बोर-न्हाण

Submitted by स्वीटर टॉकर on 15 January, 2016 - 05:01

गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.

आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.

तर मग आपण आपल्या कार्यक्रमामध्ये अशांना का सहभागी करून घेऊ नये ज्यांना हा अनुभवच कधी घ्यायला मिळालेला नाही आणि मिळण्याची शक्यता देखील कमीच आहे? ह्या विचारानी आम्ही उत्सवचं बोर-न्हाण सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या ‘आपलं घर’ नावाच्या अनाथाश्रमात केलं. अनाथ मुलामुलींबरोबर तिथे निराधार वृद्धांची देखील काळजी घेतली जाते.

बोर-न्हाण हा छोट्यांचा कार्यक्रम असल्यामुळे तिथल्या चौथीपर्यंतच्याच मुलामुलींना त्यात सहभागी करून घेतलं होतं. त्यातली सगळ्यात छोटी मुलगी ‘खुशी’ चार वर्षांची आहे. तिचंही बोर-न्हाण केलं. सर्व मुलांना साखरेच्या दागिन्यांचं जाम कुतूहल! डोक्यावर ओतलेली बोरं आणि चॉकलेटं गोळा करायला हीऽऽ झुंबड. मग त्यांचे खेळ घेतले. ते झाल्यावर संस्थेतल्या सर्वांनाच हॉलमध्ये बोलावलं. मग एक तासभर जादूचे प्रयोग झाले. त्यानंतर जेवण. कार्यक्रम समाप्त.

संस्थेला दिलेली देणगी हा कार्यक्रमाचा भाग न ठेवता संस्थेचे संस्थापक, संचालक अर्थात सर्वेसर्वा श्री. फळणीकर यांच्या ऑफिसमध्ये खाजगीत दिली. खरं सांगायचं तर ऑफिस खाजगी नाहीच. संस्थेचे सर्व व्यवहार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक. हे सगळं तिथली स्वच्छता, साधेपणा, टापटीप, मुलांची वागणूक आणि स्वावलंबन यातून पावलोपावली दिसून येतं.

काही वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ करण्याऐवजी ती सगळी रक्कम आम्ही ‘जनसेवा फौंडेशन’ नावाच्या अशाच संस्थेला दिली होती तेव्हां माझा तिथल्या मुलांशी संबंध आला होता तेव्हां देखील मी अशीच इंप्रेस झाले होते. मात्र मला तेव्हां असं वाटलं की ही संस्था खास चांगली आहे म्हणून इथली मुलं इतकी गुणी आहेत. आता माझ्या लक्षात आलं की कळकळीनी चालवलेल्या या सर्वच संस्था भावनिक रीत्या सक्षम अशी पिढी तयार करताहेत. मात्र आपला त्यांच्याशी संबंध नसल्यामुळे आपल्या हे लक्षात आलेलं नाही.

त्यांच्या हॉलमध्ये आम्ही फुग्यांचं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. मात्र आपल्या कामासाठी त्यांचं मनुष्यबळ वापरायचं नाही असं ठरवून आम्ही एक तास आधीच तिथे पोहोचलो. फुगे तिथेच फुगवणं जरूर होतं कारण इतका व्हॉल्यूम गाडीत मावणार कसा? मोठे फुगे तोंडानी घट्ट फुगवणं आणि त्यांची नीट गाठ मारणं सोपं नसतं. पहिली ते चौथीची मुलं हे सटासट करू शकतील यावर माझा विश्वास बसला नसता जर मी स्वतः डोळ्यांनी ते पाहिलं नसतं! अर्ध्या तासात हॉल तयार झाला!

जादुगार देखील आम्हाला डेकोरेशनला मदत करंत होते. ते मंगेश पाडगावकरांची एक कविता गुणगुणू लागले. मी मुलांना विचारलं, “ही कविता कुणाची आहे माहीत आहे का रे मुलांनो?” “होऽऽऽ” एकसुरात उत्तर. कविता त्यांच्या अभ्यासक्रमात नसूनसुद्धा त्यांना ते माहीत होतं! त्यांना हे देखील माहीत होतं की काही दिवसांपूर्वीच पाडगावकरांचं देहावसान झालं होतं! Maybe I am out of touch, आणि एकाचं कौतुक करण्यासाठी दुसर्‍याला खाली खेचण्याची जरूर नाही, पण मला वाटत नाही की नॉर्मल मुलांना प्रायमरीमध्ये साहित्याबद्दल इतकी माहिती असते म्हणून. (यात माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीदेखील सामील आहेतच.)

