तळवलकर - श्री. मुकेश माचकर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

लहानपणी पेपर वाचायला मिळायचा गल्लीतल्या सार्वजनिक वाचनालयात. ते घराच्या सरळ रेषेत रस्त्यापलीकडेच होतं. त्याच्या आठ कप्प्यांमध्ये पेपर लागले की, लगेच धावत रस्ता पार करून त्यांच्यावर झडप घालायचो. पण, त्या काही सेकंदांमध्येही तिथे ठिय्या मारूनच बसलेले अधीर आणि ज्येष्ठ पेपरवाचक मिळेल त्या पेपरवर कब्जा करायचे. त्या मारामारीतही आरामात हाताला लागायचा तो महाराष्ट्र टाइम्स अर्थात मटा. प्रभातमधल्या सिनेमाच्या उत्तान जाहिराती, भविष्य, केसरीचे अग्रलेख, सकाळच्या इत्थंभूत बातम्या, बाजारभाव, लोकसत्तेतल्या मुंबईच्या बातम्या, पुढारी, ऐक्य वगैरेंचे प्रादेशिक संदर्भ यांना त्या गरीब-निम्न मध्यमवर्गीय वस्तीत जास्त भाव होता. या वाचकांना उच्चभ्रू ‘मटा’ फारसा अपील व्हायचा नाही. जरा जडच पडायचा. म्हणून तो मला सहज मिळायचा. मी वाचून काढायचो. नंतर त्याची गोडीच लागली.

मग लक्षात आलं की इथे हा पेपर हातात घेणारे मोजकेच लोक जरा खास आहेत… त्यांची मतं, त्यांची वैचारिक घडण, त्यांची जगदुनियेची समज अन्य मंडळींपेक्षा वेगळी आहे… आणि ती घडण्यात ‘मटा’चा मोठा वाटा आहे… आपलीही समज आणि दृष्टी घडवण्यात या वर्तमानपत्राचा हातभार लागू लागलाय, हे लक्षात यायला लागलं…

गोविंदराव तळवलकरांशी ही पहिली अप्रत्यक्ष ओळख…

****

पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेईपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं… त्यातून ‘मटा’प्रेम मात्र तुकारामाच्या गाथेसारखं तगून राहिलं होतं, उलट, बहरून आलं होतं… ‘मटा’ हा एक पंथ बनला होता आणि माझ्यासारखे वाचक त्या पंथाचे कट्टर अनुयायी बनले होते. गोविंदरावांच्या लेखणीच्या फटकाऱ्यांपुढे महाराष्ट्राचे सत्ताधारी चळचळा कापतात, असं आम्हा वाचकांना वाटायचं. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाच्या शैलीचा एक आविष्कार तळवलकरांच्या लिखाणात होता. ते शेलके शब्द अचूक वापरायचे. जुने चपखल शब्द आणि शोधून काढायचे. रमणा, सहस्त्रभोजन अशी चंगळ असलेल्या अग्रलेखाच्या शीर्षकावरच आम्ही फिदा असायचो. ही शीर्षकं नंतर काही काळ भाषाव्यवहारात चलनी नाण्यांसारखी वापरली जायची. काही शब्द तर तळवलकरांमुळे विशिष्ट संदर्भांनी नंतर बरीच वर्षं वापरले गेले असतील. जन्मजात पुणेकर असल्यामुळे त्यांच्या लेखणीतून प्रकट होणारा तुच्छतावाद समजणं कठीण गेलं नाही. त्याच्याशी आंतरिक नाळही जुळायची. तुच्छता आणि आढ्यता म्हणजेच तळवलकरांची परंपरा असल्याचा, त्या काळात तरुण असलेल्या आणि नंतर पत्रकार बनलेल्या अनेकांचा गैरसमज झाला, त्यात काही आश्चर्य नव्हतं. महाराष्ट्रातले सगळ्या क्षेत्रांमधले झाडून सगळे मान्यवर मटामध्ये लिहीत होते. त्यामुळे नंतर नंतर मटामध्ये ज्याला स्थान नाही, त्याला जगात काहीच किंमत नाही, अशी भावना होऊ लागली. अभिजात काय, उच्च अभिरुचीचं काय, सामाजिक बाबतीत करेक्ट भूमिका काय, विद्वत्ता कशाला म्हणायचं इथपासून ते उत्तम नाटक कोणतं, बघणेबल सिनेमा कोणता इथपर्यंत (श्रेय कमलाकर नाडकर्णींचं) आणि कालच्या टेस्टमध्ये सुनीलकडून (गावसकर हो) नेमकी काय चूक झाली ते विविकंकडूनच (वि. वि. करमरकर) समजून घ्यायचं असतं, अशी शिस्त लागली. ‘मटा’च्या संवेदनपरिघापलीकडे बरंच काही आहे, याची जाणीव झाली, तेव्हा ‘मटा’चा मठ उद्ध्वस्त होऊन तिथे माहितीमॉल उभा राहिला होता आणि त्यातल्या काही चकचकीत विटा लावण्याचं ‘भाग्य’ही लाभलं आमच्यातल्या काहीजणांना. पण, ते एक असो.

तळवलकरांनी वाचस्पती बनून अनेक पुस्तकांचा परिचय करून दिला. ती सगळी वाचणं शक्य नव्हतंच; पण, त्यांचं सार काय आहे, हे कळू लागलं, लेखकांची नावं समजू लागली. मित्रपरिवारात चर्चेत संदर्भ देता येऊ लागले. समोरचा माणूसही मूळ पुस्तक न वाचता आपल्याप्रमाणेच तळवलकरांचा कॉलम वाचूनच संदर्भ देतोय, हे समजू लागलं. काखेत दोन पुस्तकं घेऊन फिरणाऱ्या आणि तीन-चार विदेशी लेखकांची नावं बोलण्यात सुयोग्य रीतीने गोवणाऱ्या माणसांविषयी आदर वाटण्याचा तो काळ होता. ती पुस्तकं त्याने वाचलेली असण्याची गरज नव्हती. वाचस्पती लयाला गेल्यानंतरही ही परंपरा कायम राहिली, हे विशेष.

