१२७०, सदाशिव पेठ, पुणे.

Submitted by विक्रमसिंह on 26 August, 2009 - 12:33

सदाशिव पेठ, पुणे. हे उच्चारले, की सगळीकडे प्रतिक्रिया ठराविक. सदाशिव पेठी, पुणेरी , वगैरे.

माझा मात्र अनुभव एकदम या प्रस्थापित कल्पनेस छेदणारा. १२७०, सदाशिव पेठ, पुणे, येथील. अगदी खरा. जन्मभर जपून ठेवावा , मनात घर करून राहिलेला असा. कुठेतरी त्याची कृतज्ञता व्यक्त करायचीच होती. म्हणूनच खरा पत्ता शीर्षक म्हणून दिलाय.

तसा मी सदाशिव पेठेत उपराच. झाले काय, मी असेन १२ वर्षाचा. माझी बहिण १० वर्षाची. आई बाबा नोकरी निमित्त खेड्यात रहायचे. पुण्याजवळच. पण माझ्या भाषेची शिवराळ प्रगति बघून बाबांनी चांगला पण धाडसी निर्णय घेतला. मुलांना शिकायला पुण्यात ठेवायचे.

योगायोगाने १२७०, सदाशिव पेठ, येथे विद्यार्थांसाठी खोल्या आहेत असे कळले. आई बाबांनी चौकशी केली, मंडळी ओळखीची निघाली. माणसे चांगली वाटली , मालकांनी लक्ष ठेवायचे कबूल केले आणि आम्ही, म्हणजे मी आणि माझी छोटी बहिण, वैजू , तेथे रहायला आलो. आई बाबा दर आठवड्याला यायचेच भेटायला.

वाडा तसा नेहमी सारखाच. तीन मजली. १०-१२ कुटुंबे रहायची. शिवाय मालक, ४ भाउ आणि त्यांची कुटुंबे. भाडेकरूंना एक एक खोली. त्याच्यातच मोरी. मालकांना प्रत्येकी दोन खोल्या. मालक आणि भाडेकरू मध्ये येवढाच फरक. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती जवळपास सारखीच. सगळे पगारदार. काटकसरीने जगणारे. वाड्यातील मंडळींचे खोलीसाठीचे मोजमाप ही मजेशीर होते. किती माणस झोपू शकतील? हे त्यांचे मोजमाप.

मोठे मालक म्हणजे बापूकाका. तेच सगळ बघायचे. त्यांचा थोडा वचक ही होता. पण आम्हा मुलांना उगाचच कधी रागवायचे नाहीत. त्यांची एक बुलेट होती. बाकी सगळ्यांच्या सायकली. आम्हाला खेळायला मिळावे म्हणून ते बुलेट सुद्धा बाहेरच ठेवत असत. त्यांचा नियम एकच. अंधार पडल्यावर क्रिकेट खेळायचे नाही.

आम्ही दोघे लहान. इतके की आम्हाला दाराला कडी व कुलुप लावायलाही खूप कसरत करायला लागायची. गॅलरीच्या कठड्यावर चढून वगैरे. हे बघून पहिल्याच दिवशी शेजारच्या वहिनी धावत आल्या. मला रागवल्या. अगदी तेंव्हापासून आख्या वाड्याने आमचे पालकत्व घेतले होते. ते अगदी चार वर्षानी वाडा सोडी पर्यंत. वैजूला तिची वेणी पण घालता यायची नाही, ते काम मालकीण बाईंचे. आईने तशी सुरवातीला प्रेमळ अटच घातली होती.

सगळ्या मोठ्या माणसांना आमचे भारी कौतूक. सारख त्यांच्या मुलांना ऐकवायचे. बघा दोघ किती लहान , पण शहाण्या सारख रहातात की नाही. आमच मित्रमंडळ मात्र जाम वैतागायचे, सारख सारख ऐकून.

