जराही घाबरू नकोस - भाग २

Submitted by आनन्दिनी on 27 January, 2017 - 05:56

मुलांचे हाल बघून मानवी आईवडीलसुद्धा कळवळतात. बापू , नंदाई तर साक्षात परमेश्वर. ते आपल्या लेकराला किती वेळ दुःखात राहू देतील. रात्री मी झोपले आणि स्वप्नात बापू आणि नंदाई !! स्वप्नातही हे गाठीचं संकट मी विसरले नव्हते. मी नेहमी बापू बापू करत असते. पण त्या दिवशी स्वप्नात मात्र मी जाऊन नंदाईच्या पायांना घट्ट मिठी मारली. मी जागेपणी जे म्हटलं होतं की "मला आई इथे हवी आहे" त्यामुळेच असावं असं मला वाटतं . तर मी आईचे पाय घट्ट धरून विचारलं "आई मी घाबरू नको ना?" आणि नंदाईने अगदी firmly सांगितलं "जराही घाबरू नकोस"
     सकाळी उठल्यावर मला इतकं बरं वाटलं ..... आईने सांगितलंय ना घाबरू नको, मग ठीक आहे. खरंच आम्ही सगळे खूप रिलॅक्स झालो. जगातली कोणती गोष्ट बापू, आई आणि दादा यांच्या शब्दाबाहेर जाणार आहे! As expected एका आठवड्याने रिपोर्ट व्यवस्थित आला. कँसर दिसत नव्हता. डॉक्टर मात्र अजूनही convinced नव्हते. अजून MRI आणि मोठी बायाॅप्सी करायचं ठरलं . इथे मुद्दाम हे सांगायला हवं की हे सगळं NHS मध्ये म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्ये, म्हणजे डॉक्टर चा वेस्टेड इंटरेस्ट असण्याची शक्यता नाही. तर MRI केला. अजून मोठी बायोप्सी केली. या सगळ्या इन्वेस्टीगेशन्स होऊन रिपोर्ट्स यायला दोन महिने लागले.  कॅन्सर नाहीये, फक्त इन्फेकशन आहे, (जे अँटिबायोटिक्सनी कमी होतंय)  आता १३ जानेवारीला फायनल रिपोर्ट आला. पण नंदाईने टेस्टच्या रात्रीच रिपोर्ट दिला होता. त्यामुळेच हे सगळे दिवस आम्ही नीट काढू शकलो. त्याबद्दल  अंबज्ञ (कृतज्ञ) राहू तेवढं कमीच !!
     या साऱ्या गोष्टीत मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या कठीण काळात राकेश solid as a rock सतत माझ्याबरोबर होता, बाबा भारतातून तडक आले, आई आणि नणंद गुरुक्षेत्रमला चंडिकाहवन करत होत्या, रोज माझ्याशी बोलून मला धीर देत होत्या, माझे दीर जाऊ जे डॉक्टर्स आहेत ते माझ्या डॉक्टरशी वेळोवेळी बोलत होते. रात्री २-३ ला सुद्धा माझा रिपोर्ट आल्या आल्या माझ्याशी बोलत होते, धाकटी नणंद गुरुचरित्राचा १४वा अध्याय वाचत होती. सुमेधावीरा आणि इतर मित्रमंडळी फ़ोन करून चौकशी करत होती. ह्या सगळ्या लोकांना आपापली बिझी लाईफ आहे पण आमच्या संकटात हे सगळे खंबीरपणे आमच्याबरोबर उभे राहिले . यात निर्विवादपणे या सगळ्यांचा चांगुलपणा, संस्कार आहेतच पण त्याचबरोबर मला श्रीमद्पुरुषार्थामधली बापूंची वाक्यं आठवतात, "आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण अनेकांचं लाडकं व्हावं. या संपूर्ण विश्वाचा चालक परमेश्वर आहे. तो माझ्या आवडीचा झाला तर मी त्याच्या आवडीचा होईन आणि मग एकदा का माझ्या मनात परमेश्वराचं प्रेम आणि त्याची आवड स्थिरावली की मग त्याच्या शक्तीमुळे अनेक जण माझ्यावर प्रेम करू लागतात." माझ्या बाबतीत मी हे खरंच अनुभवलं . काय होऊ शकलं असतं आणि बापूनी कसं अलगद बाहेर काढलं हा विचार केला की माझं मन भरून येतं . "तुमचा मी भार वाहीन सर्वथा , नव्हे हे अन्यथा वचन माझे " बापू सर्वार्थाने  त्यांच्या वचनाला जागले. त्यांनी रोगापासून तर मला वाचवलच, पण diagnosis च्या स्ट्रेसपासून सुद्धा त्यांनी आमच्या कुटुंबाला वाचवलं.
     बापू सगळं भरभरून देतात आणि तरीही मनुष्यस्वभावानुसार मी मागतच रहाते पण आता इतर सगळं मागताना मी बापूंच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे मागते
"हरो त्रिताप हमारे , दो सुखकी छाया
तुझेही तुझसे मांगने तेरी शरण आया
 ॐ जय अनिरुद्ध प्रभो"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कसलं भयानक लिहिता ....घाबरलेच मी....
पण,खूप छान वाटतंय कि तुम्ही एकदम व्यवस्तीत आहात....
बापू सदैव तुमच्या पाठीशी राहो...

