भव्य गोष्टीवेल्हाळपणा (Movie Review - Bahubali - The Beginning)

Submitted by रसप on 11 July, 2015 - 23:42

वर्षभरापूर्वी एका मित्राने म्हटलं की, 'ह्यावर्षी मी मुंबई मॅरेथॉन धावणार!'
मी म्हटलं, ' बाबा रे, तू काही अ‍ॅथलीट नाहीस आणि सेलेब्रिटी तर त्याहूनही नाहीस, कशाला उगाच जीवाला त्रास करून घेतोयस?'
पण तो ठाम होता. 'हे स्पिरीट आहे रे, 'स्पिरीट'. तुमच्या शहरासाठीचं तुमचं 'स्पिरीट''
तो पूर्ण नाही, हाफ मॅरेथॉन धावला. पण हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठीसुद्धा सॉलिड जिद्द लागते. त्या जिद्दीला सलाम म्हणून काही दिवसांनी त्याला एक प्रशस्तीपत्रक तर मिळालंच, त्याहीपेक्षा मित्रांकडून क्वचितच मिळणारी कौतुकाची थाप आणि कायमस्वरूपी 'इज्जत' मिळाली !

एस एस राजामाउलीचा 'बाहुबली' अशीच एक हाफ मॅरेथॉन पूर्ण करतो. भव्य, अतिभव्य, अतिशयोक्तभव्य अश्या एकावर एक कडी करत जाणाऱ्या परदेशी इतिहासपटांच्या जोडीला भारताने जोधा-अकबर वगैरे काही मोजकेच चित्रपट उभे केले आहेत. जे उभे केले, त्यांतही लिखित इतिहासाकडून कथानकं उधार घेण्याकडे जास्त कल होता. पूर्णपणे काल्पनिक कथानकावरील एक भव्य इतिहासपट बनवणं, हा एक मोठा धोका राजामाउलीनी स्वीकारला. ह्या चित्रपटाचं नेमकं बजेट काय ह्यावर १७५ कोटींपासून ते २५० कोटींपर्यंत माहिती उपलब्ध आहे. १७५ कोटीसुद्धा काही चिल्लर नाही ! मुघल-ए-आझम बनवताना दिग्दर्शक के आसिफ ह्यांनी निर्माता शापूरजी पालनजींना पाण्यासारखा पैसा वाहवायला लावला होता, तेव्हा शापूरजींचे धाबे कसे दणाणले होते, ह्याच्या सुरस कथा बऱ्याच वाचायला मिळतात. पण वाहिलेल्या पैश्याचं जे चीज मुघल-ए-आझमच्या आरसेमहाल व इतर भव्य सेट्समध्ये झालं, तसंच चीज 'बाहुबली'नेही केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

'बाहुबली'ची भव्यता शीर्षकांपासूनच सुरु होते. अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकाला करून दिलेली ही भव्यतेची अनुभूती, अगदी अखेरपर्यंत ठेवलेली आहे. काही दृश्यांमध्ये स्पेशल इफेक्ट्स कळून येतात, पण ते गुळगुळीत रस्त्यासाठी टोल भरण्याचा त्रास नसल्यासारखं निरुपद्रवी आहे.
कल्पनेच्या पलीकडे असणारा अतिप्रचंड धबधबा आपल्याला पहिल्याच दृश्यात दिसतो. एका मध्यमवयीन स्त्रीच्या (राम्या कृष्णन) मागावर काही सैनिक लागलेले असतात. तिच्या कुशीत एक लहानगं बाळही असतं. ती त्या सैनिकांपासून वाचते, मात्र जखमी अवस्थेत पाण्याच्या त्या अथांग प्रवाहाला शरण जाते. पण त्या लहान बाळाला सुरक्षित ठेवते. हे बाळ ह्या महाकाय जलपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भूमिपुत्रांना मिळते आणि त्यांच्या टोळीच्या मालकिणीला दैवदत्त पुत्रप्राप्ती होते. लहानपणापासून जलपर्वताच्या वरच्या बाजूस काय असेल, ह्याची जबरदस्त ओढ असलेला हा पुत्र - शिवा - पर्वतकडा चढून जायचे असंख्य अयशस्वी प्रयत्न करत राहतो. अनेक वर्षांनंतर 'शिवा'च्या (प्रभास) प्रयत्नांना यश मिळतं आणि तो त्या अज्ञात दुनियेत पोहोचतो. इथे असलेले लोक त्यालाच काय, कुणालाच माहित नसतात. काय असतं तिथे ? कोण असतात ते लोक ? शिवा कोण असतो ? नेमका संघर्ष काय आणि कुणाचा आहे ? ही सगळी कहाणी बरीच मोठी आहे. इतकी मोठी की ती एका चित्रपटात मावलेलीच नाही ! उत्कंठा शमते आहे असं वाटत असताना ती परत ताणली जाते आणि चित्रपट त्याच अपूर्ण अवस्थेत संपतो ! 'बाहुबली - द कन्क्ल्युजन - इन २०१६' असं झळकतं.

