१२७०, सदाशिव पेठ, पुणे.

Submitted by विक्रमसिंह on 26 August, 2009 - 12:33

सदाशिव पेठ, पुणे. हे उच्चारले, की सगळीकडे प्रतिक्रिया ठराविक. सदाशिव पेठी, पुणेरी , वगैरे.

माझा मात्र अनुभव एकदम या प्रस्थापित कल्पनेस छेदणारा. १२७०, सदाशिव पेठ, पुणे, येथील. अगदी खरा. जन्मभर जपून ठेवावा , मनात घर करून राहिलेला असा. कुठेतरी त्याची कृतज्ञता व्यक्त करायचीच होती. म्हणूनच खरा पत्ता शीर्षक म्हणून दिलाय.

तसा मी सदाशिव पेठेत उपराच. झाले काय, मी असेन १२ वर्षाचा. माझी बहिण १० वर्षाची. आई बाबा नोकरी निमित्त खेड्यात रहायचे. पुण्याजवळच. पण माझ्या भाषेची शिवराळ प्रगति बघून बाबांनी चांगला पण धाडसी निर्णय घेतला. मुलांना शिकायला पुण्यात ठेवायचे.

योगायोगाने १२७०, सदाशिव पेठ, येथे विद्यार्थांसाठी खोल्या आहेत असे कळले. आई बाबांनी चौकशी केली, मंडळी ओळखीची निघाली. माणसे चांगली वाटली , मालकांनी लक्ष ठेवायचे कबूल केले आणि आम्ही, म्हणजे मी आणि माझी छोटी बहिण, वैजू , तेथे रहायला आलो. आई बाबा दर आठवड्याला यायचेच भेटायला.

वाडा तसा नेहमी सारखाच. तीन मजली. १०-१२ कुटुंबे रहायची. शिवाय मालक, ४ भाउ आणि त्यांची कुटुंबे. भाडेकरूंना एक एक खोली. त्याच्यातच मोरी. मालकांना प्रत्येकी दोन खोल्या. मालक आणि भाडेकरू मध्ये येवढाच फरक. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती जवळपास सारखीच. सगळे पगारदार. काटकसरीने जगणारे. वाड्यातील मंडळींचे खोलीसाठीचे मोजमाप ही मजेशीर होते. किती माणस झोपू शकतील? हे त्यांचे मोजमाप.

मोठे मालक म्हणजे बापूकाका. तेच सगळ बघायचे. त्यांचा थोडा वचक ही होता. पण आम्हा मुलांना उगाचच कधी रागवायचे नाहीत. त्यांची एक बुलेट होती. बाकी सगळ्यांच्या सायकली. आम्हाला खेळायला मिळावे म्हणून ते बुलेट सुद्धा बाहेरच ठेवत असत. त्यांचा नियम एकच. अंधार पडल्यावर क्रिकेट खेळायचे नाही.

आम्ही दोघे लहान. इतके की आम्हाला दाराला कडी व कुलुप लावायलाही खूप कसरत करायला लागायची. गॅलरीच्या कठड्यावर चढून वगैरे. हे बघून पहिल्याच दिवशी शेजारच्या वहिनी धावत आल्या. मला रागवल्या. अगदी तेंव्हापासून आख्या वाड्याने आमचे पालकत्व घेतले होते. ते अगदी चार वर्षानी वाडा सोडी पर्यंत. वैजूला तिची वेणी पण घालता यायची नाही, ते काम मालकीण बाईंचे. आईने तशी सुरवातीला प्रेमळ अटच घातली होती.

सगळ्या मोठ्या माणसांना आमचे भारी कौतूक. सारख त्यांच्या मुलांना ऐकवायचे. बघा दोघ किती लहान , पण शहाण्या सारख रहातात की नाही. आमच मित्रमंडळ मात्र जाम वैतागायचे, सारख सारख ऐकून.

समोरच्या पाटणकर खाणावळीतला डबा यायचा. पण तो नावालाच. आम्हाला दोघांना तो अजिबात आवडायचा नाही. पण का कोण जाणे वाड्यातल्या इतर मित्रमैत्रिणींना त्यातल्या भाज्या खूप आवडायच्या. मग काय, त्यांच्या आयांचा स्वयंपाक आमच्या ताटात आणि आमचा डबा त्यांच्या ताटात. वाड्यात अगदी वासावरून सुद्धा कुणाच्या घरी काय शिजतय हे कळायचे. अगदी लहानपणी गावाला असताना सगळी आळी आपले घर वाटायचे. पुण्याला एका वाड्यातच अख्खी आळी सामावलेली होती. सगळी कडे मुक्त प्रवेश. अगदी कधिही. मोठ्या सणांसाठी आम्ही आमच्या घरी जायचो. इतर वेळी आमचे सगळे सण १० घरी व्हायचे.

