाबाहेर/ जंगलात साधारणतः पाणी/ नदी जवळ असेल अशा ठिकाणी कुटी बांधतात. कुटी शाकारणे, जमिन सारवणे, चुलीवर स्वयंपाक, विहीर असेल तर पाणी शेंदुन आणणे अशी कामं स्वतः करतात. श्री.चितळे ही त्यांना मदत करतात. लाईटाची सोय नाही.
त्या म्हणाल्या, की आमच्याकडे कुणीही आलं तर आम्ही अगदी जेवण, नाष्टा सगळी सोय करु शकतो. मच्छरदाणी, ब्लँकेट ही मिळतील.

दरवर्षी ८ महिने नर्मदातीरावर कुटी बांधुन परिक्रमावासियांची सेवा करतात. >>>> खरोखरच धन्य आहे या चितळे दांपत्याची ...

कोणी भेटलं की कोन गांवके? अन कोन जातके? हे दोन प्रश्न अगदी ठरलेले. >>>
हे लोक जात बघून परीक्रमावासियांना मदत करतात का ?

दोन दिवस थांबूनही त्यांना बरोबर घेऊन जायला कोणीही तयार नाही कारण कुठल्याही स्त्रीची विटंबना होताना बघणं शक्य नाही अन तिथे कोणी काही करूच शकत नाही. >>>
ह्याचा नक्की अर्थ काय ? कळलं नाही मला .

नर्मदे हर! छान अनुभव. आमच्या ओळखीतील एका दांपत्याने काही वर्षांपूर्वी परिक्रमा केली होती. त्यांनीही असेच भरभरून केलेलं वर्णन अजूनही आठवणीत आहे. भविष्यात संधी मिळाली तर नक्की आवडेल जायला मला. पुण्याच्या सुहास लिमये यांचं परिक्रमेवरील पुस्तकही रोमांचकारी आहे वाचायला .

प्रतिभा चितळे यांचे अनुभव खूप अलौकिक आहेत. सर्वांनी एकदा तरी नक्कीच ऐकण्यासारखे आहेत. १७-१८ विडिओ आहेत...मी आत्तापर्यंत ५-६ वेळा तरी ऐकले असतील...तरीही पुन्हा ऐकतो तेंव्हा नवीन काहीतरी कळते.

मंजूताई खूपच छान लेख, मी चितळे यांचे तूनळीवरील अनुभव ऐकले आहेत. अगदी भारावून जातो आपण.
आयुष्यात एकदातरी हि नर्मदा परिक्रमा करण्याचा मानस आहे. बघुयात कास जमतंय.
जगन्नाथ कुंट्यांच "नर्मदे हर " अजूनही वाचायला मुहूर्त लागत नाही.

काल रात्री सलग १८ भाग ऐकले. काय अफाट आहेत.मंजूताई इतक्या सुंदर व्हिडिओजची, इथे ओळख करुन दिल्याबद्दल खूप खूप आभार.

सामो,धन्यवाद! मी पण ती सीडी अध्याश्यासारखी नॉनस्टॉप ऐकली होती. तडक उठावं व परिक्रमा करावी, वाटत होतं..

चितळे ताईंचा व्हिडीओ पाहून मराठी माणसं झुंडीच्या झुंडीने परिक्रमेला जात आहेत. नर्मदा काठावरील मध्य प्रदेशातील गरीब जनतेवर भार टाकत आहेत. फुकट रहाय जेवायला मिळते, दक्षिणा मिळते म्हणून म्हातारे कोतारे, हौसे नवसे परिक्रमेत सामील होतात. परतफेड शून्य.
चितळे ताईंसारखे परतफेड करणारे फार थोडे लोक आहेत.
चितळे ताईंच्या व्हिडीओमध्ये अतिरंजित गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्यक्षात स्वच्छताप्रिय माणसाला किळसवाणे वाटू शकेल. तिकडं जो पण गेला की लगेच पुस्तक लिहिणार, फेसबुक वर प्रवास वर्णन टाकणारच. आलेला अनुभव मनात ठेवणार नाहीच. आणि हो अश्वत्थामा प्रत्येकाला भेटणारच.
मी इतकी मुर्ख माणसं परिक्रमेत पाहिलीत कि मनाई केलेल्या ठिकाणांचे फोटो काढणार. कन्यापुजनाचे व्हिडिओ बनवणार. झोपण्याच्या जागेवरून भांडणं करणार.

