जराही घाबरू नकोस - भाग २

Submitted by आनन्दिनी on 27 January, 2017 - 05:56

मुलांचे हाल बघून मानवी आईवडीलसुद्धा कळवळतात. बापू , नंदाई तर साक्षात परमेश्वर. ते आपल्या लेकराला किती वेळ दुःखात राहू देतील. रात्री मी झोपले आणि स्वप्नात बापू आणि नंदाई !! स्वप्नातही हे गाठीचं संकट मी विसरले नव्हते. मी नेहमी बापू बापू करत असते. पण त्या दिवशी स्वप्नात मात्र मी जाऊन नंदाईच्या पायांना घट्ट मिठी मारली. मी जागेपणी जे म्हटलं होतं की "मला आई इथे हवी आहे" त्यामुळेच असावं असं मला वाटतं . तर मी आईचे पाय घट्ट धरून विचारलं "आई मी घाबरू नको ना?" आणि नंदाईने अगदी firmly सांगितलं "जराही घाबरू नकोस"
     सकाळी उठल्यावर मला इतकं बरं वाटलं ..... आईने सांगितलंय ना घाबरू नको, मग ठीक आहे. खरंच आम्ही सगळे खूप रिलॅक्स झालो. जगातली कोणती गोष्ट बापू, आई आणि दादा यांच्या शब्दाबाहेर जाणार आहे! As expected एका आठवड्याने रिपोर्ट व्यवस्थित आला. कँसर दिसत नव्हता. डॉक्टर मात्र अजूनही convinced नव्हते. अजून MRI आणि मोठी बायाॅप्सी करायचं ठरलं . इथे मुद्दाम हे सांगायला हवं की हे सगळं NHS मध्ये म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्ये, म्हणजे डॉक्टर चा वेस्टेड इंटरेस्ट असण्याची शक्यता नाही. तर MRI केला. अजून मोठी बायोप्सी केली. या सगळ्या इन्वेस्टीगेशन्स होऊन रिपोर्ट्स यायला दोन महिने लागले.  कॅन्सर नाहीये, फक्त इन्फेकशन आहे, (जे अँटिबायोटिक्सनी कमी होतंय)  आता १३ जानेवारीला फायनल रिपोर्ट आला. पण नंदाईने टेस्टच्या रात्रीच रिपोर्ट दिला होता. त्यामुळेच हे सगळे दिवस आम्ही नीट काढू शकलो. त्याबद्दल  अंबज्ञ (कृतज्ञ) राहू तेवढं कमीच !!
     या साऱ्या गोष्टीत मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या कठीण काळात राकेश solid as a rock सतत माझ्याबरोबर होता, बाबा भारतातून तडक आले, आई आणि नणंद गुरुक्षेत्रमला चंडिकाहवन करत होत्या, रोज माझ्याशी बोलून मला धीर देत होत्या, माझे दीर जाऊ जे डॉक्टर्स आहेत ते माझ्या डॉक्टरशी वेळोवेळी बोलत होते. रात्री २-३ ला सुद्धा माझा रिपोर्ट आल्या आल्या माझ्याशी बोलत होते, धाकटी नणंद गुरुचरित्राचा १४वा अध्याय वाचत होती. सुमेधावीरा आणि इतर मित्रमंडळी फ़ोन करून चौकशी करत होती. ह्या सगळ्या लोकांना आपापली बिझी लाईफ आहे पण आमच्या संकटात हे सगळे खंबीरपणे आमच्याबरोबर उभे राहिले . यात निर्विवादपणे या सगळ्यांचा चांगुलपणा, संस्कार आहेतच पण त्याचबरोबर मला श्रीमद्पुरुषार्थामधली बापूंची वाक्यं आठवतात, "आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपण अनेकांचं लाडकं व्हावं. या संपूर्ण विश्वाचा चालक परमेश्वर आहे. तो माझ्या आवडीचा झाला तर मी त्याच्या आवडीचा होईन आणि मग एकदा का माझ्या मनात परमेश्वराचं प्रेम आणि त्याची आवड स्थिरावली की मग त्याच्या शक्तीमुळे अनेक जण माझ्यावर प्रेम करू लागतात." माझ्या बाबतीत मी हे खरंच अनुभवलं . काय होऊ शकलं असतं आणि बापूनी कसं अलगद बाहेर काढलं हा विचार केला की माझं मन भरून येतं . "तुमचा मी भार वाहीन सर्वथा , नव्हे हे अन्यथा वचन माझे " बापू सर्वार्थाने  त्यांच्या वचनाला जागले. त्यांनी रोगापासून तर मला वाचवलच, पण diagnosis च्या स्ट्रेसपासून सुद्धा त्यांनी आमच्या कुटुंबाला वाचवलं.
     बापू सगळं भरभरून देतात आणि तरीही मनुष्यस्वभावानुसार मी मागतच रहाते पण आता इतर सगळं मागताना मी बापूंच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे मागते
"हरो त्रिताप हमारे , दो सुखकी छाया
तुझेही तुझसे मांगने तेरी शरण आया
 ॐ जय अनिरुद्ध प्रभो"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटल्म तुझ्याकडे फर्स्ट हँड अनुभव असतील आणि त्याच्या जोरावर म्हणतो आहेस, तर कसलं काय!!!!>>> तो काहीही म्हणत असतो, पण तो खोटे कधी बोलत नाही हां Proud