जय हो बापू!!

पण मला एक सांगा की तुम्ही सारखे एव्हडे बापू बापू नंदाई नंदाई दादा दादा नामजप करता तर अशी गाठ भले ती बिनाइन असली तरी होऊच का दिली तुमच्या शरीरात? आणि त्यामुळे झालेला पुढचा सगळा त्रास?
की ती गाठ कुणा दुष्ट शक्तीने (सैतान) तुमच्या शरीरात निर्माण केली? म्हणजे ती मॅलिग्नंटच असणार कारण जर दुष्ट सैतान एव्हडी गाठ वगैरे इम्प्लान्ट करण्याचा प्रयत्न करतो तर बिनाइन गाठ का करेल ना. म्हणजे बापूंनी मॅलिग्नंट गाठ बिनाइन केली. लै पावर.
पण मग त्यांना ही पावर थेट सैतानाला संपवायला का नाही सांगत? म्हणजे पुढे जाऊन अजून कुठल्या भक्ताला त्रास नको, बरोबर?

बापूंची आरती असेल ना? माझ्यासाठी ती इथे पोस्ट करता का? मला आरत्या फार आवडतात. विशेषतः अर्वाचीन देवांच्या. स्वामी समर्थ, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज वगैरे. द्या ना प्लीज. मी तुमचा आजन्म अंबज्ञ राहीन.

ॐ जय अनिरुद्ध प्रभो"
गाठ आली म्हणजे त्यांची भक्ती कमी पडली, किंवा मग साक्षात प्रभोने त्यांची परीक्षा घेतली हे साधं लॉजिक तुला समजू नये!!!. त्या आरत्यांना सोड. त्यांच्या मागे लागू नकोस, तुला चरित्र आणि पोथ्या वाचायची गरज आहे. लॉकेट आहे का गळ्यात? किमान किचेन? कीचेन नसेल तर किचन मध्ये वायव्येला पूर्व मानून त्यारेफरंसने दक्षिणेकडे पाठ करून ऊर्ध्व दिशेला तोंड करून १०१ वेळा जप तरी करत जा बाबा.

ताई तुम्हाला काही झालं नाही हे उत्तम झालं, पण या सगळ्यात तुम्हाला ठार अपयश आलं आहे. तुम्हाला अँटिबायोटिक्स वापरावी लागली, रादर तुम्हाला कोणी ती दिली आणि तुम्ही ती वापरलीत?? त्याची तुम्हाला गरज वाटली ??? ताई यापुढे जप वाढवा. पुरेसा जप होत नाहीये. ऊर्ध्वसमांतररमुक्तगरुडासनात जप करा. नक्की फरक पडेल.
ॐ जय अनिरुद्ध प्रभो"

कॅन्सर नाही निघाला हे उत्तमच. पण बापू आणि त्यांच्या स्वघोषित देवरूपी परिवाराने तुम्हांला काही होऊ दिलं नाही हे समजणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. सॉरीच!!!!
बापूंची महती सांगणारा एक लेख आला रे आला की मायबोलीवर लपलेले बापूभक्तही एकदमच उगवतात हे कसं काय बरं? मागे जुन्या मायबोलीवर असे बापूभक्त उर्वरित पापी लोकांना वाट्टेल ते बडबडत होते.

कॅन्सर नाही निघाला हे उत्तमच. पण बापू आणि त्यांच्या स्वघोषित देवरूपी परिवाराने तुम्हांला काही होऊ दिलं नाही हे समजणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. सॉरीच!!!!>>>>>> +१

टण्या आणि अमितव बापुभक्त आहेत का??