>>>> चितळे ताईंच्या व्हिडीओमध्ये अतिरंजित गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्यक्षात स्वच्छताप्रिय माणसाला किळसवाणे वाटू शकेल.>>> +१०१
मला फक्त त्यातील सार आवडले. त्यांनी इन्टर्नलाइझ केलेला अनुभव महत्वचा वाटला. बाकी परिक्रमा करावीशी अजिबात वाटली नाही.
________________
कन्यापूजनाच्याही मी विरोधात आहे. स्त्रीला माणूस माना. देवत्व नका बहाल करु.

कन्यापूजनाच्याही मी विरोधात आहे. स्त्रीला माणूस माना. देवत्व नका बहाल करु ---> कन्यापूजन हा एक नर्मदा परिक्रमेचा विधी आहे. त्यात कन्येला देवी मानून पूजा केली जाते आणि गरीब कन्यांना जेवण आणि कपडे दिले जातात. पूजा आणि नमस्कार हा कान्यरूपातील देवीला असतो. ज्या देशात अजूनही स्त्री भ्रूण हत्या होतात तिथे अश्या प्रथांची गरज आहे. निदान यामुळे का होईना लोकांमध्ये योग्य संदेश जाईल.

आपल्या मताचा आदर आहे कोहंसोहं परंतु तरीही माझा अशा पूजेला विरोधच आहे. एकदम देवत्व तरी नाहीतर अत्याचार तरी. स्त्री ही माणुस आहे हे कधी शिकणार? तिच्या मर्यादा आहेत, तिच्यातही दोष असणारेत. तिलाही स्खलनाचा/पतित होण्याचा हक्क आहे. हाडामासाची, अस्थिमज्जेची माणुस आहे.

चितळे ताईंच्या व्हिडीओमध्ये अतिरंजित गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्यक्षात स्वच्छताप्रिय माणसाला किळसवाणे वाटू शकेल ---->
माझ्या मते त्यांनी आलेला अनुभव शब्दबद्ध केला आहे. मलातरी ते अनुभव खरे वाटतात. त्यात अतिरंजित असे काहीही नाही. शेवटी प्रत्येकाला येणार अनुभव वेगळा. तो त्याच्या मनातील भाव, इच्छाशक्ती, पूर्वकर्म, श्रद्धा, उपासना, अश्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. सौ चितळे यांनी सांगितले आहेच की कसे काही अनुभव हे फक्त त्यांनाच आले आणि त्यांच्या मिस्टरांना नाही, जरी ते दोघे एकत्र परिक्रमा करत असले तरी.

नर्मदा काठावरील मध्य प्रदेशातील गरीब जनतेवर भार टाकत आहेत. फुकट रहाय जेवायला मिळते, दक्षिणा मिळते म्हणून म्हातारे कोतारे, हौसे नवसे परिक्रमेत सामील होतात.>>>>>>>>>> मला नाही वाटत का तेथील गरीब जनतेवर भार आहे. तेथील जनता गरीब आहे परंतु त्यांची नर्मदा मातेवर श्रद्धा आहे व तेदेखील हे सर्व सेवा म्हणूनच करत असतात. नर्मदा परिक्रमा काही सोपी गोष्ट नाही. जो कोणीही परिक्रमा करावयास तयार होतो त्या जवळजवळ सर्वांना हे माहित असते की परिक्रमा खडतर आहे. केवळ फुकट रहायला जेवायला मिळते, दक्षिणा मिळते म्हणून कोणी परिक्रमा करणार नाही. प्रत्येकवेळी राहायला उत्तम घर आणि जेवायला चांगले अन्न मिळेलच असे नाही आणि त्यासाठी सुद्धा दररोज २५-३० किमी ची पायपीट करायला कोणीही सहजासहजी तयार होणार नाहीत. परिक्रमेचा नियमच असा आहे की सुरु केली की संपवावी लागते...अगदी काहीही झाले तरी. जर मध्येच सोडली तर योग्य नाही. हे सर्व जाऊन न घेता कोणी परिक्रमेला सुरुवात करत असेल तर मात्र चुकीचे आहे. परंतु सहसा अश्यांची संख्या फार कमी असते आणि असली तरी काही दिवसातच ते परिक्रमा सोडून जात असल्याने अश्या लोकांचा फारसा भार कोणावर पडत नाही असे मला वाटते.

