संभ्रम-ध्वनी (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 27 October, 2016 - 03:47

मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती.

कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली.

कार्तिक त्याच शहरातला, आई वडीलांन बरोबर राहणारा. तेवीस वर्षाचा, रुंद खांदे असणारा, नुकतीच दाढी मिशा ठेवायची सवय, कार्तिक ने सरळ ताराला त्याचा मोबाइल नंबर दिला. आपण पाच मिनिट कुठे ही एका कॅफे मध्ये भेटू असा म्हटला. ताराला तो बरा वाटला, पण एकदम भेटण्याचे तिला दडपण आले होते.

ते एका आठवड्या नंतर भेटले, तारा अबोल होती, त्यातच तिने आपल्याबद्दल काही बोलाचेय नाही असे ठरवले होते. कार्तिक ही अबोल होता पण कार्तिक ने खूप प्रश्न विचारले. काय आवडते, काय करतेस, शहर आवडले का आणि बरच काही. मग ताराने पण भरपूर गप्पा मारल्या. तिची कॉफी थंड होऊन गेली पण गप्पा नाही संपल्या.
संध्याकाली घरी परत येताना आपण खूप दिवसांनी बरच बोललो असे तिला वाटले, कार्तिकही तिला चांगला वाटला पण परत भेटायला नको असे तिने ठरवले, पण तिच्या लक्षात आले की कार्तिक बद्दल आपण काहीच विचारले नाही.

तिने लगेच कार्तिक ला फोन केला "मी तुला फोन करणारच होतो" कार्तिक म्हटला.
"हो का? मग का नाही केलास?" तारा ने विचारले. हे ऐकून कार्तिक हसला.
"ऐ ऎक ना, तू काय करतोयस मी विचारलेच नाही"
"फायनली तुझ्या लक्षात आले तर" कार्तिक हसत म्हटला.
"ऐ सांग ना" तारा ने परत विचारले.

मी सिविल इंजिनियर आहे, आधी जॉब करत होतो, आता नवीन जॉब शोधतोय" कार्तिक ने सांगितले.
"मला वाटले तू जॉब करतोयस" ताराला आश्चर्य वाटले.

"आधी होता, मग काढून टाकले, बघ ना तुझ्या कंपनी मध्ये माझ्यासाठी एखादी नोकरी" कार्तिक ने अगदी सहज विचारले.

तारा एकदम गप्प झाली. तिने तिच्या कंपनाचे नाव हीं खोटे सांगितले होते. एकदम कोणा वर जास्त विश्वास ठेवायचा नाही हे ती नंदिनीकडून शिकली होती, नंदिनी तिची मोठी बहीण होती.

नंदिनीने बाबांच्या विरोधात जाऊन ध्रुवशी लग्न केले होते.

"परत घरी येऊ नकोस" असे बाबांनी तिला सुनावले होते.

ती ताराला ही घराबाहेरच भेटायची. ताराला ध्रुव आणि नंदिनीचा हेवा वाटत असे. आपल्याला ही ध्रुव भाऊजीं सारखे कोणी भेटावे असे तिला नेहमी वाटत असे. पण ध्रुवला जर्मनी मध्ये नोकरी मिळाली आणि तो जो तिकडे गेला तो परत आलाच नाही, नंदिनी ला फोन करणे ही त्याने कमी केले, थोड्या दिवसांनी कळले की त्याने तिथे दुसरा संसार सुरु केला आहे. घटस्फोट देण्यासाठी ही परत येत नव्हता. अशात नंदिनीची दोन वर्ष वाया गेली, ती परत तारा आणि बाबांच्याकडे राहायला आली. "परत लग्न कर" हा बाबांचा सल्ला ही तिने ऎकला नाही. ताराला तिची अवस्था बघवत नसे. आपल्या ताईचा विश्वासघात करून हा माणूस तिथे आरामात राहतोय याचा तिला खूप राग येत असे.

