दुर्लक्षित आंबेडकर

Submitted by घायल on 10 April, 2016 - 04:18

एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक रुपे आहेत. देशातील सर्वात मोठी कामगार संघटना चालवणारे कामगार नेते, चळवळीच्या निमित्ताने वृत्तपत्रे चालवणारे खंदे पत्रकार, रिझर्व बॅंकेचे संस्थापक , देशाच्या चलनातील धोके समजावून ब्रिटीशांना रुपयाचे अवमूल्यन करायला सांगताना त्यांचे वाभाडे काढून रोषास पात्र होणारे बाबासाहेब, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा आजही मार्गदर्शक ठरावा असा ग्रंथ लिहीणारे बाबासाहेब, जलसंधारणाचे महत्व ओळखून दामोदर व्हॅलीसहीत इतर चार धरणांचे नियोजन करून चार वर्षात ते प्रकल्प पूर्णत्वास नेणारे बाबासाहेब, भाक्रा - नांगल येथील धरणाचे नियोजनकर्ते आणि जनक बाबासाहेब अशी अनेक रुपे आहेत. ही रुपं दुर्लक्षित राहिलेली आहेत.

भारतातील जातीव्यवस्थेचं सूक्ष्म आकलन असणारे बाबासाहेब आपल्याला माहीत आहेत. पण त्यांच्या या संदर्भातल्या लिखाणाची मोडतोडच खूप झालेली आहे.

तत्कालीन नेत्यांनी बाबासाहेबांच्या अनेक प्रकारच्या कार्याला अनुल्लेखाने मारून फक्त दलितांविषयीचे कार्य यालाच प्रसिद्धी दिली. त्यामुळे ते दलितांचे नेते अशी प्रतिमा तयार झाली, केली गेली. वरतून महापुरुषांना आपण आपल्या जातीत वाटून घेतले असे सोवळे ओवळे दु:ख व्यक्त करायलाही अनुल्लेखक सर्वात पुढे होते आणि आहेत. अनुल्लेख ही अशी कृती आहे जिची जबाबदारी घ्यावी लागत नाही. असे दुर्लक्ष इतरही काही नेत्यांच्या वाट्याला आले , पण इथे तो विषय नाही.

आजच्या लोकसत्तेतला , दि. १० एप्रिल २०१६ चा गिरीश कुबेर यांच अर्थशास्त्री आंबेडकर हा लेख सुद्धा वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतो. त्याची लिंक वाचकांच्या अवलोकनार्थ खाली देण्यात येत आहे.

http://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-econom...

२००० साली वीजेची किती गरज असेल त्याप्रमाणे वीजनिर्मितीचे बनवलेले धोरण, वीजनिर्मिती, विकासाचे नियोजन याबद्दल बोलताना हरी नरके.
https://www.facebook.com/ps.sachin/videos/1131362003542906/

डॉ. रामचंद्र गुहा यांनी अलिकडेच बाबासाहेबांना आधुनिक भारताचे शिल्पकार असा उल्लेख केला आहे. परदेशी अभ्यासकांनीही बाबासाहेबांच्या या कामाचं आधुनिक भारताच्या पायाभरणीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. दुर्दैवाने देशात याबद्दल बोललं, लिहीलं गेलेलं नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप :- बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या, कामगिरीच्या वेगवेगळ्या पैलूंचा विचार इथे करून १२५ वी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करूयात. फक्त अभिवादन हा या धाग्याचा उद्देश नसून आपापल्या परीने वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला जावा ही छोटीशी अपेक्षा आहे.

- ज्या पैलूंवर खूप बोललं, लिहीलं गेलं आहे ते टाळले जावेत ही नम्र विनंती आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्त्रीयांना हे माहित आहे का की हिंदू कोड बिल मांडुन आंबेडकरांनी स्त्रीयांच्या स्वातंत्र्यासाठी काय केले आहे? त्या जे आज स्त्री स्वातंत्र्याचे सुख भोगत आहेत त्या मागे आंबेड्करांची किती मेहनत आहे? हे बिल जेंव्हा त्यांनी मांडले होते तेंव्हा त्यांना कोणी विरोध केला होता? का केला होता? हे बिल पास न होऊ शकल्या मुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजिनामा दिला होता माझ्या मते भारतातल्या प्रत्येक स्त्रीला हा इतिहास माहित असायला हवा व तिने आंबेडकरां प्रती कृतज्ञ असावयाला हवे.

1. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत,
2. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार,
3. पोटगी, 4. विवाह, 5. घटस्फोट, 6. दत्तकविधान आणि 7. अज्ञानत्व व पालकत्व.

हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच! भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला, हे अतिशय दुर्दैवी होते. या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला. सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करताहात, असा सवाल डॉ. आंबेडकरांनी प्रतिगामी विरोधकांना 20 सप्टेंबर 1951 रोजी केला. हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्ध्यासारखे लढले. पण दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ 4 कलमेच मंजूर झाली होती. यास्तव अत्यंत दु:खीकष्टी होऊन डॉ. आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. भारतीय स्त्रियांच्या हक्कांसाठी केवढा मोठा त्याग बाबासाहेबांनी केला! डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र डॉ. राजेंद्रप्रसाद, शंकराचार्य, ब्रह्मानंद सरस्वती, स्वामी करपात्री, डॉ. पट्टाभी सीतारामय्या या नेत्यांनी बाबासाहेबांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाहीत. बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्मितीचे ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्या तत्त्वांचा, मूल्यांचा त्यांनी संविधानात जोरदार पुरस्कार केला त्याच तत्त्वांना मूठमाती देणे त्यांच्यासारख्या विचारी नि विवेकनिष्ठ महापुरुषाला कसे शक्य होईल? म्हणूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले.

पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत. ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. 1955-56 मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे 1) हिंदू विवाह कायदा, 2) हिंदू वारसाहक्क कायदा, 3) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि 4) हिंदू दत्तक व पोटगी कायदा. हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली.

चांगला उपक्रम.

आंबेडकरांच्या दलितेतर कार्याबद्दल चांगल्या शब्दात वाचायला मिळावे हि अपेक्षा.

बरोबर आहे साधनातै. सर्वांचे सहकार्य मिळेलच.
कुसुमाग्रज जयंतीप्रमाणेच मायबोलीकडून काही उपक्रम चालवण्यात येणार असेल तर उपक्रमामधे सहभाग वाढेल आणि आपोआपच योग्य प्रकारे प्रतिसाद देखील येतील.

इतिहासाचे जाणकार बरेच असावेत. एकेक लेख जरी आला तरी खूप माहिती मिळेल.

ज्यांच्याकडे vision होती आणि समोरच्या काळापलिकडे जे पाहू शकत होते ते लोक गेल्यानंतर त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन ते कार्य तटस्थ दृष्टीने कुठलेही लेबल न लावता लोकांसमोर मांडण्यात बहुतांशी अपयश आलेय किंवा असे मूल्यमापन कोणी केलेच तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आलेय. या जयंतिनिमित्त त्या संदर्भात काही झाले तर चांगलेच आहे.

छान माहिती कपोचे. मधे मी त्यांच्या वेबसाईट वर व सरकारच्या वेबसाईटवरही घटना तयार करायच्या वेळेस प्रत्येक कायद्याबद्दल ज्या चर्चा झाल्या होत्या त्या चर्चा व खुद्द आंबेडकरांची मते वाचली होती. त्यांची माहिती, कायदा कसा असावा याबद्दलची मते व कोणत्याही समाजाबद्दल अजिबात नसलेली कटुता हे पाहून आपण थक्क होतो.

संविधान सभेत आंबेडकर हे अ‍ॅड. जयदेव गायकवाड लिखित पद्मगंधा प्रकाशनाचे पुस्तक उपलब्ध आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील लायब्ररीत संविधान सभेत झालेल्या सर्व चर्चांची, टिपणांची नोंद आहे. सलग पाच वर्षे त्याचा अभ्यास करून हे पुस्तक लिहीले आहे. संविधानातल्या प्रत्येक कलमावर किती साधकबाधक चर्चा झाली, सदस्यांच्या शंका आणि त्यांना बाबासाहेबांनी दिलेले उत्तर, संदर्भ, उदाहरणे हे सर्व त्यात आहे.

मायबोलीच्या खरेदी विभागात असेल तर मागवता येईल.