आपण या मुलांना अनाथ म्हणतो खरं, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज तिथल्या प्रत्येक मुलाला वीस भावंडं, पंधरा मावशा, दहा आजोबा आणि दहा आज्या आहेत. भले त्यांच्याकडे दिवाळीत फोडायला हजारो रुपयांचे फटाके नसोत, पण तिकडे गणपती, दिवाळी, जन्माष्टमी वगैरे जितक्या जोमात साजरे केले जातात तितक्या जोरात बाहेरची मुलं करंत नाहीत. ‘जनसेवा फौंडेशन’ मध्ये लहान मुलांची काळजी घेणार्‍या ज्या मावशी आहेत त्या व्हील-चेअरमध्ये आहेत! त्या नेहमी म्हणतात, “मी मुलांची काळजी घेतेच कुठे? मुलंच माझी काळजी घेतात!”

अशा ठिकाणी मी जाऊन आले की मला अगदी खुजं असल्यासारखं वाटतं.

हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड बोर- न्हाण आणी त्याहून सुंदर तुझे मन.. मनात आलेले विचार अमलात आणताही तुम्ही दोघं लगेचच, खरंच कौतुकास्पद आणी इन्सपायरिंग आहे तुमची कृती!!

खूपच छान उपक्रम. असे काहितरी वेगळे पण अर्थपूर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन. माझ्या मित्रमंडळींना मी ह्याबद्दल नक्कि सांगेन म्हणजे अजून कोणाला असेच काहितरी करता येईल.
>> मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?>> ह्या वाक्यानी मात्र अंतर्मुख केलत Sad

लेख, विचार आणि कल्पना सगळच भारी.
ह्याच आठवड्यात श्री. फळ्णीकरांबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल वाचनात आलं. तुमची परवानगी असेल तर मला तो लेख इथे शेअर करायला नक्की आवडेल.

सर्वजण,
पुनःपुन्हा धन्यवाद!

तुम्हाला सगळ्यांना हा उपक्रम आवडलाच आहे तर स्वीट टॉकरची एक हलकी फुलकी व्हीडियो तू नळीवर आहे ती बघायला आवडेल असं वाटतं. त्याची लिंक
http://www.maayboli.com/node/51406

स्पॉक - बोर न्हाण ला काही धार्मिक पार्श्वभूमी आहे की नाही मला माहीत नाही. आम्ही ते केवळ मजा म्हणून केलं. छोट्या मुलामुलींना बोलावून बाळाच्या डोक्यावरून बोरं ओतली जायची. ती सगळी मुलं गोळा करतात आणि खातात. हल्ली बोराशिवाय चॉकलेट, गोळ्या वगैरे असतात. मुलं जमलीच आहेत म्हटल्यावर त्यांचे खेळ आणि मग पोटपूजा !

नलिनी - नेकी और पूछ पूछ? जरूर करा की शेअर!

हल्ली माझ्या डोक्यात एक किडा वळवळतोय. मूल अनाथ कुठलं म्हणायचं? ज्याला आईवडील नाहीत ते, का ज्याच्यावर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नाही ते?>>> निशब्द

खुपच सुंदर विचार आहेत ..

शेवटच वाक्य विशेष आवडल!
सध्या आउटसोअर्सिंग हा कळीचा शब्द असल्यानी , मुलाना संस्कार वर्गाना पाठवल की भागतं Sad

धन्यवाद!

हा लेख माझ्या वाचनात आला होता. लेखिकेचे नाव त्यावर नव्हते. कोणास माहित असल्यास नक्की सांगा, लेखाखाली देता येईल.