तिने तेव्हाच ठरवेल होते, कधी कोणावर जास्त विश्वास ठेवायचा नाही.

ताराला नंदिनीची आठवण आली, तिने लगेच तिला फोन केला.
"काय अजून झोपली नाहीस?" नंदिनीने विचारले.
"झोपणारच होते, सहजच फोन केला" तारा म्हटली. थोडे बोलून तारा ही झोपून गेली.

कार्तिक रोज फोन करत असे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्या आधी, तारालाही त्याच्या बरोबर गप्पा मारायला आवडत असे. "आज भेटणार का?" कार्तिक हे रोज ताराला विचारात असे, ताराला ही नाही म्हणता येत नसे.

"तुझ्या ऑफिस जवळ आपण भेटू" कार्तिक असे ठरवत असे, पण कार्तिकला ताराचे ऑफिस कुठे आहे हे ही माहीत नव्हते. ताराने ती कुठे राहते हे सांगितले नव्हते. कार्तिक ने कधी जास्त विचारले नाही पण कार्तिक त्याच्या बद्दल सगळे सांगत असे. त्याने ताराला घरी बोलावले होते, त्याच्या घरी असे एकदम कसे जायचे, त्याचा आई वडिलानां कसे भेटायचे, ताराला त्याचे दडपण वाटले, त्यामुळे ती कधी त्याच्या घरी गेली नाही.

आणि जे होणार होते तेच झाले, दोघे ही एकमेकांच्या प्रेमात पडले. ताराला हे माहीत होते की कार्तिक स्वतःहून विचारणार नाही आणि ताराला ही त्याची मैत्री गमवायची नव्हती.पण एक दिवस ताराला राहवले नाही आणि तिने कार्तिक ला "मिस यु" असा मेसेज केला, कार्तिक ने त्याला "मिस यु टू" असे लगेच उत्तर दिले.

तारासाठी कार्तिक हे पहिले प्रेम होते, कार्तिकला ही ताराशिवाय करमत नसे.

कार्तिक ताराला प्रेमाने "बॉस" असे म्हणत असे."तू माझी बॉस आहेस, तू जे सांगशील ते मी करीन" कार्तिक असे म्हणत असे. ताराला त्याचे असे बोलणे आवडत असे.

"तू फेसबुक वरचे रेलेशनशिप स्टेटस बदलेस का" एकदा ताराने कार्तिकला विचारले.
"मी फेसबुक वर नाहीये" कार्तिक शांतपणे म्हणाला.
"का?" ताराला आश्चर्य वाटले.
"माझ्या सगळ्या मित्रांना चांगली नोकरी आहे, त्यांचे अपडेट्स बघून, मला पण कंटाळा आला होता आणि माझ्या कडे साधी नोकरी नाही. मग एकदिवस अकाउंट डिलिट केले"
"भारी, मी पण नाहीये फेसबुक वर" तारा ने सांगितले
आता कार्तिकला आश्चर्य वाटले.

"अरे मी आणि नंदिनीने फेसबुक वर खूप फोटो अपलोड केले होते, पण कोणीतरी बाबांना फोटो दाखवले. बाबा चिडले, सगळे फोटो डिलिट करायला लावले आणि मग अकॉउंट ही डिलिट करायला लावले. मग आम्ही ही कधी नवीन अकॉउंट सुरु केले नाही"

"तू टिंडर वरचे अकाउंट डिलिट केलेस का?" कार्तिक ने विचारले.
"तू केले नाहीस का" ताराने खोट्या रागात विचारले.
"आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हाच डिलिट केले" कार्तिक म्हणाला.
"मी पण" तारा पण लाजत म्हणाली.