****

रानडे इन्स्टिट्यूटमधल्या आमच्या-आमच्यातल्या ‘चहा-बिडी’ चर्चांमध्ये गोविंद तळवलकर विरुद्ध माधव गडकरी या संपादकांमध्ये आम्हीच काल्पनिक लढाई जुंपून द्यायचो. संपादक लोकाभिमुख असावा की हस्तिदंती मनोऱ्यातला असावा, याभोवती सहसा ती भिरभिरत असे. आम्ही आयव्हरी टॉवरवाल्या गोविंदरावांचे शिपाई आणि अनुयायी होतो. अभिजीत ताम्हणे तर जहाल‘मटा’वादी होता. अनेक वर्षांचे मटाचे अंक त्याने जपून ठेवले होते, त्यातले अनेक संदर्भ त्याला तोंडपाठ असायचे. तळवलकर आणि माधव गडकरी यांच्या एकाच विषयांवरच्या अग्रलेखांचा तौलनिक अभ्यास असा काहीतरी विषय त्याने त्याच्या डेझर्टेशनसाठी घेतला होता… त्याचा निष्कर्ष अभ्यासाआधीच निघालेला असणार हे आम्हाला माहिती होतं; तो निष्कर्ष काय असणार, हेही आम्हाला माहिती होतं आणि त्याच्याप्रमाणे तौलनिक अभ्यास न करताही आमचा निष्कर्ष तोच होता… गोविंदराव हे माधवरावांपेक्षा भारी आहेत… विषय संपला!

अभिजीतला रानडेचा ‘मटा’धीश असं नाव उगाच नव्हतं मिळालं.

****

रानडे इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत ताम्हणेने सहा महिन्यांतच मटात प्रवेश मिळवला आणि त्याने प्रवेशपरीक्षेची खबर दिल्यानंतर ती देऊन वर्षभरात मीही केसरी सोडून मटामध्ये दाखल झालो.

पत्रकारितेतल्या संपादक-सिंहाच्या गुहेत प्रवेश झाला. चंद्रशेखर कुलकर्णी, प्रवीण टोकेकर, समीर मणियार, श्रीकांत पाटील, प्रभाकर नारकर, रोहित चंदावरकर, सारंग दर्शने, संजय ढवळीकर, रोहित चंदावरकर, आशा मटाले, मृण्मयी रानडे, दिलीप आठवले, राजेंद्र फडके, इब्राहीम अफगाण… आम्हा सगळ्यांना मटाबद्दल प्रेम होतं, आदर होता, गोविंदरावांबद्दल तर नितांत आदर होता. पण, त्यांची भीती किंवा दरारा वाटत नव्हता. आमच्या आधीच्या पिढीपर्यंतच्या त्यांच्या दराऱ्याला आणि शिस्तीच्या परीटघडीला आमच्या हसण्याखिदळण्याने आणि हिरीरीच्या वादविवादांनी तडे जाऊ लागले होते. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर जुन्या सहकाऱ्यांइतकी तळवलकरांनी कधी त्याबद्दल खळखळ केली नाही.

आधीचे तळवलकर असते तर तुमची काही खैर नव्हती. तुम्ही त्यांचं फारच मवाळ रूप पाहताहात, असं सगळे वरिष्ठ आलटून पालटून सांगत असत.

तरीही, तळवलकरांशी आमच्यापैकी बहुतेकांचं वन टु वन नातं काही जुळलं नाही. तो त्यांचा स्वभाव नव्हता. मितभाषी हा शब्दही मोठा वाटावा, इतकं कमी बोलण्याकडे त्यांचा कल होता… निदान आमच्यात तरी. त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करण्याची संधीच मिळणं कठीण होतं. संपादकीय बैठका किंवा अन्य कारणांनी त्या थंडगार गुहेत अवचित प्रवेश करायला मिळालेला उपसंपादक किंवा कनिष्ठ वार्ताहर नंतर दोन-पाच दिवस ती रोमांचकारक घटना सगळ्यांना सांगत फिरे. कदाचित तारेने घरीही कळवत असेल. मटामध्ये बातमी छापून आली असती, तरी आश्चर्य वाटू नये, इतकी ती दुर्मीळ घटना होती.

तळवलकर मुळात ऑफिसातल्या अनेकांना ओळखतच नसत. बोलणं तर दूरच. एकदा म्हणे त्यांनी वृत्तसंपादक शिवाजी सावंतांना असं सांगितलं की, त्यांच्या केबिनसमोरच्या पेपरच्या रॅकसमोर एक उंच मुलगा रोज येऊन पेपर वाचत असतो. त्याला हटका. शिवाजीराव म्हणाले, ‘अहो, तो रोहित चंदावरकर आहे, भास्कररावांचा मुलगा. आपल्याकडे उपसंपादक आहे तो.’

तळवलकरांच्या केबिनमध्ये जाण्याच्या वरची पायरी म्हणजे तळवलकरांनी दोन शब्द आपल्याशी बोलणं. ते ‘हं’ आणि ‘हँ’ याच्यापलीकडे गरज नसल्यास फारसं बोलायचे नाहीत. जे बोलायचे, ते पुटपुटल्यासारखं. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा सराव नसलेल्यांना ते समजायचं नाही. शिवाय शब्दांचा व्यय त्यांना अजिबात चालायचा नाही.