पण मला एक सांगा की तुम्ही सारखे एव्हडे बापू बापू नंदाई नंदाई दादा दादा नामजप करता तर अशी गाठ भले ती बिनाइन असली तरी होऊच का दिली तुमच्या शरीरात? आणि त्यामुळे झालेला पुढचा सगळा त्रास?
की ती गाठ कुणा दुष्ट शक्तीने (सैतान) तुमच्या शरीरात निर्माण केली?
>>
माझा अनिरुद्ध बापूंशी काडिचाही संबंध नाही हे नमूद करून लिहितेय:
ज्यांचा विश्वास असतो - त्यांच्या लेखी राम देव असूनही त्याला - त्याच्या जवळच्यांना मरण चुकलं का? नाही!
रामकृष्ण परमहंस - अध्यात्मिक द्ऱुष्ट्या मोठे असले म्हणून त्यांचे शरीरभोग त्यांनी टाळले नाहित. अविश्वास असणाऱ्यांच्या द्ऱुष्टीने टळले नाहित.
कारण देह असतील तर देहभोग असतातच. ते टाळणं हे spirituality चं उद्दिष्ट नसतं. आणि तरीही मदत मागतली आणि मदत घेण्याची लायकी असेल तर मदत मिळू शकते. ती खरच देवाकडून मिळते का? का मदत मागितल्यावर आपली मनोभूमिका तशी तयार होऊन आपण योग्य मदत शोधतो? जे काही असेल ते त्या काळात मनोधैर्य टिकवायला वा त्यातून बाहेर पडायला मदत करते ना?
कॅंसर सारख्या रोगात रुग्णाच्या मनोभूमिकेने खूप फरक पडतो - हे तरी मान्य आहे का? मग ती मनोभूमिका कशाने तयार होतेय ह्याचा आग्रह का?
so called बुद्धीवादी तर्ककर्कश्य होत जातात अनेकदा. हे टाळता येऊ शकतं का? वैद्न्यानिक दृष्टीकोनात अनुभवांना open असाव अशी अपेक्षा असते.
हे थोतांड आहे - असं कुठलीही शहानिशा न करता मनात धरलं तर गॅलिलिओ ला माफी मागायला लावणाऱ्या चर्च मधे आणि आपल्यात काय फरक रहातो?

@नानबा......
अगदि बरोबर. देव आहे कि नाहि ह्य पेक्शा तुम्हि एखद्या वस्तुला देव मानुन तुमचि सर्व मानसिक शक्ति त्या वर केन्द्रित करता. ह्याने जि शक्ति उत्पन होते त्याचे परिमाण अजुन तरि नाहि. पण त्या शक्ति चे परिणाम मात्र आनन्दिनी ह्यानि लिहिल्या प्रमणे जाणवतात.

कॅंसर सारख्या रोगात रुग्णाच्या मनोभूमिकेने खूप फरक पडतो - हे तरी मान्य आहे का? मग ती मनोभूमिका कशाने तयार होतेय ह्याचा आग्रह का? >> मला वाटतं व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करूनही ह्यात थोडासा विवेकाचा आग्रह धरला पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील सीमारेषा फार धुसर असते. इथे 'म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो' ह्या भूमिकेतून पाहीले पाहिजे.
क्ष व्यक्ती/देव/शक्ती मुळे मला आलेल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळाले असे म्हणण्यात काहीच चूक नाही पण अमुक एका व्यक्तीमुळे मला कॅन्सर झाला नाही हे म्हणणे अंधश्रद्धेकडे झुकणारे आहे.

पण अमुक एका व्यक्तीमुळे मला कॅन्सर झाला नाही हे म्हणणे अंधश्रद्धेकडे झुकणारे आहे.
>>>>

पण हे खरेही असू शकते ना? Happy

देव, देवाचा अवतार वा तत्सम शक्ती अस्तित्वातच नाही किंवा असूच शकत नाही हे ठामपणे कसे सिद्ध करता येईल?