दोघही प्रेमात होते, एकमेकांचे होते, सगळे चांगले सुरु असताना एक दिवस ताराचे बाबा तिच्या कडे राहायला आले. बाबांचे असे अचानक येण्याचे कारण ताराला माहिते होते. नंदिनीनेच सांगितले होते.
मी ताराला फोटो वरूनच पसंत केले होते. फेसबुक वर पण शोधले पण तिचे प्रोफाइल काही सापडले नाही. मी तिला भेटायला तयार होतो पण ती तयार नव्हती, शेवटीच बाबांनी खूप विनवण्या केल्या तेव्हा कुठे ती परत घरी आली.

पण हे सगळे तिला कार्तिकला सांगता आले नाही. बाबांसमोर तिला कार्तिकला फोन करता आला नाही, व्हाट्सअप वर तिने मेसेज केले पण त्यावर काही नीट बोलता आले नाही. कार्तिकला ही ती अचानक का गेली हे कळाले नाही. ती अशी का न सांगता गेली याचा कार्तिकला राग आला
घरी पोहचल्यावर ताराने लगेच कार्तिक ला फोन केला.

"मग तू कधी लग्न करणार आहेस?" कार्तिकचा अजून राग गेला नव्हता.
"अरे मी त्याला अजून भेटले पण नाही, मला भेटाचेय पण नाहीये" कार्तिकचा राग आता तारा पर्यंत पोहचला होता.
"जर भेटाचेय नाहीये तर मग का गेलीस?" कार्तिकने उलट विचारले.
"बाबांसाठी घरी आली आहे, मला ताईला ही भेटाचय होते" तारा ने समजावण्याचा प्रयत्न केला.
"परत कधी येणार आहेस?"
"अरे येईल दोन दिवसात, एवढीच जर आठवण येत असेल तर ये इकडे"
"मला नोकरी मिळू दे, मी तुझ्या बाबांना लगेच भेटतो"
"मला आहे ना नोकरी, तू ये इकडे, मला नाही त्या मुलाला भेटाचेय"
"तारा थोडे दिवस थांबू" आता कार्तिक ताराला समजावत होता
"तुला माझ्याशी लग्नच नाही करायच, नाही तर तू आता आला असतास" तारा एकदम रडकुंडी ला आली.
"तारा..काहीही बोलू नकोस, मला नोकरी मिळू दे, मग येतो"

पण ताराला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता, तारा रडायला लागली, तिने फोन बंद केला, कार्तिकने खूप फोन केले, मेसेज केले पण ताराने उत्तर दिले नाही, ताराचे पहिले प्रेम होते, पहिले भांडणे होते, तिला काय करावे कळत नव्हते.

नंदिनी हे सगळे बघत होती, कधीतरी ती ही या परिस्थीती मधून गेली होती. तारा अंधारात बसली होती, ताराला ही फार काळ तिचे दुःख लपवता आले नाही. कार्तिक बद्दल तिने सगळे नंदिनीला सांगितले. नंदिनीने ही कार्तिकची बाजू घेतली. "असा पटकन निर्णय घेऊ नकोस" असा सल्ला ही तिला दिला.
ताराला आश्चर्य वाटले. नंदिनी या सगळ्याला विरोध करेल असे तिला वाटले होते, पण नंदिनीचा याला पाठींबा होता.

"त्या मुलाला भेटून घे, नकार दे, बाबांना मी समजावते" नंदिनीने समजावले, तारा रडतच नंदिनीला बिलगली.
"आता रडू नकोस, मी तुझ्या साठी नवीन पर्स घेतली आहे, ती घेऊन जा"

ताराच्या मना वरचा डोंगर दूर झाला होता. तिने पटकन आवरले आणि मला फोन केला. मी ताराच्या फोनची वाटच बघत होतो. आम्ही ताराच्या घरा जवळच्या कॅफे मध्ये भेटायचे ठरवले.

पावसाळ्याचे दिवस होते, त्या संध्याकाळी पाऊस होता, मी कॅफे मध्ये आधी पोहचलो, तारा अर्धा तास उशिरा आली, पूर्ण भिजली होती.