अनाथांचा नाथ
विजय फळणीकरांच्या ‘आपलं घर’मध्ये ११ आजी-आजोबा व ५५ मुलं राहतात. सध्याचं फळणीकराचं काम मुख्यत्वे एकच, हा डोलारा चालवण्यासाठी मदत मिळवणं. ते म्हणतात, ‘तेव्हाही भीक मागायचो. आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच..’ अनाथांचा नाथ बनलेल्या सेवादानाच्या या सत्पात्री दानाविषयी.. पुण्यातील एक सहृदय वाचक शाम खांडेकर यांनी अलीकडेच माझा संपर्क शोधून माझ्या पत्त्यावर एक पुस्तक पाठवून दिलं, ‘पराजय नव्हे विजय!’ विजय फळणीकर नावाच्या अनाथांच्या नाथाचे हे आत्मकथन. मी सहज म्हणून पुस्तक चाळायला घेतलं आणि त्यात इतकी गुंतले की वाचून झाल्याक्षणी मी फळणीकरांना फोन केला व पुढच्याच रविवारी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आमची भेट नक्की करून टाकली. विजय फळणीकर यांचं आयुष्य ही देवाची देणगी आहे असे वाटते. घरच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून दहाव्या वर्षी नागपूरहून मुंबईला पलायन. त्यानंतर गिरगाव चौपाटीवर बेवारस आयुष्य जगताना आलेले जीवघेणे अनुभव. पुढे मुंबादेवीच्या देवळासमोर भीक मागत सरलेलं दीड वर्ष. काळे गुरुजींच्या परिसस्पर्शाने जीवनाला मिळालेली कलाटणी.. समृद्धीच्या पायऱ्या चढत असताना एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने आलेलं कमालीचं नैराश्य आणि त्यातून स्फुरलेली अनाथ मुलांचा बाप होण्याची प्रेरणा.. या साऱ्याच घटना सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या आहेत. उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. डोणज्याची जागा तर हिरव्यागार डोंगररांगांच्या मधोमध अगदी निसर्गाच्या कुशीत आहे. इथे अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ग्रामीण भागातील दहावी व बारावी नापास मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, हॉस्पिटल व फिरता दवाखाना असे एकूण पाच उपक्रम (सर्व विनामूल्य) चालतात. सगळ्या कौलारू बैठय़ा इमारती, पाठच्या उतारावर आंबा, नारळ, चिकू, डाळींब यांसह फुलझाडं, भाजीपाला यांची निगुतीने केलेली लागवड. प्रवेशद्वाराशी गणपतीचं लहानसं देऊळ. मागच्या बाजूला भरभक्कम विहीर ज्यामध्ये सर्व छतांवर पडणारं पावसाचं पाणी गाळून सोडण्याची व्यवस्था. धुण्याभांडयाचे पाणीही प्रक्रिया करून बागेला घालण्याची सोय. बोअरचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन युनिट. हा देखणा आराखडा केवळ मॅटिकपर्यंत शिकलेल्या फळणीकरांनी बनवलाय यावर विश्वासच बसत नाही. गोरगरिबांसाठी एक पैसाही न घेता (जेवणासह) चालवल्या जाणाऱ्या इथल्या रुग्णालयामधील सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, स्त्री- पुरुष रुग्णांसाठी वेगवेगळे वार्ड्स, प्रसूतिगृह, ईसीजी व डिजिटल एक्स-रेची सोय, दंत विभाग व नेत्र चिकित्सा अशा सुविधा अचंबित करणाऱ्या आहेत. शिवाय ‘आपलं घर’ची अद्ययावत मोबाइल मेडिकल व्हॅन डोक्यावर सोलर पॅनल घेऊन दररोज अतिदुर्गम खेडय़ांमध्ये जात असते. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय. इथल्या मुलांची आनंदी व निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमनशिबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान, असा मला प्रश्न पडला! केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असंच हे ‘आपलं घर’ आहे. आपलं सर्वस्व पणाला लावून अनाथांसाठी आपलं घर उभारणाऱ्या फळणीकरांच्या जीवनावर एखादा चित्रपट सहज निघू शकेल! खरं तर नागपूरच्या एका संपन्न घरात त्यांचा जन्म झाला, पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने नशिबाचे फासे फिरले आणि न शिकलेल्या आईवर चार घरची भांडी घासून कुटुंबाचं पोट भरण्याची पाळी आली. गरिबीला त्रासलेल्या नऊ-दहा वर्षांच्या विजयला, शाळेतील मित्रांच्या गप्पांतून कधी तरी ऐकलेली झगमगती मुंबई खुणावू लागली आणि एक दिवस त्याने हिय्या करून घर सोडलं. खिशात एकुलती एक दहा रुपयांची नोट घेऊन हा मुलगा दादरला