768f8441f443e6d087d962dfc19605e9.jpg

बहुतेक लोकांना हे खरंच झेपत नाही. कारण भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकाला अश्या अतिभव्यतेची आणि अपूर्णतेची सवय नाही. त्यातही 'पुढील वर्षापर्यंत थांबा' असं सांगितलं जाणं, म्हणजे त्यांना एक थट्टाच वाटते ! काही अंशी बरोबरही आहे म्हणा. पुढील भाग वर्षाखेरीस किंवा दोन-तीन महिन्यांत प्रदर्शित करायला काहीच हरकत नव्हती. पण, निर्मात्यांचं गणित काय असेल ते अडीचशे कोटींची फोडणी जेव्हा बसते, तेव्हाच कळत असावं !

मूळ चित्रपट तेलुगुमध्ये बनलेला आहे. हिंदीत त्याची डब केलेली आवृत्ती आहे. ह्या विसंगातीशी जुळवून घेण्यात आपला थोडासा वेळ जातो. त्यात भर म्हणून काही ठिकाणी गंभीर रसभंग आहेत. उदा. - शेकडो लोक मिळून ओढत असलेल्या दोरखंडाला झोळ असणे, काहीही गरज नसताना मध्येच एक आयटम सॉंग येणे, सर्वदूर फरशीचं बांधकाम आणि दृष्टीपथातसुद्धा एखादंही झाड नसताना म्हातारीने मोठ्ठा खड्डा भरून काटक्या गोळा करणे आणि त्या काटक्या तिला तिच्या आसपास २४ तास मिळतच राहणे वगैरे. डब केलेले संवाद असल्याने त्यांत विशेष दम नाहीच, उलटपक्षी 'वो देखो तुम्हाला बेटा क्या कर रहा है.. वो देखो तुम्हारी मां क्या कर रही है..' सारख्या पुनरुक्तीही खटकतात.

मुख्य भूमिकेत 'प्रभास' खूप सहज वावरतो. त्यात वारंवार सुपरस्टार 'नागार्जुना'चा आभास होत राहतो. त्याची एनर्जी केवळ अप्रतिम आहे. काही अमानवी दृश्यं तो त्याच्या पिळदार देहयष्टी व आश्वासक शारीर अभिनयाने विश्वसनीय करवतो आणि त्याच वेळी 'अवंतिका' (तमन्ना) चा प्रेमिक म्हणून हळुवार अभिनयसुद्धा चांगलाच करतो.
त्याच्या विरुद्ध भूमिकेतल्या 'राणा दग्गुबती'ला आपण 'दम मारो दम' मध्ये बऱ्यापैकी मोठ्या आणि 'बेबी' व 'यह जवानी है दिवानी' मध्ये छोट्या भूमिकांत पाहिलं आहे. त्याची धिप्पाड देहयष्टी त्याचं इथलं काम आपोआपच करून जाते. माजलेल्या रानटी सांडाशी झुंजण्याचा प्रसंग असो की एका साम्राज्याचा अधिपती म्हणून मिरवणं असो, त्याला शोभून दिसतं.
तमन्नाच्या अंगावर एका दृश्यात असंख्य फुलपाखरं बसलेली दाखवले आहे, ते जराही अतिशयोक्त वाटू नये इतकी ती फुलासारखी सुंदर दिसली आहे. सुंदरीच्या वेशभूषेत नाजूक आणि एका लढवय्यीच्या भूमिकेत राकट दिसणं तिने चांगलं निभावून नेलं आहे.
राम्या कृष्णनने दिलेलं काम चोख केलं आहे आणि अनुष्का शेट्टीला ह्या भागात तरी विशेष काम नाहीच, कदाचित ती पुढच्या भागात जास्त दिसेल.
इतर सहाय्यक भूमिकांत सत्यराज (ज्याला आपण 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये दीपिकाच्या वडिलांच्या भूमिकेत पाहिलं होतं) आणि नासर लक्षात राहतातच. खासकरून सत्यराजचा 'कट्टप्पा' जबरदस्त !