आमचा अभ्यास, दुखणी खुपणी, भांडणे हे सगळ वाड्याने संभाळल. थोडी सर्दी वा खोकला झाला तर संध्याकाळी घरगुती औषधे हजर. परिक्षेच्या आधी सगळ्यांचे रेडिओ बंद. शाळेच्या ट्रीपला जायचे तर उजूची किंवा चंदूची आई डबा देणार. ऐन वेळेला कोणी तरी तुटलेली बटण लावून देणार्, कोणी उसवलेली शिवण शिवणार तर कोणी सकाळच्या शाळेला उशीर होतोय म्हणून पाणि तापवून देणार, वहिनी आम्ही झोपून गेल्यावर तसाच पेटत राहिलेला स्टो बंद करणार आणि शिवाय जळलेले दुधाचे भांडे धुवून ठेवून आम्हाला पांघरूण घालून जाणार. एक ना अनेक. असंख्य छोट्या छोटया गोष्टी. आईची आठवण आली म्हणून कधी रडावेच लागले नाही. सगळ्या माउल्या आमच्यासाठी सदैव हजर.

आज सुद्धा त्या माउल्या आपल्या मुलीसारख आमच्या हिला वागवतात, माझ्या मुलांना आपल्या नातवासारखे जवळ घेतात. त्यांच्या यशाचे पेढे घेताना तेच अनेक वर्षांपूर्वी माझ्या इंजिनियर झाल्याचे पेढे घेताना दिसलेले कौतूक त्यांच्या डोळ्यात मला पुनः दिसत.

वैजू खूप वर्षानी नुकतीच वाड्यात जाउन आली. तिच्या मुलीने आमच्या तोंडून इतक्या वेळेला ऐकल होत की तिला प्रत्यक्ष पहायच होत. म्हणाली, पाच मिनिटात जाऊ म्हणून गेले आणि चार तास सुधीर कडे बसले. सगळे जण भेटायला आले होते.

माझे मित्र मोठे झालेत. वहिनी देवाघरी गेल्या. माझ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या. वाडा जाउन सदनिका आल्या. सायकली जाउन गाड्या आल्या. पण आनंद यात आहे, वाड्यातली आपुलकी गेली नाही. जाणार कशी.

आम्ही लहान होतो म्हणून आम्हाला चांगली वागणूक मिळाली का? मला नाही असे वाटत. आमच्या शेजारच्या खोलीत दोन सी.ए.करणारे होते.एम्.के. आणि पाटिलबुवा. सगळे त्यांना तसेच म्हणायचे. त्यांना पण तशीच वागणूक. ती सगळी माणसच चांगली होती.

वाडयातल्या वास्तव्याने एक गोष्ट मात्र माझ्या मनावर बिंबली आहे. सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी. या माझ्या विश्वासाला अजूनही कधी तडा गेला नाही, ही वाड्याची पुण्याई.

तो वाडाच तसा होता. अगदी ``१२७०, सदाशिव पेठ, पुणें,`` असून सुध्धा.

गुलमोहर: 

सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी>>>
हे खूप आवडले. Happy छानच लिहीलाय लेख.

विक्रम छान लेख आणी तुम्हा भावंडांचे कौतुक सुद्धा...
हायला पण भौ तुम्ही आमची पंचाईत केलीत्...यापुढे माबोकर सपेवाल्यांशी भांडताना कायम हे उदाहरण तोंडावर मारले जाणार.. Proud

छान लिहिलयस हॄदय ओतून . खरचं,पुण्याच्या गोष्टी म्हणजे नेहमी तिकडच्या लोकांच्या कुटाळक्याच ऐकायला मिळतात. ते झालं कि तिकडल्या विविध बोर्डस् वर काय काय खाष्ट सूचना लिहिलेल्या असतात ते नेटवर भरपूर सर्क्युलेट होत असतात. असं छान छान लिहिलस आणी बरं वाटलं वाचून. पुषकळांचे गैरसमज दूर व्हायला मदत मिळेल, (इन्क्लुडिंग मी!!!) Happy

अरे विक्रमजी, तुम्ही तर माझे शेजारीच निघालात की - मी १२७२ सदाशिव पेठेतला (त्यावेळेसचा सासवडकर वाडा, पाटणकर बोर्डिंगच्या बरोबर समोर) - माझा जन्म तिथलाच -१९६० ते १९७० मी तिथे होतो, मग पुढे ती जागा सोडली....
तुम्ही म्हणताय ते वातावरण तिथल्या सगळ्याच वाड्यांमधे होतं बहुतेक....
अजूनही त्या वाड्यातील श्री गुरव कुटुंबीयांचे आम्हा सर्वांशी आपुलकीचे, प्रेमाचे संबंध आहेत....
तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल.......
धन्यवाद........

सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी>>>> गैरसमजातुन बाहेर या. Proud
काही माणसे कधीच चांगले वागत नाही.

अरे, हे वाचलंच नव्हतं आधी. खूप छान लिहिलंय
अँकी +१

१२७० म्हणजे नक्की कुठे? निंबाळकर तालमीच्या आसपास का? मी चिमण्या गणपती चौकातली Happy

१२७० म्हणजे नक्की कुठे? निंबाळकर तालमीच्या आसपास का? मी चिमण्या गणपती चौकातली स्मित >>>> सुजाता मस्तानीकडून मंडईकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर बाजीराव रोडच्या थोडं अलीकडे - फार पूर्वी (१९६०-७०) म्युन्सिपाल्टीची एक जागा होती - भटकी जनावरे डांबून ठेवायची जागा होती त्यासमोर.....

खूप छान लेख.

वाडयातल्या वास्तव्याने एक गोष्ट मात्र माझ्या मनावर बिंबली आहे. सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी.>>>> अगदी अगदी

अँकी आणि नीधप यांच्या प्रतिसादाशी सहमत.

पुरंदरे, फार पूर्वी नाही. माझ्या लहानपणी म्हणजे १९७०-८०च्या दशकातही तो पांजरपोळ होता की अस्तित्वात Happy
आता तिथे वर्किंग विमेन्स हॉस्टेल झालंय. चांगलं आहे असं ऐकलंय

अरे वा! विक्रमसिंह, तुम्ही आमचे शेजारीच की! मी सुद्धा बरीच वर्षे लोणीविके दामले आळीत राहत होते. ओकांच्या वाड्याशेजारी. स.पे. बद्दल भरभरून (कश्याही अर्थाने) बोलायला मी आजही तयार असते!! शरीराची स.पे. सुटली तरी मनातली स.पे. जात नाही हे खरं! Wink

शरीराची स.पे. सुटली तरी मनातली स.पे. जात नाही हे खरं! डोळा मारा>>>>> अगदी अगदी अकु.....
त्या ओक मंडळींशी माझ्या कुटुंबियांचे चांगले आपुलकीचे संबंध होते - माझ्या लहानपणीची गोष्ट असल्याने त्यावेळेसचे जास्त आठवत नाहिये .... त्यावेळेस तिथे एक आशीर्वाद मंगल कार्यालयही होते ना ??

अरे वा. आज वाडा अचानक उजळलेला दिसतोय. Happy . योगेंद्र कृपा.

हो आशिर्वाद त्याच गल्लीत. मी ६९ ते ७३ तिथे दामले वाड्यात होतो. शेजारी सुधीर गाडगीळ. त्यावेळेस ते मनोहर मध्ये होते.
त्या पांजर पोळास तेथे अड्डा म्हणायचे. आणि त्याच्या समोर आमचा धुडगुस चालायचा.

@शशांक पुरंदरे, हो का? ओकांच्या वाड्याची खरी लगबग कळायची ते निंबाळकर तालमीचा गणपती गल्लीत आला की! हौसेहौसेने रस्ताभर संस्कारभारतीच्या रांगोळ्या, गणोबांच्या गळ्यात तुळशीचा स्वहस्ते केलेला हार, पंचारती अशी सगळी थाटातली तयारी असायची. अजूनही असते. गणपती विसर्जनाच्या दिवशी निंबाळकर तालीम आणि गल्लीत फिरकल्याशिवाय राहवत नाही.
आशिर्वाद कार्यालयाच्या जागी झालेल्या इमारतीतच वास्तव्य होते! Happy

@ विक्रमसिंह, सकाळी सुधीर गाडगीळ व आमची / गृहसदस्यांची दुधाची बरणी हातात घेऊन रस्त्यात गाठ पडायची.

त्या रस्त्याच्या, गल्लीच्या व शेजार्‍यांच्या असंख्य आठवणी आहेत.

< सगळी माणसे मुळात चांगलीच असतात. आपण फक्त त्यांना चांगल वागण्याची संधी द्यायला हवी.>

एकदम पटले.

हे सगळं माझ्याच घराच्या आजूबाजूचं बोलताय.. :).. जबरी वाटतंय सगळी वर्णनं वाचून.. :).. मी पण बाराशे समथिंग सदाशिव पेठ. Happy
अकु, मनातली सपे. मस्त. Happy ..

Pages