मला वाटल्म तुझ्याकडे फर्स्ट हँड अनुभव असतील आणि त्याच्या जोरावर म्हणतो आहेस, 
>>>

मी अनुभव घ्यायला ना कधी कोणत्या बापूंच्या घरी गेलोय ना कोणत्या देवाच्या दारी गेलोय. मला यांची गरज नाही. पण ज्यांचा देव आणि बापूंवर विश्वास असेल त्यांना खोटे ठरवणे जे मी फार आधी करायचो ते आता बंद केलेय ईतकेच. थोडक्यात सांगायचे झाल्यास मी श्रद्धा पाळत नाही आणि कोणाच्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणत नाही Happy

आणि हो, एखादा आसाराम बापू जेव्हा गुन्हेगार आहे हे समजते तेव्हा मात्र एखाद्या गुन्हेगाराचा जितका तिरस्कार करावा तितकाच त्याचाही करतो.
अन्यथा जसे एखाद्या गे जोडप्याचा मला (किंवा समाजाला) काही त्रास होत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या बापू-भक्त जोडीचा मला (किंवा समाजाला) त्रास होत नसेल तर मग का उगाच माझा विश्वास नाही म्हणून त्यांच्या मागे हात धुवून लागा. जगू द्यावे त्यांना त्यांच्या विश्वासासह त्यांच्या जगात Happy

. फक्त गणपती नावाचा एक देव आहे ही माझ्या मते श्रद्धा आहे.
>>
जिद्न्यासा - ही तरी श्रद्धा कशी ठरणार ग? प्रूव कुठे झालय की गणपती आहे वगैरे? सगळ्याच अंधश्रद्धा की!
माझा अनिरुद्धबापूंवर - त्यांच्या वक्तव्यावर विश्वास नाही.
पण आनिंदिताच्या अनुभवावर अविश्वासही नाही. हा माझा अनुभव नाही - किंवा त्यांच्या संदर्भात काहीच अनुभव नाही - हे माहितीये मात्र.
आणि फसवणूकीची शंका असली तरी लांब रहावं असं वैयक्तिक मत असल्यानं - मी त्या फंदातही पडत नाही.
पण मला अनुभव नाही - त्या अनुभवाची शहानिशा करण्याकरता जो वेळ - पैसा वा इमोशनल इनवोल्मेट जे लागेल ते द्यायची माझी तयारी नाही - तर शहानिशा न करता ते खोटच आहे - हे म्हणणं कितपत logical - हा प्रश्न मात्र खरच प्रामाणिक आहे.

actually मी लिहिलय त्याचं दुसरं टोक म्हणजे येणारा प्रत्येक अनुभव त्याच त्याच logic मधे बसवून बुवा बापूंच्या आहारी जाणं हा आहे - त्यामुळे टण्या - भाचा - जिद्न्यासा आदी व्यक्तींचं लिहिणही योग्य आहे.

नानबा, श्रद्धा = belief/faith अंधश्रद्धा = blind faith/belief. Both can't be proved. But faith can, in most cases, help you in keeping your morale up and give strength to sustain while blind faith often leads you to being very vulnerable. It's a thin line between the two and one must trust his/her own best judgement to define it.
ह्या धाग्यावर मला लिहावेसे वाटत नाहीये आता. तेव्हा हेमाशेपो.

जिज्ञासा आपली श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या अचूक आहे.

प्रश्न फक्त एखाद्या विश्वासाला श्रद्धेत मोजावे की अंधश्रद्धेत याचा आहे आणि हे प्रत्येक जण स्वत:पुरते ठरवतो. त्यामुळे आपण विरोध त्या विश्वासाला न करता त्यामुळे काही अनिष्ट घडत असेल तर त्याला करावा. उदाहरणार्थ, नरबळी किंवा सतीची प्रथा.