रहमान आणि एम एम करीम, हे इलय्या राजांनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने हिंदीला दिलेले हल्लीचे अनमोल संगीतकार आहेत. करीमच्या क्रिमिनल, जिस्म, जख्म, सूर अश्या अनेक चित्रपटांच्या संगीताची मोहिनी रसिक श्रोत्यांच्या मनावरून सहजासहजी उतरणारी नाही. इथेही करीम उत्कृष्ट मेलोडी देतात. खासकरून 'पंछी बोले..' हे गाणं तर संपूच नये असं वाटावं, इतकं गोड आहे !

सेंथिल कुमार ह्यांचं छायाचित्रण आणि मनू जगध ह्यांचं कलादिग्दर्शन निश्चितच दाद देण्यायोग्य आहे. माहिष्मतीचा राजमहाल, अद्भुतरम्य निसर्ग, प्रत्येक दृश्यात जपलेली भव्यता केवळ अप्रतिम !

राजामाउलींचं अभिनंदन आधीच करून झालं आहे. तरी एक कहाणी सांगायला सात तासांची आवश्यकता भासणं, हे बरोबर आहे की नाही हे दुसरा भाग पाहिल्यावरच नेमकं कळेल. पण ह्या पहिल्या भागाची कहाणीसुद्धा आटोपशीर करायला हवीच होती. केवळ भव्यतेच्या ध्यासापोटी इतर काही ठिकाणी थोडी डोळेझाक केली असावी की काय असं वाटतं. अनावश्यक प्रसंग, लांबण, गोष्टीवेल्हाळपणा थोडा टाळायला हवा होता.
मात्र ह्या सगळ्याला सहन करून 'बाहुबली' एकदा तरी पाहावा असाच आहे. कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अ‍ॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
वन स्टार फॉर द एफर्ट.

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-bahubali-beginning.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १२ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

MB Image.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच पाहिला बाहुबली . अतिप्रचन्ड आवडला ...

अतिभव्यता आहेच , पण व्ही एफ एक्स आणि ग्राफिक्स देखील मस्तच!

मुळात भारतीय संस्कॄतीला घट्ट धरुन आहे , आणि असे चित्रपट अन्य पौराणिक , ऐतिहासिक / मिथकान्वर आधारित देखील बनावेत अशी मनापासून इच्छा आहे .

छत्रपती शिवाजी महाराज अथवा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या इतिहासावर आधारित अशा फिल्म्स आल्या तर स्वागतच!

मस्त आहे. मला आवडला.
चांदोबातील गोष्ट आहे > अगदी अगदी! मला चांदोबातल्या गोष्टी आवडायच्या. आणि चित्रपट बनवताना या माध्यमाची ताकद ओतली आहे. प्रेक्षणीय आहे चित्रपट! (नवर्‍याला मात्र अज्जिबात आवडला नाही). रात्री १० चा शो सुद्धा फुल होता.

स्पॉईलर अलर्टः
मला पडलेला प्रश्नः
सिवागमी(Sivagami) ही मुळ राजाच्या मोठ्या अपंग मुलाची पत्नी आहे.
हा मोठा मुलगा लायक नसल्यामुळे छोट्या मुलगा राजा बनतो. हा छोटा मुलगा (जो राजा बनतो) तो कसा मरतो?
त्याची बायको बाहुबलीला जन्म देताना मरते.
या सगळ्याता "मुख्य विश्वस्त" हे पद सिवागमी कडे कसे येते? कोणत्या अधिकाराने?
एकतरा तिचा नवरा जो की मुळ राजाचा मोठा मुलगा आहे तो एकतर स्वतः राजा बनायला हवा किंवा "मुख्य विश्वस्त"?
किंवा मग डायरेक्ट बाहुबलीलाच राजाचा मुलगा म्हणुन भावी राजा का घोषित करत नाही ही सिवागमी?
राजानंतर त्याचा एकुलता एक मुलगा राजा बनणे बरोबर नाही का? बाहुबली आणि तिच्या स्वतःच्या मुलामधे स्पर्धा लागुच कशी शकते?
सिवागमी सगळॅ अधिकार स्वत:कडे कोणत्या बेसिस वर घेते?
----
हा प्रश्न मी काहीतरी मिस केले असे समजुन विचारले आहेत. कथेतच लुपहोल्स असतील तर माहीत नाही.