मी ताराशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला, पण तिने हो-नाही अशीच उत्तर दिली.
मग बराच वेळ झाला, आम्ही काही बोललो नाही.
ताराला फोन आला, तिचा मोबाइल पर्स मध्ये होता, तिला कळालेच नाही. मी ही सांगितले नाही, मला वाटले ताराला तो कॉल घ्यायचा नाहीये.पण परत कॉल आला.

"तुला फोन येतोय" मी म्हटले.

मी काय म्हटले ताराला कळलेच नाही, तिचे लक्षच नव्हते. मी पर्सकडे खुणावले, तिला कळाले, तिने लगेच पर्स उघडली, पर्स पावसाच्या पाण्याने ओली झाली होती, पण फोन वाजत होता, कोणी "कार्तिक हनी" चा फोन होता, मला तेवढे दिसले. तिने फोन उचला, पण कॉल कनेक्ट झाला नाही. फोन मध्ये पाणी गेले होते.
"कार्तिक हनी" चा एक एसेमेस आला, पण मला तो मेसेज वाचता आला नाही. पण तो एसेमेस वाचून ताराच्या चेहऱ्यावरचे सारे रंगच उडाले.

तारा उठून कॅफेच्या बाहेर गेली, मी ही तिच्या मागे गेलो. तिने फोन करायचा बराच प्रयत्न केला, पण शेवटी फोन बंद झाला.

मी लगेच माझा फोन तिला दिला. तिने नंबर डायल केला, फोन लागला, पण तो रॉन्ग नंबर होता. तारा ने परत नंबर आठवला, परत डायल केला, पण तोही रॉन्ग नंबरच होता. त्या ऐसेमेस मुळे तारा अस्वस्थ झाली, मला तो एसेमेस काय होता ते कळाले नाही.

आम्ही पटकन जवळच्या एका मोबाइल दुरुस्ती दुकानामध्ये गेलो. त्याने मोबाइल बघूनच, 'वॉटर डॅमेज' आहे दुरुस्त होणार नाही असे सांगितले.

मी पटकन एक हजारची नोट त्याला दिली, "लवकरात लवकर दुरुस्त करून द्या" अशी विनंती वजा सूचना केली. "पैश्याची काळजी करू नका" असे ही सांगितले.
त्याने उद्या सकाळी या असे सांगितले.

"आज रात्री बघतो आणि रिपेअर झाला तर उद्या सकाळी देतो" तो माणूस आम्हाला म्हटला. "लगेच होणार नाही का?" ताराने विचारले. त्याने मानेनेच नाही म्हणून सांगितले.
आम्ही शॉपच्या बाहेर आलो, तारा काही बोलण्याच्या स्थिती मध्ये नव्हती, मी तिला घरापर्यंत सोडले, तिचा निरोप घेतला आणि घरी आलो.

मी सकाळी परत त्या शॉप कडे गेलो, माझ्या आधी तारा आली होती, ती रात्रभर झोपली नसणार, एवढे मला तिच्याकडे बघून कळाले. आम्ही साहजिकच काही बोललो नाही. तो माणूस थोड्या वेळाने आला.
त्याने दोन हजार मागितले, ताराने एटीएम मधून पैसे काढले, माझे कालचे पैसे मला परत केले.

"सिम कार्ड्स डॅमेज झाली आहेत. मोबाइल फॉरमॅट केला आहे, पण काँटॅक्टसचा बॅकउप घेऊन ठेवला होता" तो माणूस आमच्याकडे फोन देत म्हटला.

हे ऐकून ताराच्या जीवात जीव आला. ताराने लगेच, "कार्तिक हनी" ला फोन लावला, तिच्या फोन मधले सिम कार्ड डॅमेज आहे, हे तिला कळले नाही.
मी माझा फोन ताराला दिला, माझ्या फोन वरून तिने कार्तिकचा नंबर डायल केला.
फोनची रिंग वाजत होती.

पण त्या कॉलला काही उत्तर आले नाही.

ताराने परत फोन केला, परत रिंग वाजली, पण परत उत्तर मिळाले नाही.