कापोचे सर्वप्रथम तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद, डॉ. बाबासाहेब यान्ची ही कल्याणकारी बाजू मान्डल्याबद्दल. कारण दलितान्चे उद्धारक, कायदेतज्ञ आणी आपले घटनाकार या पलीकडे बर्‍याच भूमिका माहीत नव्हत्या. त्या इथे लिहील्याने मनाची अनेक कवाडे उघडली गेली. तुम्ही खूप छान लिहीता आणी अनेक बाजू प्रकाशात आणता. असेच लिहीत रहा.

सकुरा याना पण धन्यवाद हिन्दु कोड बिलाबद्दल लिहीले म्हणून. कारण इतके सविस्तर आजच वाचायला मिळाले.

कापोचे सर्वप्रथम तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद, डॉ. बाबासाहेब यान्ची ही कल्याणकारी बाजू मान्डल्याबद्दल. कारण दलितान्चे उद्धारक, कायदेतज्ञ आणी आपले घटनाकार या पलीकडे बर्‍याच भूमिका माहीत नव्हत्या. त्या इथे लिहील्याने मनाची अनेक कवाडे उघडली गेली. तुम्ही खूप छान लिहीता आणी अनेक बाजू प्रकाशात आणता. असेच लिहीत रहा. +१

या महामानवच्या व्यक्तीत्वाचे अजुनही काही अज्ञात पैलू जगासमोर यावेत.

कापोचे सर्वप्रथम तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद, डॉ. बाबासाहेब यान्ची ही कल्याणकारी बाजू मान्डल्याबद्दल. कारण दलितान्चे उद्धारक, कायदेतज्ञ आणी आपले घटनाकार या पलीकडे बर्‍याच भूमिका माहीत नव्हत्या. त्या इथे लिहील्याने मनाची अनेक कवाडे उघडली गेली. तुम्ही खूप छान लिहीता आणी अनेक बाजू प्रकाशात आणता. असेच लिहीत रहा.>>>> +१००

बाबासाहेबांचे कार्याची किती कमी माहिती जनतेसमोर आली आहे हे हा लेख वाचल्यानंतर समजले. या धाग्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची अधिक माहिती मिळेल.

छान उपक्रम. बाबासाहेबांचे अर्थशास्त्रातील योगदान आजवर वाचले नव्हते, त्यामुळे अधिक वाचण्यास उत्सुक.

ते दुर्लक्षितच कसे राहतील यासाठी त्यांच्या संविधान निर्मितीवर संशय घेऊन whatsapp वर नेहमीची विखारी प्रचारमोहीम चालू झाली आहे. जाहीररीत्या उदोउदो करायचा आणि खासगीत मात्र कुजबुज मोहीम चालवायची.

अरे, येउद्यात ना लेख. एकेका विषयावर एकेकाने लेख लिहीला तरी ब-याच पैलूंना स्पर्श करता येईल.

प्रतिसादामधे लिहा किंवा वेगळा लेख लिहून त्याची लिंक इथे द्या. मायबोलीकरांच्या लेखाची लिंक हेडरमधे अपडेट करण्यात येईल.

खालील विषयावर आपण नक्कीच लिहू शकता. गुगळून देखील लिहू शकता.

१. वीजमंत्री म्हणून बाबासाहेबांचे काम
२. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील बाबासाहेबांचे योगदान
३. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ आणि आजच्या काळातले त्याचे महत्त्व
४. वीजेचे नियोजन, नियमन यासंबंधी बाबासाहेबांची धोरणे.
५. सुरक्षेसंबंधी असलेले बाबासाहेबांचे चिंतन
६. कामगार नेता, मुंबईतला संप, विधीमंडळात कामगारांच्या बाजूने सरकारचे वाभाडे काढणारी भाषणे
७. संविधान सभेतील प्रवेश आणि संविधान सभेतील कार्य
८. जलसंधारण मंत्री म्हणून केलेले काम. धरणांचे नियोजन, पाणीवाटप व २००० सालापर्यंतची पाण्याची गरज व त्याचे नियोजन याबाबतचा दृष्टीकोण.
९. इतर विषय

कपोचे... छान उपक्रम आणि कल्पना, कपोचे तुमचे प्रथम अभिनन्दन...