हा मोठा मुलगा लायक नसल्यामुळे छोट्या मुलगा राजा बनतो. हा छोटा मुलगा (जो राजा बनतो) तो कसा मरतो?

>> 'अकाली मृत्यू' इतकाच संदर्भ आहे. त्याचा मृत्यू नैसर्गिकच असावा. कदाचित तो कसा मरतो (युद्धातील जखमा किंवा इतर काही आजार वगैरे) हे आधी चित्रपटात असेल, पण लांबी कमी करताना ते संपादित केलं असावं. असंही 'तो अकाली मेला' इतपत संदर्भ कहाणीला पुढे नेण्यासाठी पुरेसा होताच म्हणून.

त्याची बायको बाहुबलीला जन्म देताना मरते.
या सगळ्याता "मुख्य विश्वस्त" हे पद सिवागमी कडे कसे येते? कोणत्या अधिकाराने?
एकतरा तिचा नवरा जो की मुळ राजाचा मोठा मुलगा आहे तो एकतर स्वतः राजा बनायला हवा किंवा "मुख्य विश्वस्त"?
किंवा मग डायरेक्ट बाहुबलीलाच राजाचा मुलगा म्हणुन भावी राजा का घोषित करत नाही ही सिवागमी?
राजानंतर त्याचा एकुलता एक मुलगा राजा बनणे बरोबर नाही का? बाहुबली आणि तिच्या स्वतःच्या मुलामधे स्पर्धा लागुच कशी शकते?
सिवागमी सगळॅ अधिकार स्वत:कडे कोणत्या बेसिस वर घेते?

>> मूळ राजाचा मोठा मुलगा (सिवागामीचा पती व भल्लालदेवचा पिता) हा मद्यपी व गैरवर्तनी असल्याने त्याला राजा केलं जात नाही. तो 'नालायक' असतो, त्याच्या अपंगपणाशी त्या निर्णयाचा संबंध नसतो. म्हणूनच लहान भाऊ व त्याची पत्नी अकाली मृत्यू पावल्यावर ते पद त्याच्याकडे येत नाही.
डायरेक्ट बाहुबलीला राजा घोषित करण्यात दोन अडचणी असाव्यात. एक तर वय आणि तो लहान भावाचा मुलगा असतो आणि मोठ्या भावालाही मुलगा (भल्लालदेव) झालेला असतो. पुन्हा कॉन्फ्लीक्ट असा की लहान भावाचा असला, तरी राजाचा मुलगा आणि राजाचा नसला, तरी मोठ्या भावाचा मुलगा. मग बाहुबली किंवा भल्लालदेव मधला एक निवडताना त्यांचं कर्तृत्व लक्षात घ्यायला हवं, वारसा नाही. म्हणून युद्धात जो अधिक पराक्रम गाजवेल, तो राजा, असं ठरतं.

म्हणून युद्धात जो अधिक पराक्रम गाजवेल, तो राजा, असं ठरतं. >> ईतपर्यंत कळल होत. पण हे सगळे "ठरवण्याचे" अधिकार सिवगमी ला कसे मिळतात? प्रधानमंत्री, मंत्रीमंडळ किंवा सिवगमीच्या अपंग नव-याला का मिळत नाही. ते सगळे योग्य उत्तराधिकारी(विश्वस्त म्हणुन) नाहीत का?

काल पाहिला. खुप आवडला. मध्ये मध्ये सौदिंडीयन अतिरेकीपणा आहे. पण ते माफ.

असाच सहज विचार करत होते. जर हा चित्रपट बॉलिवूड मध्ये बनला असता तर काय कास्टींग पहायला आवडले असते. मी निवडलेले कलाकार असे आहेत:

अवंतिका -आलिया
देवसेना - प्रियांका चोप्रा/ करीना
शिवगामि - तब्बू/ श्रीदेवी
भल्लाल - ह्रितिक
कटप्पा- आमिर खान/ संजय दत्त
भल्लालचा पिता - नसिरुद्दीन शाह
बाहुबली - तुलनेने नवा चेहरा उदा. पुलकित सम्राट

प्रभास काय देखणा दिसतो..अगदी चपखलपणे शोभतो भूमिकेत..मला फार आवडला..
मला हिंदी व्हर्जन मधे ह्रितीक आवडला असता बाहुबली म्हणून!