मागेही मी एका धाग्यावर म्हणालो होतो,
जर गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा असेल तर ती गणपती नावाचा एक देव आहे ईथपासून सुरू होते Happy

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल आभार. आज भारतात भोंदू बाबांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे बाबा,बापू म्हटलं की बरेच लोक critic होतात आणि हे योग्यच आहे. कोणावरही अंधविश्वास टाकणं चूकच !
similarly जगात खूप वाईट विकृत पुरुष आहेत. रेप करतात, ऍसिड फेकतात. मग सगळेच पुरुष वाईट आहेत का? आवश्यक आहे ते पटकन विश्वास न  टाकता, डोळसपणे निर्णय घेणं. गुरूच्या बाबतीतही कोणी म्हणतंय म्हणून कोणी विश्वास ठेऊ नये. त्या 'गुरु'चे आचार विचार कसे आहेत ते पाहावं, वाचावं , त्यांचं कार्य कसं आहे ते पाहावं ,त्यात तथ्य असलं, ते योग्य वाटलं, आणि आपल्याला अनुभव आला तरच आपण विश्वास टाकावा. मी अनिरुद्ध बापूंचे असंख्य अनुभव घेतले आहेत. आणि तरीही तुम्ही त्यांना मानावं असा माझा जराही आग्रह नाही कारण तुम्ही कुठे अनुभव घेतला आहेत?

आता गाठीबद्दल .... बापूनी मॅलिग्नन्ट (कॅन्सरची) गाठ बिनाइन (साधी) केली असं मी कुठे म्हटलंय. जर माझ्या नशिबात कॅन्सरची गाठ असती तर त्याच्याशी लढायला बापूनी मला मनःसामर्थ्य दिलं असतं. बापूंच्या भक्त परिवारामध्ये अनेक कँसर survivors आहेत. आईवडील जसे मुलांना स्वातंत्र्य देतात पण अडचणीत मुलांना मदत करतात तसेच सद्गुरू शिष्याना पूर्ण कर्मस्वातंत्र्य देतात. गाठ हा माझ्या या किंवा पूर्व जन्मातील माझ्या कर्मांमुळे मला आलेला भोग होता. पण त्या प्रसंगी मला जे मनाचं बळ आवश्यक होतं ते पुरवायला माझी गुरुमाऊली धावून आली. शरीराचे भोग राम कृष्ण किंवा मोठमोठ्या संतांनीसुद्धा भोगलेच ना.

मी अँटिबायोटिक्स का घेतली? जपच  का नाही केला? कोणतेही 'सद्'गुरु कर्माचा त्याग करून फक्त देव देव करत बसा असं कधीच सांगत नाहीत. मला  माझी कर्म चोख करायलाच हवीत.  गायत्री मंत्राचे कितीतरी फायदे आता scientifically सिद्ध होत आहेत. पण मी ऋषी मुनींसारखी जपतप, स्नानसंध्यावाली lifestyle फॉलो करत्येय का ? नाही ना मग त्या मंत्रांचा त्यांना मिळत होता तेवढा फायदा मला कसा मिळेल? मला औषधांचा सहारा घ्यायलाच हवा.

  भक्तांचे बरेच अनुभव अभक्तांच्या दृष्टीने योगायोग 'coincidence ' असतात. तर या 'coincidence ' बद्दल जगविख्यात सायंटिस्ट आईन्स्टाईन सांगून गेलाय 'Coincidence is God's way of being anonymous'  'योगायोग म्हणजे देवाने अदृश्य रूपाने केलेली लीला'

मी डॉक्टर आहे त्यामुळेच आयुष्य हे किती uncertain आहे हे मी जवळून बघितलंय. आणि मनुष्याचं कर्तृत्व किती सीमित आहे हेसुद्धा मी अनुभवलंय. ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर सॉक्राटिस ने म्हटल्याप्रमाणे 'I know that I know nothing.' चा अर्थ मला कळला आहे. सायन्स, मेडिकल नॉलेज जगातील प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू शकत नाही. द्यानेश्वरांनी रेड्याकडून वेद कसे वद वाले , तुकारामाच्या गाथा पाण्यावर कश्या तरंगल्या सायन्स हे कसं सांगणार....

रामकृष्णांना देव मानणं ठीक आहे पण मिशावाला आपल्यासारखा माणूस, त्याला देव मानायचं म्हणजे .... जेव्हा कृष्ण अस्तित्वात होता तेव्हा तोही हाडामासाचा मनुष्यच होता. अर्जुनाने त्याला देव मानून स्वतःचा उद्धार करून घेतला तर दुर्योधनाने आयुष्यभर त्याला गवळी म्हणून हिणवून स्वतःच्या आयुष्याची माती केली. मी अर्जुनाला फॉलो करत्येय.  तुमचं तुम्ही ठरवा.

