रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव वाचुन चित्रपटाची नावे टंकण्यासठी धागा उघडला तर ईथे आधीच सगळी नावे लिहीली आहेत. तरी अजुन काहि नावे- मराठीतील-
१. गणप्या गावडे- थेटरात जाउन पाहीला Sad
२.नऊ महीने नऊ दिवस- झी टॉकीज
३. भरत जाधवचा एक चित्रपट नाव नीट आठवत नाही पण लग्नाची वरात लंडन ला अस काहीस आहे....
४. जबरदस्तः- पुष्कर जोग.
५.स्वजो च एक नाव आठवत नाही पण डायलॉग आहे- अरे आओना फिर....

मितवा.. मानसिक आत्महत्या आहे हा चित्रपट म्हणजे. Angry

आणि सांगायला पण लाज वाटते पण "क्या कूल हैं हम" थेटर मध्ये जाऊन पाहिला होता :शरम वाटणारी बाहुली:

आलिया शाहीदचा "शानदार". महाबोर.

आज एक मुखवटे म्हणून लागला होता टीव्हीवर. पूर्ण डोक्यावरून गेला.

थिएटरमध्ये जाउन बोअर झालेल्या सिनेमांच्या लिस्टमध्ये दोन नावे अगदी अढळपदावर आहेत ती म्हणजे
१) पुणे-५२
२) धोबीघाट

तो एक कुठला सिनेमा बरं ?
सलमान , शाखा आणि माधुरी दीक्षित (नेने होण्याआधीचा). शाखा तिचा नवरा असतो आणि सलमान मित्र. तो इतका इनोसण्ट असतो कि बस्स. लग्न झाल्यावरही तिच्याशिवाय करमत नाही म्हणून तिच्याकडे जात असतो वगैरे आणि निरागसपणे जे संवाद वोलत असतो ते इतके द्वयर्थी असतात कि नव-याला नकोनको होऊन जातं.
सखा सारखा मित्र असावा पण तो हजबंड मटेरियल होऊ शकत नाही यावर तर कुणाचंही एकमत होईल. पण लग्नानंतरही त्याची उछलकूद टाईप मैत्री अगदी बेडरूमपर्यंत (निरागसपणे) चालू देणारी माधुरी पाहून तिच्या मूर्खपणाला हसावं की रडावं हे कळत नव्हतं. सखा कडून अपेक्षा नसतातच. बॉलिविडी निरागस मैत्री दाखवायच्या नावाखाली इतके अत्याचार केलेत की शाखाचीच बाजू पटायला लागते.

एक स्व जो चा आणि सई चा सिनेमा होता कुणितरी एक मुस्लिम असतं... प्रेम असतं, लग्नाला नेहमी प्रमाणे विरोध.. हिंदी मराठी मिक्स नाव होतं सिनेमाचं Sad भयानक भिकार सिनेमा होता.

बहुधा प्यारवाली लव्हस्टोरी Uhoh

कुंगफू योगा

मला अजून कळले नाही की जॅकी चॅन ने असे कोणते तत्वज्ञान सोनू सूदला सांगितले ज्यामुळे अचानक सोनूमधे परिवर्तन होऊन जॅकी बरोबर नाचायला लागला. Uhoh

ऋन्मेऽऽष..तुम्ही कामाला लावले Happy
वरती नावे आलेली आहेतच..
छोटीसी लव्ह्स्टोरी
नाच
सुर्यवंशम
लाल बादशाह
गंगा जमुना सरस्वती (हा टॉप रद्दड)
शाखा चे जवळपास सगळेच
ए दिल है मुश्कील

लोकहो,
एकदा "कुंग फु योगा" बघाच..बाकी सगळे चित्रपट अर्थपूर्ण वाटु लागतील. Happy

Laga chunari main dag pahilya १ tasat baher padale, shikshanachya aaicha gho purn pahila kasa basa

हम तुम्हारे है सनम हा एक भयंकर पण चांगली गाणी असलेला पिक्चर आहे(मी आधी माधुरि ला एक कानाखाली दिली असती असं वाटतं.)

थिएटरमध्ये जाउन बोअर झालेल्या सिनेमांच्या लिस्टमध्ये दोन नावे अगदी अढळपदावर आहेत ती म्हणजे
१) पुणे-५२ > +१०००००००० कंप्लिट मान्शिक शिकनेस

मेला
हर दिल जो प्यार करेगा
कहि प्यार न हो जाये

आजकाल न्यूयॉर्क- मुंबई थेट विमान असते, १४ तास. बरेच लोक तेच निवडतात.
मी जात होतो तेव्हा मधली सीट मिळाली होती. शेजारचा माणूस गाववालाच निघाला.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर समोरच्या टीव्हीवर ( प्रत्येक सीट पुढे आय पॅड एवढ्या आकाराचा टीव्ही असतो) काय काय आहे पहात होतो.
तिथे "हमशकल्स" नावाचा चित्रपटही होता. ते नाव पहाताच शेजारचा शत्रूपक्ष आनंदला.
"जबरदस्त कॉमेडी पिक्चर आहे, हसून हसून बेजार व्हाल !" असा आग्रह करून पूर्ण चित्रपट बघायला लावला.
शिवाय आधून मधून " आता ते तीघे मुलींचे कपडे घालून येतील बरं का! मिस करू नका" वगैरे...
कॉलर ट्यून बेबी हे गाणे मला पाठ आहे.

Traumatized शब्दाचा खरा अर्थ कळला. त्या दिवशी मुंबई विमानतळावर उतरलेला एखादा इसम लोकांना दगड मारत असलेला पाहिला असेल तर तो मीच होतो. एखाद्या माबोकराला दगड लगला असेल तर क्शमस्व.

विकु Lol

मग तो हवा येउ द्या वगैरे पाहताना लोळत असेल.

बाय द वे रटाळ, बंडल आणि बकवास हे एकाच कॅटेगरीत घातल्याबद्दल ऋन्मेष चा णिशेध.

बंडल आणि बकवास असलेले अनेक पिक्चर अजिबात रटाळ नसतात. किंबहुना उत्तम पिक्चर्स पेक्षा असे अनेक पिक्चर जास्त करमणूक करतात.
उलट अजिबात बंडल्/बकवास नसलेले पण प्रचंड रटाळ असलेलेही अनेक पिक्चर्स आहेत Happy

आजचा रटाळ चित्रपट, मागेही एका ठिकाणी उल्लेख केलेलाच,
तो आशुतोष गोवारीकरचा पावणेचार तासाचा कसोटी सामना, लगान !
त्यापेक्षा तीन तासांत आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी सामना लाईव्ह बघावा आणि त्यानंतर पाऊण तास सिद्धूची बडबड ऐकावी.
पूर्वार्ध जगात रटाळ आणि उत्तरार्धात क्रिकेट सामना सुरू झाल्यावर ईतका प्रेडीक्टेबल ईतका प्रेडीक्टेबल की एखादा शारजामधील फिक्स सामना बघतोय असे फिलींग.
निव्वळ ए आर रेहमानने तारला त्याला आणि त्या नादात पुर्ण बघितला गेला. पिक्चर संपल्यावर समजले की आपलाच तीन गुणा टाईम फुकट गेलाय.
खूप रडलो मी त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा लगान बघितला.. पण स्वत:साठी नाही, तर त्या ऑस्करच्या परीक्षकांसाठी ज्यांच्यावर आमीरने पावणेचार तास अत्याचार केला.

फारेण्ड, सहमत आहे.
आधी तुझा सल्ला घेतला असता तर तीन वेगळे धागे काढता आले असते Happy

Pages