इथे कुणीतरी विचारले होते की देवसेना ला आसपास एकही झाड नसताना गोळा करायला काटक्या कुठून मिळतात म्हणून.

मला आठवते त्याप्रमाणे भल्लाल देव जेव्हा देवसेना ला भेटण्यासाठी येतो तेव्हा त्याचे सैनिक तिला काटक्यांनी ढोसत असतात. अश्या प्रत्येक वेळी अंगावर पडलेल्या काड्या ती जमा करते नंतर एकसाथ सगळा वचपा काढण्यासाठी! Wink

बघायला घेतलाय..खरेच भव्यदिव्य. पण ठिकठिकाणी उगाचच्या उगाच..
त्यामुळे पहिलेच १५-२० मिनिटांतच जाम बोर झालो..
तरी चिकाटी सोडली नाही..

राखी सावंत सारखे मेरे करन अर्जुन आयेंगेच्या चालीवर मेरा बाहु बली आयेगा बघूनही चिकाटी सोडली नाहीये हे विशेष..

हिरोईन काहीही न करता पटते याची फार गंमत वाटली..
आम्ही काय काय पापड तळलेत ते आमचे आम्हाला माहीत..

असो,
चिकाटी न सोडायचे कारण "कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?" यामागील संदर्भ जाणून घेतल्यास त्या जोक्सने होणारे इरीटेशन कमी होईल अशी आशा आहे.

बघतोय...
क्रमशः

>> राखी सावंत सारखे मेरे करन अर्जुन आयेंगेच्या चालीवर... <<

'राखी गुलजार' म्हणायचं आहे ना तुम्हाला ? राखी गुलजार आणि राखी सावंत ह्यांच्यात 'रक्षाबंधन' आणि 'व्हॅलेण्टाईन्स डे' इतका फरक आहे !

हिरोईन काहीही न करता पटते याची फार गंमत वाटली..
आम्ही काय काय पापड तळलेत ते आमचे आम्हाला माहीत..

आधी आकाशात घुसलेल्या जलपर्वतावरुन १०० वेळा खाली पडताना एक ओरखडाही पडणार नाही इतके मजबुत शरीर आणा, जिला अद्याप पाहिलेलेही नाही तिचा ध्यास घेऊन पर्वत चढण्याइतकी हिंमत आणा आणि मग जा हिरोईन पटवायला. तिचा ध्यास घेऊन तो पर्वत चढुन आला हे ऐकताच ती अजुन पुढे काही विचार करतच नाही. असले हिरे रोज रोज नाही मिळत. इतकी हिंमत असेल तर मग पापड तळायची वेळ येणार नाही.

तिचा ध्यास घेऊन तो पर्वत चढुन आला हे ऐकताच ...
>

कुठल्याही प्रकारचे वेरीफिकेशन न करता.. वाह, अश्याच तर मुली नाही सापडल्या कधी Wink

एवढा अजेय जलपर्वत चढला ना तो. असं कसं म्हणता??
>>

गिर्यारोहक चढतच असतात, त्याचा प्रेमाशी काय संबध..

आणि हो, तिच्यासाठी नाही चढला तो..
त्याला तो मुखवटा नंतर दिसला, आधी १०० वेळा बालपणापासून चढत होताच ना तो.

बाकी नुसते मुखवटा आणि आपले बाह्य सौंदर्य बघून भुललेल्या मुलाला कसा होकार दिला तिने..

कुठल्याही प्रकारचे वेरीफिकेशन न करता.. वाह, अश्याच तर मुली नाही सापडल्या कधी

अहो भाऊ, तो मुखवटा दाखवतो जो तिच्या मते झ-यातुन वाहुन खाली गेलेला असतो. ते बघितल्यावर तिची खात्री पटते.

बालपणापासुन चढायचे प्रयत्न करत होताच , पण चढला का एकदातरी?? ज्या फांदीच्या दिशेने तो झेप घ्याय्चा नेमका तिथुनच तो खाली कोसळायचा. पण त्या फांदीच्या पुढे तिचा हात दिसताच ती झेप जाते की नेमकी फांदीवर. याला प्रेम म्हणतात (सिनेमात).