बाबासाहेब आम्बेडकरान्च्या कार्याची माहिती जनतेसमोर तुरळक प्रमाणात आलेली आहे किव्वा अजुनही पुर्णपणे समोर आलेली नाही...

<<अनुल्लेख ही अशी कृती आहे जिची जबाबदारी घ्यावी लागत नाही. असे दुर्लक्ष इतरही काही नेत्यांच्या वाट्याला आले , पण इथे तो विषय नाही.>>
----- बाबासाहेबान्च्या बाबत अनुल्लेख झाला, केला गेला हे मान्य. एका प्रमाणाबाहेर असा अनुल्लेख झाला तर तो मान्य होत नाही आणि त्याने अनुल्लेख करणार्‍यान्चा जनतेच्या मनात असलेला विश्वास कमी होतो.

पाण्यापासून ठेवले होते वंचित, त्याच नेत्याने सर्वप्रथम मांडली नदीजोड संकल्पना...!

जगात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरुन होईल असे अनेक तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. भुजलपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि पाऊस देखील लहरी झाला आहे. या सर्वांचा परिणाम सहाजिकच देशाच्या विकासावर होणार आहे. याचे भान 2015 मध्ये सरकारला आले आणि नदीजोड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांना एकमेकांशी जोडून 17 सप्टेंबर रोजी देशात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र नदीजोड प्रकल्प ही कल्पना आजची नाही तर पुढील 50 वर्षांनंतर देशाची लोकसंख्या किती असेल आणि त्यासाठी किती पाणी लागेल याचे नियोजन एका दृष्ट्या नेत्याने स्वातंत्र्याआधीच केले होते. त्यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

ज्यावेळी उत्तर भारतात महापूर असतो तेव्हा महाराष्ट्रात पाण्याची चिंता सतावत असते. एवढेच काय कोकणात लाखो लिटर पावसाचे पाणी वाहून जाते आणि मराठवाडा हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत असतो. आज आपण जल आणि ऊर्जासाक्षरता या शब्दांचा सर्रास प्रयोग करतो पण या शब्दांमागील भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्येच व्यक्त केली होती. पाण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा हा नदीजोड प्रकल्पच असल्याचे त्यांनी सांगून ठेवले होते. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शतकोत्तर रौप्यमोहत्सवी जयंती वर्ष म्हणून देशभर साजरे होते आहे. केंद्र सरकारने देखील त्याची जय्यत तयारी केली आहे आणि याच वर्षी नदीजोड प्रकल्पाला सुरुवात व्हावी हा मोठा योगायोग आहे. ज्या समाजाला हजारो वर्षे पाण्यापासून दूर ठेवले त्याच समाजातील बाबासाहेबांनी देशवासीयांना मुबलक पाणी आणि वीज मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. 2000 मध्ये भारताला किती पाणी लागेल याचे नियोजन त्यांनी त्याच वेळी केले होते.
कधी झाला पहिला प्रयत्न ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरायच्या मुंबई कौन्सिलचे सदस्य असताना पाण्याचे व सिंचनाचे नियोजन कसे करावे याचा आराखडा तयार केला होता. केंद्रीय पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांनी नदीजोड प्रकल्प आणला होता. दामोदर व्हॅली प्रकल्प, शेतीविषयी योजना आणि वीज याबद्दल आपले धोरण स्पष्ट केले होते.

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक हरी नरके म्हणतात ज्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले त्याच समाजातील बाबासाहेबांनी देशवासियांसाठी पाण्याचे नियोजन करणे हा काळाने घेतलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड' आहे.

केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प त्यांनी हाती घेतले.
आज ज्या प्रमाणे उत्तर भारतात पूरस्थिती असते तेव्हाही तिच स्थिती होती. या पूराचा सकारात्मक उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मोठे विद्युत प्रकल्प उभारावेत. नद्यांना कालवे काढून दुष्काळी भागात पाणी घेऊन जावे, धरणे बांधून समुद्रात जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीला, उद्योगधंद्यांना करता येईल व पुरात होणारी जीवित आणि आर्थिक हानी टाळता येईल याकडे डॉ. आंबेडकरांनी सरकारचे लक्ष वेधले होते.