रोज रात्री विशिष्ट वेळेला ते घरून डेस्कवर फोन करत. त्या वेळच्या चीफसबकडून बातम्या काय आहेत, पानात काय चाललंय, पहिलं पान काय करणार वगैरे माहिती घेत. एकदा चीफसब पान लावायला आत गेले होते. फोन मी घेतला. ते म्हणाले, ‘तळवलकर’. मी म्हणालो, ‘ते आता नसतात. ते पाच वाजताच घरी जातात.’ ते म्हणाले, ‘मी तळवलकर बोलतोय…’ मग मला पळता भुई थोडी झाली!

एकदा मुंबई महानगरपालिकेत आलेल्या एका ब्रिटिश तज्ज्ञाच्या व्याख्यानाच्या रिपोर्टिंगला मला पाठवलं गेलं. त्यांना त्या तज्ज्ञाविषयी माहिती आणि जिव्हाळा होता. त्यामुळे त्या बातमीवर त्यांचं खास लक्ष होतं. माझा एक ज्येष्ठ सहकारी व्याख्यान ऐकायला म्हणून सोबत आला आणि त्याने आल्यावर बातमी लिहून दिली. मी मुख्य वार्ताहरांना सांगितलं, बातमी कव्हर करायला मी गेलो होतो, तर माझ्याकडून बातमी घ्यायला हवी. आम्हा दोघांचे इन्ट्रो वेगवेगळे होते. प्रकरण तळवलकरांकडे गेलं. त्यांनी ‘हे निगेल काय असतं, नायजेल करा’ अशी सूचना केली आणि वरिष्ठ सहकाऱ्याच्या बातमीला ज्येष्ठत्वाचा मान दिला.

दुसऱ्या दिवशी एडिट मीटिंगमधून बाहेर आल्यावर मुख्य वार्ताहर प्रकाश अकोलकर मला म्हणाले, ‘इतर वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचल्यानंतर तळवलकर म्हणाले, माचकरची बातमी बरोबर होती. ती वापरायला हवी होती. तोच इन्ट्रो योग्य होता. आपलं चुकलं.’

ही गोष्ट मी तारेने घरी कळवली असणार, हे सांगायला नकोच.

****

प्रकाश अकोलकरांनी मला रिपोर्टिंगला ओढलं आणि वेगवेगळ्या बीट्सवर माझी ट्रायल सुरू झाली. मी माहौल टिपण्यात आणि तो शैलीदार भाषेत लिहिण्यात पटाईत होतो. अशा साइड स्टोरीज किंवा बॉक्समधल्या क्षणचित्रांसाठी योगेश हा फॉन्ट वापरला जायचा. माझ्याकडून अशा इतक्या बातम्या जायच्या की, माझं नाव योगेश माचकर ठेवा, अशी सूचना यायला लागली. एकदा दत्ता सामंतांनी तिसऱ्या आघाडीचा मोर्चा काढला दादर ते सम्राट हॉटेल, चर्चगेट. अकोलकरांनी मला पाठवलं. मोर्चा कसा कव्हर करतात, याची मला कल्पना नव्हती. मी मोर्चाबरोबर सगळं अंतर चाललो. मोर्चाएवढीच लांबलचक बातमी लिहिली. ती पहिल्या पानावरून आत दणक्यात छापून आली.

तळवलकरांनी दुसऱ्या दिवशी नाराजी व्यक्त केली त्यांच्या बैठकीत. उडाणटप्पू असलेल्या तिसऱ्या आघाडीतल्या गणंगांना इतकं महत्त्व देण्याचं काय कारण होतं, असा त्यांचा प्रश्न होता. अकोलकर म्हणाले, ‘अहो, आपल्याकडचा एक रिपोर्टर अख्खा मोर्चा चालला. त्याने फक्कड लिहिलंय वाचलंत का?’ दुपारी साक्षात दिनू रणदिवेंनी फोन करून बातमीचं कौतुक केल्यावर ताबूत थंडे झाले असावेत.

जयवंत दळवींचा अखेरचा सत्कार, हा खरं तर तळवलकरांच्याही जिव्हाळ्याचा विषय होता. त्याला तब्येतीची साथ नसताना पु. ल. देशपांडे पुण्याहून बोरिवलीला आले होते. बोरिवलीच्या एका शाळेच्या भरून ओसंडून गेलेल्या हॉलमध्ये सुरेख सोहळा झाला. वार्तांकनाला योगेश माचकर होते. बातमी पहिल्या पानावर फोटोसह सेकंड लीड लागली. तळवलकर दळवींचे मित्र असूनही म्हणाले, ‘बापरे, फारच मोठी लावलीत बातमी.’

पुढच्या दहा-पंधरा दिवसांत दळवी निवर्तले आणि तो त्यांचा अखेरचा सत्कार ठरला. तेव्हा मटाच्या समयोचिततेचं कौतुक झालं.

****

तळवलकर हे त्यांच्या धाटणीचे शेवटचे संपादक होते.

आजच्या काळात असा संपादक वस्तुसंग्रहालयातही पाहायला मिळणार नाही.