जर गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा असेल तर ती गणपती नावाचा एक देव आहे ईथपासून सुरू होते Happy

>> मान गयें ऋन्म्या !!!

जर गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा असेल तर ती गणपती नावाचा एक देव आहे ईथपासून सुरू होते
>>>>>>>>
रईस डायलॉग मारा है +२१ Wink

"तुमचा मी भार वाहीन सर्वथा , नव्हे हे अन्यथा वचन माझे " बापू सर्वार्थाने त्यांच्या वचनाला जागले. त्यांनी रोगापासून तर मला वाचवलच, पण diagnosis च्या स्ट्रेसपासून सुद्धा त्यांनी आमच्या कुटुंबाला वाचवलं. >> ह्या वाक्यामुळे गैरसमज झाला असावा. तुमच्या श्रद्धेने तुम्हाला बळ दिले. Basically those who do not believe in him do not get that will power so it's not about "him" it's about you. So long as you are aware of this no one can fool you. अशी डोळस श्रद्धा कोणावर ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न.
जर गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा असेल तर ती गणपती नावाचा एक देव आहे ईथपासून सुरू होते >> बरोबर. फक्त गणपती नावाचा एक देव आहे ही माझ्या मते श्रद्धा आहे.

अनिरुद्ध बापूंनी (निर्भया घटनेनंतर) ३ जानेवारी २०१३ ला केलेल्या भाषणातील काही वाक्ये पुढीलप्रमाणे -

अशा बलात्कारीत स्त्रीने किंवा तरूणाने जर अनिरुद्ध चालिसा दररोज १०८ वेळा ११ दिवस म्हटला, तर ज्यांनी ज्यांनी बलात्कार केलेला आहे, तो ताबडतोब नपुंसक होऊन जाईल, हे माझे वरदान आहे. आणि नुसता नपुंसक होईल एवढे नाही, तर त्याची नपुंसकता जगाला कळेल, आणि त्याची छीथू होईल, हेही लक्षात ठेवा.
...
जी स्त्री, किंवा जो असहाय मुलगा/तरूण गुरूक्षेत्र मंत्र रोज म्हणतो, कमीतकमी पाच वेळा, त्याच्यावर बलात्कार कोणी करूच शकणार नाही. अगदी १०० लोकांची गँग आली, आणि ती व्यक्ती एकटी आहे, तरीदेखील ते शक्य होणार नाही, हे माझं वचन आहे.
...

संदर्भासाठी त्यांचे हे रेकॉर्डेड भाषण- https://www.youtube.com/watch?v=kO04G6gLUEc

आता सायन्स, मेडिकल नॉलेज हे तरी कसं एक्सप्लेन करणार? काही गोष्टींवर विश्वास हा ठेवावाच लागतो.

भा, oh my God! हे भयंकर आहे! ही अशी वक्तव्यं करणाऱ्या माणसावर कोणाचीच डोळस श्रद्धा असणं शक्यच नाही! Thank you for enlightening me! This guy shouldn't listen to himself as well.. That will be a bad influence!

भा, बापूंमध्ये आणि त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी ताकद असताना भारतातून रेप निघूनच जायला हवेत खरेतर. बरं ह्या बापू भक्तांनी ह्या मंत्रांचं इतर भाषांमध्ये ट्रान्सलेशन केलंय का? देशाच्या कानाकोपर्‍यात, खेडोपाडी पोचायला हवी ही ताकद तर त्याचा उपयोग होईल. बापूभक्त काही पावलं उचलतायत का त्या दृष्टीने?

निर्भया घटनेनंतर बर्याच भक्तांनी बापुना आपल्या मुलींच्या बहिणींच्या सुरक्षेबद्दल विचारलं होतं. त्याला उत्तर देताना बापूनी हे सांगितलं होतं. माझ्या गुरूंनी हे सांगितल्यामुळे माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. पण बापूभक्त नसलेल्या लोकांचा यावर विश्वास नाही बसला तर ते पटण्यासारखं आहे. उद्या जर कोणी दुसरे गुरु असं म्हणाले तर मलासुद्धा खरं वाटेल न वाटेल पण नाकारायलाही माझ्याकडे पुरावा नाही त्यामुळे 'असूही शकतं, मला  ठाऊक नाही'  असं माझं मत राहील. पण मी 'हे अशक्य आहे' असं कधीच म्हणणार नाही. ज्या गोष्टी/ व्यक्तीबद्दल मला माहिती नाही आणि पुरावा नाही त्याबद्दल जर मी ठाम मत द्यायला लागले तर माझं मत चुकीचं असण्याचीच शक्यता जास्त नाही का?
एकाची भक्ती म्हणजे श्रद्धा आणि दुसर्याची म्हणजे अंधश्रद्धा असं कसं !