प्रश्न फक्त एखाद्या विश्वासाला श्रद्धेत मोजावे की अंधश्रद्धेत याचा आहे आणि हे प्रत्येक जण स्वत:पुरते ठरवतो. त्यामुळे आपण विरोध त्या विश्वासाला न करता त्यामुळे काही अनिष्ट घडत असेल तर त्याला करावा. उदाहरणार्थ, नरबळी किंवा सतीची प्रथा.
>>>
हे पण रिलेटिवच आहे ऋन्मेष. नरबळी किंवा सती हे उदाहरण सोपे आहे कारण यात थेट मनुष्यवध आहे. पण बापूंच्या भक्तांनी आपल्या मुलांना बापूंचे भक्त बनवून केलेला अब्युज अनिष्ट मानावा की नाही? प्रस्तुत लेखिकेची मुले उद्या सुशिक्षित अंधश्रद्ध बनली तर समाजाचे नुकसान अनिष्ट मानावे की नाही?

@ लेखिका: आइनस्टाइनवगैरे बडबड जी केलीत वर ती मात्र चुकीची आहे. आइनस्टाइनचा कुठल्याच प्रकारच्या देवावस विश्वास नव्हता. त्याची ही जे देवासंबंधीची वक्तव्ये उद्धृत केली जातात ती अत्यंत वेगळ्या संदर्भात (क्वांटम/प्रोबॅबिलिटी) चाललेल्या त्याच्या व इतर शास्त्रज्ञांच्या चर्चेत येतात. त्याचा आणि देव असण्याचा वा आइन्स्टाइनचा देवावर श्रद्धा असण्याचा काहिही संबंध नाहिये.

"प्ररब्धाचा भोग" हे चित भी मेरी पट भी मेरी पळवाट आहे. कँसर झालेल्यांनी अमक्या बुवाचा जप करा, बरा झाला तर बुवांची कृपा, नाही तर प्रारब्धाचा भोग!.

पूर्वी देवी सारखे रोग होते. ते रोग बरे करणे दूर राहिले, मुळात ते का होतात हेही माहित नव्हते. देवीच्या अवकृपेमुळे झालेला रोग म्हणून देवी असे नाव पडले. असंख्य ज्ञात अज्ञात शास्त्रज्ञ, डॉकटर, कंपाऊंडर, वगैरे लोकांच्या अथक परिश्रमातून तो रोग आज समूळ नष्ट झालेला आहे. मलेरिया, पोलिओ हेही तसेच. बाळंतपण म्हणजे दुसरा जन्म असे पूर्वी मानत. कारण अनेक स्त्रिया काँप्लिकेशन्स ने मरत. ते प्रमाण आज बरेच कमी आहे. कारण तेच. भारतातील बुवा बापूंची प्रचंड संख्या लक्षात घेता हे रोग आधी आपल्याकडूनच जायला हवे होते. कोणत्याही बुवा बापूने आपल्या मंत्र सामर्थ्यावर हे रोग नष्ट केलेले नाहीत. विज्ञानाने केले.

अशा एखाद्या बुवा बापूवरील श्रद्धा व गणपतीवरील श्रद्धा यांना एकाच पारड्यात तोलणे चूक आहे. म्हणलं तर दोन्ही अंधश्रद्धाच पण एक बिनाईन व दुसरी बिनाईन नाही. इथे गणेशोत्सव होतो. लोक आपल्या घरच्या आराशीचे व नेवेद्याचे फोटो टाकतात. कुणी नवरात्रीचे फोटो टाकतात. कोणीही टीका करत नाही. "प्रवासाला निघताना मी स्वामी समर्थांच्या "भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे" असे लिहिलेल्या फोटोला नमस्कार करतो" असे कुणी लिहिले तर त्यावरही टीका होत नाही. मग बापू ( किंवा नरेंद्र महाराज, सत्य सईबाबा, ..) अशांवरच टीका का होते याचा अंतर्मुख होउन विचार कराल का प्लीज ?

जाता जाता: आज रामकृष्ण परमहंस असते तर कदाचित त्यांच्या रोगाचे अचूक निदान व उपाय झाले असते व साक्षात कालिमातेला जे करता आले नाही ते एखाद्या यकश्चित एम डी डॉक्टर ने केले असते. थोडेसे ऑफेन्सिव्ह वाक्य आहे हे, पण यावरही विचार व्हावा.