उतरला आणि चौपाटीवरील भयानक अनुभव घेत भिरभिरत मुंबादेवीच्या आश्रयाला आला. पहिला दिवस सार्वजनिक नळावरचं पाणी पिऊन ढकलला, पण नंतर प्रबळ भुकेने सदसद्विवेकबुद्धीवर मात केली आणि देवळाच्या पायरीवर भीक मागत त्याचं नवं आयुष्य सुरू झालं. दीड वर्षांत तो पक्का भिकारी बनला, परंतु परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं म्हणून ती घटना घडली. ४२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग फळणीकरांच्या डोळ्यांसमोर आजही जसाचा तसा उभा आहे. एका उंचापुऱ्या रुबाबदार गृहस्थांनी दर्शन करून परतताना अगदी अनपेक्षितपणे त्याचा हात पकडला आणि त्याला खेचतच आपल्या गाडीत बसवून पोलिसांमार्फत डोंगरीच्या बालसुधारगृहात नेलं. या देवदूताचं नाव यशवंत रामकृष्ण काळे. डोंगरीच्या बालसुधारगृहाचे ते त्या वेळी प्रमुख होते. त्यांचा परिसस्पर्श झाला आणि विजयच्या आयुष्याचं सोनं झालं. आजही दर गुरूपौर्णिमेला ते कुठेही असले तरी काळे गुरूजींच्या पाया पडायला जातातच. सातवी पास झाल्यावर सुधारगृहाच्या नियमानुसार विजयला बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्याने नागपूरला दिवसा नोकरी आणि रात्री शाळा करत मॅट्रिकचा टप्पा गाठला. त्यानंतर पुणे येथील बालचित्रवाणीत मंच साहाय्यक म्हणून नियुक्ती, मग विवाह, मुलाचा जन्म, आकाशवाणीवरील जाहिरात क्षेत्र या नव्या दालनात प्रवेश आणि नंतर प्रतिमा कम्युनिकेशन नावाचं डॉक्युमेंटरी फिल्म्स, मालिका, जाहिराती इत्यादींची निर्मिती करणारं स्वत:चं ऑफिस अशा स्थैर्याच्या व समृद्धीच्या पायऱ्या तो भराभर चढत गेला. पण दुर्दैव दबा धरून होतंच. सुखाच्या ऐन शिखरावर असताना पुन्हा एकदा दु:खाने गळामिठी मारली. त्यांचा एकुलता एक मुलगा वैभव रक्ताच्या कर्करोगाने तडकाफडकी गेला आणि फळणीकर दाम्पत्य पुरतं कोलमडलं. इतकं की मनात आत्महत्येचे विचार प्रबळ होऊ लागले. त्या दरम्यान वैभवच्या विम्याचे पैसे आले. त्यांच्या मनात आलं या पैशातून रुग्णवाहिका घेतली तर वैभवच्या स्मृतीही चिरंतन राहतील आणि समाजालाही फायदा होईल. हा विचार फळणीकरांनी मित्रांजवळ बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला (एप्रिल २००२). फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वापाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली. दिवसा नोकरी अन् रात्री रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बनून जनतेची चाकरी अशी दुहेरी वाटचाल सुरू झाली तरी मन उदासच होतं. विचार करता करता अनाथ आश्रमाची प्रेरणा मिळाली आणि फळणीकर पती-पत्नींच्या आयुष्याला दिशा मिळाली. स्वत:चे दोन फ्लॅट्स विकून त्यात बायकोच्या दागिन्यांसह होती-नव्हती ती शिल्लक टाकून फळणीकरांनी वारजे येथे दोन गुंठे जमीन खरेदी केली आणि त्यावर बांधकाम होइपर्यंत लगतच छोटंसं घर भाडय़ाने घेऊन ३ ते १० वयोगटांतील १४ मुलांचं ‘आपलं घर’ सुरू झालं (फेब्रुवारी २००३). सुदैवाने मुलांची काळजी घ्यायला अत्यल्प पगारात रत्ना कंधारे आणि ननावरे मावशी पुढे आल्या आणि पालकांची संख्या दोनाची चार झाली. उद्घाटनासाठी काळे गुरुजींच्या नावाशिवाय दुसरं नाव मनात येणं शक्यच नव्हतं. ‘फक्त लढ म्हणा’ या कवितेची आठवण करून देत ते म्हणाले, देवळासमोर भीक मागणारा, केस वाढलेला, अंगावर फक्त एक फाटकी चड्डी घातलेला विजय मला आजही स्पष्ट आठवतोय. त्याची ही धडपड पाहून मला इतकंच म्हणायचंय की माझ्यासाठी याहून मोठी कोणती गुरूदक्षिणा असेल? त्यानंतर अनंत अडचणीतून मार्ग काढत संस्था विस्तारत गेली. व्याप वाढू लागले तशी फळणीकरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मग २४ तासही अपुरे पडू लागले. आश्रमात येणाऱ्या मुलांची संख्या वाढतच होती, पण वारज्याच्या जागेत क्षमतेबाहेर मुलं ठेवणं शक्य नव्हतं. तेव्हा आणखी एक अनाथाश्रम आणि त्या सोबत वृद्धाश्रम काढावा असं त्यांच्या मनानं घेतलं. वृद्धाश्रमाच्या संकल्पनेबाबत ते म्हणतात, ‘लहान मुलांबरोबर आजी-आजोबा हवेतच ही माझीच भावनिक गरज होती.’ त्यानुसार जागेचा शोध घेताना सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील हिरवाईने नटलेली पावणेदोन एकराची जागा नजरेसमोर आली. समाजपुरुषाच्या पाठिंब्याने हेही शिवधनुष्य उचललं आणि दोन महिन्यांतच सर्व बांधकाम होऊन निराधार आजी-आजोबांना नातवंडांची ऊब मिळू लागली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांसाठी निरनिराळ्या सोळा व्यवसायांचे नि:शुल्क प्रशिक्षण देणारे केंद्र, गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल व गावोगावी फिरणारी अद्ययावत रुग्णवाहिका अशा आणखी ३ उपक्रमांसाठी मदतीचे अनेक हात पुढे आले आणि स्वच्छ, पारदर्शी काम असेल तर काही कमी पडत नाही याचा निर्वाळा मिळाला. फळणीकरांचं नि:स्पृह काम बघून अनेक दाते ‘आपलं घर’ संस्थेशी जोडले गेले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर हे संस्थेचे एक ट्रस्टी आहेत. त्यांच्या मनाचा मोठेपणा व संस्थेशी जुळलेली नाळ इतळी घट्ट की एवढय़ा व्यस्त दिनक्रमातूनही महिन्याच्या बैठकीला ते आवर्जून हजर असतात. तेही वेळेच्या पाच मिनिटं आधीच. संवेदनशील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हीसुद्धा ‘आपलं घर’ची मानद संचालक आहे. गेली १२ वर्षे ‘आपलं घर’मधील गणपतीची पहिल्या दिवसाची आरती मृणाल कुलकर्णीच्या हस्ते होतेय. चांगल्या घरातील मुलांना जे जे मिळतं ते ते आपल्या मुलांना देण्याचा फळणीकरांचा प्रयत्न असतो. दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत त्यांना पुण्याबाहेर सहलीला नेलं जातं. कधी समुद्राकाठी तर कधी प्राणीसंग्रहालय बघण्यासाठी. शिवाय सर्कस, संस्कारक्षम सिनेमा अथवा नाटक यांचीही कधीमधी सफर घडते. एअर डेक्कन या विमान कंपनीने तर १५ ऑगस्ट २००५ या दिवशी ‘आपलं घर’च्या सर्व मुलांना व कर्मचाऱ्यांना पुणे, बंगळुरू व चेन्नई अशी विमान सफर घडवली शिवाय चेन्नईत गेल्यावर तर के. पद्मनाभन् या दानशूराने सर्वाची शाही व्यवस्था ठेवली. मुलांच्या मनावर कोरली गेलेली आणखी एक आठवण म्हणजे ‘लिटिल चॅम्प्स’मुळे प्रसिद्ध असलेल्या ‘सारेगम’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात सहभागी होण्याची त्यांना राजन डांगे यांच्यामुळे मिळालेली संधी. इथल्या आजी-आजोबांनीही ‘स्वप्न स्वरांचे, नव तारुण्यांचे’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने ही झगमगती दुनिया बघितली. फळणीकर म्हणतात, ‘अशा कार्यक्रमांना समाजच पैसा देतो, मी फक्त नियोजन करतो एवढंच.’ या देवकार्यासाठी फळणीकरांना अनेक पुरस्कार मिळाले. यातील एक पुरस्कार कायम स्मरणात राहील असे ते म्हणतात. नागपूरहून पळून आल्यावर ज्या बिर्ला ऑडिटोरियमच्या बाहेरील पालिकेच्या नळावरचं पाणी पिऊन त्यांनी तहानभूक शमवली त्याच सभागृहात ३४-३५ वर्षांनंतर, २००४ मध्ये सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला गेला. तो क्षण अविस्मरणीय होता. ‘‘या पुरस्कारावर जरी माझं नाव असलं तरी त्यात ‘जेथे राघव तेथे सीता’ हे ब्रीदवाक्य मानून चालणारी माझी पत्नी साधना आणि ‘आपलं घर’च्या सर्व परिवाराचा मोलाचा वाटा आहे,’’ हे त्यांचे उद्गारही पुरेसे बोलके आहेत. आज ‘आपलं घर’मध्ये ११ आजी-आजोबा व ५५ मुलं राहतात. संस्थेचं मुख्य कार्यालय वारजे येथे आहे. मुलांचा व वृद्धांचा दिनक्रम आखलेला असतो. तो व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी तिथे अनेक र्वष राहणाऱ्या मावशी कंपनीची. फळणीकरांचे काम मुख्यत्वे एकच, हा डोलारा चालवण्यासाठी मदत मिळवणं. हसत हसत ते म्हणाले, ‘तेव्हाही भीक मागायचो, आत्ताही मागतोय. फक्त उद्देश वेगळा एवढंच.’ या पूर्ण प्रकल्पाचा महिन्याचा खर्च (२९ सेवकांच्या पगारासह) दरमहा ३ ते साडेतीन लाख रुपये आहे. सरकारची कुठलीही मदत नाही, परंतु समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवणं ही आता समाजाची जबाबदारी. संपर्क: ०२०-२०२५०७३९ -९८५०२२७०७७ apalaghar@yahoo.com