आणि प्रेम एस्टब्लिश करायला तुम्हाला जितका वेळ लागतो तितका त्यांना लावला असता ना तर बाहुबली कंक्लुडींग २०१६ ला न येता बाहुबली कंटिन्युइंग २०१६ असा बोर्ड शेवट आला असता आणि बाहुबली कंक्लुडींग २०१७ ला आला असता. मग तुम्हीच परत माथे फोडुन घेतले असते. म्हणुन त्यांनी प्रेम आवरते घेतले.

आणि प्रेम एस्टब्लिश करायला तुम्हाला जितका वेळ लागतो तितका त्यांना लावला असता ना तर ...
>>>>

हीच तर कमाल असते, कमीत कमी द्रुश्यात परीणामकारक आणि विश्वासार्ह बनवणे.
प्रेम त्याच द्रुश्यात दाखवले नसते, एकतर्फी दाखवले असते आणि हळूहळू फुलताना दाखवले असते तर चालले असते.

ठिक आहे, तुम्ही करत बसा हे सगळे. बाहुबलीवाल्यांना भव्यदिव्य दाखवताना हे असले चुट्पुट दाखवायला वेळ नाही मिळाला, काय करणार? शिवाडू राजवाड्यात जाणे महत्वाचे होते, कथा त्यामुळे पुढे जाणार होती. प्रेमात पडायला इथे हिरोईन नसती तर त्याला दुसरे काहीतरी कारण मिळालेच असते. कारण इथे कारण महत्वाचे नव्हतेच.

जावूद्या ओ
चांदोबाच्या गोष्टीत आणि प्रेमात कशाला शोधताय logic आणि कारण.
तुम्ही तमन्ना बघा आम्ही प्रभास बघतो

प्रभाससारखा मुलगा असेल तर कोणतीही मुलगी बिना एफर्ट्स पटेल
>>>

एक्झॅक्टली रीया, हाच चुकीचा संदेश जातो आणि याचा परीणाम भारतात प्लेबॉय संस्कृती फोफावण्यात होईल.

बाहुबलीवाल्यांना भव्यदिव्य दाखवताना हे असले चुट्पुट दाखवायला वेळ नाही मिळाला, काय करणार?
>>
कितीही भव्यदिव्य दाखवले तरी इमोशन्स हा चित्रपटाचा आत्मा असतो, भव्यदिव्यता तुम्हाला क्षणिक भुरळ घालायचे काम करते बास्स !

एक्झॅक्टली रीया, हाच चुकीचा संदेश जातो आणि याचा परीणाम भारतात प्लेबॉय संस्कृती फोफावण्यात होईल.
>>
बरं ठिकेय!
आणखी काय म्हणणं आहे?

भारतातली प्रत्येक मुलगी चित्रपट बघून मुलगा पटवावा वा मुलाला पटावी इतकी मुर्ख वाटते की काय तुम्हाला? आणि एखादी असेलच अशी मुर्ख तर ती फक्त बाहुबली बघुनच हे शिकेल की काय?

तद्दन फालतू कमेंट आणि फालतू मत.
असल्या फालतू विषयावर चर्चा करण्यात मला इंटरेस्ट नाही. तुमचं चालू द्या.

भारतात प्लेबॉय संस्कृती
>>
वा वा वा! संस्कृती रक्षक!

तुर्तास इथेच थांबतो, नवीन धाग्याला विषय मिळाला आहे, रात्री किंवा उद्या मांडतो, तुर्तास काम करतो Happy

एक्झॅक्टली रीया, हाच चुकीचा संदेश जातो आणि याचा परीणाम भारतात प्लेबॉय संस्कृती फोफावण्यात होईल.

ओ भाऊ, इथे संस्कृती कसली फोफावतेय? इथे ती आधीपासुनच आहे. शकुंतलाने दुष्यंताशी गांधर्वविवाह केला तो काय त्याला मॅट्रिमोनी साईटवर पाहुन, नंतर त्याच्यामागे गुप्तचर लावुन त्याच्या पार पाच पिढ्यापर्यंत इतिहास तपासुन?? संस्कृतीच्या नावाने हाळी द्यायच्या आधी अभ्यास करा.

दुनियादारीत सई कशी काय पटते रे स्वप्नील जोशीला? फक्त रूमाल उचलून? त्यापेक्षा त्याने तिच्यावर 'रूमाल' टाकला असता तरी बाकीच्यांनी नाद सोडला असता ना. Lol

अर्र्र...... काय हे. मी आज घरी होते तर जरा टिपी करत होते. तुम्ही कारणच नाहीसे केलेत हो. आता काय करु? कोतबो???

Pages