>>पण अमुक एका व्यक्तीमुळे मला कॅन्सर झाला नाही हे म्हणणे अंधश्रद्धेकडे झुकणारे आहे.
>>>>
पण हे खरेही असू शकते ना? :)>> हे कसं काय ऋन्मेष? जरा उलगडून सांगणार का?
म्हणजे बॉलिवूड पिक्चरमध्ये, हिंदी सिरियल्समध्ये अगदी शक्य आहेच पण रियल लाईफमध्ये कसं काय ते सांग.

उद्या जर कोणी दुसरे गुरु असं म्हणाले तर मलासुद्धा खरं वाटेल न वाटेल पण नाकारायलाही माझ्याकडे पुरावा नाही त्यामुळे 'असूही शकतं, मला ठाऊक नाही' असं माझं मत राहील. >> ताई, तुम्हाला असं वाटत असेल, पण साधारणपणे `बर्डन ऑफ प्रूफ' (अर्थात सिद्ध करण्याची जबाबदारी) हे क्लेम करणार्‍याकडे असतं. `मी क्लेम करतो, तो तुझ्याकडे डिसप्रूव्ह करायला पुरावा नसेल, तर खरा आहे' असं चालत नाही. दावा करणार्‍यावरच तो सिद्ध करणार्‍याची जबाबदारी असते साधारणपणे.

ह्याबद्दल https://en.wikipedia.org/wiki/Philosophical_burden_of_proof येथून -

Shifting the burden of proof
One way in which one would attempt to shift the burden of proof is by committing a logical fallacy known as the argument from ignorance. It occurs when ... a proposition is assumed to be true because it has not yet been proved false.

>>जर गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा असेल तर ती गणपती नावाचा एक देव आहे ईथपासून सुरू होते <<

रुन्म्या, तुझाहि पुतळा बनवुन त्याला दुध पाजवु शकतो (कॅपलरी ॲक्शन), मग तु काय देवत्वाला पोचणार काय?..

बाकि, या बापुंना माबोवर गरज नसताना भरपुर फुटेज मिळालेलं आहे. उन्हे उनके हाल पे छोड दो...

>>बाकि, या बापुंना माबोवर गरज नसताना भरपुर फुटेज मिळालेलं आहे. उन्हे उनके हाल पे छोड दो...>> हे अगदी खरं आहे.
हा लेखही बापूंचं मार्केटिंग करायला लिहीला असावा असं समजायला चान्स आहे.

जर गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा असेल तर ती गणपती नावाचा एक देव आहे ईथपासून सुरू होते <<
रूनमेशभौ...काय बात आहे.. खतरनेक ड्युलॉग...

मि लेककासी सहमत आहे. मी स्वत shankar maharajana manato dhanakwadi chya.

काय हे सायो. किती baseless personal alliegation . मी इकडे UK मध्ये, बापू तिकडे भारतात आणि त्यांना काय पडलय तुम्ही त्यांना माना न माना. मला अनुभव आला. मला वाटलं की लोकांशी share करावा. But I have realised this is not the place!

पुराणातही देवांच्या नावावर कैक चमत्कार आहेत. ज्यांना शास्त्रीय आधार नाही. आणि त्या चमत्कारांच्या आधारावरच देव या संकल्पनेचे अस्तित्व आहे. अन्यथा त्यांना देव न म्हणता फक्त पराक्रमी योद्धा म्हटले गेले असते. उदाहरणार्थ अर्जुन पराक्रमी योद्धा पण श्रीकृष्ण हा देव.

पण हे खरेही असू शकते ना? :)>> हे कसं काय ऋन्मेष? जरा उलगडून सांगणार का?