>>>> मलातरी ते अनुभव खरे वाटतात.>>>> मला त्यांचे तत्वज्ञान फार आवडले परंतु अ‍ॅक्च्युअल अनुभव हे नंतर मुलामा चढविल्यासारखे व ग्लॅमराइझ केल्यासारखे वाटले. ते मुद्दाम केले आहेत असे म्हणायचे नाही पण मागे वळून पहाताना आपल्याला कसे बालपण किंवा गतायुष्य नेहमी सुंदर व आदर्शवतच वाटते कारण तेव्हाच्या हार्ड्शिप्स, कष्ट आपण विसरलेलो असतो तरी किंवा त्याकडे डोळेझाक तरी करतो. तसे काहीसे हे अनुभव मला वाटले.

सारखे व ग्लॅमराइझ केल्यासारखे वाटले. ते मुद्दाम केले आहेत असे म्हणायचे नाही पण मागे वळून पहाताना आपल्याला कसे बालपण किंवा गतायुष्य नेहमी सुंदर व आदर्शवतच वाटते कारण तेव्हाच्या हार्ड्शिप्स, कष्ट आपण विसरलेलो असतो तरी किंवा त्याकडे डोळेझाक तरी करतो. तसे काहीसे हे अनुभव मला वाटले.
नवीन Submitted by सामो on 3 January, 2020 - 11:08
>>> परफेक्ट अॅनालिसिस. मला हेच शब्दात मांडता येत नव्हतं. धन्यवाद सामो जी.

परंतु अ‍ॅक्च्युअल अनुभव हे नंतर मुलामा चढविल्यासारखे व ग्लॅमराइझ केल्यासारखे वाटले--->>> नाही समजले. थोडा खुलासा करून किंवा एखादे उदाहरण देऊन सांगाल का की ग्लॅमरईज्ड केले म्हणजे काय ते?

>>>>> एखादे उदाहरण देऊन सांगाल का की ग्लॅमरईज्ड केले म्हणजे काय ते?>>>>>
दोनदा आंघोळ करायची सकाळ व संध्याकाळ प्रत्येक संगमावर तर स्नान व्हायचेच हे सांगा जरुर पण त्याबरोबर प्रातर्विधीकरता अडचणी असतील तर त्याही ओझरत्या सांगाच की.
____________________
अजुन एक प्रत्येक अगदी प्रत्येक इच्छेनंतर तत्काळ इच्छापूर्ती होणे हे कितीदा व्हावे - १-२-३ त्याला सुमारच नाही - येह बातभी कुछ हजम नही हुइ!

दोनदा आंघोळ करायची सकाळ व संध्याकाळ प्रत्येक संगमावर तर स्नान व्हायचेच हे सांगा जरुर पण त्याबरोबर प्रातर्विधीकरता अडचणी असतील तर त्याही ओझरत्या सांगाच की. ----> प्रातर्विधी बद्दल काही बोलल्या नाहीत हेखरे. कदाचित आलेल्या अनुभवापुढे हा प्रश्न त्यांना गौण वाटला असावा. बाकी २ वेळा स्नान मात्र परिक्रमेचा नियम आहे आणि संगमावर स्नान करणे पुण्यकारक मानले जाते म्हणून कदाचीत त्याचा उल्लेख जास्त वेळा केला असेल.