वर्तमानपत्राच्या तंत्राशी त्यांचा किती संबंध होता, याची कल्पना आम्हा ज्युनियर मंडळींना कधी आली नाही. तो फारसा नसावा, असा संशय घ्यायला मात्र वाव आहे. त्याची त्यांच्या काळात गरजही नव्हती. तेव्हा टीव्हीच मर्यादित होता. बातम्या आणि विचार देण्याची जबाबदारी सर्वस्वी वर्तमानपत्रांवरच होती. संपादकीय कामकाजात अन्य विभागांचा हस्तक्षेप नव्हता; शिवाय झालाच तर त्याला हस्तक्षेप म्हणण्याची मुभाही होती. मटाच्या ऑफिसच्या दाराशी असलेल्या केबिनमध्ये ब्रँड मॅनेजर सुधाकर श्रोत्री बसायचे. ते फारच कमी वेळा तळवलकरांच्या केबिनमध्ये जायचे. तेही अदबीने. संपादकापेक्षा मोठ्या केबिनमध्ये बसलेले ब्रँड मॅनेजर संपादकांना सोयीनुसार चर्चेला बोलावून घेत आहेत आणि त्यांना एकतर्फी सूचना देत आहेत, हे चित्र त्या कार्यालयाने पाहिलं ते खूप नंतर. सर्क्युलेशन वगैरे विभागांचे लोक तर त्यांना भेटणं टाळायचेच. टाइम्सच्या व्यवस्थापनामध्ये तोवर संपादकीय विभाग हा प्रमुख विभाग मानण्याची आणि त्याचा आदर वगैरे करण्याची जुनाट परंपरा होती. त्यामुळे तळवलकरांना त्या पातळीवरही सन्मानाची वागणूक मिळत गेली. ‘मटा’च्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच दि. वि. गोखल्यांच्या नेतृत्वाखाली पेपरची अप्रतिम घडी बसली होती. मुंबईच्या वर्तमानपत्रांच्या जगातले कसदार आणि नाणावलेले पत्रकारच वेचून मटामध्ये आणले गेले होते. जे जे अव्वल ते ते मटामध्ये आपसूक यायचं. प्रवेशपरीक्षेतून तावून सुलाखून आलेले उपसंपादक आणि वार्ताहर आपल्या कामात तरबेज असायचे. इतर वर्तमानपत्रांच्या मानाने उपसंपादकांनाही मटामध्ये फारच कमी काम पडायचं. पण, जे करायचं ते अतिशय उत्तम दर्जाचंच करायला लागायचं. उरलेल्या वेळात चर्चा करण्यायोग्य माणसं आसपास असायची, पुस्तकं असायची, वातावरणाला अभ्यासूपणाचा स्पर्श होता. आवडीच्या विषयांवर व्यासंग करण्याची सोय होती. अन्य विभागांशी समन्वयाची जबाबदारी घेतलेली सक्षम माणसं होती. त्यामुळे, तळवलकरांचा दैनंदिन कामकाजातल्या व्यावहारिक आणि तांत्रिक अंगांशी काहीच संबंध नसायचा. ते संस्कारांनी ब्रिटिश आणि रहिवास ढांगेजवळच्या राममहलमध्ये असल्यामुळे सकाळी विशिष्ट वेळी बिनचूक ऑफिसमध्ये हजर होत. पुस्तक वाचू लागत. मग ठरल्या वेळी इतर सहकाऱ्यांबरोबर बैठक व्हायची, दिवसभरातल्या विषयांची चर्चा व्हायची. ‘अग्रलेख’ आणि ‘धावते जग’ या सदराचे विषय ठरायचे, लेखक ठरायचे, ते पुन्हा वाचनात मग्न. मग ठरल्या वेळी लंच. पुन्हा आल्यावर वाचन. अग्रलेखाचं लेखन किंवा नंतरच्या काळात एका बोटाने टायपिंग. (त्यांची बोटं भलतीच जाड होती. त्यामुळे कीबोर्डवर अमुकशेजारी तमुक अक्षर असतं आणि तळवलकरांच्या बोटांनी याऐवजी ते अक्षर दाबलं गेलं असतं, तर काय घोळ होऊ शकला असता, याचं चावट उदाहरण अभिजीत द्यायचा. ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंही असावं.) त्यानंतर ते पुन्हा वाचत बसायचे. संध्याकाळी बैठक झाल्यावर न्यूजरूममधून पेस्टअपचं काम चाललेलं असायचं तिथपर्यंत एक फेरी मारायचे. हात मागे बांधलेले असायचे, जाड बोटं तालात हलत असायची. संपला विषय. पाचनंतर ते घरी रवाना व्हायचे.

हे सुख इतर संपादकांना लाभलं नाही.

****

ऑफिसात तळवलकरांची वाचनतंद्री सहसा कोणी भंग करत नसे.

एकदा संजय दत्तच्या देशद्रोहाच्या प्रकरणात सिनेमासृष्टीचं निवेदन घेऊन आमीर खान आणि अनुपम खेर आले होते (हो अनुपम खेरच!). सगळी टाइम्स बिल्डिंग त्यांच्यामागे गोळा झाली होती. ते जिथे जात तिथे त्यांच्यामागून पाच-पन्नासजण फिरत होते. आमच्या ऑफिसमध्ये ते आले तेव्हा काचेला दीड-दोनशे डोळे लागले होते. आमीर-अनुपम शिवाजीरावांकडे गेले, संपादक कुठे बसतात, ते विचारायला. शिवाजीरावांनी त्यांना सांगितलं, ‘जे काही असेल ते माझ्याकडे द्या. मी त्यांच्याकडे देतो.’ हे हटून बसले. आम्ही त्यांनाच भेटणार. म्हणाले, ‘जा मग.’ हे गेले. दारावर टकटक करून आत गेले. आम्ही उत्सुकतेने पाहू लागलो. तळवलकरांनी विचारलं, ‘कायये?’ त्यांनी सांगितलं, ‘सर, हम फिल्म इंडस्ट्रीसे एक निवेदन लेके आये है…’ तळवलकरांना हे दोघे कोण आहेत याचा काही पत्ता नव्हता. असता तरी फारसा फरक पडला नसता. त्यांनी निवेदन हा शब्द ऐकताच, ‘वो बाहर न्यूज एडिटरको दे दो,’ असं सांगून पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं.

तेच तळवलकर थोरल्या विखे पाटलांच्या स्वागताला दारापर्यंत गेले होते. आमच्यातले काहीजण म्हणाले, ‘काँग्रेस कनेक्शन.’

नंतर अत्यंत साध्या, मळकट कपड्यांमधल्या एका वयोवृद्ध माणसाच्या स्वागतासाठी तळवलकर उठून गेलेले पाहिले… त्यांच्याशी अतिशय आदराने वागताना पाहिले… ते कोणी सामाजिक कार्यकर्ते होते… आता कोणतं कनेक्शन जोडायचं असा जोडणाऱ्यांना प्रश्न पडला असेल.