नलिनी,
शतशः धन्यवाद!

श्री. फळणीकरांचं पूर्वायुष्य इतकं नाट्यमय आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती आणि मला वाटतं बर्‍याचशा वाचकांना नसावी.

पुत्रवियोगासारख्या विषाचं अमृतात रुपांतर करणारे म्हणजे खरोखर महात्माच!

'पराजय नव्हे, विजय' हे पुस्तक लगेचंच मिळवते.

आपलं घर ही संस्था 501 c साठी (अमेरिकेतून देणगी द्यायची झाली तर) मान्यताप्राप्त आहे का? जर नसेल तर इतर मान्यताप्राप्त संस्थेद्वारे ह्या संस्थेला देणगी देण्याचा मार्ग आहे का?
501 c चा फायदा असा की ते असेल तर बर्याच अमेरिकन कंपन्या कर्मचार्याची देणगी match करतात. म्हणजे संस्थेला दुप्पट देणगी मिळते.

नलिनी,
अनेकानेक धन्यवाद!

फारच सुंदर ओळख करुन दिलीत या फळणीकर दांपत्याची... कृपया एक वेगळा धागा काढणार का या दांपत्यावर ?? सर्वांनाच माहिती होईल या दृष्टीने म्हणतोय मी ...

लेख नेहमी प्रमाणेच चांगला आहे.

त्या संस्थेच खरच कौतुक आहे. सगळ्याच संस्था हवी तेवढी मेहनत घेत नाहीत.

शेवटच वाक्य भिडणार आहे.

आणि सलाम तुमच्या सामाजीक कार्यासाठीही.

अजबराव,

मला ५०१ फक्त साबणाचा बार माहीत आहे ! Wink

व्यविस्थित माहिती श्री. फळणीकर (मो. +९१-८२७५६९५४५२) देऊ शकतील.

परवाच्या सकाळमधे ब्लॉग आलाय - https://www.esakal.com/blog-165331
सध्या त्यांना मिळणार्‍या देणग्या आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाहिये, त्यामुळे एफडी मोडून कर्मचार्‍यांचे पगार करावे लागत आहेत, आणि श्री फळणीकर अजूनही देणग्या जमवण्यासाठी फिरत आहेत. Sad

Pages