समोरच्या पाटणकर खाणावळीतला डबा यायचा. पण तो नावालाच. आम्हाला दोघांना तो अजिबात आवडायचा नाही. पण का कोण जाणे वाड्यातल्या इतर मित्रमैत्रिणींना त्यातल्या भाज्या खूप आवडायच्या. मग काय, त्यांच्या आयांचा स्वयंपाक आमच्या ताटात आणि आमचा डबा त्यांच्या ताटात. वाड्यात अगदी वासावरून सुद्धा कुणाच्या घरी काय शिजतय हे कळायचे. अगदी लहानपणी गावाला असताना सगळी आळी आपले घर वाटायचे. पुण्याला एका वाड्यातच अख्खी आळी सामावलेली होती. सगळी कडे मुक्त प्रवेश. अगदी कधिही. मोठ्या सणांसाठी आम्ही आमच्या घरी जायचो. इतर वेळी आमचे सगळे सण १० घरी व्हायचे.

आमचा अभ्यास, दुखणी खुपणी, भांडणे हे सगळ वाड्याने संभाळल. थोडी सर्दी वा खोकला झाला तर संध्याकाळी घरगुती औषधे हजर. परिक्षेच्या आधी सगळ्यांचे रेडिओ बंद. शाळेच्या ट्रीपला जायचे तर उजूची किंवा चंदूची आई डबा देणार. ऐन वेळेला कोणी तरी तुटलेली बटण लावून देणार्, कोणी उसवलेली शिवण शिवणार तर कोणी सकाळच्या शाळेला उशीर होतोय म्हणून पाणि तापवून देणार, वहिनी आम्ही झोपून गेल्यावर तसाच पेटत राहिलेला स्टो बंद करणार आणि शिवाय जळलेले दुधाचे भांडे धुवून ठेवून आम्हाला पांघरूण घालून जाणार. एक ना अनेक. असंख्य छोट्या छोटया गोष्टी. आईची आठवण आली म्हणून कधी रडावेच लागले नाही. सगळ्या माउल्या आमच्यासाठी सदैव हजर.

आज सुद्धा त्या माउल्या आपल्या मुलीसारख आमच्या हिला वागवतात, माझ्या मुलांना आपल्या नातवासारखे जवळ घेतात. त्यांच्या यशाचे पेढे घेताना तेच अनेक वर्षांपूर्वी माझ्या इंजिनियर झाल्याचे पेढे घेताना दिसलेले कौतूक त्यांच्या डोळ्यात मला पुनः दिसत.

वैजू खूप वर्षानी नुकतीच वाड्यात जाउन आली. तिच्या मुलीने आमच्या तोंडून इतक्या वेळेला ऐकल होत की तिला प्रत्यक्ष पहायच होत. म्हणाली, पाच मिनिटात जाऊ म्हणून गेले आणि चार तास सुधीर कडे बसले. सगळे जण भेटायला आले होते.

माझे मित्र मोठे झालेत. वहिनी देवाघरी गेल्या. माझ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. वाडा जाउन सदनिका आल्या. सायकली जाउन गाड्या आल्या. पण आनंद यात आहे, वाड्यातली आपुलकी गेली नाही. जाणार कशी.

आम्ही लहान होतो म्हणून आम्हाला चांगली वागणूक मिळाली का? मला नाही असे वाटत. आमच्या शेजारच्या खोलीत दोन सी.ए.करणारे होते.एम्.के. आणि पाटिलबुवा. सगळे त्यांना तसेच म्हणायचे. त्यांना पण तशीच वागणूक. ती सगळी माणसच चांगली होती.

वाडयातल्या वास्तव्याने एक गोष्ट मात्र माझ्या मनावर बिंबली आहे. सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.

तो वाडाच तसा होता. अगदी ``१२७०, सदाशिव पेठ, पुणें,`` असून सुध्धा.

गुलमोहर: 

चांगले लिहीलय विक्रम. इतक्या लहान वयात तुम्ही आणि तुमची बहीण आईवडिलांपासून दूर राहिलात म्हणजे कौतुकाचीच गोष्ट आहे.

विक्रम, चांगलं लिहिलंय. तुमचं आणि तुमच्या आईवडीलांचं तर कौतुक आहेच, पण इतक्या लहानपणी आईवडीलांपासून दूर राहणार्‍या मुलांना मायेने बघणं, त्यांचं सगळं करणं अगदी प्रशंसनीय आहे.