****

तळवलकर नंतर लगेचच रिटायर झाले.

संपादकांच्या सेवानिवृत्तीचे किंवा सेवासमाप्तीचे जे दशावतार असतात, ते त्यांच्या वाट्याला फारसे आले नसावेत. १९९३च्या दंगलींनंतर महाराष्ट्र टाइम्सने बहुजनांच्या भावनेविरोधातली भूमिका घेतली होती. विजय तेंडुलकरांच्या ‘रामप्रहर’ या सदराची ‘बेहरामप्रहर’ अशी संभावना होत होती. मटाने हिंदूंची बाजू लावून धरलीच पाहिजे, असा सर्वसामान्य माणसांचाही कल झाला होता. परिणामी खप कमी झाला होता आणि मटाच्या खपाशी व्यवस्थापनाला काही देणंघेणं आहे, हे त्या काळात अचानक प्रकर्षाने पुढे येऊ लागलं होतं. कुमार केतकरांच्या आगमनाची द्वाही फिरत होती. व्यवस्थापनाच्या अन्य विभागांचा, खासकरून वितरण विभागाचा संपादकीय विभागावर दबदबा निर्माण होण्याचा तो काळ होता.

त्या काळाचे तडाखे नंतर केतकरांना भोगावे लागले.

तळवलकर वेळेत आणि सन्मानाने निवृत्त झाले!

****

निवृत्तीनंतर त्यांनी सचिवालय जिमखान्यात एक पार्टी दिली. त्या पार्टीत सहभागी होण्याची आणि तळवलकरांबरोबर ‘यज्ञकार्य’ करण्याची पहिली आणि अखेरची संधी तेव्हा मिळाली.

तेव्हाही ते भावविवश वगैरे झाले नव्हते. थोडे अधिक गप्पा मारत होते आणि अधूनमधून हसतही होते, हेच आमच्यासाठी नवलाचं होतं.

निवृत्तीआधीच्या टप्प्यात ते थोडेसे सैलावले असावेत. एक-दोनदा बातमीचं भाषांतर करत बसलेलो असताना नेहमीची फेरी मारताना मागून येऊन शेजारी थांबून बातमी कसली आहे, अशी विचारणाही त्यांनी केली होती. मृण्मयी रानडेने केसांत बांधलेल्या एका भल्या मोठ्या आकड्यावर नजर गेल्यानंतर त्यांनी ‘हे केसात काय हिंस्त्र माळलंय या मुलीने’ असंही ते म्हणाले होते. मी गंमतीजंमतीत ‘मटा बॅचलर्स’ क्लब स्थापन केला होता. विविक तहहयात अध्यक्ष होते, शरद कद्रेकर तहहयात सचिव आणि मी तहहयात खजिनदार.

संध्याकाळच्या हलक्याफुलक्या मीटिंगमध्ये कोणीतरी त्यांना हे सांगितलं. ते म्हणाले, ‘त्या माचकरचं काही सांगू नका. तो कधी पार्टी बदलेल त्याचा नेम नाही.’

१४ वर्षांनी का होईना, मी पार्टी बदलली आणि त्यांचा शब्द खरा केला.

****

भावविवशता त्यांच्या स्वभावात नव्हतीच.

ते शक्यतो अतिशय कोरडेपणाने वागायचे आणि तसंच लिहायचे. नंतरच्या शब्दबुजबुजाटी पत्रकारितेत आणखी काही वर्षं व्यतीत करण्याची मजबुरी त्यांच्यावर आली असती, तर त्यांना फार अवघड गेलं असतं.

उत्तम सहकारी, निरंकुश अधिकार, ज्ञानोपासनेला सुयोग्य वातावरण, एकंदरच छापील शब्दांना मोल असलेला वर्तमानपत्रांचा सुवर्णकाळ असे सगळे शुभयोग तळवलकरांच्या संपादकीय कुंडलीत जुळून आले होते. त्यांना साक्षेपी आणि ज्ञानमार्गी संपादक बनता आलं. ते परवडलं.

अर्थात, हे फार सोपं आकलन झालं. त्यांच्या काळात, म्हणजे जवळपास २५ वर्षं मटाचे पंचप्राण त्यांच्या अग्रलेखांतच सामावलेले होते, हे विसरून चालणार नाही. गुणवान सहकाऱ्यांच्या घुसळणीतून निर्माण होणाऱ्या वर्तमानपत्राच्या दर्जावर त्यांचा शिक्का होताच. त्यांची एखादी सूचनाही सगळा नूर पालटून टाकू शकायची. त्यांची छोटीशी कृतीही अन्वर्थक ठरायची.

इंदिरा संत आणि रमेश मंत्री यांच्यात साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक झाली, तेव्हा तळवलकरांनी आणि मटाने अर्थातच इंदिराबाईंच्या बाजूने भूमिका घेतली होती. जिंकून आले मंत्री. त्या दिवशी मटामध्ये इंदिराबाईंच्या कवितांवरचा अग्रलेख छापून आला होता.

****

तळवलकर आमच्या पिढीसाठी ‘तळवलकर’च राहिले!

सर्वतोपरि शक्य असूनही ‘गोविंदराव’ बनून ते आमच्या डोक्यावर बसले नाहीत. ‘गोविंदरावजी’ वगैरे लोचटपणाची तर शक्यताच नव्हती. ‘तळवलकरसाहेब’ असं कोणी म्हणालं असतं, तर त्यांनी तडकाफडकी त्याला घरी पाठवला असता. साहेबी आणि ‘सरकी’ला त्यांच्या काळात मज्जावच होता मटामध्ये. आदराने वा मैत्रीत पण सरळ आडनावाने हाक मारायची पद्धत होती.

अनाठायी जवळीक किंवा अधिक्षेप न करता कशाचंही रिपोर्टिंग किंवा मूल्यमापन करायचं, तर हे अंतर राखावं लागतं, हे एक मूल्य त्यांनी आमच्यात नकळत रुजवलं होतं.