आनन्दिनी, तुमची ही पोस्ट मी आत्ताच वाचली.
>>निर्भया घटनेनंतर बर्याच भक्तांनी बापुना आपल्या मुलींच्या बहिणींच्या सुरक्षेबद्दल विचारलं होतं. त्याला उत्तर देताना बापूनी हे सांगितलं होतं. माझ्या गुरूंनी हे सांगितल्यामुळे माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. >> म्हणजे एखाद्या मुलीवर रेप व्हायची शक्यता असताना तिने तुमच्या बापूंचा मंत्र म्हटला तर तिच्यावरचा रेप टळणार ह्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे असं म्हणताय?
एखाद्याला गुरुस्थानी मानलं की त्यांनी का ही ही बोललं की त्यावर सारासार विचार न करता डोळे झाकून विश्वास ठेवायचा? कुठे जात असावी लोकांची बुद्धी?

अर्जुनाने त्याला देव मानून स्वतःचा उद्धार करून घेतला तर दुर्योधनाने आयुष्यभर त्याला गवळी म्हणून हिणवून स्वतःच्या आयुष्याची माती केली. मी अर्जुनाला फॉलो करत्येय. तुमचं तुम्ही ठरवा.>> नक्की ना? कारण मला माहित असलेल्या महाभारताप्रमाणे दुर्योधनाला क्षत्रीयधर्माचं पालन, आणि गाजवलेल्या पराक्रमामुळे स्वर्गप्राप्ती झालेली, आणि इव्हेन्चुअली देवत्व प्राप्त झालेलं. तर अर्जुन स्वर्गापर्यंतही पोहोचू शकला न्हवता. कृष्ण्याच्या मृत्यूनंतर द्वारकेच्या नागरिकांना आणि १८००० बायकांना घेऊन येत असताना झालेल्या युद्धात त्याचा संपूर्ण पाडाव झालेला, गांडीव आणि इतर शक्ती गळून पडल्या होत्या. त्याला शेवटी स्वर्गप्राप्ती त्याच्या ठायी असलेल्या गर्वामुळे मिळाली न्हवती.

बापूंच्या भक्तांनी आपल्या मुलांना बापूंचे भक्त बनवून केलेला अब्युज अनिष्ट मानावा की नाही? प्रस्तुत लेखिकेची मुले उद्या सुशिक्षित अंधश्रद्ध बनली तर समाजाचे नुकसान अनिष्ट मानावे की नाही?
>>>>>

टण्या, हे ऊत्तर तुम्ही पुन्हा बापूंवरच्या श्रद्धेला अंध कॅटेगरीत ढकलून केले आहे. अन्यथा सारेच आईबाप आपल्या पोरांना देवबाप्पा करायला शिकवतातच. माझ्या आईवडिलांच्या कृपेने मी सुद्धा लहानपणी देवदेवच केले. पुढे मोठे झाल्यावर माझ्या स्वत:च्या विचारांनुसार ते बंद केले आणि घरात माझ्या या विचारांचा आदर ठेवला गेला. तो न ठेवला गेला तर ते चूक. मग ती देवावरची श्रद्धा असो वा बापूंवरची..
नरबळी सती हे उदाहरण आपली श्रद्धा दुसरयांवर लादणे या अर्थाने पटकन समजावे म्हणून टोकाचे दिलेय. मागे जैन धर्मात एका मुलीला 65 दिवसांचा ऊपवास करायला लावून तिचा जीव घेतला ते देखील गैरच. 65 दिवसच का, अगदी एक दिवसाचा उपवास देखील त्यांच्या तब्येतीला हानीकारक असेल तर ते चूकच. पण सगळेच बापूबापू करणारे किंचा सगळेच देव देव करणारे असे करत असतील असे नाही.

बापू स्वप्नात आल्यामुळे तुम्हाला मनःशान्ती मिळाली असेल तर ते उत्तमच आहे. त्याबद्दल दुसर्यांना आक्षेप घेण्याचा हक्क नाही आणि कारणही नाही.

तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे तुमची दैनंदिन रोजीरोटी विज्ञानाच्याच आधारावर चालली आहे. मात्र ‘त्यांनी रोगापासून मला वाचवलं’ असं लिहून तुम्ही या विज्ञानालाच नजरअंदाज करता आहात असं वाटतं.

माझ्यासारखा तटस्थ वाचक (ज्याला बापूंवरील भक्तीत रस नाही मात्र त्याचा राग वा त्रासही होत नाही) जेव्हां तुमचा लेख वाचतो तेव्हां त्याचा असा अर्थ लावतो – पहिल्यांदा तुम्हाला कॅन्सर होता. बापू स्वप्नात आले आणि त्यांनी कॅन्सरचा नायनाट केला. साहाजिकच तुमचे रिसल्ट निगेटिव्ह आले. आता थोडंफार इन्फेक्शन राहिलं आहे त्यासाठी बापूंच्या शक्तीची जरूर नाहिये. ते काम डॉक्टरांच्या आवाक्यातलं आहे आणि त्यांच्यावर सोडलं आहे.

Pages