माझा पुणेरी लोकांचा अनुभव असाच चांगला आहे. माझी सख्खी लहान जाउ आणि चुलत जावा सगळ्या पुण्याच्या आहेत, पण अगदी सालस आणि अगत्यशील आहेत. त्यांच्या घरची मंडळी पण तशीच.
आणि पुपुकर आणि गडकरींइतके चांगले मित्रमैत्रिणी पण पुण्याचेच Happy

सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.>>

छानच. तुमचे विचार चांगले आहेत. हिरे पारखायला जवाहिरच लागतो म्हणतात ते खरं आहे.

इतक्या लहान वयात तुम्ही दोघे एकटे राहिलात ह्याचपण खरच कौतुक वाटल.

>>सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी.
लाखमोलाचं वाक्य आहे.

वाड्यांमधलं वातावरण अगदी असंच असायचं, बांधून ठेवणारं, पण आता तसे लोकही राहिले नाहीत आणि तसं वातावरणही. छान लिहिलंय तुम्ही आवडलं.

खूप छान लिहिलय. वाडासंस्कृती ग्रेट आहे खरच!
एवढ्या लहान वयात तुम्ही दोघं भाऊ बहिण आईवडिलांशिवाय दूर राहिलात हेही कौतुकस्पदच.

छान लिहिलंय.
इतक्या लहान वयात तुम्ही भावंड एकटी राहिलात आणि तुमच्या पालकांनी तसा निर्णय घेतला - दोन्ही कौतुकास्पद Happy

सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.
>> अगदी सुंदर वाक्य!!!

फारच सुंदर लिहिलं आहेस विक्रम. अगदी कृतज्ञतेने भरुन आलेलं मन इथे मोकळं केलं आहेस Happy

खरच खुपच छान लिहिलय !! एवढ्या लहान वयात यात तुम्ही भावंड एकटी राहिलात खरच कौतुक आहे तुमच ,तुमच्या पालकांच आणि सगळ्या वाड्यातल्या लोकाच पण

दुर्दॅवाने चांगल्या गोष्टी प्रसारित होत नाही. आणि काही 'चहा घेउन आला असाल..' सार्ख्या गोष्टी भरभरुन सांन्गितल्या जातात तसे आहे. छान अनुभव आणि सुरेख मांडलाय. चांगले लोकं सगळी कडे भेटतात.

छान लिहिलंय....

कानफाट्या ठरलेल्या आणि सतत तक्रारी येणार्‍या मुलाबद्दल कुणी कौतुकानी बोललं तर घरच्यांना जसं वाटत असेल तसं वाटलं...

सुरेख लिहिलय.
'सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी'
अगदी अगदी.. Happy

हे असं ऐकायचं आणि मग कुठेतरी जाऊन माझाच अनुभव हो असं म्हणून सांगायचं अश्यामुळे तर उगाच पुणं बदनाम झालंय... (सरसेनापती हे केवळ तुम्हालाच नाहीये हा!) Happy

त्रिविक्रमाक्रा,
एवढ्या लहानपणी एकटं रहाणार्‍या तुझी आणि बहिणीची शाब्बास, उरावर धोंडा ठेवून मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला दूर ठेवणार्‍या तुमच्या आईवडिलांची पण शाब्बास आणि लहानपणी तुम्हाला सांभाळून घेणार्‍या सगळ्या वाड्याची शाब्बास..

लेखानंतर आलेल्या फिलिंगबद्दल यंकूशी सहमत!!

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. तुम्हा सर्वांनाच लेख आवडल्याच वाचून मलाही छान वाटल आणि लहानपणी झालेल्या कौतुकाच्या पुनःप्रत्ययाचा आनंदही झाला.

माझा उद्देश मी लेखात सुरुवातीला लिहीलाच आहे. माझ्या भावना तुमच्या पर्यंत पोचल्या यातच खूप काही मिळाल.

पुनः एकदा तुमचे आभार.

मस्त लिहिलय विक्रम.. चला निदान या लेखामुळे तरी पुणेकरांविषयी उगाचच काहीही गैरसमज करून घेतलेल्यांच्या विचारांना थोडातरी छेद जावा Happy

नीधपाला भरपूर मोदक Happy

Pages