तळवलकरांचं निव्वळ ‘तळवलकर’ असणं किती थोर होतं, हे आता कळतंय!

****

लेखक 'बिगुल' या न्यूजपोर्टलचे संपादक आहेत.

हा लेख 'बिगुल'वर पूर्वप्रकाशित असून मायबोली.कॉमवर पुनर्प्रकाशन करण्यास अनुमती दिल्याबद्दल 'बिगुल' व श्री. मुकेश माचकर यांचे मनःपूर्वक आभार.

****
प्रकार: 

फार सुंदर लिहिलंय. सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं.
काही वेळ मला पण पत्रकार व्हावंसं वाटलं! Happy

इथे दिल्याबद्दल चिनुक्स थँक्यू!

फारच सुंदर लिहलय.... जुन्या आठवणी ताज्या झाल्या!
जुन्या मटाचा मी खुप आधीपासूनचा फॅन आहे.... पेपर वाचायला लागलो तो मटाच!
८८-८९ चा काळ असेल तो... आमच्या इस्लामपूरात मटा दुपारी २-३ वाजता यायचा पण म्हणून कधी आमच्या घरच्यांनी सकाळी येणारा लोकल पेपर घेतल्याचे आठवत नाही!
मटा म्हणजे दर्जा, मटा म्हणजे उच्च अभिरुची हे समीकरण खूप लहानपणीच मनावर बिंबले होते.... पुढे साताऱ्यात आल्यावर पण दैनिक ऐक्य वाचताना ते समाधान फारसे मिळायचे नाही.... एकदा शाळेतून घरी आल्यावर दुपारी आलेला मटा वाचला की मग काहीतरी माहितीपूर्ण वाचल्यासारखे वाटायचे!
मुकेश माचकर त्या काळी मायाबाजार या सदरात चित्रपट परीक्षण लिहायचे... इतके रसभरीत आणि तरीही माहितीपूर्ण चित्रपट परीक्षण मी अजूनतरी वाचलेले नाही!
रविवारी "मैफल" पुरवणी येत होती तोपर्यंत मी मटाचा फॅन होतो... पुढे त्याची "संवाद" झाली आणि वरती माचकरांनी लिहल्याप्रमाणे मटाला चकचकीत विटा लागायला लागल्या आणि मी मटापासून दुरावलो.... अजुनही वाचतो कधीमधी पण पूर्वीप्रमाणे अगदी कट्टर "मटा"वाला राहीलेलो नाही!

झकास. सुंदर लिहिलंय.
(मृण्मयी रानडेनेही ती 'हिंस्त्र' आठवण फेसबूकवर शेअर केली आहे.)

स्वरूप, प्रतिसाद आवडला.

काहिही घटना घडली की मटा (गोविंदराव) काय म्हणतोय हे वाचण्याची उत्सुकता असायची. गोविंदरावांनी एक सुजाण वाचक वर्ग निर्माण केला हे नक्की. तेंव्हा मटा वाचल्यावर वाचल आणि सोडून दिल अस व्हायच नाही. माधवराव गडकरींपेक्षा त्यांची आणि विद्याधर गोखले यांचे तूलना करायला मजा यायची.

हे बिगुलमध्ये वाचलं होतं. छान आहे लेख . आजच्या मटातही तळवलकरांब्दद्दल सुरेख लेख आहेत. मला समजण्यापूर्वीच्या वयात तळवलकर निवृत्त झाले असल्याने अग्रलेख वाचले गेले नाही आहेत. पण मधून मधून त्यांचे मटात लेख यायचे ते वाचलेत . नेमकं लिखाण , अचूक संदर्भ , रोखठोक भाषा ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये Happy

>>>काहिही घटना घडली की मटा (गोविंदराव) काय म्हणतोय हे वाचण्याची उत्सुकता असायची. गोविंदरावांनी एक सुजाण वाचक वर्ग निर्माण केला हे नक्की.

माझ्या लहानपणी (१९८५-१९९०) पेपर वाचनाचा जो उत्साह मी माझ्या घरात आणि माझ्या आई वडिलांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये पहिला आहे तो आता कुठेच दिसत नाही. मला असं वाटतं की आता सगळी माध्यमे (इंटरनेटमुळे) एक झाल्यासारखी झालेली आहेत. त्यामुळे वर्तमानपत्राची वाट बघून, गरम गरम चहा आणि मारीबरोबर त्याचा "आस्वाद" घेणेच आता उरले नाही.

ऑफिस, घर, पार्क, जिम, सिनेमा कुठेही बातम्या आपली पाठ सोडत नाहीत. त्यामुळे आता त्यांना पूर्वीइतकी किंमत राहिली नाही.

चांगला लिहिलाय लेख. Happy
(फक्त माधव गडकरी यांच्याबाबतचे मत सोडून.... कारण मी माधव गडकरींच्या लोकसत्तातील अग्रलेखांचा निस्सिम चाहता होतो व प्रथमपासुनच मटाविरोधी. )

छान लिहिलंय.
आमच्या घरातही केवळ आणि केवळ मटाच वाचला जायचा.
सकाळचा पेपर त्यादिवशी संध्याकाळी मिळायचा आम्हाला.
तळवलकर असेपर्यंत हा पेपर खरेच खूप लाडका होता.
मग पेपरचे संपादक बदलले, पेपरची साईझ बदलली, फाँट्स बदलले.
मी मुंबईला येऊन स्वतः पेपर घेऊन वाचायची वेळ येईपर्यंत मटा एकदम थिल्लर झाला होता.
त्यातल्या मुंबई पुरवणीची भाषातर महाथिल्लर होती.
असा पेपर आपण वाचायचो असे सांगायचीही लाज वाटायची.