>>>>>

मी म्हणालो की खरेही असू शकते ना?
व्याकरणदृष्ट्या विचार करता माझे विधान प्रश्नार्थक आहे. मी ते खरेच आहे असे कुठेही म्हटले नाही. तुम्ही ते खोटे आहे असे ठामपणे म्हणत असाल तर तसे सिद्ध करा अन्यथा तुमचे मत "हे खोटे असू शकते" असे समजण्यात येईल Happy

भक्ती,श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्यातली रेषा खूप धूसर आहे.
अशा गोष्टींचा उच्चशिक्षीत लोकांवर इतका पगडा आहे तर सामान्य माणसांवर किती असेल. अर्थात मनाचा स्ट्राँगनेस शिक्षणावरच अवलंबून असतो असं नाही, पण शिक्षणाने याचा फोलपणा समजायला मदत व्हावी अशी अपेक्षा असते.
मायबोलीवर अशी खूप लोक असतील की ज्यांनी कधी बुवा, माता, कुंडली, अंगठ्या, कालसर्प इ. पूजा, अभिषेक, व्रत वगैरे केलं नसेल. त्यांच्यावर, किंवा त्यांच्या जवळच्यांवर अनेक संकट नक्कीच आली असतील. त्यावर त्यांनी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यापुढे न झुकता, मन शांत ठेवून निर्णय घेतला असेल, तोंड दिलं असेल.
खरचं एक धागा कोणीतरी काढायला हवा जिथे स्ट्राँग माणसे स्वतःवर (किंवा जवळच्यांवर ) आलेले प्रसंग, त्यावर केलेली मात इ. सांगू शकतील.
त्यामुळे अशा अशा गोष्टी मानू नका हे सांगणे 'एखाद्याच्या श्रद्धेवर केलेली ह्रदयशून्य टीका' वाटणार नाही. आणि कदाचित इतर बर्‍याच लोकांना शिकायला आणि आत्मपरिक्षण करता येईल.
यात लोकांचे जमले तर प्रबोधन होईल आणि नक्कीच खूप फायदा होईल असे वाटते.

अनिरुद्ध बापूंनी (निर्भया घटनेनंतर) ३ जानेवारी २०१३ ला केलेल्या भाषणातील काही वाक्ये पुढीलप्रमाणे -......>>>>खरेच असे बोलणारे लोक म्हणजे किती स्वार्थी आहेत बघा....
जो कोणी त्यांचा जप करणार त्यांनाच हे मदत करणार, बाकिच्या लोकांवर कितीही अन्याय होऊ दे, निष्पाप मुलांवर कसाही अत्याचार होऊ दे पण ते माझ्या पाया पडत नाही ना मग मी कशाला मदत करु?
मान्य कि हे लोक चांगले काम सुद्धा करत असणार पण कधी?....तर बाकिचे लोक जेव्हा देणग्या देऊन यांचे खिसे भरणात तेव्हाच.

मी अनिरुद्ध बापूंचे असंख्य अनुभव घेतले आहेत....कसे बरे? प्रत्येक वेळी स्वप्नात येऊन कि प्रत्यक्षात practically भेटून, पैशाची मदत किंवा तुमच्याकडे येऊन, तुम्हाला वेळ देऊन?
जर ते सोडून दुस-या कोणी मदत केली असेल तर कृपाकरून त्याचे श्रेय फक्त त्यालाच द्या बापूंना नको.
आणि जर बापू स्वप्नात येऊन तुमची मदत करत असतील तर स्वप्नातच त्यांना नमस्कार करा, देणग्या द्या काय हवे ते करा. कारण तुमच्या स्वप्नातले अनुभव हे त्यांचे अनुभव नाहीत तर ते फक्त तुमचे अनुभव आहेत. तुमच्या मनाला सतत मनोबल वाढण्यासाठी दुसरे कोणीतरी हवे असते. त्या मनाला त्यातून स्वतंत्र करायचा प्रयत्न करा. जे जवळ आहेत त्यांना श्रेय द्या, त्यांचे आभार माना.

>>मी म्हणालो की खरेही असू शकते ना?
व्याकरणदृष्ट्या विचार करता माझे विधान प्रश्नार्थक आहे. मी ते खरेच आहे असे कुठेही म्हटले नाही. तुम्ही ते खोटे आहे असे ठामपणे म्हणत असाल तर तसे सिद्ध करा अन्यथा तुमचे मत "हे खोटे असू शकते" असे समजण्यात येईल :)>> शब्द्च्छल करत बसण्यात इंटरेस्ट नाही आणि पुराणातली वांगी पुराणात.
मला वाटल्म तुझ्याकडे फर्स्ट हँड अनुभव असतील आणि त्याच्या जोरावर म्हणतो आहेस, तर कसलं काय!!!!

Pages