तारा ने व्हाट्सएप वर मेसेज केले, एसेमेस केले.

मला तर ती विसरून गेली होती, मला ही ऑफिसला जायचे होते, मी ताराचा निरोप घेऊन निघालो.

मी नंतर ताराला भेटलो नाही. मी परत फोन नाही केला. मला माझे उत्तर मिळाले होते, ती "कार्तिक हनी" बरोबर सुखी असेल असा विचार करून मी ताराचा विषय डोक्यातून काढून टाकला.
जेमतेम सहा महिने झाले होते, मी ताराला विसरलोच होतो, पण अचानक एकेदिवशी ताराच्या वडिलांचा फोन आला.

"तुमचे ठरले नसेल तर ताराला एकदा भेटा" अशी विनंती केली. मला याचे आश्चर्य वाटले. तारा आणि कार्तिक चे काय झाले? त्यांचे लग्न का नाही झाले? असे प्रश्न मला पडले.

मी ताराला भेटलो, या वेळेस ती स्वतः हुन बोलत होती. "मीच बाबांना तुम्हाला फोन करायला सांगितले" असे ही म्हणाली. मला ती आनंदी वाटली. मी तिला कार्तिक बद्दल विचारले नाही आणि तिने ही काही विषय काढला नाही.

मला एवढे माहीत होते की कार्तिक बरोबर जर तिचे नाते असते तर तिने कधीच माझ्याशी लग्न केले नसते.

हो, आम्ही लग्न केले. "तू माझ्या बरोबर आनंदी राहशील ना?" माझ्या या प्रश्नाला ती हसून "हो" म्हटली. मग मी ही आनंदाने तिच्याशी संसार सुरु केला.

मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती. तो मेसेज काय होता? मला नंतर ताराने कार्तिक बद्दल अगदी थोडक्यात सांगितले, मी सुद्धा जास्त विचारले नाही.

तिला हे कधी कळले नाही आणि कळू ही नये की त्या रात्री तिला घरी सोडल्यावर मी परत त्याच मोबाईल दुरुस्ती दुकानात गेलो. मी तिच्या मोबाईल मधला कार्तिकचा नंबर बदलला. मी "कार्तिक हनी" या नावाखाली माझ्याकडचा नवीन नंबर सेव्ह केला आणि मला माहित होते की ताराला कार्तिकचा नंबर पाठ नाहीये.
ताराने ही तिचा जुना नंबर बदलला.

ते परत कसे भेटले नाही याचे मला ही फार आश्चर्य वाटले. त्यांचे तकलादू नाते एका फोन नंबर वरच अवलंबून होते. फोन नंबर बदलला आणि नाते ही संपले.

मी असे का केले, मला माहित नाही, पण त्या दिवशी मला ताराचा राग आला होता. तिचा बॉयफ्रेंड होता तर मग मला कशा भेटायला आली? फोनवर ही नकार देता आला असता.

मला कधीतरी असे वाटते की, मी जे केले ते चुकीचे होते का? पण मग दुसरे मन म्हणते, जर तारा आणि कार्तिक चे नाते घट्ट असते, तर त्यांचे लग्न झाले असते.

पण एवढे मात्र खरे की ते दोघे कधी परत भेटले नाहीत.

कारण आज ही ती कार्तिकच्या नंबर वर फोन करते, एसेमेस करते, पण त्या नंबर वरून तिला कधीच रिप्लाय येत नाही. तिला आज ही असे वाटते की तो नंबर कार्तिकचा आहे आणि जेव्हा ती त्या नंबर वर फोन करते तेव्हा माझ्या कपाटातल्या खणा मधला फोन व्हायब्रेट होतो.

चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपाटातल्या खणा मधला व्हायब्रेट होणारा फोन गुपीत फोडू शकतो. त्याने ते सीम काढून फेकून कसे दिले नाही याचे आश्चर्य वाटते.