संपादकीय फक्त आणि फक्त तळवलकरांचंच आवडलंय आत्तापर्यंत.
तेव्हा खरंतर कळायचंही नाही हे लिहिणारा माणूस कोण, ही भाषा इतकी सुंदर का!
आत्ता मात्र माझ्या विचारांचं/भाषेचं/शब्दांचं बरंच श्रेय मटाला आणि त्यामुळे तळवलकरांना जातं हे लक्षात येतंय.

तळवळकरांना श्रध्दांजली.
_/\_

मला वाटते त्यांनी शेवटचा लेख अमेरिकेतून लिहिला होता. अमेरिकेतील निवडणुकांच्या संदर्भात होता.
मला तोही लेख खूप समतोल वाटला होता. पण तो लेख ट्रंफ यांच्याबाजूने लिहिला गेला असल्याची टिका झाली होती.

सईला पूर्ण अनुमोदन. लहानपणी मटा चं कौतुक फारच असायचं.. मी कॉलेजपर्यंत मटा चा चाहता होतो. (१९९२) नंतर हळूहळू लोकसत्ताकडे वळालो कारण विविधांगी विषय.. हल्लीचा मटा म्हणजे थिल्लर झालाय. ढिगाने चुका. व्याकरणीय चुका तर खोर्‍याने..

चिनुक्स, खूप धन्यवाद माचकर सरांचा हा लेख आमच्यासमोर ठेवल्याबद्दल!

छान आठवणी. जुना मटा छान असायचा आता कित्येक वर्षात वाचला नाहीये.
लहानपणी आमच्या कडे मटा आणि समोरच्या घरात लोकसत्ता येत असे.
आपापले वाचून झाले की मग अदलाबदल होत असे Happy
खास करून शनिवारी आणि रविवारी मटा आणि लोकसत्ता वाचणे म्हणजे चंगळ असे

>>जयवंत दळवींचा अखेरचा सत्कार, हा खरं तर तळवलकरांच्याही जिव्हाळ्याचा विषय होता. त्याला तब्येतीची साथ नसताना पु. ल. देशपांडे पुण्याहून बोरिवलीला आले होते. बोरिवलीच्या एका शाळेच्या भरून ओसंडून गेलेल्या हॉलमध्ये सुरेख सोहळा झाला. वार्तांकनाला योगेश माचकर होते. बातमी पहिल्या पानावर फोटोसह सेकंड लीड लागली. तळवलकर दळवींचे मित्र असूनही म्हणाले, ‘बापरे, फारच मोठी लावलीत बातमी.’>>>>

या कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थित होतो.... जुन्या आठवणी Happy

चांगला लेख इथे दिल्याबद्दल आभार

खुपच सुरेख लेख. तळवलकर संपादक असतानाचा मटा कधीही न वाचल्याची खंत वाटली. मी ज्या भागात वाढले तिकडे मटा पोचतच नव्हता.

मी देखील मटा वाचत वाढलो मात्र तेव्हा केतकर संपादक झाले होते (९०नंतर). तळवलकरांची पुस्तकेच वाचली व मटातून येणारे त्यांचे ऑप-एड लेख. मिरजेत मटा दुपारी ४ला येत असे. त्यामुळे अनेक वर्षे वर्तमानपत्र म्हणजे संध्याकाळी वाचायचीच गोष्ट होती आमच्यासाठी.

सुरुवातीपासुनच काँग्रेसधार्जीर्ण धोरण अवलंबल्याने मटा नेहेमीच एक्सुरी वाटायचा. बाळासाहेब, गडकरी यांच्या अग्रलेखासारखी तेजदार धार मटाच्या अग्रलेखांना कधीच दिसली नाहि. मटाने त्या काळात विचार दिला हे पिटीच्या मास्तरांनी केवळ त्रिकोन्/चौकोन्/वर्तुळात खेळ घेतले म्हणजे भुमिती शिकवली, असं म्हणण्यासारखं आहे...

छान लेख. इथे दिल्या बद्दल धन्यवाद.
मुकेश माचकर नाव वाचून फिल्म संबंधित लेख आठवले एकदम.
लहानपणी कायम मटाच यायचा घरी. सकाळी उठून तासनतास ब्रश करताकरता पेपर वाचणे असं कित्येक वर्ष केलेलं आठवते. तेव्हा हा कॉंग्रेस धार्जिणा आहे इ. काही कळत न्हवत, पण जे लिहिलंय ते वाचायला आवडायचं. शेवटची काही तळवलकर असलेली वर्षे आणि मग केतकर असलेली वर्षे. हल्ली मटा बघितला तर वर कोणी म्हटलंय तसा थिल्लर वाटला, पानभरात वाचायला शोधायला लागलं. कदाचित मी नॉस्टॅल्जिक झालो की काय असं वाटून सोडून दिलं.
तेव्हा कुणाकडे गेल्यावर ४-५ पेपर दिसले की पहिला मटा वाचला जायचा. थोडं मोठं झाल्यावर मैफल मधून येणारे तळवलकरांचे लेख कधीकधी एकसुरी/ कॉंग्रेस उदोउदो वाटलेले आहेत. ते तसेच होते का तेव्हा वाजपेयी सरकार आणि त्याच्या बद्दल आदर असल्याने तसे पेंट झाले माहित नाही. त्याची पुस्तके आता आणखी थोडी अक्कल/ पर्स्पेक्टीव्ह आल्याने वाचली पाहिजेत असं वाटतंय.

तळवळकर संपादक असताना आमच्याकडे अंबाजोगाईला दुसऱ्या दिवशी कि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पोचायचा मटा. पण तरी मटा घरी असणं आणि वाचणं कंपल्सरी होते. त्यात मामा मटामध्ये असल्याने मटा म्हणजे घराचा पेपर वाटायचा.