अजुन एक प्रत्येक अगदी प्रत्येक इच्छेनंतर तत्काळ इच्छापूर्ती होणे हे कितीदा व्हावे - १-२-३ त्याला सुमारच नाही - येह बातभी कुछ हजम नही हुइ! ----> Happy कठीण परिस्थितीचा विचार करता खासकरून त्या परिस्थितीत जेंव्हा इच्छा पूर्ती होणे अवघड आहे असे वाटत असते (आणि rationally पाहता ते खरे पण असू शकते) अश्या वेळी जेंव्हा इच्छा पूर्ण होते तेंव्हा तो आनंद वेगळाच असतो. बाकी विश्वास ठेवावा की नाही हे वैयक्तिक.
यावरून परमहंस योगानंदांच्या योगी कथामृतची आठवण झाली. त्यातही बऱ्याच प्रकरणात त्यांनी अनुभवलेल्या निरनिराळ्या चमत्काराचे वर्णन आहे. पॉल ब्रॅंटन यांच्या पुस्तकातपण त्यांनी स्वतः अनुभवलेल्या योग्यांच्या चमत्काराचे वर्णन आहे. सध्या एक पुस्तक वाचतोय भक्तयोग्याची आनंदसाधना. त्यात गुरुदेव रानडे यांच्या गुरु शिष्य परंपरेतील एका साधकाचा (रामकृष्ण महाराज) साधारण मध्यमवर्गीय मनुष्य (बँकेतील अधिकारी) ते साक्षात्कारी योगी अश्या प्रवासाचे, साधनेचे वर्णन आहे. त्यात हिमालय यात्रेमध्ये त्यांना आलेले अनुभव आणि गरज असताना त्यांच्या गुरुदेवांनी केलेली मदत (त्यावेळी त्यांचे गुरु देहात नव्हते) ज्यामध्ये अगदी जेवण, राहण्याच्या प्रबंधापासून ते कठीण परिस्थितीत जीव वाचवण्यापर्यंत अशी बरीच वर्णने आहेत ज्यावर सामान्यपणे विश्वास बसणे कठीण वाटते. पण या व अश्या अनेक योग्यांची साधना, तप, पाहता त्यांचे अनुभव खोटे आहेत हे म्हणायलाही मन तयार होत नाही.

आपले म्हणणे बरोबर आहे कोहंसोहं. कदाचित मीच जास्त स्केप्टीकल किंवा अश्रद्ध मनाने विचार करते आहे. परंतु आपण व्यवस्थित समजुन उमजून चर्चा केल्याने बरे वाटले. थोडा सकारात्मक विचार करुन पाहीन. मला त्यांचे अनुभवकथन आवडले आहेच नो डाउट. फक्त टु गुड टू बी ट्रु असे मधेच वाटते.

सामो आपण जे वाटले ते प्रामाणिकपणे लिहिले यातच सर्व काही आले. गेल्या काही वर्षात माझ्या वाचनात आलेल्या अध्यात्मिक पुस्तकात खास करून चरित्रात असंख्य चमत्कार वाचले आहेत. तेही अगदी गेल्या ५०-१०० वर्षात झालेले तेही फक्त सिद्ध पुरुषांचेच नाही तर त्यांच्या भक्तांना, शिष्यांना पण आलेले. त्यामुळे असेल कदाचित, माझा विश्वास चमत्कारांवर लवकर बसतो, खास करून सांगणारी व्यक्ती अधिकारी वाटली तर.
गेल्या ५०-६० वर्षांचेच उदाहरण द्यायचे झाले तर नीम करोली बाबा यांचे देता देईल. त्यांच्या चमत्कारांवर त्यांचे एक परदेशातील शिष्य रामदास यांनी पुस्तक लिहिले आहे जे बरेच फेमस पण आहे. काही महिन्यांपूर्वी मी काहीशी पाने वाचली होती. १-२ दिवसांपूर्वीच रामदास यांचे निधन झाले. नीम करोली बाबा स्टिव्ह जॉब्स आणि मार्क झकरबर्ग यांच्यामुळे जास्त प्रकाशझोतात आले. हयात असताना देखील त्यांना राजकारणातील मोठे अधिकारी जसे की राजेंद्रप्रसाद, इंदिरा गांधी वगैरे भेटायला आलेल्या असे ऐकले आहे. त्यांना मारुतीचा अवतार मानले जाते. यु ट्यूब वर एक चॅनेल आहे दस्तक मीडिया म्हणून. त्यात त्यांचे एक भक्त रोज नीम करोली बाबांनीं केलेल्या चमत्कारांची कथा सांगतात. सध्या या कथा १२५ होऊन अधिक झाल्या आहेत. अर्थात त्या आधी पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्याच आहेत. काही विडिओ तर मुलाखतीचे आहेत ज्यांनी हे चमत्कार स्वतः पाहिलेत जेंव्हा बाबा देहात होते. काही भक्तांचे अलीकडच्या काळात आलेल्या अनुभवाचे विडिओ पण आहेत.

Pages