एकीकडे तो त्यांचे तकलादू नाते एका फोन नंबर वरच अवलंबून होते असे म्हणतो पण त्यांचे आत्ताचे नाते एका विश्वासघातावर अवलंबून आहे असे त्याला वाटत नाही. मनाची सोयिस्कर समजूत घातली आहे. तो खरा असता तर नंतर का होईना त्याने सत्य कबूल करायला हवे होते. मग त्यांच्या नात्याचा तकलादू किंवा टिकाऊपणा दिसून आला असता.

यातले काहीच न करता लबाडीचे समर्थन करत तिला आणि स्वतालाही फसवत राहतो.

कोणतीही वस्तु आपल्याला हवी असल्यास आपण जसे आपली प्रयत्नाची पराकाष्ठा करुन ती वस्तु मिळवीतो, तसेच प्रेम मिळवण्यासाठी पण सर्वस्व पणाला लावावे लागते. तुम्ही मिळवलेले प्रेम हे 'समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे धोका देउन मिळवलेले प्रेम आहे.' असल्या प्रेमा मध्ये सुख आणि गोडवा फार काळ ती टिकुन राहात नाही....!!!

छान लिहिली आहे कथा. ट्विस्ट आवडला.

ताराकडे नम्बर नव्हता म्हणुन ती कार्तिक पर्यंत पोचु शकली नाही. पण कार्तिककडे तर नंबर होता ना? खरच तकलादु नातं होतं. 'मी' ने तिला मिळवण्यासाठी फसवणुक केली असेल, पण त्याने तिचं अफेअर विसरुन तिच्यावर नक्कीच प्रेम केलं, म्हणुन ते दोघ एकमेकांबरोबर टिकुन राहिले.

कार्तिक चा काय मेसेज होता तेही सांगितलं तर समजेल तारा च्या नवर्याने बरोबर केले की चूक.
नाही आवडली कथा..

@मयुरी चवाथे-शिंदे धन्यवाद Happy

@मनिमाऊ "ताराने ही तिचा जुना नंबर बदलला" हे वाक्य कथेत आहे, त्यामुळे ताराचा नवीन नंबर कार्तिकला मिळाला नाही

कारण आज ही ती कार्तिकच्या नंबर वर फोन करते, एसेमेस करते>तारा अजुनहि कर्तिक ला फोन करते हे पट्त नाहि

मस्त मजा आली Happy

काही प्रतिसादांचे आश्चर्य वाटले. म्हणजे कथा आवडली नाही ओके. कथेतील पात्राचे वागणे रुचले नाही ओके. पण कथेतील पात्र राम नसून रावण दाखवले म्हणून कथा आवडली नाही असा काही प्रतिसादांचा सूर दिसला तो पटला नाही. कारण लेखकानेही कुठे म्हटलेय की त्यातील नायक रामासारखा वागलाय. एका ग्रे शेड वर कथा लिहिलीय गाईज, असे समजून एंजॉय करा Happy

मस्त आहे ट्विस्ट.

पण नायकाला ताराबद्दल काही प्रेम नसताना (तो तर तिला विसरूनही गेला होता), पहिल्या भेटीतच तिचे कोणावर प्रेम आहे (तकलादू का असेना) हे कळल्यावरही त्याने तिच्याशी लग्न का केले याचे कारण दिले असते तर अजून कथा आवडली असती. कारणाची एखादी हिंट पण चालली असती.

पण ध्रुवला जर्मनी मध्ये नोकरी मिळाली आणि तो जो तिकडे गेला तो परत आलाच नाही. ताराला फोन करणे ही त्याने कमी केले, >>> इथे नंदिनी हवं ना ?

@माधव

हो, कदाचित अजून गोष्ट फुलवता आली असती.

बाकी "ताराला फोन करणे ही त्याने कमी केले" या जागी "नंदिनीला फोन करणे ही त्याने कमी केले" हा बदल केला आहे. धन्यवाद Happy

Pages