अभिजीत ताम्हाणे म्हणजे चित्रकला, कलाप्रदर्शने यावर लिहायचे ना मटामध्ये? त्यांच्यामुळे कला व त्या जगतात काय चालले आहे हे मिरजेच्या बॅकवॉटर्समध्ये थोडेफार कळायचे तरी.

तळवलकर ९६साली मटातून निवृत्त झाले. ९२पासून मटा वाचला - बाबरी मशिद आंदोलन व नंतर मुंबई दंगलीच्या बातम्यांमुळे हे साल लक्षात आहे. पण का कोण जाणे माझ्या डोक्यात नेहेमी मटा म्हणजे केतकर हे समीकरणच बसले आहे.

स्थानिक पातळीवर कोल्हापुरातून येणारे पुढारी, सकाळ यांचा दर्जा सामान्यच होता. जमिनीच्या वादावरून बांधावर चुलत भावाची कुर्‍हाडीचे घाव घालून हत्या आणि म्हैसाळच्या बाबासाहेब कदमांचे चिरंजीव अमोल कदम पुण्यात ऑर्डिनन्स फॅक्टरीत व्यवस्थापक म्हणुन पदनियुक्त झाले असल्या बातल्या पुढारीत असत. आमच्या गावातले दोन पेपर म्हणजे खरे तर मटक्याचे आकडे आणि वकिलाच्या नोटिसा छापायलाच निघत. त्यांची नावे होती अतिरेकी आणि जनप्रवास. आमच्या दोस्ताचे वडिल त्या पेपरांचे मालक, खरा धंदा (बहुतेक) चंदन तस्करी.
या सर्व पार्श्वभुमीवर मटा लखलखून उजळायचा. मटाने माझ्यावर केलेल्या वाचनसंस्कारांचे मूल्य अनमोल आहे.

माचकरांची लिहिण्याची शैली चांगली आहे ह्याबद्दल वादच नाही. पण ह्या लेखाचा सूर थोडा मी कसा बरोबर होतो आणि तळवलकरांमध्ये कशा उणिवा होत्या अशा धाटणीचा काहीसा वाटला.

छान लेख .
आमच्या कडे पण मटा च यायचा . तेव्हा तो फक्त चार पानांचा असायाचा .

छान लेख.
मटा कधीच न वाचल्याची मलाही हळहळ वाटली.

तळवलकर असेपर्यंत हा पेपर खरेच खूप लाडका होता.
मग पेपरचे संपादक बदलले, पेपरची साईझ बदलली, फाँट्स बदलले.
मी मुंबईला येऊन स्वतः पेपर घेऊन वाचायची वेळ येईपर्यंत मटा एकदम थिल्लर झाला होता.
त्यातल्या मुंबई पुरवणीची भाषातर महाथिल्लर होती.
असा पेपर आपण वाचायचो असे सांगायचीही लाज वाटायची.
>>> साती यांना पूर्ण अनुमोदन.

मला वाटतं 'मटा'चा फॉरमॅट बदलण्याचं मुख्य कारण होतं ते, व्यवस्थापनाच्या लक्षात आलं होतं की सध्या भारतात तरुणांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. आणि तो तरुण वाचकवर्ग गटवण्याकरीता व्यवस्थापनाने 'मटा'चा फॉरमॅट बदलण्याची केलेली ती युक्ती होती. त्यावेळी मला 'मटा'चा मला भयंकर राग आला होता. ज्या जुन्या वाचकांच्या जीवावर तो मोठा झाला, त्यांना त्याने सोयीस्कररित्या बाजूला सारले होते. शेवटी मी 'मटा'चा निषेध म्हणून त्याला सोडचिट्ठी दिली. 'मटा'ने आमच्या पिढीला वाऱ्यावर सोडून आमच्या केलेल्या अपमानाचा सल अजूनही माझ्या मनात धुमसतोय.

फार सुरेख लेख.

आता तळवळकरांनी लिहिलेले त्या वेळचे अग्रलेख कुठे वाचायला मिळतील का?

किती जिव्हाळ्याने लिहिलाय लेख. मस्त वाटलं.

आता मटाचं काय झालंय? का झालंय असं?

कालच फेसबुकवर एका पत्रकाराने लिहिलं होतं की नव्या 'रिपोर्टर्स'ना तळवलकरांचं नावही माहित नाहीये हे पाहून मी दिग्मूढ झालो आहे- हे असं होण्यासाठी कोण जबाबदार आहे? या रिपोर्टर्सना नोकरी कोणी दिली? कशाचा आधारावर? बर, नोकरी सुरू केल्यावर तुम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं का? कसलं प्रशिक्षण दिलं? सनसनाटी कसं लिहायचं, की बातमी नसलेली बातमी कशी लिहायची? त्यांच्या विचारांना बैठक मिळावी म्हणून सिनियर पत्रकारांनी काय केलं? नुसतं दिग्मूढ झालो असं म्हणलं की संपला विषय?- असे सगळे प्रश्न त्यांची कमेन्ट वाचून पडले Happy असो!

मला आवडला हा लेख. तळवलकारांना संपादक म्हणुन मिळालेली मुभा (स्पेस) व त्यांनी तिचा केलेला योग्य वापर हे उत्तम उतरले आहे. तसेच त्यापुढच्या संपादकांना ती न मिळणे व त्याचे परिणाम हेदेखील नीट आले आहे.
आपल्या कामाचा भाग म्हणुन पुस्तके वाचायला मिळणे ही भाग्याचीच गोष्ट. अर्थात तळवलकरांसारखे शीघ्र-वाचकच त्याला योग्य तो न्याय देऊ शकतात. हे एका नजरेच्या टप्प्यात आख्खे पान वाचणे, त्याचा गोषवारा/अ‍ॅनालिसिस डोक्यात होणे व त्याची टिपणे काढणे याला पाहिजे जातीचे (अभ्यासक प्रवृत्तीचे या अर्थाने जातीचे, नायतर पुन्हा इथे फाटे फुटतील).

Pages