आज ज्या राज्यांमध्ये मुबलक पाणी आणि वीज आहे त्या राज्यांची भरभराट होताना दिसत आहे. उद्योगांचे प्राधान्य अशाच राज्यांना आहे. ही काळाची पावले बाबासाहेबांनी ओळखली होती. 1942 मध्ये त्यांनी सिंचन, वीजनिर्मीती, जलवाहतूकीचा विकास आणि विस्तार या गोष्टी एकमेकांना पुरक असल्याचे सांगत त्यांच्या विकासावर भर देण्याचे सुचवले होते.

एका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, या देशातली लोकांना स्वस्त वीज नको आहे, तर जगातील सर्वात स्वस्त वीज या देशातील लोकांना मिळाली पाहिजे.

डॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीबद्दल अमेरिकन अभ्यासकाने लिहून ठेवले आहे.
प्रो.हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्यांच्या पुस्तकात "भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता", असे म्हटले आहे.
नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच 1942 मध्ये मांडली होती.

संदर्भ - दिव्य मराठी.कॉम
http://divyamarathi.bhaskar.com/news-bk/NAT-DEL-river-linkage-policy-and...

कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव !!

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गेल्याच वर्षी कोलंबिया विद्यापीठाने गौरव केला. विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील शंभर विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबासाहेबांची निवड झाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं.

गेल्या वर्षी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आगळा वेगळा सन्मान केला. विद्यापीठाने जगभरातल्या १०० विद्वानांची यादी केली आणि या यादीत पहिलं नाव होतं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं... विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय नाव आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँण्ड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं.

या आधी कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील राष्ट्रांच्या राज्यघटना आणि कायद्याच्या अभ्यासासाठी बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन केलं. या ठिकाणी बाबासाहेबांचं शिल्प आणि त्यांच्या कामाचा गौरव करणारं साहित्यही ठेवण्यात आलं आहे. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले ते १९१३ मध्ये. त्यासाठी त्यांना बडोद्याच्या महाराजांकडून स्कॉलरशिप मिळाली होती. १९१३ साली त्यांनी एमएची पदवी मिळवली. पुढे १९२७ मध्ये याच विद्यापीठातून त्यांनी पीएचडी घेतली.

कोलंबिया विद्यापीठात शिकताना आयुष्यात आपल्याला पहिल्यांदाच सामाजिक समतेचा अनुभव आला असं बाबासाहेबांनी १९३० साली न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

पुढे १९५२ मध्ये आंबेडकरांना सामाजिक योगदानाबद्दल सन्माननीय डॉक्टरेट पद्वी बहाल करण्यात आली. जगभरातील राज्यघटना अभ्यासण्यासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळणं हे आजही महत्वाचं मानलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा विद्यापीठाने केलेला सन्मान भारतासाठी अभिमान ठरला आहे.
संदर्भ- http://www.youtube.com/watch?v=GXIwH1NbfdE

बघा ओबामा काय बोलतात...

"डॉ. बाबासाहेबांसारखा "तारा" जर आमच्या देशात जन्माला जन्माला आला असता, तर आम्ही त्याना सुर्य म्हणुन संबोधले असते."

- अमेरीकेचे राष्ट्रपती बराक ओबामा.

मी भारतासारख्या राष्ट्रात अमेरिकन नागरिकांच्या नोकरीची अपेक्षा करतो, याचे एकमेव कारण म्हणजे माझ्यावर असलेला डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या दुरदृष्टी विचारांचा प्रभाव होय....

- अमेरीकेचे राष्ट्रपती बराक ओबामा.

संदर्भ- http://www.youtube.com/watch?v=GXIwH1NbfdE

कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव संदर्भ..

http://www.ibnlokmat.tv/showvideo.php?id=229892

सकुरा धन्यवाद
नदीजोड प्रकल्पाचं स्मरण करून दिल्याबद्दल. उत्तम लेख. कुणाचा आहे ते लिहावे.

सगळ्याच माहितीच्या पोस्टस छान Happy
बाबासाहेबांवरची आनि त्यांनी लिहलेली मराठीतली पुस्तके सुचवा ना.
जयकर लायब्ररी मधे ही बरीच आहेत पण ती सगळी इंग्रजी भाषेत आहेत.त्यासाठी खुप पेशन्स लागेन.

Pages